Home Blog Page 122

भारताचा ऐतिहासिक विजय: २०२५ चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावत इतिहास रचला!

0

Loading

मुंबई  (गुरुदत्त वाकदेकर) : भारतीय क्रिकेट संघाने आपल्या अप्रतिम कामगिरीने न्यूझीलंडवर ४ गडी राखून विजय मिळवत २०२५ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. या विजयासह भारताने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वर्चस्व प्रस्थापित करत गेल्या ८ महिन्यांत दुसरे मोठे आयसीसी विजेतेपद पटकावले आहे.
*सामन्याच्या ठळक घडामोडी:-*     न्यूझीलंड: २५१/७ (५०)
भारत: २५४/६ (४९)
भारत ४ गडी राखून विजयी
रोहित शर्मा (७६) आणि शुभमन गिल (३१) यांनी दमदार सलामी दिली, १७ व्या षटकात १०० धावांची भागीदारी पूर्ण.
श्रेयर अय्यर (४८) आणि अक्षर पटेल (२९) यांनी मधल्या फळीत संघाला सावरले.
के. एल. राहुल (३४) आणि रवींद्र जडेजा (१२) यांनी संयमी खेळी करत भारताला विजय मिळवून दिला.
न्यूझीलंडकडून मायकल ब्रेसवेल (५०), डॅरिल मिचेल (६३) आणि ग्लेन फिलिप्स (३४) यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्तीने प्रत्येकी २ बळी घेत न्यूझीलंडला २५१ धावांवर रोखले.
रोहित शर्माने ४१ चेंडूत अर्धशतक पूर्ण करत आक्रमक सुरुवात दिली.
कर्णधार रोहित शर्माने ८३ चेंडूत ७६ धावांची जबरदस्त खेळी केली.
श्रेयर अय्यर अर्धशतकापासून अवघ्या २ धावांनी मुकला.
के. एल. राहुल आणि रवींद्र जडेजाने शेवटपर्यंत धीरगंभीर फलंदाजी करत भारताचा विजय निश्चित केला.
रवींद्र जडेजाने विजयी चौकार लगावत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
*पुरस्कार व विक्रम:-*
सामनावीर : रोहित शर्मा (७६ धावा)
स्पर्धावीर : रचिन रवींद्र (महत्त्वपूर्ण अष्टपैलू योगदान)
भारताने २०१३ नंतर दुसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली.
भारताचा आयसीसी स्पर्धांमध्ये न्यूझीलंडविरुद्धचा पहिला अंतिम फेरीतील विजय.
भारताने २०२४ टी२० विश्वचषक जिंकल्यानंतर २०२५ चॅम्पियन्स ट्रॉफीही जिंकली – एका वर्षात दोन आयसीसी विजेतेपदे.
भारत-न्यूझीलंड यांच्यात आजवर ११९ सामने झाले आहेत. त्यापैकी ६१ सामने भारताने तर ५० सामने न्यूझीलंडने जिंकले आहेत. एक सामना बरोबरीत सुटला तर ७ सामन्यांचे निकाल लागले नाहीत.
विजयानंतर संपूर्ण भारतीय संघाने मैदानावर आनंदोत्सव साजरा केला.
बीसीसीआय सचिव जय शाह यांनी रोहित शर्माच्या हाती चॅम्पियन्स ट्रॉफी सुपूर्द केली.
संघाने पारंपरिक “लॅप ऑफ ऑनर” घेत चाहत्यांचे आभार मानले.
भारतीय खेळाडूंनी “वुई आर द चॅम्पियन्स” गाण्यावर ड्रेसिंग रूममध्ये जल्लोष केला.
रोहित शर्मा (भारताचा कर्णधार): “ही एक अविस्मरणीय वेळ आहे. संपूर्ण संघाने योगदान दिले आणि आमच्या गोलंदाजांनी सामन्यातील महत्त्वाचे क्षण निर्माण केले. भारतीय चाहत्यांसाठी हा विजय आहे!”
मिचेल सॅंटनर (न्यूझीलंड कर्णधार): “आम्ही चांगली लढत दिली, पण भारताचा संघ अधिक चांगला खेळला. पुढच्या स्पर्धेत पुनरागमन करण्याचा आम्ही प्रयत्न करू.”
भारताने हा ऐतिहासिक विजय मिळवत आपले आयसीसी स्पर्धांतील वर्चस्व पुन्हा सिद्ध केले. न्यूझीलंडने दिलेल्या आव्हानाला समर्थपणे सामोरे जात, भारताने दमदार कामगिरी केली. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या विजेतेपदाने भारताचा क्रिकेटमधील सुवर्णकाळ सुरू असल्याचे स्पष्ट झाले!

गणेश गल्ली चौक परिसरात भव्य स्वच्छता मोहीम – नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : गणेश गल्ली चौक परिसरात वाढता कचरा, दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव आणि साथीचे रोग या समस्यांवर उपाय म्हणून ८ मार्च रोजी सकाळी १० वाजता भव्य स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेला नागरिकांसह महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या मोहिमेद्वारे कचऱ्याचे ढीग हटवण्यात आले, रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात आले आणि डासांची उत्पत्ती होणाऱ्या ठिकाणांची विशेष स्वच्छता करण्यात आली. स्थानिक रहिवासी, सामाजिक कार्यकर्ते आणि महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.

या अभियानात सहाय्यक अभियंता श्रीकांत राठोड, राजेश गोसावी (सुपरवायझर, एस डब्ल्यू एम), पूजा साटम (ज्युनिअर सुपरवायझर, एस डब्ल्यू एम), महेंद्र मारू (मुकादम, एस डब्ल्यू एम – मेंटेनन्स), जितेंद्र साळुंखे (पीसीओ), रवींद्र जिमन, श्री. कांबळे आणि लालबाग विभागातील कचरा व्यवस्थापन कर्मचारी यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

महिला दिनाचे औचित्य साधून ८ मार्च रोजीही परिसरात विशेष स्वच्छता उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमात महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आणि परिसर स्वच्छतेचा संदेश दिला.

या मोहिमेच्या यशस्वी आयोजनासाठी महेंद्र मंदाकिनी जगन्नाथ तावडे (प्रशासन व उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, दक्षिण मुंबई जिल्हा) यांनी विशेष पुढाकार घेतला. “परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी ही मोहीम केवळ एक दिवसापुरती मर्यादित न राहता सातत्याने राबवली जावी,” असे मत त्यांनी व्यक्त केले. या अभियानामुळे गणेश गल्ली चौक परिसर अधिक स्वच्छ आणि आरोग्यदायी झाला असून, नागरिकांनी परिसर स्वच्छ ठेवण्याचा संकल्प केला आहे.

