मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा ५ गडी राखून पराभव करत विजेतेपद पटकावले. नाणेफेक जिंकून भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पाकिस्तानी संघाला १९.१ षटकांत १४६ धावांत गुंडाळले. त्यानंतर भारताने १९.४ षटकांत १५० धावा करत नाट्यमय विजय मिळवला.
पाकिस्तानच्या डावात सलामीवीर साहिबजादा फरहान (३८ चेंडूत ५७) आणि फखर जमन (३५ चेंडूत ४६) यांनी सुरुवातीला चांगली भागीदारी केली. परंतु मधल्या फळीतील फलंदाजांना भारतीय फिरकीपुढे तग धरता आले नाही. कुलदीप यादवने ४ षटकांत ३० धावांत ४ गडी घेत पाकिस्तानी डाव कोलमडवला. त्याला अक्षर पटेल (२/२६) आणि वरुण चक्रवर्ती (२/३०) यांचीही साथ लाभली. जसप्रीत बुमराहने शेवटच्या टप्प्यात २ महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या.
१४७ धावांचे लक्ष्य गाठताना भारताची सुरुवात डळमळीत झाली. अभिषेक शर्मा (५), शुभमन गिल (१२) आणि कर्णधार सूर्यकुमार यादव (१) स्वस्तात माघारी परतले. पण तिलक वर्मा (५३ चेंडूत नाबाद ६९) यांनी संयमी आणि स्फोटक अशा दोन्ही शैलीत खेळ करत डाव सावरला. संजू सॅमसनने २४ धावांचे योगदान दिले, तर अखेर शिवम दुबेने फटकेबाजी करत ३३ धावा केल्या. शेवटी रिंकू सिंगने चौकार मारत विजय निश्चित केला.
पाकिस्तानकडून फहीम अश्रफने ४ षटकांत २९ धावांत ३ बळी घेतले. शाहीद आफ्रिदी आणि अबरार अहमद यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. मात्र हारिस रऊफच्या ३.४ षटकांत ५० धावांची उधळण पाकिस्तानच्या पराभवाचे मुख्य कारण ठरली.
या सामन्यात अनेक विक्रम नोंदवले गेले. कुलदीप यादवने आशिया कप २०२५ मध्ये एकूण ९ बळी घेत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज म्हणून आपले स्थान पक्के केले. अंतिम सामन्यातील त्याचा ४/३० चा स्पेल निर्णायक ठरला. तिलक वर्माने अंतिम सामन्यात ५३ चेंडूत नाबाद ६९ धावा ठोकत कारकिर्दीतील सर्वोत्तम टी-२० खेळी साकारली आणि भारताला विजय मिळवून दिला. या विजयासह भारताने आशिया कपचे विक्रमी नववे विजेतेपद आपल्या नावावर केले. तसेच हा सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगतदार ठरल्याने तो चाहत्यांच्या स्मरणात दीर्घकाळ राहील.
दुबईत झालेला हा रोमांचक सामना पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान क्रिकेट स्पर्धेची तीव्रता दाखवून गेला. भारतीय संघाने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागांत उत्कृष्ट खेळ दाखवत आशिया कप २०२५ चा किताब आपल्या नावावर केला. हा विजय भारतीय क्रिकेटच्या आत्मविश्वासात आणि परंपरेत नवा अध्याय जोडणारा ठरला.
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : “दात आणि दातामुळे खुलणारे स्मितहास्य हे सौंदर्य उजळवणारा सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. मात्र बदललेली खाद्यसंस्कृती दातांच्या समस्यांना मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे. जुन्या काळी आपण खात असलेल्या भाकरी किंवा अपॉलिश भात यांत भरपूर तंतू असायचे. आजच्या अन्नपदार्थांमध्ये मात्र रसायनांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पचनशक्ती कमी झाली आहे आणि पित्तवृद्धीमुळे दातांवर दुष्परिणाम होत आहेत. जुन्या काळातील दातांवरील म्हणी आजही खरी ठरतात. यावरून स्पष्ट होते की, अखेरीस दातापासून सुरू झालेला प्रवास दातावरच संपतो. त्यामुळे दातांची निगा राखणे अत्यावश्यक आहे,” असे प्रतिपादन दंतचिकित्सक डॉ. रिबेका दोडती यांनी केले.
