Home Blog Page 73

घरकाम करणाऱ्या महिलेच्या घरातून सव्वा लाखांचा ऐवज लंपास; पाचोरा पोलिसांच्या चतुर तपासातून आरोपी जेरबंद

0

Loading

पाचोरा –  शहरातील वृंदावन पार्क परिसरात एक धक्कादायक चोरीची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती. मात्र पाचोरा पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि अतिशय काटेकोर तपासकार्यामुळे केवळ काही तासांतच चोरीचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण आव्हाड, तसेच पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल पवार यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. पाचोरा पोलीस स्टेशनचा पोलीस निरीक्षक पदाचा पदभार राहुल पवार यांनी स्वीकारल्यापासून गुन्हेगारांना चपराक बसण्याचे प्रमाण वाढले असून, सर्वसामान्य जनतेला पोलीस दलाकडून तातडीने मदत मिळण्याचे प्रमाणही लक्षणीयरीत्या वाढले आहे. त्यांच्या कार्यशैलीमुळे गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. कठोर, परंतु पारदर्शक आणि लोकाभिमुख पोलीस प्रशासन उभारण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. या घटनेचा सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे आहे. दि. 27.07.2025 रोजी दुपारी 12.00 ते 12.30 या कालावधीत पाचोरा शहरातील वृंदावन पार्क येथे राहणाऱ्या अश्विनी राजेश डहाळे, वय 33 वर्षे, व्यवसाय – घरकाम, यांच्या घरात अज्ञात चोरट्याने संमतीविना प्रवेश करून लबाडीच्या इराद्याने त्यांच्या पर्समधून खालीलप्रमाणे मौल्यवान वस्तू चोरून नेल्या. चोरीस गेलेल्या मालामध्ये 1,05,000 रुपये किमतीचा सोन्याचा सुमारे 11 ग्रॅम वजनाचा नेकलेस आणि 500 रुपयांच्या तीन नोटा असे एकूण 1,500 रुपये रोख रक्कम होती. या सर्व चोरीस गेलेल्या मालाची एकूण किंमत 1,06,500 रुपये इतकी होती. या प्रकरणी अश्विनी डहाळे यांनी पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलीसांनी तत्काळ गुन्हा दाखल करत तपास सुरु केला. गुन्हा क्र. 375/2025, भा.दं.सं. कलम 305(अ) नुसार सदर गुन्हा नोंदविण्यात आला. या प्रकरणाचा तपास पोहवा/1328 गजानन देशमुख यांच्याकडे देण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, रमेशकुमार शामलाल जांगीड, वय 49 वर्षे, मूळ रा. वार्ड क्रमांक 3, ईसाडिया, ता. मादपुर, जि. सिकर, राजस्थान, सध्या रा. एस.बी.आय कॉलनी, पाचोरा हा व्यक्ती फिर्यादी अश्विनी डहाळे यांच्या घरी काही दिवसांपूर्वी फर्निचरचे काम करण्यासाठी आला होता. चोरीच्या घटनेनंतर तो अचानक बेपत्ता झाला होता, यामुळे पोलिसांचा संशय त्याच्यावर गेला. सदर माहितीच्या आधारे पोलीसांनी गुप्त बातमीदाराची मदत घेऊन संशयित आरोपी रमेशकुमार जांगीड याला शोधून काढले. त्यास ताब्यात घेऊन गुन्ह्याबाबत विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला दिनांक 27 जुलै 2025 रोजी संध्याकाळी 6.55 वाजता अटक करण्यात आली. अधिक तपास करत असताना रमेशकुमार जांगीड याने चोरी केलेला मुद्देमाल आपल्याच ताब्यातील एस.बी.आय कॉलनीमधील बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी लपवून ठेवल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्याच्या सांगण्यावरून त्या ठिकाणी पंचांसमक्ष मेमोरेडम पंचनामा करून तपास केला. त्यात त्याच्या कब्जातून 1,05,000 रुपये किमतीचा 11 ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस व 500 रुपयांच्या तीन नोटा (एकूण रोख 1,500 रुपये) असा एकूण 1,06,500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सदर चोरी प्रकरणातील गुन्हा उघडकीस आला असून पोलिसांनी अटक आरोपी रमेशकुमार जांगीड याला न्यायालयात रिमांड रिपोर्टासह सादर केले. पोलिसांच्या या जलद कारवाईमुळे नागरिकांमध्ये पोलीस यंत्रणेबाबत विश्वास वाढला आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण आव्हाड आणि पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे पोलीस निरीक्षक राहुल पवार यांनी पाचोरा शहरात गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्यासाठी राबवलेली रणनीती आणि त्यांच्या नेतृत्वगुणामुळे पोलीस विभागात एक सकारात्मक बदल दिसून येत आहे. त्यांच्या कार्यशैलीचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे. सदर प्रकरणात तपास करणारे पोहवा/1328 गजानन देशमुख यांनी अत्यंत कौशल्याने आणि चिकाटीने तपास केला. त्यांना पोलीस कॉन्स्टेबल संदीप राजपूत (पोकों/100), जितेश पाटील (पोकों/1609), हरिष परदेशी (पोकॉ/1409), कमलेश राजपूत (पोकों/429) यांनी सहकार्य केले. या गुन्ह्याच्या उकलामुळे पाचोरा शहरातील नागरिकांत समाधानाचे वातावरण आहे. काही तासांत चोरीच्या घटनेचा उलगडा करून मुद्देमाल परत मिळवणं ही पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेची उत्तम साक्ष देणारी बाब ठरली आहे. या कामगिरीबद्दल पाचोरा पोलीसांचे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. या संपूर्ण घटनेतून काही महत्त्वाच्या बाबी स्पष्टपणे समोर आल्या आहेत. पहिली बाब म्हणजे घरात काम करणाऱ्या व्यक्तींबाबत सतर्क राहणे किती आवश्यक आहे हे अधोरेखित झाले आहे. घरगुती कामासाठी येणाऱ्या लोकांचे आधी पोलीस व्हेरिफिकेशन करणे किंवा ओळखीच्या व्यक्तीकडून शिफारस घेणे, ही काळाची गरज ठरत आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे नागरिकांनी घरात मौल्यवान वस्तू ठेवल्यास त्याबाबत योग्य खबरदारी घेणे आवश्यक आहे. सुरक्षेची हमी नसेल तर दागदागिने बँकेत ठेवणे हा पर्याय विचारात घ्यावा. या प्रकरणामुळे पाचोरा शहरात नागरिकांनी सावध राहण्याची आवश्यकता अधोरेखित झाली असून पोलिसांनी दाखवलेली तत्परता व कार्यक्षमता ही सर्वांच्या कौतुकास पात्र आहे. भविष्यात अशा प्रकारचे गुन्हे रोखण्यासाठी नागरिकांनी स्वतःची सुरक्षा जागरूकतेने मजबूत करणे गरजेचे आहे. पोलीस विभागाकडून देखील नागरिकांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येत असून, कोणताही संशयास्पद प्रकार आढळल्यास त्वरित जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये कळवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पाचोरा पोलीस स्टेशनने दाखवलेली तत्परता, चपळाई आणि संयमित पद्धतीने केलेला तपास हा इतर गुन्ह्यांच्या तपासासाठी आदर्श ठरावा, अशीच जनतेची भावना असून पोलीस निरीक्षक राहुल पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस दलाचे मनोबल निश्चितच उंचावले आहे. त्यांचे सुशिक्षित, योग्य नियोजनबद्ध आणि लोकाभिमुख धोरण हे पाचोरा शहरासाठी एक मोठे बलस्थान ठरत आहे.

दि पाचोरा पीपल्स बँकेच्या चेअरमनपदी अतुलभाऊ संघवी, तर व्हा. चेअरमनपदी प्रशांतभाऊ अग्रवाल यांची बिनविरोध निवड

