Home Blog Page 16

एम.एम. पाचोरा महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी चेतना हिरे यांची राष्ट्रीय युवा विनिमय कार्यक्रमासाठी निवड; केरळमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व

0

Loading

पाचोरा – केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालयाच्या ‘मेरा भारत युवा केंद्र’ या राष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठामार्फत राबविण्यात येणाऱ्या आंतरराज्य युवा विनिमय कार्यक्रम २०२६ साठी जळगाव जिल्ह्यातील सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एम.एम. पाचोरा महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी कु. चेतना रणदीप हिरे यांची निवड झाली आहे. ही निवड केवळ वैयक्तिक यशापुरती मर्यादित न राहता पाचोरा शहर, जळगाव जिल्हा आणि महाराष्ट्राच्या युवक क्षमतेचे राष्ट्रीय पातळीवरील प्रतिनिधित्व करणारी ठरली आहे. विशेष म्हणजे, कु. चेतना हिरे यांच्यासोबत जळगाव जिल्ह्यातील आणखी आठ युवकांचीही या प्रतिष्ठित कार्यक्रमासाठी निवड करण्यात आली असून एकूण नऊ युवकांचा हा गट महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. हा युवक गट २२ फेब्रुवारी ते १ मार्च २०२६ या कालावधीत केरळ राज्याच्या शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक अभ्यास दौऱ्यावर जाणार आहे. या संपूर्ण उपक्रमाचे नेतृत्व कमलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार असून नियोजनबद्ध कार्यक्रम, चर्चासत्रे, सांस्कृतिक सादरीकरणे आणि परस्पर संवादाच्या माध्यमातून युवकांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना अधिक दृढ करण्यावर भर देण्यात येणार आहे. ‘मेरा भारत युवा केंद्र’ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या आंतरराज्य युवा विनिमय कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विविध राज्यांतील युवकांना एकमेकांच्या संस्कृती, परंपरा, भाषा, सामाजिक रचना आणि विकासात्मक उपक्रमांची प्रत्यक्ष ओळख करून देणे हा आहे. देशातील विविधतेतून एकात्मतेचा अनुभव घेणे, सामाजिक सलोखा वाढविणे, नेतृत्वगुणांचा विकास घडविणे, स्वयंशिस्त, संघभावना आणि राष्ट्रप्रेम वृद्धिंगत करणे हे या कार्यक्रमाचे केंद्रबिंदू आहेत. या दौऱ्यात युवकांना केरळ राज्यातील शैक्षणिक संस्था, सामाजिक उपक्रम, स्वयंसेवी संघटना, सांस्कृतिक स्थळे आणि विकास मॉडेल्सची माहिती दिली जाणार आहे. कु. चेतना रणदीप हिरे या एम.एम. पाचोरा महाविद्यालयात शिक्षण घेत असताना सामाजिक कार्यात सातत्याने सक्रिय राहिल्या आहेत. विद्यार्थिनी म्हणून शिक्षणाबरोबरच समाजोपयोगी उपक्रमांमध्ये सहभाग, युवक प्रबोधन, स्वयंसेवी कार्य तसेच शैक्षणिक उपक्रमांमध्ये त्यांनी घेतलेली पुढाकाराची भूमिका ही त्यांच्या निवडीमागील महत्त्वाची बाब ठरली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, जिल्हाधिकारी रोहन घुगे तसेच जिल्हा युवा अधिकारी अभिषेक चावरे यांनी त्यांचे अभिनंदन करून कौतुक केले आहे. त्यांनी युवकांनी शिक्षणासोबतच सामाजिक बांधिलकी जपावी, राष्ट्रीय स्तरावरील संधींचा लाभ घ्यावा आणि आपल्या जिल्हा व राज्याचे नाव उज्ज्वल करावे, असा संदेश दिला आहे. या निवडीमुळे जळगाव जिल्ह्याचा लौकिक राष्ट्रीय पातळीवर अधिक उंचावला असून जिल्ह्यातील युवकांनी सामाजिक, शैक्षणिक व राष्ट्रउभारणीच्या कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असा सकारात्मक संदेश या यशातून मिळत आहे. कु. चेतना रणदीप हिरे यांची ही निवड पाचोरा शहरातील शैक्षणिक क्षेत्रासाठी अभिमानास्पद ठरली असून त्यांच्या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची प्रेरणा मिळणार आहे. केरळमध्ये होणाऱ्या या प्रतिनिधित्वातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक मूल्यांचे प्रभावी सादरीकरण होईल तसेच देशातील युवकांमध्ये परस्पर समज, सहकार्य आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना अधिक दृढ होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

भ्रम, भय आणि वास्तव यामधील अडकलेली शिक्षणव्यवस्था : पालक, शिक्षक आणि शासन यांची सामूहिक जबाबदारी