निमित्त होते सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटी संचालित श्रीमती मणिबेन एम. पी. शाह कला आणि वाणिज्य स्वायत्त महिला महाविद्यालय, मराठी विभाग आयोजित शारदोत्सव २०२५ (पाचवे वर्ष) अंतर्गत ‘नवदुर्गा : नवविचार व्याख्यानमाला’. सातव्या व्याख्यानात ‘दातापासून दाताकडे’ या विषयावर त्या बोलत होत्या.
डॉ. रिबेका दोडती या दंतचिकित्सक असून मराठीवरील विशेष प्रेमामुळे सध्या त्या सेंट जोसेफ महाविद्यालय, सत्पाळा, विरार येथे मराठी पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रश्मी शेटये-तुपे यांनी केले. प्रमुख व्याख्यात्यांचे स्वागत प्रा. किरण जाधव यांनी केले, तर आभार प्रदर्शन सामिया काझी हिने केले. प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. कार्यक्रम आभासी माध्यमातून यशस्वीपणे पार पडला. अशा प्रकारे शारदोत्सवाच्या सातव्या माळेत झालेले हे व्याख्यान विद्यार्थिनींसाठी आरोग्याबाबत सजगतेचा संदेश देणारे ठरले. स्मितहास्याचे खरे सौंदर्य दातांच्या आरोग्यात दडलेले आहे, याची जाणीव या प्रबोधनातून प्रत्येक सहभागींच्या मनात दृढ झाली.
जळगाव : राज्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीने अनेक जिल्ह्यांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नद्या, नाले तुडुंब भरून वाहू लागले, पूरस्थिती निर्माण झाली आणि शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. घरं, जनावरे, शेतीमाल वाहून गेला, अनेक ठिकाणी रस्ते तुटले, तर काही भागांतील लोकांना स्थलांतर करावे लागले. या नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यातील शेतकरी वर्ग तसेच सर्वसामान्य जनतेवर आर्थिक संकट कोसळले आहे. या
पार्श्वभूमीवर राज्याचे आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदा मंत्री मा. ना. गिरीशभाऊ महाजन साहेब यांनी समाजातील सर्व घटकांना पुढे येऊन पूरग्रस्त बांधवांना मदतीचा हात देण्याचे भावनिक आवाहन केले होते.विशेष म्हणजे गिरीशभाऊंच्या या आवहानाला काही सेकंदात पहिलाच प्रतिसाद त्यांच्याच मतदार संघातील त्यांचे खंदे समर्थक संजयदादा गरुड यांच्याकडून मिळाला कारण वास्तविकता अशी आहे की राज्यात निम्यापेक्षा जास्त भागात पूरग्रस्त स्थिती निर्माण झाली असून प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. शासन आपले निर्णय व दिशा ठरवून मदतीसाठी पावले उचलते तोपर्यंत वेळ जातो; शासकीय स्तरावरील मदत मिळेल तेव्हा मिळेल, पण तोपर्यंत नुकसान झालेल्यांनी काय करावे हा प्रश्न अत्यंत गंभीर बनतो. अशा वेळी स्थानिक पातळीवरून मदतीचा हात पुढे करणे ही खरी वेळेची गरज आहे. संजयदादा गरुड यांसारख्या लोकांनी अशा वेळी पुढे येऊन तातडीने मदत करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते आणि हीच आजच्या काळाची खरी गरज आहे. या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य संजयदादा गरुड यांनी एक प्रशंसनीय पुढाकार घेतला. त्यांनी स्वतः तसेच विविध संस्थांच्या माध्यमातून एकत्रित केलेला निधी आज मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे सुपूर्द केला. धुळे दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना संजयदादा गरुड यांनी जळगाव विमानतळावर प्रत्यक्ष भेट देत मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी तब्बल रुपये ७,१०,६६६/- (सात लाख दहा हजार सहाशे साठसहा रुपये) इतकी आर्थिक मदत धनादेशाद्वारे सुपूर्द केली. या वेळी राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री मा. ना. श्री. गिरीशभाऊ महाजन, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. गुलाबराव पाटील, वस्त्रोद्योग मंत्री मा. ना संजय सावकारे, आमदार मा. आ. श्री. मंगेशदादा चव्हाण, आमदार मा. आ. किशोरआप्पा पाटील, आमदार मा. आ. अमोल जावळे, ज्येष्ठ नेते मा. श्री. अरविंद देशमुख यांच्यासह जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते. संजयदादा गरुड यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांवरून कौतुक करण्यात आले. या मदतीत शेंदुर्णीतील धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आचार्य गजाननराव गरुड पतसंस्था शेंदुर्णी, शेंदुर्णी सहकारी फळ विक्री संस्था मर्या. शेंदुर्णी, श्री त्रिविक्रम महिला सहकारी दूध उत्पादक संस्था मर्या. शेंदुर्णी या स्थानिक संस्थांचा सक्रिय सहभाग होता. यासोबतच संजयदादा गरुड व माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. सरोजिनी संजयराव गरुड यांनी वैयक्तिक पातळीवर देखील पुढाकार घेत आपल्या परीने मदतीचा हात दिला. “फुल ना फुलाची पाकळी” म्हणून त्यांनी या उपक्रमात योगदान देत पूरग्रस्त शेतकरी व सर्वसामान्यांना दिलासा मिळावा, यासाठी एकत्रित मदत उभी केली. याच पार्श्वभूमीवर समाजात दिसणाऱ्या एका प्रवृत्तीवर आता कटाक्ष टाकणे गरजेचे आहे. फक्त नेत्यांसोबत पूरग्रस्त भागांचा पहाणी दौरा करणे, फोटो काढून व्हिडिओ बनवणे आणि ते सोशल मीडियावर व्हायरल करून चमकोगिरी करण्यापेक्षा संजयदादा गरुड यांच्यासारखे प्रत्यक्ष दातृत्व दाखवणे हेच खरे समाजकारण आहे. हीच आजच्या काळाची खरी गरज आहे. केवळ कॅमेऱ्यासमोर पंचनामा करणाऱ्या शासकीय यंत्रणे सोबत उभे राहून लोकप्रियता मिळवण्याऐवजी पूरग्रस्तांच्या वेदना समजून त्यांना खऱ्या अर्थाने दिलासा देणे महत्त्वाचे आहे. संजयदादा गरुड यांनी केलेले हे काम त्या सर्वांना ठोस संदेश देणारे ठरते, जे फक्त दाखवण्यापुरते समाजकारण करतात. संजयदादा गरुड यांनी या भेटीत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे पूरग्रस्तांच्या मदतीबाबत काही महत्त्वपूर्ण मागण्या देखील केल्या. त्यांनी सांगितले की, अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकरी वर्ग प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे. अनेक ठिकाणी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देणे अत्यावश्यक आहे. यासाठी पिकांचे पंचनामे त्वरीत पूर्ण करावेत व नुकसानभरपाईचे वितरण तातडीने करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. तसेच शासनाने मदत कार्य अधिक गतीमान करून पूरग्रस्तांना त्वरित आधार मिळावा, यासाठी त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना विशेष विनंती केली. राज्यातील सामाजिक संस्था, सहकारी बँका, शैक्षणिक संस्थांनी अशा कठीण काळात पुढाकार घेऊन मदतकार्य हाती घ्यावे, असे आवाहन जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन यांनी यापूर्वी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत संजयदादा गरुड यांनी केवळ स्वतःच्या पातळीवर मदत न करता विविध संस्थांना प्रेरित केले आणि त्यातून मोठ्या प्रमाणावर निधी गोळा झाला. त्यामुळे पूरग्रस्तांसाठी स्थानिक पातळीवरून होणाऱ्या या सामूहिक प्रयत्नांची प्रशंसा होत आहे. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून केलेले हे कार्य स्थानिक जनतेसाठी प्रेरणादायी ठरले आहे. कठीण प्रसंगी शासनाबरोबरच समाजातील विविध घटकांनीही पुढे यावे, हीच खरी लोकशाही आहे, असे स्थानिकांनी यावेळी नमूद केले. संजयदादा गरुड यांची ही मदत केवळ आर्थिक साहाय्य नसून पूरग्रस्तांच्या मनात आशेचा किरण निर्माण करणारी ठरली आहे. या उपक्रमामुळे जळगाव जिल्ह्यातून राज्यातील आपत्तीग्रस्त बांधवांसाठी एकता, संवेदनशीलता आणि सामाजिक जबाबदारीचे सुंदर उदाहरण निर्माण झाले आहे. संजयदादा गरुड यांचा हा परोपकारी निर्णय आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना दिलेली आर्थिक मदत निश्चितच पूरग्रस्तांना नव्या ऊर्जेचा दिलासा देणारी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. तसेच ही मदत जाहीर करताना दिलेला संदेश – “चमकोगिरीच्या नावाखाली केवळ फोटो-व्हिडिओ काढून सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यापेक्षा प्रत्यक्ष मदतीचा हात पुढे करणेच खरे समाजकारण आहे” – हा समाजातील प्रत्येक जबाबदार व्यक्तीने आत्मसात करण्याची आजच्या काळाची खरी गरज आहे.