0

Loading

पाचोरा – दि पाचोरा पीपल्स को-ऑप. कॉ बँक लि. पाचोरा जि. जळगाव या तालुक्यातीलच नव्हे चार जिल्हे मिळून एक अग्रगण्य आणि जनमानसात विश्वासार्हतेचा ठसा उमटवलेल्या सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुक दिनांक 13 जुलै 2025 रोजी शांततेत पार पडली या निवडणुकीनंतर 14 जुलै रोजी मतमोजणीचे काम पार पडले. या मतमोजणीत अतुलभाऊ संघवी यांच्या दूरदृष्टी, नेतृत्व, आणि सहकार क्षेत्रातील अनुभवाला जनतेने भरभरून साथ दिली. त्यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या सहकार पॅनलने सर्वच्या सर्व जागांवर दणदणीत विजय मिळवत बँकेच्या भविष्यासाठी नवा मार्ग प्रशस्त केला. मतमोजणीनंतर नियमानुसार संचालक मंडळाचे सत्तास्थापन व पदनिर्धारण करण्याची प्रक्रिया दिनांक 28 जुलै 2025 रोजी पाचोरा पीपल्स बँकेच्या प्रशस्त सभागृहात पार पडली. या महत्त्वपूर्ण बैठकीस नवनिर्वाचित संचालक मोठ्या उत्साहात उपस्थित होते. सभेच्या अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी आर. आर. पाटील हे होते. त्यांच्या देखरेखीखाली चेअरमन आणि व्हा. चेअरमन पदांची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या सभेला अतुलभाऊ संघवी, प्रशांतभाऊ अग्रवाल, डॉ. अनंतदादा पाटील, राहुल संघवी, ॲड. अविनाशभाऊ भालेराव, सौ. संगीता शरद पाटे, सौ. संध्या प्रकाश पाटील, नंदुबालाजी उर्फ नरेंद्र पाटील, भागवत महालपुरे, पवन अग्रवाल, विकास वाघ, पुखराज डांगी, ॲड. स्वप्नील पाटील, देवेंद्र कोटेचा आणि अविनाश कुडे हे नवनिर्वाचित संचालक उपस्थित होते. या बैठकीत चेअरमन पदासाठी नंदुबालाजी उर्फ नरेंद्र पाटील यांनी अतुलभाऊ संघवी यांचे नाव सुचवले. संघवी यांचा उमेदवारी अर्ज नियमानुसार दाखल करण्यात आला. त्याचप्रमाणे व्हा. चेअरमन पदासाठी राहुल संघवी यांनी प्रशांतभाऊ अग्रवाल यांचे नाव सुचवून त्यांचा अर्ज सादर केला. उल्लेखनीय बाब म्हणजे, या दोन्ही पदांसाठी कोणताही प्रतिस्पर्धी अर्ज दाखल झाला नाही. ही बाब त्या उमेदवारांविषयी असलेल्या विश्वासाचे ठोस प्रतीक आहे. त्याअनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकारी आर. आर. पाटील यांनी औपचारिक घोषणा करत अतुलभाऊ संघवी यांची चेअरमन म्हणून आणि प्रशांतभाऊ अग्रवाल यांची व्हा. चेअरमन म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. सभागृहात या घोषणेनंतर

टाळ्यांच्या कडकडाटात आणि जल्लोषात दोन्ही पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत ‘सहकार पॅनल’ने दाखवलेली एकजूट, संयमित प्रचार, आणि जनतेच्या प्रश्नांवरील स्पष्ट भूमिका यामुळे मतदारांमध्ये प्रचंड विश्वास निर्माण झाला. बँकेच्या पूर्वीच्या कार्यकाळात अतुलभाऊ संघवी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिलेले योगदान, प्रामाणिक कारभार, आर्थिक सुदृढता, आणि सामाजिक बांधिलकी लक्षात घेता मतदारांनी पूर्ण पॅनलवर कौल दिला. या विजयामुळे बँकेतील पारदर्शकता, विश्वासार्हता, आणि स्थिरता यांना बळकटी मिळेल, असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला. विशेष म्हणजे, बँकेच्या अनेक ग्राहक व सभासदांनी या निकालाचे स्वागत करताना सोशल मिडियावर अभिनंदन संदेशांचा वर्षाव केला. अतुलभाऊ संघवी हे सहकार क्षेत्रातील एक अनुभवी आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व म्हणून ओळखले जातात. बँकेच्या अनेक धोरणात्मक निर्णयांमध्ये त्यांनी भरीव भूमिका बजावली आहे. अर्थव्यवस्थेतील चढ-उतारांमध्येही त्यांनी बँकेला स्थिरतेकडे नेले. शाखा विस्तार, ग्राहक सेवा सुधारणा, डिजिटल बँकिंग सेवा, आणि कामकाजातील पारदर्शकता ही संघवी यांच्या नेतृत्वाची वैशिष्ट्ये ठरली आहेत. तसेच ग्रामीण आणि शहरी भागात बँकेचा व्याप वाढवताना त्यांनी शेतकरी, महिला बचतगट, लघुउद्योग, आणि तरुण उद्योजक यांना प्राधान्य दिले आहे. त्यामुळेच मतदारांनी पुन्हा त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे. प्रशांतभाऊ अग्रवाल यांची निवड व्हा. चेअरमन पदावर झाल्यामुळे बँकेच्या कारभारात नव्या ऊर्जा आणि व्यवस्थापन कौशल्याची भर पडेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. ते स्वयंउद्योजक, आधुनिक तंत्रज्ञानाची उत्तम जाण असलेले, आणि सहकार मूल्यांशी बांधील नेतृत्व म्हणून ओळखले जातात. त्यांचा व्यवसायातील अनुभव, कारभारातील शिस्त आणि निर्णयक्षमतेमुळे बँकेच्या धोरणनिर्धारण प्रक्रियेत नावीन्यता येईल. त्यांच्याकडून बँकेच्या ग्राहक सेवा क्षेत्रात सुधारणा, मोबाईल बँकिंगचा वापर, कर्जवाटप प्रक्रियेतील गतिमानता यावर भर दिला जाईल, अशी अपेक्षा आहे. नव्या संचालक मंडळाच्या हाती बँकेच्या कारभाराची सूत्रे आली आहेत. यावेळी बँकेपुढे काही महत्त्वाची उद्दिष्टे आहेत – सर्वसामान्य ग्राहकांना बँकेच्या मुख्य प्रवाहात आणणे, नवीन शाखा सुरू करून ग्रामीण भागात बँकिंग सेवा पोहोचवणे, एनपीएचे प्रमाण कमी करणे व कर्ज वसुलीचा वेग वाढवणे, डिजिटल बँकिंग प्रणालीला अधिक मजबूत करणे, महिला बचत गट व तरुण उद्योजकांना प्राधान्य देणे, बँकेची आर्थिक स्थिती अधिक सक्षम बनवणे. या सर्व उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी नवे नेतृत्व सक्षम आणि सज्ज आहे. संचालक मंडळातील प्रत्येक सदस्याचे विशिष्ट योगदान, अनुभव आणि तज्ज्ञता असून बँकेचा समतोल विकास साधण्याचे व्रत त्यांनी हाती घेतले आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, शांततापूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली याबद्दल सभासद आणि नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. बँकेचे नियमित सभासद, ठेवीदार, कर्जदार तसेच विविध समाजघटकांनी अतुलभाऊ संघवी व प्रशांतभाऊ अग्रवाल यांचे अभिनंदन करत, बँकेच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. दि पाचोरा पीपल्स बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सहकार पॅनलने दाखवलेला विश्वास, बिनविरोध निवड झालेल्या चेअरमन व व्हा. चेअरमनचे व्यक्तिमत्त्व आणि कार्यक्षमतेचा लौकिक यामुळे बँकेपुढील पाच वर्षांचा कार्यकाळ हा निश्चितच आर्थिक सशक्तता, पारदर्शक कारभार आणि जनतेशी निष्ठा यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. अतुलभाऊ संघवी आणि प्रशांतभाऊ अग्रवाल यांच्यासारख्या अनुभवी आणि दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वाखाली पाचोरा पीपल्स बँक आणखी यशाचे शिखर गाठेल, अशी जनतेची खात्री आणि अपेक्षा आहे. बँकेच्या यशस्वी वाटचालीसाठी त्यांना सर्व स्तरांतून भरभरून शुभेच्छा मिळत आहेत.

वैशालीताई सुर्यवंशी यांच्या प्रेरणादाई उपस्थितीत हजारो शिवभक्तांचा सहभाग..!

