Home Blog Page 107

विश्वशांतीसाठी सामूहिक नवकार महामंत्र पठणाचा ऐतिहासिक उपक्रम: पाचोरामधील जयकिरण प्रभाजी स्कूलचा अभिमानास्पद सहभाग

0

Loading

पाचोरा – शहरातील जयकिरण प्रभाजी न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल येथे दि. 9 एप्रिल 2025, बुधवार रोजी सकाळी 8:01 वाजता एक अत्यंत भावनिक, प्रेरणादायी व ऐतिहासिक असा सामूहिक नवकार महामंत्र पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये संपूर्ण विश्वात एकाच वेळी नवकार महामंत्राचे 108 वेळा सामूहिक पठण करून विश्वशांती, एकता आणि समभावाचा संदेश देण्यात आला. हा उपक्रम देशभरात नवचैतन्य घेऊन आला असून, त्याचे वैशिष्ट्य म्हणजे हे पठण थेट प्रक्षेपणाद्वारे 108 देशांमध्ये एकाच वेळेस दाखवले गेले आणि या प्रसंगी देशाचे आदरणीय पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांचीही थेट उपस्थिती लाभली.
पाचोऱ्यातील या शाळेने या महान उपक्रमात सहभागी होऊन ना केवळ आपल्या संस्थेचा सन्मान वाढवला, तर विद्यार्थ्यांमध्ये अध्यात्म, शांती व मूल्य शिक्षण रुजवण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले. या दिवशी शाळेच्या प्रांगणात वातावरण अत्यंत मंगलमय, शिस्तबद्ध व भक्तिपूर्ण होते. नवकार महामंत्राचा जयघोष आणि विद्यार्थ्यांचे एकाग्र मन:पूर्वक सामूहिक पाठ यामुळे संपूर्ण परिसर पावन झाला होता.
नवकार महामंत्र जैन धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि सर्वधर्मसमभावाचा संदेश देणारा मंत्र आहे. या मंत्राचे पठण केल्यामुळे मनःशांती, आत्मशुद्धी आणि सृष्टीत समतोल नांदतो, असा विश्वास आहे. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात या मंत्राचे आध्यात्मिक, वैज्ञानिक आणि सामाजिक महत्त्व अत्यंत मार्मिक शब्दांत मांडले. नवकार मंत्र हे केवळ जैन धर्मापुरते मर्यादित न राहता त्याचा प्रभाव सर्व मानवजातीसाठी कल्याणकारी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
या सामूहिक प्रार्थनेच्या माध्यमातून त्यांनी एक अनोखी संकल्पना मांडली की, जर रजिस्ट्रेशनद्वारे या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांची संख्या अधिकाधिक वाढली, तर प्रत्येक वर्षी 9 एप्रिल हा दिवस ‘नवकार दिवस’ म्हणून साजरा करण्यात येईल. यामुळे नवकार मंत्राचा जागतिक प्रसार होईल आणि भारत एक अध्यात्मिक नेतृत्व करणारा देश म्हणून पुढे येईल, असा त्यांचा आशय होता.
पठणानंतर मा. नरेंद्रजी मोदी यांनी भारतवासीयांना नवसंस्कारांसाठी 9 महत्त्वाचे संकल्प करण्याचे आवाहन केले. त्यांनी दिलेल्या नो संकल्पना एक नवा सामाजिक दृष्टिकोन तयार होईल, जो देशाच्या सर्वांगीण विकासासाठी उपयोगी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमात जयकिरण प्रभाजी न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल पाचोरा या शाळेचे संपूर्ण व्यवस्थापन, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. शाळेच्या अध्यक्षपदी विराजमान असलेले दिनेशजी बोथरा यांनी या उपक्रमाचे स्वागत करताना सांगितले की, अध्यात्म व संस्कार यांची पायाभरणी शाळेपासूनच व्हावी यासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन महत्त्वाचे आहे.
उपाध्यक्ष गिरीषजी कुलकर्णी, सचिव जीवनजी जैन, सहसचिव संजयजी बडोला, खजिनदार जगदीशजी खिलोशिया, स्कूल कमिटी चेअरमन लालचंदजी केसवाणी, स्कूल कमिटी सचिव रितेशजी ललवाणी, संचालक संजयजी चोरडीया, गुलाबजी राठोड, गोपालजी पटवारी, सौ. प्रितीजी जैन, महेंद्रकुमारजी हिरण,अशोककुमारजी मोर, शेखरकुमारजी धाडीवाल भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष राजेश जैन महिला अध्यक्षा हर्षा संघवी आदी मान्यवरांनी या उपक्रमासाठी सहकार्य केले.
या कार्यक्रमाचे मार्गदर्शन व आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पलता पाटील आणि CEO अतुल चित्ते सर यांनी केले. याशिवाय शाळेतील शिक्षकवर्गाचे योगदानही अत्यंत उल्लेखनीय होते. यामध्ये निर्मला पाटील, प्रतिभा मोरे, रुपाली जाधव, प्रिती शर्मा, शितल तिवारी, दिपिका रणदिवे, योगिता शेंडे, पुजा पाटील, ज्योती बडगुजर, कविता जोशी, रूपाली देवरे, भाग्यश्री ब्राम्हणकर, विद्या थेपडे, शितल महाजन, स्मिता देशमुख, हरिप्रिया नम्र, किशोरी साळुंखे, वाल्मिक शिंदे, किरण बोरसे, संगिता पाटकरी, पुजा अहिरे, पुनम कुमावत, शालिनी महाजन, कल्पना बोरसे, निवृत्ती तांदळे, संजय सोनजे, संदिप परदेशी, कृष्णा शिरसाठ, आनंद दायमा, मनोज बडगुजर, शिवाजी ब्राम्हणे, अलका बडगुजर, अश्विनी पाटील, सुनिता शिंपी, मनिषा पाटील, शिवाजी पाटील, विकास मोरे यांनी कार्यक्रमात सक्रीय सहभाग घेतला.
विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध आणि निःस्वार्थ वृत्तीने नवकार महामंत्राचे 108 वेळा सामूहिक पठण करताना दाखवलेली एकाग्रता आणि समर्पण भाव पाहता येणारे नवभारताचे दर्शन घडले. या दिवशी शाळेचे प्रांगण जणू काही तपोभूमीच बनले होते. शिक्षक, विद्यार्थ्यांचे पालक आणि नागरिक या सर्वांनी मिळून कार्यक्रम यशस्वी करण्यात आपली भूमिका बजावली.
हा कार्यक्रम हा केवळ एक धार्मिक अथवा सांस्कृतिक उपक्रम न राहता तो एक सामाजिक चळवळ ठरावा असा विचार या उपक्रमामागे होता. ज्या प्रकारे या कार्यक्रमात सर्व स्तरांतील व्यक्तींनी सहभावाने भाग घेतला, त्यावरून भारतात अध्यात्म, संस्कार व समाजिक एकात्मतेच्या मूल्यांची अजूनही गाढ मुळे आहेत, हे स्पष्ट होते.
शेवटी, एक गोष्ट मात्र निश्चित आहे की अशा प्रकारचे उपक्रम केवळ शांती आणि एकतेचाच नव्हे, तर भावी पिढीच्या सर्वांगीण विकासासाठीही अत्यंत आवश्यक आहेत. पाचोरामधील जयकिरण प्रभाजी न्यू इंग्लिश मिडीयम स्कूलने या ऐतिहासिक क्षणाचा भाग होऊन आपल्या शाळेचा आणि पाचोराचा सन्मान उंचावला आहे. देशाच्या इतिहासात 9 एप्रिल 2025 हा दिवस नवकार दिवस म्हणून साजरा होईल, हे निश्चितच प्रेरणादायी आणि गौरवास्पद आहे.

