Home Blog Page 80

शिवराज्याच्या प्रेरणास्थानी नव्या प्रवेशद्वाराची मागणी, भडगाव शहराच्या मूलभूत सुविधांवरही भर

0

Loading

भडगाव (माधव जगताप) : भडगाव शहराचा प्रमुख ओळखचिन्ह व ऐतिहासिक वास्तू मानला जाणारा मुख्य प्रवेशद्वार म्हणजेच नगरदेवळा दरवाजा, हा सुस्थितीत असतानाही अनाकलनीय कारणांमुळे नुकताच पाडण्यात आला. या दरवाजाचे शहराच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ओळखीशी थेट नाते असल्याने या दरवाजाच्या जागी नव्याने भव्य आणि उंची देऊन प्रवेशद्वार उभारण्यात यावा, अशी ठाम मागणी शिवसेना नेत्या वैशाली सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. नव्याने बांधण्यात येणाऱ्या या दरवाज्याला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने “हिंदवी स्वराज्य प्रवेशद्वार” असे नामकरण करण्यात यावे, असा ठराविक आग्रहही यावेळी व्यक्त करण्यात आला.
ही मागणी माजी नगरसेविका योजना पाटील, माजी गटनेते शंकर मारवाडी, माजी नगरसेवक मनोहर चौधरी, जिल्हा युवाधिकारी माधव जगताप, तालुका युवाध्यक्ष चेतन पाटील, शहर संघटक जिभाऊ महाजन, उपाध्यक्ष भैय्या राजपूत, शहराध्यक्षा मनिषा पाटील, शहर युवाध्यक्ष चेतन पाटील, युवक संघटक रोनित अहिरे, उपाध्यक्ष यश पाटील, युवा संघटक यश महाजन, करण राजपूत, समन्वयक भुषण देवरे, सह समन्वयक सत्यजित पाटील, जेष्ठ नागरिक पंडित पाटील, सुरेश पाटील, दत्तात्रय पाटील आदींनी संयुक्तरित्या नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रविंद्र लांडे यांच्याकडे करण्यात आली. यावेळी आस्थापना विभाग प्रमुख राहुल साळुंखे यांच्याकडेही निवेदन सादर करून प्रशासनाला या विषयावर जागरूक करण्यात आले.
या ऐतिहासिक दरवाजाच्या जागी उभारण्यात येणारा नवीन दरवाजा केवळ एक स्थापत्य निर्मिती नसून तो शहरवासीयांसाठी गौरवाचा, अभिमानाचा आणि प्रेरणेचा द्योतक ठरेल, असे मत या प्रतिनिधींनी व्यक्त केले. हिंदवी स्वराज्य स्थापनेचा संकल्प साकार करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतीस अभिवादन करण्याचा हा एक प्रयत्न ठरेल, असे सांगून शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शहराच्या तरुणाईला यामधून प्रेरणा मिळावी ही भावना निवेदनात अधोरेखित केली.
या प्रमुख मागणीसोबतच शहरातील इतर अनेक मूलभूत नागरी समस्या व गरजांकडेही प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. शहरात संपूर्णपणे स्वच्छता व पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपण मोहीम मोठ्या प्रमाणात राबवण्यात यावी, यासाठी पालिकेने तात्काळ नियोजन करून ती प्रत्यक्षात उतरवावी, अशी मागणी केली गेली. तसेच जुना पारोळा रोडवरील पूनम हॉटेल ते सुर्यवंशी डेअरी आणि नाचनखेडा रोड न. प. हद्दीपर्यंत मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची दुरवस्था असून, अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या रस्त्यांची डागडुजी, मजबुतीकरण व सुधारणा करावी, अशीही विनंती केली गेली.
शहरात मोकाट फिरणाऱ्या जनावरांच्या समस्येने नागरिक हैराण झाले असून, वाहतुकीला अडथळा, अपघातांची शक्यता, तसेच सार्वजनिक ठिकाणी घाण होत असल्याने यावर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले. नगरपरिषदेने या मोकाट जनावरांना पकडण्यासाठी स्वतंत्र पथक तयार करून कारवाई करावी, असा ठाम सूर यावेळी व्यक्त झाला.
नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागात वापरले जाणारे
“संडास व गटारींच्या सफाईसाठी वापरले जाणारे व्हॅक्युम सक्शन टँकर अद्यापही निकृष्ट स्थितीत असून…”
अनेक ठिकाणी सफाई व्यवस्थित होत नसल्याची तक्रार नागरिकांकडून वारंवार केली जात आहे. यामुळे शहरात दुर्गंधी व रोगराई पसरत आहे. त्यामुळे तातडीने टँकरची दुरुस्ती तातडीने करावी, तसेच सफाई व्यवस्था नियमित व सुरळीत करण्यात यावी, अशी विनंती निवेदनात स्पष्टपणे करण्यात आली आहे.
शहराच्या काही भागांमध्ये शुद्ध पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. नवीन पाइपलाइन टाकण्याच्या कामाच्या वेळी अनेक ठिकाणी जुनी पाइपलाइन तुटली असून, ढापे उघडे पडले आहेत. त्यामुळे पाण्याची गळती होत आहे आणि रस्त्यांवर चिखल व अस्वच्छता पसरली आहे. या सर्व ढाप्यांची तातडीने दुरुस्ती करावी, गळती थांबवून शुद्ध पाणी पुरवठा सुरळीत करावा, यासाठी ठोस योजना तयार करावी, अशी मागणी करण्यात आली. याशिवाय पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू, मलेरिया, फाइलेरिया यांसारख्या आजारांचा फैलाव होऊ नये म्हणून संपूर्ण शहरात रोगप्रतिबंधक औषध फवारणी करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी पुढे आली. नगरपरिषदेने या संबंधाने वेळेत पावले उचलली नाहीत, तर नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होईल, असा इशाराही देण्यात आला. या निवेदनाच्या माध्यमातून केवळ एका प्रवेशद्वाराच्या पुनर्बांधणीची मागणी न करता शहराच्या सर्वांगीण विकासाचा, जनतेच्या गरजांचा आणि भविष्यकालीन स्वच्छ, आरोग्यदायी भडगाव घडवण्याचा विचार या नेतृत्वाने पुढे मांडला आहे. शिवसेना नेत्या वैशाली सुर्यवंशी यांच्या प्रेरणेतून व मार्गदर्शनातून साकार झालेली ही भूमिका ही राजकारणाच्या पलीकडची असून, शहरासाठी जिव्हाळ्याची आहे. प्रशासनाने या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून तातडीने पावले उचलावीत, हीच शहरवासीयांची अपेक्षा आहे.