0

Loading

पाचोरा : शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पाचोरा-भडगाव मतदारसंघात शिवसेनेच्यावतीने एक आगळावेगळं, भक्तिपर, सामाजिक व पर्यावरणपूरक कार्यक्रमांचं भव्य आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमांची संपूर्ण रूपरेषा ‘समाजासाठी समर्पित शिवसेना’ या संकल्पनेवर आधारलेली होती. या उपक्रमांमध्ये एकीकडे अध्यात्मिक आधारे जनजागृती घडवून आणली गेली, तर दुसरीकडे पर्यावरण जपण्यासाठी वृक्षारोपणासारख्या कृतीद्वारे हरित संस्कृतीचा संदेश पोहोचवण्यात आला. या सामाजिक-धार्मिक उपक्रमांना शिवसेनेच्या मातृशक्तीचे प्रभावी नेतृत्व करणाऱ्या नेत्या मा. वैशालीताई सूर्यवंशी यांची प्रेरणादायी व सक्रिय उपस्थिती लाभली. त्यांच्यासह युवा नेतृत्व करणारे मा. नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांनी देखील यात उत्साहाने सहभाग नोंदवत जनतेशी थेट संवाद साधला. या कार्यक्रमांना पाचोरा-भडगाव मतदारसंघातील शिवसैनिक, पदाधिकारी व सामान्य नागरिक यांचा मोठा प्रतिसाद लाभला. या भव्य उपक्रमाची सुरुवात एक अत्यंत भक्तिपर आणि मंगलमय वातावरणात झाली. पाचोरा तालुक्यातील प्रसिद्ध व ऐतिहासिक महादेवाचे बांबरुड येथील श्री महादेव मंदिरात सकाळी मंगल वाजंत्री, शंखध्वनी आणि हर हर महादेवच्या जयघोषात महाआरतीचे आयोजन करण्यात आले. या महाआरतीमध्ये सहभागी झालेल्या शिवसैनिकांनी एकमुखाने प्रार्थना केली की, उद्धवजी ठाकरे यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभो आणि त्यांच्याद्वारे महाराष्ट्राच्या सामाजिक, आर्थिक व पर्यावरणीय प्रगतीचा मार्ग खुला व्हावा! या आरतीमुळे परिसरात अध्यात्मिक शांतीचे आणि एकतेचे चैतन्य निर्माण झाले. महाआरतीनंतर सुरू झाली शिवभक्तांच्या परंपरेची आणि श्रद्धेची साक्ष असलेली कावड यात्रा. या यात्रेचे खास वैशिष्ट्य म्हणजे शिवसेना नेत्या मा. वैशालीताई सूर्यवंशी आणि मा. नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांनी स्वतः यात पायी चालत भाग घेतला. त्यांच्या या सहभागाने सर्व उपस्थित शिवभक्तांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. संपूर्ण यात्रा ही भक्तिभाव, भजन-कीर्तन, डमरु आणि ताशा-ध्वनींनी भारलेली होती. शिस्तबद्ध रांगा, डोक्यावर पवित्र जल असलेल्या कावडी आणि हातात भगवा ध्वज असलेले हजारो शिवभक्त पाहता क्षणीच मनात श्रद्धा आणि अभिमान दाटून येत होता. कावड यात्रेच्या मार्गावर, निर्मल सीड्स समोरील श्रद्धेय तात्यासाहेब आर.ओ. पाटील यांच्या पुतळ्याजवळ, हजारो शिवभक्तांना थंड दूध वाटप करण्यात आले. हे दूधवाटप केवळ एक सेवा नव्हती, तर समाजाभिमुखतेची आणि श्रद्धेच्या सेवेसाठीची शिवसेनेची बांधिलकी याचे सजीव उदाहरण होते. हा उपक्रमदेखील मा. वैशालीताई सूर्यवंशी व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी स्वतः राबवला. शिवसेनेचे कार्यकर्ते प्रत्येक भक्ताशी प्रेमाने संवाद साधत होते, ज्यामुळे परस्पर आदरभाव व आत्मीयता दिसून आली. यात्रेनंतर एक महत्त्वाचा सामाजिक संदेश देणारा उपक्रम राबवण्यात आला. निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणात वृक्षारोपणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमामध्ये मा. वैशालीताई सूर्यवंशी यांनी स्वतः झाडांचे रोप लावून उपस्थितांना पर्यावरणाच्या संवर्धनाचे महत्व पटवून दिले. त्यांच्या हस्ते लावण्यात आलेल्या या रोपांना समर्पण, संयम आणि संस्कृतीचे प्रतीक मानण्यात आले. यानंतर सर्व उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनीही वृक्षलागवड करून ‘एक झाड, एक जीवन’ ही संकल्पना जनमानसात रुजवली. शिवसेनेने पर्यावरणपूरक उपक्रम हाती घेऊन केवळ राजकीय पक्ष म्हणून नव्हे, तर एक सामाजिक जबाबदारी पार पाडणारी संस्था म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. वृक्षारोपण करताना उपस्थितांनी “झाडे लावा, झाडे जगवा” आणि “हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला. या सर्व उपक्रमांमध्ये मोठ्या संख्येने शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यांच्या समवेत एकमेकांशी समरसून कार्य करणाऱ्या शिवसैनिकांचे दृढ नातेही या निमित्ताने अधिक बळकट झाले. या प्रसंगी योजना ताई पाटील, मनिषा पाटील, निता भांडारकर, दिपक राजपूत, उद्धव मराठे, रमेश बाफना, पप्पू राजपूत, संदीप जैन, बंटी हटकर, प्रशांत पाटील, बंडू मोरे, चेतन पाटील, गजू पाटील, रतन परदेशी, रमेश पाटील, गोपाल परदेशी, महाजन, पप्पू दादा पाटील, भाऊसाहेब पाटील, समाधान पाटील, दगडू पाटील, मनोज चौधरी, हरीश देवरे, भूषण पाटील, राजू मोरे, फकिरा पाटील, जितेंद्र महाजन आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांचे उत्साही योगदान व सहभागाने कार्यक्रम अधिक भव्य स्वरूपात पार पडला. या संपूर्ण उपक्रमामागे एकच मूळ प्रेरणा होती – शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्याविषयी असलेला आदर, प्रेम आणि विश्वास! त्यांच्या दूरदृष्टीने प्रेरित होऊन शिवसेनेने महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक व पर्यावरणीय विकासासाठी जो पायाभूत विचार मांडला आहे, तो या उपक्रमांद्वारे साकार करण्यात आला. प्रत्येक उपस्थिताच्या मनात एकच भावना स्पष्टपणे दिसून येत होती – “उद्धवजींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास घडो!” या कार्यक्रमांच्या माध्यमातून शिवसेनेने एक महत्त्वाचा संदेश दिला – श्रद्धा ही केवळ धार्मिक नसून ती सामाजिक बांधिलकीची जाणीव असते, पर्यावरण संरक्षण हे केवळ सरकारचे कर्तव्य नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, आणि राजकारण हे केवळ सत्ता मिळवण्यासाठी नसून समाजहितासाठी असावे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून राबवलेल्या या उपक्रमांच्या माध्यमातून भक्ती, वृत्ती आणि हरित संस्कृती यांचा गजर संपूर्ण मतदारसंघात घुमला. या कार्यक्रमांमधून सामाजिक एकात्मतेची प्रचिती आली, तसेच नागरिकांच्या मनात शिवसेनेच्या कार्यपद्धतीबाबत नव्याने आदरभाव निर्माण झाला. या भव्य उपक्रमांनी एक गोष्ट स्पष्ट केली आहे की, राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजासाठी काहीतरी वेगळं आणि उपयोगी करण्याची प्रेरणा जिथे आहे, तिथेच खरी नेतृत्वाची ओळख ठरते. मा. वैशालीताई सूर्यवंशी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली ही पुढाकाराची भूमिका निश्चितच अनुकरणीय ठरावी, अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहे. या साऱ्या उपक्रमांचे एकमेव ध्येय होते – शिवसेनेच्या विचारधारेतून समतोल, समरस, आणि समृद्ध महाराष्ट्र घडविणे!

पाचोरा तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासाठी नियोजनपूर्व बैठक उत्साहात संपन्न

0

Loading

पाचोरा – तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्या अंगी असलेल्या क्रीडा कौशल्याला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी सन २०२५-२६ मध्ये होणाऱ्या तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन भव्य स्वरूपात करण्याच्या दृष्टीने श्री एस.एस.एम.एम. महाविद्यालय, पाचोरा येथे एक महत्वपूर्ण व नियोजनात्मक बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीस तालुक्यातील विविध शाळांमधील क्रीडा शिक्षकांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रा. एस.एस. पाटील (उपप्राचार्य, एस.एस.एम.एम. महाविद्यालय) हे होते. तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक एन.आर. ठाकरे, महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. जे.पी. बडगुजर, तालुका क्रीडा समन्वयक प्रा. गिरीश पाटील, तसेच मुख्याध्यापक सुरवाडे सर, मुख्याध्यापक धोनी सर, मुख्याध्यापक पिंजारी सर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी तालुका क्रीडा समितीचे सदस्य गणेश पाटील, एस.के. पाटील, सुभाष राठोड व प्रा. वाल्मीक पाटील हे मान्यवरही उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सभेच्या निमित्ताने काही नव्या जबाबदाऱ्या आणि नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. गणेश पाटील आणि गजानन सोमवंशी यांची मुख्याध्यापक पदावर नेमणूक झाल्याबद्दल सर्वांनी टाळ्यांच्या गजरात अभिनंदन केले. त्याचप्रमाणे चंद्रभान शिंदे यांची RSP (Road Safety Patrol) म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. याचप्रमाणे महाविद्यालयात स्पोर्ट्स कोट्यातून नुकतीच नियुक्त झालेल्या प्राध्यापिका ऋतुजा जोशी यांचा देखील पुष्पगुच्छ देऊन क्रीडा समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. या बैठकीचे प्रमुख आकर्षण ठरले ते मुख्याध्यापक एन.आर. ठाकरे यांचे सामाजिक वास्तव आणि शिक्षणातील क्रीडाविभागाच्या महत्वावर केलेले विचारमंथन. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “क्रीडा शिक्षक हा शाळेचा आत्मा असतो. तो विद्यार्थ्यांचे केवळ खेळात प्रशिक्षण देत नाही तर शिस्त, टीमवर्क, नेतृत्व आणि परिश्रम या मुल्यांचाही विकास करतो.” त्यांनी आजच्या विद्यार्थ्यांची मोबाईलच्या आहारी गेलेली जीवनशैली हा एक गंभीर सामाजिक प्रश्न म्हणून उपस्थित करत क्रीडा आणि मैदानी उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शरीरसंपदा, मानसिक संतुलन व सकारात्मकता निर्माण होते हे अधोरेखित केले. स्पर्धा पारदर्शक आणि निपक्षपाती पद्धतीने घेतल्या गेल्या पाहिजेत, असा ठाम आग्रहही त्यांनी व्यक्त केला. त्यानंतर तालुका क्रीडा समन्वयक प्रा. गिरीश पाटील यांनी आपल्या सविस्तर मार्गदर्शनातून उपस्थित क्रीडा शिक्षकांना येणाऱ्या शैक्षणिक वर्षातील तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचे स्वरूप, नियोजन, प्रक्रिया याविषयी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “या वर्षी पाचोरा तालुकास्तरावर एकूण १० प्रकारांच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. शाळा, खेळाडू आणि संघ नोंदणीसाठी ऑनलाइन प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे.” यामध्ये खेळाडू इम्पोर्ट प्रक्रिया, मागील वर्षाची प्राविण्य प्रमाणपत्रे डाऊनलोड करणे, तसेच प्रत्येक खेळाचे नियम व शिस्तबद्ध संचालन याविषयीचे तांत्रिक आणि व्यावहारिक मार्गदर्शन त्यांनी दिले. प्रा. गिरीश पाटील यांनी सर्व शाळांनी आणि महाविद्यालयांनी या स्पर्धांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांचा सहभाग मोठ्या संख्येने नोंदवावा, जेणेकरून सर्व ग्रामीण आणि निमशहरी भागातील गुणी खेळाडूंना संधी उपलब्ध होईल, असे आवाहनही केले. “क्रीडांगण हीच खरी प्रयोगशाळा आहे जिथे खेळाडू स्वतःला घडवतो, हरतो, जिंकतो आणि आयुष्याला आकार देतो,” असे उद्गार त्यांनी यावेळी काढले. या बैठकीला तालुक्यातील जवळपास सर्वच शाळांतील क्रीडा शिक्षक आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष राठोड यांनी अतिशय नेटकेपणाने केले. त्यांनी प्रत्येक मान्यवराला योग्य त्या पद्धतीने बोलते करून कार्यक्रमात सुसूत्रता राखली. तर आभार प्रदर्शन प्रा. वाल्मीक पाटील यांनी करत उपस्थित मान्यवरांचे आणि सहभागी शिक्षकांचे मन:पूर्वक आभार मानले. सभेचा संपूर्ण प्रवास अत्यंत सौहार्दपूर्ण आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला. शाळेतील क्रीडा शिक्षक एकत्र येऊन काम करत असल्यामुळे एक सकारात्मक ऊर्जा सभागृहात जाणवत होती. बैठकीत अनेकांनी आपले अनुभव, अडचणी आणि सूचना मोकळेपणाने मांडल्या. एकमेकांच्या सहकार्याने अधिकाधिक खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सर्वांनी एकत्र काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला. या बैठकीद्वारे केवळ आगामी क्रीडा स्पर्धांचे नियोजन झाले नाही, तर शिक्षकांमध्ये संवाद, सहकार्य आणि सशक्त तालुका क्रीडा यंत्रणा उभी करण्याची चळवळही रुजलेली दिसून आली. ग्रामीण भागातील विद्यार्थी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्यासाठी ही एक महत्त्वाची पायरी ठरावी, अशी अपेक्षा सर्वांनी व्यक्त केली.

