Home Blog Page 103

नोंदणी दस्त हाती घेणे झाले दुप्पट महाग: राज्य शासनाच्या निर्णयामुळे घरखरेदीदारांवर आर्थिक भार

0

Loading

पाचोरा –( झुंज वृत्तपत्र & ध्येय न्युज प्रतिनिधी – धनराज पाटील, बॅनर Mo. 9922614917)— महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने दस्तनोंदणी प्रक्रियेतील ‘दस्त हाताळणी शुल्क’ प्रतिपान २० रुपये वरून थेट ४० रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. १५ एप्रिल २०२५ रोजी जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार हा वाढीव दर संपूर्ण राज्यभर लागू करण्यात येणार असून, दस्तनोंदणी प्रक्रिया अधिक डिजिटल, सुरक्षित आणि कार्यक्षम बनवण्यासाठी होणाऱ्या खर्चाची पूर्तता यामार्फत केली जाणार आहे. तथापि, यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशावर थेट आर्थिक ताण पडणार असल्याने समाजात विविध पातळींवर चिंता व्यक्त केली जात आहे.
हा शासन निर्णय महसूल विभागाचे सह सचिव सत्यनारायण बजाज यांच्या स्वाक्षरीने आणि राज्यपालांच्या आदेशानुसार जारी करण्यात आला आहे. दस्तनोंदणीच्या संगणकीकरणासाठी आणि त्या अंतर्गत लागणाऱ्या हार्डवेअर, सॉफ्टवेअर, डेटा सेंटर, नेटवर्क, तांत्रिक मनुष्यबळ, आणि देखभाल व्यवस्थेसाठी खर्चात सातत्याने झालेली वाढ लक्षात घेता दस्त हाताळणी शुल्क वाढविणे शासनाच्या विचाराधीन होते. अखेर, महसूल आणि वन विभागाने याबाबतचे आदेश काढून या शुल्कात दुप्पट वाढ केली आहे.
सन २००१ मध्ये ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्त्वावर आधारित दस्तनोंदणी प्रक्रियेच्या संगणकीकरणाची सुरुवात झाली होती. यावेळी दस्त हाताळणी शुल्क प्रती पान फक्त २० रुपये निश्चित करण्यात आले होते. हे शुल्क २००१ पासून आजतागायत कायम होते. परंतु २००२ नंतर संगणकीकरणाच्या क्षेत्रात झालेली व्यापक वाढ, प्रणालीतील तांत्रिक प्रगती आणि वाढती कार्यालयीन गरज यामुळे त्यामागील आर्थिक गुंतवणूक लक्षणीय प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे आता दस्त हाताळणी शुल्कात दुप्पट वाढ करून ते ४० रुपये करण्यात आले आहे.
सध्या राज्यात एकूण ३५ संगणकीकृत दस्तनोंदणी कार्यालये कार्यरत असून, दररोज हजारो व्यवहार आणि दस्तनोंदणी प्रक्रिया या कार्यालयांमधून पार पडतात. यासाठी वेब आधारित प्रणाली, डेटा साठवणूक केंद्र, सर्व्हर इन्फ्रास्ट्रक्चर, स्वतंत्र MPLS नेटवर्क कनेक्टिव्हिटी आणि IT सहाय्यक मनुष्यबळाची आवश्यकता असते. याचबरोबर प्रत्येक जिल्हा व विभागीय कार्यालयांमध्ये टेक्निकल सपोर्ट यंत्रणा कार्यरत आहे, जी सॉफ्टवेअर अपग्रेड्स, हार्डवेअर देखभाल, नेटवर्क समस्या, प्रशिक्षण, आणि इतर तांत्रिक अडचणी दूर करण्याचे काम करते. यामुळे संगणकीकरणासाठीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
सन २०१२ मध्ये वेब आधारित प्रणाली लागू झाल्यानंतर डेटा सेंटर आणि सर्व्हरच्या खर्चात अधिक वाढ झाली. दस्तनोंदणी व्यवहारांचे प्रमाण वाढल्याने डेटाच्या प्रमाणातही सातत्याने वाढ झाली आहे. परिणामी, मोठ्या क्षमतेचे स्टोरेज, अधिक सुरक्षित सर्व्हर आणि जलद नेटवर्क आवश्यक झाले आहे. या सगळ्याचा थेट खर्च दस्तनोंदणी विभागाच्या सेवा निधी (Service Fund) मधून केला जात असल्याने त्यावरचा ताणही वाढला आहे.
महत्वाचे म्हणजे, महसूल व वन विभागाने ८ ऑक्टोबर २०१५ रोजी जारी केलेल्या आदेशाद्वारे दस्तनोंदणी प्रक्रियेच्या तांत्रिक अंमलबजावणीसाठी खासगी सल्लागार व सेवा प्रदात्यांची मदत घेण्यास मान्यता दिली होती. १८ एप्रिल २०२२ रोजी महसूल विभागाच्या एकात्मिक माहिती व्यवस्थापन कक्षाची स्थापना करण्यात आली. या प्रक्रियेमुळे दस्तनोंदणी कार्यालयांची संख्या, सुविधा, व सेवांचा विस्तार झाल्याने खर्चही वाढला आहे. याशिवाय राज्यभरातील उप निबंधक कार्यालयांची संख्या सुमारे २०० ने वाढली आहे, ज्यामुळे हार्डवेअर, कंझ्युमेबल्स, सॉफ्टवेअर लायसन्सेस, आणि तांत्रिक मनुष्यबळ यावरचा खर्चही अनेक पटींनी वाढलेला आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर दस्त हाताळणी शुल्क २० रुपयेवरून ४० रुपये इतके करण्याची नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी शासनाकडे शिफारस केली होती. त्यानुसार शासनाने सदर प्रस्तावाला मान्यता देऊन त्वरित अंमलबजावणी केली आहे.
नवीन आदेशानुसार, ही शुल्कवाढ १७ फेब्रुवारी २०२५ रोजी वित्त विभागाच्या संमतीनुसार निश्चित करण्यात आली असून, याची अधिकृत नोंद शासनाच्या संकेतस्थळावर (www.maharashtra.gov.in) प्रकाशित करण्यात आली आहे. दस्त हाताळणी शुल्क वाढीचा संगणकीय संदर्भ क्रमांक 202504151756085019 असा आहे. सदर आदेश डिजिटल स्वाक्षरीसह निर्गमित करण्यात आला आहे.
तथापि, या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक भार वाढण्याची शक्यता आहे. दस्तनोंदणी व्यवहारांमध्ये आधीच स्टॅम्प ड्युटी, नोंदणी शुल्क, छपाई व फोटोकॉपी खर्च, कायदेशीर सल्लागारांचे मानधन, इतर प्रक्रिया शुल्क इत्यादी भरावे लागते. त्यात आता प्रतीपान ४० रुपये दस्त हाताळणी शुल्क वाढल्यामुळे व्यवहाराचा एकूण खर्च लक्षणीयरीत्या वाढणार आहे.
विशेषतः गृह खरेदीदार, शेतकरी, लघु उद्योजक, आणि सामान्य कुटुंबांसाठी ही वाढ मोठे आर्थिक आव्हान ठरू शकते. दस्तावेजात पानसंख्या जास्त असल्यास दस्त हाताळणी शुल्कदेखील हजारोंच्या घरात पोहोचण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागात जिथे जमिनींचे व्यवहार, वारस नोंदणी, गहाणखत किंवा तडजोडीच्या कागदपत्रांची पाने अनेकदा अधिक असतात, तिथे या वाढीचा परिणाम अधिक जाणवेल.
या पार्श्वभूमीवर दस्त लेखक संघटना, कायदेविषयक सल्लागार, वकील संघटनाही या निर्णयावर नाराजी व्यक्त करत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की या शुल्कवाढीमुळे नागरिक खासगी दलालांचा मार्ग पत्करू शकतात, अनधिकृत व्यवहारांना चालना मिळू शकते, आणि अधिकृत प्रक्रियेपासून लोक दूर राहू शकतात. त्यामुळे शासनाने ही वाढ लागू करताना पारदर्शकता, सेवा दर्जा आणि नागरिकांसाठी दिलासा देणाऱ्या उपाययोजना देखील करणे आवश्यक आहे.
दुसरीकडे, शासनाचे म्हणणे आहे की संगणकीकरणामुळे दस्तनोंदणी व्यवहार अधिक जलद, सुरक्षित आणि पारदर्शक बनले आहेत. पूर्वी अनेक दिवस लागत असलेले दस्तावेज आता अल्प कालावधीत ऑनलाईन प्रक्रियेद्वारे तयार होत आहेत. त्यामुळे नागरिकांना देखील सेवा सुलभतेचा लाभ मिळतो आहे. मात्र यासाठी होणारा खर्च भागवण्यासाठी दस्त हाताळणी शुल्क वाढवणे अपरिहार्य होते, असा प्रशासनाचा युक्तिवाद आहे.
सामाजिक संघटनांचे म्हणणे आहे की, सरकारने नागरिकांवर सरळ आर्थिक भार टाकण्याऐवजी महसूल विभागातील अपव्यय, अनावश्यक खर्च यावर नियंत्रण आणून निधीची बचत करावी. तसेच संगणकीकरणात पारदर्शक निविदा प्रक्रिया, खर्चावर नियंत्रण, आणि नियोजनबद्ध खर्चाचे व्यवस्थापन केल्यास सामान्य नागरिकांची गळचेपी टाळता आली असती.
या निर्णयामुळे येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था, बांधकाम व्यावसायिक, पतसंस्था यांच्यासह अनेक क्षेत्रांवर अप्रत्यक्ष परिणाम होण्याची शक्यता आहे. विशेषतः गृह प्रकल्प विकसकांना दस्तनोंदणीशी संबंधित एकूण खर्च वाढल्यामुळे तो खर्च ग्राहकांकडून वसूल करावा लागणार आहे, जे ग्राहकांसाठी आणखी महागात पडू शकते.
शेवटी इतकेच म्हणावे लागेल की, राज्य शासनाचा हा निर्णय एकीकडे डिजिटल व कार्यक्षम यंत्रणा निर्माण करण्याचा प्रयत्न असला तरी दुसरीकडे नागरिकांवरचा आर्थिक बोजा वाढवणारा आहे. शासनाने या वाढीच्या जोडीला सेवा सुधारणा, प्रामाणिक माहितीप्रसारण, ऑनलाईन सल्ला केंद्र, सेवा वेळापत्रक, व ग्रामीण सवलती अशा उपायांची घोषणा केल्यासच नागरिकांना या बदलाचा स्वीकार करता येईल. अन्यथा हा निर्णय केवळ महसूल वाढीसाठी नागरिकांच्या खिशावर हात घालणारा ठरेल.