पाचोरा तालुका गुर्जर सखी आयोजित जागतिक महिलादिन सोहळा उत्साहात संपन्न : समाज संघटन व संस्कृतीचे अद्वितीय दर्शन

0

Loading

पाचोरा तालुक्यातील गुर्जर सखी समूहाच्या वतीने ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांसाठी विशेष कलात्मक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा सोहळा फक्त एक साधा कार्यक्रम नसून, गुर्जर समाजाच्या महिलांचे सशक्तीकरण, संस्कृती जतन, आणि सामाजिक ऐक्याचे प्रतीक ठरला.
गुर्जर समाज : ऐतिहासिक वारसा आणि सांस्कृतिक परंपरा
गुर्जर समाज हा भारतातील एक महत्त्वाचा समाज असून त्यांचा इतिहास शौर्य, पराक्रम आणि कष्टाळू वृत्तीचा आहे. प्राचीन काळापासूनच गुर्जर समाज हा व्यापारी, शेती आणि सैनिक म्हणून ओळखला जातो. संस्कृती आणि परंपरेच्या दृष्टीने अत्यंत समृद्ध असलेल्या या समाजात महिलांना विशेष स्थान आहे. समाजाच्या धार्मिक व सामाजिक कार्यक्रमात महिलांचा मोठा सहभाग असतो. लोकनृत्य, पारंपरिक पोशाख, आणि घरगुती व्यवसायांमध्ये महिलांची महत्त्वपूर्ण भूमिका असते. अशा पार्श्वभूमीवर, पाचोरा तालुक्यात झालेल्या या कार्यक्रमाने गुर्जर महिलांचे संघटन, त्यांच्या कलागुणांना वाव आणि सामाजिक योगदान यांचा गौरव केला.
या विशेष सोहळ्यात महिलांसाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या, ज्या केवळ मनोरंजनात्मक नव्हत्या तर त्यातून महिलांचे कौशल्य, आत्मविश्वास आणि एकोपा यांची जाणीव झाली. कार्यक्रमात पुढील स्पर्धांचा समावेश होता –
लोकनृत्य स्पर्धा – गुर्जर समाजाच्या पारंपरिक लोकनृत्याचा सुरेख आविष्कार येथे पाहायला मिळाला. आकर्षक वेशभूषेत आणि गोंडस नृत्यशैलीत महिलांनी बहारदार सादरीकरण केले.
विनोदी उखाणे स्पर्धा – महिलांच्या तल्लख बुद्धीची चुणूक येथे दिसून आली. पारंपरिक मराठी उखाण्यांना हलक्या फुलक्या विनोदाची जोड देऊन उपस्थितांना खळखळून हसविण्यात आले.
मराठी वेशभूषा स्पर्धा – नऊवारी साडी, पारंपरिक दागिने आणि डोक्यावर पारंपरिक फेटा अशा वेशभूषेत महिलांनी सहभाग घेतला. प्रत्येक सहभागीने समाजाच्या सांस्कृतिक ठेव्याचे दर्शन घडवले.
होम मिनिस्टर स्पर्धा – महिलांच्या कौशल्यांची कसोटी पाहणारी ही स्पर्धा विशेष आकर्षण ठरली. स्वयंपाक, घरगुती व्यवस्थापन आणि कौटुंबिक समन्वय यावर आधारित या स्पर्धेत महिलांनी आपली कल्पकता दाखवली.
या स्पर्धांमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या महिलांना विशेष पारितोषिके प्रदान करण्यात आली. विजेत्या स्पर्धकांची नावे पुढीलप्रमाणे –
शिला पाटील – लोकनृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक
रेखा पाटील – विनोदी उखाणे स्पर्धेत प्रथम
ज्योस्ना महाजन – मराठी वेशभूषा स्पर्धेत प्रथम
संध्या पाटील – होम मिनिस्टर स्पर्धेत प्रथम
स्मिता पाटील – विशेष पारितोषिक
या महिलांनी आपल्या कौशल्याने कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि उपस्थितांचा उत्साह द्विगुणित केला.
या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते, ज्यांनी महिला सशक्तीकरणाबद्दल आपले विचार मांडले. प्रमुख पाहुण्यांमध्ये सिद्धीविनायक हॉस्पिटलच्या डॉ. ग्रिष्मा पाटील, फ्लोअर बॉक्स कॅफेच्या सौ. प्रियंका महाजन, आणि मावुली बेंटेक्सच्या सौ. मनीषा येवले यांचा समावेश होता. या प्रतिष्ठित महिलांनी आपल्या यशोगाथा उपस्थित महिलांसमोर मांडल्या, ज्या प्रेरणादायी ठरल्या.
कार्यक्रमात सुमारे ७० महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. मनोरंजनासोबतच त्यांना अल्पोपहार आणि कोल्ड कॉफीचा आस्वाद घेण्याची संधी मिळाली. कार्यक्रमाच्या पुढील टप्प्यात, ९ आणि १० मार्च रोजी महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन सिद्धीविनायक हॉस्पिटलमध्ये करण्यात आले आहे. या शिबिरात हिमोग्लोबिन, थायरॉईड आणि रक्तदाब तपासणी मोफत केली जाणार आहे, जे महिलांच्या आरोग्य जपणुकीसाठी अत्यंत महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.
या कार्यक्रमाची संपूर्ण संकल्पना सौ. वैशाली पाटील यांनी तयार केली होती. त्यांनी न केवल कार्यक्रमाचे नियोजन केले, तर उत्तम सूत्रसंचालन तर आभार प्रदर्शन सौ शितल महाजन यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये सौ. शीतल महाजन, सौ. जयश्री पाटील, सौ. ज्योती देशमुख, सौ. स्वाती पाटील, सौ. मेघा पाटील, सौ. संगीता पाटील, सौ. रेखा पाटील, आणि सौ. सत्वशीला पाटील या महिलांचे मोलाचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सौ. संजीवनी पाटील यांनी सौ. वैशाली पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच, हा कार्यक्रम केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता, महिलांसाठी सकारात्मक व्यासपीठ निर्माण करण्याचे कार्य करत आहे, असे विचार उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
हा कार्यक्रम पाचोरा तालुक्यातील महिलांच्या संघटित कार्यक्षमतेचे द्योतक ठरला. स्थानिक महिलांनी एकत्र येऊन, विविध उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी आणि एकीचे दर्शन घडवले. गुर्जर समाजातील महिलांच्या वाढत्या सहभागाने त्यांच्या आत्मविश्वासात आणि सामाजिक स्थानात निश्चितच वृद्धी होईल.
“महिलांनी एकत्र यावे, समाजासाठी योगदान द्यावे, आणि आपले हक्क मिळवावे” – या विचाराने प्रेरित होऊन, पाचोरा महिला संघटनाने पुढील काळातही अशा अनेक उपक्रमांचे आयोजन करण्याचा निर्धार व्यक्त केला
या कार्यक्रमाने महिलांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळवून देण्याबरोबरच, सामाजिक आरोग्य, परंपरा आणि महिला सशक्तीकरणाचा प्रभावी संदेश दिला. गुर्जर समाजातील महिलांची संघटनशक्ती, त्यांच्या कार्यक्षमतेचे दर्शन आणि संस्कृतीच्या जतनाचे महत्व यातून अधोरेखित झाले. भविष्यातही असे उपक्रम राबवले जावेत, अशी अपेक्षा व्यक्त करत उपस्थितांनी कार्यक्रमाची सांगता केली.
“संपूर्ण समाजाच्या उत्कर्षासाठी महिलांचे संघटन हाच खरी शक्ती आहे” – या विचाराने प्रेरित होऊन, गुर्जर समाजाच्या महिला संघटनेने आपल्या प्रयत्नांची दिशा स्पष्ट केली आहे.

