पाचोरा – शहर व तालुक्यासह परिसरात संपूर्ण जिल्ह्यात गेल्या काही तासापुर्वी अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे, तुफानी वादळ, गारपीट व वीजेच्या कडकडाटामुळे प्रचंड प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीत शहरी भागांसह ग्रामीण भागांतील प्रत्येक गाव प्रभावित झाले असून, शेती, घरे, जनावरे, विद्युतवाहिन्या, झाडे, शाळा इत्यादींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही बाब अत्यंत दु:खद आणि चिंताजनक असून अनेक शेतकरी आणि सामान्य नागरिक सध्या तणावाखाली आहेत. या नुकसानीमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत, काहींचे उभे पीक वाया गेले आहे, घरांचे छप्पर उडाले आहे तर काही ठिकाणी झाडे कोसळून जीवितहानीचाही धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांची भावना अत्यंत उद्विग्न असून, शासनाकडून तात्काळ मदतीची अपेक्षा व्यक्त होत आहे. नैसर्गिक आपत्तीच्या घटनांमध्ये अनेक वेळा मीडिया प्रतिनिधींवर विविध गावांतील घटना सविस्तरपणे कव्हर करण्याची अपेक्षा केली जाते. मात्र वास्तव पाहता प्रत्येक गावात जाऊन, प्रत्येक नागरिकाच्या नुकसानीचा स्वतंत्र वृत्तलेख तयार करणे हे अत्यंत वेळखाऊ, श्रमसाध्य व कधी कधी अशक्यप्राय कार्य आहे. एकीकडे वेळेचा अभाव, दुसरीकडे साधनांची मर्यादा आणि तिसरीकडे सर्वत्र होणाऱ्या नुकसानीचे सामूहिक स्वरूप लक्षात घेता ध्येय न्युज व झुंज वृत्तपत्राने यावेळी “कॉमन” स्वरूपात एकत्रित माहितीवर आधारित विनामूल्य बातमी प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला आहे. कॉमन स्वरूपातील बातमी म्हणजे संपूर्ण तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील नुकसानाच्या एकत्रित चित्रणावर आधारित लेख. यात स्थानिकांची भावना, शेतकऱ्यांचे मत, प्रशासनाच्या हालचाली व संभाव्य मदतीच्या बाबतीत अपेक्षा अशा सर्व गोष्टी सामाविष्ट केलेल्या असतात. त्यामुळे नागरिकांनी प्रत्येक गावाची स्वतंत्र बातमी नसल्याने नाराज न होता, सामूहिक भावनेने या प्रकाराकडे पाहावे अशी अपेक्षा आहे. अनेकदा नागरिकांच्या मनात ही अपेक्षा असते की, त्यांच्या नुकसानीबाबत बातमी प्रसिद्ध झाली की शासन लक्ष देईल.या अशाने काही भुरट्या पत्रकारांना पैसे देऊन आपल्या बातम्या लावायला सांगतात मात्र यापेक्षा अधिक महत्त्वाची बाब म्हणजे, संबंधित विभागाच्या पंचनाम्याच्या प्रक्रियेत स्वतः सक्रीय सहभाग घेणे. शेतकऱ्यांनी व नागरिकांनी पंचनाम्यासाठी गावात येणाऱ्या महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर स्वतः उपस्थित राहून आपले नुकसान सविस्तरपणे दाखवणे अत्यावश्यक आहे. प्रशासनाला नुकसान भरपाई देण्यासाठी पंचनाम्याचे अहवाल हेच अत्यावश्यक आणि अधिकृत आधार असतात. केवळ बातमी प्रसिद्ध झाली म्हणून किंवा व्हिडिओ व्हायरल झाला म्हणून सरकारी मदत मिळणार नाही व मिळतच नाही त्यामुळे प्रत्येकाने नुकसान नोंदवून घेण्यासाठी सजग राहणे, कोणतीही बाब दुर्लक्षित न करता तिची योग्य ती नोंद अधिकाऱ्यांकडून करून घेणे, आवश्यक कागदपत्रे तयार ठेवणे ही अत्यावश्यक बाब आहे. अशा संकटकाळात फक्त पत्रकारितेवर, बातमीवर किंवा राजकीय हस्तक्षेपावर अवलंबून न राहता नागरिकांनी व शेतकऱ्यांनी स्वतः पुढे येऊन प्रशासनाशी थेट संपर्कात राहणे गरजेचे आहे. स्थानिक तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, मंडल अधिकारी, सरपंच, कृषी अधिकारी, प्रांताधिकारी इत्यादी संबंधित अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्कात राहून आपली नुकसान भरपाईची प्रक्रिया वेळेत पूर्ण होईल याची दक्षता घेणे आवश्यक आहे. नागरिकांनी सजग राहण्याबरोबरच प्रशासनाची जबाबदारीही कमी होत नाही. महसूल व कृषी विभागाने वेळेवर सर्व गावांमध्ये प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची व नागरिकांची नोंद करून घेणे, पंचनामे वेळेत तयार करणे व शासनाला अहवाल सादर करणे हे त्यांचे कर्तव्य आहे. यामध्ये कोणतीही ढिलाई, विलंब अथवा पक्षपातीपणा झाल्यास नागरिकांचा रोष ओढवू शकतो. हे देखील शासकीय यंत्रणेला चांगल्या प्रकारे माहित आहे या आपत्तीमधून बाहेर पडण्यासाठी केवळ बातम्या, पोस्ट, व्हायरल व्हिडिओ अथवा प्रतिक्रिया यावर विसंबून राहून चालणार नाही. नागरिकांनी स्वतःहून प्रशासनाच्या प्रत्येक टप्प्यावर सक्रिय सहभाग घेणे गरजेचे आहे. पत्रकारांनी आपापल्या परीने मोठ्या क्षेत्राची माहिती एकत्र करून वस्तुनिष्ठ बातमी प्रसिद्ध केल्याने ती एक दस्तऐवज ठरते. मात्र त्याचवेळी मदत मिळवण्यासाठी पंचनाम्यात प्रत्यक्षपणे उपस्थित राहणे आणि आपल्या हक्कासाठी शासकीय यंत्रणेसमोर शांत, संयमी व प्रभावीपणे आपली बाजू मांडणे हीच खरी गरज आहे. शेवटी, ही नैसर्गिक आपत्ती असून तिचा सामना एकजुटीने, सजगतेने आणि सकारात्मक दृष्टिकोनातूनच करता येईल. शासन, प्रशासन, माध्यमे आणि नागरिक या सर्व घटकांनी एकमेकांचा सन्मान राखत कार्य केल्यासच आपत्तीचे सावट दूर होऊन पुनर्बांधणीची प्रक्रिया सुरळीत होऊ शकेल.