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटी संचालित श्रीमती मणिबेन एम.पी. शाह कला व वाणिज्य स्वायत्त महिला महाविद्यालयाच्या मराठी विभागात शारदोत्सव २०२५ (पाचवे वर्ष) अंतर्गत ‘नवदुर्गा : नवविचार’ व्याख्यानमालेत सहावे पुष्प म्हणून ‘कोसबाडच्या टेकडीवरून’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. विद्यार्थिनींसमोर अनुताई वाघ यांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. कार्यक्रमास प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या व्याख्यानातून समाजसेवेतील स्त्रीशक्तीच्या अद्वितीय योगदानाची जाणीव विद्यार्थिनींना झाली.
व्याख्यानादरम्यान निवेदिका वैशाली जाधव यांनी अनुताई वाघ यांच्या कार्याची सखोल चर्चा करत “कोसबाडच्या टेकडीवरून जीवनदृष्टी मिळते. समाजसेवा म्हणजे केवळ सेवा देणे नाही, तर मुलं शाळेत येत नसतील तर त्यांच्या अंगणात शाळेचं झाड लावण्याची जबाबदारी स्वीकारणे ही खरी सेवा आहे,” असे सांगितले. त्यांनी विद्यार्थिनींना सांगितले की, प्रत्येक नवीन गोष्ट घडवायची असेल, तर कामाच्या प्रत्यक्ष परिणामाऐवजी मानसिक तयारी, निग्रह आणि सातत्य आवश्यक आहे.
मोक्षाविषयीही विचार मांडले, “मोक्ष शोधताना किंवा काम करताना कामातून मिळणारा मोक्ष हीच खरी कोसबाडची टेकडी आहे. एखादी गोष्ट घडवायची असेल, तर तिच्या मानसिकतेवर निग्रह ठेवून काम करा; परिणामावर जास्त लक्ष केंद्रित करू नका.” त्यांच्या या स्पष्ट आणि प्रामाणिक मतांनी विद्यार्थिनींच्या मनात आत्मशोध आणि कार्याची महत्त्वाची शिकवण रुजली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृतीय वर्ष कला शाखेतील ज्योती पाटील यांनी केले. प्रमुख वक्त्यांचा परिचय पायल गोतपगार ह्या विद्यार्थिनीने करून दिला, तर कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थिनींनी आभार प्रदर्शन केले. शारदोत्सवात अशा उपक्रमांनी विद्यार्थिनींना सामाजिक कार्य, स्त्रीशक्तीची जाणीव आणि जीवनदृष्टीचा अभ्यास करण्याची संधी दिली, असे उपस्थितांनी नोंदविले.
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटी संचालित श्रीमती एम.पी. शाह महिला महाविद्यालयाच्या मराठी विभागात शारदोत्सव २०२५ (पाचवे वर्ष) अंतर्गत ‘नवदुर्गा : नवविचार’ व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. या व्याख्यानमालेत पाचवे पुष्प म्हणून ‘स्व-कथाकथन’ या विषयावर व्याख्यात्या, लेखिका आणि कथाकथनकार डॉ. वृंदा कौजलगीकर यांनी व्याख्यान सादर केले. कार्यक्रमास विद्यार्थिनींसह प्राध्यापकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्त्री उपजतच सृजनशील असून तिचं योगदान केवळ कुटुंबापुरतं मर्यादित न राहता साहित्य, कला आणि संस्कृतीच्या क्षेत्रात ठसा उमटवते, असे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. कौजलगीकर म्हणाल्या, “स्व-कथाकथन म्हणजे स्त्रीने स्वतःच्या अनुभवांवर, भावविश्वावर, संघर्षांवर व आत्मशोधावर आधारित कथन सादर करणे. हे केवळ आत्मकथन नसून तिच्या व्यक्तिमत्त्वाचा, विचारांचा आणि सामाजिक स्थितीचा आरसा ठरतो.” त्यांनी सांगितले की स्त्रीच्या अनुभवातून समाजासही संदेश मिळतो आणि तिच्या जीवनातील कथा विद्यार्थिनींसाठी मार्गदर्शक ठरतात. त्यांनी समाजातील स्त्रीच्या विविध भूमिकांवर आणि सृजनशीलतेवरही प्रकाश टाकला.