पाचोरा ग्रामीण रूग्णालयातील डॉक्टरांना आलेली खंडणीची धमकी – एक गंभीर सामाजिक आणि कायदेशीर प्रश्न

0

Loading

पाचोरा हे जळगाव जिल्ह्यातील एक महत्त्वाचे उपविभागीय शहर असून वैद्यकीय सेवा, शिक्षण, व्यापार, शेती व सामाजिक चळवळींसाठी ओळखले जाते. या शहराची प्रतिमा अनेक वर्षांपासून “सुसंस्कृत आणि चिकित्सकदृष्ट्या सजग शहर” म्हणून राहिलेली आहे. मात्र अलीकडे समोर आलेली एक धक्कादायक घटना – पाचोरा ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. टाक यांना २ कोटींच्या खंडणीसाठी आलेली धमकी आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची चेतावणी – ही केवळ वैयक्तिक नव्हे तर सामाजिक प्रतिष्ठेवर घाला घालणारी आहे. डॉ. टाक यांना आलेली धमकी ही चिठ्ठी, ई-मेल आणि फोन कॉलच्या माध्यमातून करण्यात आली. यात त्यांच्याकडे तब्बल २ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली असून मागणी पूर्ण न केल्यास त्यांचे खोटे व अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याचा इशारा देण्यात आला आहे. अशी मागणी ही केवळ एक आर्थिक गुन्हा नसून, डॉक्टरसारख्या जबाबदार व्यक्तीच्या मानसिक स्वास्थ्यावर हल्ला आहे. या प्रकरणात डॉ. टाक यांनी तातडीने पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली असून त्यांनी सुसंगत पुरावे देखील पोलिसांकडे सुपूर्द केले आहेत. या संदर्भात पाचोरा येथील पत्रकार व सुवर्णकार समाजाच्या वतीने निषेध व्यक्त करीत संबंधित आरोपींना तातडीने शोधून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशा स्वरूपाचे निवेदन प्रशासनात दिले आहे तथापि, नागरिकांमध्ये यासंबंधी एक सशंकतेची भावना निर्माण झाली आहे की, केवळ स्थानिक पोलिस यंत्रणेमार्फत एवढ्या गुंतागुंतीच्या आणि डिजिटल स्वरूपाच्या गुन्ह्याचा सखोल तपास होईल का? पाचोरा पोलिसांची खरेतर कामगिरी चांगली असून विविध गुन्ह्यांत त्यांनी यशस्वी कारवाई केली आहे. परंतु, सायबर गुन्हेगारीचे वाढते स्वरूप आणि खंडणी मागण्यामागील नेटवर्क पाहता हे प्रकरण जिल्हा पातळीवरील स्थानिक गुन्हे शाखा (LCB), तसेच सायबर क्राईम युनिटकडे वर्ग करून युद्धपातळीवर तपास होणे अत्यंत गरजेचे आहे. पाचोऱ्यासारख्या प्रगतशील शहरात अशा प्रकारचा खंडणीचा गुन्हा होणे ही स्वतःच चिंताजनक बाब आहे. हे प्रकरण वैयक्तिक वाटले तरी त्यामागे कोणते तरी संगठित रॅकेट असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या प्रकाराच्या वास्तविक मुळापर्यंत पोहोचणे, समाजासमोर तथ्य मांडणे ही यंत्रणांची जबाबदारी आहे. या प्रकरणामुळे शहरातील सरकारी रूग्णालयांची प्रतिमा, नागरिकांचा विश्वास आणि सुरक्षिततेविषयीचा भाव यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. ही घटना पाचोऱ्याच्या सामाजिक, वैद्यकीय आणि प्रशासकीय प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारी आहे. पाचोरा ग्रामीण रुग्णालय हे संपूर्ण तालुक्यातील गरीब व गरजू रुग्णांसाठी एकमेव मोठे उपचार केंद्र आहे. येथे दररोज शेकडो नागरिक उपचारासाठी गर्दी करतात. परंतु रुग्णालयात सध्या काही भुरटे, पोटभरू व तोतया पत्रकारांनी ठाण मांडले असून, बिनधास्त वावर करताना दिसत आहेत. यामध्ये काही चिडीमार प्रवृत्तीच्या लोकांचाही सहभाग असून त्यांचा मुख्य उद्देश म्हणजे डॉक्टरांवर दबाव टाकणे, त्रास देणे आणि स्वार्थासाठी बदनामी करणे, असे दिसते. डॉ. टाक यांच्या संदर्भातील घटनेचा या असामाजिक प्रवृत्तींशी संबंध असण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे सर्वजण रुग्णालयाच्या आवारात बिनधास्त वावरत असल्याने तेथील सुरक्षेचा प्रश्न उभा राहतो. या पार्श्वभूमीवर, ग्रामीण रुग्णालयाच्या प्रशासनाने काही तातडीच्या सुरक्षा उपाययोजना हाती घेणे गरजेचे ठरते: CCTV कॅमेऱ्यांची संख्या वाढवणे, विशेषतः गेट, ऑपरेशन थिएटर, डॉक्टर केबिन, औषध वितरण केंद्र व गर्दीच्या जागी. असंबंधित व्यक्तींचा रुग्णालयात वावर बंद करण्यासाठी गेटवर ओळखपत्राधिष्ठित प्रवेश प्रक्रिया लागू करणे. तोतया पत्रकार, खंडणीखोर व चिडीमार यांचा वावर थांबविण्यासाठी पोलीस प्रशासनाची तातडीने मदत घेणे. रुग्णवाहिकेच्या अधिकृत चालकाशिवाय इतर व्यक्तींना पार्किंग व इमारतीच्या आसपास थांबण्यास मज्जाव करणे. डॉ. टाक हे मूळचे बाहेरगावचे असले तरी त्यांनी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात कर्तव्यदक्षतेने व निष्ठेने सेवा बजावली आहे. रुग्णसेवेप्रती त्यांची बांधिलकी पाहता, त्यांच्यावर अशा प्रकारे खोटे आरोप करून खंडणी मागणे हे निंदनीय आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची दखल घेणे ही फक्त प्रशासनाची नव्हे तर वैद्यकीय संघटनांची देखील नैतिक जबाबदारी आहे. IMA, सरकारी डॉक्टर संघटना, MSFDA व इतर वैद्यकीय व्यासपीठांनी या प्रकरणात उघड पाठिंबा दर्शवून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत व मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत लेखी मागणी करणे गरजेचे आहे. डॉ. टाक यांच्यासारख्या जबाबदार वैद्यकीय अधिकाऱ्यांना अश्लीलतेच्या माध्यमातून ब्लॅकमेल करून खंडणी मागणाऱ्या प्रवृत्ती ही नागरिकांच्या सुरक्षेसाठी एक गंभीर इशारा आहे. त्यामुळे पाचोऱ्यातील ही घटना ही फक्त स्थानिक तपासापुरती मर्यादित न ठेवता जिल्हा गुन्हे शाखा, सायबर क्राईम व गुप्तचर यंत्रणांकडून युद्धपातळीवर तपासली गेली पाहिजे. प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, आरोपींना अटक करून समाजासमोर ठेवावे, डॉक्टर व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना सुरक्षा द्यावी आणि पाचोऱ्याच्या सामाजिक प्रतिष्ठेला पुन्हा सन्मान मिळवून द्यावा, हीच वेळेची मागणी आहे.असे झाले तरच कोणतेही सक्षम व कर्तव्यनिष्ठ अधिकारी पाचोरा येथे आपली जबाबदारी पार पाडताना स्वतःला असुरक्षित व बाहेरगावचे असल्याने एकटे पडलो असे समजणार नाही