मान्सूनपूर्व काळजीची ठोस पावले : चोपडा तालुक्यात ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे व्यापक स्वच्छता सर्वेक्षण सुरु

0

Loading

चोपडा (प्रतिनिधी – मनीष महाजन भाई कोतवाल रोड Mo 97661 43638 )- तालुक्यात उन्हाळ्याच्या वाढत्या तडाख्याबरोबरच पावसाळ्याच्या आगमनाची चाहूल लागण्यापूर्वी विविध आजारांचा धोका टाळण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून दिनांक १ एप्रिल २०२५ पासून चोपडा तालुक्यातील ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याच्या मुख्य स्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षणाची मोहीम जोरात राबवली जात आहे. ही मोहीम जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांच्या आदेशानुसार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन सुशीर आणि डॉ. अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. यामध्ये चोपडा तालुक्यातील प्रत्येक गावातील जलस्रोत, पाण्याच्या टाक्या, पाईपलाइन आणि झरे यांचे काटेकोरपणे निरीक्षण करून त्यांच्या स्वच्छतेची खात्री केली जात आहे.
या सर्वेक्षण मोहिमेचा उद्देश म्हणजे येणाऱ्या मान्सून कालावधीत पाणीजन्य आजारांपासून नागरिकांचे संरक्षण करणे, सुरक्षित आणि स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे, तसेच ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचा दर्जा उंचावणे हा आहे. गावोगावी स्थानिक आरोग्य उपकेंद्रातील आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक, समुदाय आरोग्य अधिकारी तसेच जलसुरक्षके यांच्या समन्वयाने ही मोहीम अंमलात आणली जात आहे.
९ एप्रिल २०२५ रोजी बुधवारच्या दिवशी आदर्श गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वडगाव बु. (ता. चोपडा) येथील उपकेंद्रात विशेष पाहणी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आरोग्य सहाय्यक वाय.आर. पाटील आणि राहुल नेहरकर यांनी गावाला भेट देत उपकेंद्राचे दप्तर, रजिस्टर व विविध आरोग्यसंबंधी नोंदी तपासून पाहिल्या. त्यांच्यासमवेत समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. भूषण देशमुख व आरोग्य सेवक विजय देशमुख उपस्थित होते.
या दौऱ्यात वडगाव बु. ग्रामपंचायत हद्दीतून होणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या प्रमुख स्रोतांची पाहणी करण्यात आली. यामध्ये गावातील पाण्याच्या टाकीची साफसफाई, तिचा नियमित स्वच्छतेचा दर्जा, पाईपलाइनमधील गळती, व्हॉल्वची कार्यक्षमता यांची बारकाईने पाहणी करण्यात आली. या पाहणीत पाण्याच्या टाकीचा परिसर स्वच्छ असून व्हॉल्व व पाईपमध्ये कोणतीही गळती नसल्याचे निरीक्षण नोंदवले गेले. पाणीपुरवठा कर्मचारी भगवान पाटील यांच्याकडून टाकी नियमित स्वच्छ केली जात असल्याची माहिती घेण्यात आली.
पिण्याच्या पाण्याच्या शुद्धतेसाठी आवश्यक असलेली TCL पावडर (टेट्राक्लोरोइझोसायन्युरेट) पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याचे पाहणीत स्पष्ट झाले. शिवाय पावडरची साठवणूकही योग्यरित्या हवा बंद बरणीत, स्वच्छ आणि कोरड्या जागेत केली जात असल्याचे आढळले. ही बाब अत्यंत महत्वाची असून अशा पद्धतीने रसायन साठविल्यास त्याचा दर्जा टिकून राहतो आणि पाणी निर्जंतुक करण्यात यश येते.
या मोहिमेअंतर्गत गावात चालणाऱ्या जलस्रोत स्वच्छता सर्वेक्षणाची संपूर्ण माहिती आरोग्य सहाय्यक वाय.आर. पाटील व राहुल नेहरकर यांनी शेरा पुस्तकात नमूद केली. उपकेंद्राचा स्वच्छ परिसर, व्यवस्थित व्यवस्थापन व शिस्तबद्ध नोंदी पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. त्यांच्या दौऱ्यामुळे गावातील ग्रामस्थांमध्येही एक सकारात्मक संदेश पोहोचला असून, स्वच्छता आणि आरोग्याच्या बाबतीत जागरूकता वाढीस लागली आहे.
गावपातळीवरील जलसुरक्षक, आरोग्य कर्मचारी, ग्रामपंचायत पदाधिकारी यांचा या मोहिमेमध्ये मोलाचा सहभाग दिसून येतो आहे. जलस्रोत स्वच्छ ठेवण्यासाठी ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यात येत असून, पिण्याचे पाणी उकळूनच वापरण्याचे, टाकी दर आठवड्याला धुण्याचे, पाईपलाइनमधील गळती तातडीने दुरुस्त करण्याचे आणि पाणवठ्याजवळ कचरा टाकू नये अशा सूचना वारंवार दिल्या जात आहेत.
चोपडा तालुक्यातील ही मोहीम म्हणजे केवळ एक सरकारी योजना नसून, ती एक जनआंदोलनाचे रूप घेऊ पाहत आहे. स्थानिक आरोग्य केंद्र, आरोग्य अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थ यांचा एकत्रित सहभाग ही या मोहिमेची खरी ताकद आहे. ग्रामीण भागात पावसाळ्याच्या तोंडावर अशा प्रकारे आरोग्यविषयक उपाययोजना राबविल्या गेल्यास भविष्यात उद्भवू शकणाऱ्या साथीच्या आजारांचा धोका नक्कीच कमी होऊ शकतो.
डॉ. सचिन भायेकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा आरोग्य यंत्रणा कार्यरत असताना चोपडा तालुक्यातील आरोग्य सेवक, सहाय्यक, समुदाय आरोग्य अधिकारी, जलसुरक्षक हे आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत आहेत. त्यांच्या कार्यपद्धतीत नियमितता, शिस्त आणि सामाजिक बांधिलकीचा भक्कम पायाच दिसून येतो.
या मोहिमेमुळे गावागावातील जलस्त्रोत स्वच्छ, सुरक्षित व नागरिकांच्या आरोग्यास पोषक राहतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. या उपक्रमाची अंमलबजावणी सातत्याने, पारदर्शक पद्धतीने आणि सहभागात्मक रितीने होत असल्यामुळे ही मोहीम यशस्वी होईल यात शंका नाही.
पावसाळ्यापूर्वी अशा प्रकारे पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे सर्वेक्षण होणे ही आरोग्यदृष्ट्या अत्यंत महत्वाची बाब आहे. आजार होण्याऐवजी त्यापासून संरक्षण करणे ही शाश्वत आरोग्य व्यवस्था निर्माण करण्याची दिशा असते. चोपडा तालुक्यात सुरु असलेल्या या सर्वेक्षण मोहिमेच्या माध्यमातून भविष्यातील आरोग्यविषयक संकटांना आधीच तोंड देण्याची तयारी सुरु झाली आहे.या उपक्रमात सहभागी असलेल्या प्रत्येक आरोग्य कर्मचाऱ्यांचे योगदान लक्षणीय असून, त्यांच्या कार्यातून संपूर्ण तालुक्यात आरोग्यविषयक चांगले परिवर्तन घडू शकते. मान्सूनपूर्व काळात राबवली जाणारी ही मोहीम म्हणजे जनतेच्या आरोग्याची पूर्वतयारी, आणि हीच योजना आरोग्यदृष्टीने ग्रामीण महाराष्ट्रासाठी एक आदर्श ठरावी, अशीच सर्वांची अपेक्षा आहे.

झुंज वृत्तपत्र व ध्येय न्यूजवर बातमी प्रसिद्धीसाठी संपर्क साधा – (प्रतिनिधी – मनीष महाजन भाई कोतवाल रोड          Mo 97661 43638 )

सार्वजनिक धार्मिक कार्यक्रम आणि राष्ट्रपुरुषांच्या जयंत्यांचा पारदर्शक हिशोब देणं: नैतिकतेचं खरं रूप

