Home Blog Page 119

“महिला: समर्पण, संयम आणि यशाचा अखंड प्रवास” कलाशिक्षक शैलेश कुलकर्णी यांनी जागतिक महिला दिनानिमित्त समाजाला दिला प्रेरणादायी संदेश

0

Loading

पाचोरा – महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी आणि त्यांच्या संघर्षशील प्रवासाची जाणीव समाजाला करून देण्यासाठी पाचोरा येथील निर्मल इंटरनॅशनल स्कूलचे कलाशिक्षक शैलेश कुलकर्णी यांनी एक वेगळ्या पद्धतीने जागतिक महिला दिन साजरा केला. त्यांनी शाळेच्या दर्शनी फलकावर

कलात्मक पद्धतीने एक सामाजिक संदेश देणारे चित्रांकन साकारले, ज्यात स्त्रीच्या विविध भूमिकांचा अप्रतिम संगम दिसून येतो.
कलाशिक्षक कुलकर्णी यांनी आपल्या कलाकृतीतून स्त्री ही आई, बहीण, कन्या, पत्नी, शिक्षिका, डॉक्टर, शास्त्रज्ञ, उद्योजिका, शेतकरी, सैनिक, राजकारणी, समाजसेविका आणि कलेतील विविध क्षेत्रांमध्ये चमकणारी व्यक्ती म्हणून कशी यशस्वी ठरते, हे सप्रेम चित्रित केले आहे.
महिला केवळ घरातील जबाबदाऱ्या सांभाळत नाही, तर समाजाच्या सर्वच क्षेत्रांमध्ये आपल्या बुद्धिमत्तेने आणि कर्तृत्वाने स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करते. तथापि, तिला अनेकदा तिच्या कष्टांची, समर्पणाची आणि बलिदानाची दखल दिली जात नाही.
या चित्रातून कलाशिक्षकांनी दाखवले आहे की, स्त्री ही केवळ घरापुरती मर्यादित नाही. ती घरातील जबाबदाऱ्या पार पाडतानाच बाह्य जगातही आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवते. तिच्या हाती स्वयंपाकघरातील ताटासोबतच अंतराळातील यानाचेदेखील नियंत्रण असते. ती घर सांभाळते, ती कुटुंब चालवते, ती समाज घडवते आणि राष्ट्रही उभारते!
“स्त्री ही तक्रार करीत नाही, ती केवळ जबाबदाऱ्या पार पाडते!”
या फलकाच्या मध्यवर्ती संदेशात एक महत्त्वाचा विचार मांडला गेला आहे – स्त्रीच्या कष्टांची तिला सवय असते, ती कुणाकडेही तक्रार करीत नाही, उलट तिला मिळालेल्या जबाबदाऱ्या ती पूर्ण निष्ठेने पार पाडते.
ही कलाकृती पाहिल्यावर विद्यार्थ्यांसह शिक्षक, पालक, आणि समाजातील इतर नागरिक प्रभावित झाले. शाळेच्या मुख्याध्यापिका आणि शिक्षकवर्गानेही या अनोख्या उपक्रमाचे कौतुक केले.
श्री. कुलकर्णी यांनी सांगितले की, “आज आपण तंत्रज्ञानाच्या युगात प्रगत झालो असलो, तरी समाजात अजूनही महिलांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अनेक स्त्रिया संघर्ष करताना दिसतात. त्यांना सन्मान मिळावा, त्यांच्या कार्याची दखल घेतली जावी, हा माझ्या चित्राच्या निर्मितीमागील उद्देश आहे.”
८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्याचा दिवस आहे. स्त्रीशक्तीचा सन्मान हा केवळ एका दिवसापुरता मर्यादित न ठेवता, तो दररोज केला गेला पाहिजे, असेही कुलकर्णी यांनी सांगितले.
या अनोख्या फलक चित्रणामुळे विद्यार्थ्यांमध्येही एक नवा दृष्टिकोन निर्माण झाला. स्त्री म्हणजे केवळ एक भूमिका नाही, तर ती संपूर्ण समाजाचा कणा आहे. स्त्रीशक्तीचा आदर करणं, तिला सन्मान देणं हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, हा संदेश विद्यार्थ्यांना मिळाला. शैलेश कुलकर्णी यांच्या या स्त्रीशक्तीच्या गौरवशाली चित्रांकनामुळे पाचोरा तालुक्यातील नागरिक, पालकवर्ग आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे कौतुक होत आहे.
स्त्रीच्या सामर्थ्याचा जागर करणारी ही कलाकृती प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरली आहे.
कलाशिक्षक: शैलेश कुलकर्णी, पाचोरा, जि. जळगाव
  Mo.8446932849

“विवाह संदर्भात बदलता प्रवाह: विवाहपूर्व समुपदेशनाची गरज”- संदीप महाजन Mo 7385108510

0

Loading

विवाहसंस्था ही भारतीय संस्कृतीचा एक महत्त्वाचा घटक असून, समाजव्यवस्थेचा मूलभूत आधार आहे. विवाह हा केवळ दोन व्यक्तींचा संबंध नसून दोन कुटुंबांचा मिलाफ असतो. मात्र, आधुनिक जीवनशैली, बदलते सामाजिक दृष्टिकोन आणि व्यक्तिस्वातंत्र्याच्या वाढत्या संकल्पना यामुळे विवाहसंस्थेवर गंभीर