डॉक्टर टाक यांना खंडणी मागितल्याच्या प्रकारावर पाचोरा अहिर सुवर्णकार मंडळातर्फे पोलीस प्रशासनाला निवेदन

0

Loading

पाचोरा – शहरातील ग्रामीण रुग्णालयात निःस्वार्थी सेवा बजावणारे डॉक्टर टाक यांना अज्ञात व्यक्तीकडून अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल दोन कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे पाचोरा तालुक्यात संतापाची लाट उसळली असून सर्वसामान्य नागरिक, सामाजिक संस्था आणि विविध घटकांकडून या प्रकाराचा तीव्र निषेध व्यक्त होत आहे. संबंधित प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पाचोरा तालुक्यातील समस्त सोनार समाज बांधवांच्या वतीने अहिर सुवर्णकार मंडळ यांच्यातर्फे पाचोरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय निकम यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात डॉक्टर टाक यांच्यावर झालेल्या अत्यंत गंभीर आणि अमानुष प्रकाराचा निषेध करत दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. अज्ञात व्यक्तीने स्वतःला पत्रकार असल्याचे भासवत, एका खोट्या नावावरून डॉक्टर टाक यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या बदनामीचे षडयंत्र रचले. अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत थेट दोन कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली. या प्रकारामुळे डॉक्टर टाक यांना मानसिक धक्का बसला असून त्यांनी तात्काळ पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. सध्या पोलीस याप्रकरणाचा प्राथमिक तपास करत आहेत. अहिर सुवर्णकार मंडळाने निवेदनाद्वारे प्रशासनासमोर पुढील प्रमुख मागण्या ठामपणे मांडल्या आहेत – 1) डॉक्टर टाक यांना नैतिक, मानसिक व कायदेशीर आधार मिळावा – अशा भीषण परिस्थितीत डॉक्टर टाक यांना मानसिक आधार देणं आवश्यक आहे. समाजाने आणि प्रशासनाने त्यांच्या पाठीशी उभं राहणं ही काळाची गरज आहे. 2) दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी – फसवणूक, ब्लॅकमेलिंग आणि खंडणी यासारख्या गंभीर गुन्ह्यांमुळे समाजात अस्थिरता निर्माण होते. अशा प्रवृत्तीला रोखण्यासाठी कठोर शिक्षा आवश्यक आहे. 3) सायबर गुन्ह्याची सखोल चौकशी व्हावी – या प्रकरणामध्ये सायबर गुन्ह्यांचा समावेश असल्याने तज्ज्ञांच्या मदतीने स्वतंत्र आणि पारदर्शक तपास होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. 4) समाजात जनजागृती व्हावी – अशा प्रकारचे गुन्हे रोखण्यासाठी समाजात व्यापक जनजागृती होणे आवश्यक आहे. त्यामुळे शासन, पोलीस यंत्रणा आणि सामाजिक संस्था यांनी संयुक्तपणे जनजागृती मोहीम राबवावी. निवेदन देताना अहिर सुवर्णकार मंडळाचे प्रमुख सदस्य आणि पाचोरा तालुक्यातील सोनार समाजातील मान्यवर व्यक्ती उपस्थित होते. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, हा प्रकार केवळ एका डॉक्टरवर हल्ला नाही तर संपूर्ण समाजाच्या मानसिक स्वास्थ्यावर आघात आहे. डॉक्टर हे समाजाचे आधारस्तंभ असतात आणि त्यांच्याविरुद्ध अशा नीच पद्धतीने खंडणी मागणे म्हणजे माणुसकीच्या नावाला काळिमा फासण्यासारखे आहे. या गंभीर प्रकारामुळे पाचोरा शहरात नागरिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. एकीकडे डॉक्टर टाक यांच्यासारखे सेवाभावी व्यक्ती वैद्यकीय क्षेत्रात अहोरात्र मेहनत घेतात, तर दुसरीकडे अशा सेवाभावाचा गैरफायदा घेऊन त्यांना मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला जातो, ही अत्यंत निंदनीय बाब आहे. अहिर सुवर्णकार मंडळाने सादर केलेले निवेदन हे समाजाच्या सुरक्षिततेसाठी आणि डॉक्टरांसारख्या सेवाभावी व्यक्तींच्या सन्मानासाठी लढा असल्याचे अधोरेखित केले आहे. प्रशासनाने या प्रकरणाची तात्काळ आणि गांभीर्याने दखल घेऊन दोषींना अटक करून कठोर शिक्षा करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. भविष्यात अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत आणि जनतेच्या मनात पोलीस यंत्रणेविषयी विश्वास निर्माण व्हावा, हीच या निवेदनामागची मूळ भावना असल्याचे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी बुरहाणी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये विधी जनजागृती शिबिर संपन्न

