Home Blog Page 146

लोक कलेतील तपस्वी हरपला! दिवंगत शाहीर मधूकर नेराळे यांना लोक कलावंत आणि मान्यवरांची श्रद्धांजली

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : शाहीर मधुकर नेराळे कायम कलावंतांच्या भल्यासाठी झगडत राहिले‌, त्यांच्या जाण्याने खर्‍या अर्थाने लोककला पोरकी झाली, अशा शब्दात  नाटककार, पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी श्रद्धांजली वाहिली तर नेराळे यांच्या निधनाने लोककलेचा आधारवड हरपला, अशा भावना मुंबई विद्यापीठाच्या लोककलेचे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे यांनी व्यक्त केल्या.
   महाराष्ट्रातील तमाशा लोककलेचे प्रेरणास्थान आणि कलावंताचे आधारवड शाहीर मधुकर नेराळे‌ यांचे गेल्याच आठवड्यात ह्रदय विकारामुळे लालबाग चिवडा गल्लीतील न्यू हनुमान थिएटरच्या कार्यालयात वयाच्या ८१ व्या वर्षी आकस्मिक निधन झाले. तमाशा लोककलेचे तपस्वी ठरलेल्या मधुकर नेराळे यांच्या निधनाने कला विश्वात दुःखाचे वातावरण आहे. लालबाग येथील लोककलावंतांचे आधारवड ठरलेले‌ न्यू हनुमान‌ थिएटर एकाएकी पोरके झाले. त्याच ठिकाणी बुधवारी अखिल भारतीय मराठी शाहीर परिषद, शाहिरी लोक कला मंच, ऑर्केस्ट्रा असोसिएशन, तिळवण तेली समाज आणि सर्वश्री नेराळे कुटुंबियांच्या वतीने शोकसभा पार पडली.    
   
शाहीर मधुकर नेराळे‌ कधी कलावंतात कला रुजविण्यात दंग झाले, तर कधी नवी‌ संघटना उभी करण्यात मग्न राहिले, तर कधी निराश्रित कलावंताला सरकारी अनुदान मिळवून देण्यात व्यस्त राहिले‌‌. महाराष्ट्राच्या मातीची ओळख असलेल्या तमाशा लोककलेला तर मरणासन्न अवस्था निर्माण झालेली. तिला राज्याच्या कानाकोपर्‍यात दौरे काढून मधुकर नेराळे‌ यांनी ऊर्जितावस्था निर्माण करून दिली. लालबाग येथील हनुमान थिएटर‌ तर अनेक निराश्रीत कलावंताना आश्रयस्थान राहिले आहे, या सर्व आठवणींना कालच्या श्रद्धांजलीच्या सभेत अनेक मान्यवर नेत्यांनी आपल्या भाषणाद्वारे उजाळा दिला. सभेत राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, खजिनदार निवृत्ती देसाई, शिवसेना ठाकरे गटाचे विभागीय नगरसेवक अनिल कोकीळ, शिवाजी मंदीरचे संचालक रामिम संघाचे उपाध्यक्ष बजरंग चव्हाण, पत्रकार, मुंबई मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष नरेंद्र वाबळे, शाहीर कुमार वैराळकर, शाहीर देवानंद माळी, नृत्य दिग्दर्शक सदानंद राणे, तमाशा कलावंत रेश्मा परितेक, राजश्री नगरकर आदी कला, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून श्रद्धांजली वाहिली. संघराज रुपवते, शाहिरी लोक कला मंचचे अध्यक्ष शांताराम चव्हाण आणि मंचचे समन्वयक लेखक काशिनाथ माटल, लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, पत्रकार राजेंद्र सकसकर, दिलिप खोंड आदींनी उपस्थित राहून मधूकर नेराळे यांच्या विषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. शाहीरी लोककला मंचचे सरचिटणीस आणि प्रसिद्ध शाहीर मधु खामकर यांनी आयोजनात भाग घेऊन सभेचे सूत्रसंचालन केले. सर्वश्री मुन्ना, राजेश राजेंद्र मधूकर नेराळे यांचा श्रद्धांजली सभेत विशेष सहभाग राहिला.

५० तास अखंड वाचन यज्ञात झाला, आगरी बोली कवितांचा जागर

0

Loading

ठाणे  (गुरुदत्त वाकदेकर) : आगरी बोलीतील कवितांची गोडी कल्याणकरांना अनुभवता आली. निमित्त होते अक्षरमंच सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान आयोजित सलग पन्नास तासांचा अखंड वाचन यज्ञ हा कार्यक्रम. यावेळी आगरी कवींनी विविध आशयाच्या कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
        
आगरी कवितांचा हा कार्यक्रम तीन सत्रात घेण्यात आला. यात कविता, चारोळ्या, पारंपारिक गीते, लग्न गीते, धवला असे आगरी साहित्यातले विविध प्रकार हाताळण्यात आले. या कवी संमेलनात कवितांना पार्श्वसंगीत देण्याचा यशस्वी प्रयोग करण्यात आला. यासाठी संगीत संयोजक ‘आपला बंड्या’ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे आणि अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध साहित्यिक प्रा. एल. बी. पाटील, प्रसिद्ध साहित्यिक अनंत शिसवे, प्रसिद्ध साहित्यिक कैलास पिंगळे या मान्यवरांची उपस्थिती लाभली. या संपूर्ण पन्नास तासांच्या सत्रात कविता वाचन, कथाकथन, अभिवाचन असे सत्र सुरु होते.
       
