चोपडा तालुक्यात गारपीठी अवकाळी पावसाने धुमाकूळ – शेतकऱ्यांची चिंता शिगेला

0

(चोपडा – प्रतिनिधी मनिष प्र. महाजन, भाई कोतवाल रोड, मो. 9766143638 / 09850865961) गेल्या काही दिवसांपासून चोपडा तालुक्यात वातावरणात सतत बदल जाणवत होता. ऊन्हाचा चटका अधूनमधून कमी-जास्त होत होता. तापमानातील अस्थिरता आणि ढगाळ हवामानामुळे नागरिक आणि विशेषतः शेतकरी वर्गामध्ये चिंता वाढली होती. पावसाची हजेरी नेमकी केव्हा लागेल हे सांगणे कठीण झाले होते, मात्र आज दुपारी दोन ते तीनच्या सुमारास अवकाळी पावसाने धानोरा, मितावली, पंचक, गोरगावले, खेडीभोकरी, माचला परिसराला जबरदस्त तडाखा दिला. या पावसासोबत आलेल्या गारपीठीने तर शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकवला. या गारपीठीचा जोर इतका होता की काही ठिकाणी ती गोट्याच्या

आकाराची असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. जवळपास १५ ते २० मिनिटे सलग पडलेल्या या गारपीठीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, अनेक ठिकाणी भात, हरभरा, गहू, केळी, द्राक्ष, पपई, टोमॅटो, मिरची, कांदा आदी पिकांवर गारांचा मारा झाला. काही शेतकरी तर हताश होऊन म्हणू लागले की, “पिकं फळायच्या उंबरठ्यावर होती, आता गारांनी सगळं उध्वस्त केलं.” पाऊस आणि गारपीठ थांबताच शेतकरी वर्ग हातात फक्त छत्र्या आणि काळजी घेऊन आपल्या शेताकडे धावले. जमिनीवर साचलेली गारं, वाकलेली किंवा तुटलेली झाडं, चिखलमय झालेली फळबागा हे दृश्य बघून अनेकांच्या डोळ्यांत पाणी आलं. एका शेतकऱ्याने सांगितले, “पाण्याची चांगली सोय करून पिकं उभं केलं होतं, कर्ज घेतलं होतं… पण निसर्गाने हे सगळं पाण्यात गेलं.” शेतकऱ्यांचे नुकसान इतकं मोठं आहे की, याची आकडेवारी प्रशासनाने तातडीने घेतली नाही तर उद्या आंदोलने होण्याची शक्यता आहे. चोपडा तालुक्यातील मितावली परिसरातील काही शेतकरी म्हणाले, “आम्ही तात्काळ तलाठी व कृषी अधिकारी यांना माहिती दिली आहे. पंचनामे लवकर व्हावेत ही आमची मागणी आहे.”
शासनाने ‘निसर्ग आपत्ती मदत निधी’ अंतर्गत गारपीठ आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी जोरदार मागणी विविध शेतकरी संघटनांनी केली आहे. या घटनेनंतर कृषी अधिकारी, तालुका प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी गारपीठ झालेल्या भागांना भेट देऊन पाहणी करावी, असेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे गारांचा आकार इतका मोठा होता की काही भागांमध्ये लहान मुलांना उघड्यावरून घरात आणण्यासाठी पालकांना झुंज द्यावी लागली. अनेक ठिकाणी झोपड्यांच्या पत्रे फुटल्याची माहिती मिळतेय. काही ठिकाणी जनावरे देखील गारांमुळे जखमी झाल्याचे बोलले जात आहे. गेल्या काही वर्षांत हवामानातील अस्थिरता आणि अनियमितता ही शेतीसाठी मोठं संकट बनली आहे. पावसाळा वेळेवर येत नाही, आल्यावर अधिक प्रमाणात पडतो आणि अचानक थांबतो, नंतर पुन्हा अवकाळी पाऊस आणि गारपीठ यामुळे शेतकऱ्यांचं नियोजन कोलमडून जातं. अशा परिस्थितीत विमा योजनेचा लाभ देखील वेळेवर मिळत नाही, अशी तक्रार अनेकांनी व्यक्त केली आहे. या गारपीठीचा परिणाम केवळ पिकांवरच नाही, तर कर्ज फेडण्याच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्यावरही होत आहे. शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत, हे वास्तव प्रशासनाने आणि राज्य सरकारने गांभीर्याने घ्यावं. त्यासाठी गरज आहे ती तातडीच्या पंचनाम्यांची, मदतीच्या जाहीर घोषणांची आणि प्रत्यक्ष खात्रीपूर्वक भरपाई वितरणाची. स्थानिक प्रतिनिधी मनिष प्र. महाजन यांनी गारपीठ झालेल्या परिसराची पाहणी केली असता अनेक ठिकाणी गारांचा साठा अजूनही घरांपुढे आणि शेतांमध्ये दिसत होता. गारपीठ झालेल्या गावांमध्ये संपूर्ण गाव भयभीत आणि शांततेत आहे. फक्त आवाज येतो तो लोकांच्या तोंडून – “आता पुढे काय होणार?”
हा प्रश्न केवळ शेतकऱ्यांचा नाही, तो सरकार आणि समाजाच्या संवेदनशीलतेचा आहे. चोपडा तालुक्यातील गारपीठीमुळे झालेलं नुकसान हे फक्त पिकांचं नाही, तर एका कष्टकरी समाजाच्या स्वप्नांचं आहे. अशावेळी शासन आणि प्रशासनाने गारपीठग्रस्त शेतकऱ्यांना वेळेवर मदत करून त्यांच्या आशेचा किरण जपावा, हीच या संकटातून उमटलेली मूक साद आहे.

Loading

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here