महिला दिन आणि रणरागिणी पोलीस कॉन्स्टेबल शारदा भावसार : कर्तव्यदक्षतेचा खरा गौरव

0

Loading

महिला दिन म्हणजे केवळ औपचारिक साजरा करण्याचा दिवस नव्हे, तर खऱ्या अर्थाने समाजासाठी योगदान देणाऱ्या स्त्रियांचा सन्मान करण्याचा दिवस आहे. आज अनेक ठिकाणी महिला दिन मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो, मात्र खऱ्या अर्थाने स्त्रीशक्तीचा गौरव करताना त्यांच्या योगदानाची दखल घेणे आवश्यक आहे.
याच पार्श्वभूमीवर पाचोरा तालुक्यातील रणरागिणी पोलीस कॉन्स्टेबल भावसार ताईंच्या कार्याची नोंद घेणे गरजेचे वाटते. त्यांचा सन्मान करणे हे केवळ एक औपचारिक कृत्य नसून, खऱ्या स्त्रीशक्तीला दाद देण्याचा एक प्रयत्न ठरला असता. पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा येथे काही महिन्यांपूर्वी एक दुर्दैवी अपघात घडला. दोन निष्पाप व्यक्तीनी आपल्या प्राणांची आहुती दिली. अर्थात अपघात होऊन दोन मृत्यु झाले या अपघातानंतर स्थानिक गावकरी आणि पंचक्रोशीतील लोक एवढे संतप्त होते. अर्थात गावकरीच काय ? तो अपघात बघीतल्या नंतर कोणीही व्यक्ती असो त्याने संतप्त होणे सहाजिकच होते आणि परिस्थिती इतकी गंभीर होती की, अपघात घडवणाऱ्या वाहनासह त्यातील चालक आणि इतर व्यक्तींवर रोष निघाला असता या संतप्त जमावाने वाहनासह अपघात करणारा चालक आणि गाडीतील प्रवाशांना ठार मारण्याचा किंवा जाळून टाकण्याचा निर्णय घेण्याची परिस्थीती होती संपूर्ण परिसरात गंभीर स्थिती निर्माण झाली होती परंतु परिस्थिती अधिकच हाताबाहेर जाण्याआधी जळगावहून शासकीय काम आटोपून परतणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबल शारदा भावसार ताई घटनास्थळी सुदैवाने पोहचल्या. परिस्थितीचे गांभीर्य समजून घेत, कोणत्याही अतिरिक्त पोलिसी मदतीशिवाय, त्यांनी जमावात जाण्याचे धैर्य दाखवले.
या संपूर्ण घटनेत भावसार ताईंनी दाखवलेली धैर्यशीलता, संयम आणि कर्तव्यदक्षता हा खऱ्या स्त्रीशक्तीचा आदर्श नमुना आहे.
अपघातानंतर जमाव इतका संतप्त झाला होता की, कोणत्याही क्षणी हिंसाचार उसळू शकला असता. लोकांच्या रोषाचा परिणाम असा झाला असता की जमावाच्या हातुन अनर्थ घडला असता नंतर निर्दोष लोकही त्यात गोवले गेले असते.
भरतीसाठी प्रयत्न करणारे युवक, नोकरीच्या शोधात असणारे काही तरुण, आणि निष्पाप गावकरीही या प्रकरणात अडकले असते गुन्हे दाखल झाले असते परंतु शारदा भावसार ताईंनी परिस्थितीचे भान ठेवत, कोणताही गैरप्रकार होऊ नये याची काळजी घेतली. पोलीस यंत्रणा घटनास्थळी पोहोचण्याआधीच, सौ भावसार ताईंनी जमावाशी शांततापूर्ण संवाद साधत परिस्थिती नियंत्रणात आणली.
ज्या कर्तव्यदक्ष आणि संवेदनशील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यामुळेच समाजातील कायदा व सुव्यवस्था राखली जाते.त्यापैकी भावसार ताईंसारख्या महिलांमुळे पोलीस दलातील महिला अधिकारी आणि कर्मचारी यांची खरी ताकद लक्षात येते. त्यांनी त्यावेळी जमावासमोर कोणाची बहीण – कोणाची आई म्हणून धैर्याने उभे राहून परिस्थिती हाताळली.
त्यांनी केवळ पोलिसी दबाव न वापरता, लोकांना समजूत घालून कायदा सुव्यवस्थेचे पालन करायला भाग पाडले.
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, एका मोठ्या हिंसाचाराला त्यांनी स्वतःच्या संयमाने आळा घातला. हे कोणीही विसरणार नाही
महिला दिनानिमित्त मोठमोठे सत्कार समारंभ झाले विविध क्षेत्रांतील महिलांचा गौरव केला गेला. मात्र, प्रत्यक्ष संकटाच्या वेळी समाजाचे संरक्षण करणाऱ्या आणि कायदा सुव्यवस्था राखणाऱ्या अशा महिलांचा गौरव होतो का?
जर खऱ्या अर्थाने समाजासाठी धैर्याने उभ्या राहणाऱ्या महिलांचा सन्मान व्हावा, असे वाटत असेल, तर रणरागिणी पोलीस कॉन्स्टेबल शारदा भावसार यांचा सत्कार करण्यास अधिक महत्त्व दिले पाहिजे.
परंपरागत दृष्टीकोनानुसार, महिलांचे कार्य फक्त घर, कुटुंब आणि सामाजिक कार्यापुरतेच मर्यादित मानले जाते. पण भावसार ताईंनी दाखवून दिले की, महिलांनी सामाजिक संरक्षणाची जबाबदारीही सक्षमतेने पार पाडता येते.
स्त्रिया फक्त संस्कृतीचा वारसा चालवणाऱ्या नाहीत, तर समाजाच्या सुरक्षेच्या रक्षणकर्त्याही आहेत.
पोलीस दलातील महिला अधिकारीही संकटाच्या वेळी मागे हटत नाहीत, तर परिस्थितीला धैर्याने सामोरे जातात.
महिला सक्षमीकरण म्हणजे केवळ नोकऱ्या मिळवणे नव्हे, तर समाजरक्षणात सक्रिय सहभाग घेणे आहे.
पाचोरा आणि परिसरातील नागरिकांनी तरी महिलांच्या कार्याचा गौरव करताना, अशा भावसार ताई सारख्या रणरागिणींच्या कार्याची दखल घेतली पाहिजे.
काही पोलीस कर्मचारी आपल्या जबाबदाऱ्या गांभीर्याने घेत नाहीत, पण भावसार ताईंसारख्या कर्तव्यदक्ष पोलिसांमुळे पोलीस दलावर लोकांचा विश्वास कायम राहतो.
जर समाजातील प्रत्येकाने आपल्या क्षेत्रात असे धाडस दाखवले, तर कायद्याचे उल्लंघन होण्याआधीच अराजकता थांबवता येईल.
महिलांनी फक्त कुटुंबासाठी नव्हे, तर संपूर्ण समाजासाठी योगदान द्यावे, याची प्रेरणा अशा घटनांमधून मिळते.
महिला दिन हा सामाजिक बदल, सशक्तीकरण आणि खऱ्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी असतो.
केवळ औपचारिक सत्कार सोहळे आयोजित करण्यापेक्षा, अशा कर्तव्यदक्ष महिलांना खरोखर योग्य सन्मान मिळायला हवा.
सरकार, स्थानिक प्रशासन आणि नागरिकांनी रणरागिणी महिलांच्या कार्याला योग्य तो न्याय द्यावा.
भावसार ताईंनी दाखवलेली हिमंत, संयम आणि जबाबदारी याचा आदर्श घेऊन समाजातील प्रत्येकाने महिलांच्या कार्याला प्रोत्साहन द्यावे.
आज आपण समाजात अनेक व्यक्तींचा सत्कार करतो, पण खऱ्या धैर्यवान आणि कर्तव्यदक्ष महिलांचा गौरव करण्यास मागे का राहतो?
पोलीस कॉन्स्टेबल भावसार यांनी दाखवलेली साहस, धैर्य, संयम आणि समाजहितासाठी घेतलेले निर्णय यामुळे त्यांचा महिला दिनाच्या निमित्ताने सन्मान होणे आवश्यकच होता
अशा महिलांचा गौरव फक्त त्यांच्या सुरक्षिततेसाठी नव्हे, तर समाजातील इतर महिलांना प्रेरणा मिळावी म्हणूनही करायला हवा.
“सत्कार केवळ परंपरागत गोष्टींसाठी अथवा स्वतःच्या स्वार्थासाठी नसावा, तो खऱ्या धैर्यासाठी आणि समाजरक्षणासाठीही असावा!”