ह्या संपूर्ण कार्यक्रमाचे नेटके आयोजन अक्षर साहित्य मंचचे अध्यक्ष योगेश जोशी, उपक्रम समन्वयक हेमंत नेहते, उपक्रम प्रमुख सुश्रुत वैद्य यांनी केले होते. तसेच आगरी बोली कट्टा या कवी संमेलनाचे खुमासदार निवेदन प्रसिद्ध कवी रामनाथ म्हात्रे तसेच श्याम माळी यांनी केले. आगरी बोली कट्टाच्या समन्वयकाची जबाबदारी प्रसिद्ध कवी संदेश भोईर यांनी उत्कृष्ट नियोजन करून यशस्वीरित्या पार पाडली.

दरम्यान यावेळी प्रसिद्ध आगरी कवी जयंत पाटील यांच्या दुसऱ्या ‘चिंकोरा’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमात अनुक्रमे प्रसिध्द गायिका संगीता पाटील, दया नाईक, प.सा.म्हात्रे, स्नेहाराणी गायकवाड, डॉ. शोभा पाटील, अश्विनी म्हात्रे ,अभिनेत्री प्रज्ञा म्हात्रे, सुनील पाटील सर, अरुण पाटील, निलेश घोडे, हरिश्चंद्र दळवी, विनोद कोळी, रवींद्र भांडे,  नीतुराज पाटील, सुनील पाटील (सच्चा माणूस), संतोष जाधव, माधव गुरव, शीतल कटारे, जयराम कराळे, जयंत पाटील, गिरीश म्हात्रे, नवनाथ ठाकूर, जय म्हात्रे, अनंत भोईर यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. तनू स्टुडिओचे मालक जोगेंद्र जाधव यांचे विशेष सहकार्य लाभले.

पाचोरा शहरातील गिरड व पुनगाव रोडवरील चोरटी गौण खनिज वाहतूक: रात्री ऐवजी दिवसा करण्याची गरज ?

0

Loading

पाचोरा शहरातील पुनगाव रोड भागातील नागरिक आणि विद्यार्थी सध्या चोरटी गौण खनिज वाहतूक झाल्यामुळे प्रचंड त्रस्त झाले आहेत. शहराच्या या महत्वपूर्ण भागांमध्ये रात्री उशिरा सुरू होणाऱ्या या वाहतुकीमुळे ना नागरिकांना झोप मिळते, ना विद्यार्थ्यांना अभ्यास करता येतो. सर्वसामान्यांसाठी हा विषय केवळ त्रासाचा मुद्दा नसून, प्रशासनाची जबाबदारी आणि त्यांच्यावरील विश्वास यावरही प्रश्न निर्माण करणारा आहे.

गौण खनिज वाहतुकीची समस्या

पाचोरा शहर आणि परिसरात रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर दहा टायरी डंपरद्वारे गौण खनिजाची वाहतूक होते. विशेषतः गोसे हायस्कूल मार्गे पुनगाव रोड या भागात हा प्रकार सर्रासपणे सुरू आहे. या मार्गावर राहणाऱ्या नागरिकांनी वारंवार प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. किंबहुना या मार्गावर रात्री गौणखणीजची किती मोठी चोरटी वाहतूक चालते याचे थेट CCTV फुटेज ध्येय  अकॅडमीच्या दालनात उपलब्ध होऊ शकतात परंतु त्यावर ठोस उपाययोजना होत नसल्याने नागरिकांच्या संतापाला उधाण आले आहे.

गौण खनिज वाहतुकीचा प्रश्न हा केवळ पाचोरा शहरापुरता मर्यादित नाही. हा विषय संपूर्ण देशभर , राज्यभरात गंभीर बनला आहे. अशा प्रकारच्या वाहतुकीला महसूल आणि पोलीस प्रशासनाचे अभय मिळत असल्याची चर्चा होत आहे. परिणामी, या वाहनांचा वेग, आवाज, आणि सदरची वाहने एवढी भरतात & वेगात असतात की त्यांच्यातून वाळू उधळून रात्रभर जणू काही रस्त्यावर वाळूची पेरणी केलेली असते परिणामतः महाविद्यालयात जाणारी मुले –  मुली यांचे वाहन स्लिप होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसून येते यामुळे रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण वाढले आहे परिणामतः नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष आणि परिणाम

पाचोरा मे न्यायालयाजवळ माननीय न्यायाधीशांचे निवासस्थान आणि हाकेच्या अंतरावर डीवायएसपी साहेबांचे निवासस्थान आहे. यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस कर्मचारी तेथे तैनात असतात. परंतु, प्रशासनाच्या लक्षाखालीही रात्रीच्या वेळेस चोरटी वाहतूक होत असल्याने त्यांच्या कार्यक्षमतेवर नागरिकांकडून टीका होत आहे. महसूल आणि पोलीस प्रशासन यांचे आशीर्वाद असल्याशिवाय अशा प्रकारच्या मोठ्या प्रमाणावर चोरटी गौण खनीज वाहतूक होणे शक्य नसल्याचे लोकांचे म्हणणे आहे.

अशा चोरट्या वाहतुकीचे दूरगामी परिणाम प्रशासनालाही भोगावे लागतात. या प्रकरणांत अनेक ठिकाणी काही दोषी व काही निर्दोष अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर हल्ले , मारहाण झाली तरी याची मुळे किती खोलवर रुजलेली आहेत, याचा अंदाज येतो. “जसे कर्म तैसे फळ” या उक्तीप्रमाणे संबंधित अधिकाऱ्यांना – कर्मचाऱ्यांना देखील भविष्यात त्याचा फटका बसू शकतो यात शंका नाही

नागरिकांच्या मागण्या आणि अपेक्षा

गिरडरोड व पुनगाव रोड रहिवाशांनी प्रशासनाला वारंवार विनंती केली आहे की, चोरट्या वाहतुकीला रात्री प्रोत्साहन देण्याऐवजी थेट दिवसाच्या वेळेत खुल्या परवानगीसह वाहतूक सुरू ठेवावी. यामुळे रात्रीच्या वेळेस तरी किमान नागरिकांना शांत झोप मिळेल आणि विद्यार्थ्यांना अभ्यास करता येईल. किंवा या चोरटी वाहतूक करणाऱ्या वाहनांना मार्ग बदलण्याची सक्त ताकीद द्यावी अशी विनंती केली जात आहे आता तरी प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून कारवाई करावी, अशी रहिवाशांची अपेक्षा आहे.