परिणाम होत आहेत. परिणामी, घटस्फोटाचे प्रमाण वाढत आहे. अशा परिस्थितीत विवाहपूर्व समुपदेशन ही काळाची गरज बनली आहे. योग्य मार्गदर्शन आणि सुसंवादाच्या माध्यमातून विवाहपूर्व समुपदेशन अनेक समस्या टाळू शकते आणि सुदृढ कुटुंबव्यवस्थेला चालना देऊ शकते.आजच्या काळात विवाहसंस्थेवर विविध सामाजिक, मानसिक आणि आर्थिक घटकांचा परिणाम होत आहे. काही महत्त्वाचे बदल पाहता येतात –. 1. लिव्ह-इन रिलेशनशिपचा वाढता स्वीकार. आधुनिक युवक-युवती पारंपरिक विवाहाच्या कल्पनेपेक्षा स्वतंत्र सहजीवनाला (लिव्ह-इन रिलेशनशिप) अधिक पसंती देत आहेत. यामागे व्यक्तिस्वातंत्र्य, जबाबदारीचे टाळणे, करिअरला प्राधान्य आणि परस्पर समजूतदारपणाचा अभाव असे विविध घटक कार्यरत आहेत. परिणामी, विवाहसंस्थेचा पाया कमकुवत होत आहे. 2. प्रेमविवाह आणि त्यातून उद्भवणाऱ्या समस्या. प्रेमविवाहाच्या वाढत्या प्रमाणामुळे कुटुंबसंस्था कधी कधी विस्कळीत होते. पालक-अपत्य यांच्यात दुरावा निर्माण होतो. प्रेमविवाहाच्या बाबतीत अनेकदा अपेक्षाभंग होतो आणि त्यामुळे वैवाहिक जीवनावर विपरीत परिणाम होतो. 3. घटस्फोटाचे वाढते प्रमाण. महाराष्ट्रात सध्या १३ लाख पेक्षा जास्त जोडपी घटस्फोटित आहेत. हा आकडा चिंताजनक आहे. घटस्फोटाच्या प्रमुख कारणांमध्ये परस्पर विश्वासाचा अभाव, मानसिक आणि आर्थिक विसंगती, कौटुंबिक हस्तक्षेप, करिअरला प्राधान्य आणि जीवनशैलीतील मतभेद यांचा समावेश आहे. 4. आर्थिक स्वायत्तता आणि वैवाहिक तणाव. महिलांचे आर्थिक स्वावलंबन हा सकारात्मक बदल असला, तरी त्यातून अनेकदा वैवाहिक तणाव वाढताना दिसतो. दोन्ही जोडीदार करिअरमध्ये व्यस्त असल्याने परस्पर संवादाचा अभाव निर्माण होतो. 5. सामाजिक माध्यमांचा प्रभाव. सोशल मीडियाच्या अतिरेकी वापरामुळे वैवाहिक जीवनात गैरसमज वाढले आहेत. इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप यांसारख्या प्लॅटफॉर्मवर असलेला आकर्षणभाव, इतरांच्या वैवाहिक आयुष्याशी केलेली तुलना आणि अवास्तव अपेक्षा यामुळे नाती तुटू लागली आहेत. विवाहपूर्व समुपदेशन म्हणजे विवाहापूर्वी होणाऱ्या जोडप्यांना योग्य मार्गदर्शन करणे, त्यांना नातेसंबंधातील जबाबदाऱ्या समजावून सांगणे आणि समजूतदारपणाने वागण्याचे शिक्षण देणे. यामध्ये पुढील महत्त्वाचे पैलू विचारात घेतले जातात –. 1. भावनिक स्थैर्य आणि मानसिक तयारी. विवाह हा केवळ उत्सव नसून जबाबदारी असते. विवाहानंतर जोडीदाराच्या वागणुकीतील फरक, मानसिकता आणि कुटुंबातील जबाबदाऱ्या यांची समज असणे गरजेचे आहे. विवाहपूर्व समुपदेशन हे मानसिक स्थैर्यास मदत करते. 2. संवाद कौशल्य विकसित करणे. संवाद हा कोणत्याही नातेसंबंधाचा पाया असतो. कुटुंबातील वाद-विवाद, गैरसमज आणि तणाव यांना टाळण्यासाठी संवाद कसा साधावा, हे शिकवले जाते. 3. आरोग्य आणि वैद्यकीय चाचण्या. वैवाहिक जीवनात शारीरिक आरोग्य महत्त्वाचे असते. विवाह ठरवताना पत्रिका जुळवण्यापेक्षा मेडिकल तपासणी अधिक महत्त्वाची आहे. दोन्ही जोडीदारांची आरोग्य स्थिती जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. 4. आर्थिक नियोजन आणि जबाबदाऱ्या. विवाहानंतर आर्थिक जबाबदाऱ्या वाढतात. आर्थिक नियोजन, गुंतवणूक, बचत याविषयी स्पष्ट कल्पना देण्यासाठी समुपदेशन आवश्यक असते. 5. कुटुंब व्यवस्थापन आणि नातेसंबंध सुधारणा. विवाहानंतर फक्त जोडीदारांचेच नव्हे, तर सासर आणि माहेर यांच्याशीही चांगले संबंध राखणे आवश्यक असते. कुटुंब व्यवस्थापन आणि नातेसंबंध सुधारण्यासाठी समुपदेशन मदत करू शकते. विवाहपूर्व समुपदेशनाची कार्यशाळा – एक सकारात्मक उपक्रम. “आजच्या तरुण पिढीमध्ये विवाहसंस्थेविषयी अनेक गैरसमज आणि चुकीच्या धारणा निर्माण झाल्या आहेत. परिणामी, घटस्फोटाचे प्रमाण वाढत आहे. योग्य समुपदेशन आणि मार्गदर्शन मिळाल्यास विवाहसंस्था अधिक स्थिर आणि मजबूत होऊ शकते.””विद्यार्थ्यांना उत्तम जीवनाचा मार्गदर्शक मिळावा यासाठी कुटुंब आणि समाज या दोन्ही घटकांची भूमिका महत्त्वाची असते. संवाद हा कोणत्याही नातेसंबंधाचा पाया आहे. जर कुटुंबातील संवाद सुसंवाद असेल, तर व्यक्तिमत्त्वाचा विकास वेगाने आणि परिणामकारक होतो.समुपदेशनामुळे मिळणारे फायदे 1. विवाहाची वास्तववादी समज विकसित होते. 2. परस्पर समज आणि संवाद कौशल्य सुधारते 3. वैवाहिक जीवनातील आर्थिक नियोजनास मदत होते. 4. भावनिक आणि मानसिक स्थैर्य प्राप्त होते. 5. घटस्फोटाचे प्रमाण कमी होते आणि विवाहसंस्था अधिक मजबूत होते. विवाहसंस्था टिकवायची असेल, तर विवाहपूर्व समुपदेशन गरजेचे आहे. समाजातील घटस्फोटाचे वाढते प्रमाण, लिव्ह-इन रिलेशनशिपची वाढती प्रवृत्ती आणि विवाहाविषयीचे बदलते दृष्टिकोन पाहता योग्य वेळी समुपदेशन घेणे आवश्यक आहे. विवाह हा केवळ आनंदसोहळा नाही, तर जबाबदारी आणि समर्पण यांचा मिलाफ आहे. जर नवविवाहित जोडप्यांना मानसिक, सामाजिक, आर्थिक आणि भावनिकदृष्ट्या सज्ज केले तर समाज अधिक सुदृढ आणि स्थिर राहील. विवाहसंस्थेचे संरक्षण हे संपूर्ण समाजाच्या हिताचे आहे, आणि त्यासाठी विवाहपूर्व समुपदेशन महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.

संवाद आणि समुपदेशन – विवाहसंस्थेचे भक्कम पायाभूत स्तंभ पाचोरा महाविद्यालयात ‘विवाहपूर्व समुपदेशन व संवाद कौशल्य कार्यशाळे’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

0

Loading

पाचोरा- विवाहसंस्था टिकवण्यासाठी परस्पर समजूतदारपणा, संवाद कौशल्य आणि योग्य विचारसरणी अत्यंत महत्त्वाची आहे. सध्याच्या आधुनिक काळात ‘लिव्ह इन रिलेशनशिप’, ‘प्री-वेडिंग’ संस्कृती आणि घटस्फोटाचे वाढते प्रमाण यामुळे विवाहसंस्थेवर गंभीर परिणाम होत आहे. याच पार्श्वभूमीवर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विवाहपूर्व समुपदेशन’ आणि ‘संवाद व व्यक्तिमत्त्व विकास’ या विषयांवर दि. 04 मार्च रोजी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी, प्राध्यापकांनी आणि अभ्यासकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला. कार्यशाळेच्या आयोजनामागील प्रमुख उद्देश तरुणाईला विवाहसंस्थेचे महत्त्व पटवून देणे, वैवाहिक नातेसंबंध अधिक समजून घेण्यास प्रवृत्त करणे आणि संवाद कौशल्याच्या माध्यमातून संबंध अधिक दृढ करण्यासाठी प्रेरित करणे हा होता.

