Home Dhyeya News Special कॉपीच्या बाजारात प्रामाणिक शिक्षणाचा एकाकी पण ठाम लढा – संदीप महाजनसर संचलित...

कॉपीच्या बाजारात प्रामाणिक शिक्षणाचा एकाकी पण ठाम लढा – संदीप महाजनसर संचलित ध्येय करिअर अकॅडमी, पाचोरा

0
120

Loading

पाचोरा – “शिस्त जर शिक्षा वाटत असेल, तर आमच्या अकॅडमीत प्रवेश घेऊ नका.” या एका वाक्यातूनच ध्येय करिअर अकॅडमीची संपूर्ण शैक्षणिक भूमिका स्पष्ट होत होती. हे वाक्य जाहिरातबाजीसाठी वापरलेले घोषवाक्य नव्हते; ते शिक्षण व्यवस्थेतील साचलेपणा विरुद्ध उघडपणे घेतलेली भूमिका होती. संदीप महाजनसर संचलित ध्येय करिअर अकॅडमी, पाचोरा (जि. जळगाव) सुरू झाली तेव्हा शिक्षणाकडे पाहण्याची दृष्टी वेगळी होती. निकाल, टक्केवारी आणि सोयीस्कर मार्ग यांपेक्षा शिस्त, समज, सातत्य आणि जबाबदारी यांना येथे प्राधान्य देण्यात आले. त्या काळात अनेक ठिकाणी शिक्षण म्हणजे गुणांची स्पर्धा, कॉपीची मूक संमती आणि पालकांच्या अपेक्षांना कुरवाळण्याचा व्यवसाय बनत चालला होता. अशा वातावरणात ध्येय करिअर अकॅडमीने कॉपीमुक्त शिक्षणाचा निर्धार केला. हा निर्णय सहज स्वीकारला जाण्यासारखा नव्हता. कारण तो केवळ विद्यार्थ्यांसाठी नव्हे, तर पालकांसाठी, शिक्षकांसाठी आणि संपूर्ण व्यवस्थेसाठी अस्वस्थ करणारा होता. विशेषतः मोठे पगार घेऊनही प्रामाणिक अध्यापनाची नैतिक तयारी नसलेले, बायकोच्या नावावर शिकवण्या दाखवून प्रत्यक्ष स्वतः अध्यापन करणारे काही प्राध्यापक आणि शिक्षक या भूमिकेमुळे अस्वस्थ झाले. त्यांच्या सोयीच्या, तडजोडीच्या शिक्षणपद्धतीवर थेट बोट ठेवले गेले होते. परिणामी, शक्य त्या सर्व पातळ्यांवर विरोध झाला. गैरसमज पसरवले गेले, अपप्रचार करण्यात आला, सामाजिक दबाव निर्माण करण्याचे प्रयत्न झाले. मात्र ध्येय करिअर अकॅडमीची भूमिका बदलली नाही. कारण येथे शिक्षण हे व्यवहार नव्हते, तर जबाबदारी होती. या अकॅडमीत शिस्त ही केवळ विद्यार्थ्यांपुरती मर्यादित नव्हती. पालकांनाही स्पष्ट भूमिका देण्यात आली होती. दररोज रात्री आपल्या पाल्याची वही उघडून पाहणे, त्या वहीवर दिनांक आणि वार आहे का ते तपासणे आणि फक्त सही करणे – एवढीच अपेक्षा होती. वहीतील मजकूर योग्य आहे का, उत्तर बरोबर आहे का, याची चौकशी पालकांनी करू नये, हे ठामपणे सांगितले गेले. पालकांनी पालकत्व निभवावे, शिक्षक होण्याचा प्रयत्न करू नये, ही भूमिका स्पष्ट होती. जोपर्यंत वहीवर सही होत नाही, तोपर्यंत पालकांनी रात्री जेवणाच्या ताटावर बसायचे नाही – हा नियम कठोर वाटत असला, तरी त्याने घराघरांत शिक्षणाला एक शिस्तबद्ध स्थान मिळाले. विद्यार्थ्यांसाठीचे नियमही तितकेच ठोस होते. मोबाईल वापरावर बंदी, शिस्तभंगाला थेट कारवाई, उशीर झाल्यास कारण सांगण्यासाठी थेट पालकांशी संपर्क. प्रत्येक विषयाचा प्रत्येक धडा आणि त्या धड्यातील प्रत्येक मुद्दा शिकवणे शिक्षकांसाठी बंधनकारक होते. गणितासारख्या विषयात तर प्रत्येक उदाहरण समजावून सांगितले जात असे. “हे येणार नाही” किंवा “हे टाळू” अशा शब्दांना येथे वाव नव्हता. प्रत्येक धड्यावर स्वतंत्र चाचणी, नियोजित कालावधीत अंतर्गत परीक्षा आणि वार्षिक मूल्यमापन ही पद्धत काटेकोरपणे राबवली जात होती. २०१० पासूनच अध्यापन व स्पेशली परीक्षा सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या देखरेखीखाली घेतल्या जात. परीक्षेदरम्यान गैरप्रकाराची शक्यता शून्यावर आणण्याचा प्रयत्न केला गेला होता. कॉपी करणे तर दूरच, साधे बोलणेही सहन केले जात नसे. अशा वेळी त्वरित कारवाई होत असे. यामुळे परीक्षेचा अर्थ मुलांच्या मनात भीती नव्हे, तर जबाबदारी म्हणून रुजत गेला. या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना वेगळा घरगुती अभ्यास करावा लागेल अशी परिस्थिती निर्माण होत नसे. कारण वर्गात शिकवलेले व्यवस्थित नोंदवणे बंधनकारक होते आणि रात्री वही तपासली जाणार, याची जाणीव असल्याने वर्गात लक्ष देणे अपरिहार्य ठरत असे. परिणामी समज वाढत गेली. हुशार आणि मेहनती विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य रात्रीची अभ्यासिका ही मोठी संधी ठरली. या सर्व प्रक्रियेचे परिणाम हळूहळू दिसू लागले. केवळ गुणच नव्हे, तर आत्मविश्वास, शिस्त आणि विचार करण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये विकसित झाली. आजही अनेक माजी विद्यार्थी भेटले की ते स्वतःची ओळख “ध्‍येयचा विद्यार्थी” म्हणून अभिमानाने करून देतात. पालकही तेवढ्याच आत्मविश्वासाने सांगतात की शिस्तीच्या या शिक्षणामुळेच त्यांच्या मुलांना आयुष्यात दिशा मिळाली. हे शब्द म्हणजे पैशात मोजता न येणारी पावती होती. मात्र कोरोना काळाने संपूर्ण शिक्षणविश्व ढवळून काढले. प्रत्यक्ष अध्यापन जवळजवळ थांबले. बहुतांश विद्यार्थी शिक्षकांच्या संपर्कापासून दूर गेले. ऑनलाईन शिक्षण हे अनेकांसाठी शिकण्याचे माध्यम न राहता केवळ वेळ घालवण्याचे साधन बनले. ज्या पालकांकडे मूलभूत सुविधा नव्हत्या, त्यांनाही मुलांसाठी मोबाईल घ्यावा लागला. याचे दुष्परिणाम समाजाने अनुभवले. याच काळात संदीप महाजन संचलित ध्येय करिअर अकॅडमीसमोर एक कठीण निर्णय उभा राहिला. ज्या शिक्षणपद्धतीचा पाया प्रत्यक्ष संवाद, नियंत्रण, देखरेख आणि शिस्त यावर होता, ती पद्धत तडजोडीने ऑनलाईन चालवणे योग्य नाही, हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे कोरोनापासून आजतागायत ध्येय करिअर अकॅडमीचे कार्यालय बंद आहे. हा निर्णय आर्थिक किंवा सोयीचा नव्हता; तो तत्वनिष्ठ होता. दरम्यानच्या काळात शिक्षणक्षेत्रात वेगळेच चित्र दिसू लागले. सरसकट पासची मानसिकता, निकाल वाढवण्यासाठी लवचिकता, गैरप्रकारांकडे दुर्लक्ष – या सगळ्यामुळे शिक्षणाचा दर्जा ढासळला. प्रवेश घेताना “पास करून देणार का?” हा प्रश्न विचारला जाऊ लागला. काही ठिकाणी शिक्षकांवरही अनैतिक तडजोडींचा दबाव आला. याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या भविष्यातील तयारीवर झाला. होय, आज प्रत्यक्षात ध्येय करिअर अकॅडमीचे कार्यालय बंद आहे. वर्गातील शांतता, रिकामे बाक, बंद अभ्यासिका हे दृश्य वास्तव आहे. मात्र ध्येय संपले आहे, असे नाही. ध्येय ही इमारत नव्हती; ती एक विचारधारा होती. ज्या विद्यार्थ्यांनी शिस्त अनुभवली, ज्या पालकांनी जबाबदारी स्वीकारली, आणि ज्या शिक्षकांनी प्रत्येक घटक प्रामाणिकपणे पार पाडला – ते सर्व आजही त्या विचारांचे प्रतिनिधी आहेत. कार्यालय बंद असले, तरी त्या शिक्षणाचे संस्कार आजही अनेक कुटुंबांत जिवंत आहेत. हा प्रश्न केवळ एका अकॅडमीपुरता मर्यादित नाही. हा प्रश्न शिक्षणाकडे पाहण्याच्या दृष्टीचा आहे. आपण निकालाला प्राधान्य देतो की गुणवत्तेला? सोयीला महत्त्व देतो की शिस्तीला? ध्येय करिअर अकॅडमीने या प्रश्नांची उत्तरे आपल्या कृतीतून दिली होती. त्यामुळे ती अस्वस्थ करणारी ठरली. कदाचित उद्या परिस्थिती बदलेल. कदाचित पुन्हा एकदा ध्येय करिअर अकॅडमी सारखे शिस्तीचे इतर दालनांची दरवाजे उघडतील. तेव्हा कदाचित ही अकॅडमी एक प्रेरणा आठवण म्हणून उरेल. पण तिचा विचार, तिची भूमिका आणि तिचा आदर्श संपणार नाही. कारण ध्येय ही संस्था नव्हती; तो एक संस्कार होता. कार्यालय बंद असणे हे वास्तव आहे. पण ध्येय जिवंत असणे ही आशा आहे. आणि जिथे आशा जिवंत असते, तिथे शिक्षण अजून संपलेले नसते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!