0

Loading

आजच्या काळात राष्ट्रपुरुषांच्या जयंत्या, धार्मिक उत्सव, सामाजिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात, ढोलताशांच्या गजरात, रोषणाईने उजळून निघालेल्या रस्त्यांवर साजरे होताना आपण पाहतो. प्रत्येक गल्ली, प्रत्येक चौकात, मोठमोठ्या मंडपांमध्ये, रंगीबेरंगी पताका आणि हारांनी सजवलेल्या व्यासपीठांवर विविध मान्यवरांच्या उपस्थितीत भाषणे होतात, सांस्कृतिक कार्यक्रम रंगतात. राष्ट्रपुरुषांच्या विचारांचा गौरव केला जातो. धार्मिकतेचा रंग अधिक गडद होतो. भक्तिभाव, श्रद्धा, निष्ठा आणि सामाजिक एकोपा याचे दर्शन घडते. मात्र या सगळ्या उत्सवांमागे आर्थिक खर्चाची जी भलीमोठी रचना असते, तिचा पारदर्शक हिशोब लोकांसमोर येतो का? आणि जर येत नसेल, तर ही खरेच आपल्या नैतिकतेची उपेक्षा नाही का? जवाबदारी म्हणजे केवळ कार्यक्रम साजरे करणे & स्वतःचा फोटो मोठा करून लावणे नव्हे, तर जनतेपुढे पारदर्शकपणे उत्तरदायी राहणे देखील होय. विशेषतः जेव्हा आपण सार्वजनिक जागेत, समाजाच्या सहभागातून, जनतेच्या निधीतून, अथवा देणगीदारांच्या योगदानातून एखादा कार्यक्रम आयोजित करतो, तेव्हा त्याचा प्रत्येक पैशाचा हिशोब देणे हे आयोजकांचे नैतिक कर्तव्य असते. आज मात्र अनेकदा असे आढळते की, राष्ट्रपुरुषांच्या जयंत्या असोत की धार्मिक उत्सव, ते केवळ सामाजिक प्रतिष्ठेचे, राजकीय वजनाचे, वा सामाजिकीकरणाच्या दर्शनी लक्षणाचे साधन बनले आहेत. सर्वसामान्यपणे पाहता, एखादा मध्यम आकाराचा सार्वजनिक उत्सव साजरा करायला किमान ५० हजार ते लाखो रुपये खर्च होतो. यात मंडप भाड्याने घेणे, व्यासपीठ सजावट, बँड, डीजे, लाईट्स, फलक, प्रसाद, भोजन व्यवस्था, वक्त्यांना मानधन, पोलीस परवानगी, जेनरेटर, पाण्याची व्यवस्था, बॅनर आणि जाहिरात यांचा समावेश होतो. अनेकदा काही खर्च रोखीने होतात तर काही थेट देणग्यांद्वारे भागवले जातात. मात्र, हे सगळे झाल्यावर त्या देणग्यांचा आणि खर्चाचा हिशोब किती जणांच्या माहितीत येतो? आपण सरकारी कार्यालयांवर, नेत्यांवर, संस्था चालकांवर सतत पारदर्शकतेची अपेक्षा ठेवतो, त्यांचा हिशोब मागतो. मग सामान्य लोकांनी आयोजित केलेल्या उत्सवांमध्ये पारदर्शकतेचा अभाव का? आज विविध धर्माचे धार्मिक कार्यक्रम व राष्ट्रपुरुषांच्या जयंत्या साजऱ्या होतात. त्या निमित्ताने समाज एकत्र येतो. अनेक जण देणगी देतात. काही जण वेळ, श्रम, साहित्य देतात. अशा वेळी त्या खर्चाचा आणि जमा निधीचा हिशोब समाजासमोर यायला हवा, कारण हा कार्यक्रम केवळ आयोजकांसाठी स्वतःची घरभरणी आणि दारूच्या पार्टी करणे यासाठी नसून संपूर्ण समाजासाठी असतो. हिशोब लपवणे म्हणजे समाजाच्या विश्वासाला तडा देणे. हा नैतिक भ्रष्टाचार ठरतो. आज अनेक ठिकाणी असे दिसते की, जयंत्यांचे आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करणाऱ्या मंडळांचे बॅनरवर आपली नावे व फोटो मोठ मोठे छापलेली असतात. जसे काही त्यांचं स्वतःचं प्रमोशन झालेले असते. काही मतलबी मात्र याचा पुरेपुर राजकीय फायद्यासाठी याचा वापर करतात. मात्र त्या मंडळाचा आर्थिक हिशोब विचारला की, गोंधळ उडतो. काही दिवस भुमिगत असतात विचारलं तर “सगळं तर व्यवस्थित झालं ना?” असं उत्तर दिलं जातं. पण प्रश्न हा आहे की, कार्यक्रम नीट होणं हेच उद्दिष्ट नसून त्यामागचा पारदर्शक हेतू आणि विश्वास हाच समाजासाठी महत्त्वाचा आहे. पारदर्शक हिशोब मांडण्याची परंपरा तयार झाली तर समाजात कोणताही गैरसमज किंवा संशय निर्माण होणार नाही. कोणत्याही ।व्यक्तीला वाटणार नाही की, “माझी देणगी कुठे गेली?”, “खरंच इतकाच खर्च झाला का?”, “या कार्यक्रमामागे कोणाचा व्यक्तिगत फायदा झाला का?” हिशोब दिल्यामुळे विश्वास वाढतो, लोकांचा सहभागही वाढतो, आणि कार्यक्रम अधिक प्रभावी होतो. जाहीर हिशोब म्हणजे केवळ आर्थिक माहिती मांडणे नव्हे. तो एक प्रकारचा आत्मपरीक्षणाचा आरसा असतो. आपण कोणत्या बाबतीत खर्च केला, कुठे वाचवता आलं असतं, कुणाचं योगदान मोठं होतं, हे सगळं लोकांसमोर आल्यावर समाजात आदरभाव निर्माण होतो. काही वेळा सामाजिक हिशोबाच्या वेळी दानशूर लोकांचे कौतुक होते. तर काही वेळा चुका स्पष्ट होतात. पण या दोन्ही गोष्टी भविष्यातील कार्यक्रमांची गुणवत्ता वाढवतात. कोणताही उत्सव संपल्यानंतर त्याचं हिशोबपत्रक व्हॉट्सॲप ग्रुप, बॅनर, पम्फ्लेट किंवा समाजमाध्यमांवरून प्रसिद्ध करता येऊ शकतं. यात एकत्रित निधी, देणग्या, खर्चाची यादी, आणि शिल्लक असे तपशील असावेत. यामध्ये प्रत्येक देणगीदाराचे नाव व रक्कम नमूद असावी. खर्चाच्या बाबतीत सर्व प्रमुख बाबी नमूद करून त्याचे बिल किंवा पुरावे दाखवले जावेत. हे करताना कुठलाही अहंकार, घमेंड न ठेवता, समाजाच्या विश्वासाचा आदर ठेवून काम केले पाहिजे. अनेकदा असे दिसून येते की, काही कार्यक्रमांमध्ये राजकीय पुढारी आपली सत्ता सिद्ध करण्यासाठी मोठ्या देणग्या देतात, त्याच्या बदल्यात व्यासपीठावरचे प्रमुख स्थान, बॅनरवरील मोठा फोटो, आणि समाजावर एकप्रकारचे वर्चस्व गाजवतात. यामध्ये मग सामाजिक हेतू दुय्यम ठरतो आणि आर्थिक अपारदर्शकता वाढते. अशावेळी निष्पक्ष आणि सामाजिक हेतू असलेली मंडळी बाजूला पडतात. म्हणूनच हिशोब ही एक सशक्त शस्त्र असते, जी या सगळ्या अपप्रवृत्तींचा नायनाट करू शकते. जर आजपासून आपण कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमानंतर हिशोब देण्याची परंपरा घडवू, तर पुढील पिढीला नैतिकतेचा योग्य आदर्श मिळेल. ते कार्यक्रम केवळ ढोलताशांचे नसतील, तर मूल्यांचे आणि पारदर्शकतेचे असतील. यातून युवकांमध्ये सामाजिक जबाबदारी, नियोजन, व्यवस्थापन आणि प्रामाणिकपणाचे बीज रोवले जाईल. याच पार्श्वभूमीवर असेही काही लोक बघायला मिळालेले आहेत किंवा आजही पाहायला मिळतात की, जे स्वतः महापुरुषांच्या जयंत्यांमध्ये अधिकाऱ्यांकडून पावती न देता वेगळा पैसा घेतात, पण तो कधीच समाजासमोर मांडत नाहीत. मात्र जेव्हा इतर कार्यक्रम असतात, तेव्हा मात्र हेच लोक खाली बसून किंवा एकतर त्यांची स्टेजवर बसायची लायकी नसते म्हणुन नेत्याच्या गाडीखालचे बनुन बिनबुलाए महेमान होतात आणि वक्त्याला व नेत्याला भाषण करतांना प्रॉम्टींग करताना दिसतात. यावरून हे स्पष्ट होते की अशा लोकांचा हेतू सामाजिक नैतिकता नसून आपली प्रतिमा, आपली लायकी जपणे हाच असतो. अशा खोट्या प्रतिष्ठेवर आधारलेल्या वृत्ती समाजाला दिशाभूल करतात ज्या महापुरुष यांनी आपले जीवन समाजासाठी दिले. त्यांची जयंती आपण साजरी करतो, त्यांच्या विचारांचे स्मरण करतो. पण खरोखर त्यांच्या विचारांप्रमाणे वागायचं असेल, तर त्यांच्या कार्याचे स्मरण करताना आपण प्रामाणिक, जबाबदार, आणि पारदर्शक वागलो पाहिजे. त्यामुळे कोणताही सार्वजनिक कार्यक्रम असो, धार्मिक उत्सव असो, राष्ट्रपुरुषांची जयंती असो – त्यासाठी खर्च झालेल्या निधीचा चोख हिशोब जनतेसमोर मांडणे हीच खरी समाजसेवा आणि नैतिकता होय. समाजात विश्वास निर्माण करायचा असेल & पुन्हा अध्यक्ष पद भुषवायचं असेल तर पारदर्शकतेला पर्याय नाही. हा संदेश घेऊन आपण सर्वांनी सार्वजनिक कार्यक्रम साजरे करताना जबाबदारी आणि नैतिकतेची जोपासना केली पाहिजे. तरच समाज खऱ्या अर्थाने प्रगल्भ, स्वावलंबी आणि जागरूक बनेल.