       कार्यशाळेच्या उद्घाटन सत्राचे प्रमुख अतिथी आणि उद्घाटक कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सिनेट सदस्य आणि पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे व्हा. चेअरमन श्री. नानासाहेब व्ही. टी. जोशी यांच्या शुभहस्ते पार पडले. आपल्या उद्घाटनपर भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना विवाहसंस्थेच्या बदलत्या स्वरूपाबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी नमूद केले की,

         “आजच्या युगात विवाहसंस्था अनेक संकटांना तोंड देत आहे. घटस्फोटाचे वाढते प्रमाण हे समाजातील कुटुंबसंस्थेच्या विघटनाचे द्योतक आहे. यामुळे विवाहपूर्व समुपदेशन ही काळाची गरज झाली आहे. योग्य विचार करूनच विवाहाचा निर्णय घ्यावा, अन्यथा भविष्यात मनस्ताप सहन करावा लागतो. आमचे महाविद्यालय आणि विद्यापीठ विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे.”

    कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष पाटील होते. त्यांनी आपल्या मनोगतात संवाद कौशल्य व व्यक्तिमत्त्व विकासाचे महत्त्व स्पष्ट करताना म्हटले,

      “विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यातील प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्यावा. विवाह हा आयुष्यभर टिकणारा बंधन आहे. त्यामुळे हा निर्णय घेताना योग्य संवाद, विचार आणि समुपदेशन गरजेचे आहे. कुटुंबातील संवाद जर सुसंवाद असेल, तरच विद्यार्थी एक उत्तम व्यक्तीमत्त्व घडवू शकतात.”

     कार्यशाळेच्या समन्वयक प्रा. सुवर्णा पाटील यांनी कार्यशाळेची भूमिका स्पष्ट केली. उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन डॉ. के. एस. इंगळे यांनी केले, तर आभार डॉ. प्राजक्ता शितोळे यांनी मानले. कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात विद्यापीठाच्या मानसशास्त्र अभ्यासमंडळाचे चेअरमन डॉ. सतीष सूर्ये यांनी ‘संवाद व व्यक्तिमत्त्व विकास’ या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी स्पष्ट केले की,

         “व्यक्तिमत्त्व हा जन्मजात गुण नसून तो घडवला जातो. घरातील संवाद हा जर सकारात्मक असेल तर विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास अधिक प्रभावी होतो. उत्तम संवाद कौशल्य आत्मसात करणे हे केवळ व्यवसायासाठी नव्हे, तर नातेसंबंध दृढ करण्यासाठीही आवश्यक आहे.” त्यांनी विद्यार्थ्यांसमोर संवाद कौशल्याचे महत्त्व PPT, व्हिडिओ क्लिप आणि प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडले. या सत्राच्या अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. जे. व्ही. पाटील यांनी संवाद कौशल्याच्या प्रभावीतेवर भर देत कुटुंबातील खेळीमेळीचे वातावरण व्यक्तिमत्त्व विकासासाठी अनिवार्य असल्याचे मत मांडले.

       कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात एस. पी. डी. एम. महाविद्यालय, शिरपूर येथील मानसशास्त्र विभागप्रमुख डॉ. नागोराव डोंगरे यांनी ‘विवाहपूर्व समुपदेशन’ या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले.

       “महाराष्ट्रात सध्या 13 लाखांपेक्षा जास्त विवाह तुटलेले आहेत. यामागील मुख्य कारण म्हणजे विवाहपूर्व समुपदेशनाचा अभाव. पती-पत्नीने एकमेकांविषयी संपूर्ण समर्पणभाव ठेवणे हेच खरे लग्न असते. विवाह ठरविण्याआधी मुला-मुलींच्या पत्रिका जुळवण्यापेक्षा वैद्यकीय तपासणी करणे अधिक महत्त्वाचे आहे. यामुळे भविष्यातील अनेक समस्या टाळता येतात.”

     या सत्राचे अध्यक्ष डॉ. जे. पी. बडगुजर होते. त्यांनी विद्यार्थी व कुटुंब यांच्यातील सुसंवाद कसा महत्त्वाचा आहे, यावर भाष्य केले.

     “विद्यार्थ्यांच्या या वयात चुका होऊ शकतात, पण त्या चुकीच्या सवयी न बनू देणं, हे कुटुंब आणि शिक्षकांचे मोठे कर्तव्य आहे.”

      या सत्राचे सूत्रसंचालन प्रा. स्वप्नील भोसले यांनी केले, प्रमुख मार्गदर्शकांचा परिचय डॉ. प्राजक्ता शितोळे यांनी करून दिला, तर आभार प्रा. जयश्री वाघ यांनी मानले.

         कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी पाचोरा नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका मा. सौ. ताईसाहेब सुचेताताई वाघ, तनिष्का ग्रुपच्या माजी अध्यक्षा मा. सौ. ताईसाहेब ज्योतीताई वाघ आणि मा. सौ. ताईसाहेब सुरेखाताई पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.

       “आजच्या पिढीने एकत्र कुटुंबपद्धतीचा स्वीकार केला, तर वैवाहिक जीवन अधिक यशस्वी होईल. संवादाच्या माध्यमातून कोणतीही समस्या सोडवता येते.”

     कार्यशाळेच्या अध्यक्षीय मनोगतात उपप्राचार्य डॉ. वासुदेव वले यांनी विद्यार्थ्यांना “या कार्यशाळेतून संस्कारक्षम आणि सकारात्मक विचारांची शिदोरी घ्यावी,” असा संदेश दिला.

    विद्यार्थिनी कु. चेतना हिरे व कु. गायत्री क्षीरसागर यांनी कार्यशाळेबद्दल आपले अनुभव शेअर केले. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मोलाचे योगदान दिले. या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना विवाहपूर्व समुपदेशनाचे आणि संवाद कौशल्याच्या महत्त्वाचे भान आले. विवाह हा केवळ समारंभ नसून, जीवनभर टिकणारे नाते आहे आणि त्यासाठी सुसंवाद अत्यंत गरजेचा आहे.

