लोकन्यायालय “न्यायाचा लोकाभिमुख चेहरा”- सौ शितल महाजन

0

पाचोरा येथे पार पडलेले राष्ट्रीय लोकन्यायालय हे केवळ एक कार्यक्रम नव्हे, तर एक सामाजिक शुश्रूषा आहे. आज न्यायप्रक्रियेबाबत सामान्य नागरिकामध्ये असलेला अविश्वास, खर्च व वेळेच्या बाबतीत असलेली भीती – अशा साऱ्यांना लोकन्यायालय हे उत्तर आहे.
१०५८ प्रकरणांचा निपटारा आणि ४ कोटी १८ लाखांहून अधिक रकमेची वसुली ही केवळ आकडेवारी नसून, समाजातील शांतता, समाधान आणि सुसंवादाची दिशा आहे. जुनी प्रकरणे मिटणे, कौटुंबिक तडजोडी, आर्थिक वादांचा निपटारा यामुळे लोकांचा मानसिक ताण हलका होतो आणि समाजात सौहार्द नांदतो.
या यशामध्ये न्यायालयीन यंत्रणेबरोबरच विविध शासकीय विभागांचा समन्वय व सहकार्य हीच खरी यशाची गुरुकिल्ली आहे. न्याय व्यवस्था लोकांच्या दारात आणणारे हे लोकन्यायालय म्हणजे ‘न्याय मंदिराचे खुले दरवाजे’ आहेत – जेथे गरिब, दुर्बळ, साध्या माणसाला मोठा वकील लागतोच असे नाही, फक्त तडजोडीची मानसिकता लागते.
या उपक्रमातून प्रेरणा घेत इतर तालुक्यांनीही अशा यशस्वी लोकन्यायालयाचे अनुकरण करावे, हीच आजची गरज आणि दिशा आहे.
लोकशाहीच्या चार स्तंभांपैकी न्यायपालिका हा एक महत्त्वाचा आणि गरिमास्पद स्तंभ. मात्र वेळखाऊ आणि खर्चिक न्यायप्रक्रिया ही न्याय मिळवण्यातील सर्वात मोठी अडचण ठरली आहे. अशा परिस्थितीत ‘राष्ट्रीय लोकन्यायालय’ ही संकल्पना म्हणजे एक युगांतरकारी बदल आहे.
पाचोरा येथे नुकतेच पार पडलेले लोकन्यायालय हे याचे ठळक उदाहरण आहे. एकाच दिवशी १०५८ प्रकरणांचा निपटारा आणि ४ कोटी १८ लाख रुपयांहून अधिक रकमेची वसुली हा आकडा केवळ आश्चर्यकारक नाही, तर समाजाच्या न्यायभानावरचा विश्वास पुनःस्थापित करणारा आहे.
या उपक्रमाची पुढील महत्वपुर्ण वैशिष्ट्ये आहेत
१) त्वरित निर्णय प्रक्रिया
२)तडजोडीचा मार्ग
३)कमी खर्चात न्याय
४)वाद टाळण्याची सकारात्मक दिशा
जुनी प्रकरणे, कौटुंबिक वाद, बँक प्रकरणे, वीजबिल वसुली, वाहतूक दंड आदी विविध क्षेत्रातील वाद एका दिवसात मिटणे ही समाजासाठी समाधानाची बाब आहे.
सर्वसामान्य व्यक्तीला मोठ्या खर्चाशिवाय न्याय मिळवून देण्याचा हा प्रभावी मार्ग आहे. विशेषतः ग्रामीण भागातील जनतेसाठी, ज्यांच्यासाठी न्यायालय म्हणजे एका वेगळ्याच दुनियेतले प्रकरण वाटते – त्यांना लोकन्यायालय ही एक सुलभ आणि विश्वासार्ह व्यवस्था वाटू लागली आहे.
सर्व यंत्रणांचा समन्वय, वकिलांचा सक्रिय सहभाग, न्यायाधीशांचे मार्गदर्शन आणि नागरिकांची सहभागिता – हीच लोकन्यायालयाची खरी ताकद आहे.
या लोकन्यायालयांमुळे केवळ वाद मिटत नाहीत, तर एक शांतता, एक सौहार्द निर्माण होते. कुटुंबे निस्तरली जातात, ताण-तणाव कमी होतो आणि समाजाच्या गतीला वेग मिळतो.
न्यायालय हे केवळ शिक्षा देण्यासाठी नसते, तर समाजात सुसंवाद निर्माण करण्याचे केंद्र असते – याचा प्रत्यय पाचोरा लोकन्यायालयातून आला आहे.
समाजानेही या प्रक्रियेचा भाग व्हावे, वाद मिटवण्यासाठी लोकन्यायालयासारख्या संधींचा स्वीकार करावा, हाच या विचारलेखाचा सार आहे.                    

लेखक  -सौ. शितल सं महाजन M.A.M.Ed
(उप- शिक्षका श्री गो से हायस्कूल , पाचोरा )
MO.7588645908

Loading

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here