व्याख्यानादरम्यान डॉ. कौजलगीकर यांनी काही गंभीर आशयाच्या तर काही विनोदी रंगाच्या कथा सादर केल्या. त्यांच्या कथांमधून स्त्रीच्या संघर्षांचे, आनंदाचे आणि भावनांचे सूक्ष्म दर्शन घडले. प्रेक्षकांनी त्यांच्या कथांचा उत्साहाने आनंद घेतला. एका विद्यार्थिनीने सांगितले, “डॉ. कौजलगीकर यांच्या कथांमधून स्त्रीच्या जीवनातील विविध पैलू समजून घेता आले.” या कथांनी उपस्थितांना विचार करण्यास प्रवृत्त केले आणि स्वकथाकथनाचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृतीय वर्ष कला शाखेतील टिशा जाधव हिने केले. कनिष्ठ महाविद्यालयाच्या मराठी विभाग प्रमुख प्रा. नेहा भोसले यांनी प्रमुख व्याख्यात्यांचा परिचय करून दिला, तर यस्तरा मान हिने आभार प्रदर्शन केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थिनींना सृजनशील अभिव्यक्तीला वाव मिळतो तसेच समाजातील स्त्रीच्या बहुआयामी योगदानाची जाणीव होते. शारदोत्सव सारख्या कार्यक्रमांनी साहित्य, कला आणि विचारांना नवी दिशा मिळवून दिली, असा सूर उपस्थितांनी नोंदविला.
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अभ्युदय नगर, काळाचौकी येथील सार्वजनिक नवरात्र महोत्सव इ. क्र. १५ यावर्षीच्या सोहळ्याने ४७ वे वर्ष गाठले आहे. परंपरा, भक्तिभाव आणि सामाजिक एकात्मतेचा वारसा जपणारा हा उत्सव परिसरातील सर्वांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. देवीच्या आराधनेसोबतच विविध सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून भाविकांना भक्ती, आनंद आणि ऐक्याचा अनोखा अनुभव मिळणार आहे.
या महोत्सवाचे अध्यक्षपद अरुण वाघे भूषवत असून, सचिव म्हणून सचिन गुरव आणि खजिनदार म्हणून राहुल खामकर कार्यरत आहेत. कार्यकारिणीच्या पुढाकाराने व स्थानिकांच्या सक्रिय सहभागामुळे गेली चार दशके हा उत्सव यशस्वीरीत्या साजरा होत आहे. सर्वसमावेशकता, शिस्तबद्ध आयोजन आणि लोकसहभाग हीच या महोत्सवाची खरी ताकद असल्याचे आयोजकांनी सांगितले.
पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात आणि मंत्रोच्चारांच्या वातावरणात देवीची स्थापना करण्यात आली आहे. नवरात्रभर भजन, कीर्तन, गाणी, नृत्यस्पर्धा, सामाजिक प्रबोधनपर कार्यक्रम तसेच मुलांसाठी विशेष उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे हा उत्सव केवळ धार्मिकतेपुरता मर्यादित न राहता सांस्कृतिक आणि सामाजिकतेचाही दिमाखदार आविष्कार ठरत आहे.
काळाचौकीतील हा नवरात्र महोत्सव वर्षानुवर्षे भक्तांना एकत्र आणत आहे. ४७ वर्षांच्या प्रवासानंतरही त्याच उत्साहाने आणि श्रद्धेने हा सोहळा साजरा होत असल्याने परिसरात आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे. देवीच्या चरणी अर्पण केलेला हा भक्तिभावाचा सोहळा श्रद्धा, परंपरा आणि सामुदायिक ऐक्याचा तेजस्वी दीप उजळवत आहे.