प्रशासनाची भूमिका आणि उपाययोजना आवश्यक

गौण खनिज वाहतूक ही एक मोठी समस्या असून यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. महसूल आणि पोलीस प्रशासनाने या प्रकरणात सक्रिय भूमिका घेतली पाहिजे. आम्ही म्हणनार नाही ही चौरटी गौण खनिज वाहतूक बंद करा  कारण सगळ्यांनाच पोट आहे & दरमहा वरपर्यंत पाकीटे पोहच करावी लागतात म्हणून देऊन – घेऊन का असेना मनसोक्तपणे गौण खनिज चोरटी वाहतूक सुरू राहू द्या अशी म्हणायची वेळ आता आली आहे पण किमान अवैध गौण खनिज वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमित तपासणी, वेळ &  वेगमर्यादेचे पालन होणे आवश्यक आहे.
चोरट्या गौण वाहतुकीमुळे निर्माण होणाऱ्या अडचणींना तोंड देण्यासाठी प्रशासनाने जबाबदारीने वागण्याची गरज आहे. केवळ तक्रारींच्या नोंदीवर समाधान मानण्या ऐवजी मानवतेच्या दृष्टीने आपण देखील समाजाचे काही देणे लागतो याची जाणीव ठेवून प्रत्यक्ष कारवाई करून नागरिकांचा विश्वास परत मिळवणे आवश्यक आहे. जर खरोखर पोलीस व महसुल प्रशासनाने योग्य पावलेल्या उचलली, तर पाचोरा शहराच्या रहिवाशांना शांत झोप आणि विद्यार्थी भविष्याच्या अभ्यासासाठी योग्य वातावरण मिळू शकेल यात शंका नाही

६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा मुंबई-२ केंद्राचे ६ डिसेंबर रोजी मुंबईत उद्घाटन

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित ६३ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा मुंबई-२ केंद्र ६ डिसेंबर रोजी सुरू होत आहे. ही स्पर्धा साहित्य संघ मंदिर, गिरगाव, मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे.

स्पर्धेची प्राथमिक फेरी मुंबई-२ केंद्रावर सुरू होत आहे. या स्पर्धेमध्ये विविध १७ नाट्य संस्थांनी सहभाग घेतला आहे. स्पर्धेमध्ये सामाजिक समस्या, राजकीय विषय, प्रेमकथा आणि इतर विविध विषयांवर आधारित नाटके सादर करणार आहेत.

*स्पर्धेचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:*

शुक्र. ६ डिसें. सायं. ७ वा. शेवटचा पर्याय लेखक : आनंद म्हसवेकर दिग्दर्शक : श्रीकांत मोरे दि. मानवता असोसिएशन
शनि. ७ डिसें. स. ११:३० वा. साती साती पन्नास लेखक : संजय पवार दिग्दर्शक : श्रद्धा माळवदे शिवशाही कला क्रीडा सेवा केंद्र, मुंबई
शनि. ७ डिसें. सायं. ७ वा. हायब्रीड लेखक : नितीन सावळे दिग्दर्शक : केतन गायकवाड सह प्रमुख कामगार अधिकारी, शहर, बृहन्मुंबई म.न.पा.
रवि. ८ डिसें. सायं. ७ वा. पूर्णविराम लेखक : इरफान मुजावर दिग्दर्शक : जयेंद्र बगाडे सह प्रमुख कामगार अधिकारी, पश्चिम उपनगरे, बृहन्मुंबई म.न.पा.
सोम. ९ डिसें. स. ११:३० वा. वेडात म्हातारे वेघात दौडले तीन लेखक : प्रकाश गावडे दिग्दर्शक : प्रमोद तांबे सहकारी मनोरंजन मंडळ, मुंबई
सोम. ९ डिसें. सायं. ७ वा. कम आय मे गो आय मस्ट लेखक व दिग्दर्शक : डॉ. शिरीष ठाकूर एस. के. युनिटी इंडिया मल्टी सर्विसेस, मुंबई
मंगळ. १० डिसें. स. ११:३० वा. मोक्ष लेखक : महेंद्र कुरघोडे दिग्दर्शक : रमाकांत जाधव श्री विघ्नहर्ता प्रतिष्ठान, मुंबई
मंगळ. १० डिसें. सायं. ७ वा. द इनर वर्ल्ड लेखक व दिग्दर्शक : अरुण गवळी ऋतुरंग थिएटर, मुंबई
बुध. ११ डिसें. स. ११:३० वा. १९६० रोजी लेखक व दिग्दर्शक : कुणाल तांबे रविंद्र कला आविष्कार संस्था, मुंबई
बुध. ११ डिसें. सायं. ७ वा. शोध सावल्यांचा लेखक व दिग्दर्शक : रितेश बायस राजे ट्रेकर्स, मुंबई
शुक्र. १३ डिसें. स. ११:३० वा. रेड अम्ब्रेला लेखक व दिग्दर्शक : अमित सोलंकी प्रमुख थिएटर असोसिएशन
शुक्र. १३ डिसें. सायं. ७ वा. शोकांतिकेची रात्र लेखक व दिग्दर्शक : राहुल कोंडे नवी मुंबई स्वयंसेवी समन्वय संस्था, वाशी
शनि. १४ डिसें. सायं. ७ वा. म्याडम लेखक : ऋषिकेश तुराई दिग्दर्शक : प्रणय आहेर नवदुर्गा मित्र मंडळ, चेंबूर
सोम. १६ डिसें. स. ११:३० वा. द हंग्री क्रो लेखक : डॉ. सोमनाथ सोनवलकर दिग्दर्शक : स्वप्नील खोत माझगाव डॉक स्पोर्ट्स क्लब, मुंबई
सोम. १६ डिसें. सायं. ७ वा. द फिलिंग पॅराडॉक्स लेखक व दिग्दर्शक : डॉ. सोमनाथ सोनवलकर माणूस फाऊंडेशन
मंगळ. १७ डिसें. सायं. ७ वा. नॉक आऊट लेखक : प्रसाद बाग दिग्दर्शक : किरण गावडे किंकणी कला अकादमी, मुंबई
बुध. १८ डिसें. स. ११:३० वा. जगज्जेता लेखक : श्रीनिवास नार्वेकर दिग्दर्शक : प्रवीण नाईक बेस्ट कला आणि क्रीडा मंडळ, मुंबई

सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्यावतीने विकास खारगे (भा.प्र.से.) अपर मुख्य सचिव तसेच विभीषण चवरे संचालक यांनी हौशी कलाकारांचे मनोबल वृद्धिंगत करण्यासाठी जास्तीतजास्त प्रेक्षकांनी उपस्थित राहावे अशी विनंती केली आहे. तसेच या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व नाट्य संस्थांना शुभेच्छा दिल्या आहेत.

तिकीट दर केवळ ₹१५/- आणि ₹१०/- आहे. रोज सकाळी ११:३० आणि संध्याकाळी ७ वाजता नाटकाचे प्रयोग होणार आहेत. सदर स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच “रंगभूमी डॉट कॉम” https://www.rangabhoomi.com/tickets/63rd-haushi-marathi-rajya-natya-spardha/ ह्या संकेतस्थळावरून ऑनलाइन तिकीट बुकींग करता येणार आहे.

पाचोरा शहरात मर्यादित दिवसासाठी भव्य सेल धमाका: फक्त ५० रुपयांपासून गारमेंट्स उपलब्ध

0

Loading

पाचोरा शहरातील प्रसिद्ध बालाजी कलेक्शनने आपल्या ग्राहकांसाठी एक अभूतपूर्व ऑफर आणली आहे. लहान मुलांचे गारमेंट्स, लेडीज गारमेंट्स तसेच वेस्टर्न पिसेस केवळ ५० रुपयांपासून उपलब्ध करून देत, ग्राहकांसाठी भव्य सेलची घोषणा केली आहे.

बालाजी कलेक्शनची वैशिष्ट्ये:

तब्बल २५,००० वेगवेगळ्या व्हरायटीजमधून निवडीचा आनंद.

आकर्षक आणि दर्जेदार ब्रँडेड कपड्यांची खास खरेदीची संधी.

प्रत्येकासाठी परवडणाऱ्या दरात अत्याधुनिक डिझाईन्स.

कोठे उपलब्ध आहे हा सेल?
हा भव्य सेल पाचोरा शहरातील भुयारी पुलाजवळ, हॉटेल भाग्यलक्ष्मीच्या बाजूला असलेल्या बालाजी कलेक्शनमध्ये आयोजित करण्यात आला आहे.

संपर्कासाठी:
प्रोप्रायटर ऋषिकेश चौधरी
मोबाईल नंबर: 8793846414

सणासुदीच्या खरेदीसाठी तसेच विशेष सेलच्या लाभासाठी आजच भेट द्या आणि आपल्या आवडीचे गारमेंट्स अत्यल्प किमतीत खरेदी करा!

येवला येथील माणुसकीची साक्ष – आदमने परिवाराचे प्रेरणादायी जीवन

0

Loading

पाचोरा -पैठणीचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे येवला आणि त्याच्या जवळच असलेल्या आडगाव गावात एक आदर्श आणि माणुसकीचा सुगंध असलेला परिवार आहे – आदमने परिवार. या कुटुंबाची ओळख आणि त्यांच्या माणूसकीने भारावून जाण्याचा अनुभव हा प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे.

ओळख आणि आदरातिथ्याचा अनुभव

येवल्यातील एका कामानिमित्त मला ललिता मॅडम यांच्या माध्यमातून आदमने कुटुंबाच्या रामदास आदमने यांच्याशी ओळख झाली. खरं तर, रामदास आदमने आणि ललिता मॅडम हे महाविद्यालयीन काळात क्लासमेट्स होते. जुन्या परिचयावरून रामदास आदमने यांनी आपुलकीने मला त्यांच्या घरी आमंत्रित केले. त्यांच्या घरच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवताच मला आदरातिथ्याचा खरा अर्थ कळला. घरातील सदस्यांनी थोड्याच वेळात मला आपुलकीने आपल्यासारखं केलं.

प्रगतिशील शेतकऱ्याची ओळख

रामदास आदमने हे प्रगतिशील शेतकरी म्हणून परिसरात प्रसिद्ध आहेत. त्यांच्या 50 एकर बागायती शेतीतून मिळणारा विकास त्यांचा जिद्द आणि श्रम यांचे उत्तम उदाहरण आहे. त्यांनी शेतीतील पारंपरिक पद्धतींबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नवा आदर्श निर्माण केला आहे. त्यांची शेती हा केवळ अर्थार्जनाचा स्रोत नसून गावासाठी प्रेरणास्थान आहे.