विद्यार्थ्यांसाठी विवाहपूर्व समुपदेशन आणि संवाद-विकास कार्यशाळा संपन्न व्यक्तिमत्त्व विकासासाठी कुटुंबातील सुसंवाद महत्त्वाचा – प्रा. डॉ. सतीष सूर्ये

0

Loading

पाचोरा- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या सहकार्याने आणि पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित, श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पाचोरा यांच्या मानसशास्त्र विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘विवाहपूर्व समुपदेशन’ आणि ‘संवाद व व्यक्तिमत्त्व विकास’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. ही कार्यशाळा दि. 04 मार्च 2025 रोजी महाविद्यालयात पार पडली.                                                या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे सिनेट सदस्य व पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे व्हा. चेअरमन श्री. नानासाहेब व्ही. टी. जोशी यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. उद्घाटन सत्राचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष पाटील यांनी भूषविले. तसेच प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. सतीष सूर्ये, डॉ. नागोराव डोंगरे, प्रमुख अतिथी उपप्राचार्य डॉ. वासुदेव वले, उपप्राचार्य डॉ. जे. व्ही. पाटील, IQAC समन्वयक डॉ. शरद पाटील, पुणे येथील बालभारती मानसशास्त्र अभ्यासमंडळ सदस्य डॉ. जे. पी. बडगुजर आदी मान्यवर उपस्थित होते                   कार्यशाळेच्या उद्देशाविषयी माहिती देताना समन्वयक डॉ. प्राजक्ता शितोळे आणि सहसमन्वयक प्रा. सुवर्णा पाटील यांनी आजच्या आधुनिक युगात विवाहसंस्थेवर होणारे परिणाम आणि घटस्फोटाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन विद्यार्थ्यांसाठी विवाहपूर्व समुपदेशन कसे महत्त्वाचे आहे, यावर प्रकाश टाकला. कार्यशाळेचे उद्घाटन करताना श्री. नानासाहेब व्ही. टी. जोशी यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले की, “आजच्या पिढीमध्ये लिव्ह-इन रिलेशनशिप, प्रेमविवाह आणि घटस्फोट यांची संख्या वाढत आहे. परिणामी, विवाहसंस्था धोक्यात येत आहे. त्यामुळे विवाहपूर्व समुपदेशन ही काळाची गरज बनली आहे. अशा कार्यशाळांमधून विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यासाठी योग्य दिशा मिळू शकते.”       कार्यशाळेच्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. शिरीष पाटील यांनी कुटुंबातील सुसंवादाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, “विद्यार्थ्यांना उत्तम जीवनाचा मार्गदर्शक मिळावा यासाठी कुटुंब आणि समाज या दोन्ही घटकांची भूमिका महत्त्वाची असते. संवाद हा कोणत्याही नातेसंबंधाचा पाया आहे. जर कुटुंबातील संवाद सुसंवाद असेल, तर व्यक्तिमत्त्वाचा विकास वेगाने आणि परिणामकारक होतो.                                                कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात विद्यापीठाच्या मानसशास्त्र अभ्यासमंडळाचे चेअरमन प्रा. डॉ. सतीष सूर्ये यांनी ‘संवाद व व्यक्तिमत्त्व विकास’ या विषयावर मार्गदर्शन केले                                 त्यांनी सांगितले की, “मुलांचे कुटुंबातील संवाद जर सुसंवाद असेल, तर त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास वेगाने होतो. पालकांनी मुलांशी संवाद साधताना त्यांना समजून घ्यायला हवे. चांगला संवाद हा आत्मविश्वास वाढवतो आणि व्यक्तिमत्त्व अधिक प्रभावी बनवतो                      या सत्रात PPT सादरीकरण, व्हिडीओ क्लिप, विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष सहभाग आणि प्रश्नोत्तर सत्राचा उपयोग करून विषय अधिक स्पष्ट करण्यात आला. सत्राच्या अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. जे. व्ही. पाटील यांनी सांगितले की, “कुटुंबातील खेळीमेळीचे वातावरण असेल, तर विद्यार्थी अधिक आत्मविश्वासाने आपली जीवनगाथा घडवतात.                                       दुसऱ्या सत्रात एस. पी. डी. एम. महाविद्यालय, शिरपूरचे मानसशास्त्र विभागप्रमुख डॉ. नागोराव डोंगरे यांनी ‘विवाहपूर्व समुपदेशन’ या विषयावर मार्गदर्शन केले ते म्हणाले, “महाराष्ट्रात सध्या १३ लाख पेक्षा जास्त जोडपी घटस्फोटित आहेत. विवाह म्हणजे केवळ दोन व्यक्तींचा संबंध नाही, तर दोन कुटुंबांचा मिलाफ असतो. विवाहपूर्व योग्य समुपदेशन केल्यास अशा समस्या टाळता येऊ शकतात.”ते पुढे म्हणाले की, “लग्न ठरवताना पत्रिका जुळवण्यापेक्षा मेडिकल तपासणी करणे अधिक महत्त्वाचे आहे. हे केवळ शारीरिक आरोग्यासाठी नव्हे, तर मानसिक स्थैर्यासाठीही आवश्यक आहे              या सत्राचे अध्यक्ष डॉ. जे. पी. बडगुजर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात स्पष्ट केले की, “विद्यार्थ्यांच्या जीवनात कुटुंब आणि शिक्षक हे दोन महत्त्वाचे घटक आहेत. या वयात झालेल्या चुका हा दोष नसून वयाचा परिणाम आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबाशी मुक्तपणे संवाद साधावा.”                                           कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी पाचोरा नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका सौ. ताईसाहेब सुचेताताई वाघ, तनिष्का ग्रुपच्या माजी अध्यक्षा सौ. ज्योतीताई वाघ आणि सौ. सुरेखाताई पाटील या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.                  सौ. ज्योतीताई वाघ यांनी ‘एकत्र कुटुंबपद्धती’चे महत्त्व सांगताना स्पष्ट केले की, “संयुक्त कुटुंबपद्धतीमुळे कुटुंबातील संवाद वाढतो आणि त्यामुळे विवाह अधिक सुस्थितीत राहतो.”           कार्यशाळेच्या अध्यक्षीय मनोगतात डॉ. वासुदेव वले यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांनी अशा कार्यशाळांमधून मिळालेल्या संस्कारक्षम व सकारात्मक विचारांची शिदोरी आपल्या आयुष्यात रुजवावी.”                                          कार्यशाळेतील सहभागींना मान्यवरांच्या शुभहस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले                     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. के. एस. इंगळे आणि प्रा. स्वप्निल भोसले यांनी केले, तर आभारप्रदर्शन प्रा. सुवर्णा पाटील आणि प्रा. जयश्री वाघ यांनी केले               कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मोलाचे योगदान दिले.