“महिलांनी दुसऱ्यावर अवलंबून राहायचं कारणच काय?” – पत्रकार सोनल खानोलकर यांचा सडेतोड सवाल

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : “आज महिलांचे सबलीकरण झाले आहे असे म्हटले जात असले तरी ती दुसरा जीव निर्माण करण्याची ताकद बाळगते, हीच तिची खरी शक्ती आहे. मग तिने दुसऱ्यावर अवलंबून राहण्याचे कारणच काय?” असा थेट सवाल ज्येष्ठ पत्रकार सोनल खानोलकर यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात उपस्थित महिलांसमोर मांडला.

या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय मिल मजदूर संघ आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. मनोहर फाळके सभागृहात पार पडलेल्या या मेळाव्यात संघटनेचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर आणि सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांचे मोलाचे प्रोत्साहन लाभले.

या कार्यक्रमात गिरणी कामगार महिला आणि घरेलू महिलांसाठी विशेष सत्र आयोजित करण्यात आले होते. प्रमुख पाहुण्या म्हणून “मनातली जाणीव” आणि “खतरनाक” मासिकाच्या संपादिका सोनल खानोलकर यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सार्वजनिक ग्रंथालय व वाचनालयाच्या ग्रंथपाल ममता घाडी यांनी प्रास्ताविक केले.

आपल्या भाषणात सोनल खानोलकर म्हणाल्या, “केवळ परिस्थितीला दोष देऊन काही साध्य होत नाही. स्वतःला घडविण्याचा प्रयत्न करा. कितीही कठीण प्रसंग आले तरी सकारात्मक राहा. त्यातूनच आत्मबळ निर्माण होते.” त्यांनी पत्रकारितेतील स्वतःच्या अनुभवांचे कथन करत महिलांना धाडसी होण्याचा आणि प्रसंगावधान राखण्याचा सल्ला दिला.

कार्यक्रमात अनेक महिलांनी भाषणाद्वारे महिलांवरील अत्याचार, सामाजिक समस्या आणि न्यायासाठीच्या संघर्षावर भाष्य केले.

शिवसेना शाखा प्रमुख दिक्षा गुंजाळ म्हणाल्या, “कर्तृत्वाशिवाय आजच्या स्त्रीला आपली ओळख निर्माण करता येत नाही.”

आशा आसबे यांनी “स्त्री नातेबंध सांभाळतानाच इतरांना सावरण्याचे अवघड कार्य करते.” असा मुद्दा मांडला.

श्रावणी पवार यांनी आपल्या कवितांमधून आधुनिक स्त्रीचे वास्तव मांडले.

ममता घाडी यांनी आपल्या प्रास्ताविकात स्त्रियांना निर्भय राहण्याचे आवाहन केले.

उषा सोहनी आणि प्रतिभा ठाकूर यांनीही महिलांच्या सशक्तीकरणावर आपले विचार मांडले.

या प्रेरणादायी कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी आंबेकर प्रतिष्ठान कॉलेजच्या प्राचार्या वैशाली घेगडमल यांनी उपस्थितांचे आभार मानले. संघटनेचे उपाध्यक्ष बजरंग चव्हाण यांनी कार्यक्रमाच्या संयोजनात विशेष योगदान दिले.

या विचारमंथनातून महिलांना स्वतःच्या सामर्थ्याची जाणीव होऊन, स्वावलंबनाचा नवा आत्मविश्वास मिळाला, हेच या कार्यक्रमाचे यश आहे!

महिलांच्या मानसिक आरोग्यासाठी विशेष व्याख्यान

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : जागतिक महिला दिनानिमित्त जीेएसबीएस हेल्थ रक्षक क्लिनिकतर्फे महिलांच्या मानसिक आरोग्यावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या व्याख्यानात प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. वैशाली शेलार यांनी स्त्रियांच्या मानसिक आरोग्याचे संतुलन या विषयावर महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.

महिला अनेकदा घरगुती जबाबदाऱ्या, कार्यालयीन दायित्वे आणि वैयक्तिक नातेसंबंध यामध्ये समतोल साधताना तणावाचा सामना करतात. तसेच, हार्मोनल बदल आणि सामाजिक अपेक्षांमुळे त्यांचा मानसिक आरोग्यावर अधिक परिणाम होतो. या सगळ्या गोष्टींचा विचार करता मानसिक आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.