पाचोरा – पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी केली आहे. 16, 22 आणि 23 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या विक्राळ अतिवृष्टीने पाचोरा व भडगाव तालुक्यातील खरीप हंगाम अक्षरशः पाण्यात वाहून गेला असून हजारो शेतकरी उध्वस्त झाले आहेत. शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, शेतीची पायाभूत साधने उद्ध्वस्त झाली, जनावरांचा मृत्यू झाला, घरगुती साहित्य वाहून गेले आणि ग्रामीण तसेच शहरी भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. या गंभीर परिस्थितीत शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून मदत द्यावी, असे आमदार पाटील यांनी ठामपणे सांगितले आहे. आमदार किशोर आप्पा पाटील यांनी निवेदनात सांगितले की, पाचोरा तालुक्यात 16 सप्टेंबर रोजी 114.8 मिमी, 22 सप्टेंबर रोजी 147.8 मिमी आणि 23 सप्टेंबर रोजी तब्बल 139.3 मिमी पाऊस झाला. यामुळे सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस तालुक्याचे पर्जन्यमान 136.4 मिमीच्या सरासरीवरून थेट 257.8 मिमीपर्यंत पोहोचले आहे, म्हणजेच सरासरी पर्जन्याच्या दुपटीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. 23 सप्टेंबरपर्यंत पर्जन्यमान 189 टक्क्यांपर्यंत नोंदले गेले असून या आकडेवारीची अधिकृत शासकीय नोंद उपलब्ध आहे. भडगाव तालुक्यातदेखील 23 सप्टेंबर रोजी 90.70 मिमी इतका मुसळधार पाऊस झाला असून महसूल प्रशासनाकडे त्याची नोंद आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या पावसामुळे शेतीसह सर्वसामान्यांच्या आयुष्यावर गंभीर परिणाम झाला आहे. या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील सर्व पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन, कापूस, भात, मका, ज्वारी यांसारखी पिके पूर्णपणे नष्ट झाली आहेत. पाणी ओसरत नसल्यामुळे शेतात उभे असलेले पीक सडत आहे. सुपीक माती वाहून गेली, अनेक ठिकाणी बांध फुटले, पिकांचे संरक्षण करण्यासाठी बसवलेले ठिबक व पाईपलाइन संपूर्ण उद्ध्वस्त झाले आहेत. शेतकऱ्यांच्या विहिरी कोसळल्या किंवा गाळाने भरल्या आहेत. फळबागांना मोठा फटका बसला असून केळी, डाळिंब, आंबा, मोसंबी यांसारख्या पिकांची हानी झाली आहे. शेतकरी वर्गासाठी ही परिस्थिती अत्यंत धोकादायक ठरली आहे, कारण त्यांच्याकडे पुढील हंगामासाठी भांडवल उरलेले नाही. आमदार पाटील यांनी निदर्शनास आणले की फक्त पिकांचेच नाही तर शेतकऱ्यांच्या दैनंदिन उपजीविकेवर अवलंबून असलेली साधनेही नष्ट झाली आहेत. “अनेक शेतकऱ्यांची मळणी यंत्रणा, ट्रॅक्टरसह शेतीतील महत्त्वाची अवजारे वाहून गेली किंवा निकामी झाली आहेत. दुधाळ जनावरे, बैल, गायी, म्हशी, बकऱ्या, कुक्कुटपालनातील कोंबड्या यांचा मोठ्या प्रमाणावर मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांचे घरगुती साहित्य पाण्यात वाहून गेले आहे. पाचोरा व भडगाव शहरातील व्यापाऱ्यांच्या दुकानात पाणी शिरून लाखो रुपयांचा माल खराब झाला आहे. पक्के रस्ते उखडून गेले, पूल व बंधारे वाहून गेले, रस्त्यांवर मोठे खड्डे पडून वाहतुकीची व्यवस्था विस्कळीत झाली आहे,” असे त्यांनी सांगितले. मागील दोन वर्षांपासून शेतकऱ्यांवर सतत नैसर्गिक आपत्तींचे संकट कोसळत आहे. कधी अवकाळी पाऊस, तर कधी दुष्काळ अशा परिस्थितीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक कंबर आधीच मोडली आहे. त्यातच या वर्षीच्या अतिवृष्टीने त्यांचे उरलेसुरले अस्तित्वही धोक्यात आले आहे. आमदार किशोर आप्पा पाटील यांनी सांगितले की, “मी स्वतः दोन्ही तालुक्यांत जाऊन परिस्थितीची पाहणी केली असून कृषी व महसूल प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. केलेल्या पंचनाम्यात 100 टक्के पिकांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शासनाने तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.” आमदार पाटील यांनी विशेषत्वाने लक्ष वेधले की, 11 सप्टेंबर 2019 रोजी पश्चिम महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांसाठी शासनाने लागू केलेल्या मदत निकषांनुसार एनडीआरएफच्या नियमांप्रमाणे तिप्पट आर्थिक मदत दिली होती. “त्याच धर्तीवर पाचोरा-भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनाही तशीच मदत मिळाली पाहिजे. शेतकऱ्यांच्या हातात यंदा शेतीतून कोणतेही उत्पन्न राहणार नाही. जमीन तयार करण्यासाठी लागणारी गुंतवणूक वाहून गेली आहे. पिकांचे नुकसान, जनावरांचा मृत्यू, पायाभूत सुविधांचा विनाश आणि शेतीतील साधनांची हानी यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोसळले आहेत. सरकारने त्वरित मदत केली नाही तर शेतकरी गंभीर संकटात सापडतील,” असे आमदार पाटील यांनी नमूद केले. शेतकऱ्यांची ही परिस्थिती केवळ त्यांचा वैयक्तिक तोटा नसून संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेलाच धक्का देणारी आहे. शेतकरी हतबल झाले तर गावोगावची