पाचोरा –तालुका आणि परिसरात मागील अनेक वर्षांत कधीही न अनुभवलेले अवकाळी तुफानी वादळ, विजेचा कडकडाट आणि मुसळधार पावसाचे संकट दि.11जूनच्या संध्याकाळी अचानक कोसळले. यामुळे शहरासह ग्रामीण भागातील शेतकरी आणि नागरिकांना मोठ्या प्रमाणात नुकसानाचा सामना करावा लागला. या नैसर्गिक संकटाच्या पार्श्वभूमीवर प्रांत अधिकारी भूषण अहिरेसाहेब आणि तहसीलदार विजय बनसोडेसाहेब यांनी नेतृत्व करत महसूल विभागाची यंत्रणा रात्रीपासूनच युद्धपातळीवर कामाला लावली. या तातडीच्या कारवाईमुळे प्रशासनाच्या कर्तव्यपरायणतेचा एक आदर्श ठेवल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून आले. दिवस संपताना सायंकाळी अचानक आलेल्या गडगडाट वादळाने शहर आणि परिसरात अक्षरशः थैमान घातले. तासाभरात आकाश काळवंडले, गार वाऱ्याच्या झोतांनी झाडे उन्मळून पडली, काही ठिकाणी पत्रे उडाली, तर विजेचा कडकडाट इतका भीषण होता की अनेक ठिकाणी जनतेने घरात दिवा लावून देवपूजा केली. या भयावह आपत्तीत नागरिकांच्या घरांचे, शेतांतील उभ्या पिकांचे, फळबागांचे, जनावरांच्या गोठ्यांचे, विद्युत वाहिन्यांचे, रस्त्यांचे, सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अशा अराजक आणि गोंधळाच्या वातावरणात प्रांत अधिकारी भूषण अहिरेसाहेब आणि तहसीलदार विजय बनसोडेसाहेब यांनी वरीष्ठांच्या आदेशाची वाट न पाहता व कोणताही विलंब न करता महसूल विभागाच्या सर्व यंत्रणेला त्वरित अलर्ट केले. मध्यरात्रीच त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पाहणीसाठी तयारी सुरू केली. पहाटे उजाडायच्या आधीच पाचोरा तालुक्यातील विविध भागांत तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार यांच्यासह संपूर्ण महसूल यंत्रणा सज्ज झाली होती. वादळामुळे संपूर्ण शहरात वीज पुरवठा खंडित झाला होता. मोबाईल टॉवर बंद पडल्यामुळे संपर्काची साधनेही जवळजवळ ठप्प झाली होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत महसूल कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी ओळखून, चंद्रप्रकाशात आणि हातातील टॉर्चच्या मदतीने नुकसानग्रस्त भागांची पहाणी व मदत कार्य सुरू ठेवले. ही सेवा म्हणजे केवळ काम नव्हे, तर एक सामाजिक बांधिलकी होती. या संकटात प्रांत अधिकारी भूषण अहिरे साहेब आणि तहसीलदार विजय बनसोडे साहेब हे स्वतः आपत्तीग्रस्त गावांमध्ये उतरले. त्यांनी पहाटेपासून न थकता विविध भागांची पाहणी केली, नागरिकांची माहिती घेतली, तातडीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. त्यांच्या उपस्थितीने महसूल कर्मचाऱ्यांमध्ये नवी ऊर्जा संचारली. अनेकांनी या अधिकाऱ्यांचे ‘फील्डमध्ये येणे’ हे वाखाणण्यासारखे असल्याचे नमूद केले. महसूल विभागाने गावनिहाय विशेष पथके तयार करून नुकसानग्रस्त शेतांमध्ये, घरांमध्ये, शाळांमध्ये आणि गोठ्यांमध्ये जाऊन पाहणी केली. संबंधित तलाठ्यांनी डिजिटल फोटोंसह अहवाल तयार करण्याचे निर्देश पाळून ‘ई-पंचनामा’ प्रणालीच्या माध्यमातून माहिती संकलित करणे सुरू केले आहे आज-उद्या संध्याकाळपर्यंत अनेक प्राथमिक अहवाल तयार करण्यात येऊन तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे वादळामुळे ज्या गावांमध्ये विजेचे खांब कोसळले, झाडे रस्त्यावर पडली, तिथे महसूल विभागाने महावितरण, वनविभाग, नगरपरिषद, आणि पोलिस प्रशासनाशी समन्वय साधून मार्ग मोकळा केला. हा समन्वय हीच या यंत्रणेची कामगिरी अधिक परिणामकारक बनवत होती. महसूल विभागाची तत्काळ आणि लोकाभिमुख कृती पाहून नागरिकांनी समाधान व्यक्त केले. अनेक शेतकऱ्यांनी अशा प्रकारच्या संकटात प्रशासनाने पहिल्यांदाच एवढ्या वेगाने प्रतिसाद दिला असल्याचे नमूद केले. “अम्हाला वाटलं नुकसान गेला म्हणून काहीच होणार नाही, पण तहसीलदारसाहेब स्वतः येऊन पाहणी केली, फोटो घेतले, तेव्हा वाटलं की शासन खऱ्या अर्थाने सोबत आहे,” असे एक शेतकरी म्हणाला. या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महसूल विभागाच्या कार्यवाहीची माहिती ‘ध्येय न्यूज’सह इतर स्थानिक मीडियांनी दिल्यानंतर सोशल मीडियावर प्रशंसांचे मेघ गर्जन करू लागले. “प्रांत अधिकारी अहिरे साहेब आणि तहसीलदार बनसोडे साहेब यांच्यासारखे अधिकारी असल्यामुळेच जनता निर्धास्त आहे,” अशा प्रतिक्रिया व्हायरल झाल्या. काहींनी तर फोटो शेअर करत महसूल कर्मचाऱ्यांना ‘आपत्तीतील देवदूत’ असे संबोधले. या घटनांनंतर प्रांत कार्यालयात आढावा बैठक घेऊन अशा अनपेक्षित आपत्तींच्या वेळी अधिक कार्यक्षमतेने काम करता यावे यासाठी काही पुढाकार ठरवण्यात आले स्थानीक ग्रामसेवक, पोलीस पाटील, सरपंच यांच्याशी ‘आपत्ती पूर्व तयारी’वर नियमित बैठक. ‘ध्येय न्यूज’चे प्रतिनिधी विविध ठिकाणी महसूल यंत्रणेच्या कामकाजावर बारकाईने लक्ष ठेवून होते. प्रत्यक्ष पाहणी करताना अधिकारी व कर्मचारी जे पावसात भिजत, चिखलात चालत, घराघरांत पोहोचत होते – ते पाहून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे हे केवळ सरकारी कर्तव्य नव्हे, तर जनतेबद्दल असलेली जबाबदारीची जाणीव दिसुन आली.या अवकाळी तुफानाने जनतेला मोठा धक्का दिला असला, तरी महसूल विभागाच्या प्रामाणिक आणि तत्काळ प्रतिसादामुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना जागृत झाली. प्रांत अधिकारी भूषण अहिरेसाहेब आणि तहसीलदार विजय बनसोडेसाहेब यांच्या नेतृत्वाखालील महसूल यंत्रणा ही नुकसानीच्या स्थळी ठिकठिकाणी पोहोणारी ‘जनतेच्या दु:खात सहभागी होणारी’ यंत्रणा आहे, हे या प्रसंगात स्पष्ट झाले. त्यामुळेच या विभागाचे मनापासून आभार मानणे ही सर्वसामान्यांची नैतिक जबाबदारी आहे. ध्येय न्यूज & झुंज वृत्तपत्र परिवारातर्फे – पाचोरा महसूल विभागास सलाम!