डॉ. शेलार यांनी महिलांच्या मानसिक स्वास्थ्याच्या महत्त्वावर प्रकाश टाकत तणाव व्यवस्थापन आणि मानसिक संतुलन राखण्यासाठी उपयुक्त उपाय सुचवले. अशा उपक्रमांमुळे महिलांमध्ये मानसिक आरोग्याविषयी जागरूकता वाढते आणि त्यांना आवश्यक मानसिक आधार मिळतो. महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित या व्याख्यानातून महिलांना मानसिक सशक्तीकरणाची नवी ऊर्जा मिळाली आहे.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५: भारत-न्यूझीलंड अंतिम सामना – कोण मारणार बाजी?

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आज दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांसाठी हे विजेतेपद प्रतिष्ठेचे असून, भारतीय संघ स्पर्धेत अद्याप अपराजित राहिला आहे. न्यूझीलंडनेही उपांत्य फेरीत दमदार कामगिरी करत अंतिम फेरी गाठली आहे.

भारताचा संघ मजबूत फलंदाजी आणि अचूक गोलंदाजीच्या जोरावर या सामन्यात प्रबळ दावेदार मानला जात आहे. गट-सामन्यात त्यांनी न्यूझीलंडवर ४४ धावांनी विजय मिळवला होता, त्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे. मात्र, न्यूझीलंड हा आयसीसी स्पर्धांमध्ये कोणत्याही परिस्थितीत पुनरागमन करणारा संघ म्हणून ओळखला जातो. त्यांनी उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेला ५० धावांनी पराभूत करून अंतिम फेरी गाठली आहे.

*मागील पराभवाचा न्यूझीलंडच्या मानसिकतेवर प्रभाव?*

गट-सामन्यातील पराभवाचा न्यूझीलंड संघावर काही प्रमाणात मानसिक प्रभाव राहू शकतो, मात्र त्यांचा संघ नेहमी कठीण प्रसंगांमधून बाहेर पडण्याची क्षमता दाखवतो. कर्णधार केन विल्यमसन आणि अष्टपैलू मिचेल सँटनरने भारतीय संघाविरुद्ध विशेष रणनीती आखल्याचे वृत्त आहे. न्यूझीलंडच्या गोलंदाजांसाठी भारतीय फलंदाजांना रोखणे हे आव्हान असेल.

*दोन्ही संघांचा अंतिम फेरीतील इतिहास*

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामन्यांचा इतिहास पाहता, २००० साली नैरोबी येथे झालेल्या आयसीसी नॉकआउट ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने भारताला पराभूत करून विजेतेपद मिळवले होते. त्यानंतर या दोन्ही संघांनी अनेक आयसीसी स्पर्धांमध्ये लढती दिल्या, मात्र चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात ते पुन्हा आमनेसामने आलेले नाहीत.

भारताने हा सामना जिंकला, तर ते चॅम्पियन्स ट्रॉफी तीन वेळा जिंकणारा पहिला संघ ठरेल.

न्यूझीलंडने विजय मिळवला, तर ते २००० नंतर प्रथमच चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकतील.

विराट कोहलीकडे आयसीसी स्पर्धांच्या अंतिम सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम करण्याची संधी आहे.

मोहम्मद शमीकडे एकाच स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा नवा विक्रम प्रस्थापित करण्याची संधी असेल.

विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या अनुभवी फलंदाजीचा संघाला फायदा होईल.

शुभमन गिलने स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे.

जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांच्या गोलंदाजीवर संघाची भिस्त असेल.

हार्दिक पंड्याच्या अष्टपैलू कामगिरीमुळे संघाचा समतोल राखला आहे.

त्याचवेळी न्यूझीलंड संघातील केन विल्यमसन हा संघाचा सर्वांत अनुभवी फलंदाज आहे.

रचिन रवींद्र आणि डेव्हॉन कॉनवे हे फॉर्मात असलेले फलंदाज आहेत.

ट्रेंट बोल्ट आणि लॉकी फर्ग्युसन यांच्या वेगवान माऱ्यामुळे भारतीय फलंदाजांसमोर आव्हान असेल.

मिचेल सँटनरच्या फिरकी गोलंदाजीवर मोठी जबाबदारी असेल.

भारतीय संघासाठी मधल्या फळीत सातत्याचा अभाव हा चिंतेचा विषय ठरू शकतो.

न्यूझीलंडसाठी फिरकी गोलंदाजी प्रभावी ठरणे गरजेचे आहे, अन्यथा भारतीय फलंदाज त्यांना नामोहरम करू शकतात.

दोन्ही संघांच्या तळाच्या फळीतील फलंदाजांची कामगिरी निर्णायक ठरू शकते.

दुबईच्या खेळपट्टीवर दुपारच्या सामन्यांमध्ये नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा होताना दिसतो. टॉस जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याची शक्यता जास्त आहे.

भारताचा टॉप ऑर्डर मजबूत असला तरी मधल्या फळीत काहीवेळा दबावात कामगिरी घसरते. न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांनी त्याचा फायदा घेतल्यास भारत अडचणीत येऊ शकतो.

न्यूझीलंडच्या फलंदाजीची जबाबदारी केवळ केन विल्यमसन आणि कॉनवे यांच्यावर असू नये, कारण भारताची गोलंदाजी आक्रमक आहे.

दुबईमध्ये भारतीय क्रिकेट चाहत्यांची संख्या मोठी असल्यामुळे भारताला घरच्या वातावरणाचा फायदा मिळू शकतो.

न्यूझीलंडला तुलनेने कमी पाठिंबा मिळेल, पण त्यांचा संघ शांत आणि तणावमुक्त खेळ करण्यासाठी ओळखला जातो.

भारताच्या फलंदाजांची चांगली सुरुवात आणि बुमराह-शमी जोडीच्या प्रभावी गोलंदाजीमुळे भारताचा विजयाचा मार्ग सोपा होऊ शकतो.

न्यूझीलंडला विजयासाठी त्यांच्या गोलंदाजांना सुरुवातीला भारतीय फलंदाजांना रोखणे गरजेचे आहे.

भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ अंतिम विजयासाठी आपली सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी मैदानात उतरतील. दोन्ही संघ मजबूत असून सामना अत्यंत चुरशीचा होईल. या हाय व्होल्टेज सामन्यात कोणता संघ इतिहास रचतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

एम. एम. महाविद्यालयात ‘जागतिक महिला दिना’निमित्त ‘Cyber Crime’ विषयावरील प्रशिक्षण कार्यक्रम – महिलांसाठी मार्गदर्शन आणि सायबर सुरक्षेच्या उपाययोजना!