0

Loading

कॉपीमुक्त शिक्षण प्रणाली, शासकीय पातळीवरील कडक नियम, कठोर कारवाईचे धोरण आणि अचानक लागू होणारे शैक्षणिक निर्णय यामुळे सध्या विद्यार्थी व पालक वर्गात मोठ्या प्रमाणावर असंतोष, संभ्रम आणि भयभीत वातावरण निर्माण झालेले दिसून येते. शिक्षण म्हणजे केवळ परीक्षा पास होणे, गुणांची टक्केवारी मिळवणे किंवा प्रमाणपत्र मिळवणे एवढाच मर्यादित अर्थ नसून शिक्षण हा व्यक्तिमत्त्व घडविण्याचा, विचारक्षम नागरिक निर्माण करण्याचा आणि देशाच्या भविष्यास आकार देण्याचा मूलभूत आधारस्तंभ आहे, हे आपण अनेकदा विसरतो. त्यामुळे शासनाच्या धोरणांवर टीका किंवा समर्थन करण्याआधी, अथवा कॉपीमुक्त शिक्षणाच्या नावाने जे काही घडत आहे त्याचा उहापोह करण्याआधी, सध्याच्या शिक्षण व्यवस्थेचे वास्तव अत्यंत प्रांजळपणे आणि डोळसपणे समजून घेणे गरजेचे आहे. आजची शिक्षण व्यवस्था पाहिली तर ती केवळ अभ्यासक्रम, परीक्षा आणि निकालांपुरती मर्यादित न राहता सामाजिक, आर्थिक आणि मानसिक स्तरावर विभागली गेलेली आहे. विशेषतः विद्यार्थी आणि पालक वर्गात तीन ठळक गट निर्माण झालेले स्पष्टपणे दिसून येतात आणि या तिन्ही गटांचा शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, अपेक्षा आणि वास्तव एकमेकांपेक्षा पूर्णतः वेगळे आहे. पहिला गट म्हणजे आर्थिकदृष्ट्या अत्यंत सक्षम पालक वर्ग. या वर्गातील पालकांनी आपल्या मुलांचे भविष्य सुरक्षित करण्याच्या उद्देशाने त्यांना लहान वयातच शैक्षणिक हब, मेट्रो सिटी, नामांकित शहरांमधील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये पाठवणे हेच योग्य समजले आहे. अनेक ठिकाणी तर केवळ शिक्षणासाठी फ्लॅट खरेदी करणे, नातेवाईक किंवा कुटुंबातील सदस्यांना त्या शहरात स्थायिक करणे, हा एक प्रकारचा ट्रेंडच बनला आहे. या पालकांसाठी शिक्षण म्हणजे गुंतवणूक आहे आणि त्या गुंतवणुकीवर भविष्यात चांगला परतावा मिळावा, ही अपेक्षा असते. त्यामुळे शाळेची फी, कोचिंग क्लासेस, हॉस्टेल, एक्स्ट्रा करिक्युलर अ‍ॅक्टिव्हिटीज, इंटरनॅशनल एक्सपोजर या सर्व गोष्टी त्यांच्या दृष्टीने स्वाभाविक आहेत, मात्र या गटातील मुलांनाही प्रचंड स्पर्धा, मानसिक ताण, सतत तुलना आणि कामगिरीचा दबाव यांना सामोरे जावे लागत असल्याचे वास्तवही नाकारता येत नाही. दुसरा गट म्हणजे सर्वसामान्य, मध्यमवर्गीय परंतु आर्थिकदृष्ट्या बऱ्यापैकी सक्षम असा पालक वर्ग. हा वर्ग संख्येने सर्वाधिक आहे आणि सध्याच्या शिक्षण व्यवस्थेतील सर्वात मोठा संभ्रम याच वर्गात दिसून येतो. या पालकांच्या मुलांचे शिक्षण प्रामुख्याने इंग्रजी माध्यम, सूट-बूट, शालेय बस, आकर्षक इमारती आणि CBSE बोर्ड याभोवती फिरताना दिसते. CBSE अभ्यासक्रम आज सेमी इंग्रजी माध्यमातही सुरू झाला आहे, परंतु खऱ्या अर्थाने NCERT आधारित अभ्यासक्रम कितपत दर्जेदार पद्धतीने शिकवला जातो, याचा विचार फारच थोडे पालक करतात. अनेक शाळा आणि महाविद्यालये केवळ नावापुरती CBSE असल्याचे चित्र दिसून येते. त्या ठिकाणी शिकवणारा शिक्षक वर्ग खरोखरच CBSE प्रणालीतून शिकलेला आहे का, त्यांना NCERT सिलेबस, लर्निंग आउटकम्स आणि कॉम्पिटन्सी बेस्ड एज्युकेशन याची समज आहे का, याचा गांभीर्याने विचार प्रवेश घेताना होताना दिसत नाही. या गटातील अनेक निर्णय भावनिक आणि सामाजिक दबावातून घेतले जातात. घरातील महिलांचा हट्ट, शेजाऱ्यांच्या मुलांचे उदाहरण, नात्यातील किंवा ओळखीतील मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जात असल्यामुळे आपल्या मुलांनीही तिथेच जायला हवे, हा एकमेव निकष अनेकदा ठरतो. हा दृष्टिकोन केवळ सुशिक्षित गृहिणींपुरता मर्यादित नसून घरकाम करणाऱ्या, बचत गट चालवणाऱ्या, श्रमिक महिलांमध्येही तितक्याच प्रमाणात दिसून येतो. आपली मुलं गाडीत गेली पाहिजेत, इंग्रजी माध्यमात शिकली पाहिजेत, गुड मॉर्निंग, सॉरी, थँक यू हे शब्द लहानपणीच बोलायला हवेत, हा एक प्रकारचा सामाजिक प्रतिष्ठेचा मापदंड बनला आहे. मात्र वास्तव असे आहे की इंग्रजी माध्यमातील बहुतांश शाळांमधील शिक्षक वर्ग कमी पगारावर काम करणारा आहे. अनेक शिक्षक सकाळी शाळेत आणि संध्याकाळी स्वतःच्या किंवा संस्थात्मक क्लासेसमध्ये शिकवण्या घेत असतात. परिणामी शाळेतील अध्यापन हे औपचारिक आणि मर्यादित राहते, तर परीक्षेत येणाऱ्या प्रश्नांची तयारी, उजळणी आणि परताळणी ही घरगुती शिकवणीत होते. याचा परिणाम असा होतो की निकाल लागल्यानंतर 95, 96, 97, 99 टक्के गुण पाहून पालक वर्ग अत्यंत आनंदी होतो आणि आपला निर्णय योग्य असल्याचा भ्रम निर्माण होतो, पण हा भ्रमाचा भोपळा तेव्हा फुटतो, जेव्हा हीच मुलं ऑल इंडिया पातळीवर NCERT आधारित स्पर्धा परीक्षा, प्रवेश चाचण्या किंवा उच्च शिक्षणाच्या स्पर्धेत उतरतात. तेव्हा त्यांच्या खऱ्या शैक्षणिक क्षमतेचे, संकल्पनात्मक समजुतीचे आणि विश्लेषणात्मक कौशल्यांचे मूल्यांकन होते आणि अनेकदा अपेक्षाभंग होतो. दुर्दैवाने तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. तिसरा गट म्हणजे मराठी माध्यम शाळांमधील विद्यार्थी. हा गट आज सर्वाधिक संकटात आहे. विद्यार्थीसंख्या कमी, प्रवेशासाठी मारामार, शाळा बंद पडण्याची भीती आणि शिक्षकांची अनिश्चितता हे सारे वास्तव मराठी माध्यमाच्या शाळांभोवती फिरताना दिसते. अनेक ठिकाणी जेमतेम तुकडी वाचवण्यासाठी विविध मार्ग अवलंबले जातात. पालकांना वेगवेगळ्या सवलती, आश्वासने, कधी अप्रत्यक्ष दबाव तर कधी भावनिक साद घालून प्रवेश संख्या पूर्ण केली जाते. या शाळांमध्ये केवळ वीस टक्के विद्यार्थी खऱ्या अर्थाने स्पर्धेत उतरणारे, अभ्यासक्रम पूर्ण करणारे आणि पुढील शिक्षणासाठी सक्षम ठरणारे असतात. उरलेले ऐंशी टक्के विद्यार्थी थेट कॉपी, सेटिंग किंवा कसेतरी पास या मानसिकतेवर चळाण आधारित प्रवेश घेतात. सगळ्यात गंभीर बाब म्हणजे पाचवीतच प्रवेश घेताना संबंधित शिक्षकांकडून शब्द सोडवला जातो की तुम्ही आमच्या मुलाला दहावीपर्यंत पास करून द्यायची जबाबदारी घेत असाल तरच आम्ही या शाळेत प्रवेश देतो. अशा प्रकारे शिक्षणाची जबाबदारी शिक्षकांवर ढकलली जाते आणि पालक स्वतःची जबाबदारी मोकळी करतात. यामुळे शिक्षण हा व्यवहार बनतो आणि मूल्याधिष्ठित प्रक्रिया राहात नाही. या संपूर्ण पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष अनुभवातून एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा समोर येतो. ध्येय करिअर अकॅडमीच्या माध्यमातून संचालक या नात्याने आलेला स्वअनुभव असा आहे की पाचवीत प्रवेश घेतलेली अनेक मुले अशी आढळून आली की ज्यांना बालवाडी स्तरावरील बेसिक शब्द देखील नीट लिहिता येत नाहीत, वाचता येत नाहीत. अक्षरओळख, शब्दओळख, साधे वाक्य वाचन, लिहिण्याची सवय यांचा पूर्णपणे अभाव असलेले विद्यार्थी समोर येत असताना जेव्हा पालकांना स्पष्टपणे सांगितले जाई की आपल्या पाल्याचा पाया कच्चा आहे, बेसिक मजबूत करण्यासाठी वेळ, मेहनत आणि विशेष तयारी लागेल, तेव्हा बहुतांश पालक हे वास्तव स्वीकारण्यास तयार नसत. उलटपक्षी पालक सरळपणे सांगत, आमचा मुलगा हुशार आहे, फक्त तो तुमच्या समोर बोलायला घाबरतो. मात्र संबंधित शिक्षकाने जे निरीक्षण नोंदवले आहे त्याची पडताळणी पालकांनी स्वतः घरी कधीच केलेली नसते. आपल्या मुलाला खरोखर काय येते, काय येत नाही, तो वाचू शकतो का, लिहू शकतो का, साधे प्रश्न स्वतः सोडवू शकतो का, याची तसदी घेण्याची वेळ किंवा मानसिकता अनेक पालकांकडे दिसून येत नाही. अशा परिस्थितीत मुलांच्या कमतरता लपवून ठेवल्या जातात, दोष शिक्षकांवर ढकलला जातो आणि हळूहळू ही कमतरता दहावीपर्यंत गंभीर स्वरूप धारण करते. या तिन्ही स्तरांवरून पाहिले तर आज संपूर्ण शैक्षणिक चक्र हे विस्कळीत, विसंवादी आणि उद्दिष्टहीन झालेले दिसते.याची मुळे बालवाडीपासून आठवीपर्यंतच्या काळात दडलेली आहेत—हाच काळ पायाभूत विकासाचा असतो. म्हणूनच ज्या पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी कॉपीवर अवलंबून भविष्याचा विचार केला आहे, त्यांच्यासाठी ही वेळ आता निघून गेलेली आहे, हे स्पष्टपणे स्वीकारावे लागेल. मात्र बालवाडीपासून आठवीपर्यंतचा विद्यार्थी वर्ग अजूनही धोक्याची घंटा ओळखून योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकतो. पालकांनी बाह्य आकर्षणांपेक्षा पायाभूत कौशल्ये, वाचन-लेखन, संकल्पनात्मक समज, शिस्त आणि स्व-अभ्यास यांवर लक्ष केंद्रित केले, तरच करिअरचा पाया भक्कम होईल. दुसऱ्या बाजूला शिस्त आणि शिक्षकांकडून दिली जाणारी शिक्षा ही संकल्पना वीस वर्षांपूर्वीच जवळपास संपुष्टात आली आहे. आज विद्यार्थी सरळपणे शिक्षकांना सांगतात की तुमची नोकरी आणि पगार वाचवायचा असेल तर तुम्हालाच आम्हाला पास करावे लागेल. आठवीपर्यंत नियम, नववी दहावीला महाविद्यालयाची चाहूल, त्यामुळे अभ्यासाचा ताण नाही, पालकांकडे लक्ष द्यायला वेळ नाही आणि शिक्षक स्वतः शिकवण्या घेत असल्यामुळे शाळेतील अध्यापन दुय्यम ठरते. या सगळ्या प्रक्रियेत नुकसान नेमके कोणाचे होते हा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. मुलांचे, पालकांचे, शिक्षकांचे, शाळांचे की देशाचे, हा केवळ चर्चेचा विषय नसून आत्मपरीक्षणाचा विषय आहे. प्रत्येक घटकाने आपापल्या स्तरावर स्वतःकडे प्रामाणिकपणे पाहण्याची गरज आहे. पालकांनी केवळ फी भरून किंवा शाळा निवडून आपली जबाबदारी संपली असे समजू नये. शिक्षकांनी केवळ पगार आणि निकालापुरते शिक्षण मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांच्या पायाभूत क्षमतांवर लक्ष केंद्रित करावे. शासनाने धोरणे आखताना केवळ आकडेवारीपुरते न थांबता त्यांची अंमलबजावणी वास्तवाशी सुसंगत आहे का याचा विचार करावा. कोरोना काळानंतर तर मुलांचे आणि शिक्षणाचे नाते जणू तुटलेच आहे. ऑनलाइन शिक्षण, मोबाईल आणि स्क्रीन टाइम यामुळे अभ्यासाची सवय आणि शिस्त ढासळली आहे. आज केवळ मोजके पालक जागरूक आहेत आणि त्यांच्या घरातील मुलं स्वयंभू पद्धतीने अभ्यास करणारी आहेत. परिस्थिती इतकी गंभीर आहे की अनेक मुलं दहावीपर्यंत पोहोचतात, परंतु स्वतःचे नाव मराठीत शुद्धलेखनासह लिहू शकत नाहीत आणि इंग्रजीचा तर दूरवरचा संबंधही नसतो. याची मुळे बालवाडीपासून ते आठवीपर्यंतच्या टप्प्यात दडलेली आहेत. हाच काळ मुलांच्या बौद्धिक, भाषिक, नैतिक आणि सामाजिक पायाभूत विकासाचा असतो. या टप्प्यावर पालकांनी अष्टपैलू विकासाच्या दृष्टीने मुलांकडे कटाक्षाने लक्ष देणे अत्यावश्यक आहे. अजूनही वेळ पूर्णपणे निघून गेलेली नाही. शासनाची शैक्षणिक धोरणे बदलत आहेत आणि अनेक शाळांच्या जागी भविष्यात मोठमोठ्या इमारती उभ्या राहतील अशी चिन्हे दिसत आहेत. मराठी शाळांना घरघर लागलेली आहे, मात्र ही घरघर आपल्या मुलांच्या भवितव्याला लागू नये याची काळजी पालकांनी, शिक्षकांनी आणि समाजाने वेळीच घेतली पाहिजे. अन्यथा शिक्षणाच्या नावाखाली केवळ प्रमाणपत्रधारी पण दिशाहीन पिढी निर्माण होईल आणि त्याचे परिणाम भविष्यात अत्यंत भयावह असतील हे निश्चित.