३५० वर्षांची परंपरा लाभलेल्या श्रीराम रथोत्सवात भक्तांचा महासागर; अघोरी नृत्य पथकाचे आकर्षण ठरले

0

Loading

पाचोरा ( उपसंपादक- धनराज पाटील MO.9922614917 & जावेद शेख , पाचोरा ) श्रीराम जन्मोत्सवाच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रीराम मंदिर रथोत्सव मोठ्या भक्तिभावात, उत्साहात आणि पारंपरिक थाटात साजरा करण्यात आला. या प्रसंगी सोनजे परीवाराच्या सदस्यांच्या हस्ते श्रीरामांचे विधीवत पूजन करण्यात आले. पूजनाच्या वेळी संपूर्ण परिसर “जय श्रीराम” च्या गजराने निनादला होता. संपूर्ण वातावरण भक्तिमय बनले होते. हजारो नागरिकांनी रथोत्सवात सहभाग घेऊन पारंपरिकतेची शान टिकवून ठेवली.पूजन समारंभानंतर श्रीरामाच्या रथाचे पूजन आणि महाआरती ही वंचित समाजातील पाच जोडप्यांच्या हस्ते करण्यात आली. याशिवाय इतर अनेक श्रद्धावान जोडप्यांनीही महाआरतीत भाग घेतला. समतेचा संदेश देत विविध सामाजिक स्तरातील लोकांनी रथाला दोर बांधून ओढण्याचा मान मिळवला. ही परंपरा केवळ धार्मिक श्रद्धेचीच नव्हे तर सामाजिक ऐक्याची प्रतीक मानली जाते.या भव्य रथोत्सवासाठी श्रीराम मंदिर रथोत्सव समितीमार्फत नियोजनपूर्वक बैठक घेण्यात आली होती. गेल्या अनेक दशकांपासून सातत्याने हा सोहळा दरवर्षी भक्तिभावात पार पडतो. यंदाच्या आयोजनातही त्या परंपरेची शान टिकवून ठेवण्यात आली. या रथोत्सवाला तब्बल ३५० वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेली आहे. या ऐतिहासिक परंपरेला साजेसे असे भव्य आणि दिव्य आयोजन यंदाही अनुभवायला मिळाले.मिरवणुकीत दिल्ली येथून आलेल्या अघोरी नृत्य पथकाने महादेव व इतर साधूंना सजीव रूपात साकारत पारंपरिक नृत्य सादर केले. यातील त्यांच्या विशिष्ट वेषभूषा, नृत्यशैली आणि देवतांचे सजीव देखावे हे नागरिकांसाठी विशेष आकर्षण ठरले. मिरवणुकीत अशा प्रकारचे धार्मिक आणि सांस्कृतिक सादरीकरण हा भक्तीचा आणि कलात्मकतेचा संगम होता.रथोत्सव मिरवणुकीला बाजारपेठेतील आझाद चौक येथून सुरुवात करण्यात आली. त्यानंतर मिरवणूक खोल गल्ली, जागृती चौक, काकासट चौक, वाचनालय गल्ली असा मार्ग कापत पुन्हा श्रीराम मंदिरात परतली. संपूर्ण मार्गावर रथाचे स्वागत करण्यासाठी नागरिकांनी पारंपरिक वेशभूषा, टाळ मृदुंगाचे गजर, पताका आणि फुलांची आरास केली होती. घराघरांतून भक्तजन रथाला ओवाळत होते, रांगोळ्या घालत होते. प्रत्येक चौकात रथ थांबवून महाआरती करण्यात आली. अशा रीतीने रथोत्सवात एकात्मतेचा, धार्मिकतेचा आणि लोकसंघटनाचा भव्य अविष्कार दिसून आला.या मिरवणुकीत तरुण मंडळी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहानग्यांनी उत्साहाने भाग घेतला. रथ ओढताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, उत्सुकता आणि भक्तिभाव पाहण्यासारखा होता. रथाला मोगऱ्याच्या फुलांची सुगंधित सजावट करण्यात आली होती. नागरीकांनी, विशेषतः तरुणांनी परंपरेनुसार परिश्रम घेत रथाला ओढले. ही परंपरा जपताना, त्यांनी सामाजिक एकोप्याचे दर्शन घडवले. श्रीराम मंदिरातील राम जन्मोत्सव साजरा करण्याची जबाबदारी कै. बापू शंकर वाणी यांच्या परिवाराकडे पूर्वापार चालत आलेली आहे. त्यांच्या परिवाराने याही वर्षी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने, भक्तिभावाने आणि सेवाभावाने सर्व कार्यक्रमांचे आयोजन केले. स्थानिक नागरिकांसह दूरदूरहून आलेल्या भाविकांनी त्यांच्या सेवाभावाचे कौतुक केले.या रथोत्सवाच्या निमित्ताने अनेक मान्यवरांची उपस्थिती नोंदवली गेली. यामध्ये सर्वपक्षीय पदाधिकारी, विविध संघटनांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते यांचा समावेश होता. याशिवाय नगरपरिषद, पोलीस प्रशासन आणि स्वयंसेवी संस्था यांनी रथोत्सवाच्या यशस्वी आयोजनात मोलाचे सहकार्य केले. यामुळे कोणतीही अनुचित घटना न घडता सर्व कार्यक्रम शांततेत पार पडले.यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मस्के आणि पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे यांनी पोलीस बंदोबस्ताची जबाबदारी सक्षमपणे पार पाडली. पोलीस कर्मचारी प्रत्येक चौकात तैनात होते. गर्दीच्या नियोजनासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या होत्या. नागरीकांनीही शिस्तबद्ध वर्तन करून प्रशासनास सहकार्य केले. त्यामुळे रथोत्सव निर्विघ्न पार पडला.नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रविंद्र लांडे हे देखील उपस्थित होते. त्यांनी मंदिर परीसरातील स्वच्छतेची विशेष काळजी घेतली होती. रस्ते धुतले गेले होते, ठिकठिकाणी पाण्याची व्यवस्था, प्राथमिक वैद्यकीय मदत केंद्रे उभारण्यात आली होती. यामुळे भाविकांना कोणतीही अडचण जाणवली नाही.रथोत्सव समितीचे कार्यकर्ते संपूर्ण दिवसभर सेवाभावाने कार्यरत होते. गर्दी नियंत्रण, मार्गदर्शन, महाप्रसाद वितरण, धार्मिक विधींचे आयोजन, स्वच्छता आणि आरास या सर्व कामांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. अनेक स्वयंसेवकांनी रथाच्या मार्गावर फुलांची उधळण, अत्तर फवारणी आणि प्रसाद वाटपाचे काम केले.रथोत्सवात सहभागी होणाऱ्या भाविकांसाठी विविध मंडळांनी जलपान केंद्रे, फळवाटप, शरबत वाटप यांचीही व्यवस्था केली होती. रथोत्सवाच्या मार्गावर पारंपरिक वाद्यवृंद, भजन मंडळे, लेझीम पथक आणि कीर्तनकारांच्या सहभागाने वातावरण अधिकच भक्तिमय झाले होते. काही ठिकाणी स्थानिक कलावंतांनी पारंपरिक लोकनृत्ये सादर करून रथोत्सवाला वेगळाच रंग दिला.रथोत्सवात सहभागी झालेल्या लोकांनी सोशल मीडियावरून थेट प्रक्षेपण केल्यामुळे देशविदेशातील श्रीराम भक्तांनीही या उत्सवाचा आनंद घरबसल्या घेतला. यामुळे रथोत्सवाला एक वेगळे जागतिक स्वरूप प्राप्त झाले आहे. अनेकांनी या परंपरेचा जागतिक वारसा म्हणून गौरव केला.अशा रीतीने ३५० वर्षांची परंपरा लाभलेला श्रीराम मंदिर रथोत्सव यंदाही भक्तिभावाने, नियोजनपूर्वक आणि सामाजिक एकतेचा संदेश देत पार पडला. धार्मिकतेबरोबरच सांस्कृतिक आणि सामाजिक अंगाने समृद्ध अशा या रथोत्सवाचा लौकिक दरवर्षी वाढत आहे. भविष्यातही ही परंपरा अशाच उत्साहाने आणि भक्तिभावाने जपली जाईल, असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला.