कर्तृत्वाची उंच भरारी : अभियंता विशाल पाटील यांची IIM-MBA नंतर थेट इन्फोसिसमध्ये बी.एस. मॅनेजरपदी नेमणूक

0

Loading

चोपडा -(प्रतिनीधी मनिष प्र. महाजन, भाई कोतवाल रोड चोपडा
M0. 97661 43638 , 98508 65961) – उत्तम शिक्षण, प्रबळ इच्छाशक्ती आणि न थांबणाऱ्या प्रयत्नांच्या जोरावर आयुष्यात कोणतेही शिखर गाठता येते, याचा एक आदर्श ठरावा असा प्रेरणादायी प्रवास पुणे येथे वास्तव्यास असलेल्या गरताड येथील मुळचे रहिवासी ज्ञानेश्वर अभिमन पाटील (माजी सैन्य अधिकारी) यांचे सुपुत्र आणि चोपडा येथील विठ्ठल अभिमन पाटील (माजी सैन्य अधिकारी) यांचे पुतण्या चि. विशाल पाटील यांचा आहे. अत्यंत साध्या आणि सेवाभावी कुटुंबातून आलेल्या विशाल यांनी शिक्षणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करून आपल्या घराण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. अभियांत्रिकी क्षेत्रातील B.E. (Mechanical) ची पदवी प्राप्त केल्यानंतर अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनी XL डायनॅमिक्स मध्ये कार्यरत राहून त्यांनी व्यावसायिक अनुभव मिळवला. मात्र बी.ई. ची पदवी एवढ्यावरच समाधान न मानता त्यांनी शिक्षणाची वाटचाल पुढे सुरू ठेवत CAT या अत्यंत कठीण परीक्षेत यश मिळवून थेट बुद्धगया येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) मध्ये MBA करण्याचा मान मिळवला. IIM सारख्या देशातील सर्वोच्च व्यवस्थापन संस्थेत प्रवेश मिळवणे हीच एक मोठी गोष्ट, त्यातही प्रथम श्रेणीसह MBA पूर्ण करून त्यांनी आपले शैक्षणिक व कौशल्याचे वर्चस्व सिद्ध केले आहे. त्यांच्या परिश्रमांना आणि गुणवत्तेला प्रत्यक्ष मान्यता लाभली ती थेट इन्फोसिस या जगप्रसिद्ध आयटी क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीमध्ये Business Strategy Manager या उच्चपदावर नियुक्ती होऊन. विशाल पाटील यांची निवड ही केवळ त्यांच्या ज्ञानाच्या बळावरच नव्हे, तर त्यांनी मिळवलेल्या व्यावसायिक अनुभव, IIM मधील अभ्यासक्रमातील गुणवत्ता आणि त्यांचे नेतृत्वगुण या सर्वच बाबी लक्षात घेऊन करण्यात आली आहे. इन्फोसिससारख्या प्रस्थापित कंपनीत Business Strategy विभागामध्ये काम करणे म्हणजे देशाच्या आर्थिक आणि डिजिटल धोरणात हातभार लावण्याचे मोठे जबाबदारीचे काम असते. विशाल यांनी आपल्या कारकिर्दीत केलेल्या धैर्यवान निर्णयांनी आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांनी नवे आदर्श उभे केले आहेत. अमेरिकन कंपनीतील नोकरी सोडून उच्च शिक्षणासाठी वेळ देण्याचा निर्णय अनेकांसाठी कठीण असतो, पण विशाल यांनी आपल्या आत्मविश्वासाच्या जोरावर हा मार्ग निवडून दाखवला. त्यांच्या यशामागे त्यांची स्वयंशिस्त, पारंपरिक कुटुंबातील मूल्ये, आणि त्यांना मिळालेलं मार्गदर्शन या सर्वांचा मोलाचा वाटा आहे. त्यांचे वडील ज्ञानेश्वर अभिमन पाटील हे भारतीय सैन्यात अधिकारी पदावर कार्यरत होते. शिस्त, देशसेवा आणि प्रामाणिकपणा हेच त्यांच्या जीवनाचे मूलमंत्र होते. हेच संस्कार विशालवर लहानपणापासूनच झाले. तसेच विठ्ठल अभिमन पाटील हेही माजी सैन्य अधिकारी असून त्यांचाही प्रभाव विशालच्या व्यक्तिमत्वावर मोठ्या प्रमाणात आहे. अशा कुटुंबातील नव्या पिढीतील युवकाने शिक्षण, कौशल्य आणि कष्ट यांच्या जोरावर देशपातळीवरील यश संपादन करणे ही खर्‍या अर्थाने कौतुकाची बाब आहे. विशाल पाटील यांच्या यशामुळे गरताड, चोपडा, पुणे तसेच जळगाव जिल्ह्यातील तमाम तरुणांमध्ये प्रचंड उत्साह आणि आत्मविश्वास निर्माण झाला आहे. खेड्यातील विद्यार्थ्यांनाही IIM, Infosys यासारख्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थांमध्ये स्थान मिळवता येते, हे त्यांच्या यशामुळे सिद्ध झाले आहे. त्यांच्या यशाचा प्रवास विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी सुद्धा मार्गदर्शक ठरावा असा आहे. विशाल यांनी दाखवून दिलं आहे की, शिक्षणात सातत्य, स्पष्ट ध्येय आणि योग्य दिशा या त्रिसूत्रीवर चालल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नाही. त्यांनी केवळ आपले कौटुंबिक नाव उज्वल केले नाही तर समाजासाठी एक प्रेरणास्रोत म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. सध्या पुणे येथील इन्फोसिसच्या प्रमुख कार्यालयात बिझनेस स्ट्रॅटेजी मॅनेजर या पदावर रुजू झालेल्या चि. विशाल पाटील यांचे झुंज वृत्तपत्र व ध्येय न्यूजच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांचे पुढील कार्यक्षेत्र यशस्वी, समृद्ध व देशहितासाठी उपयोगी होवो हीच शुभेच्छा. यशोगाथेचा सारांश : BE (Mechanical) नंतर अमेरिकन कंपनी XL डायनॅमिक्स मध्ये नोकरी, CAT परीक्षेद्वारे बुद्धगया IIM मध्ये प्रवेश, IIM-MBA प्रथम श्रेणीत उत्तीर्ण, थेट इन्फोसिसमध्ये Business Strategy Manager म्हणून नियुक्ती, शिक्षण, अनुभव आणि व्यवस्थापन कौशल्य यांचा उत्तम संगम. या प्रेरणादायी यशाबद्दल पुणे, गरताड, चोपडा, जळगाव जिल्हा आणि महाराष्ट्रातील तमाम युवकांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे. या ध्येयवेड्या युवकाच्या यशाची गाथा समाजात नवचैतन्य निर्माण करणारी ठरली आहे

जळगाव येथे “राष्ट्रीय स्तरावरील बडगुजर समाज विचार-मंथन संमेलनाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम

2

Loading

जळगाव – आजच्या यंत्रयुगीन आणि तांत्रिक प्रगतीच्या काळात बडगुजर समाजाच्या अंतर्गत एकात्मता, विचारांची दिशा आणि सामाजिक संघटनाचे महत्त्व अधिकच अधोरेखित होत चालले आहे. समाजाच्या चिरस्थायी प्रगतीसाठी आणि उद्याच्या पिढीला मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ, बडगुजर दर्शन मुंबई यांच्यावतीने आणि देशभरातील विविध सहकारी मंडळे, कार्यकर्ते, सामाजिक नेतृत्व यांच्या सहकार्याने रविवार, दिनांक ४ मे २०२५ रोजी, जळगाव शहरात दापोरेकर मंगल कार्यालय येथे एक ऐतिहासिक व राष्ट्रीय स्वरूपाचा समाज विचार-मंथन संमेलन सोहळा आयोजित करण्यात येत आहे.
या संमेलनाच्या निमित्ताने महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान या राज्यांतील विविध