पाचोरा येथे 29 रोजीसायबर क्राईम विषयावर व्याख्यान

0

Loading

पाचोरा – येथील रोटरी क्लब पाचोरा भडगाव व जैन पाठशाळा पाचोरा यांचे तर्फे दिनांक 29 जून 2025, रविवार रोजी “सायबर क्राईम” या विषयावर जाणीव जागृतीपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. जैन पाठशाळा सभागृह, जामनेर रोड, पाचोरा येथे सकाळी 10 वाजता, पुणे येथील सुप्रसिद्ध, राष्ट्रीय पुरस्कार विजेते सायबर सेक्युरिटी व्याख्याते डॉ. धनंजय देशपांडे हे सायबर सेक्युरिटीच्या संदर्भातील महत्त्वाचे नियम, कायदे व मंत्र यावेळेस श्रोत्यांना सांगणार आहेत.

समाजात सायबर क्राईम चे वाढते प्रमाण आणि जनतेची फसवणूक या संदर्भातील जाणीव जागृती करण्यासाठी डॉ. धनंजय देशपांडे हे देशभर जागर करीत आहेत. या पार्श्वभूमीवर येथील रोटरी क्लब चे अध्यक्ष डॉ. पवनसिंग पाटील, सेक्रेटरी डॉ शिवाजी शिंदे आणि जैन पाठशाळेचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रफुल्ल संघवी यांनी हे जनजागृती पर व्याख्यान आयोजित केले आहे. पाचोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक पवार त्यांचे सहकार्य लाभले आहे. पाचोरा शहर व तालुक्यातील व्यापारी, उद्योजक, युवक, युवती, तसेच बँकिंग क्षेत्राशी संबंधित कर्मचारी आणि ग्राहकांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. व्याख्यानानंतर श्रोत्यांच्या शंका व प्रश्नांचे समाधान डॉक्टर धनंजय देशपांडे करणार आहेत. सदर व्याख्यान निशुल्क असून प्रवेश सर्वांसाठी खुला आहे. जास्तीत जास्त श्रोत्यांनी व्याख्यानाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या पुढाकाराने प्रलंबित वनहक्क दाव्यांवर निर्णायक बैठक

0

Loading

पुणे (गुरुदत्त वाकदेकर) : जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील आदिवासी बांधवांच्या प्रलंबित वनहक्क दाव्यांच्या निकाली निघण्यासाठी संसदरत्न खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या पुढाकारातून दिनांक २३ जून २०२५ रोजी पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या समवेत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत विभागीय वनहक्क समितीचे सदस्य किरण लोहकरे यांनी सद्यस्थितीचे सविस्तर विवेचन केले आणि अडचणी मांडल्या. त्यावर चर्चा होऊन ठोस निर्णय घेण्यात आले.

या बैठकीचा प्रस्ताव ७ जून रोजी पुणे येथे यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई आणि आदिवासी विकास केंद्र यांच्या वतीने आयोजित बैठकीत मांडण्यात आला होता. खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत किरण लोहकरे व किसान सभेचे ॲड. नाथा शिंगाडे, आदिवासी कृती समिती पुणे चे पदाधिकारी यांनी जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील प्रलंबित वनहक्क दाव्यांचा मुद्दा ठामपणे मांडला. शरदचंद्र पवार यांनी त्याची गांभीर्याने दखल घेत सकारात्मक आश्वासन दिले होते.

या पार्श्वभूमीवर २३ जूनच्या बैठकीत पुढील निर्णय घेण्यात आले:

१) विभागीय वनहक्क समितीकडे अपील व पुनर्विलोकनासाठी पाठवलेल्या एकूण ४४ प्रलंबित दाव्यांबाबत पुढील १५ दिवसांत उपविभागीय आणि जिल्हास्तरीय बैठका घेण्यात येतील.
या माध्यमातून संबंधित दावे तातडीने निकाली काढण्यात येणार आहेत.

२) जुन्नर व आंबेगाव तालुक्यांतील एकूण १२३ आदिवासी गावांपैकी ५६ गावांचेच सामूहिक वनहक्क दावे मंजूर झाले आहेत, तर १ दावा सध्या प्रलंबित आहे.
उर्वरित ६६ गावांनी आपापले सामूहिक वनहक्क दावे तात्काळ सादर करावेत, यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येतील.

३) मंजूर झालेल्या सामूहिक व वैयक्तिक दाव्यांची नोंद सातबारा उताऱ्यावर करण्यात यावी, यासाठी जिल्हाधिकारी तलाठ्यांना स्पष्ट सूचना देतील.
त्यानंतर संबंधित नोंदी अधिकृतरित्या सातबाऱ्यात दाखल होतील.

वनहक्क दावे मंजूर करण्याच्या प्रक्रियेकडे शासनाकडून अपेक्षित गांभीर्याने पाहिले गेलेले नाही. मात्र या गंभीर आणि आदिवासी समाजाच्या उपजीविकेसाठी अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाबाबत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. याआधीही त्यांनी पुणे जिल्ह्यातील प्रलंबित वनहक्क दाव्यांबाबत विभागीय आयुक्तांशी पत्रव्यवहार करून अनेक प्रकरणे मार्गी लावली आहेत.

आता जिल्हाधिकाऱ्यांबरोबर थेट बैठक घेऊन खासदार कोल्हे यांनी पुनश्च पुढाकार घेतला असून, लवकरच सर्व प्रलंबित प्रकरणे निकाली निघून आदिवासी बांधवांना त्यांचे हक्काचे वनहक्क मिळतील, अशी आशा विभागीय वनहक्क समितीचे सदस्य किरण लोहकरे यांनी व्यक्त केली आहे.