प्रियांश आर्यचे आक्रमक शतक; चेन्नई सुपर किंग्जचा पराभवाचा चौकार

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयपीएल-२०२५ मध्ये पंजाब किंग्जने त्यांच्या घरच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्जचा १८ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने युवा फलंदाज प्रियांश आर्यच्या झंझावाती शतकाच्या जोरावर सहा विकेट्स गमावून २१९ धावा केल्या. प्रत्युत्तरात, चेन्नईने पूर्ण षटके खेळल्यानंतर पाच विकेट गमावून २०१ धावा केल्या. या हंगामात पंजाबचा घरच्या मैदानावर हा पहिला विजय आहे तर चेन्नईचा सलग चौथा पराभव आहे. 
प्रियांशने ४२ चेंडूंत सात चौकार आणि नऊ षटकारांसह १०३ धावांची खेळी केली. त्याने ३९ चेंडूत शतक पूर्ण केले जे आयपीएलमधील पंजाबसाठी दुसरे सर्वात जलद शतक आहे. त्याच्यानंतर शशांक सिंगने ३६ चेंडूत नाबाद ५२ धावा केल्या. त्याच्या खेळीत त्याने तीन चौकार आणि दोन षटकार मारले.
चेन्नईला जलद सुरुवात हवी होती आणि त्यांनी ती मिळवली. रचिन रवींद्र आणि कॉनवे यांनी पहिल्या विकेटसाठी ६१ धावांची भागीदारी केली. सातव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर मॅक्सवेलने रचिन रवींद्रला बाद केले. त्याने २३ चेंडूत सहा चौकारांसह ३६ धावा केल्या. कर्णधार ऋतुराज गायकवाड फक्त एक धाव करू शकला.
चेन्नईला शिवम दुबे आणि कॉनवे यांनी भागीदारीची आवश्यकता होती. दोघांनीही संघाची धावसंख्या १०० च्या पुढे नेली आणि वेगाने धावा काढण्यास सुरुवात केली. दोघांनीही ८९ धावांची भागीदारी केली. १५ व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर दुबेला बाद करून फर्ग्युसनने पंजाबला सामन्यात परत आणले.
त्यानंतर धोनी आला ज्याच्याकडून जलद धावा अपेक्षित होत्या. दरम्यान, १८ व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर चेन्नईने कॉनवेला रिटायर आउट केले. शेवटच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर धोनीही बाद झाला. आणि यासोबतच, चेन्नईच्या विजयाच्या आशाही भंगल्या. 
तत्पूर्वी, पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रियांशने येताच वादळ निर्माण केले आणि पहिल्याच षटकात १६ धावा केल्या. दुसरा सलामीवीर फलंदाज प्रभसिमरन सिंगला मुकेश चौधरीने त्याचे खातेही उघडू दिले नाही. कर्णधार अय्यरला काही खास करता आले नाही आणि तो नऊ धावा काढून खलीलचा बळी ठरला. खलीलने मार्कस स्टोइनिसलाही तंबूचा रस्ता दाखवला.
गेल्या सामन्यात अर्धशतक झळकावणारा नेहल वधेराला अश्विनच्या चेंडूवर धोनीने यष्टीचीत केले. त्याला फक्त नऊ धावा करता आल्या. अश्विनने मॅक्सवेलला त्याच्याच चेंडूवर झेल देऊन पंजाबला पाचवा धक्का दिला. दरम्यान, शतक पूर्ण करणारा प्रियांश सतत धावा करत होता. १४ व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर नूर अहमदने प्रियांशला बाद केले.
प्रियांशच्या जाण्यानंतर शशांक सिंग आणि मार्को जानसेन यांनी जलद धावा काढल्या. दोघांनीही मोठे फटके मारले. शशांकने ३६ चेंडूत ५२ धावा केल्या. त्याच्या खेळीत त्याने दोन चौकार आणि तीन षटकार मारले. जानसेनने १९ चेंडूत दोन चौकार आणि दोन षटकारांसह ३४ धावांची नाबाद खेळी केली.

सामाजिक जाणिवेचा दीप उजळणारा आगळावेगळा वाढदिवस – आर.पी.आय. आहिल्यानगर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र भाऊ थोरत यांची विधायक प्रेरणा

0

Loading

देवळाली प्रवरा, ता. श्रीरामपूर – राजकारण, समाजकारण आणि अध्यात्म या त्रिसूत्रीच्या माध्यमातून नव्या पिढीला प्रेरणा देणारा एक आगळावेगळा वाढदिवस नुकताच साजरा झाला. रिपब्लिकन पक्ष ऑफ इंडिया (आठवले गट) चे आहिल्यानगर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र भाऊ थोरत यांनी २ एप्रिल २०२५ रोजी देवळाली प्रवरा येथे आपला वाढदिवस अत्यंत विधायक आणि लोकहितवादी उपक्रमांच्या साक्षीने साजरा केला.
सामान्यतः वाढदिवस म्हटला की केक, पार्टी, सेल्फी आणि गोंगाट यांचा डामडौल डोळ्यासमोर येतो. पण सुरेंद्र भाऊ थोरत यांनी या पारंपरिक चौकटीबाहेर जाऊन एक उदाहरण घालून दिलं आहे – असा वाढदिवस साजरा करा, जो समाजाला दिशा देईल, गरजूंना आधार देईल आणि तरुणाईला मार्गदर्शन करेल.
या दिवशी सकाळपासूनच विविध उपक्रमांना सुरुवात झाली. रक्तदान शिबिराचे आयोजन करून शेकडो युवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. “रक्तदान हेच जीवनदान” या मंत्राला अनुसरून एक सामाजिक बांधिलकी साकार झाली. यासोबतच मोफत मोतीबिंदू तपासणी व उपचार शिबिर देखील आयोजित करण्यात आले. अनेक ज्येष्ठ नागरिकांनी या सेवेमुळे नवदृष्टी अनुभवली.
शालेय विद्यार्थ्यांसाठी वह्यांचे वाटप आणि मोफत चष्मे वितरण या उपक्रमांनी शिक्षणाच्या प्रकाशात भर घातली. गरजू आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळाल्यामुळे त्यांच्या शिक्षणातील अडथळे दूर झाले. या छोट्या पण महत्त्वाच्या उपक्रमांमधून सामाजिक समरसतेचा संदेश दिला गेला.
या सामाजिक सोहळ्याच्या निमित्ताने जिल्ह्याच्या विविध तालुक्यांतील आर.पी.आय.चे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीरामपूर, राहुरी, नेवासा, राहाता, कोपरगाव, शेवगाव, पाथर्डी, तसेच आहिल्यानगर येथील कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावून एकतेचे दर्शन घडवले. कार्यक्रमाच्या नियोजनात मझोन काळे (आहिल्यानगर जिल्हा सरचिटणीस, आर.पी.आय.), नंदकुमार बगाडे पाटील (आहिल्यानगर प्रतिनिधी), सामाजिक कार्यकर्ते मोहन भाऊ आव्हाड, आमित काळे, तसेच मझोन भाऊ काळे मित्रमंडळ, रमानगर यांचा मोलाचा सहभाग होता.
या दिवशीचा प्रमुख अध्यात्मिक भाग म्हणजे रात्री ९ वाजता पार पडलेला भव्य किर्तन सोहळा. महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेल्या कि.ह.भ.प. शालिनीताई निवृत्ती महाराज यांचे कीर्तन झाले. त्यांच्या ओघवत्या वाणीने, भक्तीरसाने आणि संतांच्या विचारांनी संपूर्ण सभागृह भारावून गेले.
आपल्या प्रवचनात शालिनीताई म्हणाल्या, “युवकांनी संतांचे विचार आत्मसात करावेत. संत तुकाराम, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत चोखामेळा, संत एकनाथ, संत सावता, संत निळोबाराय, संत शेख महंमद, संत रामदास महाराज यांसारख्या थोर विभूतींनी समाजाला दिशा दिली. त्यांच्या आचारधर्मावर चालणं हीच खरी प्रगती आहे.”
त्यांनी युवकांना आवाहन करत सांगितलं, “मोबाईल, व्यसन, आळस यापासून दूर राहा. आईवडिलांची सेवा करा. गुरूजनांचा आदर करा. शिक्षण घेऊन समाजासाठी कार्य करा. वाढदिवस साजरे करा, पण त्यातून समाजाचा विचारही करा.”
यावेळी उपस्थित सर्वांनी संपूर्ण कार्यक्रमाला मनःपूर्वक प्रतिसाद दिला. त्यानंतर सुरेंद्र भाऊ थोरत यांचा विशेष सत्कार करण्यात आला. मझोन काळे, नंदकुमार बगाडे पाटील, मोहन भाऊ आव्हाड, आमित काळे आणि मझोन भाऊ काळे मित्रमंडळ, रमानगर यांच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
आपल्या मनोगतात सुरेंद्र भाऊ थोरत म्हणाले, “माझा वाढदिवस म्हणजे लोकसेवेचे निमित्त. सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून मी माझे जन्मदिवस साजरे करतो. समाजातील गरजूंसाठी काहीतरी करता आलं, तर त्याचं समाधान अमूल्य असतं. आजची तरुणाई जर सामाजिक कार्यात उतरली, तर खऱ्या अर्थाने परिवर्तन घडू शकतं.”
या कार्यक्रमाला आर.पी.आय.च्या कार्यकर्त्यांबरोबरच स्थानिक ग्रामस्थ, युवक आणि महिला वर्गाने मोठा प्रतिसाद दिला. स्वयंस्फूर्तीने अनेकांनी कार्यक्रमात सेवाभावाने सहभाग घेतला. सर्व कार्यक्रम अत्यंत नेटकेपणाने व शिस्तीत पार पडले. परिसरात उत्सवाचे आणि भक्तीभावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या आगळ्यावेगळ्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुरेंद्र भाऊ थोरत यांनी जो आदर्श समाजासमोर ठेवला, तो निश्चितच अनुकरणीय आहे. वाढदिवस हे केवळ वैयक्तिक समाधानाचे क्षण नसून, ते समाजहितासाठी व लोकसेवेच्या नव्या संकल्पासाठी वापरले गेले पाहिजेत, हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले.
संतांच्या विचारांचा अंगीकार, गरजूंसाठी उपक्रम, विद्यार्थ्यांसाठी साहित्यवाटप, वयोवृद्धांसाठी आरोग्यसेवा, आणि अध्यात्मिक प्रबोधन अशा सर्व घटकांचा संगम असलेला हा वाढदिवस केवळ एक दिवसापुरता मर्यादित न राहता, अनेकांच्या आयुष्यात प्रेरणेचा दिवा उजळून गेला आहे.