0

Loading

पाचोरा – तालुका विधी सेवा समिती पाचोरा व पाचोरा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि तालुका विधी सेवा समितीचे मा. अध्यक्ष आदरणीय निमसे साहेब यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली, बुरहाणी इंग्लिश मिडियम स्कूल येथे एक व्यापक व उपयुक्त विधी जनजागृती शिबिर आयोजित करण्यात आले. समाजातील विविध स्तरांतील महिलांच्या सुरक्षिततेसाठी कायद्याचा उपयोग व त्याचा प्रभाव जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या हेतूने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांपासून ते शिक्षकवर्गापर्यंत सर्वांसाठी हे शिबिर माहितीपूर्ण व प्रेरणादायी ठरले. या शिबिरामध्ये प्रमुख वक्त्यांपैकी एक प्रा. वैशाली बोरकर यांनी POSH ACT-2013 म्हणजेच “कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध, मनाई व तक्रार निवारण कायदा” यावर सखोल आणि अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. त्यांनी या कायद्याच्या उद्दिष्टांपासून ते अंमलबजावणीपर्यंत सर्व महत्त्वाच्या बाबी विद्यार्थ्यांसमोर मांडल्या. शाळेतील विद्यार्थिनींसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही या मार्गदर्शनाचा लाभ घेतला. प्रा. बोरकर यांनी उदाहरणांच्या सहाय्याने कायद्याची व्याप्ती स्पष्ट करताना हे अधोरेखित केले की, कामाच्या ठिकाणी होणाऱ्या मानसिक, शारीरिक व भाषिक त्रासांवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाऊ शकते आणि महिलांनी याबाबत सजग राहणे काळाची गरज आहे. कार्यक्रमात उपस्थित असलेले प्रकाश विसपुते सर यांनी विधी विषयातील मूलभूत संकल्पना सोप्या भाषेत उलगडून दाखवताना, शाळकरी वयातील विद्यार्थ्यांना कायदेशीर जाणीव व जाण असणे किती आवश्यक आहे, यावर भर दिला. त्यांनी कायदे केवळ गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी नसून समाजातील प्रत्येक घटकाच्या हक्काचे संरक्षण करणारा एक मजबूत आधारस्तंभ आहे, हे स्पष्ट केले. महिलांच्या सुरक्षितता व गोपनीयतेचा अत्यंत संवेदनशील विषय मांडताना डॉ. सौ. सुनिता मांडोळे यांनी स्त्रीच्या सन्मानाची जपणूक करणारे अनेक कायदे समजावून सांगितले. समाजात अनेकदा महिलांना गोपनीयतेचा अभाव जाणवतो आणि त्यातूनच त्यांचे मानसिक व सामाजिक शोषण होते. त्यामुळे महिलांनी आपल्या हक्कांची आणि कायद्याच्या संरक्षणाची जाणीव ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले. बालकांच्या सुरक्षेचा महत्त्वपूर्ण भाग असलेल्या बॅड टच आणि गुड टच या विषयावर सौ. ललिता पाटील यांनी मार्गदर्शन करताना बालकांशी संवाद साधला. त्यांनी मुलामुलींना त्यांच्या शरीरासंदर्भात काय योग्य आहे व काय अयोग्य, हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. बालकांनी अशा प्रसंगी घाबरून न जाता विश्वासू मोठ्यांशी बोलण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. या सत्राने उपस्थित पालकवर्ग व शिक्षकांनाही बालसुरक्षेच्या बाबतीत जागरूक केले. POCSO ACT म्हणजेच “बालकांवर लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा” या विषयावर ॲड. भाग्यश्री महाजन यांनी सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, १८ वर्षांखालील मुलामुलींवर होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या शारीरिक, मानसिक किंवा लैंगिक छळवणुकीवर हा कायदा कठोर शिक्षेची तरतूद करतो. यामध्ये मुलांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांची जबाबदारी घेणाऱ्या प्रौढांची जबाबदारी या दोन्हींचा समावेश असतो. शाळा, महाविद्यालये व इतर शिक्षण संस्थांनीही या कायद्याचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. तालुका विधी सेवा समितीचे कार्य व त्याचे फायदे या विषयावर ॲड. अंकुश कट्यारे यांनी उपस्थितांना माहिती दिली. त्यांनी विधी सेवा समिती म्हणजे काय, ती कोणासाठी काम करते, तिच्या कार्यपद्धती काय आहेत, याची माहिती दिली. अनेक गरजू, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांपर्यंत मोफत कायदेशीर मदत पोहोचवण्याचे काम विधी सेवा समिती करत असते. शाळांमधूनही या माध्यमातून जनजागृती होणे हे समाजहितासाठी आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले. कुमारावस्थेत व युवा अवस्थेत शरीरात होणारे जैविक व मानसिक बदल आणि त्यादृष्टीने घ्यावयाची काळजी या विषयावर रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. मुकेश तेली यांनी प्रभावी मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना अत्यंत संवेदनशीलतेने व आत्मियतेने समजावले की, या वयातील शारीरिक व मानसिक बदल नैसर्गिक असून त्याकडे चुकीच्या नजरेने पाहू नये. विद्यार्थ्यांनी याकाळात सकारात्मक सवयी अंगीकाराव्यात व सायबर गुन्हेगारी, सोशल मीडिया व्यसनापासून दूर राहावे, असेही त्यांनी सांगितले. या सर्व उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे अध्यक्ष ताहेर भाई कपाशी, उपाध्यक्ष मुस्तफा भाई लाकडावाला, CEO बी. एन. पाटील, प्राचार्या सौ. मनीषा पाटील, उपप्राचार्या सौ. अश्विनी सोमपूरकर यांच्यासह संपूर्ण शिक्षकवर्ग व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांनी शाळेच्या पातळीवरून विद्यार्थीहिताच्या व कायदेसाक्षरतेच्या या उपक्रमात पूर्ण जबाबदारीने सहभाग घेतला. या शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये कायदेशीर ज्ञानाची जाणीव निर्माण झाली. विशेषतः मुलींसाठी POSH व POCSO कायद्यांविषयी सखोल माहिती मिळाल्यामुळे त्यांच्यात आत्मविश्वास व सुरक्षिततेचा भाव वाढला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संपूर्ण बुरहाण इंग्लिश मिडियम स्कूल परिवाराचे तालुका विधी सेवा समिती व वकील संघ पाचोरा यांनी विशेष कौतुक केले. अशा प्रकारचे शिबिरे शाळांमध्ये वेळोवेळी होणे अत्यावश्यक असून, यामुळे विद्यार्थी केवळ शैक्षणिकदृष्ट्या नव्हे तर कायदेशीरदृष्ट्याही सशक्त होतात. कायद्याच्या अंधारात वावरणाऱ्या समाजातील दुर्बल घटकांपर्यंत प्रकाश पोहोचवणाऱ्या अशा उपक्रमांचे महत्त्व आजच्या काळात अधिकच वाढले आहे. बुरहाण इंग्लिश मिडियम स्कूलने या उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीचे अत्युत्तम उदाहरण सादर केले आहे.

माऊली फाउंडेशनचा ५०१ वृक्ष लागवड व संगोपन संकल्प : पर्यावरण संरक्षणासाठी व्यापक उपक्रमांचे भव्य पाऊल

0

Loading

भडगाव – आजच्या बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी समाजातील विविध संस्था आणि नागरिकांनी पुढाकार घेणे गरजेचे झाले आहे. याच भावनेतून प्रेरित होत, माऊली फाउंडेशन या सामाजिक संस्थेने २०२५ या वर्षात ५०१ वृक्ष लागवड व संगोपन संकल्प हाती घेतला आहे. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मनोहर सूर्यवंशी यांच्या प्रेरणादायी संकल्पनेतून या अभियानाची सुरुवात झाली असून, या उपक्रमाला भडगाव तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. या वृक्षारोपण व संगोपन उपक्रमाचा शुभारंभ नुकताच साई समर्थ मतीमंद शाळा, नाचणखेडा रोड, भडगाव येथे झाला. या उद्घाटनप्रसंगी माऊली फाउंडेशनचे उपाध्यक्ष युवराज सूर्यवंशी, संचालिका संगिता जाधव, जनमंच संस्थाध्यक्ष शिवराम पाटील, शेतकरी संघ संचालिका व नगरसेविका योजना पाटील, तसेच मोरसिंग राठोड, निलेश मालपुरे, शांताराम पाटील, गुलाबसिंग पाटील, राजेश वाघ, साई समर्थ मतीमंद शाळेचे अधीक्षक आणि माऊली फाउंडेशनचा समर्पित सहकारी वृंद हे सर्वजण प्रमुख उपस्थित होते. उद्घाटनप्रसंगी परिसरात विविध प्रजातींच्या झाडांची लागवड करण्यात आली. विशेष म्हणजे, फक्त लागवडीपुरतेच हे कार्य मर्यादित न राहता, त्या झाडांचे नियमित संगोपन व संवर्धन करण्याचा संकल्पही या फाउंडेशनने केला आहे. “सजीव सृष्टी टिकवायची असेल तर निसर्ग व पर्यावरणाचे संतुलन राखणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी वृक्षलागवड ही काळाची गरज आहे. पण त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे त्यांचे संगोपन.” – असे विचार या वेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. या संकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे माऊली फाउंडेशन फक्त वृक्षारोपण करून थांबत नाही, तर त्या झाडांची वाढ, संरक्षण व निगा यासाठी विशेष समिती स्थापणार आहे. प्रत्येक झाडाचे दत्तकत्व स्थानिक स्वयंसेवकांना देण्यात येणार असून त्याच्या वाढीचा कालावधी, देखरेख आणि त्यावर होणाऱ्या बदलांचा लेखाजोखा ठेवण्याचे नियोजन आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक मनोहर सूर्यवंशी होते. आपल्या मनोगतात त्यांनी सांगितले की, “आपल्या देशात दरवर्षी लाखो झाडे लावली जातात. परंतु त्यातील फारच थोड्या झाडांचे संगोपन होते. म्हणूनच आमच्या फाउंडेशनने केवळ वृक्ष लागवड न करता ‘संगोपन’ या शब्दाला सुद्धा समान महत्त्व देत ५०१ झाडांच्या संगोपनाची जबाबदारी घेतली आहे. हे झाडे केवळ पर्यावरणच नव्हे तर भविष्यातील पिढ्यांचे आरोग्य, हवामानाचे संतुलन आणि जैवविविधतेचे रक्षण करणारे ठरणार आहेत.” कार्यक्रमात उपाध्यक्ष युवराज सूर्यवंशी यांनी सांगितले की, “माऊली फाउंडेशन गेल्या अनेक वर्षांपासून समाजोपयोगी उपक्रम राबवत आहे. यामध्ये आरोग्य तपासणी शिबिरे, रक्तदान शिबिरे, शैक्षणिक साहित्य वाटप, विशेष विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम असे विविध उपक्रम सतत राबवले जातात. आता पर्यावरण रक्षणासाठी फाउंडेशनने हे भव्य पाऊल उचलले असून हे फक्त एक दिवसाचे काम नाही, तर हे एक दीर्घकालीन अभियान आहे. यातूनच खरी सामाजिक जबाबदारी पार पाडली जाणार आहे.” संचालिका संगिता जाधव यांनी भावनिक शब्दांत सांगितले, “या वृक्षांची काळजी घेणे ही आपली स्वतःची जबाबदारी आहे. झाडे लावून फोटो काढणे ही काही शेवटची प्रक्रिया नाही, तर त्यांच्याबरोबर आपल्या मनाचे नाते निर्माण होणे आणि त्यांना जिवंत ठेवणे हाच खरा मानवतेचा खरा धर्म आहे.” नगरसेविका योजना पाटील यांनी सांगितले, “भडगावसारख्या ग्रामीण भागात वृक्ष लागवडीचा मोठा फायदा होतो. जलसंधारण, जमिनीत आर्द्रता टिकवणे, पक्ष्यांना आश्रय देणे, शुद्ध हवा यासाठी ही झाडे उपयुक्त ठरतात. माऊली फाउंडेशनचा हा उपक्रम खरंच कौतुकास्पद असून नगरपरिषदही भविष्यात यासाठी सहकार्य करण्यास तयार आहे.” शिवराम पाटील, मोरसिंग राठोड, निलेश मालपुरे, शांताराम पाटील, गुलाबसिंग पाटील, राजेश वाघ यांनीही आपले विचार व्यक्त करताना नागरिकांनी या अभियानात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. विशेषतः शालेय विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागृती निर्माण होण्यासाठी या प्रकारचे उपक्रम आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमात साई समर्थ मतीमंद शाळेचे अधीक्षक यांनी शाळेच्या वतीने वृक्षांचे रक्षण व संगोपन करण्याचा निर्धार व्यक्त केला. मतीमंद विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अशी कृतीतून शिकण्याची संधी मिळते आणि निसर्गाशी आत्मीय नाते निर्माण होते, असे त्यांनी नमूद केले. माऊली फाउंडेशनच्या या अभियानाची पुढील टप्प्यात भडगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये विस्तार होणार असून शासकीय व खाजगी शाळा, महाविद्यालये, मंदिर परिसर, शासकीय कार्यालयांचे आवार, तसेच सार्वजनिक रस्त्यांच्या कडेला झाडे लावण्याचे नियोजन करण्यात येत आहे. या झाडांसाठी जलसिंचन, कुंपण व्यवस्था, खत व्यवस्थापन याचीही आखणी करण्यात आली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, वृक्ष लागवड अभियानाबरोबरच माऊली फाउंडेशन लवकरच रक्तदान शिबिर, मोफत रोगनिदान तपासणी शिबिर, महिलांसाठी आरोग्य जागर, युवकांसाठी नशाबंदी जनजागृती मोहीम, तसेच स्वच्छता अभियान हेही कार्यक्रम भडगाव तालुक्यात राबवणार आहे. त्यामुळे हे फक्त वृक्ष लागवडीपुरते मर्यादित न राहता, सर्वांगीण सामाजिक प्रबोधनाचे व पर्यावरण जागृतीचे उदाहरण ठरणार आहे. समारोपाच्या क्षणी संस्थेचे अध्यक्ष मनोहर सूर्यवंशी यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. त्यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, “या अभियानात प्रत्येकाने एक झाड दत्तक घेऊन त्याच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारावी. हे झाड तुमच्या मुलासारखे वाढवा, कारण हे झाडच उद्याचे प्राणवायू निर्माण करणारे यंत्र आहे.” एकूणच, माऊली फाउंडेशनचा ५०१ वृक्ष लागवड व संगोपन संकल्प हा केवळ एक उपक्रम नसून, ही एक सामाजिक चळवळ आहे. ही चळवळ पर्यावरणरक्षणाच्या दिशेने भडगाव तालुक्याला नवा मार्ग दाखवेल, यात शंका नाही.

