पाचोरा (प्रतिनीधी भोला पाटील ) संपूर्ण पाचोरा तालुका आणि शहरात काही दिवसांपूर्वी आलेल्या अवकाळी वादळी पावसाने अक्षरशः थैमान घातले. जोरदार वाऱ्यांसह आलेल्या या अवकाळी पावसामुळे विजेचे खांब उन्मळून पडले, झाडे रस्त्यांवर आडवी झाली, घरांमध्ये पाणी शिरले, शेतातील पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले. गावोगावी अंधाराचे साम्राज्य पसरले, अनेक भागांमध्ये संपर्क तुटला, तर काही भागात नागरिकांना घरातच अडकून राहावे लागले. या नैसर्गिक संकटसमयी ज्या तीन यंत्रणांनी जीवाची पर्वा न करता, विश्रांती विसरून, झोप आणि अन्न यांचा त्याग करून काम केले, त्या महसूल विभाग, महावितरण कंपनी आणि नगरपालिका प्रशासनाचे कार्य हे समाजसेवेचे उत्तम उदाहरण ठरले. या सर्व कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी या भीषण संकटात केवळ प्रशासनाचे कर्तव्य म्हणून काम न करता, एक मानवी आणि सामाजिक दायित्व म्हणून जबाबदारी पार पाडली. आणि याच कार्याची नोंद घेत पाचोऱ्यातील पत्रकार बांधवांनी या तिन्ही यंत्रणांच्या प्रतिनिधींना भावनिक आणि प्रेरणादायी स्वरूपात सन्मानित करण्याचा निर्णय घेतला होता. पाचोऱ्यातील पत्रकार बांधव छत्रपती शिवाजी महाराज चौकात, हॉटेल नीलमजवळ एकत्र जमले. यानंतर या सर्व पत्रकारांनी महसूल विभाग, महावितरण आणि नगरपालिका या तिन्ही यंत्रणांच्या कार्यालयात जाऊन वर्ग १ ते वर्ग ४ पर्यंतच्या सर्व कर्मचाऱ्यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. या कार्यक्रमात प्रांताधिकारी, तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी, कोतवाल, पटवारी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, सहाय्यक अभियंते, शाखाधिकारी, वीज लाइनमन, सफाई कामगार, जलपुरवठा विभाग, आरोग्य विभाग, वाहनचालक, कार्यालयीन सहाय्यक अशा अनेक पदांवरील कर्मचाऱ्यांचा समावेश होता. प्रत्येक कर्मचाऱ्याच्या चेहऱ्यावर समाधानाचे आणि कृतज्ञतेचे भाव होते. महसूल विभागाचे प्रांताधिकारी, तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी, कोतवाल, पटवारी यांच्यासह आपत्ती व्यवस्थापन पथकांनी संकट सुरू होताच गावोगाव धाव घेतली. पंचनामे, नुकसानीची पाहणी, शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न समजून घेणे आणि शासकीय मदतीचे अहवाल तयार करून वरच्या स्तरावर पाठवणे या साऱ्यांत त्यांनी विलक्षण तत्परता दाखवली. गावागावात पाणी साचले होते, जनावरे वाहून गेली होती, भिंती कोसळल्या होत्या; अशा सर्व ठिकाणी महसूल यंत्रणा मदतीसाठी तत्काळ पोहोचत होती. महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी अतिशय धाडसाने काम केले. अनेक भागांत खांब कोसळले होते, तारा तुटल्या होत्या, ट्रान्सफॉर्मर निकामी झाले होते. काही ठिकाणी खांबांवर झाडे कोसळली होती, त्यामुळे धोका वाढलेला होता. परंतु, या सर्व संकटांच्या पार्श्वभूमीवर वीज कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता कामावर उतरले. अनेकांनी तब्बल 36 तास झोप न घेता, केवळ चहा घेऊन, वीज जोडणीच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. नागरिकांना अंधारातून प्रकाशाकडे नेणारे हे खरे “प्रकाशदूत” ठरले. पालिकेच्या सफाई, बांधकाम, जलपुरवठा व आरोग्य विभागांनी देखील आपापल्या जबाबदाऱ्या उत्तम प्रकारे निभावल्या. गटारे मोकळी करणे, रस्त्यावरचे पाणी हटवणे, झाडांची फांदी साफ करणे, पाणी शिरलेल्या घरांमध्ये मदत करणे, दवंडी देणे, रोगराई टाळण्यासाठी कीटकनाशके फवारणे अशा अनेक महत्त्वाच्या कामांत पालिकेचे अधिकारी व कर्मचारी झपाट्याने कार्यरत होते. कुठेही तक्रारीला वेळ न दवडता उत्तर दिले गेले. या संपूर्ण संकट काळात महसूल विभाग, महावितरण व नगरपालिका प्रशासन यांच्यातील परस्पर समन्वय अभूतपूर्व होता. महसूल विभागाने तयार केलेले अहवाल तातडीने वीज वितरण आणि पालिकेकडे पोहोचवले. महावितरणने पालिकेसोबत मिळून बाधित भागांत वीजप्रवाह सुरळीत केला. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी उघड्यावर पडलेल्या वीज तारांभोवती कुंपण घालून नागरिकांचे रक्षण केले. या तिन्ही यंत्रणांच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच नागरिकांचा त्रास लवकर कमी झाला. सामान्यपणे पत्रकार हे प्रश्न उपस्थित करणारे असतात, परंतु या संकटसमयी पाचोऱ्यातील पत्रकारांनी एक वेगळी आणि उल्लेखनीय भूमिका पार पाडली. त्यांनी प्रशासनाच्या या झोकून देऊन केलेल्या कामगिरीची दखल घेतली आणि त्यांचे आभार मानण्यासाठी हा सन्मान समारंभ आयोजित केला. “फक्त टीका न करता चांगले कार्य देखील लोकांपुढे आणणे हेही पत्रकारितेचे कर्तव्य आहे” हे त्यांनी सिद्ध करून दाखवले.या कार्यक्रमात अनेक पत्रकारांचे डोळे पाणावले. टाळ्यांच्या गजरात, फुलांच्या हारांत आणि मनःपूर्वक कृतज्ञतेच्या शब्दांत झालेला हा सत्कार फक्त औपचारिक नव्हता, तर एक सामाजिक संदेश देणारा होता. “संकट आलं की कधी कधी देव दिसत नाही, पण देवासारखी माणसं नक्की भेटतात”, हे अनेकांच्या ओठांवर होते. या सन्मान सोहळ्यामुळे प्रशासन व नागरिक यांच्यातील सकारात्मक नातेसंबंध अधिक दृढ होण्यास मदत झाली आहे. यापुढील काळात प्रशासन अधिक चांगली सेवा देईल, नागरिक अधिक सहकार्य करतील आणि पत्रकार समाजाला जोडणारा सेतू म्हणून भूमिका पार पाडतील, असा विश्वास यावेळी अनेकांनी व्यक्त केला. पत्रकारांकडून घेतलेला हा उपक्रम म्हणजे केवळ सत्कार नव्हता, तर समाजाला दिलेला एक सकारात्मक संदेश होता – की जेव्हा संकट येते तेव्हा समाजाला उभं राहण्यासाठी प्रशासनाची गरज असते आणि जेव्हा प्रशासन चोख जबाबदारी पार पाडतं तेव्हा समाजाचंही कर्तव्य आहे त्यांचा सन्मान करणे. हा सन्मान त्याच साठी होता – त्यांच्यासाठी ज्यांनी काळोख्या रात्रीही दिवा घेऊन वाट दाखवली.