जिल्ह्यांतून हजारो समाजबंधू, कार्यकर्ते, तरुण-तरुणी, महिला मंडळे, ज्येष्ठ मार्गदर्शक, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, व्यावसायिक आणि शिक्षणतज्ज्ञ मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम केवळ समाजहितासाठीच नव्हे तर भावी पिढीच्या समृद्ध भविष्याचा पाया रचण्यासाठी मैलाचा दगड ठरणार आहे.
बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ, बडगुजर दर्शन मुंबई या संघटनेने आपल्या स्थापनेपासून समाजाच्या उन्नतीसाठी सातत्याने कार्य केले आहे. वर्धापन दिनानिमित्त सामाजिक भान असलेल्या उपक्रमांना चालना देण्याचा संकल्प करत यंदाचा वर्धापन दिन काहीतरी आगळंवेगळं करून साजरा करण्याचा निर्णय मंडळाने घेतला. त्यातूनच समाजहिताचे विचारमंथन व्हावे, नव्या विचारांचा अविष्कार घडावा, समाजात एकात्मता यावी, नेतृत्व घडावे आणि विवाह, शिक्षण, नोकरी, व्यसनमुक्ती, महिलासक्षमीकरण यांसारख्या प्रश्नांवर एकत्रित विचार होऊन उपाययोजना सुचवाव्यात यासाठी “समाज विचार-मंथन संमेलन सोहळा” साकार झाला आहे.
समाजातील सर्वात जळजळीत व संवेदनशील विषयांपैकी एक म्हणजे विवाहविषयक समस्या. समाजात योग्य वयात विवाह होत नाही, मुले-मुली शिक्षण किंवा नोकरीसाठी विलंबाने स्थिर होतात, आर्थिक अपेक्षा वाढतात, मुलींना वर मिळणे कठीण जाते किंवा मुलग्यांना मुली मिळत नाहीत असे प्रकार वाढले आहेत. आधुनिक जीवनशैली, सोशल मीडियाचा अतिरेक, समाजातील संवादाचा अभाव, जातीतील संकुचितता, परंपरांचे अंधानुकरण आणि तांत्रिक साधनांचा अभाव यामुळे विवाह संस्थेचा पाया डळमळीत होतो आहे.
या पार्श्वभूमीवर संमेलनामध्ये विशेष सत्र आयोजित करून विवाह संस्था सशक्त करणाऱ्या उपाययोजना, सामूहिक विवाहांचे आयोजन, विवाह मेळावे, डिजिटल डेटाबेस तयार करून जुळवाजुळव सुविधा, वयाच्या अनुषंगाने समाजाचे मार्गदर्शन, पालकांसाठी कार्यशाळा यावर चर्चा होणार आहे. समाजातील ज्येष्ठ व मार्गदर्शक मंडळींच्या अनुभवाच्या आधारे एक सकारात्मक विचारवाट उभा करण्याचा मानस आहे.
समाजाचा विकास केवळ आर्थिक भरभराटीने होत नाही. त्यासाठी सशक्त विचारांची, ध्येयवेड्या नेतृत्वाची, एकतेची आणि कृतिशील सहभागाची आवश्यकता असते. समाजात नेतृत्व निर्माण होत नाही असे नाही – पण ते स्थिर राहत नाही, कारण त्यामागे सहकार्याचा अभाव असतो. मतभेदांना संघटनात आड येऊ नये यासाठी नेतृत्वसंवर्धन हेही या संमेलनाचे एक प्रमुख परिमाण असेल.
कार्यक्रमात विविध राज्यातील व जिल्ह्यांतील युवक-युवतीं करीता यामार्फत नेतृत्व कौशल्य विकसित करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. काही यशस्वी बडगुजर तरुणांनी उद्योग, प्रशासन, शिक्षण, न्यायक्षेत्र यामध्ये केलेली वाटचाल इतरांना प्रेरणा देईल अशा स्वरूपात माहीती मिळणार आहे
शिक्षण व कौशल्य विकास – गुणवत्तापूर्ण शिक्षणाची गरज व दिशा
युवकांतील व्यसनमुक्ती व जीवनशैली सुधारणा
महिलांचे आरोग्य, सक्षमीकरण आणि अर्थिक स्वावलंबन
समाजातील विविध गटांतील संवाद व सुसंवाद निर्मिती
संघटित सहभागाने समाजविकासाची धोरणात्मक आखणी
डिजिटल युगात समाज संघटनेची नव्याने उभारणी
या सगळ्या विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शक आपले अनुभव, विचार आणि दिशा स्पष्ट करतील.
भविष्यातील समाजविकासाचा व्हिजन – ठोस प्रस्ताव
कार्यक्रमात संपूर्ण बडगुजर समाजाच्या विकासासाठी “समाज व्हिजन दस्तऐवज” तयार करण्यात येणार असून, तो संमेलनाच्या अखेरीस सर्व सहकारी मंडळांना सादर करण्यात येणार आहे.
या संमेलनात विविध क्षेत्रांतून समाजाचा गौरव वाढविणाऱ्या बडगुजर व्यक्तींनी शिक्षण, कायदा, वैद्यकीय, प्रशासकीय, उद्योग, लष्कर, कला, साहित्य, पत्रकारिता अशा क्षेत्रातील समाजरत्नांचे विचार हे समाजाला आदर्श निर्माण करणारे ठरतील
संपूर्ण संमेलनात प्रत्येक गाव, शहरातून प्रतिनिधींची उपस्थिती अत्यावश्यक असून, प्रत्येक प्रतिनिधीने स्वतःच्या गावातील समस्या, सामाजिक घडामोडी, विवाहातील अडथळे, महिला व युवकांचे प्रश्न, तसेच स्थानिक पातळीवर होणारे उपक्रम यांची माहिती घेऊन उपस्थित राहावे. हे विचारसत्र केवळ भाषणाचे व्यासपीठ नसून समाजमनाला दिशा देणारा एक सामूहिक संवाद ठरणार आहे.
हा संमेलन सोहळा म्हणजे केवळ एकदिवसीय कार्यक्रम नाही, तर नवीन सामाजिक युगाची सुरुवात आहे. समाजाने आपले दुर्लक्षित प्रश्न समोर आणले पाहिजेत, नुसते गाऱ्हाणे मांडणे नाही, तर त्यावर उपाय शोधण्यासाठी एकजुटीने पुढे यायला हवे. या कार्यक्रमातून “आता काळ बदलला आहे, आता आपण बदलूया!” असा स्पष्ट संदेश दिला जाणार आहे.
बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ, बडगुजर दर्शन मुंबई आणि सर्व सहकारी मंडळांकडून आवाहन करण्यात आले आहे की, या कार्यक्रमात आपले गाव, आपली संघटना, आपल्या मतांचा प्रतिनिधी म्हणून आपण सहभागी व्हा. संमेलनात आलेली मते, निर्णय, प्रस्ताव हे पुढील धोरणे ठरवण्यासाठी उपयोगी ठरणार आहेत. आपल्या समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी हा ऐतिहासिक क्षण चुकवू नका.
समाज हिताय, समाज सुखाय!
– एक आदर्श समाज घडविण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा!असे आवाहन बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ, बडगुजर दर्शन मुंबई
सह – सर्व सहकारी मंडळे आणि समाज कार्यकर्तेयांनी केले आहे

पाचोऱ्यातील गो.से.हायस्कूलचे गौरवशाली यश: तालुक्यातील सर्वोत्कृष्ट सुंदर शाळा ठरवत प्रथम क्रमांकासह तीन लाखांचे पारितोषिक पटकावले

0

Loading

पाचोरा – पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या गो.से.हायस्कूलने आपल्या स्वच्छ, सुंदर, अनुशासित व आदर्श शालेय व्यवस्थापनाच्या जोरावर ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा – टप्पा दोन’ या उपक्रमात तालुक्यातील सर्वोत्कृष्ट शाळा म्हणून प्रथम क्रमांक पटकावला आहे. या प्रतिष्ठेच्या सन्मानासोबतच शाळेला तीन लाख रुपयांचे रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र मिळाले असून, हा गौरव आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते देण्यात आला.शुक्रवार, दिनांक १८ एप्रिल २०२५ रोजी पाचोरा येथील तात्यासाहेब आर.ओ.पाटील व्यापारी संकुलात पंचायत समिती शिक्षण विभागाच्यावतीने ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमांतर्गत निवड झालेल्या शाळांचा सन्मान समारंभ संपन्न झाला. या