व्यापार-व्यवसाय साखळी मोडते, रोजगाराचे साधन कमी होते आणि स्थलांतर वाढते. आमदार पाटील यांनी याच मुद्द्याला हात घालत सांगितले की, “आज शेतकऱ्यांची खरीप हंगामातील पिके गेली आहेत, जनावरांचे पालन करणारे लोकदेखील उद्ध्वस्त झाले आहेत. शेतीतून मिळणारा पैसा गावोगावच्या किराणा, खत, बियाणे, औषधे, वाहतूक, लहान उद्योग यांना आधार देतो. पण या आपत्तीनंतर ग्रामीण अर्थव्यवस्था कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. म्हणून सरकारने तातडीने मदत जाहीर करणे अत्यावश्यक आहे.” आमदार किशोर आप्पा पाटील यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, शासनाकडून वेळेत निर्णय झाला नाही तर शेतकरी मोठ्या अडचणीत सापडतील. “शेतकऱ्यांना फक्त आधाराची गरज नाही, तर ठोस आर्थिक मदत हवी आहे. या मदतीमुळे त्यांना पुन्हा उभे राहण्याची संधी मिळेल. पुढील हंगामासाठी जमिनीची तयारी, बी-बियाणे, खत, यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी भांडवल उभारता येईल. जर वेळेत मदत मिळाली नाही तर शेतकऱ्यांचे कर्जबाजारीपण वाढेल आणि आत्महत्यांचे प्रमाणही वाढू शकते. त्यामुळे शासनाने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून आवश्यक आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी,” असे ते म्हणाले. स्थानिक नागरिक व शेतकरी वर्गानेही आमदार पाटील यांच्या या पुढाकाराचे स्वागत केले आहे. शेतकरी म्हणत आहेत की, “आमदार पाटील नेहमीच आमच्या अडचणींना आवाज देतात. त्यांनी या वेळी थेट मुख्यमंत्री पातळीवर जाऊन मदतीची मागणी केली आहे, त्यामुळे आम्हाला आशा वाटते की सरकार आमच्यासाठी तातडीने काहीतरी निर्णय घेईल.” व्यापाऱ्यांनीही सांगितले की, अतिवृष्टीमुळे त्यांचे दुकानातील लाखो रुपयांचे माल खराब झाले असून शासनाकडून मदतीची गरज आहे. आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या या ठाम भूमिकेमुळे पाचोरा-भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वेदनांना ताकदवान आवाज मिळाला आहे. आता सर्वांचे लक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाकडे लागले आहे. या निवेदनानंतर शेतकरीवर्गात आशा निर्माण झाली आहे की शासन तातडीने ओला दुष्काळ जाहीर करेल आणि शेतकऱ्यांच्या उभ्या आयुष्याला नवसंजीवनी देणारी मदत जाहीर करेल.
पाचोरा – शहरातील शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण स्थान मिळवलेले श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय नेहमीच विविध शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांतून विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासाची संधी उपलब्ध करून देत असते. ह्याच परंपरेला अनुसरून महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागामार्फत दरवर्षी आयोजित केला जाणारा वाणिज्य मंडळाचा उद्घाटन सोहळा यंदाही उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विविध क्षेत्रात यशस्वी झालेले माजी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आली. उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. वासुदेव वले सर यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन केले. त्यांच्या सोबत प्रमुख वक्ते म्हणून भडगाव येथील र. ना. देशमुख महाविद्यालयाचे वाणिज्यशास्त्र विषयातील ख्यातनाम प्राध्यापक डॉ. गजानन चौधरी उपस्थित होते. या वेळी सभागृहात उपस्थित सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात पाहुण्यांचे स्वागत केले. वाणिज्य विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. योगेश पुरी यांनी प्रास्ताविक करताना महाविद्यालयातील वाणिज्य मंडळाच्या कार्याचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की वाणिज्य मंडळ हे फक्त अभ्यासापुरते मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या व्यवसायाभिमुख दृष्टिकोनाला वाव देणारे, त्यांच्या उद्योजकतेच्या क्षमतेला चालना देणारे व्यासपीठ आहे. विद्यार्थ्यांमध्ये