Home Blog

भाजयुमोच्या जिल्हा उपाध्यक्षपदी योगेश ठाकूर; पाचोरा शहरातील युवा नेतृत्वाला नवी ओळख

Loading

पाचोरा – शहरातील भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या संघटनात्मक कार्यात सातत्याने सक्रिय राहून युवकांमध्ये पक्ष विचार रुजविणारे अभ्यासू आणि तळागाळाशी घट्ट नाळ जोडून काम करणारे योगेश मधुकर ठाकूर यांची भारतीय जनता युवा मोर्चा, जळगाव पश्चिम जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्ष संघटनेतील सातत्यपूर्ण कामगिरी, कार्यकर्त्यांशी असलेला समन्वय, युवकांमध्ये निर्माण केलेला प्रभाव आणि संघटन वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांची दखल घेत पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे पाचोरा शहरासह संपूर्ण जळगाव पश्चिम जिल्ह्यात भाजयुमोच्या कार्याला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. योगेश ठाकूर यांनी राजकीय क्षेत्रात केवळ पद सांभाळण्यापुरते कार्य न करता संघटन उभे करण्यासाठी प्रत्यक्ष मैदानात उतरून काम केले आहे. भारतीय जनता युवा मोर्चामध्ये कार्यकारिणी सदस्य म्हणून सुरुवात करत त्यांनी शहर चिटणीस, शहर सरचिटणीस आणि शहराध्यक्ष या विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या. प्रत्येक पदावर काम करताना त्यांनी कार्यकर्त्यांना जोडण्यावर, युवकांना पक्षाच्या विचारधारेकडे आकर्षित करण्यावर आणि संघटन मजबूत करण्यावर भर दिला. त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये नियोजन, सातत्य, संवादकौशल्य आणि कार्यकर्त्यांशी आत्मीय संबंध यामुळे त्यांना युवा कार्यकर्त्यांमध्ये विशेष ओळख मिळाली. पाचोरा शहरात युवकांना संघटित करून सामाजिक, राजकीय आणि जनहिताच्या विषयांवर सक्रिय भूमिका घेण्यासाठी त्यांनी सातत्याने पुढाकार घेतला. विविध सामाजिक उपक्रम, रक्तदान शिबिरे, स्वच्छता अभियान, युवक मेळावे, शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे तसेच पक्षाच्या विविध कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर युवकांचा सहभाग वाढविण्यासाठी त्यांनी विशेष मेहनत घेतली. पक्षाचे विचार सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविताना त्यांनी संवाद आणि प्रत्यक्ष संपर्क याला प्राधान्य दिले. त्यामुळे पाचोरा परिसरात भाजयुमोच्या कार्यात मोठ्या प्रमाणावर नव्या युवकांचा सहभाग वाढताना दिसून आला. पाचोरा-भडगाव विधानसभा प्रमुख अमोल भाऊ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली योगेश ठाकूर यांनी पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासाठी सातत्याने काम केले. बूथस्तरावरील संघटन मजबूत करणे, युवकांमध्ये पक्षाची पकड वाढविणे आणि प्रत्येक विभागात कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण करणे यासाठी त्यांनी वेळोवेळी विशेष मोहिमा राबवल्या. निवडणुकीच्या काळात तसेच विविध संघटनात्मक कार्यक्रमांमध्ये त्यांनी घेतलेली मेहनत आणि कार्यकर्त्यांना एकत्र ठेवण्याची क्षमता यामुळे त्यांच्याकडे पक्ष नेतृत्वाने विश्वासाने पाहिले. त्यांच्या नियुक्तीमुळे जळगाव पश्चिम जिल्ह्यात भाजयुमोच्या माध्यमातून युवकांमध्ये नवे नेतृत्व निर्माण होण्यास चालना मिळेल, असे मत अनेक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. युवकांमध्ये राजकीय जाणीव निर्माण करताना सामाजिक जबाबदारीची जाणीव देखील रुजविण्याचा त्यांचा प्रयत्न कायम राहिला आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली भाजयुमोचे कार्य अधिक व्यापक स्वरूपात पुढे जाईल, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. योगेश ठाकूर यांच्या निवडीची बातमी समोर येताच पाचोरा शहरात भाजयुमो आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. विविध स्तरांवरील पदाधिकारी, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, मित्रपरिवार तसेच युवकांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देत त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी विश्वास व्यक्त केला आहे. राजकीय क्षेत्रात शांत, संयमी आणि संघटनाला प्राधान्य देणारे कार्यकर्ते म्हणून योगेश ठाकूर यांची ओळख निर्माण झाली आहे. पद मिळाल्यानंतरही तळागाळातील कार्यकर्त्यांशी असलेला त्यांचा संपर्क आणि साधेपणा कायम राहिला असल्याने युवकांमध्ये त्यांच्याबद्दल विशेष आपुलकी पाहायला मिळते. आगामी काळात जळगाव पश्चिम जिल्ह्यात भाजयुमोचे संघटन अधिक प्रभावीपणे उभे करण्यासाठी ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

पाचोरातील शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी; पाटील ट्रॅक्टरकडून New Holland 3600 TX Super वर आकर्षक लाभ योजना

Loading

पाचोरा – शहरासह संपूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आधुनिक शेतीला गती देणारी विशेष ऑफर पाटील ट्रॅक्टरकडून जाहीर करण्यात आली असून या योजनेमुळे पाचोरा परिसरातील शेतकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. शेतीतील वाढते यांत्रिकीकरण, कमी वेळेत अधिक उत्पादनाची गरज आणि मजबूत ट्रॅक्टरची वाढती मागणी लक्षात घेता “10 वर 25 ची ताकद – New Holland 3600 TX Super” ही योजना पाचोरात चर्चेचा विषय ठरत आहे. पाचोरा व परिसरातील शेतकरी सध्या शेतीकामासाठी दमदार आणि इंधन बचतीचा ट्रॅक्टर निवडण्यावर भर देत आहेत. अशा परिस्थितीत New Holland 3600 TX Super हा ट्रॅक्टर मजबूत इंजिन, टिकाऊ गुणवत्ता आणि उत्कृष्ट कार्यक्षमतेमुळे पाचोरातील शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरू लागला आहे. नांगरणी, रोटाव्हेटर, पेरणी, ट्रॉली वाहतूक तसेच ऊस, कापूस आणि केळी यांसारख्या पिकांच्या शेतीसाठी हा ट्रॅक्टर प्रभावी ठरत असल्याचे अनेक शेतकरी सांगत आहेत. पाचोरातील पाटील ट्रॅक्टरने जाहीर केलेल्या या विशेष ऑफरनुसार केवळ ₹10,000 बुकिंग रकमेवर ग्राहकांना ₹25,000 पर्यंतचा विशेष लाभ दिला जाणार आहे. यासोबतच ₹15,000 पर्यंत अतिरिक्त फायदा मिळणार असल्याने पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ही योजना आर्थिकदृष्ट्या फायदेशीर मानली जात आहे. कमी खर्चात अधिक शक्तिशाली ट्रॅक्टर मिळवण्याची संधी असल्यामुळे अनेक ग्राहक प्रत्यक्ष शोरूममध्ये भेट देत माहिती घेत आहेत. विशेष म्हणजे पाचोरा परिसरातील ग्राहकांसाठी ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध असून 20 मे 2026 पर्यंत बुकिंग व डिलिव्हरी पूर्ण करणाऱ्या ग्राहकांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे पाचोरातील शेतकऱ्यांनी वेळ न दवडता लवकर बुकिंग करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ट्रॅक्टरसोबत फायनान्स सुविधा, सोपे हप्ते आणि तांत्रिक मार्गदर्शनही उपलब्ध करून दिले जात असल्याने ग्रामीण भागातील ग्राहकांचा प्रतिसाद वाढताना दिसत आहे. पाचोरा तालुक्यात शेतीसाठी आधुनिक साधनांचा वापर वाढत असताना अशा ऑफरमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळत आहे. शेतीतील मेहनत कमी करून उत्पादनक्षमता वाढवण्यासाठी सक्षम ट्रॅक्टरची आवश्यकता निर्माण झाली असून त्याच गरजेला ओळखून पाटील ट्रॅक्टरने ही योजना आणल्याचे सांगितले जात आहे. विशेषतः पाचोरातील तरुण शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करत असल्यामुळे अशा ऑफरना चांगला प्रतिसाद मिळत आहे. अधिक माहितीसाठी ग्राहकांनी +91 89835 61334 किंवा +91 91755 61334 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. पाटील ट्रॅक्टरचे शोरूम गुलाब नगर, मुंबई-नागपूर हायवे, HP पेट्रोल पंप समोर, भडगाव रोड, पाचोरा, जिल्हा जळगाव येथे असून पाचोरा शहरासह ग्रामीण भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर या ऑफरचा लाभ घेण्यासाठी पुढे येत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