पालक-विद्यार्थ्यांचा हिरवाईसाठी सकारात्मक प्रतिसाद : श्री गो.से. हायस्कूल पाचोरा येथील अभिनव उपक्रमास भरभरून प्रतिसाद

0

Loading

पाचोरा – येथील पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री गो.से. हायस्कूल, पाचोरा या नामवंत शैक्षणिक संस्थेने विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने एक अभिनव उपक्रम राबविला. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसोबत मिळून झाडे लावावीत, आणि त्या क्षणाचे छायाचित्र शाळेच्या वर्गसमूहात पाठवावे, अशी विनंती संबंधित वर्गशिक्षकांनी पालकांना केली. विशेष म्हणजे, या उपक्रमास विद्यार्थ्यांबरोबरच पालकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, केवळ काही मिनिटांतच झाडे लावल्याची छायाचित्रे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर पोहोचू लागली. या उपक्रमामागे शाळेचे मुख्याध्यापक एन. आर. ठाकरे यांचे दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शन लाभले. त्यांच्याच प्रेरणेतून संपूर्ण शिक्षकवर्गाने आपापल्या वर्गातील विद्यार्थ्यांना संदेश पाठवून या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले. झाडे लावण्याच्या कृतीतून केवळ पर्यावरण रक्षणाची भावना रुजवली गेली नाही, तर शाळा-विद्यार्थी-पालक यांच्यातील बंध अधिक दृढ झाले. या मोहिमेचा प्रारंभ वर्ग सातवी ब च्या वर्गशिक्षिका सौ. शितल महाजन यांनी आपल्या वर्गाच्या पालकांसाठी तयार केलेल्या संदेशाद्वारे झाला. दिनांक 25 जुलै रोजी संध्याकाळी सुमारे साडेसहा वाजता त्यांनी आपल्या वर्गाच्या व्हॉट्सअ‍ॅप पालकगटावर एक महत्त्वाचा संदेश पाठवला. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांसोबत मिळून कोणतेही झाड लावावे, त्यावेळी काढलेले छायाचित्र व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर पाठवावे, आणि हे कार्य दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत पूर्ण व्हावे, अशा स्पष्ट सूचना दिल्या. या संदेशाची झपाट्याने दखल घेत मनश्री रविंद्र गढरी या सातवी ब वर्गातील विद्यार्थिनीच्या आई सौ. मनिषा गढरी यांनी अत्यंत तत्परतेने शाळेच्या या आवाहनास प्रतिसाद दिला. त्यांनी आपल्या मुलीसोबत एक वृक्षारोपण केले आणि त्याचे छायाचित्र काही मिनिटांतच वर्गसमूहात पाठवले. गढरी कुटुंबाचे हे उदाहरण इतर पालकांसाठी प्रेरणादायी ठरले आणि मग पालकांच्या सहभागाने हा उपक्रम अधिक व्यापक रूप धारण करू लागला. झाडे लावण्याच्या या मोहिमेमध्ये केवळ झाड लावणे एवढ्यावरच मर्यादित न राहता, अनेक पालकांनी आपल्या घरातील लहान भावंडांनाही या उपक्रमात सहभागी करून घेतले. काही पालकांनी आपल्या अंगणात, तर काहींनी शेतामध्ये झाडे लावली. एका विद्यार्थ्याच्या वडिलांनी तर गावातील मंदिराच्या परिसरात झाड लावून त्या ठिकाणी कायमस्वरूपी पाणी देण्याची जबाबदारीही घेतली. शाळेच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये ‘पर्यावरण रक्षण ही आपली जबाबदारी आहे’ ही भावना रुजताना दिसत आहे. एका विद्यार्थ्याने आपल्या झाडासोबत एक पाटी लावली होती, ज्यावर लिहिले होते – “हे झाड माझं आहे, मी त्याची काळजी घेईन.” अशा प्रकारच्या कृतीतून विद्यार्थ्यांच्या मनात झाडांविषयी आत्मीयता निर्माण होणे, हेच या उपक्रमाचे खरे यश आहे. मुख्याध्यापक एन. आर. ठाकरे यांनी याबाबत बोलताना सांगितले की, “फक्त वर्गात बसून पर्यावरणशास्त्र शिकवणे आणि प्रत्यक्ष झाडे लावण्याचा अनुभव देणे यामध्ये मोठा फरक असतो. विद्यार्थ्यांनी स्वतः झाड लावले की, त्याला पाणी घालणे, त्याची निगा राखणे याचे महत्त्व ते प्रत्यक्ष शिकतात. त्यामुळे हा उपक्रम म्हणजे पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने एक छोटासा पण ठोस पाऊल आहे.” वर्गशिक्षिका सौ. शितल महाजन यांनी यामागील प्रेरणा विषद करताना सांगितले की, “गेली काही वर्षे आपण वृक्षारोपणाविषयी खूप बोलतो, पण कृती फारच मर्यादित असते. त्यामुळे यंदा मी ठरवलं की माझ्या वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याने झाड लावले पाहिजे. आणि त्या झाडाचे छायाचित्र पाठवावे, जेणेकरून इतरांना प्रेरणा मिळेल. मनश्री आणि तिच्या आईने दिलेला पहिला प्रतिसाद हा अत्यंत उत्साहवर्धक होता.” हा उपक्रम शाळेच्या इतर वर्गांपर्यंतही पोहोचत असून अनेक वर्गशिक्षकांनी देखील आपापल्या वर्गातील पालकांना अशाच प्रकारची सूचना देऊन झाडे लावण्यास प्रवृत्त केले आहे. शिक्षक आणि पालक यांच्यातील हे समन्वयाचे उदाहरण शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श ठरू शकते. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये फक्त पुस्तकी ज्ञान न राहता, प्रत्यक्ष कृतीतून सामाजिक आणि पर्यावरणीय मूल्यांची जाणीव होऊ लागली आहे. यासारखे उपक्रम ग्रामीण भागातल्या शाळांनी राबविल्यास पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सकारात्मक बदल घडवून आणता येईल. झाड लावण्याचा हा उपक्रम एका दिवसापुरता न राहता, त्या झाडांची वाढ, त्यांची निगा, पाणी देणे, खत टाकणे आणि भविष्यात ती झाडे कशी उपयोगी पडतील, याची माहितीही विद्यार्थ्यांना दिली गेल्यास ते संपूर्ण जीवनात पर्यावरणपुरक जगण्याचे धडे घेऊ शकतील. श्री गो.से. हायस्कूलचा हा उपक्रम केवळ एक साधा पर्यावरण जागृती उपक्रम नव्हता, तर विद्यार्थ्यांच्या भावविश्वाशी जोडलेली एक प्रेरणादायी कथा होती. विद्यार्थ्यांनी आपापल्या आई-वडिलांसोबत मिळून झाड लावले, यामुळे त्यांच्यातील संवाद वाढला, पर्यावरणाविषयी आत्मीयता निर्माण झाली आणि शाळेच्या संस्कारक्षम शिक्षणपद्धतीचे प्रतिबिंब पुन्हा एकदा स्पष्ट झाले. शाळेतील इतर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि व्यवस्थापन समितीनेही या उपक्रमाचे कौतुक केले असून लवकरच या उपक्रमाच्या अंतर्गत लावलेल्या झाडांचे निरीक्षण करण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन केली जाणार आहे, जेणेकरून ही झाडे वाढतील आणि त्यांचे संगोपन सुस्थितीत होईल. शेवटी, हे निश्चितच म्हणता येईल की पाचोरा येथील श्री गो.से. हायस्कूलच्या या अभिनव उपक्रमातून ‘झाडे लावा, झाडे जगवा’ ही घोषणा केवळ घोषणाच न राहता कृतीतून साकार होत आहे, आणि त्यात मुख्य सहभाग आहे विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा – जो या उपक्रमाचा खरा आत्मा आहे.