रस्त्यावर साजरा झालेला प्रशांत येवले यांचा विश्वासाचा वाढदिवस

0

Loading

पाचोरा – लोकशाहीचा चौथा स्तंभ समजल्या जाणाऱ्या पत्रकारितेत आज अनेक तडजोडी झालेल्या दिसतात. मात्र अशा काळातही काही पत्रकार अशा तत्त्वांवर ठाम राहतात, जे केवळ लोकहितासाठीच कार्यरत असतात. ‘मी माझा न्यूज चॅनल’चे चिफब्युरो आणि ‘दैनिक पुण्य प्रताप’चे पाचोरा तालुका प्रतिनिधी प्रशांत येवले हे त्यापैकीच एक नाव. त्यांच्या वाढदिवसानिमित्त स्वखर्चाने भारुडभर्ती संबंधित पत्रकारांचे फोटो बॅनरवर न घेता पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अत्यंत साधेपणाने आणि सर्वसामान्य लोकांच्या सान्निध्यात वाढदिवस साजरा करण्यात आला. कोणताही डीजे, बॅनरबाजी किंवा मोठा खर्च न करता, केवळ स्नेह, आपुलकी आणि खऱ्या संबंधांच्या आधारे साजरा झालेला हा वाढदिवस खरंतर एका आदर्श पत्रकाराच्या जीवनमूल्यांचा उत्सव ठरला.
प्रशांत येवले यांनी ‘मी माझा न्यूज चॅनल’ आणि ‘दैनिक पुण्य प्रताप’च्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून प्रामाणिक आणि धाडसी पत्रकारितेचा वारसा जपला आहे. कोणत्याही राजकीय पक्षाच्या गुलामीत न झुकता, कोणत्याही गुन्हेगारी किंवा अवैध धंदेवाल्यांशी संबंध न ठेवता त्यांनी सत्य, सामाजिक न्याय आणि सामान्य जनतेच्या समस्या यांचा पाठपुरावा केला आहे. त्यांची पत्रकारिता ही खऱ्या अर्थाने लोकशाहीस बळकटी देणारी ठरली आहे.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून आलेले प्रशांत येवले यांनी कोणताही अनैतिक मार्ग स्वीकारला नाही. व्यसनांपासून दूर राहून, आपल्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडत, त्यांनी पत्रकारितेला एक सामाजिक सेवा म्हणून घेतले. त्यांनी कोणतीही पदे, मानपदं वा आर्थिक लाभ यांचा हव्यास केला नाही.किंबहुना पक्षकाराच्या शोधासाठी 25% चे आमीष देऊन पोलीस स्टेशनला दररोज चक्रा सुद्धा मारल्या नाही उलट केवळ आपल्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून ‘मी माझा न्यूज चॅनल’च्या माध्यमातून आणि ‘दैनिक पुण्य प्रताप’चे प्रतिनिधी म्हणून समाजाच्या प्रत्येक थरातील समस्या मांडल्या.
या वाढदिवसाला उपस्थित असलेले दत्ताआबा बोरसे, नंदु शेलकर, मिलिंद भाऊ सोनवणे, जावेद शेख, लक्ष्मण सूर्यवंशी, ध्येय न्युजचे पत्रकार धनराज मेघराज पाटील, राहुल महाजन, प्रवीण बोरसे, भुवनेश दुसाने, नरसिंह भुरे , निखिल मोरे आदी सहकारी व मित्रमंडळी यांनी प्रशांत येवले यांच्या कार्याची प्रशंसा करत, त्यांच्या आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे या कार्यक्रमात कोणताही ‘क्लबवाला’, बोगस पत्रकार, किंवा अवैध धंद्यातील व्यक्ती नव्हती. हेच या साधेपणाच्या कार्यक्रमाचं मोठं यश होतं.
प्रशांत येवले यांना पत्रकारितेतील प्रेरणा मिळाली ती नगरसेवक वासुआण्णा महाजन यांचे स्वीय सहाय्यक आणि अत्यंत विश्वासू पत्रकार मिलिंद भाऊ सोनवणे यांच्या विचारधारेतून. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत, त्यांनीही कधीही आपल्या मूल्यांपासून तडजोड केली नाही. स्वच्छ प्रतिमा, सुसंवादी आचारधर्म आणि प्रत्येक सामाजिक प्रश्नावर स्पष्ट भूमिका घेणे हीच त्यांची खरी ओळख बनली आहे.
‘मी माझा न्यूज चॅनल’चे चिफब्युरो आणि ‘दैनिक पुण्य प्रताप’चे पाचोरा तालुका प्रतिनिधी म्हणून त्यांनी केवळ बातम्या दिल्या नाहीत, तर त्या बातम्यांमागची खरी भावना समाजासमोर मांडली. त्यामुळेच त्यांचं नाव कोणत्याही खोट्या प्रचारात नव्हे, तर खऱ्या जनसेवेत झळकतं. त्यांच्या बातम्यांमध्ये कोणतीही पक्षपाती भूमिका नसते, त्यामुळे समाजातील सर्व स्तरांमध्ये त्यांच्या बातम्यांना प्रचंड विश्वास मिळतो.
प्रशांत येवले यांचं व्यक्तिमत्त्व हे कोणताही गवगवा न करता, शांतपणे आणि चिकाटीने काम करणाऱ्या कार्यकर्त्याचं आहे. त्यांनी कधीही कोणत्या कार्यक्रमासाठी पैसे जमा केले नाहीत कोणाच्या मागे लागले नाही कोणतंही प्रसिद्धीचं वलय मिळवण्यासाठी नाटक करणं केलं नाही. उलट, कुणी बोलावलं तरी अत्यंत नम्रपणे उपस्थित राहून, कार्यक्रमाच्या भावना समजून घेत, वस्तुनिष्ठ बातमी तयार करणं हेच त्यांचं कार्य राहिलं आहे.
त्यांच्या कार्यामुळेच आज पाचोरा तालुक्यात ‘मी माझा न्यूज चॅनल’ आणि ‘दैनिक पुण्य प्रताप’ यांचा लोकांमध्ये विशेष विश्वास आहे. हे माध्यम केवळ बातमी पोहोचवण्याचं साधन न राहता, जनतेच्या हक्कांचं शस्त्र ठरलं आहे – आणि हे शक्य झालं आहे प्रशांत येवले यांच्या अडथळ्यांवर मात करून केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज अनेक वरिष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते व सर्वसामान्य नागरिक वाणी समाजातील मान्यवर व्यक्तींनी त्यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे शुभेच्छा दिल्या. त्या शुभेच्छांमध्ये एकच सूर होता – “प्रशांतसारख्या पत्रकारांची गरज आज समाजाला अधिक आहे.” त्यांचा आदर्श बघून भुरट्या पत्रकारांनी आणि केवळ स्वार्थासाठी चॅनलचा वापर करणाऱ्यांनी सुद्धा आत्मपरीक्षण करावे, अशीही भावना अनेकांनी व्यक्त केली.
शेवटी एवढंच म्हणता येईल की, ‘मी माझा न्यूज चॅनल’चे चिफब्युरो आणि ‘दैनिक पुण्य प्रताप’चे पाचोरा तालुका प्रतिनिधी पत्रकार प्रशांत येवले यांचा हा वाढदिवस हा केवळ एक सामाजिक कार्यक्रम नव्हता, तर प्रामाणिक पत्रकारितेचा विजय सोहळा होता. त्यांच्या पुढील जीवनप्रवासाला यश, उत्तम आरोग्य, कुटुंबासह समाधान आणि जनसेवेची नवनवीन संधी लाभो, हीच प्रार्थना.