मुंबई – प्रशासनाच्या विविध पातळ्यांवर सातत्यपूर्ण कामगिरी बजावत, जनतेशी संवाद ठेवत आणि शासनाच्या योजना वास्तवात उतरवण्यासाठी झटणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये मा. गणेश मिसाळसाहेब हे नाव अत्यंत सन्मानाने घेतले जाते. त्यांच्या कार्यक्षमता, सचोटी, प्रामाणिकता आणि सामाजिक बांधिलकीची राज्य शासनाने दखल घेत, दिनांक २२ एप्रिल २०२५ रोजी त्यांना ‘अपर जिल्हाधिकारी’ या मानाच्या पदावर पदोन्नती दिली. या पदोन्नतीनंतर त्यांची नियुक्ती ‘अपर जिल्हाधिकारी (अतिक्रमण निष्कासन), पश्चिम उपनगरे, वांद्रे, मुंबई उपनगर’ या अत्यंत महत्त्वाच्या पदावर करण्यात आली असून, १० जून २०२५ रोजी मा. गणेश मिसाळ साहेब यांनी अधिकृतपणे या पदाचा कार्यभार स्वीकारला. प्रशासनातले त्यांचे हे स्थान म्हणजे केवळ एक
पदनियुक्ती नाही, तर त्यांच्या १६ ते १७ वर्षांच्या अथक सेवेला दिले गेलेले राज्यशासनाचे गौरवचिन्ह आहे. त्यांनी उपजिल्हाधिकारी संवर्गात धुळे, जळगाव, नाशिक आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये प्रभावी आणि लोकाभिमुख सेवा दिली आहे. त्यांनी महसूल संकलन, निवडणूक प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन, सार्वजनिक वितरण व्यवस्था, शासकीय योजना अंमलबजावणी, अतिक्रमण निष्कासन, सामाजिक सुरक्षा योजना आदी क्षेत्रांमध्ये स्वतःचे कसब आणि सजग भूमिका सिध्द केली आहे. खास करून जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील त्यांची सेवा विशेषत्वाने उल्लेखनीय आहे. यामध्ये सर्व प्रथम पाचोरा येथील प्रांताधिकारी म्हणून कार्यरत असताना सध्या अपर जिल्हाधिकारी पदावर कार्यरत असलेल्या गणेश मिसाळसाहेबांनी आपल्या प्रशासकीय कार्यकौशल्याने राज्य शासनाच्या विविध योजनांना दिशादर्शक व प्रेरणादायी बनवले आहे. त्यांच्या कार्यकाळातील एक महत्त्वपूर्ण
निर्णय म्हणजे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्राबाबत घेतलेली दूरदृष्टीपूर्ण भूमिका. शासन निर्णयाचा सखोल अभ्यास करून त्यांनी नोंद घेतली की दरवर्षी नव्याने नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र काढण्याच्या प्रक्रियेमुळे विद्यार्थी आणि पालकांना वेळ, पैसा आणि त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे त्यांनी यावर शासकीय परिपत्रकाचा चिकित्सकपणे सखोल अभ्यास करून व शब्दांचा योग्य तो अर्थ लावून तब्बल तीन वर्षांसाठी वैध असलेले नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि तो अमलात आणला. प्रारंभी जिल्हास्तरीय प्रयोग म्हणून राबवलेला हा उपक्रम इतका यशस्वी ठरला की त्याच्या परिणामांचा अभ्यास करून सदरची बाब शासन दरबारी वरीष्ठ स्तरावर सादर केल्या नंतर राज्य शासनाने क्षणाचाही विलंब न करता संपूर्ण महाराष्ट्रातच तीन वर्ष वैध असलेले नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र देण्याचे अधिकृत आदेश निर्गमित केले. या निर्णयामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना मोठा दिलासा मिळाला. शिक्षण, नोकरी, शिष्यवृत्ती अशा विविध शासकीय योजनांमध्ये सहभागी होण्यासाठी नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्राचा अडथळा दूर झाल्याने त्यांना स्थिर आणि विश्वासार्ह कागदपत्र उपलब्ध झाले. या ऐतिहासिक बदलामुळे विद्यार्थी वर्गामध्ये त्यांच्या कार्याची विशेष चर्चा आणि प्रशंसा होत असून, ते विद्यार्थ्यांमध्ये एका समर्पित आणि जनहितैषी अधिकाऱ्याच्या रूपात ओळखले जात आहेत. शासन निर्णयांचा केवळ अंमलबजावणी करणारा अधिकारी न राहता, निर्णयाच्या मूलभूत अर्थाचा अभ्यास करून समाजहितासाठी तो योग्य प्रकारे अंमलात आणणारा विचारवंत अधिकारी म्हणून त्यांनी स्वतःची वेगळी छाप निर्माण केली आहे.याचबरोबर त्यांनी पाचोरा तालुक्यात कार्यरत असताना “जलयुक्त शिवार अभियान” अंतर्गत जलसंधारणाचे अत्यंत महत्त्वाचे काम केले. त्यावेळी पावसाच्या अपुरी पातळीमुळे शेतकरी संकटात होते. पाणी अडवणे, साठवणे व भूजल पुनर्भरणाच्या दृष्टीने त्यांनी काटेकोर नियोजन करून प्रत्यक्ष कामावर भर दिला.त्यांच्या प्रयत्नांमुळे या अभियानात उल्लेखनीय यश मिळाले आणि शिवारातील बऱ्याच ठिकाणी पाणी उपलब्ध झाले. त्यांचे काम इतके प्रभावी ठरले की तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः एक तास या शिवारात थेट उपस्थित राहून विविध प्रकल्पांची पाहणी केली. एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील काम इतके प्रेरणादायी असू शकते, हे त्यांनी प्रत्यक्ष दाखवून दिले.या दोन्ही कामांमुळे — नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्रासंदर्भातील शासन निर्णयाचा प्रभावी अंमल आणि जलयुक्त शिवार अभियानातील यशस्वी अंमलबजावणी — त्यांचं नाव राज्यभर विशेष उल्लेखनीय ठरले आहे. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे ते प्रशासनात केवळ एक अधिकारी म्हणून नव्हे, तर समाजहितासाठी झटणारा मार्गदर्शक अधिकारी म्हणून ओळखले जातात. आज अनेक विद्यार्थी, शेतकरी आणि सामान्य नागरिक त्यांच्या या दूरदृष्टीच्या निर्णयाचे लाभार्थी आहेत. अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांमुळेच प्रशासनाविषयी लोकांचा विश्वास अधिक दृढ होतो. तसेच आदिवासीबहुल, दुर्गम, सीमित साधनसंपत्तीचा आणि मूलभूत सुविधांचा अभाव असलेला नंदुरबार हा जिल्हा अनेक अडचणींचा सामना करत असतो. अशा ठिकाणी त्यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून दोन वर्षे स्वखुशीने सेवा दिली. सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून अन्नधान्य गरजूंपर्यंत पोहोचवणे, त्यामध्ये पारदर्शकता ठेवणे, स्थानिक प्रतिनिधींशी संवाद ठेवून उपाययोजना करणं, आणि सर्वसामान्य माणसाची सोय व्हावी म्हणून अतिरिक्त मेहनत घेणं हे त्यांच्या कामाचं वैशिष्ट्य राहिलं. मा. गणेश मिसाळसाहेब यांनी काम करत असताना केवळ कार्यालयीन व्यवहारापुरतीच भूमिका न बजावता, प्रत्येक कार्यात मानवी चेहरा ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या कामात केवळ कायदाशास्त्र नव्हते, तर संवेदनशीलता, माणुसकी आणि आस्थाही होती. नंदुरबारमधील अनेक गावांमध्ये त्यांनी प्रत्यक्ष भेटी दिल्या, स्थानिक लोकांच्या