जिद्दीच्या जोरावर भाजी विक्रेत्याच्या मुलाची भरारी ; श्री गो से हायस्कूलचा हर्षल चौधरी ठरला यशाचा प्रेरणादायी चेहरा

Loading

पाचोरा – शहरातील भारतीय नगर परिसरातील एका साध्या भाड्याच्या घरातून उभा राहिलेला संघर्ष आज संपूर्ण शहरासाठी अभिमानाचा विषय ठरला आहे. आर्थिक अडचणी, मर्यादित साधने आणि प्रतिकूल परिस्थिती यांना न जुमानता भाजीपाला विक्रेता शैलेंद्र निंबा चौधरी यांचा मुलगा चिरंजीव हर्षल शैलेंद्र चौधरी याने मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत ९३.४० टक्के गुण मिळवत पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री गो से हायस्कूल पाचोरा या विद्यालयातून द्वितीय क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे प्रथम क्रमांक केवळ अर्ध्या टक्क्याने हुकला असला तरी हर्षलने मिळवलेले यश हे अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. शहरातील भाजीपाला मार्केटमध्ये रोज पहाटेपासून संध्याकाळपर्यंत मेहनत करणारे शैलेंद्र चौधरी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह अत्यंत प्रामाणिकपणे करत आहेत. हातावर पोट असलेल्या या कुटुंबासाठी प्रत्येक दिवस हा संघर्षाचा असतो. घरामध्ये आधुनिक शैक्षणिक सुविधा नाहीत, स्वतंत्र अभ्यासिका नाही, महागडे क्लासेस नाहीत, तरीही मुलाने मोठे व्हावे, शिक्षण घेऊन स्वतःचे आयुष्य घडवावे हीच त्यांची एकमेव इच्छा होती. आपल्या कष्टाच्या कमाईतून त्यांनी मुलांना शिक्षणासाठी श्री गो से हायस्कूलमध्ये प्रवेश दिला आणि मुलानेही त्या विश्वासाचे सोनं करून दाखवले. हर्षल चौधरी हा लहानपणापासूनच अभ्यासू आणि शांत स्वभावाचा विद्यार्थी म्हणून ओळखला जात होता. शाळेत नियमित उपस्थिती, अभ्यासातील सातत्य आणि शिक्षकांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन ही त्याची खासियत होती. अनेकदा घरातील परिस्थितीमुळे अभ्यासात अडथळे आले, तरी त्याने हार मानली नाही. इतर मुलांप्रमाणे महागडी साधने नसतानाही पुस्तकांशी मैत्री करत त्याने स्वतःला अभ्यासात झोकून दिले. “अभ्यास हाच माझा मार्ग आहे,” ही भावना त्याच्या प्रत्येक कृतीतून दिसून येत होती. हर्षलने वेळेचे अत्यंत नियोजनबद्ध व्यवस्थापन केले. सकाळपासून रात्रीपर्यंतचा प्रत्येक क्षण त्याने योग्य पद्धतीने वापरला. मोबाईल, मनोरंजन आणि इतर आकर्षणांपासून स्वतःला दूर ठेवत त्याने ध्येयावर लक्ष केंद्रित केले. अनेकदा वडिलांच्या दुकानात मदत करूनही त्याने अभ्यासात खंड पडू दिला नाही. आपल्या आई-वडिलांच्या कष्टांची जाणीव त्याला होती आणि त्या कष्टांचे चीज करायचे, हीच त्याच्या मनातील सर्वात मोठी प्रेरणा होती. या यशामागे श्री गो से हायस्कूलच्या शिक्षकांचेही मोठे योगदान असल्याचे हर्षलने सांगितले. मुख्याध्यापक एन. आर. ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना केवळ शिक्षणच नव्हे तर आत्मविश्वास आणि जिद्द देण्याचे काम आपल्या शिक्षकांमार्फत व वेळेप्रसंगी प्रत्यक्ष लक्ष केंद्रित केले शिक्षकांनी सुद्धा वेळोवेळी घेतलेले मार्गदर्शन, सराव परीक्षा, शंका निरसन आणि मानसिक आधार यामुळेच आपण हे यश मिळवू शकलो, अशी भावना हर्षलने व्यक्त केली. उपमुख्याध्यापक आर. एल. पाटील, पर्यवेक्षिका सौ. गोहिल, आर. बी. बांठिया, महेश कौडिण्य यांच्यासह सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सातत्याने परिश्रम घेतले. हर्षलच्या यशानंतर घडलेली एक घटना मात्र संपूर्ण शहराच्या मनाला स्पर्शून गेली. निकाल जाहीर झाल्यानंतर मुख्याध्यापक एन. आर. ठाकरे यांनी आपल्या सहकारी शिक्षकांसह थेट भाजी मार्केटमध्ये जाऊन शैलेंद्र चौधरी यांच्या दुकानावर त्यांचा सत्कार केला. हातात फुलांचा गुच्छ, चेहऱ्यावर आनंद आणि डोळ्यांत अभिमान घेऊन शिक्षकांनी भाजी विक्रेत्या वडिलांना मिठी मारत मुलाच्या यशाबद्दल अभिनंदन केले. हा प्रसंग पाहण्यासाठी बाजारातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते. शिक्षण संस्था आणि शिक्षक विद्यार्थ्यांच्या कुटुंबाशी किती आत्मीयतेने जोडलेले असतात, याचे हे सुंदर उदाहरण ठरले. शैलेंद्र चौधरी यांनाही या क्षणी भावना अनावर झाल्या. “मी आयुष्यभर मेहनत केली, पण मुलाने आज माझ्या कष्टाचे चीज केले,” असे म्हणताना त्यांचा आवाज भरून आला होता. बाजारात भाजी विकणाऱ्या एका सामान्य वडिलांच्या डोळ्यांत त्या दिवशी अभिमानाचे तेज स्पष्ट दिसत होते. आर्थिक परिस्थिती कितीही कठीण असली तरी मुलांना शिक्षण दिल्यास ते नक्कीच यश मिळवू शकतात, हा विश्वास या घटनेने अधिक दृढ झाला. हर्षलच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष दिलीपभाऊ वाघ, चेअरमन नानासाहेब संजय वाघ, मानद सचिव तथा उच्च न्यायालयातील नामांकित विधितज्ञ ॲड. महेशदादा देशमुख, व्हाईस चेअरमन तथा उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सिनेट सदस्य नानासाहेब विलास जोशी, शालेय समिती चेअरमन खलील देशमुख, तांत्रिक विभागाचे चेअरमन वासुदेवआण्णा महाजन, पिटीसीचे ज्येष्ठ संचालक सतीश चौधरी उर्फ भोला आप्पा यांनी विशेष अभिनंदन केले आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला चालना देण्यासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील असून हर्षलसारखे विद्यार्थी संस्थेचा नावलौकिक वाढवत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच झुंज वृत्तपत्र व ध्येय न्युजचे संपादक तथा ध्येय ॲकेडमीचे संचालक संदीप महाजन आणि परिवारातर्फे चिरंजीव हर्षल चौधरी याचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले असून त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. संघर्षमय परिस्थितीतून उभे राहत शिक्षणाच्या जोरावर यश संपादन करणाऱ्या हर्षलसारख्या विद्यार्थ्यांमुळे समाजातील अनेक कुटुंबांना नवी प्रेरणा मिळत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. आजच्या स्पर्धेच्या युगात अनेक विद्यार्थी साधनांच्या अभावाचे कारण पुढे करतात. मात्र हर्षल चौधरी याने परिस्थितीला दोष न देता स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवला आणि यशाची नवी उंची गाठली. त्याचा संघर्ष, त्याची जिद्द आणि कुटुंबासाठी काहीतरी मोठे करण्याची इच्छा हीच त्याच्या यशाची खरी ताकद ठरली. पाचोरा शहरात सध्या सर्वत्र हर्षल चौधरी आणि त्याच्या कुटुंबाचे कौतुक होत आहे. एका भाजी विक्रेत्याच्या मुलाने आपल्या गुणवत्तेच्या जोरावर मिळवलेले हे यश केवळ गुणांचे यश नाही, तर मेहनत, संघर्ष आणि शिक्षणाच्या सामर्थ्याचा जिवंत पुरावा आहे. भविष्यात मोठे अधिकारी बनून समाजासाठी काम करण्याचे स्वप्न हर्षलने डोळ्यांत साठवले असून त्याच्या या प्रवासासाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे।