परिवाराचा एकोप्याचा मंत्र

माधवराव आणि शांताबाई आदमने यांच्या संस्कारातून घडलेल्या रामदास आदमने यांचा परिवार हा एकात्मतेचे प्रतीक आहे. परिवारातील सदस्यांची संख्या मोठी असूनही घरातील प्रत्येक सदस्याचा स्वभाव लाघवी आणि आपुलकीने भरलेला आहे. घरातील प्रत्येक व्यक्ती आपल्या नात्यांचे आणि परंपरेचे जतन करत आधुनिकतेचा स्वीकार कसा करावा, याचे उदाहरण आहे.

आदमने परिवाराबद्दल अधिक सांगायचे झाले तर, हा परिवार केवळ शेती किंवा सामाजिक कार्यासाठी प्रसिद्ध नाही, तर त्यांच्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठीही ओळखला जातो. आदमने कुटुंबाने एकत्र कुटुंब पद्धतीचे मूल्य कायम ठेवत एकजुटीचे उदाहरण निर्माण केले आहे. वडील माधवराव आणि मातोश्री शांताबाई यांच्या आशिर्वादाने आणि मार्गदर्शनाखाली रामदास आदमने, त्यांची पत्नी अनिता, लहान भाऊ संजय माधवराव आणि त्यांची पत्नी भारती या सर्वांनी घराचा एकोपाही जपला आहे.

परिवारातील पुढील पिढी शैक्षणिकदृष्ट्या उत्तम यश मिळवत आहे. रामदास आदमने यांची मुलगी श्वेता ही आयटी इंजिनियर असून साक्षीही B E असुन पुढील शिक्षणात प्रगती करत आहे. संकेतने B B I BlA शिक्षण घेतले आहे. हा परिवार फक्त आर्थिक प्रगतीसाठीच नव्हे, तर ज्ञान आणि कुटुंबातील मूल्यांसाठीही ओळखला जातो.

माणुसकीचे दर्शन

आदमने परिवार हे केवळ आपलेपणाचे आदर्श उदाहरण नाही, तर त्यांच्या माणुसकीच्या वागणुकीतून इतरांना प्रेरणा मिळते. घरातील कुठल्याही पाहुण्यांशी संवाद साधताना त्यांच्या वागणुकीत अभिजात प्रेम, आदर आणि आपुलकी जाणवते. त्यांच्या सहवासात काही तासही पुरेसे असतात, माणुसकीची खरी ओळख पटवण्यासाठी.

परिवाराचे योगदान

आदमने परिवार फक्त शेतीपुरता मर्यादित नाही. समाजहितासाठी आणि गावाच्या विकासासाठीही त्यांचे योगदान मोठे आहे. सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होताना, इतरांना मदतीचा हात देताना त्यांच्या कार्यातून सेवा आणि निस्वार्थतेचा वारसा जपला जातो.

प्रेरणादायी जीवनमूल्ये

आदमने परिवाराकडे पाहताना, जीवनात साधेपणा, कष्टाळूपणा आणि आत्मीयतेच्या भावनेने जीवन कसे समृद्ध करता येते, याची प्रेरणा मिळते. त्यांच्या कुटुंबाचा एकत्रितपणा आणि माणसांशी जोडलेला आत्मीय भाव समाजासाठी एक संदेश आहे की नात्यांमध्ये आपुलकी आणि विश्वास असेल तर कोणत्याही अडचणींवर सहज मात करता येते.

एक आदर्श कुटुंब

आडगाव येथील आदमने परिवार हा केवळ एक कुटुंब नाही, तर गावासाठी एक प्रेरणास्थान आहे. प्रगतिशील शेती, माणुसकीची भावना, कुटुंबाचा एकोप्याचा आदर्श आणि समाजसेवेतील सक्रिय सहभाग यामुळे त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या कडून शिकण्यासारखे अनेक पैलू आहेत.

आदमने परिवाराची भेट माझ्या स्मरणात कायमची राहील. माणुसकीचे जिवंत दर्शन, कुटुंबीयांचा आदर, आपुलकीचा वसा आणि प्रगतिशील विचार यामुळे त्यांच्या जीवनाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. असे आदर्श कुटुंब म्हणजे माणुसकीच्या प्रवाहातील दीपस्तंभच म्हणावे लागेल.

विद्यार्थ्यांसाठी कायदेशीर सेवा समिती स्थापन; विधीज्ञ व समांतर विधी सहायकांना प्रशिक्षण

0

Loading

जळगाव – राज्य विधी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी तसेच मुलांसाठी विशेष कायदेशीर सेवा समिती स्थापन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये कायद्याविषयी जागरूकता निर्माण करणे, त्यांचे हक्क आणि अधिकार यांची जाणीव करून देणे तसेच त्यांना कायदेशीर सल्ला देणे हा आहे. या योजनेतर्गत, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने विधीज्ञ आणि समांतर विधी सहायकांची एक विशेष समिती गठित केली असून त्यांच्यासाठी दोन दिवसीय विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

प्रशिक्षणाचे ठिकाण व उपस्थित मान्यवर

जिल्हा सत्र न्यायालय येथे नुकतेच आयोजित करण्यात आलेल्या या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने २रे सह. न्यायाधीश कनिष्ठ स्तराचे एस.पी. जसवंत, बाल न्याय मंडळाच्या सदस्य डॉ. शैलजा चव्हाण, मुख्य लोक अभिरक्षक अब्दुल कादीर अब्दुल शेख, उप मुख्य लोक अभिरक्षक मंजुळा मुंदडा, सहायक लोक अभिरक्षक शिल्पा रावेरकर, सागर पी. जोशी आणि हर्षल आर. शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश

प्रशिक्षणादरम्यान उपस्थित विधीज्ञ आणि समांतर विधी सहाय्यक यांना मुलांचे अधिकार आणि हक्क, त्यांना आवश्यक असलेली कायदेशीर मदत, तसेच न्यायालयीन प्रक्रियेत विद्यार्थ्यांना कसे मार्गदर्शन करावे, याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये २ रे सह. न्यायाधीश एस.पी. जसवंत यांनी मुलांच्या संरक्षण आणि हक्कांसंदर्भातील महत्त्वाचे कायदे उलगडून सांगितले. डॉ. शैलजा चव्हाण यांनी बाल न्याय मंडळाच्या कार्यपद्धतीची माहिती दिली आणि विद्यार्थ्यांसाठी न्यायदान प्रक्रियेत असलेली संवेदनशीलता अधोरेखित केली.