Dhyeya News Special Analysis पाचोरा- शहरात मंगळवारी रात्री अवकाळी वादळी वाऱ्यांसह आलेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण शहराला अक्षरश: हादरवून टाकले. या वादळात अनेक झाडे कोसळली, फांद्या तुटून रस्त्यावर विखुरल्या गेल्या, विद्युत खांब वाकले आणि विद्युत वाहिन्यांना मोठ्या प्रमाणावर हानी पोहोचली. परिणामी, संपूर्ण शहरा सहपरिसराचा वीजपुरवठा खंडित झाला आणि अंधाराचे साम्राज्य पसरले. या नैसर्गिक आपत्तीत जेव्हा सामान्य नागरिक दहशतीत घरात सुरक्षिततेसाठी झुंजत होते, तेव्हा महावितरण (MSEB) चे अधिकारी आणि कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता थेट रस्त्यावर उतरले होते. त्यांचे हे कार्य केवळ एक जबाबदारी म्हणून नव्हते, तर ती एक सेवा वृत्तीची जिवंत साक्ष होती. रात्रीच्या सुमारास आलेल्या जोरदार वादळी पावसाने शहराच्या विविध भागांमध्ये झाडांची व फांद्यांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली. काही ठिकाणी झाडांचे खोडच रस्त्यावर कोसळले तर अनेक ठिकाणी विद्युत वाहिन्यांवर फांद्या पडल्याने वायरिंग तुटले. या अपघातामुळे वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला.या संकटाची माहिती मिळताच महावितरणच्या पाचोरा विभागाचे कार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंते, कनिष्ठ अभियंते, वायरमन, लाइनमन आणि इतर तांत्रिक कर्मचारी तातडीने हरकत घेत कामासाठी सज्ज झाले. त्यांनी कोणताही विलंब न करता सर्वप्रथम नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोका असलेली ठिकाणे ओळखून तेथील विद्युत प्रवाह पूर्णतः बंद केला. त्यानंतर लगेचच झाडांची फांदी हटवणे, तुटलेल्या वायरची दुरुस्ती, खांब सरळ करणे, ट्रान्सफॉर्मर तपासणी, फ्यूज वायरिंग बदलणे यासारख्या तांत्रिक कामांची यादी आखून, ‘वॉर रूम’ पद्धतीने विविध पथकांची नेमणूक करण्यात आली. हे सर्व कर्मचारी रात्रभर सतत पावसात, चिखलात आणि काळोखात कार्यरत होते. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेली ।समर्पण भावना आणि तत्परता याचे संपूर्ण पाचोरेकरांना आश्चर्य आणि अभिमान वाटावा अशीच होती. विजेच्या खांबावर चढून तुटलेल्या वायर जोडणारे कर्मचारी, रात्रभर झाडांच्या फांद्या रस्त्यावरून हटवणारे लाईनमन, वायरिंग तपासणारे कनिष्ठ अभियंते आणि या सर्वांची योग्य समन्वयाने नेमणूक करणारे वरिष्ठ अधिकारी यांचे योगदान शब्दांत मांडणे कठीण आहे. जेव्हा वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाट असताना सर्वसामान्य जनतेला घराबाहेर पडण्याची सुद्धा भीती वाटत होती अशा अडचणीच्या क्षणी MSEB चे कर्मचारी आपल्या कुटुंबियांना सोडून जिवाची पर्वा न करता कर्मचाऱ्यांनी दाखवलेले धैर्य, निष्ठा आणि सेवाभाव हे खरे देशसेवेसम आहेत. त्यांचे कार्य हे केवळ तांत्रिक नव्हे, तर सामाजिक व नैतिक बांधिलकीचे प्रतीक म्हणावे लागेल. रात्री साधारणत: 2 वाजता बऱ्यापैकी काही परिसरातील वीजपुरवठा पुन्हा सुरू करण्यात महावितरणला यश आले. प्रामुख्याने ही गोष्ट महत्त्वाची ठरते कारण ज्या भागात अनेक सार्वजनिक सेवांचे केंद्रबिंदू आहेत – दवाखाने, अपात्कालीन सेवा केंद्रे, पाणीपुरवठा यंत्रणा इत्यादी. महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्राधान्यक्रम ठरवून योग्य ठिकाणी वीजपुरवठा सुरळीत केला. गणेश कॉलनीसह काही भागांत अजूनही वीज खंडित मात्र, अजूनही गणेश कॉलनीसह काही भागांतील घरगुती वीजपुरवठा पूर्णपणे पूर्ववत झालेला नाही. कारण या भागांतील तांत्रिक अडचणी आणखी जटिल आहेत – अनेक ठिकाणी झाडे व फांदया पडल्याते खांब वाकलेले असून वायरिंग तुटून पडलेली आहे. तरीही MSEB चे कर्मचारी दिवसरात्र काम करत असून या ठिकाणीही लवकरच वीजपुरवठा सुरळीत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.या अडचणीच्या काळात पाचोऱ्याच्या नागरिकांनी देखील संयम आणि समजूतदारपणा दाखवला. काही ठिकाणी लोकांनी स्वत: झाडांच्या फांद्या हटवण्यासाठी मदत केली. स्थानिक पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि माजी – भावी नगरसेवकांनी MSEB च्या पथकांसोबत काम केले. नागरिकांनी सोशल मीडियावरून महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आणि त्यांच्या कार्याची प्रशंसा केली.जेव्हा सगळीकडे अंधार असतो, रस्त्यावर पाणी साचलेले असते, वाहतूक बंद असते, तेव्हा घराबाहेर पडून काम करणारे हे विजेचे कर्मचारी म्हणजे खरे खरे समाजाचे आधारस्तंभ. अशा आपत्कालीन काळात ते केवळ एक कर्मचाऱ्याची भूमिका निभावत नाहीत, तर ‘देवदूत’ ठरतात. MSEB च्या कार्यकारी अभियंत्यांपासून ते लाइनमनपर्यंत सगळ्यांनी आपल्या कामात ज्या प्रकारचे तांत्रिक कौशल्य, संकटप्रबंधन व नागरिकांशी संवाद ठेवण्याची पद्धत दाखवली, ती खरोखरच शिकण्यासारखी आहे. महावितरणचे नेतृत्व – प्रभावी समन्वयाची कमाल या संपूर्ण प्रक्रियेत महावितरणचे वरिष्ठ अधिकारी, उपविभागीय अभियंते, सहाय्यक अभियंते यांनी प्रभावी समन्वय व नियोजन करून आपत्ती व्यवस्थापनात ‘आदर्श मॉडेल’ सादर केले. प्रत्येक पथकाकडे कोणती यंत्रणा आहे, कोणते साहित्य आहे, कोठे काय काम बाकी आहे, हे व्यवस्थित नोंद ठेवून ते समन्वयित केले गेले. त्यामुळे कोणताही गोंधळ न होता सुसूत्रपणे सर्व कामे पार पडली. . शेवटी काय शिकायला मिळाले?
संकटं कोणत्याही क्षणी येऊ शकतात, पण त्याला सामोरे जाणारी इच्छाशक्ती, संघभावना व सेवा वृत्ती असेल तर त्यावर मात करता येते. 2 सरकारी यंत्रणेकडे फक्त तक्रारीच नाही, तर त्यांचे चांगले काम देखील उजेडात आणले पाहिजे. 3 -MSEB चे कर्मचारी हे ‘काम बोलतंय’ हे वाक्य जणू सजीव करून दाखवणारे आहेत. या पूर्ण प्रकरणातून जे स्पष्ट होते ते म्हणजे महावितरणचे कर्मचारी हे केवळ सरकारी कर्मचारी नसून, ते सामान्य माणसाच्या आयुष्यात प्रकाश पसरवणारे खरे नायक आहेत. त्यांचं काम जेवढं कठीण आहे, तेवढंच ते गरजेचं आणि समाजासाठी अनमोल आहे.त्यांच्या कार्याला ‘ड्युटी’ म्हणून न पाहता, एक ‘मिशन’ म्हणून स्वीकारणं, संकटातही डगमगून न जाता सेवा करण्याची वृत्ती, आणि त्यातून जनतेच्या मनात निर्माण होणारा विश्वास – हे सगळं महावितरणच्या पाचोरा विभागाला सलाम करण्यास भाग पाडते. Dhyeya News च्या वतीने पाचोरा महावितरणचे सर्व अधिकारी, अभियंते, कर्मचारी, लाइनमन व तांत्रिक सहकाऱ्यांना शतशः सलाम!