पदोन्नती निमित्त नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सत्कार व निरोप समारंभ
अडचणी समजून घेतल्या आणि त्या सोडवण्यासाठी यंत्रणेला दिशा दिली. पदोन्नतीनंतर त्यांच्या सेवेत काही काळासाठी आणखी एक जबाबदारी देण्यात आली. महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळ (MSSIDC), मुंबई येथे त्यांची सह व्यवस्थापकीय संचालक तथा अपर जिल्हाधिकारी म्हणून तीन आठवड्यांसाठी नियुक्ती करण्यात आली. येथे त्यांनी लघुउद्योगांना चालना देण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेतले. त्यांनी लघुउद्योजकांना शासकीय योजना सुलभपणे समजावून दिल्या, प्रक्रियेत सुधारणा केल्या आणि डिजिटल प्लॅटफॉर्मचा अधिकाधिक वापर करून पारदर्शकतेला चालना दिली. अल्पावधीतच त्यांनी या महामंडळात सकारात्मक परिणाम घडवून आणले. सध्या त्यांनी जी जबाबदारी स्वीकारली आहे ती ‘अपर जिल्हाधिकारी (अतिक्रमण निष्कासन), पश्चिम उपनगरे, वांद्रे, मुंबई उपनगर’ ही आहे. ही भूमिका अतिशय
अपर जिल्हाधिकारी (अतिक्रमण निष्कासन) वांद्रे, मुंबई उपनगर येथे रूजू झाल्या नंतर त्याचे स्वागत करतांना अधिकारी व कर्मचारी परिवार
संवेदनशील आणि गुंतागुंतीची मानली जाते. मुंबईसारख्या महानगरात अतिक्रमण ही एक सततची समस्या असून, यामध्ये कोर्टाचे आदेश, राजकीय हस्तक्षेप, नागरिकांच्या भावना, सामाजिक प्रश्न आणि कायदेशीर पेच या सगळ्यांचा समतोल राखणे ही मोठी प्रशासकीय कसोटी असते. अशा भूमिकेसाठी अनुभव, संयम, समन्वयक्षमता आणि स्पष्ट धोरण आवश्यक असते – आणि मा. गणेश मिसाळसाहेब या सर्व निकषांवर ते अत्यंत योग्य अधिकारी ठरतात. त्यांचा अनुभव धुळे, जळगाव, नाशिक आणि नंदुरबारसारख्या विविध भौगोलिक व सामाजिक पार्श्वभूमीच्या जिल्ह्यांमध्ये काम करण्याचा आहे. त्यांनी लोकसंख्येचे वेगळेपण, सामाजिक गरजांचा भान, आणि स्थानिक लोकसंवाद याचा नेहमीच अभ्यास केला आहे. त्यांच्या कार्यशैलीचा एक ठळक विशेष म्हणजे कोणत्याही पदावर असताना त्यांनी ‘माणसांत जाऊन माणसांसोबत काम’ केलं. कार्यालयाच्या बाहेर जाऊन प्रत्यक्ष जनतेत मिसळण्याची आणि त्यांच्या अडचणी ऐकण्याची तयारी ही त्यांच्या नेतृत्वशैलीची ओळख आहे.त्यांनी आपली प्रशासकीय सेवा ही केवळ कर्तव्यपूर्ती म्हणून न बजावता, ती एक सामाजिक जबाबदारी मानून ती पार पाडली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात लोक ज्या अपेक्षेने येतात, त्या अपेक्षा पुर्ण करण्यासाठी त्यांनी आवश्यक बदल, सुधारणा आणि निर्णय घेतले. अनेक लोकांचे अर्ज, तक्रारी, विनंत्या त्यांना वैयक्तिक पातळीवर पोहोचल्यावर ते गांभीर्याने त्यावर कार्यवाही करत. त्यामुळे त्यांच्याबाबत लोकांमध्ये आदरयुक्त आत्मीयता निर्माण झाली आहे.त्यांचा स्पष्ट विश्वास आहे की प्रशासकीय पद ही केवळ सत्ता नाही, तर ही सेवा आहे. जनतेचे विश्वासार्ह प्रतिनिधी म्हणूनच त्यांनी स्वतःला नेहमी सिद्ध केले आहे. अधिकारी असूनही, त्यांनी लोकांसमोर ‘आपला माणूस’ म्हणूनच वावरले आहे. आदिवासी भागात, त्यांनी स्थानिक बोलीभाषेत संवाद साधून अनेक समस्यांचे निरसन सहज आणि संवेदनशीलतेने केलं. प्रशासनाच्या दारात येणारा प्रत्येक सामान्य माणूस त्यांच्यासाठी केंद्रबिंदू ठरतो – हे त्यांच्या प्रत्येक कृतीतून जाणवतं मुंबईसारख्या महाकाय शहरात, अतिक्रमणसंबंधीच्या कामात अंमलबजावणी, न्यायालयीन आदेशांची अचूक पूर्तता, कायदेशीर प्रक्रिया, स्थानिक स्वराज्य संस्थांचा समन्वय, आणि संवेदनशील वस्तींचे स्थानांतरण यासारख्या आव्हानांना सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर, त्यांच्या सारख्या अनुभवी आणि लोकाभिमुख अधिकाऱ्याची नियुक्ती म्हणजे शासनाचा अत्यंत चपखल निर्णय म्हणावा लागेल. मा. गणेश मिसाळ साहेब यांना प्रशासकीय कारभाराबरोबरच शासकीय जमीन, महसूल संकलन, ग्रामीण विकास योजनांची रचना, अंमलबजावणी, रोजगार हमी योजनेची कार्यवाही, पंचनामे, आणि संकट निवारणाचे काम यामध्ये विशेष पारंगतता प्राप्त झाली आहे. त्यांनी आपल्या सेवेत दरवेळी नवीन गोष्टी शिकण्याची आणि ती अंमलात आणण्याची वृत्ती ठेवली आहे.पदोन्नतीच्या या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर मा. गणेश मिसाळ साहेब यांनी ‘ध्येय न्यूज’ व ‘झुंज’ वृत्तपत्राशी बोलताना आपल्या कुटुंबीय, वरिष्ठ अधिकारी, सहकारी कर्मचारी, मित्रपरिवार आणि नागरिकांचे आभार मानले. त्यांनी नम्रपणे सांगितले की, “मी आज ज्या टप्प्यावर आहे, तिथे पोहोचण्यासाठी अनेकांचा वाटा आहे. वरिष्ठांचे मार्गदर्शन, सहकाऱ्यांचे सहकार्य आणि जनतेचा विश्वास यामुळेच मी आज या पदावर काम करण्यास सक्षम आहे.”त्यांनी पुढे नमूद केले की, “मुंबई उपनगरात अतिक्रमण हा विषय अत्यंत गुंतागुंतीचा असून, यात नियमानुसार, पण मानवतेचा विचार करून काम करण्याची आवश्यकता आहे. जनतेचा विश्वास जपणे, कायद्याचे पालन करणे आणि व्यवस्थेचा आदर राखणे हे माझे मुख्य उद्दिष्ट राहील.” त्यांच्या कार्यशैलीमुळे त्यांच्याबद्दल अनेक राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय वर्तुळात सन्मान आणि विश्वास आहे. त्यांच्या पारदर्शक धोरणांनी आणि माणुसकीच्या स्पर्शाने त्यांनी अनेकांना न्याय मिळवून दिला आहे. म्हणूनच, आज जेव्हा त्यांना महाराष्ट्र शासनाकडून अपर जिल्हाधिकारी या पदावर पदोन्नती मिळते, तेव्हा ती केवळ अधिकाऱ्याची पदोन्नती नसून, एक सेवाभावी विचारांची व मानवी संवेदनांची पदोन्नतीही आहे. मा. गणेश मिसाळसाहेब यांच्या या पुढील कार्यकाळासाठी ‘ध्येय न्यूज’ आणि ‘झुंज’ परिवारातर्फे त्यांना मन:पूर्वक शुभेच्छा आणि सशक्त प्रशासनाच्या या प्रवासाला सलाम.