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आमदार किशोर आप्पा पाटील यांनी भूषवले. व्यासपीठावर माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकरभाऊ काटे, पाचोरा नगरपालिकेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे, गटविकास अधिकारी गोकुळ बोरसे, गटशिक्षण अधिकारी समाधानअण्णा पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी सरोज गायकवाड, शाळेचे कमिटी चेअरमन दादासाहेब खलील देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.गो.से.हायस्कूलच्या यशस्वी वाटचालीत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या सर्व शिक्षक, सहशिक्षक, कर्मचाऱ्यांचा या प्रसंगी गौरव करण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक एन.आर.पाटील, उपमुख्याध्यापक आर.एल.पाटील, पर्यवेक्षिका अंजली गोहिल, पर्यवेक्षक आर.बी.तडवी, किमान कौशल्य विभागप्रमुख मनीष बाविस्कर, सांस्कृतिक विभागप्रमुख महेश कौंडिण्य, शिक्षक आर.बी.बांठीया, डी.डी.विसपुते, संगीता वाघ, पी.एम.पाटील, आर.बी.बोरसे, सुबोध कांतायन, अरुण कुमावत, डी.आर.टोणपे, सागर थोरात, रूपेश पाटील आदींनी सन्मानपत्र, ट्रॉफी आणि तीन लाख रुपयांचा चेक आमदारांच्या हस्ते स्वीकारला. या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या पालकांच्या चेहऱ्यावर उत्साह आणि समाधान झळकत होते.मुख्याध्यापक एन.आर.पाटील यांच्यावतीने महेश कौंडिण्य यांनी उपस्थितांना शाळेच्या यशस्वीतेबाबत मनोगत व्यक्त केले. आपल्या मनोगतात त्यांनी सांगितले की, “ही फक्त शाळेची नव्हे तर सर्व पाचोरा तालुक्याच्या शैक्षणिक प्रतिष्ठेची विजयगाथा आहे. आम्ही शिक्षणासोबत विद्यार्थ्यांचे चारित्र्य, कलेचा विकास, संस्कार व नैतिक मूल्ये जोपासण्यावर भर दिला. शाळेचा परिसर, स्वच्छता, पर्यावरणपूरक उपक्रम, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीमुळेच हे यश शक्य झाले.”या कार्यक्रमाचे निवेदन सचिन जोशी आणि विनोद धनगर यांनी अत्यंत ओघवत्या शैलीत पार पाडले. पारितोषिक स्वीकारणाऱ्या शिक्षकांना उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन करत त्यांच्या कार्यक्षमतेची प्रशंसा केली.गो.से.हायस्कूलच्या यशाबाबत पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार दिलीप वाघ, चेअरमन संजय वाघ, मानद सचिव ॲड.महेश देशमुख, व्हाईस चेअरमन व्ही.टी.जोशी, शालेय समितीचे चेअरमन खलील देशमुख, तांत्रिक विभागाचे चेअरमन वासुदेव महाजन यांच्यासह सर्व पदाधिकारी, संचालक मंडळ व विविध शिक्षक संघटनांनी शाळेचे अभिनंदन केले.या यशामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभिमानाची भावना निर्माण झाली असून त्यांच्यात आपल्या शाळेबद्दलचा आत्मविश्वास अधिक दृढ झाला आहे. अनेक पालकांनी शाळेच्या व्यवस्थापन, पर्यावरण संवर्धन उपक्रम, भित्तीचित्रे, लघुपट, सभागृहाची सुसज्जता, डिजिटल शिक्षण सुविधा आणि विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन वाढवणाऱ्या उपक्रमांचे विशेष कौतुक केले.या उपक्रमासाठी शाळेने वर्षभर कठोर परिश्रम घेतले होते. शाळेच्या भिंतींवर पर्यावरण, राष्ट्रप्रेम, समाजसेवा, महिला सक्षमीकरण यासारख्या विषयांवर आधारित भित्तीचित्रे रंगवण्यात आली. स्वच्छतागृह व्यवस्थापन, मुलींसाठी स्वतंत्र सुविधा, जलशुद्धीकरण यंत्र, रेनवॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा, डिजिटल लायब्ररी, पर्यावरण क्लब, हरित गट, प्लास्टिकमुक्त शाळा अशा उपक्रमांनी शाळेला वेगळा दर्जा प्राप्त करून दिला.यशाचे खरे श्रेय शाळेतील प्रत्येक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, व्यवस्थापन समिती, पालक व विद्यार्थ्यांचे आहे. त्यांनी एकसंघ, सातत्यपूर्ण आणि निष्ठेने काम केले. गावकरी आणि जुने विद्यार्थी यांचाही शाळेच्या सौंदर्यीकरणात सहभाग होता. काही स्थानिक उद्योजकांनीही प्रायोजक म्हणून योगदान दिले.ही फक्त शाळेची जिंकलेली स्पर्धा नव्हे, तर सर्व सामाजिक संस्था, पालक आणि स्थानिकांच्या सामूहिक प्रयत्नांनी घडवलेले शिक्षणद्रष्टत्वाचे उदाहरण आहे. पुढील काळात गो.से.हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना राज्यस्तरावरील स्पर्धांसाठी विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शाळेच्या यशाचा आलेख अजून उंचावण्यासाठी नवे प्रयोग, नवी साधने, नव्या कल्पना यांचा अवलंब करण्याचे संकेत मुख्याध्यापक पाटील यांनी यावेळी दिले.पाचोऱ्यातील गो.से.हायस्कूलने संपूर्ण तालुक्याला दिशा देणारे काम केले आहे. या यशाने इतर शाळांनाही प्रेरणा मिळाली असून संपूर्ण तालुक्यात शैक्षणिक स्पर्धेला सकारात्मक चालना मिळाली आहे. यामुळे ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या उपक्रमाचे खरे उद्दिष्ट साकार झाले आहे.तिन लाखांचे पारितोषिक ही केवळ आर्थिक मदत नसून शाळेच्या गुणवत्तेवर राज्यशासनाने दिलेली अधिकृत मोहोर आहे. आता हे यश टिकवणे, वाढवणे, आणि इतर शाळांसाठी प्रेरणास्थान ठरणे हे पुढील आव्हान आहे. परंतु गो.से.हायस्कूलच्या एकजुटीच्या आणि कार्यक्षमतेच्या पार्श्वभूमीवर हे आव्हान नक्कीच संधीमध्ये बदलले जाईल, याची खात्री पाचोऱ्याला आहे.अशा प्रकारे पाचोऱ्यातील गो.से.हायस्कूलने केवळ सौंदर्य आणि सुव्यवस्थेच्या निकषांवर आधारित स्पर्धा जिंकली नाही, तर समाजाशी नाळ जुळवणारी, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीला दिशा देणारी शाळा म्हणून आपली ओळख अधिक मजबूत केली आहे. हे यश म्हणजे शिक्षणप्रेमी पाचोरा शहराच्या शैक्षणिक प्रगतीच्या वाटचालीतील मैलाचा दगडच ठरतो.

श्री शेठ एम. एम. महाविद्यालयाची NEET आणि JEE परीक्षांसाठी प्रतिष्ठित निवड

0

Loading

पाचोरा : विद्यार्थ्यांच्या भविष्याचा दिशादर्शक ठरणारा टप्पा म्हणजे बारावीचे शिक्षण आणि त्यानंतरची NEET व JEE ही राष्ट्रीयस्तरावरील महत्त्वपूर्ण स्पर्धा परीक्षा. भारतातील लाखो विद्यार्थी आपले वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी क्षेत्रातील स्वप्न साकार करण्यासाठी या परीक्षांमध्ये सहभागी होतात. या परीक्षांचा दर्जा, गुप्तता, पारदर्शकता आणि संपूर्ण व्यवस्थापन अतिशय नाजूक व जबाबदारीचे असते. त्यामुळे अशा परीक्षा घेण्यासाठी केंद्र निवडताना शिक्षण मंत्रालय अत्यंत काटेकोर आणि विश्वासार्ह निकषांच्या आधारे संस्थांची निवड करते.
गेल्या काही वर्षांमध्ये अनेक राज्यांमध्ये NEET व JEE परीक्षांच्या पेपरफुटीच्या घटना समोर आल्या. या घटनांमुळे संपूर्ण देशभरात खळबळ उडाली होती. विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता, पालकांमध्ये चिंता आणि शिक्षणव्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने परीक्षा केंद्रांच्या निवडीसंदर्भात नव्या कठोर निकषांची अंमलबजावणी केली. त्यानुसार फक्त त्या संस्थांनाच परीक्षा केंद्र म्हणून निवडण्यात येईल ज्या पूर्णपणे सुरक्षित, पारदर्शक, नैतिक व प्रशासकीय दृष्टिकोनातून सक्षम आहेत. याच प्रक्रियेत महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील श्री शेठ एम. एम. महाविद्यालयाची निवड राष्ट्रीय स्तरावरील NEET आणि JEE परीक्षांसाठी करण्यात आल्याचे विश्वसनीय वृत्त प्राप्त झाले आहे. ही निवड केवळ या महाविद्यालयाच्या भौतिक सुविधांमुळे किंवा मोठ्या इमारतींमुळे झालेली नसून, या महाविद्यालयाने आजवर निर्माण केलेल्या विश्वास, शिस्त, परीक्षांचे यशस्वी आयोजन, वाखाणलेली प्रशासकीय कार्यपद्धती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांप्रती असलेली जबाबदारी या गुणांमुळे झाली आहे. पाचोऱ्यासारख्या उपविभागीय शहरात असलेल्या श्री शेठ एम. एम. महाविद्यालयाचा इतिहास अत्यंत गौरवशाली आहे. शिक्षण क्षेत्रात दीर्घकाळ सेवा देत असलेले हे महाविद्यालय केवळ पाचोरा तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण खान्देशात आपली शैक्षणिक ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरले आहे. या महाविद्यालयातील विविध अभ्यासक्रम, प्रशस्त इमारती, दर्जेदार ग्रंथालय, संगणक लॅब, सुसज्ज परीक्षा हॉल, प्रशिक्षित कर्मचारीवर्ग आणि तत्पर व्यवस्थापन ही त्यांच्या गुणवत्तेची साक्ष देतात.
या महाविद्यालयाने पूर्वी अनेक परीक्षांचे तसेच शासकीय परीक्षा केंद्र म्हणून यशस्वी आयोजन केलेले आहे. त्यामुळेच NEET व JEE परीक्षेसारख्या अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाच्या परीक्षांचे केंद्र म्हणून या संस्थेवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. अशी निवड ही केवळ महाविद्यालयासाठी गौरवाची बाब नाही, तर संपूर्ण पाचोरा शहर आणि जळगाव जिल्ह्यासाठीही अभिमानाची गोष्ट आहे. परीक्षा केंद्र निवड प्रक्रियेमध्ये परीक्षा सुरक्षेची व्यवस्था, सीसीटीव्ही नेटवर्क, ऑनलाईन मॉनिटरिंग क्षमता, बायोमेट्रिक पडताळणीची यंत्रणा, पेपर लॉकिंग फॅसिलिटी, फायर सेफ्टी, अपंगासाठी सुलभता अशा विविध बाबींची तपासणी करण्यात येते. श्री शेठ एम. एम. महाविद्यालय या सर्व निकषांवर खरे उतरले आणि अंतिम टप्प्यात राष्ट्रीय परीक्षा एजन्सी कडून मान्यता प्राप्त केली.
या संदर्भात महाविद्यालयाचे प्राचार्य, वरिष्ठ प्राध्यापक व व्यवस्थापन समितीने समाधान व्यक्त करत पुढील तयारीसाठी विशेष बैठक घेतली असून, NEET व JEE परीक्षांच्या आयोजनासाठी एक स्वतंत्र नियोजन समिती स्थापन केली आहे. या समितीच्या माध्यमातून परीक्षा काळात कोणत्याही अडचणी उद्भवू नयेत यासाठी प्रत्येक बाबीचे बारकाईने नियोजन करण्यात येत आहे.महाविद्यालयाच्या या यशाबद्दल अनेक नामवंत पालक, माजी विद्यार्थी आणि सामाजिक संस्था यांनी अभिनंदन व्यक्त केले आहे. परीक्षेच्या दिवशी हजारो विद्यार्थी या केंद्रावर उपस्थित राहणार असल्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था, सुरक्षा, पालकांची सोय, आरोग्य सुविधा, आपत्कालीन उपाययोजना यावरही स्थानिक प्रशासनासोबत समन्वय साधला जाणार आहे.या संदर्भात पाचोरा नगरपरिषद, पोलिस प्रशासन आणि स्थानिक आरोग्य यंत्रणा यांच्यासोबत महाविद्यालय चर्चा करून येत्या काही दिवसांमध्ये संयुक्त बैठक आयोजित केली जाणार आहे. यामुळे NEET व JEE परीक्षांचा संपूर्ण अनुभव विद्यार्थ्यांसाठी सुलभ, सकारात्मक व प्रेरणादायी ठरणार आहे.शिक्षण क्षेत्रात प्रामाणिकपणाची, गुणवत्ता आणि सामाजिक उत्तरदायित्वाची मूल्ये पाळणाऱ्या संस्थांना अशा जबाबदाऱ्या देणे ही आपल्या शिक्षण व्यवस्थेची दिशा योग्य आहे, हे या उदाहरणावरून दिसून येते.पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा दिलीपभाऊ वाघ यांनी ध्येयन्युजशी बोलताना सांगितले श्री शेठ एम. एम. महाविद्यालयाने मिळवलेला हा सन्मान फक्त संस्थेपुरता मर्यादित नाही, तर पाचोऱ्यातील प्रत्येक शिक्षणप्रेमी नागरिकासाठी प्रेरणास्थान आहे
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ यांनी सांगितले
राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांचे आयोजन हे आपल्या शहराच्या शैक्षणिक क्षमतेचे प्रमाणपत्र ठरते. यानिमित्ताने पाचोरा हे शहर शिक्षणनगरीच्या दिशेने वाटचाल करत आहे, हे निश्चित. ‘विश्वासू व्यवस्थापन, दर्जेदार शिक्षण व सक्षम परीक्षा केंद्र’ ही ओळख श्री शेठ एम. एम. महाविद्यालयाने यशस्वीपणे सिद्ध केली आहे.& एक विश्वास, एक जबाबदारी आणि एक गौरव – हे यश संपूर्ण पाचोऱ्याचे आहे.