भडगाव – नगरीच्या राजकारणात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे, संयमी भाषण शैली, विकासाभिमुख दृष्टीकोन असलेले माजी नगराध्यक्ष गणेशअण्णा परदेशी यांनी आज मुंबई येथे शिवसेनेत अधिकृतपणे प्रवेश केला. हा प्रवेश माजी मुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते यांच्या हस्ते पार पडला. गणेशअण्णा परदेशी हे भडगाव नगरीतील एक अभ्यासू, लोकाभिमुख, आणि कार्यक्षम नेतृत्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या सामाजिक आणि राजकीय कारकिर्दीला शिवसेनेच्या मजबूत विचारधारेची जोड लाभल्याने भडगाव परिसरातील राजकारणात नव्या समीकरणांची नांदी झाली आहे. शिवसेनेच्या मुंबईतील पक्ष मुख्यालयात झालेल्या विशेष समारंभात गणेशअण्णा परदेशी यांचा पक्षप्रवेश मोठ्या जल्लोषात पार पडला. या प्रसंगी भडगाव-पाचोरा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार किशोरअप्पा पाटील, भडगाव तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष युवराज पाटील, युवासेना विधानशेत्र प्रमुख लाखिचंद पाटील, उपजिल्हा प्रमुख डॉ. विशाल पाटील, जिल्हा वैद्यकीय आघाडीचे डॉ. प्रमोद पाटील, युवासेना शहरप्रमुख नीलेश पाटील, तालुका संघटक महेंद्र ततार, भडगाव नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष जगन भोई, माजी नगरसेवक बापुराव पाटील, देवाजी अहिरे, प्रदीप भाऊ आणि जहांगीर मालचे या शिवसेना नेत्यांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली. गणेशअण्णा परदेशी यांनी भडगाव नगराध्यक्षपदाच्या कालखंडात शहराच्या सर्वांगीण विकासासाठी निरंतर प्रयत्न केले. पाणीपुरवठा योजना, रस्ते डांबरीकरण, वीज प्रश्न सोडवणे, नागरी सुविधा वाढवणे, कचरा व्यवस्थापनात सुधारणा, तसेच महापालिकेतील प्रशासन पारदर्शक ठेवणे या सर्व बाबींमध्ये त्यांनी आपले नेतृत्त्व प्रभावीपणे सिद्ध केले आहे.त्यांच्या कार्यकाळात भडगाव नगर परिषदेमार्फत विविध योजनांच्या माध्यमातून गरीब व सामान्य जनतेपर्यंत विकास पोहोचवण्यात आला. त्यांनी महिलांच्या स्वयंरोजगार गटांना प्रोत्साहन देणे, युवकांसाठी खेळांचे मैदान उपलब्ध करून देणे, तसेच विविध सामाजिक उपक्रमांमधून समाजाशी कायमचा संबंध प्रस्थापित केला. गणेशअण्णा परदेशी यांनी पक्षप्रवेशानंतर ध्येय न्युजशी बोलताना शिवसेनेचा महाराष्ट्राभिमान,आमदार किशोर आप्पा पाटील यांचा सामाजिक न्याय, ग्रामीण विकास आणि ठाम भूमिकांबाबत आपली निष्ठा व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, “शिवसेना हा एक फक्त राजकीय पक्ष नसून, तो सामान्य जनतेच्या हक्कांचा रक्षक आहे. माझ्या सामाजिक कार्याला आणि विचारांना योग्य दिशा देणारा आणि अधिक व्यापक व्यासपीठ देणारा हा पक्ष असल्याने मी आजपासून शिवसेनेचा भाग झालो आहे.” ते पुढे म्हणाले,आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली “माझे ध्येय हे भडगाव नगरीचे व तालुक्याचे सर्वांगीण, समतोल विकास करणे आहे. शिवसेनेच्या माध्यमातून आमदार किशोरअप्पा पाटील यांच्या नेतृत्वात आपण हे उद्दिष्ट साध्य करू.” या प्रसंगी आमदार किशोरअप्पा पाटील यांनी गणेश परदेशी यांचे पक्षप्रवेशाबद्दल स्वागत करताना सांगितले की, “गणेश परदेशी हे सामाजिक जाणीव असलेले नेतृत्व असून, त्यांचा शिवसेनेत प्रवेश म्हणजे भडगाव परिसरासाठी एक सशक्त निर्णय आहे. त्यांच्या अनुभवाचा उपयोग आम्ही पक्षबांधणी आणि स्थानिक विकास कार्यात करू.”युवराज पाटील, लाखिचंद पाटील, डॉ. विशाल पाटील, डॉ. प्रमोद पाटील यांच्यासारख्या स्थानिक व युवा नेत्यांनीही परदेशी यांच्या प्रवेशाचे स्वागत केले. सर्वांनी एकत्र येत भडगावच्या राजकारणात नव्या ऊर्जा व नव्या संकल्पांसोबत काम करायचे निर्धार व्यक्त केला.गणेशअण्णा परदेशी यांच्या शिवसेनेत प्रवेशामुळे भडगाव शहर व परिसरातील शिवसैनिकांत उत्साहाचे वातावरण आहे. स्थानिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, “गणेशअण्णा परदेशी यांचे अनुभव आणि कार्यकुशलता पक्षाला बळकटी देणार आहे. त्यांची लोकांशी असलेली जवळीक व संवादशैली हा पक्षासाठी एक मोठा फायदा ठरेल.” विशेष म्हणजे, परदेशी यांना राजकीय व सामाजिक क्षेत्रातील विविध घटकांचा पाठिंबा आहे. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे तालुक्यातील सत्तासमीकरणात नवा कलाटणीबिंदू निर्माण झाला आहे. स्थानिक पातळीवर भविष्यातील निवडणुकीचे राजकीय चित्र अधिक रंगतदार आणि प्रतिस्पर्धात्मक होणार याबाबत राजकीय विश्लेषकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.गणेशअण्णा परदेशी यांचा शिवसेनेत प्रवेश हा केवळ एका व्यक्तीचा पक्षबदल नसून, तो एक सकारात्मक राजकीय संकेत आहे. विकासाभिमुख आणि जनतेच्या हितासाठी लढणाऱ्या नेतृत्वाचा शिवसेनेत प्रवेश झाल्याने पक्षाच्या विचारसरणीला चालना मिळणार आहे. त्यांच्या समवेत भडगाव परिसरातील अनेक युवक व समर्थक पुढील काही दिवसांत शिवसेनेत दाखल होतील, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे. हे संपूर्ण दृश्य बघता, भडगाव नगरीचा राजकारणाचा नवा अध्याय सुरू झाल्याचे चित्र स्पष्टपणे दिसते. सामाजिक सौहार्द, विकासाचा निर्धार, आणि शिवसेनेच्या नेतृत्वात सामर्थ्यशाली भडगाव घडविण्याच्या दिशेने टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.
पाचोरा – वीज पुरवठ्याच्या गंभीर समस्येवर आमदार किशोरआप्पा पाटील यांची तातडीने दखल, प्रांताधिकारी कार्यालयात घेतली कंपनी अधिकाऱ्यांसोबत बैठक – मात्र प्रसारमाध्यमांना आमंत्रण का नव्हते? पाचोरा शहर व परिसरातील वीजपुरवठा खंडित होण्याच्या गंभीर समस्येची तातडीने दखल घेत आमदार किशोरआप्पा पाटील यांनी प्रांताधिकारी कार्यालयात संबंधित वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. नागरिकांना होणाऱ्या त्रासाची गंभीर दखल घेत या बैठकीत अधिकाऱ्यांना झाडाझडती घेण्यात आली. ही बैठक प्रांताधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती.अशा महत्त्वाच्या आणि लोकहिताच्या विषयावर बैठक होत असताना, स्थानिक पत्रकार आणि प्रसारमाध्यमांना या बैठकीबाबत अधिकृतरित्या आमंत्रण देणे, हे प्रांताधिकारी साहेबांचे प्रशासकीय व सामाजिक कर्तव्य होते. परंतु याबाबत पत्रकारांना आमंत्रित करण्यात आले की नाही, याची माहिती अधिकृतरीत्या मिळालेली नाही. मात्र हे निश्चित आहे की, ‘ध्येयन्युज’ व ‘झुंज’ या दोन्ही स्थानिक दैनिकांचे संपादक या बैठकीसाठी आमंत्रित नव्हते.तरीदेखील, अन्य माध्यमांद्वारे या बैठकीची माहिती समोर आल्यानंतर पत्रकार आणि संपादक या नात्याने आमदार किशोरआप्पा पाटील यांनी या प्रश्नावर घेतलेली स्पष्ट भूमिका आणि तातडीची कार्यवाही याचे विश्लेषण करणे हे आमचे नैतिक व व्यावसायिक कर्तव्य ठरते. असे प्रसंग हे केवळ समस्येचे निराकरण नव्हे तर लोकप्रतिनिधींनी घेतलेली जबाबदारी व प्रशासनातील समन्वय याचे प्रतिबिंब ठरतात. त्यामुळे, माध्यमांशी संवाद न ठेवता अशा बैठका पार पडणे हे पारदर्शक प्रशासनाच्या दृष्टीने चिंताजनक बाब ठरते. आम्ही आशा करतो की, भविष्यात याप्रकारच्या बैठकीत सर्व प्रसारमाध्यमांना समान व आवश्यक मान्यता दिली जाईल.पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेला गेल्या काही महिन्यांपासून सतावत असलेल्या वीजपुरवठ्याच्या समस्येने गंभीर वळण घेतले आहे. विशेषतः शेतकरी वर्गाच्या तोंडावर खरीप हंगाम सुरू असताना, वेळेवर वीज न मिळाल्यामुळे त्यांच्या शेतमालाचे आणि आर्थिक गणिताचे प्रचंड नुकसान होत आहे. अशा परिस्थितीत जेव्हा बहुसंख्य लोकप्रतिनिधी गप्प राहतात किंवा केवळ निवेदनापुरते मर्यादित राहतात, तेव्हा पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोरआप्पा पाटील यांनी घेतलेला आक्रमक पवित्रा हे एक सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. या बातमीच्या निमित्ताने आपण या संपूर्ण घटनाक्रमाचे, त्यामागील राजकीय-सामाजिक पार्श्वभूमीचे आणि आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या नेतृत्वशैलीचे सखोल विश्लेषण करणार आहोत. त्यांच्या भूमिकेचा परिणाम, प्रशासनाच्या कार्यशैलीवर होणारा दबाव आणि जनतेच्या मनात निर्माण होणारी विश्वासार्हता या सर्व गोष्टींचा विचार येथे करण्यात येणार आहे. पाचोरा व परिसरातील गावांमध्ये वीजपुरवठ्याच्या बाबतीत अनेक समस्या सातत्याने अनुभवास येत होत्या. विशेषतः डीपीडीसीच्या माध्यमातून निधी मंजूर होऊनही प्रत्यक्षात ट्रान्सफॉर्मर बसवले जात नव्हते, काही ठिकाणी ट्रान्सफॉर्मर मंजूर होऊन वर्षानुवर्षे प्रलंबित होते, वीज जोडण्या होत नव्हत्या. त्यातच यंदाच्या वर्षी लवकर पावसाळा सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी बी-बियाण्यांची खरेदी करून शेतात पेरण्या सुरू केल्या. मात्र वीजपुरवठा अपुरा असल्याने मोटारी सुरू न होऊ शकता शेतजमीन कोरडीच राहिली. ही केवळ आर्थिक नुकसानीची बाब नव्हती, तर शेतकऱ्यांच्या मनोबलाचे आणि आत्मसन्मानाचे देखील नुकसान करणारी गोष्ट होती. शेतकऱ्यांचे जीवनचक्रच पूर्णपणे विस्कळीत झाले होते. यामुळेच या प्रश्नाला गांभीर्याने घेत जनतेच्या वतीने आवाज उठवणे हे काळाची गरज होती. या पार्श्वभूमीवर, आमदार किशोरआप्पा पाटील यांनी पाचोऱ्यात महावितरणच्या अधिकाऱ्यांसमोर थेट बैठक आयोजित केली. या बैठकीत त्यांनी उपस्थित शेतकरी प्रतिनिधींना आपली व्यथा मांडण्याची मोकळीक दिली. शेतकऱ्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, डीपी मंजूर असूनही जोडणी नाही, ट्रान्सफॉर्मर बसवले गेले नाहीत, टेंडर मंजूर झाले पण कामे सुरू नाहीत. एकंदरीतच महावितरणकडून होत असलेल्या ढिसाळ कारभारामुळे त्यांचा जीव मेटाकुटीस आला आहे. आमदार पाटील यांनी प्रशासनाकडून माहिती घेऊन, या समस्या का सुटत नाहीत याचे उत्तर मागितले. “डीपीडीसीतून निधी मंजूर करूनसुद्धा जर विजेच्या समस्या सुटत नसतील, तर मग महावितरण नेमकं करतं तरी काय?” असा थेट सवाल करून त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. हा सवाल केवळ प्रशासकीय जबाबदारीचा नव्हता, तर तो एक लोकशाहीचा चपखल हस्तक्षेप होता. आजच्या काळात, अनेक लोकप्रतिनिधी फक्त निवडणुकीपुरती भूमिका बजावतात. निवडून आल्यानंतर जनतेशी संवाद कमी होतो, प्रशासनावर दबाव कमी होतो आणि लोकांच्या प्रश्नांना वेळेवर उत्तरे मिळत नाहीत. या सगळ्या पार्श्वभूमीवर किशोरआप्पा पाटील यांची कार्यपद्धती वेगळी ठरते. ते शेतकऱ्यांच्या समस्या ऐकतात, त्यांचे गांभीर्य समजून घेतात आणि त्यावर त्वरित उपाययोजना घडवून आणण्यासाठी स्वतः पुढाकार घेतात. त्यांच्या बोलण्यात राजकीय भाषेचा लवलेशही नसतो, तर त्यातून जनतेच्या वेदनेचे प्रतिबिंब उमटते. हीच गोष्ट त्यांना इतर राजकीय नेत्यांपेक्षा वेगळं ठरवते. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत स्वीकारले की काही तांत्रिक अडचणी, मनुष्यबळाचे अभाव, ठेकेदारांची उदासीनता यामुळे कामे रखडली आहेत. मात्र त्यांनी यावेळी हा देखील शब्द दिला की, पुढील एक महिन्यात वीज जोडण्या, डीपी बसवणे, ट्रान्सफॉर्मर बदलणे ही कामे प्राधान्याने पूर्ण केली जातील. हे आश्वासन काहीतरी चमत्कारिक नाही, पण आमदारांच्या हस्तक्षेपामुळेच हे घडले, हे मात्र निश्चित. बैठकीपूर्वी जी उदासीनता होती, त्याची जागा आता उत्तरदायित्वाने घेतली आहे. या बैठकीला पत्रकारांना देखील आमंत्रित करण्यात आले होते. पत्रकारांसमोरच अधिकाऱ्यांना जाब विचारल्याने, ही बैठक केवळ बंद दरवाजांमागे न राहता ती जनतेसमोर खुली झाली. यामुळे पारदर्शकता वाढली, लोकांमध्ये जागरूकता निर्माण झाली आणि माध्यमांनीही या विषयाकडे गांभीर्याने पाहिले.या घटनेचा राजकीयदृष्ट्याही दूरगामी परिणाम होणार आहे. शेतकरीवर्ग हा पारंपरिक दृष्ट्या मतदानात महत्त्वाचा घटक आहे. त्यांची मने जिंकण्यासाठी केवळ भाषणं, घोषणांपेक्षा कृती आवश्यक आहे. किशोरआप्पा पाटील यांनी ती कृती दाखवून दिली आहे. जर प्रशासन दिलेल्या आश्वासनांनुसार काम पूर्ण करेल, तर याचा सारा श्रेय आमदारांना जाईल. आणि जर त्यांनी काम केले नाही, तरीही जनता इतकी जागृत झाली आहे की ती स्वतःच विचारणा करेल – किशोरआप्पांनी मागे लागून आमच्यासाठी लढा दिला, पण महावितरणने आम्हाला दगा दिला. आमदार किशोरआप्पा पाटील यांचा हा पवित्रा एक नेता म्हणून त्यांच्या स्वभावातील जाणीवशीलता, आक्रमकता आणि दूरदृष्टी यांचे प्रतीक आहे. त्यांनी केवळ प्रतिनिधित्व केले नाही, तर जनतेच्या आवाजाला स्वतःच्या आवाजात परावर्तित केले. त्यांनी प्रशासनाला उत्तरदायित्वाची जाणीव करून दिली, आणि शेतकऱ्यांना दिलासा दिला. हीच लोकशाहीची खरी ताकद आहे आणि हेच लोकप्रतिनिधी म्हणून आदर्श ठरणारे वर्तन आहे. आज ज्या पद्धतीने राजकारणात स्वार्थ, जातीयता आणि घोषणांचा बाजार मांडला जातो, त्यात किशोरआप्पा पाटील यांची भूमिका एक प्रामाणिक, जाणीवशील आणि कार्यक्षम नेतृत्वाची साक्ष देते. जनतेच्या प्रश्नांवर डोळसपणे प्रतिक्रिया देणारे, त्यासाठी आक्रमक होणारे आणि मार्ग काढणारे नेतृत्व म्हणजेच – जनतेचा खरा प्रतिनिधी.
मेघा दरवर्षी हा सण अत्यंत श्रद्धेनं पाळते. आजही सकाळपासून वटपौर्णिमेचे शुभेच्छांचे मेसेज व्हॉट्सॲपवर यायला लागले…
मी (गालातल्या गालात हसत): “आजही वटपौर्णिमा… म्हणजे, तिचा उपवास ठरलेला!”
तसं आमचं सगळं सुरळीत सुरू होतं — माझा चांगला जॉब, तिचाही, छानशी सोसायटी, प्रशस्त फ्लॅट, आणि एक दुचाकी — ज्यावरून मी रोज तिला स्टेशनवर सोडतो आणि परत आणतो.
सगळ्यात गोड गोष्ट म्हणजे आमची लेक — कस्तुरी. ती आता दीड वर्षांची. त्यामुळेमेघा पुन्हा नोकरीवर रुजू झाली आहे, कस्तुरीला तिची आई सांभाळते — अगदी आपुलकीनं. म्हणून आम्ही दोघंही निर्धास्त.
नेहमीप्रमाणे त्या दिवशीही मेघाला स्टेशनवर सोडलं आणि मी कंपनीकडे वळलो.
मी (थोडासा अस्वस्थ होत): “असं अचानक? बरं, जातो लगेच.”
भेट झाली. काही बोलणी झाली. आणि… थेट घरी परत.
कारण, कंपनीनं मला घरी बसवलं होतं. सगळं क्लिअर केलं, वस्तू परत दिल्या, थरथरत्या हातांनी पीएफचा चेक घेतला आणि शेवटचा ‘रामराम’ ठोकला.
दार उघडलं. घर सुट्टीसारखं वाटलं.
कस्तुरी (हसत धावत आली): “बाबा!”
मी तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं… आणि डोळे भरून आले. त्या हसऱ्या चेहऱ्यावरचं हसू कायम राहावं यासाठी आतून हादरलो होतो.