पाचोरा – शहराच्या धार्मिक व आध्यात्मिक वर्तुळातील एक तेजस्वी तारा आज मालवला… ज्योतिषशास्त्र, वेदशास्त्र, कर्मकांड, पारंपरिक पूजा विधी व धर्ममार्गदर्शन या क्षेत्रात तब्बल साडे सहा दशके अखंड सेवा देणारे चंद्रकांत वसंत जोशी उर्फ चंदू गुरुजी (वय ८४, रा. कोंडवाडा गल्ली, पाचोरा) यांचे वृद्धापकाळाने आज, दिनांक १८ जून २०२५ रोजी पहाटे १:४१ वाजता निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण पाचोरा शहरात हळहळ व्यक्त होत असून, अध्यात्म क्षेत्रातील एक युग संपल्याची भावना भाविकांमध्ये दिसून येत आहे. चंदू गुरुजी हे गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्याने त्रस्त होते. अखेर वृद्धापकाळामुळे त्यांनी अखेरचा श्वास आपल्या कोंडवाडा गल्लीतील राहत्या घरी घेतला. त्यांच्या अंत्ययात्रेची निघण्याची वेळ आज दुपारी २ वाजता निश्चित करण्यात आली असून यांची अंत्ययात्रा कोंडवाडा गल्ली राहते घर पांचाळेश्वरनगर येथून निघणार आहे. गुरुजींच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबावर, नातेवाईकांवर तसेच शहरातील धार्मिक कार्यात सहभागी होत आलेल्या असंख्य भक्तगणांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. चंदू गुरुजी यांचे पाचोरा-भडगाव तालुक्यातच नव्हे तर उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यात एक अत्यंत मान्यवर व आदरणीय नाव त्यांनी आपल्या आयुष्याचे तब्बल ६५ वर्षे देवधर्माच्या कार्याला समर्पित केली. विवाह, मुंज, वास्तुशांत, सत्यनारायण पूजा, श्राद्धकर्म, नवग्रह शांती, नवचंडी, ग्रहशांती आदी पूजाविधी त्यांनी शास्त्रोक्त पद्धतीने पार पाडले. त्यांच्या मुखातील वेदस्वर आणि मंत्रोच्चाराचा अद्वितीय ठसा श्रोत्यांच्या मनावर कोरला जात असे. चंदू गुरुजी केवळ पूजाविधी करणारे कर्मकांडविशारद नव्हते, तर त्यांनी प्रत्येक शंका घेऊन येणाऱ्या व्यक्तीच्या मनोव्यथा समजून घेतल्या. त्यांच्या कडे आलेला प्रत्येक जण समाधान आणि सकारात्मकता घेऊनच परत जात असे. त्यांनी नव्हे तर पिढ्यानपिढ्या त्यांच्या मार्गदर्शनावर अवलंबून असलेले असंख्य भक्तगण पाचोरा, भडगाव, जामनेर, बोदवड, एरंडोल, जळगाव, सोयगाव व परिसरातून त्यांच्या भेटीला यायचे. त्यांच्या बोलण्यातली समजूतदार भाषा, प्रगल्भता आणि अनुभवी दृष्टिकोनामुळे समाजात त्यांच्याविषयी विलक्षण आदर होता. कित्येकांनी आपल्या आयुष्यातील अडथळे त्यांच्या सल्ल्याने दूर केल्याची अनेक उदाहरणे आहेत. चंदू गुरुजींच्या पश्चात त्यांच्या तीन मुले, सुना, नातवंडे, दोन भाऊ, वहिनी असा मोठा परिवार आहे. पाचोरा शहरातीलच रहिवाशी व भारत देशात व विदेशात प्रख्यात राजकीय , शासकीय, तसेच विशेष प्राख्यात सेलिब्रेटीचे ज्योतिष विशारद गजानन जोशी गुरुजी यांचे ते काका होते. वडिलोपार्जित परंपरेचा वारसा त्यांनी केवळ जपला नाही तर नव्या पिढीपर्यंत पोहोचवला. त्यांनी आपल्या मुलांनाही धर्म, शास्त्र, श्रद्धा आणि सेवा यांचे महत्त्व दिले. गेल्या अनेक दशकांमध्ये चंदू गुरुजींनी केवळ धार्मिक विधी नव्हे, तर समाजप्रबोधनही साधले. नवसाचे विधी, वास्तुशांतीसाठी येणाऱ्या कुटुंबांना त्यांनी अंधश्रद्धांपासून दूर ठेवत विज्ञानाधिष्ठित अध्यात्माचे मार्गदर्शन दिले. त्यांच्या हातून झालेली प्रत्येक पूजा हा भक्तांसाठी एक आध्यात्मिक अनुभव ठरायचा. मंत्रोच्चाराचे परिणाम अनुभवणारे अनेक शेकडो लोक त्यांच्या शेवटच्या दर्शनासाठी येत आहेत. पाचोरा शहराला अध्यात्म, संस्कृती आणि धर्मशास्त्राचा मार्ग दाखवणारा दीपस्तंभ आता निघून गेला आहे. परंतु त्यांच्या शिकवणीचा प्रकाश त्यांच्या शिष्यांद्वारे, कुटुंबीयांद्वारे आणि भक्तगणांद्वारे पुढील पिढ्यांमध्ये नक्की पोहचत राहील.आज दिनांक १८ जून रोजी दुपारी २ वाजता त्यांच्या राहत्या घरी – कोंडवाडा गल्ली, पाचोरा येथून त्यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात होणार आहे. अनेक धार्मिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक, राजकीय नेते आणि वडिलोपार्जित भक्त परिवार त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. चंदू गुरुजींचा शांत, संयमी, श्रद्धेचा आणि ज्ञानाचा प्रवास आज संपला. परंतु त्यांच्या स्मृती, त्यांचे शब्द, त्यांचे पूजाविधी आणि ज्योतिष मार्गदर्शन अजूनही हजारो मनांत चिरंतन जिवंत आहेत. चंदू गुरुजींच्या परिवाराच्या दुःखात झुंज वृत्तपत्र व ध्येय न्यूज परिवार सह संपादक संदीप महाजन सहभागी आहे ओम् शांती।
पाचोरा – शासनाच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठीचा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर पा.ता.सह. शिक्षण संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या पाचोरा येथील श्री गो. से. हायस्कूल मध्येही आज सकाळी ७ वाजता शाळा प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. या प्रसंगी शाळेच्या परिसरात नवचैतन्य, सजावट, स्वागत आणि विद्यार्थ्यांच्या आनंदाचे वातावरण अनुभवायला मिळाले. मान्यवरांची उपस्थिती आणि स्वागत प्रवेशोत्सवाच्या या कार्यक्रमाला शालेय व्यवस्थापन समितीचे चेअरमन खलील दादा देशमुख, तांत्रिक विभाग प्रमुख वासुदेव महाजन, संस्थेचे सदस्य सतीश नारायण चौधरी, विद्यालयाचे मुख्याध्यापक एन. आर. पाटील, उपमुख्याध्यापक आर. एल. पाटील, पर्यवेक्षिका सौ. अंजली गोहिल, तसेच आर. बी. तडवी व एस. एन. पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. याशिवाय सकाळ सत्रातील सर्व शिक्षक-शिक्षिका आणि पालकांनीही उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ पारंपरिक पद्धतीने रांगोळी सजवण्यात आली होती. सुंदर फलक लेखनाने शाळेचे प्रवेशद्वार आकर्षक दिसत होते. प्रत्येक येणाऱ्या पालक आणि विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. या उत्सवी वातावरणात नव्या शैक्षणिक वर्षाची सुरूवात झाली.विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक संच वाटप कार्यक्रमाच्या मुख्य भागात इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रतीकात्मक स्वरूपात पाठ्यपुस्तक संचाचे वाटप करण्यात आले. ही केवळ पुस्तकांची देणगी नव्हे, तर ज्ञानाच्या दारात प्रवेश करण्याची संधी होती. प्रत्येक विद्यार्थ्याला गुलाबपुष्प, पुस्तकांचे संच आणि अल्पोपहार देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. या प्रसंगी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, कौतुक आणि उत्सुकतेचे भाव स्पष्टपणे दिसत होते. व्यवस्थापन समितीचे मार्गदर्शन शाळा व्यवस्थापन समितीचे चेअरमन खलील दादा देशमुख यांनी आपल्या भाषणात पालक आणि विद्यार्थ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. शिक्षण हे केवळ नोकरी मिळवण्यासाठी नसून जीवन समृद्ध करण्याचे साधन आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. पालकांनी आपल्या पाल्यांचा शैक्षणिक प्रवास सक्षमपणे पार पडावा यासाठी सातत्याने शाळेशी संपर्कात राहण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. तांत्रिक विभाग प्रमुख वासुदेव महाजन यांनीही विद्यार्थ्यांना नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की आजच्या युगात तांत्रिक कौशल्ये आत्मसात करणं अनिवार्य झालं असून, विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातच त्याकडे लक्ष द्यावे.सतीश नारायण चौधरी यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देताना शाळेतील सुवर्ण परंपरेचा उल्लेख केला आणि सांगितले की, श्री गो. से. हायस्कूल ही केवळ शिक्षणाची जागा नसून विद्यार्थी घडविण्याचा एक तीर्थक्षेत्र आहे. शिक्षकांचे योगदान मुख्याध्यापक एन. आर. पाटील यांनी कार्यक्रमाचे स्वागतपर भाषण करताना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला. त्यांनी यावेळी सांगितले की, “विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हाच आमचा खरा उद्देश आहे.” उपमुख्याध्यापक आर. एल. पाटील यांनी पालक व शिक्षक यांच्यात सुसंवाद राहावा यावर भर दिला आणि विद्यार्थीहितासाठी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे आवाहन केले. पर्यवेक्षिका सौ. अंजली गोहिल यांनी शाळेतील विविध उपक्रमांविषयी माहिती दिली आणि नवीन शैक्षणिक वर्षात मुलांसाठी कसे नियोजन करण्यात आले आहे हे समजावून सांगितले. आर. बी. तडवी आणि एस. एन. पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना सकारात्मक विचार, नियमित अभ्यास व आत्मविश्वास यांची प्रेरणा दिली. सजावट आणि संस्कृतीचे दर्शन प्रवेशोत्सव हा शाळेच्या बाह्य सजावटीपुरता मर्यादित नव्हता, तर विद्यार्थ्यांच्या मनात नवीन ऊर्जा भरणारा एक सांस्कृतिक प्रसंग होता. कार्यक्रमाच्या ठिकाणी पारंपरिक रांगोळी, रंगीबेरंगी पताका, प्रेरणादायक घोषवाक्ये असलेले फलक लावण्यात आले होते. या सर्व सजावटी विद्यार्थ्यांनाच नव्हे, तर उपस्थित पालक व मान्यवरांनाही भारावून टाकणाऱ्या होत्या. गुलाबपुष्प आणि अल्पोपहार इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना स्वागत स्वरूपात गुलाबपुष्प देण्यात आले. त्यानंतर अल्पोपहाराचेही आयोजन करण्यात आले होते. मुलांनी आनंदाने उपहार घेतला आणि पालकांनी शाळेच्या नियोजनाचे कौतुक केले. काही पालकांनी आपली मते व्यक्त करत शाळेतील शिक्षणपद्धती, वातावरण आणि कौटुंबिक सहभाग याबाबत समाधान व्यक्त केले.उत्सवाची सांगता आणि नव्या वर्षाची सुरुवात कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. विद्यार्थ्यांच्या उत्साहात भर घालणारा हा कार्यक्रम त्यांच्या शिक्षण प्रवासाची उजळणी करणारा ठरला. नव्या संकल्प, नवीन पुस्तके, नवीन वर्ग शिक्षक आणि नवीन ध्येय यांच्यासह २०२५-२६ हे शैक्षणिक वर्ष मोठ्या आत्मविश्वासाने सुरू झाले. पाचोऱ्यातील श्री गो. से. हायस्कूल मध्ये संपन्न झालेला प्रवेशोत्सव हा केवळ औपचारिक कार्यक्रम नव्हता, तर ज्ञानाच्या मंदिरात प्रवेश करत असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनातील अत्यंत भावनिक, सन्माननीय आणि संस्मरणीय क्षण ठरला. नव्या शैक्षणिक वर्षात सर्व विद्यार्थ्यांना यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देत शाळा व्यवस्थापनाने त्यांचे अभिनंदन केले आणि आपल्या जबाबदारीची जाणीवही पुनः एकदा अधोरेखित केली.