मुख्य लोक अभिरक्षक अब्दुल कादीर अब्दुल शेख यांनी न्यायालयीन प्रक्रियेतील स्थानिक लोकांच्या सहभागाचे महत्त्व पटवून दिले. उप मुख्य लोक अभिरक्षक मंजुळा मुंदडा यांनी मुलांच्या शिक्षणाशी निगडित कायद्यांवर चर्चा केली, तर सहायक लोक अभिरक्षक शिल्पा रावेरकर यांनी विद्यार्थी व लहान मुलांच्या बाबतीत कायदे कसे प्रभावीपणे अंमलात आणावेत, यावर लक्ष केंद्रित केले.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचा सक्रिय सहभाग

या दोन दिवसीय कार्यक्रमात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या प्रभारी अधीक्षक बी.के. मोरे यांच्यासह कनिष्ठ लिपिक आर.के. पाटील, प्रमोद ठाकरे, शिपाई पी.बी. काजळे, जावेद पटेल, सचिन पाटील आदींनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या सहकार्यामुळे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पार पडले. यावेळी विधीज्ञ आणि समांतर विधी सहाय्यक यांना त्यांच्या कामकाजाशी संबंधित व्यावहारिक माहिती देण्यात आली आणि त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी उपयुक्त उपायही सुचवण्यात आले.

विद्यार्थ्यांसाठी कायदेशीर सेवांचे स्वरूप

या नव्याने स्थापन झालेल्या कायदेशीर सेवा युनिटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या सेवा पुरविल्या जातील. उदाहरणार्थ:

कायदेविषयक सल्ला: विद्यार्थ्यांच्या हक्क व जबाबदाऱ्यांविषयी माहिती देणे.

कायदेशीर मदत: गरजूंना मोफत कायदेशीर मदत उपलब्ध करणे.

जागरूकता शिबिरे: विद्यार्थ्यांसाठी विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरे आयोजित करणे.

मानसिक व कायदेशीर आधार: मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कौटुंबिक, सामाजिक व शैक्षणिक समस्यांवर उपाय सुचवणे.


प्रशिक्षणाचा सकारात्मक परिणाम

या प्रशिक्षण कार्यक्रमामुळे जिल्ह्यातील विधीज्ञ आणि समांतर विधी सहाय्यक यांच्या कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. त्यांच्या माध्यमातून मुलांशी संबंधित असलेल्या न्यायालयीन प्रकरणे अधिक जलद व संवेदनशीलतेने हाताळली जातील. याशिवाय, विद्यार्थ्यांमध्ये कायद्याची जाण वाढून त्यांच्यात स्वतःच्या हक्कांबद्दल जागरूकता निर्माण होईल.

कार्यक्रमाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या या पुढाकारामुळे कायद्याविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठण्यात आला आहे. यामुळे, विधीज्ञ व समांतर विधी सहाय्यक यांना मुलांचे हक्क व अधिकार यांसंदर्भात अधिक चांगल्या प्रकारे काम करता येईल.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या या प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी एक पायाभूत व्यवस्था उभारण्यात येत आहे, जी भविष्यात मुलांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी मोलाची ठरणार आहे.

९ डिसेंबर पासून श्रमिक क्रीडा मैदानावर गं. द. आंबेकर चषक भव्य कबड्डी महोत्सव

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने कबड्डीची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ना. म. जोशी मार्गावरील श्रमिक जिमखाना येथे गं. द. आंबेकर स्मृती प्रित्यर्थ ९ डिसेंबर पासून व्यवसायिक पुरुष अ गट, स्थानिक पुरुष अ  गट आणि महिला गटाच्या स्पर्धांना, संध्याकाळी ६ वाजल्यापासून आरंभ होत आहे.
   
राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर, सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या पुढाकाराने गेल्या ३० वर्षांपेक्षा अधिक काळापासून हा क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. यंदाच्या कबड्डीच्या तीन विभागात खेळविल्या जाणार्‍या सामान्यांमध्ये सुमारे ४८ नामवंत संघ खेळणार आहेत. क्रीडा महोत्सवात रसिकांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, प्रो-कबड्डीतील डावखुर्‍या खेळाडूंचा रंजक खेळ पाहावयाला मिळणार आहे. क्रीडा सामने ९,१०,११ डिसेंबर तर अंतिम सामने त्याच क्रीडांगणावर १२ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता पार पडतील.