थोडक्यात:

  • प्रलंबित ४४ दावे निकाली काढण्यासाठी लवकरच उपविभागीय व जिल्हास्तरीय बैठका
  • ६६ आदिवासी गावांनी सामूहिक दावे तात्काळ दाखल करावेत
  • मंजूर दाव्यांची सातबाऱ्यावर नोंद करण्यासाठी जिल्हाधिकारी स्तरावर कार्यवाही
  • खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा सातत्यपूर्ण पुढाकार आणि सकारात्मक वाटचाल

पाचोरा येथील उपोषणाचा खरा चेहरा किशोरआप्पांनी सखोल चौकशीला संधी द्यावी

0

Loading

पाचोरा — मुंबईतील उपोषणाच्या निमित्ताने पाचोरा मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. सामाजिक कार्यकर्ते हरीभाऊ पाटील यांनी उपोषणात दोन प्रमुख मागण्या मांडत उपोषणास सुरुवात केली
१) पाचोरा शहरातील अवैध धंदे बंद करावेत आणि पोलीस निरीक्षक अशोक पवार यांची बदली करावी
२) पाचोऱ्यात पत्रकारांवर दाखल गुन्हे रद्द करण्यात यावेत
या दोन्ही मागण्या पाहता, त्या सामाजिक भानातून आणि लोकहिताच्या दृष्टिकोनातून घेतलेल्या वाटतात. पण, जेव्हा आपण थोडं खोलात जातो, तेव्हा यामागचा खरा आशय आणि हेतू अधिक गहिरा व गुंतागुंतीचा वाटू लागतो. उपोषण हे लोकशाहीतील प्रभावी अस्त्र असले तरी त्यामागची पार्श्वभूमी आणि प्रेरणा योग्य आहे का, याचाही तितकाच गांभीर्याने विचार झाला पाहिजे.
अवैध धंद्यांवर कारवाई की ‘व्यवस्था’ टिकवण्याचा प्रयत्न? “पाचोरा शहरातील अवैध धंदे बंद करावेत” – ही एक रास्त आणि लोकहिताची मागणी आहे. मात्र, या मागणीला तात्पुरती संमती देताना जेव्हा अशा अवैध धंद्यांची माहिती तपासली जाते, तेव्हा दिसते की अवैध धंदे सुरू आहेत म्हणुन संबंधित पोलीस निरीक्षक यांची बदली करणे हा प्रकार कितपत योग्य आहे आणि महाराष्ट्रच नव्हे तर देशभरात पाचोरा शहरा पेक्षाही भयंकर अवैध धंदे यांनी थैमान घातले आहे हे कोणाच्या आर्शिवादाने हे नव्याने सांगण्याची गरज नाही परंतु पाचोरा शहरात जे जुगार, चक्री व्यवहार यांचे जाळे शहरात पसरलेले आहे. त्याची सत्यता देखील महत्वाची आहे
विशेष म्हणजे शहरातील कोण ते तथाकथीत पत्रकार होते की त्याच्या घरी झालेल्या काही आठवड्यांपूर्वी एका बैठकीत चक्री जुगारासाठी दरमहा “७० चक्री × १००० रुपये = ७०,००० रुपये” या स्वरूपात ठराविक रक्कम देऊन चक्री धंदे सुरू ठेवण्याचा ठराव करण्यात आला होता. आधी “चक्री बंद करा” अशी मागणी त्यांनीच केली आणि नंतर त्यांनीच “चक्री सुरू करा” असा विरोधाभासी पाठपुरावा करणे हे नक्कीच संशय निर्माण करणारे आहे
ही मागणी मग खरोखर अवैध धंद्यांवर रोष आहे की त्यावरचे नियंत्रण एखाद्या गटाच्या हातात ठेवण्याचा प्रयत्न आहे, हा सवाल उपस्थित होतो.
हरीभाऊंच्या उपोषणात समाविष्ट असलेल्या काही व्यक्तींवर पत्रकार असल्याचा दावा करण्यात येतो. पण त्यांच्या नावे कोणतीही अधिकृत ओळखपत्रे अथवा मान्यताप्राप्त पत्रकार संस्थांची सदस्यता नसल्याचे दिसून येते. उलटपक्षी,सोशल मीडियावरून अनेक वेळा सामान्य नागरिक, व्यापारी, महिला यांना धमकावणाऱ्या ब्लॅकमेलरच्या पोस्ट केल्या गेल्याचे स्पष्ट पुरावे उपलब्ध आहेत. “ब्रेकिंग न्यूज”च्या नावाखाली खंडणी वसूल करण्याचे प्रकारही समोर आले आहेत. त्याहून गंभीर म्हणजे, आपलेच सत्ताधारी असलेले पाचोरा नगर परिषदेच्या सन्मानीय उपनगराध्यक्षां विरोधात “फेक ब्रेकिंग” प्रसिद्ध केल्याचे धाडसही याच व्यक्तींकडून झाल्याची घटना विसरून चालणार नाही