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्प २०२४–२५ मधील आदिवासी घटकासाठी केलेल्या तरतुदी आणि प्रत्यक्ष खर्च यामधील गंभीर तफावत अधोरेखित करणारी अभ्यासपूर्ण विश्लेषणात्मक पुस्तिका १६ जून २०२५ रोजी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या आदिवासी विकास केंद्रातर्फे प्रकाशित करण्यात आली.
“महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्प २०२४–२५ — आदिवासींसाठी अंदाजपत्रकीय तरतूद व खर्च विश्लेषण” या अहवालाचे प्रकाशन प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या हस्ते झाले.
अहवालातील मुख्य निरीक्षणे:
आरोग्य विभागासाठी मंजूर तरतूद ₹२५,०१५ कोटी, प्रत्यक्ष खर्च ₹२०,०५० कोटी (~८०%)
शिक्षण विभागासाठी मंजूर तरतूद ₹८९,७०५ कोटी, प्रत्यक्ष खर्च सुमारे ₹८३,३०० कोटी
प्राथमिक आरोग्य केंद्र, पोषण आहार योजना, मातामृत्यू रोखण्याच्या योजना यामध्ये अंमलबजावणी अपुरी
आश्रमशाळा, मुलींसाठी छात्रावास योजना यासाठी निधी रखडलेला
विविध क्षेत्रांतील अंदाजपत्रकीय तरतुदींपैकी मोठा निधी इतर विभागांकडे वर्ग करण्यात आल्याचे निदर्शनास आले
तज्ज्ञांचे मत:
प्रा. गीतांजय साहू (वनहक्क अभ्यासक) यांनी सांगितले की, “वनहक्क कायद्याअंतर्गत तात्पुरती जमीन मिळाली तरी उपजीविका योजनांची अंमलबजावणी होत नाही.”
प्रा. रवी गावित म्हणाले, “शालेय गळती रोखण्यासाठी समर्पित निधींचा प्रभावी वापर होणे आवश्यक आहे. सध्या आदिवासी योजनांसाठी असलेल्या निधीपैकी ५०% हेसुद्धा प्रत्यक्ष वापरले जात नाही.”
डॉ. वैशाली पाटील यांनी अधोरेखित केले की, “७०% शेतकरी स्त्रिया या आदिवासी समाजातून असूनही, त्यांच्यासाठी असलेल्या योजनांमध्ये भेदभाव दिसतो.”
विठ्ठल लाड यांनी शहरी आदिवासींसाठी योजना अस्तित्वात असल्या तरी प्रत्यक्ष लाभ मिळत नाही, हे नमूद करताना म्हणाले की, “गौण वनोत्पादनाला बाजारपेठ मिळावी, यासाठी ठोस धोरण गरजेचे आहे.”
सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शिंदे यांनी यावर स्पष्ट टिप्पणी करत सांगितले, “१४ वर्षांत वनहक्क कायदा केवळ ३३०० गावांमध्ये राबवण्यात आला. फक्त ‘ट्रायबल सब-कॉम्पोननंट’ म्हणून नाव बदलल्याने काहीही बदल होत नाही. स्वतंत्र ऑडिट यंत्रणा, तिमाही जिल्हास्तरीय अहवाल, आणि स्थानिक प्रतिनिधित्व बंधनकारक करणे आवश्यक आहे.”
अहवालाची प्रमुख मागणी:
आदिवासी उपयोजनांवर स्वतंत्र श्वेतपत्रिका जाहीर करावी
बजेटवरील लोकनियंत्रण वाढवावे
स्थानिक स्वशासन आणि ग्रामसभांना आर्थिक निर्णयात सक्रिय सहभागी करावे
प्रभावी अंमलबजावणीसाठी विभागीय समन्वय वाढवावा
कार्यक्रमाचा समारोप करताना दत्ता बाळसाराफ यांनी सांगितले, “हा अहवाल केवळ आकडेवारी सादर करणारा नाही, तर धोरणात्मक मार्गदर्शन करणारा महत्त्वाचा दस्तऐवज ठरेल. राज्य शासनाने आता जबाबदारीची ठोस पावले उचलायला हवीत.”
संपूर्ण अहवालात आरोग्य, शिक्षण, कृषी, स्थलांतर आणि वनहक्कासारख्या क्षेत्रांमध्ये जाहीर तरतूद आणि प्रत्यक्ष खर्च यामधील मोठ्या तफावतींचे वास्तव स्पष्ट केले गेले आहे. आदिवासी समाजाच्या विकासासाठी रचण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पीय योजनेला केवळ आकड्यांपुरते मर्यादित ठेवू नये, तर ती जमिनीवर परिणाम करणारी ठरावी, असा ठाम सूर उपस्थित मान्यवरांनी मांडला.