वरील मजकूर आपणास योग्य वाटल्यास आपण फक्त नाव कट न करता अथवा मजकुरात बदल न करता इतरत्र Send करणेस अथवा प्रसिद्ध करणेस विनंती


Dhyeya News & सा. झुंज संपादक.. संदीप दा. महाजन, पाचोरा जि. जळगाव
(M.A.B.Ed) & Journalism
M0 7588645907 /73 8510 8510

दहावीच्या विद्यार्थ्यांनी कोणताही ताण न घेता आत्मविश्वासाने परीक्षा द्यावी –  गटशिक्षणाधिकारी विजय पवार

0

Loading

पाचोरा – तालुक्यात यावर्षी इयत्ता दहावीच्या राज्य मंडळ परीक्षेचे अत्यंत नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध आयोजन करण्यात आले असून विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारच्या भीतीला किंवा तणावाला बळी न पडता आत्मविश्वासाने परीक्षा द्यावी, असे आवाहन गटशिक्षणाधिकारी पाचोरा तथा परीरक्षक विजय पवार यांनी केले आहे. पाचोरा पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दहावी परीक्षा केंद्र संचालक व सहाय्यक परीरक्षक यांच्या सहविचार सभेत ते बोलत होते. पाचोरा तालुक्यात यंदा राज्य मंडळाच्या दहावी परीक्षेसाठी एकूण तेरा परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आली असून या केंद्रांवर चार हजार पाचशे पंचवीस विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झालेले आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची परीक्षा सुरळीत, पारदर्शक आणि गैरप्रकारमुक्त पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रशासनाच्या वतीने व्यापक तयारी करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर पाचोरा येथील गो से विद्यालयात ही महत्त्वाची सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत परीक्षा आयोजनाचा सविस्तर आढावा घेताना गटशिक्षणाधिकारी विजय पवार यांनी केंद्र संचालक, सहाय्यक परीरक्षक तसेच संबंधित कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. परीक्षा प्रक्रियेत कुठल्याही प्रकारची त्रुटी राहू नये, यासाठी प्रत्येक स्तरावर काटेकोर नियोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात आली असून त्याद्वारे सतत निरीक्षण ठेवण्यात येणार आहे. यासोबतच प्रत्येक वर्गात झूम अ‍ॅपच्या माध्यमातून संनियंत्रण करण्यात येणार आहे. परीक्षा काळात तालुका स्तरावर स्वतंत्र नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून या नियंत्रण कक्षातून थेट सर्व परीक्षा केंद्रांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. कोणतीही अडचण, तांत्रिक समस्या किंवा अनुचित प्रकार आढळल्यास तात्काळ कारवाई करता यावी, यासाठी हे नियंत्रण प्रभावी ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. परीक्षा सुरळीत पार पडावी, विद्यार्थी व पालकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण व्हावे आणि शिक्षक व कर्मचारी यांचे समन्वयाने काम व्हावे, या उद्देशाने हे नियोजन करण्यात आले असल्याचेही त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी विशेषतः नैतिकतेवर भर दिला. विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारचा गैरमार्ग अवलंबू नये, आपल्या मेहनतीवर, अभ्यासावर आणि आत्मविश्वासावर विश्वास ठेवून शांत मनाने परीक्षा द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. परीक्षा प्रक्रियेत शिस्त आणि पारदर्शकता राखण्यासाठी तालुका स्तरावर दोन भरारी पथक आणि तेरा बैठे पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय यावर्षी महसूल विभागाचे स्वतंत्र बैठे पथक नेमण्यात आले असून त्यामुळे परीक्षा प्रक्रियेवर अधिक काटेकोर नियंत्रण राहणार आहे. या सर्व पथकांचे कार्य म्हणजे परीक्षा काळात सतत निरीक्षण ठेवणे, नियमांचे पालन होत आहे का हे पाहणे आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता घेणे होय. या सहविचार सभेचे प्रास्ताविक भागवत कोरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार राजू सूर्यवंशी यांनी मानले. परीक्षा काळात तहसीलदार विजय बनसोडे व गटविकास अधिकारी सुधाकर मुंढे हे वेळोवेळी परीक्षा केंद्रांना भेटी देणार असून त्यांच्या उपस्थितीमुळे प्रशासनातील समन्वय अधिक बळकट होणार आहे. परीक्षा नियंत्रणाच्या कामासाठी कैलास बडगुजर, दिलीप अहिरे, नितीन भालेराव यांच्यासह केंद्र प्रमुख अनिल पाटील, सीमा पाटील, जयदीप पाटील, सुनील शिवदे, गिरीश भोयर, सतीश पाटील, संजय पाटील आदी अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. एकूणच पाचोरा तालुक्यात दहावीच्या परीक्षेसाठी शिक्षण विभाग, प्रशासन आणि संबंधित यंत्रणा पूर्णतः सज्ज असून नियोजन, तंत्रज्ञानाचा वापर आणि जबाबदार यंत्रणेच्या माध्यमातून यंदाची परीक्षा शांततापूर्ण व यशस्वीरीत्या पार पडेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