पाचोरा शहर विकासासाठी भरीव तरतुदी – सन २०२५-२६ वित्तीय वर्षाचे पाचोरा नगरपरिषदेचे अंदाजपत्रक सादर

0

Loading

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण टप्पा ठरणाऱ्या सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाचे नगरपरिषद अंदाजपत्रक सादर करण्यात आले असून, एकूण २५५ कोटी ५९ लाख २ हजार ३४२ रुपये एवढ्या भरीव निधीचा समावेश आहे. या अंदाजपत्रकानुसार, नगरपरिषदेच्या उत्पन्न-खर्चाचा विचार करता ८ लाख १३ हजार १४७ रुपये शिल्लक राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, यावर्षी कोणत्याही प्रकारच्या करात वाढ करण्यात आलेली नाही, मात्र शहरातील मूलभूत सुविधा व नागरी विकासाच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणावर तरतुदी करण्यात आल्या आहेतनगरपरिषदेकडे असलेल्या निधीव्यतिरिक्त, केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना आणि अनुदानांमधून मिळणाऱ्या निधीचा काटेकोरपणे उपयोग केला जाणार आहे. रस्ते, गटारी, पथदिवे, उद्याने, वाचनालये, ओपन जिम, तसेच पिण्याच्या पाण्याचा पुरवठा यासारख्या अत्यावश्यक नागरी सुविधांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे.
       शहराच्या सर्वांगीण विकासासाठी खालील प्रमाणे विविध योजनांसाठी भरीव निधी राखून ठेवण्यात आला आहे:
१) राज्यस्तरीय नगरोत्थान (DPR) अंतर्गत नव्या रस्त्यांसाठी – ₹१०० कोटी
शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी आणि नागरिकांना उत्तम दर्जाचे रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांचे नूतनीकरण तसेच नवीन रस्ते बांधणीला प्राधान्य देण्यात आले आहे.                    .                              २) दलित वस्ती सुधारणा योजनेंतर्गत – ₹१० कोटी
शहरातील दलित वस्ती सुधारणा योजनेच्या अंतर्गत विविध मूलभूत सुविधा उभारण्यासाठी १० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यात अंतर्गत रस्ते, गटारी, नळजोडणी, सांडपाणी व्यवस्थापन आणि पथदिवे बसविण्याचा समावेश आहे.
३) जिल्हास्तरीय नगरोत्थान योजनेसाठी – ₹१० कोटी शहरातील सार्वजनिक सुविधा व नागरी जीवनमान उंचावण्यासाठी जिल्हास्तरीय नगरोत्थान योजनेंतर्गत १० कोटींचा निधी राखून ठेवण्यात आला आहे. यात मुख्यतः पायाभूत सुविधा, दळणवळण व्यवस्था, जलनिकासी, वीजपुरवठा सुधारणा आणि हरित क्षेत्र निर्मिती यांचा समावेश असेल.
४) दलितत्तर वस्ती सुधार योजनेंतर्गत – ₹५ कोटी नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रातील दलितत्तर वस्तींसाठी स्वतंत्र ५ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. ही तरतूद मुख्यतः पायाभूत सुविधांचे बळकटीकरण, मूलभूत सेवा सुधारणा आणि सामाजिक उपक्रमांना चालना देण्यासाठी वापरण्यात येणार आहे.
५) नवीन प्रशासकीय इमारतीसाठी – ₹२० कोटी नगरपरिषदेच्या प्रशासकीय कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी नवीन प्रशासकीय इमारत बांधण्यासाठी २० कोटी रुपयांची मोठी तरतूद करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना एकाच ठिकाणी सर्व सेवांचा लाभ घेता येईल आणि प्रशासनाच्या दैनंदिन कामकाजात सुसूत्रता येईल.
६) भुयारी गटार टप्पा क्र. २ साठी – ₹३५ कोटी शहराच्या सांडपाणी व्यवस्थापनासाठी आणि आधुनिक मलनिस्सारण योजनेसाठी भुयारी गटार टप्पा क्र. २ अंतर्गत ३५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे शहरातील आरोग्यदायी वातावरण टिकविण्यास मदत होईल.
७) महिला आणि बालकल्याण योजनेसाठी – ₹१० लाख शहरातील महिलांसाठी विशेष योजना आखण्यात आल्या असून, महिला आणि बालकल्याण विभागाच्या विविध उपक्रमांसाठी १० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये महिला सक्षमीकरण, आरोग्य सेवा, पोषण आहार आणि बालकल्याण उपक्रमांचा समावेश आहे.
८) आर्थिक दुर्बल घटकांसाठी – ₹१० लाख
शहरातील गरजू, आर्थिक दुर्बल घटकांसाठी मदतकार्य आणि पुनर्वसन योजना राबवण्यासाठी १० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
९) दिव्यांग बांधवांसाठी – ₹१२ लाख
शहरातील दिव्यांग नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांच्यासाठी विविध सोयीसुविधा उभारण्यासाठी १२ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यात सुलभ शौचालये, रॅम्प, विशेष बस स्टॉप आणि रोजगार प्रोत्साहन योजनांचा समावेश असेल.
१०) पिण्याच्या पाणीपुरवठ्यासाठी अमृत २.० अंतर्गत – ₹३५ कोटी शहरातील नागरिकांना शुद्ध आणि स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा अखंडित पुरवठा करण्यासाठी “अमृत २.०” योजनेअंतर्गत ३५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे जलवाहिन्यांचे नूतनीकरण, नवीन पाणी पुरवठा यंत्रणा उभारणी आणि जलसंधारण प्रकल्पांना चालना मिळणार आहे.
     नवीन अंदाजपत्रकात कोणताही नवीन कर लावण्यात आलेला नाही किंवा सध्याच्या करांमध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. मात्र, नगरपरिषदेकडे असलेल्या उत्पन्नाच्या स्रोतांचा कार्यक्षम उपयोग करून शहराच्या विकासासाठी हा निधी खर्च करण्याचा मानस आहे.
    या अंदाजपत्रकामुळे शहराचा सर्वांगीण विकास, नागरी सुविधा वृद्धिंगत करणे आणि पर्यावरणपूरक नागरी सुविधा निर्माण करणे या तिन्ही उद्दिष्टांना चालना मिळणार आहे. रस्ते, गटारी, पाणीपुरवठा, वीज, क्रीडा संकुल, सार्वजनिक वाचनालये, गार्डन्स, सांडपाणी व्यवस्थापन आणि महिला सक्षमीकरण यांसारख्या सुविधांसाठी केलेल्या तरतुदीमुळे शहराचा चेहरामोहरा निश्चितच बदलणार आहे.
     नगरपरिषदेच्या वतीने सांगण्यात आले की, प्रत्येक विकास योजनेचा काटेकोरपणे आढावा घेत जनतेच्या सहभागातून निर्णय घेतले जातील. तसेच अंदाजपत्रकातील सर्व कामे वेळेत आणि गुणवत्तापूर्ण रीतीने पूर्ण केली जातील, याची काळजी घेतली जाणार आहे.
           हे अंदाजपत्रक शहराच्या दिर्घकालीन विकासासाठी महत्त्वपूर्ण टप्पा असून, नागरिकांच्या हिताचे निर्णय घेण्यास नगरपरिषद कटिबद्ध आहे. त्यामुळे या योजनांच्या अंमलबजावणीसाठी स्थानिक नागरिकांनी आणि नगरपरिषदेने एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे.
या अंदाजपत्रकाच्या माध्यमातून शहराच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल आणि येत्या काही वर्षांत शहर आधुनिकतेकडे वाटचाल करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

आरोग्यसेवेतील समर्पणाला राष्ट्रीय सन्मान – डॉ. राणी व अभय बंग यांना यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर)  : आदिवासी भागातील आरोग्यसेवा आणि समाजप्रबोधनाच्या क्षेत्रात अपूर्व कार्य करणारे ज्येष्ठ समाजसेवक आणि वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. राणी बंग व डॉ. अभय बंग यांना यंदाचा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार २०२४ जाहीर झाला आहे. यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे दिला जाणारा हा प्रतिष्ठित पुरस्कार त्यांना त्यांच्या समाजोपयोगी कार्याबद्दल प्रदान करण्यात येणार आहे.