सदर पुस्तिका धोरण निर्मात्यांसाठी मार्गदर्शक ठरेल आणि पुढील वाटचालीत आदिवासी हितसंपादनाचे खरे प्रतिबिंब ठरू शकेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
पाचोरा – तालुक्यातील सारोळा बु. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दिनांक १६ जून २०२५ रोजी नवीन शैक्षणिक वर्षाच्या स्वागतासाठी पारंपरिक पद्धतीने आणि मोठ्या उत्साहात ‘शाळा प्रवेशोत्सव’ साजरा करण्यात आला. शिक्षणाची गोड सुरुवात, विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, आणि पालकांचा सहभाग यामुळे संपूर्ण परिसरात शिक्षणाविषयी सकारात्मक वातावरण निर्माण झाले. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सकाळी शाळेतील शिक्षक, विद्यार्थ्यांचे पालक आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले. प्रभातफेरीत ‘शाळा चलो’, ‘विद्यार्थ्यांनो शाळेत चला’, ‘ज्ञान हेच शक्तीचे रूप आहे’ अशा घोषणा देत मुलांनी साऱ्या गावातून मिरवणूक काढली. ही प्रभातफेरी म्हणजे एक सामाजिक जागृती अभियानच ठरले. शाळेच्या शिक्षण गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची जाणीव ग्रामस्थांना करून देण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला. प्रवेशोत्सवाच्या मुख्य कार्यक्रमात तालुका कृषी अधिकारी कराड साहेब यांनी शाळेला भेट दिली. त्यांच्या हस्ते शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प व चॉकलेट देऊन स्वागत करण्यात आले. यासोबतच प्रत्येक नवोदित विद्यार्थ्याला त्यांच्या शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या पुस्तकांचे आणि गणवेशाचे वितरण करण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आणि आनंद द्विगुणीत झाला. कार्यक्रमास ग्रामपंचायतचे उपसरपंच वाल्मीक पाटील, ग्रामपंचायत सदस्य अविनाश देशमुख, ग्रामपंचायत सदस्य जनाबाई गाडेकर, ग्रामसेवक नंदकिशोर गोराडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश पाटील, समितीचे इतर सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान उपस्थित पालकांशी संवाद साधण्यात आला. मुलांच्या शिक्षणामध्ये पालकांचा सहभाग किती महत्त्वाचा आहे याबाबत शिक्षकांनी तसेच मान्यवरांनी मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी कराड साहेब यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “आज शिक्षण हे केवळ शाळेपुरते मर्यादित नसून, ते भविष्यातील सक्षम नागरिक घडवण्याचे सर्वात मोठे माध्यम आहे. पालकांनी मुलांच्या शिक्षणात सक्रिय सहभाग घेतला पाहिजे.” ग्रामपंचायत उपसरपंच वाल्मीक पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “गावातील शाळा ही आपली शिक्षणसंस्कृती जपणारी संस्था आहे. तिचे जतन आणि विकास हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून शाळेच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत.” गुलाबाच्या फुलांचा सुगंध, चॉकलेटचा गोडवा आणि नव्या पुस्तकांचा वास यांनी शाळेचा पहिला दिवस संस्मरणीय बनवला. नवोदित विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत नवा उमंग आणि स्वप्नांची झिलमिल झलक दिसून येत होती. शिक्षकांनीही नव्या वर्षाच्या नव्या संकल्पांसह शिक्षणाचे व्रत हाती घेतले. शाळेचे मुख्याध्यापक विनोद धनगर यांनी कार्यक्रमाचे संयोजन आणि सूत्रसंचालन अत्यंत सुबकपणे केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक राजाराम राठोड, वैशाली चव्हाण, मयुरी पाटील यांनी विशेष मेहनत घेतली. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेच्या इमारतीला आकर्षक फुगे, रंगीबेरंगी पताका आणि शुभेच्छा फलकांनी सजवण्यात आले होते. या प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने गावातील विविध घटक – ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती, पालक व शिक्षक – हे सर्व एका ध्येयासाठी एकवटले होते : आपल्या मुलांसाठी उत्तम शिक्षणाची उपलब्धता निर्माण करणे. अशा उपक्रमामुळे केवळ शाळेची प्रतिमा उजळत नाही, तर समाजात शिक्षणाबाबत जागरूकता निर्माण होते. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करताना सांगितले, “शाळेतील प्रत्येक विद्यार्थी हा आमच्या गावाचा उज्वल भविष्य आहे. त्यांना दर्जेदार शिक्षण देणे हे आपले सामूहिक कर्तव्य आहे. आम्ही शाळेच्या प्रत्येक गरजेसाठी तत्पर राहू.” या प्रवेशोत्सवानंतर शाळेत विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांसाठी संगणक शिक्षण, योगाभ्यास, चित्रकला, संगीत शिक्षण, वाचन संस्कार तसेच विज्ञान-गणित कार्यशाळा यांचे आयोजन करण्यात येणार आहे. याशिवाय, पालक-शिक्षक संघटनेच्या बैठका, शिक्षकांचे प्रशिक्षण आणि विद्यार्थ्यांसाठी बालसभा यांद्वारे संपूर्ण वर्षभर शाळा गतीमान ठेवली जाणार आहे. शाळेच्या या सकारात्मक वाटचालीत जिल्हा परिषद व पंचायत समिती पातळीवरून देखील सहकार्य मिळत असून शाळेच्या भौतिक सुविधांच्या उभारणीसाठी प्रस्ताव पाठवले गेले आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरातील शाळांप्रमाणेच शिक्षण सुविधा मिळाव्यात यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे. सारोळा बु. येथील जिल्हा परिषद शाळेतील प्रवेशोत्सव हा केवळ एक औपचारिक कार्यक्रम नव्हता. तो शिक्षणाच्या आणि सामाजिक सहभागाच्या नव्या पर्वाची सुरुवात होती. गाव, शाळा आणि पालक यांच्या त्रैसंधीने घडलेला हा उपक्रम शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यासाठी प्रेरणादायी ठरला. अशीच एकजूट टिकवली गेल्यास, ग्रामीण भागातील शाळाही शैक्षणिक उत्कर्षाच्या दिशेने निश्चितपणे पुढे जातील. सारोळा बु. सारख्या ग्रामीण भागातील शाळांमध्ये जेव्हा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा होतो, तेव्हा तो फक्त शाळेपुरता न राहता संपूर्ण समाजाचे भवितव्य उजळवतो. हेच खरे शिक्षणाचे यश आहे.
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : सोशल वर्कर्स असोसिएशन फॉर मेडिकल एज्युकेशन अँड एन्व्हायर्नमेंट (स्वामी), परळ या सेवाभावी संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी राबवली जाणारी विद्यार्थी सहाय्य योजना यंदाही उत्साहात पार पडली. या वर्षी सुमारे ३१० गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले. सदर उपक्रम स्वामी संस्थेच्या कार्यालयाबाहेर पार पडला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ. यतीन पटेल आणि सीए श्रीकांत कुलकर्णी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरेश लाड (संस्थाध्यक्ष) होते. या प्रसंगी मोहन कटारे (कार्याध्यक्ष), वैशाली शिंदे (उपाध्यक्ष), उल्हास हरमळकर (खजिनदार), गोविंद राणे (सचिव), रचना खुळे, प्रतिभा सावंत, रश्मी नाईक, प्रतिभा सकपाळे, योगिनी लाड, सुमंगल गुरव, ममता खेडेकर, सुरेखा निमकर, विमल माळोदे, नम्रता पडवळ, लखबिर कौर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
इयत्ता ५वी ते १०वीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक डझन फुलस्केप वह्या, कंपास पेटी, परीक्षेचा पॅड, वर्कशीट, रंगपेटी, सर्टिफिकेट फोल्डर इत्यादी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
विद्यार्थी सहाय्य योजना प्रकल्पप्रमुख गीता नाडकर्णी, नीलम सावंत, गायकर मॅडम, रीना महाडीक, अस्मिता घरत, स्वाती मयेकर यांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाच्या आयोजनात प्रदिप ढगे, अनिल तावडे, विलास पाटील, कांतीलाल परमार, शिवाजी गावकर, विष्णू मणियार, दिलीप मेस्त्री, अजय सुर्वे, शैलेश तुम्मा, दशरथ खमितकर, विश्वनाथ तेलकर यांचे मोलाचे योगदान लाभले.
विद्यार्थ्यांच्या मनोगतामधून संस्थेच्या उपक्रमाची फलश्रुती स्पष्ट झाली. कु. सोहम मयेकर (दहावी) याने सांगितले, “मी पाचवीपासून स्वामी संस्थेच्या विद्यार्थी सहाय्य योजनेचा लाभ घेत आहे. दरवर्षी मिळणाऱ्या साहित्यामुळे माझ्या पालकांवरील आर्थिक भार कमी झाला आहे.” तसेच कु. आयुष सकपाळ (दहावी) म्हणाला, “मी सहावीपासून स्वामी संस्थेच्या योजनेत सहभागी असून, यामुळे मला शिक्षणात सातत्य ठेवता आले.”
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये संस्थेचे उदय पारकर, उर्मिला जाधव, तृप्ती पवार, किरण करलकर, गणेश अंबोकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
स्वामी संस्था ही गेली १९ वर्षे शैक्षणिक, आरोग्य, पर्यावरण व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. या योजनेद्वारे अनेक गरजू विद्यार्थ्यांना आधार देत संस्था ‘शिक्षण हेच भविष्य’ हे मूल्य जपत आहे.
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : दादरच्या राजा शिवाजी विद्या संकुल येथे १५ जून २०२५ रोजी “मराठी साहित्य व कला सेवा” आणि “शोध आनंदाचा फाऊंडेशन” यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १६वे कविसंमेलन भारावलेल्या वातावरणात, अत्यंत रसाळ आणि भावस्पर्शी स्वरूपात संपन्न झाले.
या कविसंमेलनाचे नेमके, प्रवाही आणि रसिकांशी संवाद साधणारे सूत्रसंचालन प्रभावी शैलीत विक्रांत लाळे यांनी केले. प्रत्येक कवीच्या सादरीकरणापूर्वी केलेली ओळख, विषयाची पार्श्वभूमी आणि रसिकांची संवेदना जागवणारे शब्द यामुळे संपूर्ण संमेलनात सातत्य आणि ओघ निर्माण झाला.