0

Loading

पाचोरा, दि. 08 मार्च 2025 – ‘सायबर गुन्हेगारीविरोधात महिलांचे संरक्षण’ हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरला! पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित, श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पाचोरा येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ‘सायबर क्राईम’ (Cyber Crime) या ज्वलंत विषयावर प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाच्या वाणिज्य आणि व्यवस्थापन विभाग, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि ह्युमन डेव्हलपमेंट फाऊंडेशन, पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन जळगाव येथील सायबर सेल विभागाच्या श्रीमती दीप्ती अनफाट यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी महाविद्यालयाच्या संस्थेचे चेअरमन श्री. नानासाहेब संजय ओंकार वाघ आणि व्हा. चेअरमन श्री. नानासाहेब व्ही. टी. जोशी यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम राबवण्यात आला. सायबर सुरक्षेच्या वाढत्या गरजेची जाणीव ठेवून, महिलांसाठी आणि विद्यार्थिनींसाठी हा कार्यक्रम विशेष उपयोगी ठरणार असल्याचे मान्यवरांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष बी. पाटील होते. आपल्या अध्यक्षीय मनोगतात त्यांनी सायबर क्राईमशी संबंधित अनुभव आणि माहिती सांगत, महिलांची कशी फसवणूक केली जाते, सोशल मीडिया आणि डिजिटल व्यवहारांमध्ये कोणती काळजी घ्यावी, यावर प्रभावी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. जयश्रीताई वाघ यांनी केले. त्यांनी सायबर गुन्हेगारीमुळे महिलांना भेडसावणाऱ्या समस्या आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेल्या गोष्टी याविषयी माहिती दिली. यानंतर जळगाव येथील सायबर सेल विभागाचे तज्ज्ञ श्री. अरविंद वानखेडे यांनी सायबर गुन्हे कसे घडतात, त्याचे स्वरूप कसे असते आणि त्यावर कायदेशीर उपाययोजना कोणत्या आहेत याबद्दल सखोल मार्गदर्शन केले.त्यांनी प्रत्यक्ष घडलेली उदाहरणे देऊन विद्यार्थिनी आणि महिलांना सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे, कोणत्या सायबर गुन्ह्यांचा समावेश कायद्यांतर्गत केला जातो, आणि गुन्हेगारांना कोणती शिक्षा होते याबद्दल माहिती दिली. सायबर गुन्ह्यांची उदाहरणे देताना त्यांनी ऑनलाईन फसवणूक, बँकिंग फ्रॉड, सोशल मीडिया हॅकिंग, फिशिंग, आणि डिजिटल चोरी यासारख्या प्रकारांवर प्रकाश टाकला.
बँक ऑफ महाराष्ट्र, पाचोरा शाखेचे सहाय्यक शाखा व्यवस्थापक श्री. पराग निखारे यांनी Financial Fraud म्हणजे काय, डिजिटल व्यवहारांमध्ये घ्यावयाची काळजी, OTP आणि बँक खात्याची सुरक्षितता, ऑनलाईन पेमेंट गेटवेज, UPI व्यवहार, क्रेडिट कार्ड फसवणूक यासंबंधी माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केले की, ‘सावध नागरिकच सुरक्षित नागरिक’ असतो. ऑनलाईन व्यवहार करताना कोणालाही आपली गोपनीय माहिती देऊ नये, अनोळखी व्यक्तींशी पैशांची देवाण-घेवाण करू नये आणि संशयास्पद लिंक किंवा कॉलवर प्रतिसाद देऊ नये.’
पाचोरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. दिनेश भदाणे यांनी सायबर गुन्ह्यांवर विशेष मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, ‘सायबर गुन्हेगारी ही आधुनिक युगातील सर्वांत धोकादायक समस्या आहे. विशेषतः महिला आणि तरुण मुली यांना याचा मोठा फटका बसतो. त्यासाठी प्रत्येकाने डिजिटल प्लॅटफॉर्मवर जबाबदारीने वागले पाहिजे.’ त्यांनी उपस्थितांना सायबर गुन्हे टाळण्यासाठी आवश्यक असलेल्या सुरक्षा उपाययोजनांविषयी सविस्तर माहिती दिली. विशेषतः सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींशी संभाषण, आपली खासगी माहिती शेअर करणे, बँकिंग माहिती लीक होणे, आणि फसवणुकीच्या वेबसाईट्सना बळी पडणे यावर विशेष भर दिला.
‘Cyber Security Professional Basic Online Course’ ची ओळख सायबर सुरक्षेविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी श्री. गोकुळ सोनार यांनी ‘Cyber Security Professional Basic Online Course’ याविषयी माहिती दिली. या कोर्सच्या माध्यमातून विद्यार्थी आणि महिला ऑनलाईन सुरक्षितता कशी राखावी, पासवर्ड संरक्षित कसे ठेवावेत, आणि हॅकिंगपासून कसे बचावावे याविषयी शिकू शकतात.या कार्यक्रमात उपप्राचार्य डॉ. वासुदेव एस. वले, उपप्राचार्य डॉ. जे. व्ही. पाटील यांच्यासह महाविद्यालयातील अनेक प्रमुख प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. डॉ. जे. डी. गोपाळ, डॉ. के. एस. इंगळे, डॉ. एस. बी. तडवी, डॉ. वाय. बी. पुरी, प्रा. आर. बी. वळवी, प्रा. अतुल पाटील, डॉ. माणिक पाटील, प्रा. स्वप्नील भोसले, प्रा. प्रदीप रुद्रसवाड, डॉ. प्राजक्ता शितोळे, प्रा. सुवर्णा पाटील, प्रा. स्वप्नील पाटील, प्रा. सुनील पाटील, प्रा. किरण पाटील, प्रा. गौतम निकम, डॉ. सरोज अग्रवाल, प्रा. लक्ष्मी गलाणी, प्रा. अक्षय शेंडे, श्रीमती ज्योती जाधव, श्री. सुनील नवगिरे, श्री. जयेश कुमावत, श्री. बी. जे. पवार, श्री. घनश्याम करोसिया, श्री. सुरेंद्र तांबे आदी मान्यवर आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी सुमारे 70 विद्यार्थिनी आणि महिलांची नोंदणी करण्यात आली. प्रशिक्षण कार्यक्रमानंतर उपस्थित महिलांनी आणि विद्यार्थिनींनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत अशा उपक्रमांची आवश्यकता अधोरेखित केली.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन कार्यक्रम सहसमन्वयक डॉ. क्रांती सोनवणे यांनी केले. तर कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन प्रा. संजिदा शेख यांनी केले.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना आणि विद्यार्थिनींना सायबर गुन्हेगारीपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे याविषयी मौल्यवान मार्गदर्शन मिळाले. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने झालेला हा उपक्रम फक्त माहितीपुरता न राहता, महिला आणि तरुणींमध्ये डिजिटल सुरक्षा आणि सायबर जागरूकतेची चळवळ रुजवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे!

गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल, पाचोरा येथे ‘आई आणि मी’ (MOM AND ME) उपक्रम उत्साहात साजरा – महिला सशक्तीकरणाचा नवा अध्याय

0

Loading

पाचोरा – गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल येथे ८ मार्च २०२५, शनिवारी, आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून ‘आई आणि मी’ (Mom and Me) हा विशेष उपक्रम राबवण्यात आला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मातृत्वाचा सन्मान, महिलांचे सशक्तीकरण आणि मातांचा त्यांच्या मुलांसोबतचा नातेबंध अधिक दृढ करण्याचा संकल्प केला गेला.
        या आगळ्यावेगळ्या सोहळ्याचे अध्यक्षस्थान गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलच्या पर्यवेक्षिका व संस्था संचालक सौ. नेहा प्रेमकुमार शामनानी यांनी भूषविले. विशेष अतिथी म्हणून प्राचार्य श्री. प्रेम शामनानी सर, शाळेतील सर्व शिक्षकवृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. शाळेतील महिला शिक्षकांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेत या कार्यक्रमाचा आनंद लुटला.
     या कार्यक्रमात शाळेतील महिला पालकांनी अत्यंत उत्साहाने सहभाग घेतला. महिलांसाठी

विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख आकर्षण ठरले रॅम्प वॉक, स्वपरिचय आणि नृत्य स्पर्धा, ज्यामध्ये महिला पालकांनी आपली कला, आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्त्व प्रभावीपणे सादर केले.
      विशेष म्हणजे, महिलांच्या सशक्तीकरणासाठी या कार्यक्रमात स्वरक्षण प्रशिक्षण आणि सेल्फ-डिफेन्स (Self-Defense) चे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. यासाठी शाळेच्या स्पोर्ट्स शिक्षिका साक्षी पवार मॅडम यांनी विद्यार्थिनींना प्रशिक्षणाच्या माध्यमातून शिकविलेले कराटे आणि सेल्फ-डिफेन्सचे प्रात्यक्षिक सादर केले. या प्रात्यक्षिकांमधून मुलींना संकट प्रसंगी स्वतःचे संरक्षण कसे करावे याचा थेट अनुभव मिळाला.
      महिला पालकांनी या कार्यक्रमात विविध प्रकारच्या नाटिका आणि नृत्यप्रयोग सादर करून समाजातील महिलांच्या संघर्षाची, त्यांची कर्तृत्वगाथा आणि विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी मिळवलेल्या यशाची झलक सादर केली. ‘आजची नारी – सशक्त आणि आत्मनिर्भर’ या विषयावर आधारित नाटिका विशेष आकर्षण ठरली. या नाटकाच्या माध्यमातून महिलांनी स्त्री शिक्षण, महिला सुरक्षाविषयक प्रश्न, स्वावलंबन आणि समाजातील महिलांचा वाढता सहभाग यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकला.
                    शाळेतील विद्यार्थिनींनीही सांस्कृतिक नृत्ये आणि देशभक्तिपर गीतांवर नृत्य सादर करून उपस्थितांचे मन जिंकले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुलींना आपली कला आणि विचार मांडण्याची संधी मिळाली.
        कार्यक्रमाच्या शेवटी पालकांनी आपले मनोगत व्यक्त करत कार्यक्रमाचे आणि शाळेच्या व्यवस्थापनाचे कौतुक केले. महिलांसाठी असा कार्यक्रम आयोजित करून त्यांना आपली कला, आत्मविश्वास आणि कौशल्य दाखवण्याची संधी दिल्याबद्दल शाळेच्या व्यवस्थापनाचे मनःपूर्वक आभार मानले.
         एका पालकांनी सांगितले, “आजच्या महिलांना फक्त घरापुरते मर्यादित राहता कामा नये. प्रत्येक स्त्रीमध्ये सुप्त गुण असतात. अशा कार्यक्रमांमुळे त्यांना ते गुण सादर करण्याची संधी मिळते.”
      तर दुसऱ्या पालकांनी आपल्या अनुभवाबाबत सांगितले, “ही स्पर्धा म्हणजे आमच्यासाठी एक आनंदोत्सव ठरला. आम्हाला रॅम्प वॉक, नृत्य आणि विविध खेळांमध्ये भाग घेऊन खूप मजा आली. आम्ही अशा कार्यक्रमांची पुनरावृत्ती व्हावी अशी मागणी करतो.”
     या कार्यक्रमात सहभागी झालेल्या पालकांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध गटांमध्ये बक्षिसे वाटप करण्यात आली. मा. प्राचार्य श्री. प्रेम शामनानी सर आणि उपस्थित शिक्षिकांच्या हस्ते महिलांना बक्षिसे प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
      महिला पालकांसाठी मनोरंजनात्मक खेळ आणि विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले .
          कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे विशेष योगदान लाभले. त्यांनी आपल्या जबाबदाऱ्या उत्कृष्टपणे पार पाडल्या. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. सौ. अमिना बोहरा यांनी अतिशय सुंदर पद्धतीने पार पाडले. त्यांच्या प्रभावी संवादशैलीमुळे कार्यक्रमाला एक वेगळीच उंची प्राप्त झाली.
        हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला असून, यापुढेही दरवर्षी अशा प्रकारचे महिला सशक्तीकरण आणि कुटुंबातील नाते अधिक दृढ करणारे उपक्रम राबवले जातील, असे शाळेच्या व्यवस्थापनाने जाहीर केले. हा कार्यक्रम फक्त महिला दिनापुरता मर्यादित न ठेवता, वर्षभरात विविध वेगवेगळ्या स्वरूपात महिला सशक्तीकरणासाठी शाळा सातत्याने प्रयत्नशील राहील, असेही सांगण्यात आले.
        या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्त्रीशक्तीचा सन्मान, मातृत्वाचा गौरव, महिला आत्मनिर्भरतेला चालना आणि समाजाच्या सर्व स्तरावर महिलांचा प्रभावी सहभाग वाढवण्याचा संकल्प करण्यात आला. ‘आई आणि मी’ (Mom and Me) हा उपक्रम केवळ एक कार्यक्रम नसून, तो महिलांच्या हक्कांसाठी उभारलेली एक चळवळ आहे. महिलांच्या समान हक्कांसाठी, त्यांना सर्व क्षेत्रांत पुढे नेण्यासाठी आणि त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन महत्त्वाचे आहे.
      संपूर्ण कार्यक्रम यशस्वीतेने पार पाडल्याबद्दल शाळेच्या व्यवस्थापन, शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालकवर्ग आणि विद्यार्थ्यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.

मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेड यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा गौरव: कर्तृत्वाचा सन्मान आणि प्रेरणादायी सन्मान सोहळा

0

Loading

पाचोरा- जागतिक महिला दिनानिमित्त मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेड यांच्या वतीने पाचोरा येथील शिक्षण, कायदा आणि सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न झाला. चिंतामणी सहकारी गृहनिर्माण संस्थेमध्ये, दीपक हरी पाटील यांच्या निवासस्थानी हा सन्मान सोहळा पार पडला.
         या कार्यक्रमात मुख्याध्यापक मंगेश पाटील सर यांच्या पत्नी, सौ. प्रतिभाताई मंगेश पाटील यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा शाल, दैनंदिनी आणि हारगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास परिसरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, तसेच मराठा सेवा संघाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
       महिला सन्मान सोहळा हा केवळ औपचारिकता नसून समाजातील कर्तृत्ववान महिलांना त्यांच्या कार्याची पावती देणारा आणि समाजाने त्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला एक प्रेरणादायी उपक्रम होता. मराठा सेवा संघ आणि जिजाऊ ब्रिगेड यांनी मातृसत्ताक व्यवस्थेचा सन्मान ठेवत शिवसंस्कृतीचा वारसा जपण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
      समाजाच्या जडणघडणीसाठी महिलांची भूमिका फार महत्त्वाची असते. याची जाणीव ठेवून राजमाता जिजाऊ, राष्ट्रमाता माऊसाहेब, सावित्रीमाई फुले, रमाई आंबेडकर, ताराराणी यांचे विचार घेऊन मराठा सेवा संघ सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतो. त्यांच्या प्रेरणादायी विचारांचा वसा पुढे नेत समाजातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्याचा हा उपक्रम स्तुत्य ठरला.
     या सन्मान सोहळ्यात पाचोरा शहरातील वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलेल्या महिलांचा गौरव करण्यात आला. त्यांच्या योगदानाची थोडक्यात माहिती पुढीलप्रमाणे:
१) शिक्षण क्षेत्रातील महिलांचा सन्मान -शिक्षण क्षेत्र हा समाजाच्या उन्नतीसाठी कणा समजला जातो. अनेक महिला शिक्षण क्षेत्रात मोठे कार्य करत आहेत. त्यापैकी काही जणींना त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी केलेल्या मेहनतीसाठी आणि समाजाला सुसंस्कारित शिक्षण देण्यासाठी सन्मानित करण्यात आले.
२) कायदा आणि न्यायव्यवस्था क्षेत्रातील महिलांचा सन्मान    समाजात कायदा आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी महिलांचे मोठे योगदान आहे. महिला वकील, न्यायाधीश, पोलीस अधिकारी, सामाजिक कार्यकर्त्या यांचा गौरव करून त्यांना त्यांच्या कठीण परिस्थितीत केलेल्या संघर्षाची दखल घेण्यात आली.
     ३) सामाजिक कार्यकर्त्या आणि स्वयंसेवी संस्थांमध्ये योगदान देणाऱ्या महिलांचा सन्मान
     समाजहितासाठी निःस्वार्थपणे कार्य करणाऱ्या महिला कार्यकर्त्यांचा सत्कार हा या कार्यक्रमाचा एक मुख्य भाग होता. बालकांचा, महिलांचा आणि वंचित घटकांचा उद्धार करण्यासाठी या महिलांनी योगदान दिले आहे.
   ४) उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रातील महिलांचा सन्मान
     कुटुंबाचा आर्थिक कणा म्हणून महिलांनी व्यवसायातही आपली ओळख निर्माण केली आहे. स्वयंरोजगार, लघुउद्योग, शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या महिलांचा गौरव करून त्यांच्या आत्मनिर्भरतेला दाद देण्यात आली.
५) कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातील महिलांचा सन्मान संस्कृती आणि कला हे समाजाचे आरसे आहेत. नृत्य, संगीत, साहित्य, चित्रकला आणि लोककला अशा विविध क्षेत्रात आपले योगदान देणाऱ्या महिला कलावंतांचा सन्मान करण्यात आला.
      या कार्यक्रमात अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या मनोगतातून महिलांचे महत्त्व अधोरेखित झाले.
     सौ. प्रतिभाताई मंगेश पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले,
“महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करणे ही समाजाची जबाबदारी आहे. महिलांना योग्य संधी मिळाल्यास त्या कोणत्याही क्षेत्रात उत्तम कामगिरी करू शकतात. समाजाने महिलांना आदराने आणि समानतेने वागवले पाहिजे.”
     दीपक हरी पाटील यांनी सांगितले,
“आजच्या घडीला महिलांनी स्वतःला सिद्ध करून दाखवले आहे. पण त्यांना पाठबळ मिळाले, तर त्या आणखी मोठे यश संपादन करू शकतात. मराठा सेवा संघ आणि जिजाऊ ब्रिगेड या महिलांच्या सन्मानासाठी नेहमीच कार्यरत राहतील.” मराठा सेवा संघाचे पदाधिकारी यांनी सांगितले,
“छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श ठेवून आणि राजमाता जिजाऊ यांचा प्रेरणादायी विचार पुढे नेत आम्ही हे कार्य करतो. महिलांचा सन्मान करणे, हा केवळ एक दिवस साजरा करण्याचा विषय नसून तो आपल्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग असला पाहिजे.”
    या सत्कार सोहळ्यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक नागरिक आणि उपस्थित मान्यवरांनी हा उपक्रम स्तुत्य आणि प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले.
  एकूणच, महिलांचा सन्मान हा केवळ त्यांच्या कामगिरीचा गौरव नाही, तर पुढच्या पिढीतील तरुणींना प्रेरणा देण्याचा एक महत्वपूर्ण भाग आहे. मराठा सेवा संघ आणि जिजाऊ ब्रिगेड यांनी हा उपक्रम राबवून महिलांना सामाजिक सन्मानाचे स्थान देण्याचे कार्य केले आहे.
    “घरातील प्रत्येक महिला ही जिजाऊ, सावित्रीमाई, रमाईच असते, तिचा आदर आणि सन्मान करणं हीच खरी शिवसंस्कृती आहे!”
    या कार्यक्रमाने महिलांच्या योगदानाची ओळख करून देत समाजात त्यांची प्रतिमा अधिक उजळ केली. महिलांना शिक्षण, स्वावलंबन आणि नेतृत्वक्षमता प्राप्त करण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम अधिक प्रमाणात व्हावेत, अशी सर्वसामान्यांची मागणी आहे.
     मराठा सेवा संघ आणि जिजाऊ ब्रिगेड यांनी घेतलेला हा पुढाकार निश्चितच समाजात परिवर्तन घडविण्यास मदत करणारा ठरेल. भविष्यातही असे प्रेरणादायी कार्यक्रम घडत राहोत आणि महिलांना त्यांच्या कर्तृत्वाचा उचित सन्मान मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!