या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा आणि वादग्रस्त मुद्दा म्हणजे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांची बदली. उपोषणकर्त्यांनी त्यांच्यावर आरोप करत बदलीची मागणी केली आहे. पण या मागील काही आठवड्यांतील घटनाक्रम पाहता, या मागणीमागे वैयक्तिक आकस आणि प्रस्थ असलेल्या गटांच्या फायद्याचा संबंध असल्याचे संकेत मिळतात. १४ जून रोजी सोशल मीडियावर पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या विरोधात अत्यंत खालच्या पातळीचे, वैयक्तिक आणि निंदनीय लिखाण करण्यात आले. हे विसरून व बघितल्या शिवाय चालणार नाही पोलीस निरीक्षकांवर अविश्वास दाखवण्यामागे काय कारण आहे हे समजून न घेता केवळ एका बाजूच्या आवाजावर बदलीची कारवाई करण्याची घाई धोकादायक ठरू शकते. अशोक पवार यांच्याविरोधात कोणतीही ठोस चौकशी न करता फक्त “प्रचाराच्या आवाजावर” निर्णय घेतला गेला तर भविष्यात चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनाही अशा पोटभरू ब्रेकींग वाल्यांच्या दबावाखाली पाचोर्‍यात झुकावं लागेल, ही शंका उभी राहते.
वास्तवीक माझ्या सहभागाबाबतही संभ्रम निर्माण केला जात आहे. 15 जुन रोजी दाखल झालेल्या गुन्ह्यात मी १९ जूनपर्यंत फक्त बघ्याची भूमिका घेतली होती. बातमी सुद्धा लावली नव्हती परंतु त्याच दिवशी एका विवाह सोहळ्यात माझ्या अनुपस्थितीत माझ्याबाबत आमदार किशोरआप्पा समर्थकां समोर अपशब्द वापरण्यात आल्याचे कळल्यानंतर मी प्रत्यक्षात या विषयात सक्रीय झालो.
२० जूनपासून मी या प्रकरणात उघडपणे भूमिका घेतली कारण माझ्या नावाचा चुकीचा संदर्भ देऊन या गटाने आमदारांविरोधात उभे राहण्याचा प्रयत्न केला. खरंतर माझा पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्याशी कोणताही वैयक्तिक संबंध नाही, ना माझे कुठलेही अवैध धंदे आहेत. पण सत्य दडपले जाऊ नये म्हणून मी हे मांडणे आवश्यक समजले.
या प्रकरणात फक्त बाहेरचे गट नाहीत, तर पोलीस यंत्रणेमध्ये असलेली गटबाजीही तितकीच जबाबदार आहे. राहुल शिंपी नावाच्या कर्मचाऱ्यावर पोलिस निरीक्षकांचा अंधविश्वास व त्यातून निर्माण होणारे आंतरिक मतभेद प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर परिणाम करत आहेत. त्यामुळे निश्चितच पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांची बदली होणे ही काळाची गरज आहे परंतु अशा स्वरूपातील आरोपात व अशा वेळी बदली होणे अयोग्य आहे आणि कोणत्याही प्रशासकीय अधिकारी याचे मनोबल खचणारी आहे ही बाब लक्षात न घेता केवळ एका गटाच्या म्हणण्यानुसार पोलीस निरीक्षक यांना बदलणे म्हणजे कारभाराला राजकीय साखळीने गुंडाळणे होय. यापूर्वी वाळू माफियांविरोधात ‘ब्रेकिंग न्यूज’च्या नावाने आवाज उठवणाऱ्या ब्रेकींग किंगला हप्ते मागणीच्या वादातुन पुनगाव रोड साई प्रोव्हिजन समोर जाहीर धुलाई झाली होती तेव्हा आठ दिवस घरातच अंबीहळद लावत उपचार केले तेव्हा कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल का? करण्यात आला नाही किंवा केला नाही तथाकथीत पत्रकार संघटनेने व त्याच्या हितचिंतकांनी त्यावेळी का आवाज उठविला नाही एवढे मात्र निश्चित त्यानंतर कोणत्याही वाळू विषयक बातम्यांचे ब्रेकिंग आले नाही हे निश्चित हाच त्यांच्या शैलीचा ‘पॅटर्न’ म्हणता येईल.
सन्माननीय आमदार आप्पासाहेब, आपण मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आहात. त्यामुळे न्याय्य मागण्या ऐकून घेणे व कोणत्याही निर्णयाआधी सत्याची पारख करणे ही आमदार साहेबांना हात जोडून विनंती आहे तसेच त्या मागण्यांमागे कोणाचे – कोणते हितसंबंध आहेत पडद्यामागे काय दडले आहे, हेही समजून घेणे तितकेच गरजेचे आहे.
माझी नम्र मागणी आहे की माझा या प्रकरणाशी नेमका काय संबंध आहे, हे समोरा-समोर मला स्पष्टपणे मांडू द्या पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्याविरोधातील पोस्ट्सची आणि माझ्याविरोधात वापरलेली भाषा तपासणी करणे हे देखील महत्वाचे आहे खरोखर कोण समाजहितासाठी काम करत आहे आणि कोण स्वतःच्या स्वार्थासाठी हे शस्त्र वापरत आहे, हे समोर यावे यासाठी मी आपले गैसमज करणाऱ्यां समोरा – समोर येण्यास तयार आहे कारण, अन्याय करणाऱ्यांपेक्षा अन्याय सहन करणारा अधिक दोषी असतो –
आणि त्या दोषातून सुटका फक्त सत्याच्या बाजूने उभं राहिल्यानेच होऊ शकते!