मेघाला फोन लावला.
मी (धीरगंभीर आवाजात): “जशी आहेस तशीच घरी ये.”
ती विचार न करता धावत आली. दार उघडलं आणि मला पाहून तिच्या जिवात जीव आला.
मी (तडक म्हणालो): माझी नोकरी गेली.
ती शांतपणे आत आली. किचनकडे वळली.
पाणी प्यायली, मलाही पाणी दिलं. म्हणाली — “जाऊ दे ना… दुसरी मिळेल की नोकरी! तोवर माझा पगार आहे ना. तुझ्या कंपनीचं बॅडलक!”
मी स्तब्ध झालो. तिच्या डोळ्यांत माया, ठामपणा आणि अव्यक्त धीर स्पष्ट दिसत होता.
पण मनात विचारांचे काहूर — कस्तुरीचं शिक्षण, घराचे हप्ते, लाईट बिल, मेंटेनन्स… हे सगळं कसं निभावणार? मी एव्हाना नोटा संपलेलं एटीएम झालोय! ह्याची मला जाणीव झाली होती.
पण ती दररोज मला ऑक्सिजन सिलेंडरसारखी उभारी देत होती. तिला सोडून आलो की, मी कस्तुरीजवळ थांबत असे. सासूबाईंनाही घरकामात आराम मिळायचा.
मी घरात राहून नोकरी डॉट कॉमवर रोज बायोडेटा टाकत राहायचो. उत्तर मात्र कुठूनच नसायचं.
मित्रांकडून सहकार्य मिळत होतं, पण तिनं आधीच ठाम सांगितलं होतं —”सल्ला घ्या, पण कोणाकडून पैसे घ्यायचे नाहीत.”
मी सर्वांना कॉल करून जॉबबद्दल सांगितलं. सर्वजण खरंच प्रयत्न करत होते. पण शेजारी मात्र टोमणे मारायचे.
शेजारी (खोटं हसत): “जॉब गेलाय वाटतं…”
मी वैतागायचो. पण ती पुन्हा समोर यायची. “लोकांना तुझं घरी असणं त्यांच्या स्वतःच्या अपयशाचं समाधान वाटतं. पळू नकोस. सामोरा जा!”
मी सांगू लागलो — “हो, जॉब गेलाय. नवीन शोधतोय. मिळेलच!”
चार महिने झाले. कस्तुरी आणि मेघा दोघींनी मला सावरलं. मी प्रयत्न सोडले नाहीत.
एक दिवस माझा मित्र दिन्या घरी आला.
दिन्या: “मुलाचा अकाउंट्स अडलाय. शिकवशील का? तू सध्या घरीच असतोस ना…”
मी (मनात): “हेच वाक्य मी हजार वेळा ऐकलंय!” मी सटकलो, “नाही जमणार!”
संध्याकाळी मेघा आली. तिला सगळं सांगितलं.
मेघा (हसून): “नेहमी लोकांच्या बोलण्याचा चांगला अर्थ घ्या. कॉलेजला टॉपर होतास ना तू? त्याच्या मुलाच्या जागी आपली कस्तुरी असती, तरी असंच उत्तर दिलं असतं का? इगो बाजूला ठेव. त्याचं समाधान तुझ्या दुःखावर उपाय ठरेल.”
तिचं सांगणं मला पटलं.
मी दिन्याच्या मुलाला शिकवलं. तो पास झाला. पुढच्या सेमिस्टरला तोच पंधरा-वीस मुलांना घेऊन आला. घरात तीन बॅचेस सुरू झाल्या. दिवस पुरत नव्हता. मेघाने माझ्या निस्तेज शरीरामध्ये आत्मविश्वासाचा ऑक्सिजन भरला आणि आमची गाडी पुन्हा रुळावर आली. मी ठरवलं — “कितीही खडकाळ रस्ता असो, आता मी गाडी रेटतच राहणार!”
एक दिवस सहज मेल चेक केला. दहा महिन्यांपूर्वी पाठवलेल्या सीव्हीला रिप्लाय आलेला! मी लॅपटॉप बंद केला. (हसत स्वतःशीच) “नाही… आता नको. धरली वाट सोडायची नाही!”
आज वटपौर्णिमा. तिथीनुसार एक वर्ष पूर्ण. माझ्या बॅड पॅचचा वाढदिवस. व्हॉट्सॲपवर मेसेज यायला लागले. वटपौर्णिमा, मेघा आणि उपवास हे कॉम्बिनेशन आठवलं. ठरवलं — आज तिच्यासाठी मी उपवास करणार. ती प्रेमळ, समजूतदार, न बोलता आयुष्याला अर्थ देणारी…
ती कामावर निघायच्या गडबडीत होती. तितक्यात तिचा फोन वाजला. तयार होताहोताच ती फोनवर बोलत होती आणि तिच्या चेहर्यावरचे हावभाव बदलू लागले. ती फोन कट करून माझ्याजवळ आली. (हसत म्हणाली) “मला प्रमोशन मिळालंय! आता मी स्पेशालिस्ट नर्स ऑफिसर झाले!”
मी (गालातल्या गालात हसून): “अभिनंदन मेघु…! उपवासाची गोड सुरुवात झाली!”
“हॅपी वटपौर्णिमा…*
हा खरा नवऱ्याला दिलेला ऑक्सिजन… तोडलेल्या फांदीला दोरा गुंडाळण्यात काय अर्थ? पुरुष मानसिकदृष्ट्या नाजूक असतात — त्यांना मानसिक उभारी बायका देऊ शकतात. म्हणूनच, बायकांनी वडाला फेऱ्या मारायच्या, की सतत समजूतदारपणे संसार सावरायचा हे ठरवावं. “बायको वडाला फेऱ्या मारते… पण आयुष्याला जो खरा ऑक्सिजन देते, तो न बोलता तिच्या वागण्यातून!”
पाचोऱ्याच्या खाद्यसंस्कृतीत अनेक नावाजलेली ठिकाणं असली, तरी खवय्यांच्या मनात जी चव घर करत जाते, ती चव वर्षानुवर्षे एकाच दर्जाने टिकून राहते तेव्हा ती जागा खास बनते. अशीच खास ओळख बनवलेली हॉटेल म्हणजे नीलम हॉटेल, जी पाचोरा शहरातील राजे छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या जवळ असून, गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या खास चवदार नाश्त्याच्या मेजवानीसाठी प्रसिद्ध आहे. विशेषतः येथे मिळणारी मिसळ, ही पाचोऱ्यातील खवय्यांच्या जिभेवर राज्य करणारी खासियत ठरली आहे. नीलम हॉटेलचे व्यवस्थापक विकीदादा मराठे हे केवळ व्यवसायिक दृष्टिकोनातून नाही तर एक सांस्कृतिक वारसा म्हणून देखील या हॉटेलकडे पाहतात. त्यांच्या वडीलांनी आणि आजोबांनी जे परिश्रम घेऊन चव तयार केली, ती वडीलोपार्जित चव आजही टिकवून ठेवण्याचा कटाक्ष विकीदादा मराठे घेत आहेत. ग्राहकांच्या आवडी-निवडी जपत, शुद्धतेवर भर देत आणि दररोज ताज्या मसाल्यांचा वापर करत ते नीलम हॉटेलची एक विशिष्ट ओळख जपून ठेवत आहेत. विकीदादांचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे, ते स्वतः स्वयंपाकघरात लक्ष घालून कामाचे निरीक्षण करतात, आणि मिसळपासून इतर सर्व नाश्त्याच्या पदार्थांपर्यंत प्रत्येक गोष्ट एकाच चवीनं आणि दर्जाने ग्राहकांपर्यंत पोहोचेल याची खात्री घेतात. नीलम हॉटेलमध्ये मिळणाऱ्या मिसळीची खासियत म्हणजे तिचा मसाला. हा मसाला कुठल्याही मोठ्या कारखान्यात तयार झालेला नसतो, तर घरगुती पद्धतीने खास मसाल्यांपासून तयार केला जातो. मिसळीची कडसर व मधुर रसयुक्त उसळ, त्यावर चटकदार लाल रसा, त्याला तुरट झणझणीत फोडणी, बरोबर पातळ आणि थोडी गोडसर रसा, आणि त्यावर कुरकुरीत शेव, चिरलेला कांदा, लिंबू, अशा सजावटीसह दिली जाणारी ही मिसळ केवळ पोट भरत नाही, तर मनही तृप्त करते. आज गुरुवारी रोजी सकाळच्या वेळेस, नीलम हॉटेलमध्ये एक खास दृश्य पाहायला मिळालं. पाचोरा शहरातील प्रतिष्ठित डॉक्टर, समाजसेवक, शिक्षक व विविध क्षेत्रातील मान्यवर एकत्रितपणे मिसळचा आस्वाद घेत होते. त्यावेळी उपस्थित होते: डॉक्टर भरत दादा पाटील – पाचोऱ्यातील ख्यातीप्राप्त वैद्यकीय, राजकीय क्षेत्रात जे सामाजिक सेवेतही सक्रिय आहेत,सामाजिक कार्यकर्ते माजी नगरसेवक दत्ता आबा बोरसे – अनेक सामाजिक उपक्रमात योगदान देणारे, जनतेच्या हितासाठी कायम पुढे. डॉक्टर गोरखनाथ महाजन – अनुभवी व नामवंत वैद्यकीय सेवक. डॉक्टर अमोल जाधव – तरुण आणि दंतरोग तज्ञ तंत्रज्ञान स्नेही डॉक्टर, ज्यांचा नवविचार सर्वत्र स्वागतार्ह आहे.