![]()
पाचोरा – ग्रामीण विकासाचा शेतकऱ्यांच्या समस्यांचा ध्यास घेत सातत्याने काम करणारे हॅट्रिक कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या पुढाकारातून पाचोरा तालुक्यातील पहाण येथे ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता’ योजनेअंतर्गत महत्त्वपूर्ण कामाला प्रारंभ झाला आहे. महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर झालेला हा शुभारंभ केवळ औपचारिक कार्यक्रम न राहता शेतकऱ्यांच्या आशा-अपेक्षांना नवे बळ देणारा ठरला. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या मागणीला आमदार पाटील यांनी प्रत्यक्षात उतरवून दाखवल्याने परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या उपक्रमाचे भूमिपूजन आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करीष्मा नायर, प्रांताधिकारी भूषण अहिरे, तहसीलदार विजय बनसोडे तसेच गटविकास अधिकारी तुकाराम मुंडे यांची उपस्थिती लाभली. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वयामुळे विकासकामांना गती मिळत असल्याचे या प्रसंगी अधोरेखित झाले. पहाण येथील जिल्हा परिषद शाळेपासून नामदेव रामचंद्र पाटील यांच्या शेतापर्यंतचा रस्ता तयार होणार असून, हा मार्ग शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. पावसाळ्यात चिखलामुळे शेतात पोहोचणे कठीण होत असल्याने शेतीची कामे अडखळत होती, तसेच शेतमाल बाजारात नेणेही मोठे आव्हान बनत होते. या पार्श्वभूमीवर आमदार किशोर आप्पा पाटील यांनी या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेत संबंधित विभागांकडे पाठपुरावा करून अखेर कामाला मंजुरी मिळवून दिली. त्यामुळे आता शेतकऱ्यांना वर्षभर सुलभ दळणवळणाची सुविधा उपलब्ध होणार आहे. या कामासाठी आवश्यक असलेली प्रशासकीय व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली असून, राज्य शासनाच्या निधीतून ‘श्री शीतल ग्रुप’ या कंत्राटदारामार्फत काम पूर्ण होणार आहे. दर्जेदार काम आणि वेळेचे नियोजन यावर भर देत आमदार पाटील यांनी प्रशासनाला स्पष्ट सूचना दिल्या आहेत. शुभारंभ प्रसंगी बोलताना आमदार किशोर आप्पा पाटील यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करणे हेच खरे विकासाचे मापदंड आहे. ग्रामीण भागातील रस्ते सुधारले तर शेतीसह संपूर्ण अर्थचक्राला चालना मिळते. पावसाळ्यातील अडथळे दूर करून शेतमाल वाहतुकीस सुलभता निर्माण करणे हा या योजनेमागील मुख्य उद्देश असून, त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ते कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनीही काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण व्हावे यासाठी संबंधित यंत्रणांना सूचना देत पारदर्शकतेवर भर देण्याचे निर्देश दिले. कोणत्याही प्रकारची हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. या कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे, तहसील प्रशासनातील अधिकारी, विविध विभागांचे कर्मचारी, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित शेतकऱ्यांनी आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच हा रस्ता साकार होत असल्याची भावना व्यक्त केली. अनेकांनी हा मार्ग त्यांच्या शेतीसाठी नवी दिशा देणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करत आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केलेली विकासकामे ही केवळ आश्वासने न राहता प्रत्यक्षात उतरलेली उदाहरणे ठरत आहेत. पहाण येथील या रस्त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी दूर होण्याबरोबरच गावाच्या सर्वांगीण प्रगतीलाही चालना मिळणार असून, हा प्रकल्प भविष्यातील विकासासाठी मार्गदर्शक ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.








