विरोधकांना हादरा देणारा निर्णय! आज मुंबईत शेकडो महिला किशोरआप्पा पाटील यांच्या नेतृत्वात शिंदे गटात दाखल होणार

0

Loading

पाचोरा / मुंबई, प्रतिनिधी – पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे तडफदार व हॅट्रिक आमदार किशोरआप्पा पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघात एकाही विरोधकाला उभं राहू न देण्याचा निश्चयच केला असून, त्या दिशेने पावलं टाकण्यास सुरुवातही केली आहे. पुरुष नेते व कार्यकर्त्यांच्या सातत्याने होणाऱ्या पक्षप्रवेशांनंतर आता महिला कार्यकर्त्यांनीही त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत एकत्रितपणे मोठा निर्णय घेतला आहे. आज मुंबईत पार पडणाऱ्या एका विशेष समारंभात शेकडो महिला किशोरआप्पा पाटील यांच्या नेतृत्वात शिवसेना (शिंदे गटात) प्रवेश करणार असून, हा प्रवेश सोहळा विरोधकांसाठी मोठा धक्का ठरणार आहे.राजकीय क्षेत्रात नेहमी सक्रिय असलेल्या किशोरआप्पा पाटील यांनी मतदारसंघात आपली राजकीय पकड इतकी मजबूत केली आहे की, आज विरोधी पक्षांचे अनेक नेते आणि कार्यकर्ते थेट त्यांच्या गटात प्रवेश करत आहेत. विशेष बाब म्हणजे आज मुंबईत होणारा हा महिला पक्षप्रवेश सोहळा ही केवळ औपचारिकता नसून, त्यामागे एक मोठी रणनीती कार्यान्वित होत आहे. या प्रवेश सोहळ्यात सहभागी होणाऱ्या महिलांमध्ये पाचोरा, भडगाव तालुक्यांतील अनेक अनुभवी आणि स्थानिक नेतृत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला आहेत. त्यामध्ये सामाजिक कार्यकर्त्या, स्वयंसहायता बचत गटांच्या प्रमुख, महिला मंडळांच्या अध्यक्षा, ग्रामपंचायत सदस्य, विविध महिला संघटनांतील पदाधिकारी यांचा समावेश आहे.
या पक्षप्रवेशासाठी मुंबई गाठलेल्या महिलांनी आपली भूमिका स्पष्ट करत सांगितलं की, “वर्षानुवर्षे आम्ही विरोधी पक्षांच्या पाठीशी उभ्या राहिलो, मात्र केवळ आश्वासनं, फोटोसेशन्स आणि निवडणुकीपुरतं मत मागणं यापलीकडे आम्हाला काही मिळालं नाही. पण किशोरआप्पा पाटील यांच्या नेतृत्वात आम्हाला समर्पित काम, सक्रिय सहभाग आणि समस्यांवर उपाय दिसतोय. म्हणूनच आज आम्ही हा निर्णायक टप्पा पार करत आहोत.”
या महिला कार्यकर्त्यांच्या प्रवेशाचे स्वागत करताना आमदार सुपूत्र सुमीत किशोरआप्पा पाटील यांनी आधीच स्पष्ट केलं आहे की, “राजकारणात महिलांना फक्त मोर्चा काढण्यासाठी किंवा नावे देण्यासाठीच वापरलं जातं हे चित्र आप्पासाहेबांमुळे बदलणार आहे. महिलांना निर्णय प्रक्रियेत, राजकीय भूमिका घेण्यासाठी आणि मतदारसंघाच्या विकासात खऱ्या अर्थाने सहभागी करणार आहे.” आप्पासाहेबांनी यापूर्वीही महिला विषयक अनेक ठोस निर्णय घेतले आहेत. उदाहरणार्थ – महिला उद्योग मोहीम, बचत गटांना विशेष कर्ज सुविधा, अंगणवाडी सक्षमीकरण, जिल्हा परिषद शाळांमधून मुलींच्या सुरक्षेसाठी उपाययोजना – या सर्वांमुळे किशोरआप्पा पाटील यांच्यावर ग्रामीण महिला वर्गाचा विशेष विश्वास निर्माण झाला आहे.
आज मुंबईत होणाऱ्या या पक्षप्रवेश सोहळ्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना उपनेते, मुंबईचे प्रमुख समन्वयक, तसेच मंत्रीगण उपस्थित राहणार आहेत. विशेष बाब म्हणजे, हा कार्यक्रम किशोरआप्पा पाटील यांच्या विशेष पुढाकारातून आयोजित करण्यात आला असून, त्याला राज्यभरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. या कार्यक्रमात प्रवेश घेणाऱ्या महिला पुढील नावीन्यपूर्ण भूमिकेसाठी तयार असून, त्यांना स्थानिक पातळीवर संघटन, प्रचार व निवडणूक व्यवस्थापन या आघाड्यांवर जबाबदारी दिली जाणार आहे. या प्रस्तावित पक्षप्रवेशाच्या चर्चांमुळेच विरोधी पक्षांमध्ये आतापासूनच अस्वस्थता पसरली आहे. काही नेत्यांनी आतापर्यंतच्या महिला सहकाऱ्यांना समजवण्याचे प्रयत्न सुरू केले असले तरी महिला वर्गाने स्पष्ट भूमिका घेतल्यामुळे त्यांच्या हातातून नेतृत्व निसटत असल्याचं चित्र तयार झालं आहे. राजकारणात महिला कार्यकर्त्या हे प्रचार यंत्रणेचा एक महत्त्वाचा भाग असतात. त्यांचा गट गमावणं म्हणजे मैदानात तोंड देणं अधिक कठीण होणं – याची कल्पना आता विरोधी नेत्यांना यायला लागली आहे. किशोरआप्पा पाटील यांची सध्याची रणनीती ही केवळ आगामी निवडणूक जिंकण्यापुरती नाही, तर त्यांनी विरोधकांचा राजकीय पाया हादरवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पुरुष कार्यकर्त्यांनंतर महिला नेतृत्वाकडे जाण्याचा त्यांचा प्रयत्न ही भविष्यातील राजकीय संधी अधिक मजबूत करण्याची पावलं आहेत.
या प्रवेशानंतर स्थानिक स्वराज्य संस्था, महिला मंडळ, गावपातळीवरचा संवाद, प्रचार व्यवस्था, सार्वजनिक कार्यक्रम यामध्ये महिलांचा प्रभावी सहभाग दिसणार आहे
आजचा होणारा शेकडो महिलांचा शिंदे गटात प्रवेश सोहळा हा फक्त एक कार्यक्रम नाही, तर हे एका नव्या राजकीय पर्वाची सुरुवात आहे. किशोरआप्पा पाटील यांच्या नेतृत्वाने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की, ते केवळ निवडणुकीसाठी नव्हे, तर समाजातील प्रत्येक घटकाला बरोबर घेऊन चालण्यासाठी झटणारे नेते आहेत. राजकीय क्षेत्रात महिला सशक्तीकरणाच्या दिशेने पडणारे हे पाऊल विरोधकांसाठी मोठा धक्का ठरणार असून, येणाऱ्या काळात अधिक महिलांचा सहभाग आणि आणखी गटांचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शिवाज्ञा गोविंदा पथकाच्या सरावास उत्साहात शुभारंभ!

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : देशभरात उत्साहाने साजऱ्या होणाऱ्या जन्माष्टमीच्या सणात महाराष्ट्रातील दहीहंडी उत्सवाला खास महत्त्व आहे. विशेषतः मुंबईतील गोविंदा पथकांनी या उत्सवाला नवा झगमगता चेहरा दिला आहे. अशाच मुंबईतील अग्रगण्य आणि मानाच्या पथकांपैकी एक म्हणजे वांद्रे-खार-सांताक्रुझ विभागातील “शिवाज्ञा गोविंदा पथक”. हे पथक गेली ७ वर्षे सातत्याने विविध मानाच्या दहीहंडीमध्ये सहभागी होत असून, थर लावून दहीहंडी फोडण्यात आघाडीवर राहिले आहे.

“परंपरेशी नाळ जपणारे, संस्कृतीशी नातं टिकवणारे, आणि एकजुटीने थर लावणारे – शिवाज्ञा गोविंदा पथक!” या पथकाची स्थापना सन २०१७ मध्ये सन्मानीय रुपेश मालुसरे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. पथकातील बाळगोपाळांनी कठोर मेहनत, सातत्य आणि शिस्तीतून हे पथक नावारूपाला आणले आहे. अनेक चढ-उतारांना तोंड देत त्यांनी आपली वाटचाल यशस्वीपणे चालू ठेवली. यंदा ८व्या वर्षात पदार्पण करत, दहीहंडी सरावाला श्रीफळ वाढवून औपचारिक सुरुवात श्री. मालुसरे यांच्या शुभहस्ते करण्यात आली.