ग्रामीण भागातील SBI शाखेचा जिव्हाळ्याचा चेहरा; जारगाव शाखेतील सेवाभावाने ग्राहक भारावले

Loading

पाचोराआजच्या धावपळीच्या आणि तांत्रिक युगात बँकिंग सेवा अधिक वेगवान झाल्या असल्या तरी अनेक ठिकाणी ग्राहकांना अजूनही असहकार्य, उडवाउडवीची उत्तरे आणि औपचारिक वागणूक अनुभवायला मिळते. मात्र पाचोरा तालुक्यातील जारगाव येथील भारतीय स्टेट बँक शाखेत चित्र याच्या अगदी उलट पाहायला मिळते. ग्रामीण भागातील ही शाखा आज अनेक ग्राहकांसाठी केवळ आर्थिक व्यवहाराचे केंद्र न राहता विश्वास, आपुलकी आणि माणुसकी जपणारी संस्था म्हणून ओळख निर्माण करत आहे. जारगाव SBI शाखेत येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला सन्मानाने वागवले जाते. शाखा व्यवस्थापक संगीता शिंदे मॅडम, जेस्ट कॅशियर सुनील महाजन, चेतन वाकुडसर, जयदिपभाऊ कोळी यांच्यासह संपूर्ण SBI परिवार ग्राहकांशी अत्यंत नम्रतेने संवाद साधताना दिसतो. ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणावर शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, महिला बचत गट, मजूर वर्ग आणि अल्पशिक्षित नागरिक या शाखेशी जोडलेले आहेत. त्यामुळे येथे फक्त व्यवहार पूर्ण करणे एवढ्यावर काम मर्यादित राहत नाही, तर प्रत्येकाला समजून घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याची मानसिकता जपली जाते. विशेष म्हणजे शहरातील SBI मुख्य शाखेमध्ये अनेक ग्राहकांना अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने काही ग्राहकांनी खासगी बँकांकडे वळण्याचा मार्ग स्वीकारला. अनेकांनी HDFC बँकेकडे खाते स्थलांतरित केले, तर काहींनी विवेकानंद SBI शाखा आणि जारगाव SBI शाखेची निवड केली. त्यामुळे जारगाव शाखेवर ग्राहकांचा वाढता ताण स्पष्टपणे जाणवतो. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणावर ग्राहकवर्ग येत असूनही येथील कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर कधीही त्रासिकपणा दिसून येत नाही. उलट प्रत्येकाला संयमाने सेवा देण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू असतो. या शाखेतील सर्वाधिक लक्ष वेधून घेणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे जगदीश तुकाराम पाटील. माजी सैनिक असलेले जगदीश पाटील यांची नियुक्ती सुरक्षा रक्षक म्हणून असली तरी प्रत्यक्षात ते ग्राहक सेवेत पूर्णवेळ कार्यरत असल्याचे चित्र रोज पाहायला मिळते. शाखेत प्रवेश करणाऱ्या अनेक ग्रामीण ग्राहकांना फॉर्म कसे भरायचे, स्लिप कशी लिहायची, कागदपत्रांची पूर्तता कशी करायची याबाबत अडचणी येतात. अशावेळी जगदीश पाटील कोणतीही कुरकुर न करता प्रत्येकाला शांतपणे मार्गदर्शन करतात. अनेक वेळा वृद्ध, अशिक्षित किंवा घाबरलेल्या ग्राहकांसाठी ते स्वतःहून फॉर्म भरून देतात, कागदपत्रांची मांडणी करून देतात आणि संबंधित खिडकीपर्यंत त्यांना पोहोचवतात. त्यांचा हा सेवाभाव पाहून अनेक ग्राहक भारावून जातात. सुरक्षा रक्षक म्हणून केवळ दारात उभे राहण्यापेक्षा ग्राहकांचा वेळ वाचवणे, त्यांची भीती कमी करणे आणि बँकेतील प्रक्रिया सोपी करून सांगणे हे काम ते अत्यंत आत्मीयतेने करताना दिसतात. माजी सैनिक म्हणून देशसेवेचा जो संस्कार त्यांच्या अंगी आहे, तोच आज ग्राहक सेवेतून प्रकर्षाने जाणवतो. त्यामुळे अनेक ग्राहक त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करताना दिसतात. जारगाव SBI शाखेची आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे येथे ग्रामीण ग्राहकांना कधीही कमी लेखले जात नाही. अनेकदा मोठ्या बँकांमध्ये ग्रामीण भागातील लोकांशी तुच्छतेने वागले जाते, मात्र येथे प्रत्येक व्यक्तीला समान सन्मान दिला जातो. त्यामुळेच या शाखेविषयी लोकांमध्ये आत्मीयता निर्माण झाली आहे. ग्राहकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसणे हीच या शाखेच्या कार्यपद्धतीची खरी पावती ठरत आहे. आज डिजिटल बँकिंगच्या युगात मानवी स्पर्श हरवत चालल्याची भावना अनेकदा व्यक्त केली जाते. मात्र जारगाव SBI शाखेने सेवाभाव, संयम आणि माणुसकीच्या बळावर वेगळी ओळख निर्माण केली आहे. शाखेतील अधिकारी, कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक यांचा एकत्रित समन्वय पाहता ही शाखा ग्रामीण भागासाठी आदर्श बँकिंग सेवेचे उदाहरण ठरत आहे. ग्राहकांना केवळ व्यवहार न देता विश्वास देणारी ही शाखा भविष्यातही अशाच सेवाभावाने कार्यरत राहो, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