या पुरस्काराचे स्वरूप पाच लाख रुपये रोख आणि सन्मानपत्र असे असून, बुधवार, १२ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता, चव्हाण सेंटर, मुंबई येथे हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. सेंटरचे अध्यक्ष मा. शरद पवार यांच्या हस्ते या दोन्ही सामाजिक योद्ध्यांचा गौरव केला जाईल.

यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे दरवर्षी राष्ट्रीय एकात्मता, लोकशाही मूल्ये आणि सामाजिक-आर्थिक क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थेला हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यंदाच्या पुरस्काराच्या निमित्ताने ग्रामीण व आदिवासी आरोग्यसेवेसाठी समर्पित जीवन व्यतीत करणाऱ्या डॉ. राणी आणि डॉ. अभय बंग यांच्या कार्याची दखल राष्ट्रीय स्तरावर घेतली जात आहे.

डॉ. बंग दाम्पत्याने ‘सर्च’ या संस्थेच्या माध्यमातून गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात आरोग्यसेवेचा यशस्वी विस्तार केला. विशेषतः आदिवासी महिलांचे आरोग्य, नवजात बालकांची काळजी आणि समुपदेशन क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्यामुळे अनेकांचे जीवन उज्ज्वल झाले आहे. त्यांच्या या अतुलनीय कार्याची दखल घेत त्यांना यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ : न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा ५० धावांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेवर ५० धावांनी विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली. न्यूझीलंडचा संघ आता ९ मार्चला दुबईत भारताविरुद्ध अंतिम सामना खेळणार आहे.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने ५० षटकांत ३६२/६ धावा केल्या. युवा फलंदाज रचिन रवींद्रने १०१ चेंडूत १०८ धावा करत शानदार शतक झळकावले. कर्णधार केन विल्यमसननेही १०२ धावांची (९४ चेंडू) संयमी खेळी केली. अखेरच्या षटकांत ग्लेन फिलिप्सने ४९ धावा (२७ चेंडू) फटकावत संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले. दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडीने १० षटकांत ३/७२ अशी कामगिरी केली.

प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ ३१२/९ इतकीच मजल मारू शकला. कर्णधार टेंबा बावुमा (५६) आणि रासी व्हॅन डर डुस्सेन (६९) यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. मात्र, न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी मधल्या षटकांत जोरदार पुनरागमन केले. मिचेल सँटनरने ३/४३, तर रचिन रवींद्र आणि फिलिप्सने प्रत्येकी १-१ बळी घेतला. अखेरच्या षटकांत डेविड मिलरने ६७ चेंडूत नाबाद १०० धावा करत अफलातून खेळी केली, पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.

न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर म्हणाला, “आजचा सामना आव्हानात्मक होता. आम्ही सातत्याने दडपण ठेवले आणि त्यामुळेच विजय मिळवू शकलो. आता अंतिम फेरीसाठी भारताविरुद्ध योग्य रणनीती आखू.”

दक्षिण आफ्रिकेचे कर्णधार टेंबा बावुमा म्हणाला, “३६२ धावांचा पाठलाग कठीण होता, पण आम्ही सुरुवात चांगली केली. मात्र, आम्हाला मोठ्या भागीदाऱ्या करता आल्या नाहीत. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी योग्यवेळी दडपण आणले आणि त्याचा परिणाम आमच्या फलंदाजांवर झाला.”

सामन्यातील महत्त्वाचे खेळाडू:-

रचिन रवींद्र (न्यूझीलंड) – १०८ धावा आणि १ बळी (सामनावीर)

मिचेल सँटनर – ३/४३ (१०)

डेविड मिलर (द. आफ्रिका) – नाबाद १०० (६७ चेंडू)

अंतिम सामना – न्यूझीलंड विरुद्ध भारत

या विजयासह न्यूझीलंडने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे, जिथे त्यांचा सामना ९ मार्चला भारताविरुद्ध दुबईमध्ये होणार आहे. न्यूझीलंडने सध्या जबरदस्त फॉर्म दाखवला असला तरी भारताची चमकदार फलंदाजी आणि भेदक गोलंदाजी त्यांना कडवे आव्हान देऊ शकते. त्यामुळे जबरदस्त अटीतटीचा अंतिम सामन‍ा पाहाण्यासाठी क्रिकेटप्रेमी उत्सुक आहेत.