‘विकसित भारत @2047’ राष्ट्रीय परिषदेत प्रा. सौ. जयश्री वर्मा वाघ यांना राष्ट्रीय स्तरावरील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक

0

Loading

लोणी – (चेतना हिरे , वरखेडी ) लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील पद्मश्री विखे पाटील कॉलेजच्या वाणिज्य विभागामार्फत ‘विकसित भारत @2047’ या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. ही परिषद दि. 13 व 14 फेब्रुवारी 2026 रोजी प्रवरानगर, ता. राहता, जि. अहिल्यानगर येथील APJ Abdul Kalam Seminar Hall येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. देशाच्या सर्वांगीण विकासाच्या दिशेने शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातून मोलाचे योगदान देणाऱ्या या परिषदेत विविध राज्यांतील अभ्यासक, प्राध्यापक व संशोधक विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी संस्थेचे सहसचिव भारत घोगरे यांनी ग्रामीण भारताच्या विकासाच्या संकल्पनेवर सखोल मार्गदर्शन केले. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी ग्रामीण भागाचा विकास साधताना सहकाराच्या माध्यमातून उभारलेला प्रवरा परिसर आजही देशासाठी आदर्श ठरत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. ग्रामीण भारत सक्षम झाल्याशिवाय ‘विकसित भारत’ची संकल्पना पूर्णत्वास जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. या राष्ट्रीय परिषदेसाठी महाराष्ट्र, गुजरात, ओडिशा, कर्नाटक आदी राज्यांतून एकूण 170 संशोधन निबंध प्राप्त झाले होते, त्यापैकी सुमारे 40 संशोधक विद्यार्थी व प्राध्यापकांनी प्रत्यक्ष सत्रात आपले संशोधन निबंध सादर केले. आर्थिक विकास, ग्रामीण-शहरी समतोल, शिक्षणाची भूमिका, उद्योग व नवोन्मेष, सामाजिक समावेश, नैतिक मूल्ये आणि मानवी दृष्टिकोन यांसारख्या विषयांवर अभ्यासपूर्ण चर्चा झाली. या परिषदेत श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पाचोरा येथील वाणिज्य विषयाच्या प्राध्यापिका सौ. जयश्री वर्मा वाघ यांनी सादर केलेल्या संशोधन निबंधाला विशेष दाद मिळाली. त्यांच्या सखोल अभ्यासपूर्ण, वास्तववादी आणि भविष्याभिमुख मांडणीमुळे त्यांना ‘बेस्ट रिसर्च पेपर प्रेझेंटेशन’ या प्रकारात राष्ट्रीय स्तरावरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी त्यांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना प्रा. सौ. जयश्रीताई वर्मा वाघ यांनी भारत विकसित राष्ट्र होण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. देशाच्या विकासासाठी योगदान देताना सुरुवात स्वतःपासून करणे आवश्यक असून वैयक्तिक विकासातूनच समाज व देशाचा विकास साध्य होतो, असे त्यांनी नमूद केले. विकासाच्या प्रक्रियेत मानवतेची जपणूक होणे तितकेच महत्त्वाचे असून माणूस म्हणून माणसासारखे वागणे हीच खरी प्रगती असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. येत्या काळात भारत जागतिक महासत्ता बनेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या परिषदेत शिक्षण संचालक डॉ. प्रदीप दिघे, K. B. P. कॉलेजच्या अधिष्ठाता डॉ. हर्षा गोयल, कर्नाटक येथील डॉ. विद्या जिरगे, मुंबई येथील डॉ. चंद्रशेखर देवरे, डॉ. श्याम साळुंखे, उपप्राचार्य डॉ. आर. ए. पवार, डॉ. भाऊसाहेब रणपिसे यांच्यासह विविध विद्याशाखांतील तज्ज्ञ प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी डॉ. दीपक पाटील यांनी प्रास्ताविक करून परिषदेच्या उद्दिष्टांची माहिती दिली, तर डॉ. आर. ए. पवार यांनी महाविद्यालय व संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक व संशोधनात्मक उपक्रमांची माहिती देत परिषदेचे महत्त्व विशद केले. संशोधन संस्कृती वृद्धिंगत करणे, विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे आणि देशाच्या विकासात बौद्धिक योगदान देणे हा या परिषदेचा मुख्य हेतू असल्याचे त्यांनी सांगितले. संपूर्ण परिषदेत अभ्यासपूर्ण चर्चा, प्रश्नोत्तर सत्रे आणि विचारविनिमयामुळे बौद्धिक वातावरण निर्माण झाले होते. सूत्रसंचालन डॉ. शांताराम चौधरी यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. विजय खर्डे यांनी केले. यशस्वी आयोजनाबद्दल आयोजक वाणिज्य विभागाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले असून ‘विकसित भारत @2047’ या राष्ट्रीय परिषदेने संशोधनाला चालना देत देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी सामूहिक प्रयत्नांची दिशा निश्चित केली, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त पाचोरा शहरात भव्य मोफत हृदयरोग व त्वचारोग तपासणी शिबिराचे आयोजन