कॉपीमुक्त परीक्षेच्या दबावावर मात करत श्री.गो.से.हायस्कूलचा दैदिप्यमान विजय

Loading

पाचोरा : बदलत्या शैक्षणिक व्यवस्थेत विद्यार्थ्यांसमोर उभ्या राहणाऱ्या आव्हानांना धैर्याने सामोरे जात पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री.गो.से.हायस्कूलने यंदाच्या एस.एस.सी. परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधून घेतले आहे. राज्य शासनाने यंदा प्रथमच अत्यंत कडक आणि पूर्णपणे कॉपीमुक्त परीक्षा पद्धती लागू केल्याने विद्यार्थ्यांमध्ये सुरुवातीपासूनच मोठी मानसिक भीती निर्माण झाली होती. परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे, व्हिडिओ चित्रीकरण, कठोर देखरेख आणि प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवणारी यंत्रणा कार्यरत करण्यात आली होती. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र अशा कठीण आणि दबावपूर्ण परिस्थितीतही श्री.गो.से.हायस्कूलने विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावत केवळ निकालातच नव्हे तर आत्मविश्वासाच्या परीक्षेतही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. विद्यालयाचा यंदाचा निकाल ८७.२० टक्के लागला असून ४६१ विद्यार्थ्यांपैकी ४०२ विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. विशेष म्हणजे ८१ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य संपादन करत विद्यालयाच्या यशात मानाचा तुरा रोवला आहे. विद्यालयातील ललित बळवंत आंबेकर याने ९४.६० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. हर्षल शैलेंद्र चौधरी याने ९३.४० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला तर मोहित गणेश पाटील ९२ टक्के गुणांसह तृतीय स्थानी राहिला. स्वरूप अशोक राठोड याने ९१ टक्के गुण मिळवत चतुर्थ क्रमांक पटकावला तर खुशी मनोहर सोनवणे हिने ९० टक्के गुणांसह पाचवा क्रमांक मिळवला. यंदाची परीक्षा केवळ विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची नव्हे तर त्यांच्या मानसिक ताकदीचीही कसोटी ठरली. परीक्षेला अवघा एक महिना शिल्लक असताना शासनाने कठोर कॉपीमुक्त धोरण लागू केल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये मोठी धास्ती निर्माण झाली होती. अनेक विद्यार्थ्यांनी “इतक्या कडक वातावरणात परीक्षा कशी द्यायची?” असा प्रश्न उपस्थित केला होता. पालकांमध्येही चिंता वाढली होती. मात्र अशा वेळी श्री.गो.से.हायस्कूल प्रशासनाने अत्यंत संवेदनशील भूमिका घेत विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू केले. संस्थेचे चेअरमन नानासो. संजय ओंकार वाघ यांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करण्यावर विशेष भर दिला. “कॉपी नव्हे तर आत्मविश्वास हेच यशाचे खरे शस्त्र आहे,” हा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आला. मुख्याध्यापक एन.आर. पाटील (ठाकरे), उपमुख्याध्यापक आर.एल. पाटील तसेच पर्यवेक्षकांनी वेळोवेळी शिक्षकांच्या बैठका घेत परीक्षा पद्धतीतील बदल विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. केवळ अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर न थांबता विद्यार्थ्यांच्या मानसिक तयारीलाही तितकेच महत्त्व देण्यात आले. विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलमधील वातावरणाची सवय व्हावी म्हणून शाळेत सराव परीक्षा घेण्यात आल्या. प्रत्येक वर्गात शिस्तबद्ध वातावरण तयार करण्यात आले. वेळेचे नियोजन, प्रश्नपत्रिका हाताळण्याची पद्धत, उत्तरपत्रिकेतील मांडणी, मानसिक स्थैर्य आणि आत्मविश्वास यावर शिक्षकांनी स्वतंत्र मार्गदर्शन केले. अनेक विद्यार्थी सुरुवातीला तणावाखाली होते. काहींना भीतीमुळे अभ्यासात लक्ष केंद्रित करणे कठीण जात होते. अशा विद्यार्थ्यांशी शिक्षकांनी वैयक्तिक संवाद साधत त्यांना प्रेरित केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी कठोर परीक्षा पद्धती ही मोठी मानसिक परीक्षा मानली जात होती. मात्र श्री.गो.से.हायस्कूलने विद्यार्थ्यांना “भीतीवर मात करून प्रामाणिक प्रयत्नांच्या जोरावर यश मिळवता येते” हे प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले. विद्यालयातील शिक्षकांनी दिवस-रात्र मेहनत घेत विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात सक्षम बनवले. अभ्यासातील अडचणी दूर करण्यासाठी अतिरिक्त तास, पुनरावृत्ती वर्ग आणि सराव चाचण्यांचे नियोजन करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढत गेला आणि परीक्षेच्या वेळी ते स्थिर मनाने प्रश्नपत्रिकेला सामोरे गेले. या यशामागे केवळ विद्यार्थ्यांची मेहनत नाही तर संपूर्ण संस्थेची एकजूट आणि नियोजनबद्ध कार्यपद्धती महत्त्वाची ठरली. अध्यक्ष भाऊसो. दिलीप ओंकार वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा कायम राखली आहे. मानस सचिव दादासो. ॲड. महेश देशमुख, व्हॉइस चेअरमन नानासो. व्ही.टी. जोशी, शालेय समिती चेअरमन दादासो. खलील देशमुख, तांत्रिक विभाग चेअरमन अण्णासो. वासुदेव महाजन यांनीही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत शाळेच्या शैक्षणिक वाटचालीला बळ दिले. विद्यालयातील पर्यवेक्षिका ए.आर. गोहिल, पर्यवेक्षक आर.बी. बांठिया, पर्यवेक्षक महेश कौंडिण्य, किमान कौशल्य विभाग प्रमुख मनीष बाविस्कर, कार्यालयीन प्रमुख अजय सिनकर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांसाठी घेतलेली मेहनत यंदाच्या निकालातून स्पष्ट दिसून आली. प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देत त्याला अभ्यासात मागे राहू न देण्याचा प्रयत्न करण्यात आला. आजच्या स्पर्धात्मक युगात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाच्या बळावर मोठे यश मिळवू शकते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे श्री.गो.से.हायस्कूलचा यंदाचा निकाल ठरला आहे. कॉपीमुक्त परीक्षेच्या नव्या युगात अनेक शाळांचे निकाल घसरले असताना श्री.गो.से.हायस्कूलने मिळवलेले यश हे केवळ गुणांचे यश नसून शिस्त, प्रामाणिकपणा, आत्मविश्वास आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण व्यवस्थेचा विजय मानला जात आहे. या यशामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून पालकांमध्येही समाधानाचे वातावरण आहे. कठीण परिस्थितीतही योग्य मार्गदर्शन, सकारात्मक विचार आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या जोरावर कोणतेही आव्हान पेलता येते, हा संदेश श्री.गो.से.हायस्कूलने संपूर्ण समाजासमोर प्रभावीपणे ठेवला आहे.