डॉक्टर टाक यांना अश्लील व्हिडिओच्या धमकीसह २ कोटींची खंडणी मागितल्याच्या प्रकारावर पाचोरा तालुक्यात संतापाची लाट; पत्रकारचं प्रशासनाला निवेदन

0

Loading

पाचोरा – शहरातील ग्रामीण रुग्णालयात सेवेत असलेले डॉक्टर टाक यांना निनावी चिठ्ठी व मेल व्दारे अज्ञात व्यक्तीकडून अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत थेट दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची संतापजनक घटना नुकतीच उजेडात आली आहे. या प्रकारामुळे पाचोरा तालुक्यात केवळ वैद्यकीय वर्तुळातच नव्हे तर पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व सर्वसामान्य जनतेतही तीव्र संतापाची भावना पसरली आहे. या खंडणीप्रकरणाची गंभीर दखल घेत पाचोरा तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांनी एकत्र येत दिनांक २५ जुलै २०२५ रोजी आमदार किशोर आप्पा पाटील, प्रांताधिकारी भूषण अहिरे आणि पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्याकडे सामूहिक निवेदनाद्वारे निषेध व्यक्त केला. हे निवेदन पाचोरा पोलीस स्टेशनचे निरीक्षक राहुलकुमार पवार यांना पत्रकारांनी थेट भेटून सादर केले. या निवेदनात पत्रकारांनी प्रशासनाकडे जोरदार मागणी केली आहे की, डॉक्टर टाक यांना फसवणूक, ब्लॅकमेलिंग व खंडणीप्रकरणातून नैतिक, मानसिक व कायदेशीर आधार दिला जावा. हे केवळ एक वैयक्तिक प्रकरण नाही तर समाजाच्या सुरक्षिततेशी संबंधित गंभीर बाब आहे. वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना अशा प्रकारे लक्ष्य केले जाणे म्हणजे केवळ डॉक्टरांची नव्हे तर संपूर्ण समाजाची मानसिक शांतता व सामाजिक समृध्दी धोक्यात आणण्याचा प्रयत्न आहे, असे मत निवेदनात व्यक्त करण्यात आले पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात सेवेत असलेल्या आणि अनेक वर्षांपासून निःस्वार्थीपणे कार्यरत असलेल्या डॉक्टर टाक यांना अज्ञात व्यक्तीकडून एका खोट्या पत्रकाराच्या नावे संपर्क साधून अश्लील फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली गेली.त्यानंतर थेट दोन कोटी रुपये खंडणीच्या स्वरूपात मागण्यात आले. हा प्रकार अतिशय मानसिक त्रासदायक, भीषण आणि गंभीर स्वरूपाचा असून संबंधित डॉक्टरांनी याची दखल घेत पाचोरा पोलीस स्टेशनला तात्काळ तक्रार दाखल केली आहे. सध्या पोलीस याबाबत प्राथमिक तपास करत आहेत.
या प्रकारानंतर पाचोरा शहरात सर्वसामान्य नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. डॉक्टर हे समाजातील आधारस्तंभ असून त्यांच्या सेवा, निष्ठा आणि कार्यक्षमतेवर संपूर्ण जनतेचा विश्वास असतो. अशा व्यक्तींना अश्लीलतेच्या माध्यमातून बदनाम करून ब्लॅकमेलिंग करणे म्हणजे वैद्यकीय व्यवसायावरच नव्हे तर माणुसकीवरच घाला घालण्यासारखे आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर संघटना आणि नागरिकांनी एकत्र येऊन एकमताने आवाज उठवला असून अशा घटनांचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. पाचोरा पत्रकार यांच्या वतीने सादर करण्यात आलेल्या निवेदनात पुढील ठळक मागण्या मांडण्यात आल्या आहेत: 1) डॉक्टर टाक यांना मानसिक, सामाजिक व कायदेशीर पाठबळ मिळावे अशा भीषण मानसिक दबावाच्या परिस्थितीत डॉक्टर टाक यांना मानसिक आधार देणं आणि कायदेशीर पातळीवर सरकारने व प्रशासनाने त्यांना मदत करावी. 2) दोषींवर कठोर कारवाईची मागणी: या गुन्ह्याचा तात्काळ, सखोल तपास करून दोषी व्यक्तींना अटक करून कठोर कायदेशीर शिक्षा द्यावी. यामध्ये सायबर गुन्ह्यांची छाननी करून ब्लॅकमेलिंग करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेणे अत्यावश्यक आहे. 3) जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी पोलीस तपासात पारदर्शकता राखावी व संपूर्ण माहिती योग्य पद्धतीने माध्यमांद्वारे सादर करावी. 4) सायबर गुन्ह्यांचे स्वरूप अत्यंत क्लिष्ट असून तज्ज्ञांच्या मदतीने या प्रकरणाचा स्वतंत्र तपास करण्यात यावा. 5) समाजात अशा प्रकारच्या मानसिक, सामाजिक व तांत्रिक गुन्ह्यांविरोधात जनजागृतीसाठी शासन, पोलीस, पत्रकार व वैद्यकीय संघटनांनी मिळून संयुक्त मोहीम राबवावी.
निवेदन देताना उपस्थित पत्रकारांची एकजूट – सदर निवेदन पत्रकार सी एन चौधरी, संदीप महाजन, राजेंद्र खैरनार, अनिलआबा येवले, गजानन गिरी, नागराज पाटील, शेख जावेद, धनराज पाटील, भोला पाटील, नंदकुमार शेलकर, एन एस भुरे, प्रशांत येवले, भास्कर सोनवणे, भुवनेश दुसाने, प्रविण बोरसे, निखील मोर यांच्या उपस्थितीत सादर करण्यात आले. हे सर्व पत्रकार सध्या पाचोरा तालुक्यात कार्यरत असून पत्रकारिता हे केवळ व्यवसाय नव्हे तर सामाजिक जबाबदारी म्हणून स्वीकारलेले आहेत. ही घटना प्रशासन आणि राजकीय नेतृत्वासाठीही एक मोठी कसोटी आहे. डॉक्टरांवरील या प्रकाराचा निकाल लावण्यात शासन यंत्रणा अपयशी ठरल्यास, वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींचा विश्वास डळमळीत होऊ शकतो. त्यामुळे आमदार किशोर आप्पा पाटील आणि प्रांताधिकारी भूषण अहिरे यांच्याकडून या प्रकरणात सक्रीय आणि ठोस पावले उचलली जातील, अशी अपेक्षा निवेदनकर्त्यांनी व्यक्त केली आहे. हा प्रकार फक्त एका डॉक्टरविरोधात नव्हे, तर संपूर्ण समाजात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. डॉक्टर हे रुग्णांसाठी जीवनदायी असतात. अशा सेवाभावी व्यक्तींना बदनाम करून पैसे उकळण्याचा प्रयत्न म्हणजे गुन्हेगारीचा अत्यंत घृणास्पद प्रकार आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी एकत्र येत सामाजिक न्यायासाठी आवाज उठवणे ही काळाची गरज असल्याचे स्पष्ट दिसून आले. या आंदोलनात समाजातील इतर घटकांनीही पुढाकार घेणे अपेक्षित आहे. या गंभीर प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन, संबधित डॉक्टरांना न्याय मिळावा आणि भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ठोस पावले उचलली जावीत, हीच अपेक्षा पत्रकार संघटनांनी व्यक्त केली आहे. निवेदन देणाऱ्या सर्व पत्रकार बांधवांनी एकजुटीने प्रशासनाला साद घातली असून, यामध्ये कोणताही राजकीय वा वैयक्तिक स्वार्थ नसून केवळ सामाजिक भान आणि जबाबदारी आहे, हे त्यांनी अधोरेखित केले आहे.
पाचोरा शहराच्या सामाजिक आरोग्य, सुरक्षितता आणि न्यायाच्या दृष्टीने डॉक्टर टाक यांना मिळालेल्या धमकीप्रकरणी केलेले हे पत्रकार संघटनेचे निवेदन केवळ निषेध नव्हे, तर समाजाला आरोग्यदायी आणि सुरक्षित ठेवण्याच्या लढ्याचा भाग आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देत, दोषींना कठोर शिक्षा करून नागरिकांच्या मनात विश्वास निर्माण करावा, हीच अपेक्षा.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!