पाचोऱ्यात ‘लक्ष्मीमाता वारकरी शिक्षण संस्था’तर्फे अध्यात्मिक मूल्यांची पेरणी – मोफत निवासी बालसंस्कार शिबिराचे आयोजन

0

Loading

पाचोरा –( झुंज वृत्तपत्र & ध्येय न्युज प्रतिनिधी – धनराज पाटील, बॅनर Mo. 9922614917) — धावपळीच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगात लहानग्यांचे बालपण हरवले आहे. संगणक, मोबाईल आणि टीव्हीच्या आहारी गेलेली मुलं अनेकदा अध्यात्म, संस्कार आणि चारित्र्य विकासापासून दूर जाताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर समाजात नवसंस्कार निर्माण करण्याच्या हेतूने पाचोरा शहरातील लक्ष्मी माता वारकरी सेवाभावी मंडळ संचलित लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्था (अनाथालय) यांच्यातर्फे शक्तीधाम, स्वप्नशिल्प हॉटेल समोर, भडगाव रोड येथे दिनांक ५ मे २०२५ ते १५ मे २०२५ दरम्यान भव्य, दिव्य, आणि पूर्णपणे मोफत निवासी अध्यात्मिक बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर शिबिराची परंपरा गेली सहा वर्षे सातत्याने सुरू आहे. प्रत्येक वर्षी उत्तर महाराष्ट्रातील विविध भागातून २०० ते २५० विद्यार्थ्यांचा सहभाग लाभतो. केवळ एका शिबिरापुरती मर्यादा न ठेवता यामधून अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनात वळण आणणारा हा अध्यात्मिक संस्कार सोहळा ठरतो. या शिबिराचा हेतू मुलांच्या मनामध्ये देश, धर्म, देव, संस्कृती आणि समाजसेवा याविषयी प्रेम, आदर व जबाबदारीची भावना निर्माण करणे हाच असून याचे यश म्हणजे मुलांमधील सकारात्मक परिवर्तन.
या शिबिरात विविध विषयांचे प्रशिक्षण देण्यात येते. योगासन, हनुमान चालीसा, राम रक्षा स्तोत्र, हरिपाठ, वारकरी पावली, श्रीमद्भागवतगीता, विष्णु सहस्त्रनाम, मंत्रपुष्पांजली, गायन, पखवाज वादन, किर्तन प्रशिक्षण, भजन शिक्षण, संवाद कौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकास असे अनेक विषय शिबिराच्या अभ्यासक्रमात अंतर्भूत आहेत. या प्रशिक्षणासाठी वारकरी संप्रदायातील अनुभवी अध्यापक व कीर्तनकार यांची उपस्थिती लाभते.
गौसेवक माऊली सातगाव को यांचे शिबिरातील मार्गदर्शन, गु. रामायणाचार्य श्री. संजय महाराज पाचपोर (आकोला ज्ञानेश्वर) यांचा अध्यात्मिक आधार आणि आदरणीय रमेशजी मोर यांचा संयोजकत्वाचा हातभार यामुळे हे शिबिर अधिक प्रभावी व उत्साही बनले आहे. या शिबिराचे प्रमुख आयोजक भागवताचार्य ह.भ.प. योगेशजी महाराज धामणगांवकर आणि अनाथांची माय – ह.भ.प. सुनीताताई पाटील (पाचोरा) हे असून त्यांचे सातत्यपूर्ण योगदान, सेवाभाव आणि भक्तिपथावरची श्रद्धा हे या उपक्रमाचे खरे बळ आहेत.
शिबिराची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे त्याची पूर्णतः मोफत निवासी सुविधा असून, विद्यार्थ्यांसाठी दोन वेळचे पोटभर भोजन, सकाळचा नाष्टा, दुपारी शीतपेय, तसेच शिबिरात शिकवले जाणाऱ्या सर्व स्तोत्रांच्या पुस्तकांची मोफत सोय करण्यात आली आहे. शिबिराच्या समारोप प्रसंगी प्रत्येक विद्यार्थ्याला भागगते, हरिपाठ, रामरक्षा, गीता, विष्णुसहस्रनाम यांची पुस्तके तसेच सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.
शिबिरात सहभागासाठी काही नियम व अटी घालण्यात आल्या आहेत. नऊ वर्षांवरील विद्यार्थ्यांनाच प्रवेश आहे. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना वारकरी पोशाख परिधान करणे बंधनकारक आहे. तसेच शिबिर परिसरात मोबाईल फोन पूर्णतः वर्ज्य असून विद्यार्थ्यांनी आपले आंघोळीचे कपडे, अंथरुण-पांघरुण, ताट, तांब्या सोबत आणावे लागेल. विद्यार्थ्यांच्या शारीरिक किंवा जीवित नुकसानाबाबत आयोजक जबाबदार राहणार नाहीत, याची माहिती पालकांनी समजून घ्यावी. हे शिबिर पूर्णतः निवासी स्वरूपाचे आहे.
या शिबिराचे विशेष आकर्षण म्हणजे अनाथ व गरीब मुलांसाठी वर्षभर निवास, शालेय व वारकरी शिक्षणाची मोफत व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे समाजातील वंचित घटकातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांना धर्म, संस्कार आणि मूल्ये यांची सांगड घालता येणार आहे.
संघटनात्मक पातळीवर पाहता, या शिबिरासाठी लक्ष्मी माता वारकरी सेवाभावी मंडळ आणि लक्ष्मीमाता वारकरी शिक्षण संस्था (अनाथालय), पाचोरा यांनी परिश्रम घेतले आहेत. वारकरी भवन, रामदेव लॉन्सजवळ, जारगाव चौफुली, पाचोरा हे संस्थेचे केंद्र असून, या संस्थेने गेल्या काही वर्षांत वारकरी संस्कृतीच्या जतनासाठी व प्रसारासाठी अविरत कार्य केले आहे.
या शिबिराविषयी अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 9545855243 / 7798755431 दिलेले आहेत. संस्थेचे सदस्य, पालक आणि वारकरी मंडळी यांना आवाहन करण्यात आले आहे की त्यांनी आपल्या पाल्यांना या अध्यात्मिक संस्कार शिबिरात सहभागी करून त्यांचे भविष्य उज्वल बनवावे.
हा उपक्रम केवळ संस्कारांचा नव्हे, तर समाजबदलाचा महत्त्वाचा टप्पा आहे. अशा शिबिरातून निर्माण होणारी मूल्यसंस्कारित पिढीच उद्याचे शीलवान, जबाबदार, देशप्रेमी नागरिक घडवू शकते. केवळ अभ्यासक्रमाच्या परिघात अडकलेल्या शिक्षणाला अध्यात्म, संस्कृती आणि सेवाभावाची जोड मिळाल्यास मुलांचे सर्वांगीण विकास होऊ शकतो, आणि याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे वारकरी बालसंस्कार शिबिर होय.
राम कृष्ण हरी! – या जयघोषाने स्फूर्ती घेणाऱ्या या अध्यात्मिक वाटचालीसाठी शेकडो मुलांच्या शांतीपूर्ण, संस्कारित आणि भक्तिप्रेरित भविष्याची पायाभरणी या उपक्रमातून होणार आहे, हे निश्चित!