वांद्रे पूर्व विधानसभा क्षेत्रात शिवाज्ञा पथकाने स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण केले असून, या पथकावर अनेक लहान-मोठ्या गोविंदा पथकांचा विश्वास आहे. त्यामुळे खार, वांद्रे व सांताक्रुझ परिसरातील अन्य पथकांनीही या संघात सहभाग घेतला आहे. रोजगार, शिक्षण आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळताना आज अनेक पारंपरिक पथके मागे पडताना दिसतात. मात्र, शिवाज्ञा गोविंदा पथकाने ही परंपरा टिकवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत उत्सवप्रियतेचा उत्साही धागा जपला आहे.

या वर्षीच्या तयारीसाठी सर्व सदस्य जोमाने सरावास सज्ज झाले आहेत. एकजुटीचा, टीमवर्कचा आणि सांस्कृतिक वारशाचा उत्तम मिलाफ या पथकात पाहायला मिळतो. हे पथक केवळ दहीहंडीपुरतं मर्यादित नसून, सामाजिक ऐक्य, संस्कृती आणि युवकांचे संघटन यासाठीही ते एक प्रेरणास्थान बनले आहे.

मुख्याध्यापिका रंजना कोळवणकर यांना पीएच.डी. पदवी प्रदान

0

Loading

विरार (गुरुदत्त वाकदेकर) : श्रीमती तारामाई वर्तक मेमोरियल अकॅडमी (CBSE), विरार यांच्या मुख्याध्यापिका श्रीमती रंजना कोळवणकर यांना मुंबई विद्यापीठाकडून विद्यावाचस्पती (Ph.D.) ही पदवी सन्मानाने प्रदान करण्यात आली आहे. ही पदवी त्यांनी “A Study of Essential Teaching Skills of 21st-Century In-Service Teachers at Primary Level” या विषयावर प्रबंध सादर करून प्राप्त केली आहे.

गेल्या ८ वर्षांपासून CBSE बोर्डाच्या मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. रंजना कोळवणकर यांना मुंबई विद्यापीठाच्या डी.एल.एल.इ. विभागाचे डॉ. कुणाल जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. शिक्षणाच्या आधुनिक गरजा आणि २१व्या शतकातील प्राथमिक शिक्षकांची कौशल्ये या संदर्भातील त्यांचा अभ्यास प्रबंध अभ्यासकांसाठी दिशादर्शक ठरणारा आहे.

या यशामागे आगाशी विरार अर्नाळा शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, डॉक्टर रंजना यांचे कुटुंबीय, शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांचे मोलाचे सहकार्य लाभले. याबद्दल डॉ. कोळवणकर यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले. तसेच शोध निबंधासाठी माहिती संकलन करताना विरार परिसरातील विविध शाळांचे मुख्याध्यापक यांनी दिलेली मदतही त्यांनी कृतज्ञतेने नमूद केली आहे.

डॉ. रंजना कोळवणकर यांच्या या शैक्षणिक यशामुळे तारामाई वर्तक विद्यालयाच्या आणि विरार परिसराच्या शैक्षणिक क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण झाला असून, त्यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

इंग्लंडचा ऐतिहासिक पाठलाग! पहिल्या कसोटीत भारताला पराभवाचा धक्का

0

Loading

लीड्स (गुरुदत्त वाकदेकर) : कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडने इतिहास रचत भारतावर पाच विकेट्सनी सनसनाटी विजय मिळवला. डकेटच्या भेदक शतकासह क्रॉली व रूट यांच्या अर्धशतकांच्या बळावर ३७१ धावांचे लक्ष्य सहज पार करत इंग्लंडने पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत १–० अशी आघाडी घेतली.
या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने पहिल्या डावात ४७१ धावांची दमदार मजल मारली. इंग्लंडने प्रत्युत्तरादाखल ४६५ धावा करत भारताला केवळ ६ धावांची लहानशी आघाडी दिली. दुसऱ्या डावात भारतीय संघ ३६४ धावांवर तंबूत परतला आणि इंग्लंडपुढे ३७१ धावांचे लक्ष्य उभे राहिले.
पाचव्या दिवशी इंग्लंडने २१/० पासून सुरुवात केली आणि भारताच्या गोलंदाजांना पहिल्या सत्रात यश मिळू दिले नाही. जॅक क्रॉली (६५) आणि बेन डकेट (१४९) यांनी पहिल्या विकेटसाठी १८८ धावांची भागीदारी करून विजयाचे मजबूत पायाभरणी केली. दुसऱ्या सत्रात भारताने चार गडी बाद केले, पण रूट (५३) आणि जेमी स्मिथ (४४) यांनी संयमी फलंदाजी करत इंग्लंडला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.
भारताच्या गोलंदाजांनी दुसऱ्या डावात अपेक्षित धार दाखवली नाही. पहिल्या डावात पाच बळी घेणारा जसप्रीत बुमराह दुसऱ्या डावात एकही विकेट मिळवू शकला नाही. प्रसिद्ध कृष्णा आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले, तर रवींद्र जडेजाने एक विकेट मिळवली.
या सामन्यात भारतीय संघ रोहित शर्मा आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या विराट कोहली यांच्या अनुपस्थितीत खेळत होता. शुभमन गिलकडे नेतृत्व सोपवण्यात आले, मात्र त्याच्या कर्णधारपदाच्या सुरुवातीलाच पराभवाचा तडाखा बसला. भारताची खालची फळी दोन्ही डावांत अपयशी ठरली आणि गोलंदाजीसुद्धा निर्णायक क्षणी प्रभावहीन ठरली.
या पराभवामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (२०२५–२७) नव्या चक्रात भारताची सुरुवात निराशाजनक ठरली आहे. भारत गुणतक्त्यामध्ये चौथ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, लीड्समध्ये विजय मिळवलेल्या इंग्लंडच्या खात्यात १२ गुण असून, १०० टक्के गुण टक्केवारीसह ते अव्वल स्थानी आहेत. बांगलादेश व श्रीलंका अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानी आहेत.
आता भारतासमोर तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीतील दुसऱ्या कसोटीचे आव्हान आहे, जी बर्मिंगहॅम येथे खेळली जाणार आहे. भारत पुनरागमन करू शकेल का? ही लढत निर्णायक ठरणार असून, सर्वांचे लक्ष त्या सामन्यावर लागले आहे.