*आंबेकर शुटिंग बॉल स्पर्धा*
  
गं. द. आंबेकर राज्यस्तरीय शुटिंग बॉल स्पर्धा श्रमिक जिमखाना येथे ८ डिसेंबर पासून दिवसभर होतील. जवळपास २४ नामवंत संघ या क्रीडा महोत्सवात उतरतील आणि सर्व सामने बाद‌ पध्दतीने खेळविले जातील. मुंबई शुटिंग बॉल असोसिएशनचे अध्यक्ष माजी आमदार श्याम सावंत, सरचिटणीस दीपक सावंत, संघटक अशोक चव्हाण या स्पर्धांचे व्यवस्थापन पहाणार आहेत. क्रीडा प्रमुख उपाध्यक्ष सुनिल बोरकर यांच्या नेतृत्वाखाली सर्व स्पर्धा पार पडत आहेत. खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष रघुनाथ आण्णा शिर्सेकर, बजरंग चव्हाण, सेक्रेटरी शिवाजी काळे‌ आणि सर्व संघटन‌ सेक्रेटरी तसेच प्रकाश भोसले, अनिल पाटील आदी हा क्रीडा महोत्सव यशस्वीरीत्या पार पडण्यासाठी मेहनत घेत आहेत.
   
येत्या ७ डिसेंबर पासून  राष्ट्रीय मिल मजदूर संघ‌ येथे शालेय १४ वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी, आयडियल स्पोर्ट क्लब अकादमीच्या सहकार्याने लिलाधर चव्हाण यांच्या व्यवस्थापनाखाली भव्य बुध्दिबळ स्पर्धा पार पडणार आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या बुध्दिबळ स्पर्धा या क्रीडा महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे, असे प्रसिध्दी प्रमुख काशिनाथ माटल यांनी कळवले आहे.

गोशाला महासंघ जलगाव जिल्हा अध्यक्ष व सचिवांची निवड: गोसेवा क्षेत्रात नवा अध्याय

0

Loading

जळगाव, कुसुंबा – श्री रतनलाल सी. बाफना गौसेवा अनुसंधान केंद्र, कुसुंबा येथे जलगाव जिल्ह्यातील गोशाला महासंघाच्या संचालक, ट्रस्टी, गोप्रेमी व कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत जलगाव जिल्हा गोशाला महासंघाचे नवे अध्यक्ष व सचिव यांची निवड जाहीर करण्यात आली.

या प्रसंगी गोशाला महासंघ जलगाव जिल्हा अध्यक्षपदी पाचोरा-कोल्हे येथील स्व. आर. एस. बाफना गोशालेचे संचालक व वरिष्ठ पंचगव्य चिकित्सक डॉ. बंसीलाल जैन यांची, तर सचिवपदी दीपक पाटील यांची निवड महाराष्ट्र गौसेवा आयोगाचे सदस्य डॉ. सुनिलजी सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आली. या बैठकीस जिल्ह्यातील 50 पेक्षा अधिक गोशालेचे संचालक, ट्रस्टी व गोप्रेमी उपस्थित होते.

बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे व निर्णय

बैठकीत जिल्ह्यातील गोशाळांच्या कार्यपद्धतींवर चर्चा करण्यात आली. गोवंश रक्षण, संगोपन, तसेच पंचगव्य उत्पादनाचा प्रचार-प्रसार यावर विशेष भर देण्याचा निर्णय घेण्यात आला. गोशाळांच्या व्यवस्थापनात सुधारणा आणि गोवंश सेवेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावरही विचारविनिमय करण्यात आला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आदिजीन युवक चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबईचे जयेशभाई शाह व निलेशभाई शाह यांनी आपले विचार मांडले. त्यांनी गोशाळांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी उपयुक्त उपाययोजनांवर मार्गदर्शन केले.

महाराष्ट्र गौसेवा आयोगाचे सदस्य डॉ. उद्धवजी नेरकर यांनी पंचगव्य उत्पादनांचे महत्त्व अधोरेखित करत गोशाळांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ कसा घ्यावा यावर माहिती दिली.

प्रमुख मान्यवरांची उपस्थिती

बैठकीत गोसेवा क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती हजर होत्या. कोल्हे गोशालेचे चेअरमन श्री रमेशजी बाफना, महावीर गोशाला वरखेडीचे चेअरमन व प्रसिद्ध व्यापारी श्री विजयजी बडोला, तसेच आर. सी. बाफना गोशालेचे संचालक यांची उपस्थिती विशेषत्वाने नोंद घेण्यासारखी होती.

याशिवाय अकोला व वाशिम येथून आलेले गोप्रेमी व कार्यकर्तेही या कार्यक्रमात सहभागी झाले. सर्वांनी एकमुखाने गोवंश रक्षणासाठी नव्या पिढीला प्रेरणा देण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

गोशाळा महासंघाची नवीन दिशा

गोशाला महासंघाच्या नव्या नेतृत्वाच्या निवडीनंतर जलगाव जिल्ह्यातील गोशाळांची कार्यप्रणाली अधिक व्यापक व प्रभावी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. नवीन अध्यक्ष डॉ. बंसीलाल जैन व सचिव दीपक पाटील यांनी त्यांच्या जबाबदाऱ्या सक्षमपणे पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला.

डॉ. बंसीलाल जैन यांनी सांगितले की, “गोवंश रक्षणासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढे यायला हवे. पंचगव्य उत्पादनांच्या माध्यमातून गोशाळा स्वावलंबी बनवण्यावर आम्ही भर देणार आहोत.” सचिव दीपक पाटील यांनीही आपल्या भाषणात गोसेवेचे महत्त्व अधोरेखित करत, जिल्ह्यातील प्रत्येक गोशाळेला आर्थिक व व्यवस्थापनात आधार देण्याचा मानस व्यक्त केला.

शेवटी एकजुटीचा संदेश

बैठकीचा समारोप सर्वांनी एकत्र येऊन गोसेवा व गोसंवर्धनासाठी काम करण्याच्या संकल्पाने झाला. जिल्ह्यातील सर्व गोशाळांनी एकत्रितपणे काम केल्यास गोवंश संवर्धनाचे उद्दिष्ट साध्य करणे शक्य असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
  गोशाळा महासंघाच्या या बैठकीने जलगाव जिल्ह्यातील गोसेवेच्या क्षेत्रात एक नवा अध्याय सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत. गोवंश संरक्षण व संवर्धनासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

पाचोऱ्यातून जवळपास 65 कोटींची फसवणूक करून राहुल फरार, दुबईतील गुंतवणुक खरच आहे का?