0

Loading

पाचोरा – छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून भाजप वैद्यकीय आघाडी जळगाव (पश्चिम), माऊली क्लिनिक व गोदावरी फाऊंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने पाचोरा शहरात भव्य मोफत हृदयरोग व त्वचारोग तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. समाजातील सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात, हृदयविकार, उच्च रक्तदाब, मधुमेह तसेच त्वचारोग यांचे वेळीच निदान व्हावे आणि उपचाराबाबत योग्य मार्गदर्शन मिळावे या सामाजिक उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात हृदयरोग व त्वचारोगाशी संबंधित विविध तपासण्या व तज्ज्ञांचे मार्गदर्शन मोफत स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हृदयविकारांच्या वाढत्या प्रमाणाचा विचार करता ईसीजी, २डी इको, कार्डिओग्राफ, रक्तदाब तपासणी, मधुमेह तपासणी तसेच आवश्यक रक्ततपासण्या केल्या जाणार आहेत. यासोबतच त्वचारोग निदान शिबिरात इसब, गजकर्ण, जुनाट खाज, अॅलर्जी, तीळ, मस, चेहऱ्यावरील डाग, टॅटू काढणे, चामखीळ काढणे यांसारख्या त्वचेच्या विविध समस्यांवर तपासणी व मार्गदर्शन दिले जाणार आहे. “आता त्वचेची समस्या लपवू नका” या संदेशातून नागरिकांना आपल्या आरोग्याबाबत सजग राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. या शिबिराचे मार्गदर्शक म्हणून मा. ना. गिरीष महाजन, गा. आ. मंगेश चव्हाण व डॉ राधेश्यामदादा चौधरी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभणार आहे. तपासणी व उपचार मार्गदर्शनामध्ये एन्जिओग्राफी, एन्जिओप्लास्टी, पेसमेकर, रिनल एन्जिओप्लास्टी, आय.व्ही.सी. फिल्टर, बायपास अशा आधुनिक वैद्यकीय प्रक्रियांबाबत सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. तसेच कार्डिओव्हास्कुलर तपासणीसाठी मोफत २डी इको आणि कार्डिओतज्ज्ञांकडून सल्ला दिला जाणार आहे. हे शिबिर गुरुवार, दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी २.०० या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. शिबिराचे स्थळ माऊली क्लिनिक, डॉ. दादासाहेब जीवन पाटील (वाणेगावकर), राज पिठाची गिरणी जवळ, विवेकानंद नगर, पुनगाव रोड, पाचोरा, जि. जळगाव असे आहे. शिबिरात सहभागी होण्यासाठी नोंदणी अत्यावश्यक असून नोंदणीसाठी ९९६०९०७०६० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी दिलीप वाम, मधुभाऊ काटे (मा. जि. प. सदस्य), सुभाषभाऊ पाटील (उपाध्यक्ष भाजपा, जळगाव), वैशालीताई सूर्यवंशी, दीपक माने यांचे सहकार्य लाभत असून आयोजनाची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली आहे. तसेच डॉ. जीवन पाटील सहसंयोजक भाजपा वैद्यकीय आघाडी, डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व धर्मदाय रुग्णालय, डॉ. वैशाली पाटील संचालिका माऊली क्लिनिक, डॉ. उल्हास पाटील माजी खासदार, डॉ. सौ. वर्षा पाटील सचिव, डॉ. केतकी पाटील सदस्य, डॉ. वैभव पाटील डी.एम. कार्डिओलॉजी यांचे मार्गदर्शन व सहकार्य या शिबिराला लाभत आहे. शिबिराबाबत विशेष बाब म्हणजे शासकीय योजनेत न बसणाऱ्या सर्व शस्त्रक्रिया सवलतीच्या दरात करण्यात येणार आहेत, त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनाही आवश्यक उपचार घेणे सुलभ होणार आहे. गोदावरी फाऊंडेशन संचलित या उपक्रमातून समाजातील आरोग्यविषयक जाणीव वाढवणे आणि वेळेवर तपासणीद्वारे गंभीर आजार टाळणे हा मुख्य हेतू आहे. या शिबिरासाठी संपर्क म्हणून आशिष भिरूड ९३७३३५०००९ व रत्नशेखर जैन ७०३०५७११११ यांचे क्रमांक देण्यात आले आहेत. जळगाव–भुसावळ महामार्ग क्र. ६, जळगाव खु. येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व धर्मदाय रुग्णालय तसेच माऊली क्लिनिक यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या प्रेरणेतून समाजाच्या आरोग्यासाठी राबविण्यात येणारे हे मोफत हृदयरोग व त्वचारोग तपासणी शिबिर नागरिकांसाठी निश्चितच उपयुक्त ठरणार असून हृदयविकार, उच्च रक्तदाब, मधुमेह व त्वचारोगांनी त्रस्त असलेल्या नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पाचोरा येथे शासकीय शिवजयंती महोत्सवाचा भव्य सोहळा

0

Loading

पाचोरा-हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, पराक्रम, शौर्य, न्यायनीती आणि लोककल्याणकारी राज्यकारभाराचे आदर्श प्रणेते विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी पाचोरा शहरात शासकीय शिवजयंती महोत्सव अत्यंत दिमाखदार आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा होत आहे. स्वराज्याच्या प्रेरणादायी इतिहासाची आठवण करून देणारा हा सोहळा केवळ एक उत्सव नसून शिवकालीन संस्कारांची आणि राष्ट्रभक्तीची ज्योत प्रज्वलित करणारा पवित्र उपक्रम ठरणार आहे. या शासकीय शिवजयंती महोत्सवासाठी शासकीय, राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांना सन्मानपूर्वक आमंत्रित करण्यात आले आहे. समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी कृतज्ञतेची पुष्पांजली अर्पण करावी, या भावनेतून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ७.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करून होणार आहे. महाराजांच्या तेजस्वी स्मृतींना अभिवादन करताना “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून जाईल. त्यानंतर सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष मा. आमदार आप्पासो. किशोर पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मानाचा सोहळा पार पडणार आहे. भगव्या ध्वजाच्या साक्षीने स्वराज्याच्या आदर्शांचा जागर केला जाईल. ध्वजारोहणानंतर जिजाऊ वंदना आणि महाराष्ट्र गीत सादर करण्यात येईल. राजमाता जिजाऊ यांच्या संस्कारांची आठवण करून देत मातृशक्तीचा गौरव करण्यात येईल. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते शिवपालखी पूजन होणार असून या पूजनातून स्वराज्याच्या पवित्र परंपरेचे स्मरण होईल. शिवपालखी ही केवळ परंपरा नसून ती शिवचरित्रातील त्याग, शौर्य आणि धर्मनिष्ठेचे प्रतीक आहे. यानंतर पाचोरा शहरातील सर्व शालेय विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत भव्य प्रभात फेरीची सुरुवात होईल. देशभक्तीपर घोषवाक्ये, लेझीम पथके, ढोल-ताशांच्या गजरात आणि शिवकालीन वेशभूषेत सजलेल्या विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे वातावरण शिवमय होणार आहे. प्रभात फेरी ही नव्या पिढीला शिवचरित्राची ओळख करून देणारी आणि राष्ट्रप्रेमाची बीजे रुजवणारी ठरणार आहे. प्रभात फेरी संपल्यानंतर विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरणाचा कार्यक्रम संपन्न होईल. या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करून त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रेरणा दिली जाईल. शिवाजी महाराजांच्या आदर्शांवर चालत ज्ञान, शौर्य आणि नैतिकता या मूल्यांचा अंगीकार करण्याचा संदेश या सोहळ्यातून दिला जाणार आहे. या पवित्र आणि प्रेरणादायी सोहळ्यास आपण उपस्थित राहून विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराजांप्रती आपला आदर, कृतज्ञता आणि निष्ठा व्यक्त करावी, अशी शिवविनंती आयोजकांनी केली आहे. सकाळच्या या शासकीय शिवजयंती महोत्सवासाठी आपली उपस्थिती लाभून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, ही नम्र विनंती आहे. या कार्यक्रमाचे आयोजन मराठा सेवा संघ, पाचोरा तसेच संभाजी ब्रिगेड, पाचोरा आणि सार्वजनिक उत्सव समिती, पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. शिवश्री राहुल बोरसे, अध्यक्ष मराठा सेवा संघ, पाचोरा तालुका, शिवश्री एस. ए. पाटील, उपाध्यक्ष मराठा सेवा संघ, पाचोरा तालुका, शिवश्री एस. के. पाटील (आण्णा), जिल्हाकार्याध्यक्ष, जळगांव, शिवश्री नितीन पाटील, शहर अध्यक्ष मराठा सेवा संघ, पाचोरा, शिवश्री सुनिल पाटील सर, जिल्हाउपाध्यक्ष मराठा सेवा संघ आणि शिवश्री जिभाऊ पाटील, अध्यक्ष संभाजी ब्रिगेड, पाचोरा तालुका यांनी सर्व नागरिकांना या महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. कार्यक्रमाचे ठिकाण छत्रपती शिवाजी महाराज चौक, पाचोरा येथे असून वेळ सकाळी ७.३० वाजता आहे. स्वराज्याच्या तेजस्वी स्मृतींना वंदन करण्यासाठी आणि शिवकालीन प्रेरणेची ज्योत अंतःकरणात प्रज्वलित करण्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