24 जून 2025 चे सर्व राशीचे भविष्य शुभ अंक व कलर

0

Loading

मेष: आज एखाद्या नव्या जबाबदारीची सुरुवात होईल. जोडीदाराशी सौहार्दपूर्ण संवाद साधाल. आर्थिक क्षेत्रात अचानक फायदा होण्याची शक्यता आहे. जुने मित्र भेटतील. शुभ अंक: ३, शुभ रंग: तांबडा

वृषभ: घरगुती वातावरणात समाधान मिळेल. एखाद्या वरिष्ठ व्यक्तीकडून कौतुक होईल. खर्चावर थोडे नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. तब्येतीकडे दुर्लक्ष नको. शुभ अंक: ६, शुभ रंग: क्रीम

मिथुन: नवीन योजना मनात येतील व अंमलातही येतील. मैत्रीच्या नात्यांत पारदर्शकता ठेवा. विद्यार्थ्यांना यशाचे संकेत आहेत. प्रवासाचे योग आहेत. शुभ अंक: ५, शुभ रंग: हिरवा

कर्क: कुटुंबात काही महत्त्वाचे निर्णय घेतले जातील. आज मन स्थिर राहील. काही जुनी चिंता दूर होईल. गुंतवणुकीसाठी योग्य दिवस नाही. शुभ अंक: २, शुभ रंग: पांढरा

सिंह: व्यवसायिकांसाठी लाभदायक दिवस. सृजनात्मक कामांना उत्तेजन मिळेल. वरिष्ठांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरेल. अहंकार टाळा. शुभ अंक: १, शुभ रंग: सोनेरी

कन्या: कसोटीचे क्षण येतील पण संयम ठेवावा लागेल. प्रेमसंबंधात पारदर्शकतेची गरज. कामांमध्ये अडथळे येतील पण धीर बाळगा. शुभ अंक: ४, शुभ रंग: राखाडी

तुला: मनात कल्पनांची गुंफण होईल, लिखाण व कला क्षेत्रातील व्यक्तींना उत्तम संधी. पैशाच्या बाबतीत थोडे सावध राहा. नवे करार होतील. शुभ अंक: ७, शुभ रंग: गुलाबी

वृश्चिक: भावनिक निर्णयांपेक्षा वास्तव पाहून निर्णय घ्या. एखादे जुने नातं पुन्हा उबदार होईल. उत्पन्नात थोडी वाढ अपेक्षित. शुभ अंक: ९, शुभ रंग: जांभळा

धनु: परदेशाशी संबंधित गोष्टींमध्ये यश येईल. शैक्षणिक क्षेत्रात भरघोस प्रगती. पण वाणीवर नियंत्रण ठेवा. वडीलधाऱ्यांचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. शुभ अंक: ८, शुभ रंग: केशरी

मकर: कामात परिश्रमाच्या तुलनेत यश मिळेल. मानसिक शांततेसाठी ध्यानधारणा उपयुक्त. आर्थिक कामात स्थैर्य राखा. शुभ अंक: १०, शुभ रंग: काळा

कुंभ: मित्रांच्या सहकार्याने प्रलंबित कामे पूर्ण होतील. घरगुती खर्च वाढेल. कोणताही निर्णय घेताना भावनांवर नाही, तर विवेकावर विसंबा. शुभ अंक: ११, शुभ रंग: निळा

मीन: आजचा दिवस आध्यात्मिक उन्नतीसाठी योग्य. मनातले द्वंद्व कमी होईल. जोडीदाराशी मतभेद शक्य, संवाद ठेवा. शुभ अंक: १२, शुभ रंग: फिकट पिवळा

दि पाचोरा पिपल्स संचालकपदी बिनविरोध निवडीने विकास वाघ कुटुंबाचा सातत्याने जनसेवेत ठसा