सलग १४ व्या वर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम; न्यू इंग्लिश मिडीयम स्कूलची यशस्वी भरारी

Loading

पाचोरा – शिक्षण क्षेत्रात सातत्यपूर्ण गुणवत्ता, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि शैक्षणिक उत्कृष्टतेची परंपरा जपत जयकिरण प्रभाजी शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल, पाचोरा या विद्यालयाने यंदाच्या इयत्ता दहावीच्या निकालात पुन्हा एकदा उल्लेखनीय यश संपादन केले आहे. सलग १४ व्या वर्षी विद्यालयाने शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखत आपल्या गुणवत्तेची भक्कम छाप उमटवली आहे. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या घवघवीत यशामुळे संपूर्ण पाचोरा शहरासह पालक वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यंदाच्या दहावीच्या परीक्षेत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुणांची कमाई करत यशाची नवी उंची गाठली. विद्यालयातून प्रथम क्रमांकाने कु. कनिष्का सौरभ जैन हिने ९३.४० टक्के गुण प्राप्त करत यशाचा मान पटकावला. तर द्वितीय क्रमांकाने कु. आर्या मिलिंद येवले हिने ९२.८० टक्के गुण मिळविले. तृतीय क्रमांकावर कु. तनिषा अनिल माळी हिने ९१ टक्के गुणांसह स्थान मिळविले. तसेच चौथ्या क्रमांकाने कु. श्रद्धा अनिल पाटील हिने ९०.८० टक्के तर पाचव्या क्रमांकाने जान्हवी जितेंद्र देवरे हिने ९०.२० टक्के गुण मिळवून विद्यालयाच्या यशात मानाचा तुरा खोवला. विशेष म्हणजे विद्यालयातून ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणारे तब्बल १३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, हे यश विद्यालयातील दर्जेदार शिक्षणपद्धती, शिक्षकांचे परिश्रम आणि विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे फलित मानले जात आहे. विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासापुरते मर्यादित न ठेवता त्यांचा आत्मविश्वास वाढविणे, नियमित सराव परीक्षा, वैयक्तिक मार्गदर्शन, पालक-शिक्षक संवाद आणि शिस्तबद्ध शैक्षणिक वातावरण यामुळेच विद्यालयाने वर्षानुवर्षे उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. विद्यालयाच्या या उज्ज्वल यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष दिनेश बोथरा, उपाध्यक्षा गौरी कुलकर्णी, सचिव जीवन जैन, सहसचिव संजय बडोला, खजिनदार जगदीश खिलोशिया, स्कूल कमिटी चेअरमन लालचंद केसवानी, स्कूल कमिटी सचिव रितेश ललवानी, संचालक संजय चोरडिया, गुलाब राठोड,गोपाल पटवारी, प्रिती जैन, संगिता बोथरा, महेंद्रकुमार हिरण, अशोककुमार मोर, शेखरकुमार धाडीवाल यांनी विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या यशामुळे विद्यालयाचा शैक्षणिक दर्जा अधिक उंचावला असून, आगामी काळातही अशीच गुणवत्ता कायम राहील, असा विश्वास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. विद्यालयाच्या प्राचार्य पुष्पलता पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल समाधान व्यक्त करताना सांगितले की, विद्यार्थ्यांनी वर्षभर केलेली मेहनत, शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य यामुळेच हे यश शक्य झाले आहे. विद्यार्थ्यांनी मिळविलेला निकाल हा त्यांच्या जिद्दीचा आणि आत्मविश्वासाचा परिणाम असून, भविष्यातही ते विविध क्षेत्रात यश मिळवून विद्यालयाचे नाव उज्ज्वल करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सी.ई.ओ. अतुल चित्ते यांच्यासह निर्मला पाटील, प्रतिभा मोरे, रुपाली जाधव, प्रिती शर्मा, पुजा पाटील, कविता जोशी, भाग्यश्री ब्राम्हणकर, अश्विनी पाटील, ज्योती बडगुजर, रूपाली देवरे, विद्या थेपडे, शितल महाजन, स्मिता देशमुख, किशोरी साळुंखे, वाल्मिक शिंदे, किरण बोरसे, शालिनी महाजन, निवृत्ती तांदळे, कृष्णा शिरसाठ, आनंद दायमा, मनोज बडगुजर, सुनिता शिंपी, पुजा लिंगायत, शिवाजी पाटील आणि विकास मोरे यांनीही सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यालयाच्या या सातत्यपूर्ण यशामुळे पाचोरा परिसरातील पालकांचा शाळेवरील विश्वास अधिक दृढ झाला असून, इंग्रजी माध्यमातून दर्जेदार शिक्षण देणारी विश्वासार्ह संस्था म्हणून न्यू इंग्लिश मिडीयम School ने स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. शैक्षणिक गुणवत्ता, संस्कारमूल्ये आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा समतोल राखत विद्यालयाने यंदाही आपल्या यशाची गरुडझेप कायम ठेवली आहे.

इन कॅमेरा परीक्षेतही पिटीसी संस्थेचा दबदबा कायम; जयेश भोई पाचोरा-भडगाव तालुक्यात प्रथम, विविध विद्यालयांचा घवघवीत निकाल