चोपड्यात महाशिवरात्री निमित्त १८ फूट उंच कच्च्या केळ्यांपासून साकारण्यात येणार भव्य महाशिवलिंग; १५ ते १८ फेब्रुवारीदरम्यान दर्शनाची सुवर्णसंधी

0

Loading

चोपडा…. (डॉ.अनिलकुमार पालीवाल) : महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र, श्रद्धेचा आणि आत्मजागृती घडविणारा उत्सव म्हणून ओळखला जातो. सृष्टीचे रचयिता, सर्व आत्म्यांचे परमपिता निराकार परमात्मा शिव यांच्या स्मरणाचा हा पावन दिवस मानला जातो. या दिवशी भक्त उपवास, जप, तप, ध्यान, रुद्राभिषेक आणि नामस्मरण करीत आत्मशुद्धीचा संकल्प करतात. अज्ञानातून ज्ञानाकडे, अंध:कारातून प्रकाशाकडे आणि अशांततेतून शांततेकडे जाण्याची प्रेरणा या पर्वातून मिळते. त्यामुळे महाशिवरात्री हा केवळ धार्मिक उत्सव नसून आत्मपरिवर्तनाचा आणि अंतर्मुख होण्याचा दिव्य सोहळा ठरतो. याच पवित्र पर्वानिमित्त , चोपडा यांच्या वतीने एक आगळावेगळा, भक्तीमय आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात येणार आहे. प्रथमच तब्बल १८ फूट उंच आणि २१,१११ (एकवीस हजार एकशे अकरा) कच्च्या केळ्यांपासून साकारण्यात आलेले भव्य महाशिवलिंग उद्यापासून भक्तांच्या दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे. या भव्य निर्मितीची तयारी मागील काही दिवसांपासून नियोजनबद्ध पद्धतीने सुरू होती. स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेत प्रत्येक केळे योग्य रचनेत बसविले, संतुलन राखले आणि संपूर्ण संरचनेला आकर्षक व देखणे रूप दिले. आज १४ फेब्रुवारी रोजी अंतिम सजावट, प्रकाशयोजना आणि पूजाविधीची तयारी पूर्णत्वाच्या टप्प्यावर पोहोचली आहे. पर्यावरणपूरक संकल्पनेवर आधारित हा उपक्रम विशेष उल्लेखनीय ठरत आहे. नैसर्गिक फळांचा वापर करून साकारलेले हे महाशिवलिंग समाजाला साधेपणा आणि निसर्गसंवर्धनाचा संदेश देत आहे. आधुनिक काळात कृत्रिम सजावटीकडे झुकणाऱ्या प्रवृत्तीच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम श्रद्धा आणि पर्यावरण यांचा सुंदर संगम घडवित आहे. या महाशिवलिंगाचे दर्शन घेताना भक्तांच्या मनात भक्तिभाव जागृत होईल आणि ‘ॐ नमः शिवाय’चा जप आपोआप ओठांवर येईल, अशी भावना व्यक्त होत आहे. प्रभू चिंतन भवन, ओम शांतीनगर, यावल रोड, चोपडा येथे १५ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत दररोज सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत दर्शनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. दररोज सकाळी ७:३० वाजता आणि रात्री ७ वाजता आरतीचे आयोजन करण्यात येईल. आरतीच्या वेळी मंत्रोच्चार, घंटानाद आणि सामूहिक प्रार्थना यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय आणि शांततेने भारावून जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कार्यक्रमादरम्यान आध्यात्मिक चित्रप्रदर्शनीचेही आयोजन करण्यात येणार आहे. या चित्रप्रदर्शनीतून शिवतत्त्वाचे गूढ, आत्मा-परमात्म्याचे नाते, कर्मसिद्धांत, जीवनमूल्ये आणि सदाचारयुक्त जीवनाची दिशा यांविषयी सुस्पष्ट मार्गदर्शन करण्यात येईल. विशेषतः तरुण पिढीला अध्यात्माशी जोडण्याचा आणि सकारात्मक विचारसरणीची प्रेरणा देण्याचा या उपक्रमामागील उद्देश आहे. समाजात शांती, प्रेम, सहिष्णुता आणि नैतिक मूल्यांची जाणीव दृढ व्हावी, हा या आयोजनाचा केंद्रबिंदू आहे. आयोजकांनी सर्व नागरिकांना सहपरिवार उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा, परमात्म्याचा दिव्य संदेश समजून घ्यावा आणि जीवनात सद्गुणांचा स्वीकार करावा, असे आवाहन केले आहे. महाशिवरात्रीच्या या पावन निमित्ताने चोपडा शहरात साकारण्यात आलेला हा अभूतपूर्व आणि प्रेरणादायी उपक्रम येत्या काही दिवसांत भक्तांसाठी आध्यात्मिक ऊर्जा, सकारात्मकता आणि आत्मिक समाधानाचा स्रोत ठरणार आहे.

लट्टालूर ते खिद्रापूर : राष्ट्रकूट–शिलाहार संबंधांचा ऐतिहासिक सेतू – युवराज पाटील चोबळीकर