नवनवीन कल्पना, तंत्रज्ञानाची जाण आणि आधुनिक व्यावसायिक दृष्टीकोन निर्माण करण्यासाठी वाणिज्य मंडळ वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन करते. यानंतर प्रमुख वक्ते डॉ. गजानन डी. चौधरी यांनी “AI in कॉमर्स, AI in डेटा सायन्स, AI चा उपयोग व त्याच्या मर्यादा” या अत्यंत महत्त्वपूर्ण आणि आजच्या काळात अत्यंत सुसंगत अशा विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) आता केवळ तांत्रिक क्षेत्रापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर ती व्यावसायिक क्षेत्रातही क्रांतिकारी बदल घडवत आहे. ऑनलाईन व्यवहार, डिजिटल मार्केटिंग, ग्राहकांच्या खरेदीच्या सवयींचे विश्लेषण, डेटा सायन्सच्या आधारे बाजारपेठेतील बदलांचा अंदाज लावणे, तसेच लेखा प्रणाली आणि करसंबंधित प्रक्रिया यांमध्ये AI चा वापर कसा करता येतो हे त्यांनी सविस्तर समजावून सांगितले. त्याचबरोबर AI वापरताना येणाऱ्या मर्यादा, नैतिकता आणि डेटाच्या सुरक्षिततेबाबत विद्यार्थ्यांना सावधगिरी बाळगण्याचे मार्गदर्शनही त्यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असलेले महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. वासुदेव वले यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना स्थानिक रोजगार संधींचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी सांगितले की आजच्या युगात मोठ्या शहरांमध्ये रोजगार मिळवण्यासाठी झटणाऱ्या तरुणांनी आपल्या मूळ गावीही उद्योग, व्यापार आणि सेवा क्षेत्रातील संधी शोधल्या पाहिजेत. महाविद्यालयातील वाणिज्य विभागातून शिक्षण घेऊन अनेक माजी विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत यशस्वीपणे कार्यरत आहेत, काहींनी स्वतःचे व्यवसाय उभारले आहेत तर काही जण नामांकित कंपन्यांमध्ये उच्च पदांवर कार्यरत आहेत, हीच या विभागाची खरी कामगिरी आहे, असे त्यांनी सांगितले. या प्रसंगी महाविद्यालयातील वाणिज्य विभागातील चार विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच विविध स्पर्धांतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना गौरवण्यात आले. या सन्मानामुळे उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह आणि प्रेरणा निर्माण झाली. कार्यक्रमाच्या सुयोग्य नियोजनासाठी आणि सुरळीत पार पडण्यासाठी वाणिज्य विभागातील प्राध्यापकांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सरोज अग्रवाल यांनी उत्तमरित्या पार पाडले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. जयश्री वर्मा वाघ यांनी करून दिला. आभार प्रदर्शन प्रा. किरण पाटील यांनी करताना सर्व उपस्थित पाहुण्यांचे, प्राध्यापकांचे, कर्मचाऱ्यांचे आणि विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. या सोहळ्याला प्रा. डॉ. के. एस. इंगळे, डॉ. एस. बी. तडवी, प्रा. आर. बी. वळवी, डॉ. शरद पाटील, डॉ. माणिक पाटील, प्रा. सुवर्णा पाटील, प्रा. प्राजक्ता शितोळे, प्रा. स्वप्नील भोसले, प्रा. क्रांती सोनावणे, प्रा. जयश्री महाजन या प्राध्यापकांसह कर्मचारी श्री. भीला पवार, श्री. सुरेंद्र तांबे, जावेद देशमुख आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. लक्ष्मी गलाणी आणि प्रा. अक्षय शेंडे यांनी विशेष प्रयत्न केले. महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. त्यांच्या चेहऱ्यावर पाहुण्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि सत्कारामुळे नव्या उमेदीचा आणि प्रेरणेचा उत्साह स्पष्टपणे जाणवत होता. वाणिज्य मंडळाच्या उद्घाटनामुळे विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासापुरते मर्यादित न राहता उद्योग, व्यापार, तंत्रज्ञान, नव्या व्यवसाय कल्पना आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारख्या आधुनिक संकल्पनांची ओळख होईल, तसेच त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि भविष्यातील करिअर घडविण्यासाठी योग्य दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. अशा प्रकारे श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात झालेला वाणिज्य मंडळाचा उद्घाटन सोहळा केवळ औपचारिकतेपुरता मर्यादित न राहता विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक, प्रेरणादायी आणि करिअर मार्गदर्शन करणारा ठरला. या कार्यक्रमातून महाविद्यालयाने पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असलेली आपली बांधिलकी अधोरेखित केली.