कार्यक्रमाचे आयोजन तीन विशेष सत्रांमध्ये करण्यात आले होते — पाऊस, जागतिक पितृदिनानिमित्त ‘बाबा’ आणि मुक्त विषय. या तिन्ही सत्रांमध्ये सहभागी कवींसोबत रसिकांनीही शब्दांच्या सरींत चिंब भिजण्याचा आनंद लुटला. विशेष म्हणजे “पाऊस” या सत्रात कविता सादर होत असतानाच खऱ्याखुऱ्या पावसाने आपली साक्ष देत उपस्थित राहून काव्याचे आभाळच भरून टाकले. कार्यक्रम संपेपर्यंत थोडी विश्रांती घेतलेल्या या आभाळरुपी श्रोत्याने, सारे कवी-रसिक सुखरूप घरी पोहोचल्यावरच आपल्या थेंबांच्या टाळ्यांनी कवितांना सलामी दिली!
मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर येथून आणि पुण्याहूनही विशेष कवी उपस्थित होते, ज्यांनी आपल्या शब्दांनी संमेलनात नवीन सूर मिसळले. डॉ. मानसी पाटील, प्रा. स्नेहा केसरकर, अशोक दामोदर कुलकर्णी (पुणे), कल्पना दिलीप मापूसकर, कल्पना निलेश सांगळे, किशोरी शंकर पाटील, जयश्री हेमचंद्र चुरी, एकनाथ शेडगे, सरोज लट्टू, स्मिता शाम तोरसकर, आश्विनी सोपान म्हात्रे, संतोष धर्मराज मोहिते, अशोक (भाई) पुंडलीक नार्वेकर, विक्रांत मारूती लाळे, शितलादेवी सुनिल कुळकर्णी, रविंद्र शंकर पाटील, सुचित्रा अरुण टिपणीस या सर्व कवींनी आपल्या शैलीतून भावना उलगडत रसिकांशी संवाद साधला. विशेष उल्लेखनीय म्हणजे नितीन सुखदरे आणि सनी आडेकर यांनी त्यांच्या मनातील “बाबा” सर्वांसमोर प्रभावीपणे सादर करून कार्यक्रमात भावनिक रंग भरले. कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी श्री. लट्टू, शैलेश नाबर आणि बालकवी वेदान्त यशवंत पंडित उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मराठी साहित्य कला सेवाचे संस्थापक अध्यक्ष गुरुदत्त वाकदेकर, शोध आनंदाचा फाऊंडेशनचे अध्यक्ष नितीन सुखदरे, सचिव सनी आडेकर, तसेच विक्रांत लाळे, रविंद्र पाटील आणि किरण जाधव यांनी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या एकत्रित नियोजनामुळे हे कविसंमेलन केवळ एक कविसंमेलन न राहता, एक भावपूर्ण आणि संस्मरणीय अनुभव ठरला. त्यांच्या नेतृत्वामुळे संमेलनाला एक सुसंस्कृत, समर्पित आणि सर्जनशील चौकट लाभली. साहित्यसेवेचा व संवेदनशील दृष्टिकोनाचा प्रभाव संमेलनाच्या प्रत्येक टप्प्यावर अनुभवायला मिळाला.
साहित्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी अशी की, १७वे कविसंमेलन येत्या १३ जुलै २०२५ रोजी दादर येथेच होणार आहे. काव्यरसिकांनी आपल्या दिनदर्शिकेत ही तारीख नोंद करून, पुन्हा एकदा या शब्दोत्सवात सामील होण्याची संधी गमावू नये!
जळगाव : जागतिक रक्तदाता दिनाचे औचित्य साधून, दिनांक 14 जून 2025 रोजी जळगाव शहरामध्ये एक प्रेरणादायी आणि समाजहितकारी उपक्रम यशस्वीरित्या पार पडला. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) जळगाव मुख्य शाखा आणि रेडक्रॉस जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात नागरिकांनी उत्साहाने सहभाग नोंदवून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले.सकाळी 9 वाजता जळगाव मुख्य शाखा परिसरात या शिबिराची सुरुवात झाली. या शिबिरासाठी विशेषतः स्टेट बँक ऑफ इंडियाने आपली सामाजिक जबाबदारी ओळखून पुढाकार घेतला. बँकेला 70 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ‘समाजाचे देणे लागतो’ या प्रेरणादायी विचारातून या उपक्रमाची आखणी करण्यात आली होती. या उपक्रमात जळगाव शाखेसह चोपडा आणि चाळीसगाव शाखांमध्ये देखील एकत्रितपणे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिरात एकूण 135 रक्तदात्यांनी स्वखुशीने सहभाग नोंदवला. त्यापैकी जळगाव शाखेमध्ये 37, चोपडा शाखेमध्ये 71, तर चाळीसगाव शाखेमध्ये 27 रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजसेवेमध्ये मोलाचा वाटा उचलला. ही संख्या केवळ आकड्यांपुरती मर्यादित नसून, प्रत्येक रक्तदात्याच्या निःस्वार्थ भावनेचे प्रतीक ठरली. या शिबिरात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या जळगाव शाखेतील विविध विभागातील अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने देखील आपली उपस्थिती आणि सहभाग नोंदवून साक्षात “बँकिंग बियॉन्ड बिझनेस” या संकल्पनेची प्रचिती दिली. धर्मेंद्र कुमार (सहाय्यक महाप्रबंधक, एसबीआय), युवराज चौधरी यांचे या संपूर्ण उपक्रमामध्ये मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच प्रशासनिक कार्यालय, जळगाव येथील अधिकारी — आशिष जाधव, अमोल महाजन, पंकज नहाले, सुयोग पाटील, सुमित ओक, शफीक पिंजारी, कल्पेश लंके व इतर कर्मचाऱ्यांनीही या उपक्रमासाठी विशेष मेहनत घेतली.शिबिराच्या यशस्वी आयोजनामध्ये रेडक्रॉस जळगाव शाखेचे विनोद बियाणी आणि त्यांच्या कार्यसमर्पित टीमचे विशेष योगदान लाभले. त्यांच्या नियोजनशिल कार्यपद्धतीमुळे रक्तदान प्रक्रियेत कुठल्याही प्रकारची अडचण न होता शिस्तबद्ध व सुरक्षित वातावरणात रक्तदान पार पडले.या शिबिरात सहभागी झालेल्या रक्तदात्यांनी केवळ रक्तदान केले नाही तर समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी अधोरेखित केली. काही रक्तदात्यांनी ही सातवी, आठवी किंवा दहावी वेळ असल्याचे सांगून हे सिद्ध केले की, रक्तदान म्हणजे केवळ एक वेळचा उपक्रम नसून ही एक आयुष्यभर चालणारी सामाजिक जबाबदारी आहे. शिबिराच्या ठिकाणी रक्तदात्यांसाठी पुरेशी व्यवस्था करण्यात आली होती. त्यात तपासणीसाठी वैद्यकीय टीम, रक्त गोळा करणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक, शीतपेय, अल्पोपहार, आणि आरामाची योग्य सुविधा दिली गेली. रक्तदात्यांना प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले. या संपूर्ण उपक्रमामुळे शहरामध्ये सामाजिक जागरूकतेला मोठी चालना मिळाली आहे. अनेक तरुणांनी या शिबिरात सहभाग घेत, पहिल्यांदाच रक्तदानाचा अनुभव घेतला. काही महिला अधिकारी व महिला कर्मचाऱ्यांनीही विशेष धाडस दाखवत रक्तदानात भाग घेतल्यामुळे स्त्रीशक्तीचा सन्मान आणि सामाजिक समतेचाही आदर्श निर्माण झाला.या शिबिराचे एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये कोणत्याही प्रकारची सक्ती नसून, पूर्णपणे स्वेच्छेने आणि सेवाभावनेने लोकांनी सहभाग नोंदवला. त्यामुळे प्रत्येक रक्तदात्याचे मनोबल वाढले. तसेच, SBI च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः उपस्थित राहून रक्तदात्यांशी संवाद साधत त्यांचे आभार मानले आणि त्यांचे मनोबल उंचावले.या उपक्रमात केवळ शहरी भागच नाही तर ग्रामीण भागातील काही SBI कर्मचारी व शाखांचे प्रतिनिधी देखील सहभागी झाले होते. त्यांनी आपल्या भागात रक्तदानाबाबत जनजागृती घडवून आणली आणि काही ठिकाणी लहान स्वरूपात शिबिरेही घेतली. या उपक्रमाच्या यशानंतर SBI आणि रेडक्रॉस जळगाव यांनी जाहीर केले की, येत्या महिन्यात जिल्ह्यातील विविध शाखांमध्ये असे आणखी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. जळगाव, भुसावळ, एरंडोल, पाचोरा, अमळनेर, चाळीसगाव आदी ठिकाणी लवकरच अशा उपक्रमांची आखणी होणार आहे. यासाठी नागरिकांनी स्वतःहून पुढाकार घ्यावा, रक्तदानासारख्या पुण्यकार्यात सामील व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. आजच्या या रक्तदान शिबिराने केवळ समाजसेवेचा आदर्श निर्माण केला नाही तर स्टेट बँक ऑफ इंडियाची 70 वर्षांची सामाजिक बांधिलकी अधिक अधोरेखित केली आहे. बँकेच्या केवळ आर्थिक नव्हे तर मानवी मूल्यांचा विचार करणाऱ्या या धोरणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.सामाजिक बांधिलकी, सेवाभाव आणि रक्तदात्यांच्या उदात्त मनोवृत्तीचा संगम म्हणजेच हे रक्तदान शिबिर. आजच्या या दिवशी आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी — “रक्त दान हे जीवनदान आहे.” आणि अशा उपक्रमात सहभाग घेणे हे केवळ सामाजिक जबाबदारी नसून, ती एक मानवतेची साक्ष आहे.