0

Loading

मागच्या महिन्यात मी खिद्रापूरचे सहकुटुंब पाहून आलो… अत्यंत देखणे, माझे तिथून पाय निघत नव्हते… आणि ऐतिहासिक गोष्टी पोटात घेवून हे मंदिर उभं आहे… मी गेली अनेक दिवस याचे संदर्भ शोधत होतो.. कमाल म्हणजे आमच्या लातूरचे अप्रत्यक्ष बंध असल्यामुळे थोडी प्रादेशिक अस्मिता जागी झाली, त्यातून लिहलेला हा लेख आहे….!!
महाराष्ट्राच्या मध्ययुगीन इतिहासाकडे पाहताना राष्ट्रकूट आणि शिलाहार ही दोन राजघराणी स्वतंत्रपणे अभ्यासली जातात; मात्र प्रत्यक्षात या दोहोंमधील नातेसंबंध हा केवळ राजकीय अधीनतेपुरता मर्यादित नसून, तो दख्खनच्या सांस्कृतिक, स्थापत्य आणि धार्मिक जडणघडणीचा कणा ठरलेला आहे. हा संबंध समजून घ्यायचा असेल, तर लातूर (प्राचीन लट्टालूर), तेर (प्राचीन तगर) आणि खिद्रापूर या तीन स्थळांना एकाच ऐतिहासिक रेषेत जोडून पाहावे लागते.
लट्टालूर हे राष्ट्रकूट घराण्याचे मूळ स्थान मानले जाते. ‘लट्टालूरपुरवराधीश्वर’ अशी उपाधी धारण करणाऱ्या राष्ट्रकूट सम्राटांनी येथूनच दख्खनच्या राजकारणाला आकार दिला. याच लट्टालूरपासून अवघ्या काही कोसांवर वसलेले तेर (तगर) हे प्राचीन व्यापारी नगर होते. रोम, इजिप्त आणि पश्चिम आशियाशी व्यापार करणाऱ्या या नगरातूनच पुढे शिलाहार राजघराण्याचा उदय झाला, ही बाब इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे.
तेर या नगराचे महत्त्व केवळ व्यापारी केंद्र म्हणून नव्हे, तर राजकीय नेतृत्व घडवणाऱ्या भूमी म्हणूनही होते. शिलाहार राजे अभिमानाने स्वतःला ‘तगरपुरवराधीश्वर’ म्हणवून घेत असत. याचा अर्थ, त्यांची सत्ता केवळ कोकणात निर्माण झाली नसून, तिची मुळे दख्खनच्या पठारावर, तगरसारख्या समृद्ध नगरात खोलवर रुजलेली होती. याच तगरमधून शिलाहारांच्या तीन स्वतंत्र, पण परस्परांशी सांस्कृतिकदृष्ट्या जोडलेल्या शाखा निर्माण झाल्या….उत्तर कोकण, दक्षिण कोकण आणि कोल्हापूर शाखा.
उत्तर कोकण शाखेने ठाणे, मुंबई आणि आसपासचा परिसर व्यापला. पुरी किंवा राजपुरी ही त्यांची राजधानी होती. दक्षिण कोकण शाखेने रत्नागिरी–सिंधुदुर्ग किनारपट्टीवर आपले वर्चस्व निर्माण केले, खारेपाटण (बलिपत्तन) हे त्यांचे प्रमुख केंद्र होते. तर कोल्हापूर शाखेने करवीर, सातारा आणि सांगली परिसरावर सत्ता प्रस्थापित करून वळिवडे व पन्हाळा या ठिकाणांना राजकीय महत्त्व प्राप्त करून दिले.
या तिन्ही शाखांचा उगम एकाच भूमीत.,तेरमध्ये…झालेला असला, तरी त्यांच्या राजकीय वाटचालीमागे राष्ट्रकूट साम्राज्याचा स्पष्ट आश्रय होता. राष्ट्रकूट हे दख्खनचे सार्वभौम सम्राट होते आणि शिलाहार हे त्यांचे अत्यंत विश्वासू मांडलिक मानले जात. सम्राट तिसरा गोविंद याने उत्तर कोकण जिंकल्यानंतर तेथे आपला मांडलिक म्हणून पहिला कपर्दी याची नियुक्ती केली. ही नियुक्ती केवळ प्रशासकीय नव्हती, तर ती राष्ट्रकूट–शिलाहार विश्वासाच्या दृढ पायावर उभी होती.
दक्षिण कोकणातही अशीच परिस्थिती दिसते. राष्ट्रकूट सम्राट पहिला कृष्ण याने शिलाहार वीर सणफुल्ल याच्यावर त्या प्रदेशाची जबाबदारी सोपवली. हे मांडलिकत्व इतके घट्ट होते की, पुढे राष्ट्रकूट साम्राज्याचा अस्त झाल्यानंतरही शिलाहार राजांनी आपल्या ताम्रपटांत राष्ट्रकूट सम्राटांची वंशावळ, उपाध्या आणि पराक्रम आदराने कोरून ठेवले. ही बाब त्यांच्या राजनिष्ठेचे आणि ऐतिहासिक स्मरणशीलतेचे द्योतक आहे.
या राजकीय अनुबंधाचा सर्वात ठळक आणि आजही दिसणारा ठसा म्हणजे स्थापत्यकलेचा वारसा. राष्ट्रकूट आणि शिलाहार यांच्या काळात महाराष्ट्रात जी मंदिरे, लेणी आणि शिल्पे निर्माण झाली, ती केवळ धार्मिक स्थळे नसून त्या काळच्या सौंदर्यदृष्टी, तांत्रिक कौशल्य आणि सांस्कृतिक समन्वयाची साक्ष आहेत.
उत्तर कोकणातील अंबरनाथचे शिवमंदिर हे याचे उत्तम उदाहरण आहे. शिलाहार राजे चित्तराज आणि मुम्मुणी यांनी बांधलेल्या या मंदिरात राष्ट्रकूटकालीन स्थापत्यशैलीचा प्रभाव स्पष्टपणे दिसतो. कोरीवकाम, प्रमाणबद्ध रचना आणि शिल्पांची सजीवता यामुळे हे मंदिर दख्खन स्थापत्याचा मानबिंदू ठरते.
मुंबईजवळील घारपुरी (एलिफंटा) लेणी ही राष्ट्रकूट आश्रयाखाली आणि शिलाहार सहभागातून विकसित झाल्याचे अनेक इतिहासकार मानतात. येथील ‘त्रिमूर्ती’ शिल्प हे केवळ शैव परंपरेचे प्रतीक नसून, भारतीय शिल्पकलेचा सर्वोच्च टप्पा मानले जाते.
या सगळ्या परंपरेचा परमोच्च बिंदू म्हणजे खिद्रापूरचे कोप्पेश्वर मंदिर. कोल्हापूरच्या शिलाहार राजांनी उभारलेले हे मंदिर म्हणजे स्थापत्यशास्त्राचा जिवंत ग्रंथच आहे. मंदिराचा स्वर्गमंडप, अधिष्ठानावरील ९५ हत्तींच्या मूर्तींचे गजपीठ, तसेच भिंतींवरील सूक्ष्म शिल्पकाम पाहताना शिलाहार राजांच्या कलारसिकतेचा प्रत्यय येतो. म्हणूनच या मंदिराला योग्य अर्थाने ‘दक्षिणेचे छोटे खजुराहो’ असे म्हटले जाते.
शिलाहारांचे योगदान केवळ स्थापत्यापुरते मर्यादित नव्हते. त्यांनी सांस्कृतिक समन्वय आणि धार्मिक सहिष्णुतेचा आदर्श घालून दिला. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराला त्यांनी दान दिलेच, पण त्याचबरोबर जैन बस्त्या आणि बौद्ध विहारांनाही आश्रय दिला. विविध धर्म, पंथ आणि विचारधारांना एकत्र नांदवणारी ही परंपरा त्या काळातील सामाजिक समतोल दर्शवते.
साहित्य क्षेत्रातही शिलाहारांनी मोलाचे योगदान दिले. उत्तर कोकणच्या शिलाहार राजाने लिहिलेली ‘अपरार्क’ ही याज्ञवल्क्यस्मृतीवरील टीका केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर काश्मीरपर्यंत पोहोचली होती. यावरून त्या काळातील बौद्धिक देवाणघेवाणीची व्याप्ती लक्षात येते.
आज लातूरच्या लट्टालूरपासून सुरू होणारा हा इतिहासाचा प्रवास, तेरच्या तगरमार्गे खिद्रापूरच्या कोप्पेश्वर मंदिरापर्यंत पोहोचतो, तेव्हा जाणवते की हा केवळ राजसत्तांचा आलेख नाही. हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक स्मृतींचा, कलात्मक परंपरेचा आणि धार्मिक उदारतेचा ऐतिहासिक सेतू आहे. ‘तगर ते कोकण’ आणि ‘लट्टालूर ते करवीर’ अशी ही अखंड परंपरा आजही आपल्या लेण्यांत, मंदिरांत आणि शिलालेखांत जिवंत आहे. फक्त्त ती अस्ताव्यस्त आणि विस्तीर्ण भूपट्यावर विस्तारलेली आहे… खूप फिरावं लागेल आणि दस्ताऐवज एकत्र करावा लागेल… खूप मोठा ऐतिहासिक खजिना आहे हे नक्की….!!