Loading

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था अर्थात पिटीसीने यंदाच्या एसएससी परीक्षेत पुन्हा एकदा आपल्या शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा उमटवत संपूर्ण पाचोरा-भडगाव परिसरात यशाची नवी उंची गाठली आहे. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेची खरी कसोटी पाहणाऱ्या आणि अत्यंत शिस्तबद्ध इन कॅमेरा पद्धतीने पार पडलेल्या दहावीच्या परीक्षेत पिटीसी संस्थेच्या विविध विद्यालयांनी उल्लेखनीय यश मिळवत संस्थेच्या शैक्षणिक परंपरेला अधिक बळकटी दिली आहे. विशेष म्हणजे भडगाव येथील सौ.सु.गी.पाटील माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी जयेश संभाजी भोई याने ९८.२० टक्के गुण मिळवत पाचोरा-भडगाव तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला असून संस्थेच्या गुणवत्तेचा झेंडा संपूर्ण जिल्ह्यात उंचावला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्पर्धात्मक वातावरण आणि सक्षम मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याचा ध्यास घेत कार्यरत असलेल्या पिटीसी संस्थेने यंदाही उत्कृष्ट निकालांची परंपरा कायम ठेवली. संस्थेच्या विविध शाळांमधील अनेक विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवत उज्ज्वल यश संपादन केले. विद्यार्थ्यांच्या मेहनतीला शिक्षकांचे नियोजनबद्ध मार्गदर्शन आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची दूरदृष्टी लाभल्यामुळे हे यश अधिक उठून दिसत आहे. पाचोरा येथील श्री.गो.से.हायस्कूलचा निकाल ८७.२० टक्के लागला असून ४६१ विद्यार्थ्यांपैकी ४०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विशेष प्राविण्य श्रेणीत तब्बल ८१ विद्यार्थ्यांनी यश मिळवले. ललित बळवंत आंबेकर आणि हर्षल शैलेंद्र चौधरी यांनी ९४.६ टक्के गुणांसह संयुक्त प्रथम क्रमांक मिळवत विद्यालयाचा गौरव वाढवला, तर मोहित गणेश पाटील ९२ टक्के, स्वरूप अशोक राठोड ९१ टक्के आणि खुशी मनोहर सोनवणे ९० टक्के गुणांसह चमकदार यश संपादन केले. सौ.सु.गी.पाटील माध्यमिक विद्यालय, भडगावचा निकाल ८३.८३ टक्के लागला असून १६७ विद्यार्थ्यांपैकी १४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ३५ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य प्राप्त केले. जयेश संभाजी भोई याने ९८.२० टक्के गुणांसह तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळवला. गौरव संदीप महाजन ९५ टक्के, आदित्य उमाकांत शिंपी ९१ टक्के, नंदिनी नारायण पाटील ८९ टक्के आणि तेजस संदीप पाटील ८६.६० टक्के गुणांसह यशस्वी ठरले. बांबरुड (राणीचे) येथील डॉ. राम मनोहर लोहीया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल ५०.४१ टक्के लागला. कुणाल योगेश डिके याने ७७.५० टक्के गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला, तर दर्शन अशोक पाटील ७७.४० आणि चंचल बापू शिंदे ७३.६० टक्के गुणांसह अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकावर राहिले. खेडगाव नंदीचे येथील श्री.एच.बी.सांघवी हायस्कूलचा निकाल ७६.४७ टक्के लागला असून मयुरी अनिल बागुल हिने ८७.२० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. शहबाज अमीन मन्यार ७९ टक्के आणि वेदश्री सुनील बाविस्कर ७७.४० टक्के गुणांसह पुढील क्रमांकावर राहिले. वाडी येथील श्री.शां.न.जैन माध्यमिक विद्यालयाचा निकाल ७३.३३ टक्के लागला. राजवीर अमर काकडे याने ८४.४० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला. हर्षल संभाजी पाटील ७६.४० आणि रोहित प्रकाश पाटील ७२.८० टक्के गुणांसह अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकावर राहिले. माहेजी येथील श्री.सु.वि.माध्यमिक विद्यालयाचा निकाल ७३.६८ टक्के लागला. कृष्ण संजय कदम आणि भूमिका अनिल भगत यांनी ७७.६० टक्के गुणांसह संयुक्त प्रथम क्रमांक मिळवला. विनीत संजय शिरसाठ ७४.६० आणि कोसर शरीफ हरदास ६५ टक्के गुणांसह यशस्वी ठरले. कुऱ्हाड खुर्द येथील आदर्श माध्यमिक विद्यालयाने ८१.३९ टक्के निकालाची नोंद केली. वैभव सुभाष देवरे ८२.४०, हर्षदा संभाजी वंजारी ७९.८० आणि विवेक प्रमोद बोरसे ७९.६० टक्के गुणांसह विद्यालयात अव्वल ठरले. दहीगाव संत येथील श्रीमती च.ही.राजपूत माध्यमिक विद्यालयाचा निकाल ८६.६६ टक्के लागला. भाग्यश्री संजय कोळी हिने प्रथम क्रमांक मिळवला, तर भाग्यश्री अनिल चौधरी आणि काजल तुळशीराम कोळी यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावले. भोजे चिंचपूरे येथील महात्मा फुले हायस्कूलचा निकालही ८६.६६ टक्के लागला. भाविका डीगंबर पाटील हिने ८८.४० टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. जागृती धनराज जाधव ८३.८० आणि जीविका सुनील जाधव ८२ टक्के गुणांसह पुढील क्रमांकावर राहिल्या. सातगाव डोंगरी येथील पोस्ट बेसिक माध्यमिक विद्यालयाचा निकाल ५९.२५ टक्के लागला. राहुल हिरमल बारेला ६८.६०, सलोनी फरीद तडवी ६७.२० आणि अनिल झाका बारेला ६५.८० टक्के गुणांसह विद्यालयात अव्वल ठरले. या सर्व यशामागे पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे नियोजन, गुणवत्तेला दिलेले प्राधान्य आणि शिक्षकांवर ठेवलेला विश्वास महत्त्वाचा ठरल्याची भावना व्यक्त होत आहे. संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार भाऊसो. दिलीप ओंकार वाघ, चेअरमन नानासो. संजय ओंकार वाघ, मानस सचिव दादासो. ॲड. महेश देशमुख, व्हॉइस चेअरमन नानासो. व्ही. टी. जोशी यांच्या नेतृत्वाखाली संस्था ग्रामीण भागात शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रम, शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि पालकांचा वाढता विश्वास यामुळे पिटीसी संस्थेचा शैक्षणिक लौकिक अधिक भक्कम होत असल्याचे चित्र यंदाच्या निकालातून स्पष्ट झाले आहे. संस्थेच्या सर्व स्थानिक समित्यांचे चेअरमन, पदाधिकारी, संचालक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे अभिनंदन केले असून भविष्यातही पिटीसी संस्था ग्रामीण शिक्षण क्षेत्रात अशीच गुणवत्तेची नवी उंची गाठत राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे।

परधाडेच्या सुपुत्राची भारतीय सैन्यात भरारी; मेजरवरून लेफ्टनंट कर्नल पदावर पदोन्नती, पंचक्रोशीत अभिमानाची लाट