डी पी आबा सर – शिक्षण क्षेत्रात मोलाची कामगिरी करणारे आदरणीय शिक्षक.डॉक्टर नंदकिशोर पिंगळे – आरोग्यविषयक जनजागृती आणि उपचारात नेहमीच अग्रस्थानी असलेले वैद्यकीय व्यावसायिक. या सर्व मान्यवरांनी एका ठिकाणी एकत्र येऊन मिसळचा आस्वाद घेतला आणि नीलम हॉटेलच्या चवदार परंपरेला सलाम केला.नीलम हॉटेल केवळ मिसळसाठी नाही, तर पोहे, वडा-पाव,आणि ताजे गरम गरम कचोरी, समोसे, फाफडा सकट गोड पदार्थ यांसारख्या पदार्थांसाठी ते ओळखले जातात. सकाळी नाश्ता असो की संध्याकाळची लज्जतदार भेट – नीलम हॉटेल खवय्यांसाठी स्वर्गापेक्षा कमी नाही. येथे येणारा प्रत्येक ग्राहक ही फक्त भूक भागवायला येत नाही, तर एक सांस्कृतिक आणि भावनिक समाधान घेऊन परत जातो. अनेक वर्षांपासून जे खवय्ये इथे येतात, ते आपल्या मुलाबाळांना, नातवंडांना सुद्धा नीलम हॉटेलच्या चविषयी सांगतात – हीच ती खरी चवदार वारशाची शिदोरी हॉटेलमध्ये उपस्थित असलेल्या डॉक्टर भरतदादा पाटील यांनी सांगितले की, नीलम हॉटेलची मिसळ ही काही खाद्यपदार्थ नाही, ती एक भावना आहे. कितीही मोठ्या शहरात गेलो तरी इथली चव विसरता येत नाही.” दत्ता आबा बोरसे यांनी आपल्या खास शैलीत म्हटले, गावातल्या मातीची चव जर जिभेवर अनुभवायची असेल तर ती नीलम हॉटेलची मिसळ खाल्ल्यावर कळते.” विकीदादा मराठे यांचं व्यक्तिमत्त्व हे तरुणांसाठी एक प्रेरणा ठरत आहे. त्यांनी व्यवसायाचा केवळ लाभाच्या दृष्टीकोनातून विचार न करता, गुणवत्तेचा वारसा आणि ग्राहकसंतोष ही मुख्य मूल्यं मानली आहेत. त्यांनी जुन्या पद्धती, जुन्या रेसिपी जशा जपल्या तशाच नव्या पिढीला रुचतील अशा काही आधुनिक नाश्त्यांचे पर्यायही हळूहळू जोडले आहेत. आज पाचोऱ्यात कोणत्याही बाहेरगावच्या पाहुण्यांना कुठे न्यावं, असा प्रश्न पडला की स्थानिक लोकांचा पहिला उल्लेख नीलम हॉटेलचा होतो. ती प्रतिष्ठा मिळवणं आणि टिकवणं हे फार मोठं कार्य आहे. नीलम हॉटेलने ते सिद्ध केलं आहे.खाण्याचे पदार्थ हे फक्त पोटापुरते नसतात, ते आठवणींचा एक भाग होतात. नीलम हॉटेलची मिसळ ही अशीच एक आठवण बनून पाचोऱ्याच्या प्रत्येक खवय्याच्या मनात जपली जाते. कोणतीही चकचकीत जाहिरात नसतानाही केवळ चव आणि सेवा यामुळे लोकांच्या ओठांवर हे हॉटेल आहे – हेच खऱ्या गुणवत्तेचं प्रमाण या हॉटेलचा इतिहास, विकीदादांची निष्ठा, आणि ग्राहकांच्या प्रेमाने नीलम हॉटेल हा केवळ व्यावसायिक ब्रँड नसून एक सामाजिक भावबंध बनला आहे. नवीन तरुण पिढीने अशाच प्रकारे गुणवत्तेची, चवदारतेची आणि ग्राहकसेवेची शिकवण घेतली तर कोणत्याही व्यवसायाला मोठं करता येईल – हे नीलम हॉटेलने दाखवून दिलं आहे.
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनाच्या गौरवप्रसंगी, ६ जून २०२५ रोजी, मराठा महासंघाच्या वतीने किल्ले रायगडाच्या पायथ्याशी – पाचाड येथील हॉटेल शिवशक्ती परिसरात – पर्यावरण संवर्धनाचा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. ‘एक झाड शिवरायांसाठी’ या प्रेरणादायी घोषवाक्याखाली रोपे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९:०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. जिल्हा संपर्कप्रमुख रामचंद्र भिलारे यांच्या हस्ते हे पूजन संपन्न झाले.यानंतर गडावरून खाली येणाऱ्या विविध जिल्ह्यांतील शिवभक्तांचे रोपे देऊन औक्षण व सन्मान करण्यात आला. “आपल्या गावी जाताना रायगडाची आठवण म्हणून एक झाड लावा, शिवरायांना मानवंदना द्या” असा संदेश देत पर्यावरणप्रेम आणि शिवप्रेम यांचा सुंदर संगम साधला गेला.कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष रुपेश कदम, संपर्कप्रमुख रामचंद्र भिलारे, जिल्हा सरचिटणीस अर्जुन सावंत, महाड तालुका अध्यक्ष काशीराम लामजे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतातून रायगडाच्या पवित्र भूमीवर घेतलेल्या या उपक्रमाचे महत्त्व उलगडले.सदर कार्यक्रमानिमित्त जिल्हा व तालुकास्तरावरील नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही जाहीर करण्यात आल्या, त्या पुढीलप्रमाणे: जिल्हा सरचिटणीस : अर्जुन सावंत, जिल्हा उपाध्यक्ष : वासुदेव कदम, गणेश देशमुख, जिल्हा चिटणीस : आनंद निंबरे, जिल्हा सह संपर्कप्रमुख : रविंद्र कुडपाणे, महाड शहर प्रमुख : राजेश मालुसरे, पेण तालुका सरचिटणीस : संजय कदम, पनवेल तालुका अध्यक्ष : उदय भोसले, तालुका सरचिटणीस : सुहास सावंत, सुधागड पाली तालुका अध्यक्ष : निलेश देशमुख, पाली आपटे अध्यक्ष : शरद चौरगे, रोहा शहर संपर्क प्रमुख : कविताताई शिर्केकार्यक्रमाला उत्तर मध्य जिल्हा अध्यक्ष अशोक देसाई, उपाध्यक्ष सतीश जाधव, दक्षिण मुंबई जिल्हा अध्यक्ष महेंद्र तावडे, दक्षिण मध्य जिल्हाध्यक्ष सचिन शिंदे, पेण तालुका अध्यक्ष नितीन चव्हाण, रोहा शहर महिला अध्यक्षा दिपाताई भिलारे, तसेच रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण बामणे यांसह विविध मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर ‘पर्यावरण रक्षण हीच खरी शिवसेवा’ या भावनेने प्रेरित होत, मराठा महासंघाने घेतलेला हा उपक्रम पर्यावरण जतन आणि जनजागृतीचा प्रभावी संदेश देणारा ठरला. रायगडाच्या साक्षीने पार पडलेला ‘शिवराज्याभिषेक दिन’ यंदा विशेषतः सामाजिक आणि पर्यावरणीय जाणिवा रुजविणारा ठरला, हे निश्चित!