ताण-तणाव मुक्त जीवनासाठी ऐनपूर महाविद्यालयात मार्गदर्शन कार्यशाळा

0

Loading

ऐनपूर, ता. रावेर: सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय, ऐनपूर येथे मानसशास्त्र विभागातर्फे “ताण-तणाव मुक्त जीवनशैली” या विषयावर विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तणावातून मुक्त राहता यावे, मनाच्या चंचलतेवर नियंत्रण मिळवता यावे आणि ध्यानसाधनेच्या माध्यमातून आत्मचिंतन करता यावे, यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे.बी. अंजने यांनी या कार्यशाळेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. त्यांनी विद्यार्थ्यांना परीक्षांमध्ये तणाव न घेता सकारात्मक विचारसरणी अंगीकारण्याचे महत्त्व पटवून दिले. “तणाव हे आपल्या मानसिक आरोग्यावर आणि शारीरिक स्वास्थ्यावर परिणाम करत असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ताण-तणाव मुक्त जीवनशैली अंगीकारून आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे गेले पाहिजे,” असे ते म्हणाले.
कार्यशाळेच्या सुरुवातीला मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ. व्ही. एन. रामटेके यांनी विद्यार्थ्यांसमोर विषयाची सखोल ओळख करून दिली. आपल्या प्रास्ताविक भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य, मनाची चंचलता, आणि त्याचा एकूण व्यक्तिमत्त्वावर होणारा प्रभाव याविषयी मार्गदर्शन केले. “मन हे अत्यंत चंचल असते. आपल्या मनात सतत वेगवेगळे विचार येत असतात आणि आपण त्या विचारांवर कृती करतो. त्यामुळे मनावर नियंत्रण मिळवणे महत्त्वाचे आहे. जर मनावर अनावश्यक तणाव निर्माण झाला, तर त्याचा थेट परिणाम आपल्या शरीरावर होतो. शारीरिक आरोग्यासोबत मानसिक स्वास्थ्य चांगले ठेवण्यासाठी ध्यान, योगसाधना आणि सकारात्मक विचार यांचा सराव करणे गरजेचे आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यशाळेचे प्रमुख वक्ते माननीय विजय पाटील (रावेर) यांनी विद्यार्थ्यांना मानसिक तणाव दूर करण्यासाठी ध्यानसाधनेचे महत्त्व पटवून दिले. “आपण नेहमीच इतरांच्या वागण्याकडे, बोलण्याकडे लक्ष देतो. मात्र, आपण स्वतःला किती ओळखतो? स्वतःच्या मानसिकतेकडे, भावनांकडे किती लक्ष देतो? याचा विचार फारसा करत नाही. ध्यानाच्या माध्यमातून स्वतःचे आत्मनिरीक्षण करता येते आणि आपल्या मनातील नकारात्मक विचार दूर करून मन:शांती मिळवता येते,” असे त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
त्यांनी ध्यान साधनेद्वारे मनःशांती कशी मिळवावी, आपल्या विचारांची दिशा कशी ठरवावी आणि परीक्षा काळातील मानसिक तणाव कसा कमी करावा, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना विविध ध्यानतंत्र शिकवत, आपल्या मनाचा अभ्यास कसा करावा आणि मानसिक संतुलन कसे राखावे याची माहिती दिली.
कार्यशाळेच्या दुसऱ्या व्याख्यात्या माननीय दीपाली लोहार (रावेर) यांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ध्यानसाधना करून घेतली. “ध्यान हे केवळ एक ध्यानतंत्र नसून, तो आपल्या जीवनशैलीचा एक अविभाज्य भाग असायला हवा. रोज काही मिनिटे ध्यान केल्याने मानसिक स्थिरता वाढते, आत्मविश्वास निर्माण होतो आणि विचार करण्याची क्षमता अधिक स्पष्ट होते,” असे त्यांनी नमूद केले.
त्यांनी विद्यार्थ्यांना सोपे आणि प्रभावी ध्यानतंत्र शिकवले, ज्यामुळे त्यांना परीक्षेतील भीती, तणाव, आणि नकारात्मक विचारांपासून मुक्त होता येईल. अनेक विद्यार्थ्यांनी या सत्रादरम्यान आपल्या अनुभवांची शेअरिंग केली आणि ध्यानसाधनेमुळे त्यांच्या मन:स्थितीत झालेल्या बदलांची माहिती दिली.
ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी डॉ. डी. बी. पाटील यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन केले. त्यांनी उपस्थित मान्यवरांचे परिचय करून दिले आणि कार्यशाळेचा हेतू स्पष्ट केला. कार्यशाळेच्या आयोजनासाठी डॉ. डी. बी. पाटील, डॉ. व्ही. एन. रामटेके, डॉ. जे. पी. नेहेते, डॉ. नरेंद्र मुळे, प्रा. एस. पी. उमरिवाड, प्रा. प्रदीप तायडे, प्रा. ज्ञानेश्वर कोळी, प्रा. अक्षय महाजन, श्री. श्रेयश पाटील, श्री. अनिकेत पाटील यांनी परिश्रम घेतले. या कार्यशाळेत ६१ विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यशाळेनंतर विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. “या कार्यशाळेमुळे आमच्या मनातील परीक्षेची भीती कमी झाली आहे. ध्यानसाधनेचा सराव केल्यास निश्चितच आमचे मन स्थिर राहील आणि आत्मविश्वास वाढेल,” असे एका विद्यार्थिनीने सांगितले.
कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी डॉ. नरेंद्र मुळे यांनी उपस्थित मान्यवरांचे, वक्त्यांचे आणि सर्व विद्यार्थ्यांचे आभार मानले. शेवटी प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांच्या परवानगीने कार्यशाळेची सांगता करण्यात आली.
ही कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरली. मानसिक तणाव, परीक्षेतील भीती आणि ध्यानसाधनेचे महत्त्व याबाबत सखोल मार्गदर्शन मिळाल्याने विद्यार्थ्यांना याचा निश्चितच फायदा होईल. भविष्यातही अशा प्रकारच्या कार्यशाळांचे आयोजन करण्यात यावे, अशी विद्यार्थ्यांची मागणी होती.

पाचोऱ्यात ‘Flour Box’ फॅमिली फूड कॅफेचे भव्य उद्घाटन – स्वादप्रेमींसाठी खास ठिकाण

0

Loading

पाचोरा : शहरातील खाद्यप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे! प्रोप्रा रोहित महाजन यांचे ‘Flour Box’ फॅमिली फूड कॅफे चे भव्य उद्घाटन ६ मार्च २०२५, गुरुवार रोजी संध्याकाळी ५:०० वाजता होणार आहे. हा नवा कॅफे भडगाव रोड, विवेकानंद नगर, न्यू वाघ मिल्क डेअरीजवळ सुरू होत असून, चवदार आणि विविध प्रकारच्या पदार्थांसह जांभूळ शॉट हीच आमची खासियत हे एक आकर्षक ठिकाण ठरणार आहे.
‘Flour Box’ हा फॅमिली फूड कॅफे असून येथे ग्राहकांना पिझ्झा, सँडविच, बर्गर, फ्रेंच फ्राईज, कोल्ड कॉफी, वॅफल्स यांसारख्या अनेक स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. आधुनिक आणि सुखद वातावरण असलेल्या या कॅफेमध्ये मित्र-मैत्रिणी, कुटुंब, तसेच तरुणाईला एकत्र येण्यासाठी एक चांगला पर्याय उपलब्ध होणार आहे.
कॅफे व्यवस्थापनाने “आम्ही वाढत आहोत आणि या नव्या प्रवासात आपले स्वागत आहे” असा संदेश दिला आहे. उद्घाटन समारंभानंतर येथे खास ऑफर्स आणि आकर्षक सवलती उपलब्ध असतील, असेही व्यवस्थापनातर्फे सांगण्यात आले आहे. पाचोऱ्यातील तरुण पिढी आणि कुटुंबांसाठी ‘Flour Box’ हे एक परिपूर्ण ठिकाण ठरेल. हल्लीच्या बदलत्या जीवनशैलीत आरामदायी वातावरणात चवदार पदार्थांचा आनंद घेण्याची संधी मिळावी, यासाठी हा कॅफे सुरू करण्यात येत आहे. शहरातील नागरिकांना एक अनोखा आणि दर्जेदार खाद्यप्रयोग येथे अनुभवता येईल.
हा नवा उपक्रम स्थानिक नागरिकांसाठी आणि फूड लव्हर्ससाठी खास ठरणार आहे. उद्घाटन समारंभाला उपस्थित राहून ‘Flour Box’ च्या चवदार पदार्थांचा आनंद घ्यावा, असे आवाहन कॅफेच्या टीमकडून करण्यात आले आहे.
ठिकाण:-न्यू वाघ मिल्क डेअरीजवळ, विवेकानंद नगर, भडगाव रोड, पाचोरा.
वेळ:-६ मार्च २०२५, गुरुवार – संध्याकाळी ५:०० वाजता
या विशेष प्रसंगी उपस्थित राहून नवीन कॅफेचा आनंद घ्या आणि आपल्या प्रियजनांसह स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घ्या. ‘Flour Box’ हा कॅफे शहराच्या खाद्यसंस्कृतीत एक नवीन पर्व सुरू करणार आहे. चला तर मग, या स्वादाच्या प्रवासात सहभागी होऊया! ‘Flour Box’ कॅफेच्या पुढील वाटचालीस ध्येय न्युज & झुंज वृत्तपत्र परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा

पाचोऱ्यात काँग्रेसचा प्रभावी लढा: सचिन दादा सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा जिवंतपणा अधोरेखित

0

Loading

महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष सध्या कोणत्या स्तरावर आहे याबाबत विविध मतप्रवाह असू शकतात. केंद्र आणि विधानसभेच्या निवडणुकांनंतर काँग्रेसची स्थिती बदलेली आहे, काही ठिकाणी पक्षाची पकड कमी झाल्याचे चित्र आहे. मात्र, पाचोऱ्यात मात्र काँग्रेस आजही जिवंत आहे आणि सक्रिय आहे, हे तालुकाध्यक्ष सचिन दादा सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनातून स्पष्ट झाले आहे.
     मागील काही वर्षांत काँग्रेस पक्षाने संपूर्ण

महाराष्ट्रात चढ-उतार पाहिले आहेत. काही भागांत काँग्रेसची ताकद घटल्याचे चित्र आहे, तर काही ठिकाणी पक्ष मजबूत उभा आहे. राज्यात सत्ताधारी भाजप आणि त्यांच्या सहकारी पक्षांच्या वाढत्या प्रभावामुळे काँग्रेसच्या भवितव्यावर अनेक तर्कवितर्क लावले गेले. मात्र, पाचोरा तालुका हा अपवाद ठरला आहे.
     पाचोऱ्यात काँग्रेस पक्षाने नेहमीच स्थानिक प्रश्नांवर लढा दिला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न असोत, बेरोजगारांचे प्रश्न असोत किंवा स्थानिक पातळीवरील विकासाच्या कामांची मागणी असो, काँग्रेस पक्ष सतत पुढे राहून सरकारच्या विरोधात आवाज उठवत आहे. त्याचे ताजे उदाहरण म्हणजे सचिन दादा सोमवंशी यांच्या नेतृत्वाखालील आंदोलन.
  सध्या महाराष्ट्रात राजकीय अस्थिरता आहे. काँग्रेसची भूमिका राज्यभर किती प्रभावी आहे याविषयी चर्चा होत असली, तरी पाचोऱ्यात मात्र काँग्रेस पक्षाचे संघटन सचीनदादा सोमवंशी आणि ॲड अविनाशभाऊ भालेराव यांच्या रुपाने मजबूत आहे. तालुकाध्यक्ष सचिन दादा सोमवंशी यांच्या नेतृत्वामुळे काँग्रेस

कार्यकर्ते जोमाने काम करत आहेत.
     त्यांच्या नेतृत्वाखालील आंदोलन हे केवळ राजकीय हेतूने नव्हते, तर शेतकरी, व्यापारी, कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कांसाठी लढण्याचे काँग्रेसचे धोरण अधोरेखित करणारे होते. या आंदोलनाने हे स्पष्ट केले की, पाचोरा तालुका हा काँग्रेससाठी आजतरी महत्त्वाचा बालेकिल्ला नसला तरी स्थानिक नेतृत्व सचिनदादा  सोमवंशी व ॲड. अविनाश भाऊ भालेराव यांच्यासारखे कार्यक्षम नेतृत्व असल्यास पक्ष कुठेही टिकू शकतो.
   महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळत असल्याचे अनेक घटनांमधून स्पष्ट झाले आहे. महिलांची सुरक्षितता हा एक गंभीर मुद्दा बनला आहे. विशेषतः, माजी महसूलमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या सूनविषयी (केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांच्या कन्येच्या) संदर्भात घडलेली घटना हे दाखवून देते की, ज्या कुटुंबाची ओळख राज्याच्या राजकारणात महत्त्वाची आहे, त्या कुटुंबातील महिलाही आज सुरक्षित नाहीत. ही अत्यंत धक्कादायक बाब आहे की एकनाथराव खडसे हे ज्या पक्षाचे (भाजपचे) एकेकाळचे मोठे नेते होते आणि ज्यांच्या कन्या संरक्षण मंत्रालयाच्या केंद्रीय मंत्री आहेत, त्या कुटुंबातील महिलेलाही सार्वजनिक ठिकाणी पोलीस संरक्षण असतानाही छेडछाड सहन करावी लागते. जर एका मोठ्या राजकीय घराण्यातील महिलेसोबत अशी घटना घडत असेल, तर सर्वसामान्य महिलांची परिस्थिती किती गंभीर असेल याची कल्पनाच करवत नाही. यामुळेच, महाराष्ट्र सरकार आणि प्रशासन यांना महिला सुरक्षेच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी या मुद्द्यावर सरकारला जाब विचारला आहे. महिलांची सुरक्षितता ही निव्वळ घोषणांपुरती मर्यादित आहे की प्रत्यक्ष कृती केली जात आहे, यावर काँग्रेसने सत्ताधारी भाजपला आव्हान दिले आहे. महाराष्ट्राच्या अनेक भागांत काँग्रेस पक्षाने स्थानिक निवडणुकांमध्ये संमिश्र यश मिळवले आहे. काही ठिकाणी पक्षाची ताकद कमी झाल्याचे चित्र असले, तरी पाचोरा सारख्या ठिकाणी काँग्रेस अजूनही प्रभावी आहे. त्याचे कारण म्हणजे स्थानिक नेतृत्वाची बांधिलकी आणि संघर्षशील भूमिका.
   भाजप सरकारच्या कार्यपद्धतीला लोक नाराज आहेत. महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, महिलांची सुरक्षा यासारख्या अनेक मुद्यांवर सरकारने दुर्लक्ष केले आहे. मात्र, अनेक ठिकाणी काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाने या मुद्यांवर ठोस कृती केली नाही. पाचोऱ्यात मात्र काँग्रेसने आपल्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला थेट आव्हान दिले आहे.
    एकूणच महाराष्ट्रात काँग्रेसची सध्याची स्थिती संमिश्र असली, तरी पाचोऱ्यात मात्र पक्ष सक्रिय आणि संघर्षशील आहे. सचिन दादा सोमवंशी यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाने हे अधोरेखित केले आहे की, राजकीय इच्छाशक्ती आणि स्थानिक नेतृत्वाच्या बळावर काँग्रेस कोणत्याही भागात टिकून राहू शकते आणि प्रभावी भूमिका बजावू शकते. हे आंदोलन हे केवळ एक दिवसापुरते मर्यादित नव्हते, तर यामधून पाचोऱ्यातील काँग्रेसच्या राजकीय जीवनतत्त्वाचा आणि संघर्षशीलतेचा पुनरुच्चार झाला आहे. त्यामुळे राज्याच्या इतर भागांमध्ये काँग्रेसचा प्रभाव किती आहे याची चर्चा वेगळी, पण पाचोऱ्यात काँग्रेसचा सामाजिक आणि राजकीय लढा अजूनही संपलेला नाही.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!