मातृत्वाची सजीव छाया हरपली – हेड कॉन्स्टेबल रणजित पाटील यांना मातृशोक, कै. सुंदरबाई पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली

0

Loading

पाचोरा –( झुंज वृत्तपत्र & ध्येय न्युज प्रतिनिधी – धनराज पाटील, बॅनर Mo. 9922614917) — कर्तव्यदक्ष पोलिस म्हणून परिचित असलेले पाचोरा पोलिस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल रणजित देवसिंग पाटील यांच्यावर काळाचा आणखी एक कठीण आघात झाला आहे. त्यांच्या जीवनातील मार्गदर्शक व आधारस्तंभ असलेल्या मातोश्री गं.भा. कै. सुंदरबाई देवसिंग पाटील (वय अंदाजे ८५) यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. १६ एप्रिल २०२५ रोजी रात्री १०:३० वाजता त्यांनी आपल्या राहत्या निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने केवळ पाटील कुटुंबीय नव्हे तर संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला आहे.
गं.भा.सुंदरबाई देवसिंग पाटील यांचे जीवन हे निस्वार्थ सेवा, निखळ प्रेम, परंपरा आणि आत्मीयता यांचे मूर्तिमंत उदाहरण होते. अत्यंत संयमी, धार्मिक आणि मृदूभाषी स्वभावामुळे त्या सर्वांनाच प्रिय होत्या. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य कुटुंबप्रमुख म्हणून सांभाळत, कुटुंबातील प्रत्येक सदस्याला संस्कार, समज आणि जबाबदारीची जाण देणाऱ्या माता म्हणून व्यतीत केले. त्यांच्या हाताखाली वाढलेले मुलगे आज विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने परिचित आहेत, ही त्यांच्या आयुष्याची सर्वात मोठी संपत्ती ठरली.
त्यांचे सुपुत्र रणजित देवसिंग पाटील हे पाचोरा पोलिस ठाण्यात हेड कॉन्स्टेबल म्हणून सेवा देत असून, पोलीस दलातील कर्तव्यपरायणतेसाठी ओळखले जातात. आईच्या आशीर्वादाने आणि संस्कारानेच त्यांचे व्यक्तिमत्व घडले आहे, असे अनेक सहकाऱ्यांचे मत आहे. आईच्या निधनानंतर त्यांनी अत्यंत धीराने अंत्यविधीची जबाबदारी पार पाडली. त्यांच्या मातोश्रींच्या जाण्याने त्यांचे आयुष्य एक मोठा आधार हरवून बसल्यासारखे झाले आहे. सकाळी ११ वाजता स्वामी समर्थ कॉलनी, चाळीसगाव रोड येथील त्यांच्या राहत्या घरातून सुरू झालेली अंत्ययात्रा अत्यंत भावनिक वातावरणात निघाली. शेकडो नागरिक, समाजबांधव, शासकीय अधिकारी, पोलीस विभागातील सहकारी, ग्रामस्थ, आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवावर अंत्यदर्शन घेतले. अंत्यविधी अत्यंत शिस्तबद्ध आणि भावपूर्ण वातावरणात पार पडला. सर्वांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते, तर वातावरणात हळहळ व्यक्त होत होती.
कै. सुंदरबाई पाटील यांच्या पश्चात त्यांचे सुपुत्र हेड कॉन्स्टेबल रणजित देवसिंग पाटील, श्री. शरद देवसिंग पाटील (शरदआण्णा), भीमसिंग गुलाबसिंग पाटील, विजयसिंग देवसिंग पाटील, भगतसिंग देवसिंग पाटील, महेंद्रसिंग देवसिंग पाटील, रामसिंग गुलाबसिंग पाटील, धनसिंग रामसिंग पाटील, शिवसिंग गुलाबसिंग पाटील यांच्यासह समस्त जाधव परिवार (शिवणीकर) शोकाकुल आहेत.
आजच्या काळात, जिथे पारंपरिक मूल्ये झपाट्याने विस्मरणात चालली आहेत, अशा काळात सुंदरबाई पाटील यांचे जीवन हे एक मौल्यवान प्रेरणास्थान आहे. त्यांनी मुलांवर केलेले संस्कार, शिस्त, आदर, सहिष्णुता व निष्ठा यांची पाळेमुळे कुटुंबात खोलवर रुजवली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पिढ्या घडल्या, समाजात आदर्श निर्माण झाला.
पाटील कुटुंब हे फक्त नातेवाइकांपुरते मर्यादित नाही, तर सामाजिक कार्य, धार्मिक श्रद्धा, शेती व्यवसाय, पोलीस सेवा आणि नागरी जबाबदाऱ्या यामध्येही त्यांचे योगदान मोठे आहे. या कुटुंबात जन्मलेल्या, वाढलेल्या आणि मार्गदर्शन केलेल्या कै. सुंदरबाई पाटील या सर्वांच्या जीवनात प्रकाशवाट दाखवणाऱ्या दीपस्तंभ होत्या. त्यांच्या जाण्याने केवळ एक व्यक्ती गमावली नाही, तर एक विचार, एक भावना आणि एक कृतीशील निष्ठा हरवली आहे.
त्यांच्या अंत्यविधीच्या वेळी अनेकांनी भावस्पर्शी श्रद्धांजली वाहताना सांगितले की, “सुंदरबाई पाटील यांचे अस्तित्व फक्त त्यांच्या कुटुंबापुरते नव्हते, त्या आमच्याही आईसारख्याच होत्या. प्रसंगी मदतीला धावून जाणाऱ्या, दुःखात समज देणाऱ्या आणि आनंदात सहभाग घेणाऱ्या व्यक्तीमत्त्वाची उणीव आम्हाला सदैव भासत राहील.”
त्यांचे स्मरण करताना अनेक ज्येष्ठ मंडळी, समाजसेवक, पोलीस अधिकारी आणि शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या घरातील वातावरण सदैव धार्मिक, साधे आणि प्रेममय राहिले. त्यांनी कधीच प्रसिद्धीचा हव्यास ठेवला नाही, आपल्या कर्तृत्वाने आणि माणुसकीच्या वागणुकीने आपले स्थान निर्माण केले.
मृत्यू अटळ आहे, परंतु काही व्यक्तींचा मृत्यू केवळ देहाचा नसतो – तो काळजात उठणाऱ्या भावना, नात्यांची उब आणि आठवणींच्या गंधाचा एक हळवा विरह असतो. सुंदरबाई पाटील यांचे आयुष्य हे या सर्व भावनांचे प्रतीक होते. त्यांनी आपल्या कार्याने, नजरेने, स्पर्शाने आणि निस्वार्थ भावनेने माणसं जिंकली.
ध्येय न्यूज व झुंज वृत्तपत्र परिवार त्यांच्या जाण्याने अत्यंत दुःखी असून, संपूर्ण पाटील कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. त्यांच्या आठवणींनी पिढ्यानपिढ्या प्रेरणा मिळत राहो, हीच श्रद्धांजली या प्रसंगी पुढील दोन शब्द मातोश्री यांच्या चरणी अर्पण करावेसे वाटतात
“आईच्या ममतेचे सावलीसारखे छत्र हरपले,
मनाच्या अंतरात आठवणींचे मेघ भरले,
मायेच्या त्या अंगणातील उब हरवली,
एक आयुष्यभराची भावना आज शून्य झाली…”

समतेच्या लढ्याला नवे बळ – पाचोऱ्यात समता सैनिक दलाच्या तालुका कार्यालयाचे १८ एप्रिल रोजी भव्य उद्घाटन