Loading

पाचोरा – तालुक्यातील परधाडे या ग्रामीण मातीतून घडलेले आणि भारतीय सैन्य दलात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे लेफ्टनंट कर्नल विनय सुरेश पाटील यांची मेजर पदावरून लेफ्टनंट कर्नल पदावर पदोन्नती झाल्याने संपूर्ण परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. १ मे २०२६ रोजी अधिकृतरीत्या ही पदोन्नती जाहीर झाली असून, श्रीनगर येथे झालेल्या विशेष समारंभात कमांडिंग ऑफिसर तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांना नविन पदाची रँक प्रदान करण्यात आली भारतीय सैन्य दलातील ही जबाबदारीची आणि प्रतिष्ठेची उंच भरारी मानली जात असून, ग्रामीण भागातील तरुणांसाठी हा प्रेरणादायी प्रवास ठरत आहे. परधाडे गावातील सामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या विनय पाटील यांनी आपल्या जिद्द, मेहनत आणि राष्ट्रसेवेच्या ध्यासाच्या बळावर भारतीय सैन्य दलात मोठे स्थान निर्माण केले आहे. २९ मे १९८५ रोजी जन्मलेल्या विनय पाटील यांचे प्राथमिक शिक्षण ग्राम विकास विद्यालय, पिंपळगाव हरेश्वर येथे झाले. ग्रामीण वातावरणात वाढताना शिस्त, मेहनत आणि देशभक्तीचे संस्कार त्यांच्यावर बालपणापासून झाले. पुढे त्यांनी Maharashtra Institute of Hotel and Tourism Management मधून शिक्षण पूर्ण केले. हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातून करिअरची दिशा मिळाल्यानंतर नोकरीच्या निमित्ताने त्यांना इंग्लंडला जाण्याची संधी मिळाली. परदेशात एक वर्ष काम करत असतानाच आपल्या मातृभूमीसाठी काहीतरी करण्याची तीव्र भावना त्यांच्या मनात निर्माण झाली आणि त्याच प्रेरणेतून भारतीय सैन्य दलात अधिकारी बनण्याचा निर्धार त्यांनी केला. देशसेवेच्या या ध्यासातून त्यांनी IMA मध्ये सैन्य प्रशिक्षण पूर्ण केले आणि २०११ मध्ये भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट म्हणून नियुक्ती मिळवली. पहिली पोस्टिंग कर्नाटकातील बेळगाव येथे झाली. त्यानंतर त्यांनी विविध संवेदनशील आणि कठीण भागात उल्लेखनीय सेवा बजावली. कर्नाटक, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, तामिळनाडू आणि पुन्हा जम्मू-काश्मीर अशा विविध भागांत त्यांनी कर्तव्य निभावताना अनेक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या. देशाच्या सीमावर्ती भागात सेवा देताना कठोर परिस्थितीतही त्यांनी आपल्या नेतृत्वगुणांचा परिचय करून दिला. सैन्यातील त्यांच्या प्रगतीचा आलेख सातत्याने उंचावत गेला. २०११ मध्ये लेफ्टनंट म्हणून सुरू झालेला प्रवास २०१५ मध्ये कॅप्टन, २०१८ मध्ये मेजर आणि आता २०२६ मध्ये लेफ्टनंट कर्नल या उच्च पदापर्यंत पोहोचला आहे. प्रत्येक पदोन्नती ही त्यांच्या कार्यक्षमतेची, प्रामाणिक सेवाभावाची आणि नेतृत्वक्षमतेची साक्ष मानली जात आहे. सध्या त्यांची पोस्टिंग काश्मीरमध्ये असून, देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या भागात ते सेवा बजावत आहेत. सेवाकाळात त्यांनी अनेक उल्लेखनीय कामगिरी बजावल्या आहेत. उत्कृष्ट कार्यासाठी त्यांना २०१६ मध्ये प्रशस्तीपत्र देण्यात आले होते. त्यानंतर २०२४ मध्ये दिल्ली येथे त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. देशसेवेत दिलेल्या योगदानाबद्दल आणि प्रभावी कामगिरीमुळे राष्ट्रपती भवनात संपूर्ण टीमला निमंत्रित करण्यात आले होते, ही त्यांच्यासाठी आणि त्यांच्या सहकाऱ्यांसाठी अत्यंत अभिमानाची बाब ठरली. विविध ठिकाणी जबाबदारी सांभाळताना त्यांनी नेतृत्व, निर्णयक्षमता आणि समन्वय या गुणांच्या जोरावर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा विश्वास संपादन केला. लेफ्टनंट कर्नल विनय पाटील यांच्या यशामागे कुटुंबाचा मोठा वाटा असल्याचे ते आवर्जून सांगतात. आई प्रभावती सुरेश पाटील आणि वडील सुरेश चिंधु पाटील यांनी दिलेले संस्कार,भाऊ गोपाल सुरेश पाटील व वहीनी अंजली गोपाल पाटील यांच्या खंबीर साथ….. पाठिंबा आणि पत्नी शितल विनय पाटील यांची खंबीर साथ यामुळे हा प्रवास अधिक सक्षमपणे पूर्ण करता आल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. त्यांचे पुत्र वंशील पाटील आणि विआंश पाटील हे देखील आपल्या वडिलांच्या या यशामुळे प्रेरित झाले आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या कुटुंबातील आणखी एक चुलत भाऊ चारुदत्त सुदाम पाटील हे देखील भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल पदावर कार्यरत आहे. आणि लवकरच त्यांची देखील कर्नल पदावर पदोन्नती होणार आहे एकाच कुटुंबातील दोन भाऊ सैन्यात उच्च पदावर सेवा बजावत असल्याने परिसरात त्यांचे विशेष कौतुक होत आहे. सैन्य दलातील जबाबदाऱ्या सांभाळतानाच समाजाशी असलेली त्यांची नाळ आजही घट्ट जोडलेली आहे. सुट्टीसाठी गावाकडे आल्यानंतर ते ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांशी संवाद साधतात, शाळांना भेटी देतात आणि तरुणांना सैन्य, स्पर्धा परीक्षा तसेच विविध क्षेत्रांतील संधींबाबत मार्गदर्शन करतात. ग्रामीण विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत आणि क्लास वन अधिकारी बनावे, यासाठी ते सातत्याने प्रेरणा देत असतात. त्यांच्या संवादातून अनेक विद्यार्थ्यांना नवी दिशा मिळत असल्याचे ग्रामस्थ सांगतात. पदोन्नतीनंतर भावना व्यक्त करताना लेफ्टनंट कर्नल विनय पाटील यांनी सांगितले की, आई-वडिलांचे आशीर्वाद, भगवान श्रीकृष्णाची कृपा आणि कुटुंबाचा भक्कम पाठिंबा यामुळे हा प्रवास यशस्वी झाला. पदोन्नती म्हणजे केवळ सन्मान नसून जबाबदारी अधिक वाढल्याची जाणीव असल्याचे त्यांनी नमूद केले. भविष्यातही अधिक चांगले काम करून देशसेवा करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. तसेच समाजातील मित्रपरिवार, नातेवाईक, शिक्षकवृंद आणि शुभेच्छा देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. परधाडे सारख्या ग्रामीण भागातून भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल पदापर्यंत पोहोचलेले विनय पाटील हे आज अनेक युवकांसाठी प्रेरणास्थान बनले आहेत. कठोर परिश्रम, देशप्रेम आणि ध्येयाप्रती असलेली निष्ठा असेल तर कोणतेही स्वप्न अशक्य नसते, हे त्यांनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवले आहे.

४५ तासांत हरवलेला मोबाईल शोधून परत; पाचोरा पोलिसांच्या तत्परतेने युवकाच्या चेहऱ्यावर फुलले समाधानाचे हास्य