धावांच्या पावसात लखनौची जादू चालली, रोमहर्षक सामन्यात कोलकात्याचा चार धावांनी पराभव

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मिचेल मार्श आणि निकोलस पूरन यांच्या शानदार खेळीच्या जोरावर, लखनौ सुपर जायंट्सने मंगळवारी त्यांच्या घरच्या मैदानावर कोलकाता नाईट रायडर्सचा चार धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना लखनौने तीन विकेट गमावून २३८ धावा केल्या. खूप प्रयत्न करूनही, कोलकाता २० षटकांत सात गडी गमावून फक्त २३४ धावा करू शकला.
पूरनने ३६ चेंडूत ८७ धावांची नाबाद खेळी केली ज्यामध्ये त्याने सात चौकार आणि आठ षटकार मारले. मार्शने ४८ चेंडूंचा सामना केला आणि सहा चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने ८१ धावा केल्या. कोलकाताकडून कर्णधार अजिंक्य रहाणेने वादळी खेळी करत अर्धशतक झळकावले.
मोठ्या धावसंख्येचा सामना करताना, कोलकाताला जलद सुरुवातीची आवश्यकता होती आणि त्यांनी ती मिळवली. सुनील नरेन आणि क्विंटन डी कॉक यांच्या जोडीने पहिल्याच षटकापासून चमत्कार करण्यास सुरुवात केली. या जोडीने पहिल्या षटकात १६ धावा काढल्या. दुसऱ्या षटकात १५ धावा झाल्या. ही धोकादायक दिसणारी जोडी आकाशदीपने तोडली. त्याने डी कॉकला नऊ चेंडूत १५ धावांच्या पुढे जाऊ दिले नाही. डावखुऱ्या फलंदाजाने दोन षटकार मारले.
यानंतर, कर्णधार रहाणेने नरेनसह लखनौच्या गोलंदाजांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. सहा षटकांत कोलकाताची धावसंख्या एका विकेटच्या मोबदल्यात ९० धावा होती. सातव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर दिग्वेश राठीने नरेनचा डाव संपवला. नरेनने १३ चेंडूंचा सामना केला आणि चार चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ३० धावा केल्या.
कर्णधार रहाणेला पुन्हा एकदा उपकर्णधार व्यंकटेश अय्यरने साथ दिली. त्यांनी मिळून लखनौच्या गोलंदाजांवर दबाव आणला आणि भरपूर धावा केल्या. लखनौसाठी धोकादायक बनत चाललेली ही भागीदारी शार्दुल ठाकूरने मोडली. त्याने कर्णधार रहाणेला तंबूचा रस्ता दाखवला. ठाकूरच्या फुल-टॉस बॉलवर पूरनने कॅच घेतला. त्याने ३५ चेंडूत आठ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ६१ धावा केल्या.
येथून कोलकाताचा डाव डळमळीत झाला. रमणदीप सिंग (१), अंगकृष रघुवंशी (५), आंद्रे रसेल (७), वेंकटेश अय्यर (४५) बाद झाले आणि कोलकाता विजयापासून दूर राहिला. 
त्याआधी, मिचेल मार्शने आपल्या वादळी खेळीने लखनौसाठी मोठ्या धावसंख्येचा पाया रचला होता. त्याने एडेन मार्करमसोबत पहिल्या विकेटसाठी ९९ धावांची भागीदारी केली. मार्करामला अर्धशतक झळकावता आले नाही आणि २८ चेंडूत ४७ धावा काढल्यानंतर हर्षित राणाने त्याला बाद केले. त्याच्यानंतर आलेल्या पूरनने गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. दोघांनीही ७१ धावा जोडल्या. आंद्रे रसेलच्या चेंडूवर मार्श बाद झाला. मार्शने ४८ चेंडूत सहा चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने ८१ धावा केल्या.
मार्शच्या जाण्यानंतरही कोलकाताच्या गोलंदाजांना कोणताही दिलासा मिळाला नाही कारण पूरन चौकार आणि षटकारांचा वर्षाव करत होता. तो शतकाकडे वाटचाल करत असल्याचे दिसत होते पण शेवटच्या षटकांमध्ये त्याला स्ट्राईक मिळाला नाही आणि त्याचे शतक १३ धावांनी हुकले.