0

Loading

पाचोरा –( झुंज वृत्तपत्र & ध्येय न्युज प्रतिनिधी – धनराज पाटील, बॅनर Mo. 9922614917)
-शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांची प्रखरतेने जपणूक करणाऱ्या आणि सामाजिक समतेसाठी सतत झगडणाऱ्या समता सैनिक दलाच्या पाचोरा तालुका आणि जिल्हास्तरावरील कार्यकर्त्यांसाठी एक ऐतिहासिक आणि आनंददायी क्षण समोर आला आहे. बराच काळ प्रतिक्षेत असलेले समता सैनिक दलाचे अधिकृत तालुका कार्यालय आता अखेर प्रत्यक्षात साकारले जात असून, १८ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११ वाजता या कार्यालयाचे भव्य उद्घाटन समता सैनिक दलाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा. नानासो धर्मभूषण बागुल साहेब यांच्या शुभहस्ते होणार आहे.
ही केवळ कार्यालय उघडण्याची बाब नाही, तर समतेच्या लढ्याला नवे अधिष्ठान, नवसंजीवनी देणारी घटना आहे. कारण तालुक्यातील व जिल्ह्यातील सर्व पुरोगामी, समतेचे कार्यकर्ते, चळवळीत झिजलेले कार्यदूत, पत्रकार बांधव आणि समता सैनिक दलाच्या विचारांनी प्रेरित असंख्य लोकांनी हे कार्यालय असावे ही अनेक वर्षांची मागणी होती. आता ती मागणी पूर्ण होऊन एक नवा अध्याय सुरू होत आहे.
या संदर्भात समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष किशोर डोंगरे (मो. 9503152470) यांनी सर्वांना आवाहन करत स्पष्ट केले आहे की, “ज्याप्रमाणे क्रांतीकारक विचारांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी केंद्रबिंदू आवश्यक असतो, त्याचप्रमाणे हे कार्यालय ही फक्त इमारत नसून, सामाजिक परिवर्तनाच्या लढ्याचे एक मजबूत बस्तान असेल.”
या ऐतिहासिक उद्घाटन सोहळ्याचे आयोजन सांडू भावराव कॅप्लेक्स, साईराज डिजिटलजवळ, भुयारी मार्ग, गिरड रोड, पाचोरा येथे करण्यात आले असून, सकाळी १० वाजता सर्व मान्यवर, कार्यकर्ते आणि नागरिकांनी उपस्थित राहावे असे नम्र आवाहन आयोजकांनी केले आहे. विशेष म्हणजे, नियोजन वेळेवर आणि काटेकोर असावे या उद्देशाने व्यक्तिशः फोन किंवा भेटी करणे शक्य न झाल्याने, झुंजवृत्तपत्र व ध्येय न्यूजच्या बातमी द्वारे हेच आमंत्रण समजावं असे आवाहन खुद्द किशोर डोंगरे यांनी केले आहे.
समता सैनिक दल – एक ऐतिहासिक चळवळ
समता सैनिक दल हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेले संघटन असून त्याचा उद्देश म्हणजे सामाजिक, राजकीय आणि आर्थिक समतेसाठी तळागाळातील जनतेला संघटित करणे, त्यांना अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ देणे आणि संविधानिक मूल्यांप्रती जनजागृती निर्माण करणे हा आहे. आजही देशात आणि राज्यात विविध क्षेत्रांमध्ये असमानता, जातीभेद, अन्याय अशा गोष्टी दिसून येतात. अशा वेळी समता सैनिक दलासारख्या संघटनांचे कार्य अत्यंत महत्त्वाचे ठरते.
पाचोरा तालुक्यात गेल्या काही वर्षांत दलाच्या माध्यमातून विविध जनजागृती कार्यक्रम, संविधान जागर मोहिमा, महापुरुषांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम, तरुण कार्यशाळा अशा अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आता त्याला एक स्थायी स्वरूपाचे कार्यालय लाभत असल्याने ही चळवळ आणखी व्यापक होणार आहे.
कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी क्षण
या उद्घाटन कार्यक्रमात फुले-शाहू-आंबेडकर चळवळीशी संबंधित असंख्य कार्यकर्ते, शिक्षक, प्रबोधनकार, लेखक, पत्रकार, विद्यार्थी, महिलाप्रतिनिधी सहभागी होणार आहेत. ही केवळ भिंतींच्या चार भिंतींचे उद्घाटन नसून एका नव्या संघर्षाची, नव्या विचार प्रवाहाची सुरुवात आहे. दलाचे विचार हे केवळ भाषणांपुरते किंवा पोस्टरपुरते न राहता, ते गावागावात, पाड्यापाड्यांत पोहोचावेत, यासाठी या कार्यालयाचा उपयोग प्रशिक्षण केंद्र, संवाद मंच, माहिती केंद्र, तरुणांसाठी मार्गदर्शन केंद्र, लायब्ररी अशा स्वरूपात केला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
या उद्घाटन सोहळ्यासाठी सांडू भावराव कॅप्लेक्स परिसरात मोठी तयारी सुरू झाली आहे. बॅनर, पोस्टर, फलक, बैठक व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वाहतूक नियोजन, स्वागत समिती, आभार प्रदर्शन, स्मृतिचिन्ह वाटप असे सर्व कार्यक्रम ठरवून नियोजनबद्ध पद्धतीने आखण्यात आले आहे. स्थानिक तरुण कार्यकर्त्यांनी हे संपूर्ण आयोजन आपल्या खांद्यावर घेतले असून, यातूनही संघटनेचे मजबूतपण आणि उत्साह दिसून येतो.
सर्व घटकांमधून सकारात्मक प्रतिसाद
पाचोरा शहर व तालुक्यातील विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी या निर्णयाचे स्वागत केले असून अनेक ठिकाणी समता सैनिक दलाच्या या उपक्रमासाठी शुभेच्छा फलक लावण्यात आले आहेत. विशेषतः ग्रामीण भागातील युवक, शेतकरी संघटना, बहुजन संघटना, युवक मंडळे आणि विविध शाळा-शिक्षकांनी या उपक्रमाबाबत उत्साह व्यक्त केला आहे.
प्रेरक अध्यक्ष बागुल साहेब यांचे नेतृत्व
समता सैनिक दलाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा. नानासो धर्मभूषण बागुल हे गेली अनेक दशके सामाजिक चळवळीतील सक्रिय आणि स्फूर्तीदायक नेतृत्व म्हणून ओळखले जातात. दलाच्या माध्यमातून त्यांनी राज्यभर संघटनात्मक बांधणी, कार्यकर्त्यांचे सक्षमीकरण आणि समतावादी विचारांचा प्रचार यासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या हस्ते पाचोऱ्यात कार्यालयाचे उद्घाटन होणे, हा स्थानिक कार्यकर्त्यांसाठी मोठा सन्मान आहे.
एकीकडे राजकारणात गढुळलेपणा, जातीय विषमता, आणि संविधान विरोधी मानसिकता वाढत असताना समता सैनिक दलासारख्या विचारधारेच्या संघटनेचे मजबूत पायाभूत रचनांमध्ये रूपांतर होणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे हे कार्यालय हे फक्त एक ठिकाण न राहता सामाजिक परिवर्तनाचा दीपस्तंभ ठरेल यात शंका नाही.
उद्या १८ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता सांडू भावराव कॅप्लेक्स, साईराज डिजिटलजवळ, भुयारी मार्ग, गिरड रोड, पाचोरा येथे होणाऱ्या या ऐतिहासिक सोहळ्यास उपस्थित राहून या चळवळीचा भाग व्हा आणि समतेच्या लढ्यात योगदान द्यावे असे आवाहन किशोर डोंगरे, जिल्हाध्यक्ष, समता सैनिक दल, मो. 9503152470 यांनी केले आहे

साक्षात विठोबा खडकदेवळा खु.मध्ये अवतरतोय! १९ एप्रिलला शिवानंद महाराजांच्या उपस्थितीत काल्याचे कीर्तन व दहीहंडी सोहळा

0

Loading

पाचोरा ( झुंज वृत्तपत्र & ध्येय न्युज प्रतिनिधी – धनराज पाटील, बॅनर Mo. 9922614917)  तालुक्यातील खडक देवळा खुर्द हे धार्मिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक समृद्धतेने ओतप्रोत भरलेले गाव यंदा पुन्हा एकदा भक्तिरसात न्हालं आहे. संपूर्ण गावाने एकत्र येत हनुमान जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाचे हे २६ वे वर्ष, आणि त्याचप्रमाणे अमृत महोत्सवी वर्ष, मोठ्या उत्साहात आणि भाविकांच्या सहभागातून सुरू आहे. १२ एप्रिल २०२५ रोजी शनिवारी या सप्ताहाची मंगल सुरुवात झाली असून, आज १६ एप्रिल ला सप्ताहाचा पाचवा दिवस साजरा होत आहे. येत्या १९ एप्रिल शनिवार रोजी काल्याच्या कीर्तनासह सप्ताहाची भावपूर्ण सांगता होणार आहे. विशेष म्हणजे, या सांगतेच्या दिवशी दहीहंडी फोडण्यासाठी पंढरपूरच्या गोविंद संस्थानाचे वंशज, श्री. शिवानंद महाराज, हे प्रत्यक्ष गावात येणार आहेत.
सप्ताहाची सुरुवात १२ एप्रिल रोजी ह.भ.प. श्री. संचितानंद महाराज पळाशी यांच्या कीर्तनाने झाली. त्यानंतर सलग आठ दिवस महाराष्ट्रातील विविध भागातून आलेल्या कीर्तनकार संतांनी, टाळ-मृदंगाच्या गजरात हरिपाठ, प्रवचन आणि संकीर्तन यांची पर्वणीच घालून दिली. दररोज सकाळी ५ ते ६ काकड आरती, सकाळी ९ पासून भजन, संध्याकाळी ५ ते ६ हरिपाठ, आणि रात्री ९ ते ११ संकीर्तन असे नित्यनेमाने कार्यक्रम चालू आहेत. गावातील लहानथोर सर्वजण या सप्ताहात संपूर्ण भक्तिभावाने सहभागी होत आहेत.
या सप्ताहाचे विशेष आकर्षण म्हणजे सांगतेचा दिनांक – १९ एप्रिल २०२५ (शनिवार). त्या दिवशी मारुती मंदिराच्या पटांगणात सकाळी ९ वाजता काल्याचे किर्तन होणार असून, त्यानंतर दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, यावेळी पिंपळगाव हरेश्वर येथील गोविंद संस्थानाचे प्रमुख व उडीचे भजन परंपरेचे वंशज संत – शिवानंद महाराज हे खडक देवळा खुर्द येथे येणार आहेत. हा कार्यक्रम केवळ धार्मिक नसून एक भक्तीचा साक्षात उत्सव ठरणार आहे. गावात सध्या हा सप्ताह चालू असताना, घराघरांमध्ये हरिपाठाचा गजर आहे. महिला भक्तांनी घरासमोर रांगोळ्या काढल्या असून सडासारवण करून मंगल वातावरण निर्माण केले आहे. मंदिर परिसरात दिवसरात्र हरिनामाचा जयघोष सुरु आहे. गावातील युवकांनी भगव्या पताका आणि कीर्तन फडांच्या माध्यमातून परिसर सजवला आहे.
ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, हे आपले परमभाग्य आहे की, साक्षात पंढरपूरातील गोविंद संस्थानाचे महाराज आपल्या गावात येणार आहेत. विठोबा पांडुरंगच खऱ्या अर्थाने आपल्या अंगणात अवतरणार आहे. शिवानंद महाराज हे केवळ कीर्तनकार नव्हे, तर भक्तीमार्गाचा प्रत्यक्ष साक्षात्कार देणारे संत असून, त्यांच्या उपस्थितीमुळे सांगतेचा दिवस अधिकच पवित्र होणार आहे. या आठवड्यात दररोज भव्य कार्यक्रम चालू आहे
आदी कीर्तनकारांनी संत चरित्र, अभंग, नामस्मरण, भक्तिपंथ यावर प्रभावी प्रवचने दिली. यामुळे वारकरी भाविकांमध्ये अधिक आध्यात्मिक जाणीव निर्माण झाली.
या सप्ताहाचे यशस्वी आयोजन आणि व्यवस्थापनासाठी मारुती मंदिर अखंड हरिनाम सप्ताह समिती, खडक देवळा खुर्द ही कार्यरत आहे.गुरुदत्त भजनी मंडळ यांच्यासह गावातील सर्व मंडळींनी मेहनत घेतली. युवक मंडळ, महिला मंडळ, वारकरी मंडळ, ग्रामपंचायत प्रतिनिधी, कीर्तन प्रेमी मंडळ, टाळ मृदंग वादन मंडळ यांनी आपले योगदान दिले आहे. अनेक घरांमध्ये सप्ताहाचे भाग्य लाभल्यामुळे त्या कुटुंबांनी खास स्वागताचे आणि नैवेद्याचे आयोजन केले आहे. महिला वर्गाने भजनमंडळांमध्ये सक्रीय सहभाग घेतला आहे. पाणी, ताट-बोठी, शिस्त, वैद्यकीय सुविधा यांची योग्य काळजी घेण्यात आली आहे. विशेषत: १९ एप्रिलच्या कार्यक्रमासाठी सुरक्षा व्यवस्था, बस थांबे, आगंतुकांसाठी आसनव्यवस्था यांचे नियोजन अंतिम टप्प्यात आहे. १९ एप्रिल रोजी काल्याच्या कीर्तनास शिवानंद महाराज उपस्थित राहणार असल्याने, सर्व पंचक्रोशीतील भाविकांनी मारुती मंदिर पटांगणात सकाळी ९ वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजन समितीने केले आहे. घराघरांतून रांगोळ्या, दीपमालिका, टाळ-मृदंगाच्या गजरात विठ्ठलाच्या दर्शनाचा अनुभव घेण्यासाठी सज्ज होण्याचे आवाहन केले जात आहे.
संपूर्ण खडकदेवळा खुर्द गावाने दाखवलेली ही भक्तिपूर्ण एकजूट, नियोजनबद्धता आणि धार्मिक समर्पण पाहता हे निश्चितच म्हणता येईल की या गावात विठोबा स्वयं अवतरला आहे! आणि १९ एप्रिल २०२५ रोजी होणारा काल्याचा किर्तन सोहळा आणि दहीहंडी कार्यक्रम हा फक्त एक धार्मिक विधी नसून पंढरपूरच्या विठोबाचा आपल्या शेतमातीतील प्रत्यक्ष साक्षात्कार ठरणार आहे.

जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत एम.एम. महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी मारली बाजी – कु. चेतना हिरे व कु. आशिराना यांचे दमदार यश

0

Loading

पाचोरा – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, सामाजिक न्यायाचे प्रतीक, शोषित-वंचित घटकांना संविधानाच्या माध्यमातून नवसंजीवनी देणारे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. याच परंपरेनुसार यंदा विद्यार्थी सेवा समिती भडगाव तर्फे आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेमध्ये श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, पाचोरा येथील दोन विद्यार्थिनींनी जिल्हास्तरावर आपली लेखनी झळकावत भरीव कामगिरी केली आहे.
या स्पर्धेत बी.ए. द्वितीय वर्षात शिकणारी साहित्य शाखेची विद्यार्थिनी कु. चेतना रणदीप हिरे ( वरखेडी ) हिने ‘उत्तेजनार्थ तृतीय क्रमांक’, तर कनिष्ठ महाविद्यालयाच्या इयत्ता अकरावी विज्ञान शाखेतील कु. आशिराना फिरोज फकीर हिने ‘उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक’ पटकावत महाविद्यालयाच्या शैक्षणिक परंपरेला चार चाँद लावले. विद्यार्थिनींच्या या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण महाविद्यालय परिवारामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या गुणवत्तेचा गौरव होत आहे.
ही निबंध स्पर्धा भडगाव येथील नालंदा बुद्धविहार येथे पार पडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रख्यात बौद्ध विचारवंत आणि समाजकार्य क्षेत्रातील अग्रणी नेतृत्व डॉ. भरत शिरसाठ होते. त्यांच्या हस्ते स्पर्धेत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, रोख पारितोषिक आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. या सन्मान वितरण प्रसंगी सामाजिक, शैक्षणिक आणि बौद्धिक क्षेत्रातील संविधानाचे अभ्यासक मा. भरत शिरसाट,
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे डॉ. निलेश पाटील,
मा.नगरसेवक नथ्थू अहिरे,
बौद्ध महासभेचे डी. के.वाल्हे , प्रा डॉ. संजय भैसे, विद्यार्थी सेवा समितीचे समन्वयक योगेश शिंपी, सौ.छाया बिऱ्हाडे, केदार साहेब, सपकाळे साहेब, मा. नगरसेविका योजना पाटील,सामाजिक कार्यकर्ते जाकीर कुरेशी, इम्रान अली सय्यद,
उपप्राचार्य डी एम मराठे,
विजयकुमार भोसले,
रेखा कोसोदे , वाघ मॅडम मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची संपूर्ण शिस्तबद्ध रचना आणि बौद्धिक उंचीची पातळी स्पर्धकांसाठी प्रेरणादायी ठरली.
या निबंध स्पर्धेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करणे, त्यांचे कार्य, तत्त्वज्ञान व संविधानातील योगदान याची समज निर्माण करणे हा होता. स्पर्धेचे विषय ‘आंबेडकरी विचारांची आधुनिक काळातील गरज’, ‘भारतीय राज्यघटनेत समावेशीत्वाचे तत्त्व’ आणि ‘डॉ. आंबेडकर – सामाजिक क्रांतीचे प्रणेते’ या प्रकारांवर आधारित होते. या विषयांवर स्पर्धकांनी दिलेल्या निबंधातून सामाजिक जाणीव, इतिहासाची समज आणि आधुनिक काळातील संदर्भांची जोड यांचा उत्तम समन्वय पाहायला मिळाला.
कु. चेतना हिरे हिने आपल्या निबंधात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सामाजिक समतेसाठीची लढाई, शिक्षणाचे महत्त्व, स्त्री सक्षमीकरण व संविधानात्मक मूल्यांची सखोल मांडणी केली. तीने आपल्या लेखनशैलीतून वाचन, चिंतन व अभ्यासाची झलक दाखवत अनेक उदाहरणे, संदर्भ व तत्त्वज्ञान मांडून परीक्षकांच्या मनावर प्रभाव पाडला. तिची भाषा प्रगल्भ, शैली ओघवती आणि मांडणी अत्यंत स्पष्ट होती. एका ग्रामीण भागातील विद्यार्थिनीने इतक्या सामाजिक भानाने लिहिलेला निबंध पाहून परीक्षक वर्ग देखील भारावून गेले.
कु. चेतना हिरे ही पाचोरा तालुक्यातील वरखेडी या गावात राहते. तिचे शिक्षण श्री एम.एम. महाविद्यालयात बी.ए. द्वितीय वर्ष साहित्य शाखेत सुरू आहे.
कु. आशिराना फिरोज फकीर हिने विज्ञान शाखेतील विद्यार्थिनी असूनही सामाजिक विषयांवरील आपली पकड दाखवत निबंधात आधुनिक काळातील शैक्षणिक विषमता, जातीभेद, स्त्री-पुरुष समानता आणि डॉ. आंबेडकरांच्या विचारसरणीचे आजच्या परिस्थितीत महत्त्व यांचे सुबक विवेचन केले. तीने बाबासाहेबांचे विचार व विज्ञान या दोघांमधील संबंध स्पष्ट करत ‘ज्ञान हेच खरे बल’ या तत्त्वाचा आधार घेत भिन्न दृष्टिकोनातून लेखन केले. विशेष म्हणजे, विज्ञान शाखेतील विद्यार्थिनी असूनही तिने वापरलेली भाषा, संदर्भ, आणि शैली अत्यंत प्रभावी व समर्पक होती.
या दोन्ही विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्याचे श्रेय महाविद्यालयाच्या प्रा. जयश्री वर्मा ( सौ.वाघ मॅडम ) आणि प्रा. डॉ. अतुल सूर्यवंशी यांना जाते. दोघेही प्राध्यापक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशील असतात. लेखन, वाचन, चर्चासत्र, व्यक्तिमत्त्व विकास, भाषाशुद्धी, समाजशास्त्रीय विश्लेषण या सर्व गोष्टींमध्ये ते विद्यार्थ्यांना सक्षम बनवतात. त्यांच्या सततच्या प्रोत्साहनामुळेच या विद्यार्थिनींनी जिल्हास्तरावर आपली चमक दाखवली.
या यशानंतर श्री एम.एम. महाविद्यालयाच्या वतीने आयोजित अभिनंदन समारंभात या विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार दिलीपभाऊ वाघ संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ व्हाईस चेअरमन नानासाहेब व्ही टी जोशी प्राचार्य डॉ शिरीष पाटील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि सहविद्यार्थ्यांनी यावेळी मोठ्या अभिमानाने विद्यार्थिनींचे स्वागत केले. महाविद्यालयाच्या नोटीस बोर्डवर त्यांच्या फोटोसह त्यांच्या यशाचा संक्षिप्त परिचय देण्यात आला असून, सोशल मीडियावरही दोघींच्या यशाची चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे.
यशामागील संघर्ष, अभ्यास, मन:पूर्वक प्रयत्न, सातत्य आणि ध्येयाप्रती निष्ठा ही मूलभूत कारणे लक्षात घेता, हे यश भविष्यातील स्पर्धांमध्ये मार्गदर्शक ठरणार आहे. महाविद्यालय प्रशासनाने या दोघी विद्यार्थिनींना पुढील राज्यस्तरीय स्पर्धांसाठी अधिक सुसज्ज करण्याचे नियोजन केले असून, लेखन कार्यशाळा, संवाद परिसंवाद, आणि अभ्यासगटाच्या माध्यमातून त्यांचे प्रशिक्षण सुरू आहे.
पाचोरा सारख्या ग्रामीण भागातील महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थिनींनी केवळ जिल्हा स्तरावरच नव्हे, तर भविष्यात राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्येही उत्कृष्ट कामगिरी करावी यासाठी महाविद्यालय कटीबद्ध आहे. महाविद्यालयाच्या एकंदर शैक्षणिक वातावरणाचा, विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या संधींचा आणि शिक्षकांच्या मेहनतीचा हा प्रत्यय आहे.
या यशाच्या निमित्ताने आज पाचोरा परिसरातील तरुणाईला, विशेषतः विद्यार्थिनींना एक नवा आत्मविश्वास, नवा दृष्टिकोन आणि प्रेरणादायी ऊर्जा मिळाली आहे. सामाजिक विषयांवर लिहिण्याची, विचार करण्याची आणि अभ्यास करून आपले विचार मांडण्याची प्रेरणा मिळवली आहे.
शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते की, “पदवीच्या वर्गात बसलेली चेतना आणि विज्ञानात रमलेली आशिराना जेव्हा डॉ बाबासाहेबांच्या विचारांचा पिचकारा घेऊन लेखणीच्या रंगांनी कागद रंगवतात, तेव्हा सामाजिक क्रांतीची नवी पिढी उभी राहते.”
या गुणवंत विद्यार्थिनींचे पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन!
त्यांना पुढील वाटचालीसाठी झुंज वृत्तपत्र व ध्येय न्यूजच्या वतीने मन:पूर्वक अभिनंदन & पुढील वाटचालीस शुभेच्छा!

ताज्या बातम्या

error: Content is protected !!