पारोळा येथील राज्यस्तरीय परिषदेत पाचोरा महाविद्यालयाच्या प्रा. सौ. जयश्री को.वाघ ( वर्मा ) यांचा संशोधन निबंध सादर

0

Loading

पाचोरा ( चेतना हिरे ) अनिर्बंध औद्योगिकीकरण, झपाट्याने वाढणारे शहरीकरण आणि मोठ्या प्रमाणावर होत असलेली जंगलतोड यामुळे आज पर्यावरणासमोर गंभीर आव्हाने उभी ठाकली आहेत. या पार्श्वभूमीवर पर्यावरणाचे नुकसान टाळत आर्थिक प्रगती साधणे ही काळाची गरज बनली असून, प्रदूषण कमी करण्यासाठी सौर ऊर्जा, पवन ऊर्जा तसेच सौर उपकरणांचा व्यापक वापर हाच शाश्वत विकासाचा प्रभावी मार्ग असल्याचे प्रतिपादन उमवि येथील व्यवस्थापन परिषदेच्या सदस्या प्रा. डॉ. सुरेखा पालवे यांनी केले. आजच्या काळातील शिक्षकांची भूमिका दीपस्तंभासारखी असून समाजात विवेकशीलता निर्माण करणे हाच शाश्वत आर्थिक विकासाचा खरा पाया असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पारोळा येथे शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी २०२६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक उपक्रमांतर्गत आणि यांच्या संयुक्त विद्यमाने “मानवता आणि पर्यावरण : शाश्वत विकासासाठी बहुविद्याशाखीय दृष्टिकोन” या विषयावर एकदिवसीय आंतरविद्याशाखीय शासकीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेच्या उद्घाटक म्हणून प्रा. डॉ. सुरेखा पालवे बोलत होत्या. या महत्त्वपूर्ण परिषदेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाय. व्ही. पाटील होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून अधिसभा सदस्य प्रा. डॉ. वर्षा पाटील, प्रा. डॉ. भूपेंद्र केसुर आणि प्रा. डॉ. विकास गीते यांनी आपले विचार मांडले. बीजभाषक म्हणून येथील शास्त्रज्ञ डॉ. महेश पाटील यांनी पर्यावरणीय समस्यांचे वैज्ञानिक पैलू, त्यावरील संशोधनाची गरज आणि नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शाश्वत विकास कसा साधता येईल यावर सखोल मार्गदर्शन केले. या परिषदेस राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला असून जवळपास २०० प्राध्यापक आणि संशोधकांनी नोंदणी केली तर सुमारे दीडशे संशोधन निबंध प्राप्त झाले. विविध विद्याशाखांतील संशोधकांनी मानवता, पर्यावरण, अर्थशास्त्र, विज्ञान, वाणिज्य आणि सामाजिक शास्त्र यांचा समन्वय साधत शाश्वत विकासाच्या संकल्पनेवर आपले विचार मांडले. या परिषदेत येथील वाणिज्य विभागाच्या प्राध्यापिका प्रा. सौ. जयश्रीताई वर्मा वाघ यांनी संशोधक विद्यार्थिनी म्हणून आपला शोध निबंध सादर केला. त्यांच्या संशोधन निबंधात पर्यावरण संरक्षण आणि आर्थिक विकास यामधील संतुलन तसेच स्थानिक पातळीवर राबवता येणाऱ्या शाश्वत उपाययोजनांचा सखोल अभ्यास मांडण्यात आला होता. त्यांच्या सादरीकरणाला उपस्थित तज्ज्ञ, प्राध्यापक आणि संशोधकांकडून विशेष दाद मिळाली. निबंध सादरीकरणानंतर त्यांनी मनोगतात्मक अभिप्राय व्यक्त करत संशोधन प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी, त्यावरील उपाय आणि भविष्यातील संशोधनाच्या संधी याविषयी आपले अनुभव सांगितले. याचवेळी प्राचार्य डॉ. जी. एच. सोनवणे यांनी शाश्वत विकासाच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षण करताना समाजाच्या वाढत्या गरजा कशा संतुलित करता येतील यावर मार्गदर्शन केले. विकासाच्या नावाखाली पर्यावरणाची अपरिमित हानी होऊ न देता नैसर्गिक संसाधनांचा विवेकपूर्ण वापर करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. एकूणच पारोळा येथे झालेली ही एकदिवसीय राज्यस्तरीय परिषद शैक्षणिक, सामाजिक आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली असून मानवता आणि पर्यावरण यांचा समतोल राखत शाश्वत विकास साधण्यासाठी बहुविद्याशाखीय दृष्टिकोन किती आवश्यक आहे हे या परिषदेमधून अधोरेखित झाले.

श्री. गो. से. हायस्कूल, पाचोरा येथे रमाई आंबेडकर जयंतीनिमित्त सामाजिक समतेचा संदेश

0

Loading

पाचोरा – पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो. से. हायस्कूल, पाचोरा येथे रमाई आंबेडकर जयंती अत्यंत सन्मानपूर्वक आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. भारतीय समाजातील सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला बळ देणाऱ्या, त्याग, सेवाभाव आणि स्त्रीशक्तीचे प्रतीक ठरलेल्या रमाई आंबेडकर यांच्या विचारांना उजाळा देणारा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसह उपस्थितांसाठी मार्गदर्शक ठरला. या जयंती कार्यक्रमाच्या प्रसंगी माजी आमदार संस्थेचे अध्यक्ष भाऊसो दिलीपभाऊ वाघ यांच्या हस्ते रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पूजनानंतर उपस्थित मान्यवर, शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी समाजातील वंचित, उपेक्षित घटकांच्या उन्नतीसाठी रमाई आंबेडकर यांनी दिलेल्या योगदानाची आठवण करून देण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक चळवळीत रमाई आंबेडकर यांनी दिलेले मोलाचे सहकार्य, त्यागमय जीवन आणि संघर्षमय वाटचाल यावर प्रकाश टाकण्यात आला. कार्यक्रमात बोलताना माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांनी रमाई आंबेडकर यांच्या जीवनकार्याचा सविस्तर आढावा घेतला. सामाजिक समता, स्त्रीसन्मान आणि शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी सांगितले की, रमाई आंबेडकर यांचे संपूर्ण आयुष्य हे संघर्ष, संयम आणि सेवाभावाचे जिवंत उदाहरण आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यामागे खंबीरपणे उभे राहत समाजपरिवर्तनाच्या लढ्यात मोलाची भूमिका बजावली. आजच्या पिढीने त्यांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन सामाजिक बांधिलकी जोपासावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ यांनीही मनोगत व्यक्त करत रमाई आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव केला. समाजातील स्त्रियांनी आत्मसन्मानाने उभे राहून शिक्षण व संघटनाच्या माध्यमातून प्रगती साधावी, हा संदेश रमाई आंबेडकर यांच्या जीवनातून मिळतो, असे त्यांनी नमूद केले. व्हाईस चेअरमन विलास जोशी यांनी शाळांमधून अशा महनीय व्यक्तींच्या जयंती साजऱ्या केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मूल्यशिक्षण रुजते आणि सामाजिक जाणिवा वृद्धिंगत होतात, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमास शालेय समिती चेअरमन खलील देशमुख, तांत्रिक विभागाचे चेअरमन अण्णासो वासुदेव महाजन, सतीश आप्पा चौधरी, प्रा. भागवत महालपुरे, सौ. मनीषा पाटील, सिताराम पाटील, माजी प्राचार्य बी. एन. पाटील, योगेश पाटील, मुख्याध्यापक एन. आर. पाटील, माजी पर्यवेक्षक शांताराम चौधरी, माजी मुख्याध्यापक विश्वासराव साळुंखे, सुधीर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी रमाई आंबेडकर यांच्या सामाजिक योगदानावर आपले विचार व्यक्त करत त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनीही कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. रमाई आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित माहितीपर भाषणांमधून विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय, समानता आणि मानवी मूल्यांचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. शाळेतील शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले. एकूणच श्री. गो. से. हायस्कूल, पाचोरा येथे साजरी करण्यात आलेली रमाई आंबेडकर जयंती ही केवळ औपचारिक कार्यक्रम न राहता, सामाजिक समतेचा, स्त्रीसशक्तीकरणाचा आणि शिक्षणाच्या महत्त्वाचा संदेश देणारी प्रेरणादायी उपक्रम ठरली.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!