राजस्थान विजयी तर पंजाबचा घरच्या मैदानावर ५० धावांनी दारुण पराभव

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : घरच्या मैदानावर आयपीएलच्या १८ व्या हंगामातील पहिला सामना खेळणाऱ्या पंजाब किंग्जची विजयाची हॅटट्रिक हुकली. शनिवारी राजस्थान रॉयल्सने त्यांच्या घरच्या मैदान मुल्लापूरवर पंजाबचा ५० धावांनी पराभव केला. या हंगामात पंजाबचा हा पहिलाच पराभव आहे. याआधी पंजाबने दोन सामने खेळले होते आणि दोन्ही जिंकले होते. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने चार विकेट गमावून २०५ धावा केल्या. पूर्ण २० षटके खेळल्यानंतर पंजाबला नऊ विकेट गमावून फक्त १५५ धावा करता आल्या.
राजस्थानकडून यशस्वी जयस्वालने हंगामातील त्याचे पहिले अर्धशतक झळकावले. त्याने ४५ चेंडूत तीन चौकार आणि पाच षटकारांसह ६७ धावांची खेळी केली. रियान परागने नाबाद ४३ धावा केल्या. पंजाबकडून नेहल वधेराने अर्धशतक झळकावले. 
पंजाबला या मैदानावर कधीही साध्य न झालेल्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करावा लागला. प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग संघाला चांगली सुरुवात देतील अशी पूर्ण अपेक्षा होती. जोफ्रा आर्चरने पहिल्याच षटकात यजमान संघाच्या आशा धुळीस मिळवल्या. त्याने पहिल्याच चेंडूवर प्रियांशला बाद केले. कर्णधार श्रेयस अय्यरने येताच दोन चौकार मारले पण आर्चरने शेवटच्या चेंडूवर त्याला बाद केले. त्याने पाच चेंडूत १० धावा केल्या.
प्रभसिमरन आणि मार्कस स्टोइनिस यांनी संघाला सांभाळण्याचा प्रयत्न केला. संदीप शर्माने स्टोइनिसला त्याच्याच चेंडूवर झेल देऊन तंबूचा रस्ता दाखवला. कुमार कार्तिकेयने वानिंदू हसरंगाच्या हाती झेल घेऊन प्रभसिमरनचा डाव संपवला. स्टोइनिसने सात चेंडूत फक्त एक धाव काढली. प्रभसिमरनने १६ चेंडूत १७ धावांची खेळी केली.
जेव्हा पंजाबची स्थिती कमकुवत वाटत होती, तेव्हा वधेरा आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी शानदार भागीदारी करून पंजाबला सामन्यात परत आणले आणि राजस्थानला अडचणीत आणले. दोघांनीही ५२ चेंडूत ८८ धावा जोडल्या. ही जोडी राजस्थानसाठी चिंतेचा विषय बनली होती, पण नंतर संपूर्ण सामना दोन चेंडूत बदलला. १५ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर तीक्षनाने मॅक्सवेलला बाद केले. त्याने २१ चेंडूत तीन चौकार आणि एका षटकारासह ३० धावा केल्या.
१६ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर हसरंगाने वधेराला जुरेल करवी झेलबाद करून पंजाबला मोठा धक्का दिला आणि येथून राजस्थान संघ सामन्यात परतला. वधेराने ४१ चेंडूंत चार चौकार आणि तीन षटकारांसह ६२ धावांची खेळी केली. १७ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर संदीप शर्माने सूर्यांश शेडगेला बाद केले. येथून पंजाबचा पराभव निश्चित दिसत होता. १८ व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर, तीक्षनाने मार्को जानसेनला तंबूमध्ये पाठवले. तो तीन धावा करू शकला. शेवटच्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर आर्चरने अर्शदीपला बाद केले आणि पंजाबचा नववा बळी घेतला. 
राजस्थानकडून आर्चरने तीन विकेट्स घेतल्या. संदीप आणि तीक्षनाने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. कुमार कार्तिकेय आणि वानिंदू हसरंगा यांना प्रत्येकी एक यश मिळाले. 
तत्पूर्वी, मुल्लानपूर क्रिकेट स्टेडियमवर पंजाबचा कर्णधार अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानचे सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि कर्णधार संजू सॅमसन यांनी संघाला दमदार सुरुवात करून दिली. दोन्ही फलंदाजांनी मैदानावर सर्वत्र फटके मारले आणि संघाची धावसंख्या १०.२ षटकांत ८९ धावांवर नेली. ही धोकादायक जोडी तोडण्याचे काम लॉकी फर्ग्युसनने केले.
त्याने ३८ धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर संजू सॅमसनला कर्णधार अय्यरकडून झेलबाद केले, त्यानंतर तो बाद झाला. संजूने २६ चेंडूत सहा चौकारांसह ३८ धावा केल्या. या हंगामातील हा पहिलाच सामना आहे ज्यामध्ये संजू सॅमसनने संघाचे नेतृत्व आणि यष्टिरक्षण केले.

दोन्ही सलामीवीर बाद झाल्यानंतर आलेला नितीश राणा जास्त वेळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही आणि मार्को जॅन्सनच्या गोलंदाजीवर मॅक्सवेलने त्याला १२ धावांवर झेलबाद केले. त्यानंतर हेटमायर आणि रियान पराग फलंदाजीला आले आणि त्यांनी संघाची धावसंख्या १५० च्या पुढे नेली. पराग ३२ धावांवर खेळत असताना गोलंदाज मार्को जॅन्सनने त्याच्याच चेंडूवर झेल सोडला.
त्याच्या शेवटच्या षटकात, अर्शदीपने हेटमायरला (२०) मॅक्सवेल करवी झेलबाद केले. रियान पराग आणि ध्रुव जुरेल (१३) यांनी ४ बाद २०५ धावा केल्या.

१० वर्षांनी बेंगळुरूने जिंकला मुंबईचा किल्ला, कृणाल पंड्या ठरला विजयाचा शिल्पकार

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : एक अतिशय रोमांचक सामना, जो आरसीबीसाठी आनंदाने संपला. कृणाल पंड्याने शेवटच्या षटकात मुंबईला रोखले आणि तीन विकेट्स घेतल्या. आयपीएल २०२५ च्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या २० व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्सचा १२ धावांनी पराभव केला. आरसीबीने १० वर्षांनंतर मुंबईला घरच्या मैदानावर हरवले.

प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने २० षटकांत ५ गडी गमावून २२१ धावा केल्या. प्रत्युत्तरात, मुंबई इंडियन्सने २० षटकांत ९ गडी गमावून २०९ धावा केल्या.

२२२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा (१७) आणि रायन रिकेलटन (१७) यांनी मुंबईला जलद सुरुवात देण्याचा प्रयत्न केला. पण यश दयालने रोहित शर्माला बाद करून मुंबईची सुरुवात खराब केली. हेझलवूडने रायन रिकेलटनला बाद केले.

विल जॅक्स (२२) आणि सूर्यकुमार यादव (२८) यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण दोघेही धावगती वाढविण्यात अपयशी ठरले. कृणाल पंड्याने जॅकला विराट कोहलीकरवी झेलबाद करून आरसीबीला तिसरे यश मिळवून दिले. सूर्याची बॅटही शांत राहिली आणि यश दयालच्या चेंडूवर लिव्हिंगस्टोनला झेल देऊन तो तंबूमध्ये परतला.

त्यानंतर, तिलक वर्मा (५६) आणि हार्दिक पंड्या (४२) यांनी स्फोटक खेळी करत सामन्याचा मार्ग बदलला आणि मुंबई इंडियन्सला पुनरागमन करण्यास मदत केली. दोघांनीही फक्त ३४ चेंडूत ८९ धावांची भागीदारी केली. त्यानंतर भुवीने तिलकला बाद करून मोठी भागीदारी भेदली. तिलकने २९ चेंडूत चार चौकार आणि चार षटकारांसह ५६ धावा केल्या. पुढच्याच षटकात, हेझलवूडने हार्दिक पंड्याला बाद करून मुंबईचा जवळजवळ शेवट केला.

मुंबई इंडियन्सला शेवटच्या षटकात १९ धावांची आवश्यकता होती. कृणाल पांड्याने पहिल्या दोन चेंडूंवर मिचेल सँटनर (८) आणि दीपक चहर (०) यांना बाद केले. त्यानंतर त्याने पाचव्या चेंडूवर नमन धीरला (११) यश दयालकडून झेलबाद करून आरसीबीचा विजय निश्चित केला. कृणाल पंड्याने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. जोश हेझलवूड आणि यश दयाल यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. भुवीने एक विकेट घेतली.

त्याआधी, विराट कोहली (६७) आणि रजत पाटीदार (६४) यांनी अर्धशतके ठोकली आणि आरसीबीला मुंबई इंडियन्सविरुद्ध २२२ धावांचे लक्ष्य देण्यात मदत केली. आरसीबीने निर्धारित २० षटकांत ५ गडी गमावून २२१ धावा केल्या.

प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या आरसीबीची सुरुवात खूपच खराब झाली. फिल साल्ट (४) याला ट्रेंट बोल्टने त्रिफळाचीत केला. त्यानंतर विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल (३७) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी केली. दोघांनीही पॉवरप्लेमध्ये आरसीबीला ७२ धावांपर्यंत पोहोचवले. कोहलीने त्याचे अर्धशतक पूर्ण केले आणि त्याच षटकात पुथूरने पडिक्कलला बाद केले.

कोहली आणि रजत पाटीदार (६४) यांनी तिसऱ्या विकेटसाठी ४७ धावांची भागीदारी केली. हार्दिक पांड्याने कोहलीचा डाव नमन धीरकडे झेल देऊन संपवला. कोहलीने ४२ चेंडूत ८ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ६७ धावा केल्या. त्याच षटकात पांड्याने लियाम लिव्हिंगस्टोनला बाद केले.

या काळात रजत पाटीदारने आपला आक्रमक खेळ सुरूच ठेवला. त्याला जितेश शर्मा (४०*) सारखा एक चांगला जोडीदार मिळाला. दोघांनीही पाचव्या विकेटसाठी ६९ धावांची भागीदारी केली. बोल्टनने पाटीदारला बाद केले. पाटीदारने ३२ चेंडूत पाच चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ६४ धावा केल्या. जितेश शर्माने १९ चेंडूंत दोन चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने नाबाद ४० धावा केल्या. मुंबई इंडियन्सकडून हार्दिक पंड्याने सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. विघ्नेश पुथूर, ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!