जळगाव – जिल्ह्याच्या मातीला संतांच्या परंपरेचा वारसा लाभलेला आहे. मुक्ताई नगरीतील संत मुक्ताबाई पालखी प्रस्थान सोहळा हा त्या परंपरेचा जिवंत आविष्कार आहे. यंदाच्या सोहळ्यासाठी शिवसेना प्रमुख नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री एकनाथजी शिंदे साहेब स्वतः मुक्ताईनगर येथे आले होते. आपल्या व्यस्त राजकीय वेळापत्रकातून वेळ काढून या अध्यात्मिक व सांस्कृतिक उत्सवात सहभागी होणे हेच त्यांच्या माणूस म्हणून असलेल्या ओळखीचे प्रतीक आहे. या दौऱ्यानंतर साहेब मुंबईकडे परतण्यासाठी मुक्ताईनगरहून जळगाव विमानतळावर पोहोचले. परंतु काही कारणास्तव त्यांच्या चार्टर्ड विमानाच्या उड्डाणास थोडा विलंब झाला. हाच क्षण नियतीने एका गरजू भगिनीसाठी आशेचा किरण ठरवून ठेवला होता. कारण या विलंबामुळेच एका मायभगिनीच्या प्राणवाचक उपचारांचा मार्ग मोकळा झाला. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील रहिवासी शीतलताई बोरडे या गेल्या अनेक महिन्यांपासून किडनीच्या गंभीर आजाराने त्रस्त होत्या. त्यांच्यावर मुंबईतील खासगी रुग्णालयात किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया नियोजित होती. याच शस्त्रक्रियेसाठी त्या आपल्या पतीसह मुंबईला जाण्यासाठी जळगाव विमानतळावर दाखल झाल्या होत्या. मात्र काही वेळेच्या फरकाने त्यांचे कमर्शियल विमान निघून गेले. डोळ्यात अश्रू, मनात काळजी आणि जीवावर बेतलेली वेळ — अशा अवस्थेत त्या मायभगिनी पूर्णपणे हतबल झाल्या होत्या. ही माहिती जळगावचे लोकप्रिय जनप्रतिनिधी, मदतीस तत्पर असलेले राज्याचे मंत्री नामदार गिरीशभाऊ महाजन यांना समजताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता ही बाब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या कानावर घातली. ‘कोणत्याही परिस्थितीत या भगिनीला वेळेत मुंबईला पोहोचवणे आवश्यक आहे’ हे गिरीशभाऊंनी ओळखले. त्यांचे जनसेवेप्रती असलेले बांधिलकी आणि तत्परता पुन्हा एकदा दिसून आली. ना.गिरीशभाऊ महाजन यांच्या विनंतीवर एकनाथ शिंदे साहेबांनी क्षणाचाही विचार न करता तात्काळ संमती दिली. “आपलं विमान उशिरा जातंयच, आपण आपल्या भगिनीला सोबत घेऊनच जाऊ,” असे म्हणत त्यांनी आपल्या चार्टर्ड विमानात शीतलताई आणि त्यांच्या पतीला सहप्रवासी म्हणून घेतले. केवळ विमान प्रवासाची परवानगी देणे एवढ्यावरच साहेब थांबले नाहीत. त्यांनी स्वतः प्रवासादरम्यान शीतलताईंची आस्थेने चौकशी केली. “किती त्रास होतोय? डॉक्टरांना दाखवलं का? ऑपरेशन कधी आहे?” अशा प्रश्नांतून त्यांची आत्मीयता आणि आपुलकी प्रत्ययास आली. मुंबई विमानतळावर पोहोचताच त्यांनी आधीच रुग्णवाहिकेची व्यवस्था करून ठेवली होती. या विशेष रुग्णवाहिकेतून शीतलताईंना थेट रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामुळे नियोजित वेळेत त्यांची शस्त्रक्रिया पार पडू शकली. आज त्या सुखरूप आहेत आणि याचे पूर्ण श्रेय जातं दोन महान व्यक्तिमत्त्वांना — एकनाथजी शिंदे आणि गिरीशभाऊ महाजन. शीतलताईंनी अश्रूपूरित डोळ्यांनी एकनाथजी शिंदे साहेबांचे हात पकडत कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. त्यांच्या चेहऱ्यावरचा दिलासा आणि मनातली कृतज्ञता हीच त्या दिवशी महाराष्ट्राच्या मनाला भिडणारी गोष्ट ठरली. त्यांनी म्हटलं, “साहेब नसते धावून आले, तर कदाचित मी आज हयातही नसते. साहेबांनी माझ्यासाठी एक भाऊ बनून देवदूतासारखी मदत केली.” गिरीशभाऊ महाजन यांचं देखील या घटनेतील महत्त्व अपार आहे. राजकीय दबाव, प्रशासकीय गडबड याच्या पलीकडे जाऊन, गिरीशभाऊंनी केवळ मानवतेच्या नात्याने हे प्रकरण शिंदे साहेबांपर्यंत पोहचवले. यातून त्यांची संवेदनशीलता आणि जनसेवेची तळमळ पुन्हा सिद्ध झाली. या घटनेने अनेक सामाजिक आणि राजकीय प्रश्नांवर न बोलता प्रकाश टाकला आहे. अनेकदा सामान्य माणूस अशा संकटसमयी एकटं पडतो. मात्र या वेळी दोन जबाबदार नेते — एक राज्याचा उपमुख्यमंत्री आणि दुसरे कॅबिनेट मंत्री — हे दोघंही एका सामान्य भगिनीच्या मदतीसाठी एका क्षणात उभे ठाकले. यापेक्षा मोठं नेतृत्वाचं उदाहरण काय असू शकतं? ही घटना संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक शिकवण आहे. हे दाखवून देणारी घटना आहे की, राजकारणाच्या पलीकडेही माणुसकीचं एक जग असतं, जेव्हा नेता आपल्या जनतेच्या दुःखात सहभागी होतो. एकनाथजी शिंदे साहेब नेहमी म्हणतात की, “मी मुख्यमंत्री नाही, मी फक्त सामान्य माणसांचा सेवक आहे.” आणि त्यांनी ही भूमिका कृतीतून सिद्ध केली आहे. शिंदे साहेबांच्या व्यक्तिमत्त्वातील ही विशेषता — मातीशी जोडलेपणं, नम्रता, सर्वसामान्यांप्रती आपुलकी आणि तत्परता — हीच त्यांना महाराष्ट्राच्या जनतेच्या हृदयात विशेष स्थान देऊन जाते. तर दुसरीकडे गिरीशभाऊ महाजन यांचे संकटसमयी केलेले त्वरित नियोजन, संवेदनशीलता आणि सहवेदना यामुळेच त्यांच्याविषयीही जनतेत अपार आदर आहे. ही घटना कुठल्याही प्रचारासाठी नव्हती. यात कुठलाही फोटोसेशन नव्हता. एकही प्रसारमाध्यम यावेळी सोबत नव्हतं. पण सत्य, सद्भावना आणि माणुसकीने घडलेल्या घटनांना प्रसिद्धीची गरज नसते — त्या लोकांच्या मनात घर करतात. याच घटनेवर आधारित समाजमाध्यमावर लोकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया दिल्या. अनेकांनी म्हटलं, “हेच खरे नेते. सामान्य माणसाच्या दुःखात जो सहभागी होतो, तोच खरा नेता असतो.” काहींनी तर शिंदे साहेबांना ‘जीव वाचवणारा योध्दा’ तर गिरीशभाऊंना ‘संकटात देवदूताचा संपर्क करणारा दूत’ असे गौरवले. अशा घटनांमुळेच महाराष्ट्राची एक वेगळी ओळख निर्माण होते. इथे नेते केवळ पदासाठी नाहीत, तर सेवेसाठीही असतात. एकनाथजी शिंदे आणि गिरीशभाऊ महाजन हे दोघेही त्याचे जिवंत उदाहरण आहेत. शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं नेतृत्व म्हणजे भाषणं नव्हे, कृतीतून उमटलेली माणुसकीची झुळूक असते. आणि त्या झुळुकीचा अनुभव जळगाव जिल्ह्याने या दिवशी घेतला. ना.एकनाथ शिंदे साहेब आणि गिरीशभाऊ महाजन यांचं माणुसकीचं हे असंच कार्य सातत्याने अखिल महाराष्ट्राच्या जनतेला प्रेरणा देत राहो.