पाचोरा – तालुक्यातील बिल्दी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज नव्या शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ अत्यंत आनंदमय आणि उत्साही वातावरणात झाला. शाळेचा पहिला दिवस नेहमीच नव्या अपेक्षा, उमेद, आणि आनंद घेऊन येतो. यावर्षीही या परंपरेला अनुसरून बिल्दीच्या शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत अनोख्या पद्धतीने करण्यात आले. शाळा सुरू होण्याच्या आधीच मुख्याध्यापक कल्पना पाटील यांच्या नेतृत्वाखाली शाळेतील सर्व शिक्षक, कर्मचारी व काही स्थानिक पालकांनी परिसराची स्वच्छता मोहीम राबवली. आदल्या दिवशी म्हणजेच १५ जून रोजीच शाळेच्या आवारात गवत कापणे, कचरा उचलणे, वर्गखोल्यांचे व आसपासच्या भागाचे पुसणे, फुलझाडांची निगा राखणे अशी कामे उत्साहाने पार पाडली गेली. त्यामुळे पहिल्याच दिवशी शाळा एका नव्या ताजेपणाने सजली होती. आज दिनांक १६ जून २०२५ रोजी, सकाळी लवकरच विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेकडे वाटचाल सुरू केली. काहींनी नव्या गणवेशात तर काहींनी शाळेसाठी खास ठेवलेल्या कपड्यांत येत आपल्या चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यांत उत्सुकता घेऊन पहिला दिवस साजरा केला. शाळेच्या प्रवेशद्वारावर त्यांच्या स्वागतासाठी फुगे, रंगीबेरंगी पताका, स्वागत फलक आणि हसतमुख शिक्षक उभे होते. प्रत्येक विद्यार्थ्याला फुगे देत, त्यांच्या हातात गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. या क्षणी शाळेचा प्रत्येक कोपरा आनंदाच्या रंगात न्हालेला दिसत होता. यावेळी विशेष आकर्षण ठरली शाळेने काढलेली प्रभातफेरी. गावभर वाजतगाजत विद्यार्थ्यांनी शिक्षण, स्वच्छता आणि शिस्तीचे संदेश देणारे फलक हातात घेऊन प्रभातफेरी काढली. “शाळा माझी, जबाबदारी माझी”, “विद्यार्थ्यांनो शिक्षण घ्या, पुढे चला” अशा घोषणा करत त्यांनी गावात चैतन्य निर्माण केले. या फेरीने गावकऱ्यांच्या लक्षात पुन्हा एकदा शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. प्रभातफेरी संपल्यानंतर शाळेच्या प्रांगणात एक छोटेखानी स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी पंचायत समितीचे ग्रामविस्तार अधिकारी ए. जे. पाटील यांनी विशेष भेट दिली. त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देण्यात आले. पाटील यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी सांगितले की, “शाळा म्हणजे केवळ शिक्षणाचे केंद्र नसून, संस्कारांची शिदोरी देणारी एक पवित्र जागा आहे. इथूनच विद्यार्थ्यांचे आयुष्य घडते.” या समारंभात प्रमुख उपस्थिती होती शाळेच्या मुख्याध्यापक कल्पना पाटील यांची. त्यांनी आपल्या स्वागत भाषणात सांगितले की, “विद्यार्थ्यांचा पहिला दिवस लक्षात राहावा आणि त्यांना शाळेशी आत्मीयता वाटावी यासाठी आम्ही या विशेष आयोजनाचे नियोजन केले. मुलांना केवळ पुस्तके देऊन पाठवायचे नाही, तर त्यांच्यात शिक्षणाबद्दल ओढ निर्माण व्हावी, ही आमची जबाबदारी आहे.” या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सोपान पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत सांगितले की, “गावात शिक्षणाची पाळंमुळं अधिक घट्ट करण्यासाठी पालकांचा सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे. आज शाळेत आलेल्या पालकांचा उत्साह पाहून निश्चितच शिक्षणप्रेमी वातावरण तयार होत आहे.”स्वयंसेवक म्हणून या उपक्रमात सहभागी झालेल्या सुवर्णा पवार यांनी विद्यार्थ्यांना आणि पालकांना शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच पालक भूषण धनगर यांची देखील यावेळी उपस्थिती लक्षणीय ठरली. त्यांनी आपल्या मनोगतातून शाळेच्या उपक्रमशीलतेचे कौतुक केले आणि पालकांनी आपल्या मुलांच्या शिक्षणात सातत्याने लक्ष घालावे, अशी विनंती केली. समारंभात प्रत्येक विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपुस्तके आणि वह्यांचे वाटप करण्यात आले. हे वाटप शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले. प्रत्येक विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर पुस्तके मिळाल्यानंतरची उत्सुकता आणि आनंद स्पष्ट दिसत होता. या उपक्रमासाठी आवश्यक साहित्याची पूर्वतयारी शाळेने ग्रामस्थांच्या सहकार्याने अगोदरच पूर्ण केली होती. विद्यार्थ्यांनी यावेळी ‘शाळा सुरू झाली गं मजा येते’ या गाण्यावर समूहगीत सादर केले. शिक्षिका कल्पना पाटील यांनी स्वतः ही तयारी करून घेतली होती. वातावरण अगदी उत्सवमय होते. या निमित्ताने पालकांशी संवाद साधण्याची संधी देखील शिक्षकांनी घेतली. त्यांनी पालकांना सांगितले की, “मुलांना वेळेवर शाळेत पाठवणे, गृहपाठाची चौकशी करणे, आणि त्यांच्या भावनिक विकासासाठी संवाद साधणे ही पालकांची प्राथमिक जबाबदारी आहे.” या संवादातून एक सकारात्मक शैक्षणिक बंध तयार झाल्याचे वातावरण दिसून आले.बिल्दी गावातील नागरिकांनीही शाळेच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. काही ज्येष्ठ नागरिकांनी जुन्या आठवणी जागवताना सांगितले की, “आपण लहान असताना अशा स्वरूपाचे स्वागत होत नसे, पण आजच्या विद्यार्थ्यांना मिळणारे प्रेम, कौतुक आणि प्रोत्साहन खरोखरच उल्लेखनीय आहे.” कार्यक्रमाच्या शेवटी शिक्षक आणि कर्मचारी वर्गाने विशेषतः स्वच्छता, सुरक्षा आणि नियंत्रण याकडे लक्ष दिले. कोणताही गोंधळ, आवाज किंवा धक्काबुक्की होऊ नये यासाठी शिक्षकांनी नम्रतेने मुलांना समजावून सांगितले. शाळेच्या पहिल्या दिवसाची ही सुरुवात केवळ औपचारिक नव्हती, तर ती एक प्रेरणादायी आणि आनंददायी आठवण बनली. या उपक्रमातून शिक्षकांचा प्रयत्न, ग्रामस्थांचा सहभाग, पालकांचे सहकार्य, आणि विद्यार्थ्यांचे बालमन जिंकणारे आयोजन एकत्रितपणे अनुभवायला मिळाले.बिल्दी शाळेने दाखवलेला हा आदर्श उपक्रम इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरावा, हीच अपेक्षा.