0

Loading

पाचोऱ्यातून सुमारे 60 ते 65 कोटी रुपये जमा करून फरार झालेला राहुल नावाचा इसम सध्या नाशिकमध्ये असल्याची सुत्रांकडून प्राथमिक माहिती मिळाली आहे. मात्र, तो फक्त व्हॉट्सअ‍ॅप कॉलच्या माध्यमातून लोकांशी संपर्क साधत असल्याचे सूत्रांकडून समजते. याप्रकरणी

आणखी एक महत्त्वाचा तपशील पुढे आला आहे – राहुलने पळवलेली संपूर्ण रक्कम दुबईमध्ये हलवली असल्याची माहीती प्राप्त असुन तेथे त्याने एका आलिशान फ्लॅटमध्ये गुंतवणूक केल्याचेही समजते

फसवणुकीची पद्धत आणि नागरिकांची अडचण

राहुलने पाचोऱ्यात विविध लोकांना 5% & 10%  मासिक परताव्याचे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. सुरुवातीच्या काही महिने त्याने ठरलेला परतावा नियमित दिला. त्यामुळे त्याच्यावर लोकांचा विश्वास बसला. मात्र, अचानक सुमारे कोटीची रुपये गोळा करून तो बेपत्ता झाला. नागरिकांनी व्यवहार करताना गुप्तता पाळली असल्याने आणि कोणतेही दस्तऐवज नसल्याने आता त्यांच्या हाती “ठणठण गोपाळा” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

पोलिसांची तातडीची कारवाई

सळाळी ध्येय न्युजने या प्रकरणाचा पर्दाफाश केल्यानंतर कर्तव्यदक्ष पोलीस यंत्रणांनी राहुलला नासीक येथुन ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. तो दुबईला जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी तातडीने हालचाली करून त्याला पकडल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या प्रकरणातील पुढील कायदेशीर कारवाई आणि राहुलकडून जमा रक्कम परत मिळवण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या भुमिकेवरच सर्वांचे लक्ष केंद्रीत आहे. आणि यासाठी पोलीसच मायबाप ठरू शकतात

मंत्री, खासदार, आमदार, आणि पोलीस प्रशासनाकडून अपेक्षा

या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मंत्री, खासदार, आमदार, आणि अन्य लोकप्रतिनिधींनी या प्रकरणात लक्ष घालून फसवणूक झालेल्या नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. अनेक नागरिक आता राजकीय प्रतिनिधी, पोलीस प्रशासन, आणि माध्यमांकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त करत आहेत. पोलीस प्रशासनाने तातडीने कारवाई केली असली, तरी नागरिकांच्या तक्रारींचा वेगाने पाठपुरावा करणे आणि दोषींवर कठोर कारवाई करणे यासाठी स्थानिक पोलीस आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. अंदाजे 60-65 कोटीचा आकडा चर्चेत असला तरी फसवणूक झालेल्या लोकांची जी काही असेल ती रक्कम परत मिळवणे आणि त्यांना योग्य न्याय मिळवून देणे ही सर्वांची प्राथमिकता असायला हवी.

फसवणूकग्रस्तांनी काय करावे?

या प्रकरणी फसवणूक झालेल्या नागरिकांनी संघटित होऊन त्वरित कायदेशीर पावले उचलणे गरजेचे आहे. त्यांनी पोलीस ठाण्यांत तक्रारी नोंदवून सहकार्य करावे तसेच आपल्या हक्काच्या रकमेचा दावा करण्यासाठी पुरावे सादर करणे अत्यावश्यक आहे. मंत्री, खासदार, आमदार यांच्याकडे मदतीसाठी विनंती करून गुन्ह्याच्या चौकशीला वेग देण्याचा प्रयत्न करावा.

सावधानतेचा इशारा

या घटनेवरून धडा घेताना भविष्यात कोणत्याही वित्तीय व्यवहारात सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. मोठ्या परताव्याचे आमिष दाखवणाऱ्या योजनांमध्ये गुंतवणूक करताना सर्व कायदेशीर बाबी तपासणे आणि विश्वासार्हतेचा पूर्णपणे अभ्यास करणे अत्यावश्यक आहे.

राहुलचा फोटो शोधणे गरजेचे

जर कोणा व्यक्तीकडे राहुलचे फोटो असतील, तर ते तत्काळ ध्येय न्युज & झुंज कार्यालयाशी संपर्क साधावा. किंवा फोटो व्हॉट्सअ‍ॅपद्वारे 7385108510 पाठवता येतील.
अशा प्रकारच्या फसवणुकीच्या घटना वारंवार उघडतील येतात परंतु पैसा जास्त मिळेण्याच्या अपेक्षेने सुज्ञ नागरी देखील वारंवार या चक्रव्युहा मध्ये लालचे पोटी अडकतात असो फसवणूक झालेल्या नागरिकांनी धीर न गमावता एकत्र येऊन आपल्या हक्कांसाठी प्रयत्न सुरू ठेवणे गरजेचे आहे. मंत्री, खासदार, पोलीस प्रशासन, आणि प्रसार माध्यमांच्या सहकार्याने या प्रकरणाला न्याय मिळवून दिला जाईल असा विश्वास व्यक्त होत आहे. शेवटी कोणीही काहीही केले तरी पाचोरा पोलीसांची भुमीकाच महत्वपुर्ण आहे

ताज्या बातम्या

error: Content is protected !!