Loading

पाचोरा : एखादी मौल्यवान वस्तू हरवल्यानंतर निर्माण होणारी अस्वस्थता आणि तीच वस्तू पुन्हा सुरक्षितपणे हातात मिळाल्यानंतर होणारा आनंद शब्दांत मांडणे कठीण असते. पाचोरा शहरात घडलेल्या अशाच एका प्रसंगाने पोलीस प्रशासनाविषयी नागरिकांच्या मनातील विश्वास आणखी दृढ झाला आहे. अवघ्या ४५ तासांच्या कालावधीत हरवलेला मोबाईल शोधून तो मूळ मालकाच्या ताब्यात देत पाचोरा पोलिसांनी कार्यतत्परतेचा आदर्श निर्माण केला असून, मोबाईल परत मिळाल्यानंतर युवकाच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान आणि आनंदाचे हास्य हेच या संपूर्ण घटनेचे खरे यश ठरले. दिनांक ३० एप्रिल २०२६ रोजी गणेश प्रशांत पाटील, रा. शिंदाड ता. पाचोरा जि. जळगाव यांचा मोबाईल जामनेर रोडवरील बिकनेर हॉटेल परिसरात हरविला होता. मोबाईल हरवल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने पाचोरा पोलीस स्टेशन गाठून घटनेची माहिती दिली. अनेकदा अशा घटनांमध्ये नागरिक निराश होतात, मोबाईल परत मिळेल की नाही याबाबत संभ्रम निर्माण होतो; मात्र पाचोरा पोलिसांनी ही बाब अत्यंत गांभीर्याने घेत तत्काळ तपासाची सूत्रे हलवली. पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोकॉ/ योगेश पाटील आणि पोकॉ/ गणेश कुंवर यांनी विशेष तत्परता दाखवत परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी सुरू केली. प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवत, संशयित हालचालींचे निरीक्षण करत त्यांनी अत्यंत कौशल्याने तपास पुढे नेला. तांत्रिक माहिती आणि स्थानिक पातळीवरील पडताळणी यांची योग्य सांगड घालत अखेर हरविलेला मोबाईल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. तपास पूर्ण झाल्यानंतर पाचोरा पोलीस निरीक्षक राहुल पवार यांच्या हस्ते सदरचा मोबाईल गणेश पाटील यांना सुपूर्द करण्यात आला. मोबाईल पुन्हा हातात मिळताच त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि दिलासा उपस्थित प्रत्येकाला भावून गेला. आजच्या डिजिटल युगात मोबाईल हा केवळ संवादाचे साधन राहिलेला नसून वैयक्तिक माहिती, आर्थिक व्यवहार, कागदपत्रे आणि अनेक महत्त्वाच्या आठवणींचा अविभाज्य भाग बनला आहे. त्यामुळे हरवलेला मोबाईल परत मिळणे म्हणजे एखादी मोठी मौल्यवान वस्तूच पुन्हा मिळाल्याची भावना निर्माण होते. गणेश पाटील यांनी देखील पोलिसांचे मनापासून आभार व्यक्त करत त्यांच्या तत्परतेचे कौतुक केले. या संपूर्ण कारवाईत पाचोरा पोलिसांनी दाखवलेली समयसूचकता आणि नागरिकांप्रती असलेली जबाबदारी विशेष लक्षवेधी ठरली. तक्रार आल्यानंतर विलंब न लावता तपास सुरू करण्यात आला आणि अल्पावधीत सकारात्मक निकाल समोर आला. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस प्रशासन जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असल्याचा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. विशेष म्हणजे, मोबाईल परत मिळाल्यानंतरचा क्षण हा केवळ वस्तू मिळाल्याचा नव्हता, तर नागरिक आणि पोलीस यांच्यातील विश्वास अधिक घट्ट झाल्याचा होता. युवकाच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद आणि पोलिसांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान हे दोन्ही दृश्य उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरले. कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आपल्या जबाबदाऱ्या किती संवेदनशीलपणे पार पाडतात याचे हे उत्तम उदाहरण मानले जात आहे. पाचोरा पोलिसांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे परिसरातील जनतेतून त्यांचे मुक्तकंठाने कौतुक होत आहे. नागरिकांच्या अडचणींना प्राधान्य देत तातडीने मदतीला धावून जाणारे पोलीस दल समाजात विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यास महत्त्वाची भूमिका बजावत असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. छोटी वाटणारी घटना देखील एखाद्या व्यक्तीसाठी किती महत्त्वाची असू शकते याची जाणीव ठेवून पोलिसांनी केलेले हे कार्य खऱ्या अर्थाने लोकाभिमुख पोलीस सेवेचे उदाहरण ठरत आहे.

कै. पी. के. शिंदे माध्यमिक विद्यालयाला अनुभवी नेतृत्वाची साथ; सविता ताड (दत्तु) यांची मुख्याध्यापकपदी नियुक्ती

Loading

पाचोरा – शहरातील कै. पी. के. शिंदे माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी सेवाजेष्ठ शिक्षिका सविता शशिकांत ताड (दत्तू मॅडम) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. १ मे २०२६ या महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने घेतलेल्या या निर्णयामुळे शिक्षण क्षेत्रात समाधानाची भावना व्यक्त होत असून, दीर्घ अनुभव आणि निष्ठेच्या बळावर त्यांनी मिळवलेले हे पद त्यांच्या कार्याचा योग्य गौरव मानला जात आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. नगराध्यक्ष तात्यासो. पंडित शिंदे, उपाध्यक्ष निरज मुनोत, सचिव दादासो ॲड.जे डी काटकर, भाजपा युवा नेते अमोलभाऊ शिंदे तसेच सहसचिव मुख्याध्यापक शिवाजी शिंदे यांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यालयाच्या प्रगतीत त्यांच्या नेतृत्वाचा मोठा वाटा राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. सविता शशिकांत ताड (दत्तु) यांचा प्रवास हा जिद्द, परिश्रम आणि सातत्याचा आदर्श ठरतो. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील माहेर असलेल्या ताड (दत्तु) मॅडम यांचे डिसेंबर १९९८ मध्ये विवाह झाला आणि त्यानंतर त्या पाचोरा येथे सासरी स्थायिक झाल्या. शिवाजीनगर येथील स्वर्गीय माजी नगरसेवक सिताराम दत्तु यांच्या त्या स्नुषा असून, श्री गो से हायस्कूलचे सेवानिवृत्त शिक्षक संजय दत्त यांच्या त्या पत्नी आहेत. कुटुंबातील शैक्षणिक व सामाजिक परंपरेचा वारसा त्यांनी समर्थपणे पुढे नेला आहे. शिक्षणाची ओढ कायम ठेवत त्यांनी जळगाव येथे बी.एड. पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन आपली गुणवत्ता सिद्ध केली. १ ऑगस्ट २००१ रोजी शिक्षक म्हणून त्यांनी सेवेत प्रवेश केला आणि तेव्हापासून सलग २६ वर्षे गणित व विज्ञान विषयाचे अध्यापन करत विद्यार्थ्यांच्या घडणीत मोलाची भूमिका बजावली आहे. कठीण विषय सोप्या पद्धतीने समजावून सांगण्याची त्यांची शैली विद्यार्थ्यांमध्ये विशेष लोकप्रिय ठरली आहे. त्यांच्या अध्यापनातून केवळ ज्ञान देणे नाही, तर विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, जिज्ञासा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यावर त्यांनी भर दिला. शाळेच्या निकालात सातत्याने वाढ व्हावी यासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम आणि नियोजन कौतुकास्पद ठरले आहे. विविध शैक्षणिक उपक्रम, मार्गदर्शन सत्रे आणि स्पर्धा परीक्षांची तयारी यामधून विद्यार्थ्यांना त्यांनी सक्षम बनवले आहे. ताड (दत्तु) मॅडम यांनी शाळेच्या व्यवस्थापनातही सक्रिय सहभाग घेतला असून शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांच्यात समन्वय राखण्याचे काम प्रभावीपणे केले आहे. शिस्त, पारदर्शकता आणि संवेदनशीलता या गुणांच्या जोरावर त्यांनी शाळेत सकारात्मक वातावरण निर्माण केले आहे. मुख्याध्यापकपदाची धुरा स्वीकारताना त्यांनी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी नवे उपक्रम राबवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. आधुनिक शिक्षणपद्धती, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासावर विशेष लक्ष देण्याचा त्यांचा मानस आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे आणि ते स्पर्धात्मक जगात सक्षमपणे उभे राहावेत, यासाठी त्या कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या नियुक्तीमुळे विद्यालयात नवचैतन्य निर्माण झाले असून शिक्षकवर्ग, विद्यार्थी आणि पालक यांच्यात उत्साहाचे वातावरण आहे. अनुभवी आणि समर्पित नेतृत्वाच्या बळावर कै. पी. के. शिंदे माध्यमिक विद्यालय आगामी काळात अधिक प्रगती करेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. सविता शशिकांत ताड (दत्तु) यांचा प्रेरणादायी प्रवास अनेकांसाठी मार्गदर्शक ठरत असून त्यांच्या नेतृत्वाखाली शाळेच्या यशाची नवी दिशा निश्चित होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!