0

Loading

पाचोरा – शहरातील सामाजिक, राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या वाघ कुटुंबाच्या जनसेवेच्या परंपरेला आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. दि पाचोरा पिपल्स को-ऑप. बँकेच्या संचालक मंडळावर अनुसूचित जमाती (NT) प्रवर्गातील एकमेव अर्जदार म्हणून आल्याने विकास वाघ यांची बिनविरोध निवड झाली आहे. ही निवड म्हणजे त्यांच्या समाजकार्याला, पारदर्शक व प्रामाणिक व्यवस्थापन कौशल्याला मिळालेली साक्ष आहे, तसेच ही निवड त्यांच्या वैयक्तिक लोकप्रियतेचा आणि कार्यक्षमतेचा ठोस पुरावा आहे. विकास वाघ हे पाचोरा शहरातील एक अत्यंत प्रतिष्ठित आणि जनमानसात रुजलेले नाव आहे. त्यांच्या कुटुंबाचा व्यवसाय तब्बल ७१ वर्षांपासून दुग्धजन्य पदार्थांच्या व्यापाराशी निगडीत आहे. दूध, दही, तूप अशा पारंपरिक व्यापारात सातत्य आणि गुणवत्ता यामुळे या घराण्याने पाचोऱ्यात विश्‍वासार्हता निर्माण केली आहे. स्व. अण्णासाहेब ज्ञानेश्वर वाघ यांच्यापासून सुरू झालेला हा व्यवसाय केवळ आर्थिक उत्पन्नाचे साधन न राहता जनतेशी जुळलेली नाळ बनला.
स्व. अण्णासाहेब वाघ हे पाचोरा नगरपालिकेचे माजी नगर उपाध्यक्ष होते. त्यांनी त्यांच्या काळात प्रामाणिकपणे प्रशासनात सहभाग घेतला आणि नगर विकासाच्या दिशेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या कार्याची प्रेरणा घेत विकास वाघ यांनीही आपले पाऊल सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात टाकले आणि त्या वाटचालीत उल्लेखनीय ठसा उमटविला. विकास वाघ यांनी यापूर्वी ॲड अतुलभाऊ संघवी यांच्या नेतृत्वाखाली दहा वर्षे पाचोरा पिपल्स को-ऑप. बँकेच्या संचालक पदावर यशस्वी कार्यकाळ पूर्ण केला आहे. त्या काळात अतुलभाऊ संघवी यांच्या नेतृत्वात त्यांनी बँकेच्या आर्थिक व्यवहारात पारदर्शकता, ग्राहकाभिमुख धोरणे, आणि योजनांमध्ये गरीब व मध्यमवर्गीय वर्गाला केंद्रस्थानी ठेवले. अतुलभाऊ संघवी यांच्या नेतृत्वात बँकेची विकासदरांची चढती कमान, ग्राहकांमध्ये असलेला विश्‍वास आणि आर्थिक धोरणातील प्रामाणिक दृष्टीकोन यामुळे त्यांना पुन्हा एकदा बिनविरोध निवड मिळवता आली. अनुसूचित जमाती (NT) प्रवर्गातील ही जागा केवळ नाममात्र आरक्षण नसून वंचित समाजातील प्रतिनिधित्वाचे प्रतीक आहे. विकास वाघ यांचा सामाजिक सुसंवाद, सर्वपक्षीय सौहार्द आणि स्वच्छ प्रतिमा यामुळे या जागेसाठी कोणीही दुसरा उमेदवार न उभा राहिल्याने ही निवड बिनविरोध झाली. निवडणूक प्रक्रियेतून जनतेने पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास टाकला आहे, हे या निवडीमागचे खरे यश मानले जात आहे. विकास वाघ हे केवळ आर्थिक संस्था किंवा बँकेपुरते मर्यादित नाहीत, तर त्यांचा सामाजिक व राजकीय सहभागही अत्यंत व्यापक आहे. त्यांच्या घराण्याचा राजकीय वारसा हेच त्यांच्या नेतृत्वगुणांचे मूळ मानले जाते. त्यांचे भाऊ किरण वाघ यांच्या पत्नी सौ. आशा वाघ व रवींद्र वाघ यांच्या पत्नी सौ. मंगला वाघ या दोघी पाचोरा नगरपालिकेच्या नगरसेविका होत्या. या महिलांनी त्यांच्या कार्यकाळात महिला सबलीकरण, नागरी सुविधा, आणि परिसर विकासावर विशेष भर दिला. या पार्श्वभूमीवर विकास वाघ यांचे राजकीय कार्यही लक्षणीय आहे. त्यांनी पाचोरा शिवसेना शहरप्रमुख पद भूषवले असून, तेव्हा त्यांनी शहराच्या विविध प्रश्नांवर ठाम भूमिका घेतली होती. पुढे पाचोरा शेतकरी सहकारी संघाचे व्हा. चेअरमन म्हणून त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी वेगवेगळ्या योजना राबविल्या. तरुणांमध्ये राजकीय जागृती निर्माण करण्यासाठी त्यांनी NSUI शहरप्रमुख तसेच युवक काँग्रेस प्रदेश सचिव म्हणून कार्य केले.
या सर्व पदांवर कार्य करत असताना त्यांनी कोणत्याही पक्षाच्या काठी टेकून नव्हे, तर स्वबळावर राजकीय जम बसवला. सर्वसामान्य जनतेशी सतत संपर्क ठेवणारा, गरजूंना तत्परतेने मदत करणारा आणि कोणत्याही पदाच्या हव्यासाशिवाय काम करणारा नेता म्हणून त्यांची प्रतिमा समाजात तयार झाली आहे. विकास वाघ यांचे नेतृत्वगुण हे त्यांच्याकडील वैयक्तिक नम्रता, निर्णयक्षमता आणि संघटनशक्तीवर आधारित आहेत. बँकेच्या प्रशासनात अतुलभाऊ संघवी यांच्या नेतृत्वात ज्या प्रकारे नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला, आर्थिक शिस्तीचे पालन केले आणि कर्जवसुलीचे प्रमाण वाढवले, त्यातून त्यांची व्यवस्थापन कौशल्ये अधोरेखित होतात. ते आपल्या सहकाऱ्यांसोबत मैत्रीपूर्ण संवाद ठेवतात आणि कोणताही निर्णय एकतर्फी न घेता सर्वांच्या सल्ल्याने घेतात, ही त्यांची खासियत आहे. अत्यंत नम्र स्वभाव, हसतमुख चेहरा, पण वेळ आली की कठोर निर्णय घेण्याची धमक असलेले श्री संघवी यांचे नेतृत्व पाचोऱ्याच्या राजकीय आणि आर्थिक क्षेत्रासाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे.
विकास वाघ हे सामाजिक कार्यातही अग्रणी आहेत. शैक्षणिक मदत, वैद्यकीय मदत, आपत्कालीन सहाय्य अशा अनेक गोष्टींसाठी ते नेहमी पुढे असतात. त्यांचा ‘कुठल्याही कार्यक्रमाचा मुख्य पाहुणा नव्हे, तर कार्यकर्ताच’ हा दृष्टिकोन त्यांना जमिनीवरचे नेतृत्व देतो. पाचोरा शहरात विविध धार्मिक उत्सव, सामाजिक उपक्रम आणि आपत्ती काळातील मदत कार्यात त्यांचा हातभार असतो. पाचोरा पिपल्स बँकेच्या पुढील पाच वर्षांच्या कार्यकाळात विकास वाघ यांच्याकडून ग्राहकांमध्ये डिजिटल व्यवहाराचा प्रसार, शेतकरी कर्ज वाटपातील पारदर्शकता, महिला बचतगटांना सहकार्य, तसेच ग्रामीण शाखांमध्ये बँकेच्या विस्ताराची अपेक्षा आहे. बँकेची सेवा सर्वसामान्यांच्या दारापर्यंत पोहचवण्याची आणि तिचा उपयोग समाजाच्या खऱ्या गरजांसाठी करण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. विकास वाघ यांची दि पाचोरा पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड ही केवळ निवडणूक यश नसून, त्यांच्यावरील समाजाच्या विश्वासाची पुनरावृत्ती आहे. त्यांच्या बिनधास्त, पारदर्शक आणि कार्यक्षम नेतृत्वामुळे पाचोऱ्यातील आर्थिक आणि सामाजिक क्षेत्राला दिशा मिळते आहे. या निवडीनंतर त्यांच्यावर नव्याने जबाबदाऱ्या आल्या असून, जनतेच्या अपेक्षांना न्याय देत ते अधिक जोमाने कार्य करतील, हीच अपेक्षा.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!