Home Blog Page 74

डॉक्टरला अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत २ कोटींची मागणी

0

Loading

पाचोरा- शहर व परिसरात वैद्यकीय क्षेत्र नेहमीच एक आदर्शवत पद्धतीने कार्यरत राहिले आहे. करोना महामारीच्या काळात माणुसकी हरवलेली असताना, पाचोरा येथे तरी ग्रामीण रुग्णालय ते खेड्यापाड्यांतील डॉक्टरांनी अपार कष्ट घेऊन जनतेसाठी दिवसरात्र अहोरात्र सेवा केली. त्या काळातील त्यांच्या कार्याचा आदर आजही प्रत्येक पाचोरावासी करतो. मात्र, अशा एका आदर्श वैद्यकीय व्यवस्थेत घडलेली एक धक्कादायक घटना सध्या चर्चेचा व चिंतेचा विषय ठरत आहे. पाचोरा शहरातील एक ख्यातनाम डॉक्टर अश्लील व्हिडिओ व फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल २ कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या अज्ञात व्यक्तीच्या जाळ्यात सापडण्याचा प्रयत्न करत असल्याचे उघड झाले आहे. हे सर्व प्रकरण गंभीर असून, अशा प्रकाराला भीक न घालता या धमकीच्या पार्श्वभूमीवर संबंधित डॉक्टरने थेट पाचोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, या डॉक्टरला गेल्या चार दिवसांत दोन वेळा निनावी चिठ्ठ्यांद्वारे धमकी देण्यात आली होती. चिठ्ठ्यांमध्ये स्पष्ट शब्दांत नमूद करण्यात आले की, “तुमचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो आमच्याकडे आहेत. हे व्हायरल होऊ नयेत, तर २ कोटी रुपये द्या,” अन्यथा समाजात मानहानी होईल अशी धमकी देण्यात आली. इतकेच नाही, तर डॉक्टरच्या मोबाईलवरून देखील एक मेसेज आला होता, ज्यात लिहिले होते की, “या प्रकरणात हस्तक्षेप करू नकोस, अन्यथा परिणाम भोगावे लागतील.” या सर्व प्रकारांमुळे संबंधित डॉक्टर प्रचंड तणावात गेले. त्यांच्या सामाजिक प्रतिमेवर होणाऱ्या परिणामाची जाणीव असल्याने त्यांनी तात्काळ पाचोरा पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी तात्काळ तपास सुरू केला आहे. धमकीच्या चिठ्ठ्या ताब्यात घेण्यात आल्या असून, मोबाईल नंबरचा तपास करण्यात येत आहे. या नंबरद्वारे संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरु आहे. मात्र, अद्याप आरोपीची ओळख पटलेली नाही. पाचोरा पोलिसांकडून या गंभीर प्रकरणात अधिक तपास केला जात आहे. मात्र, एवढ्या गंभीर प्रकरणाबाबत अधिकृत प्रेस नोट प्रसिद्ध करण्यात आली नसल्याची खंत पत्रकार क्षेत्रातून व्यक्त होत आहे. ही केवळ एका डॉक्टराविरुद्धची धमकी नसून, संपूर्ण वैद्यकीय क्षेत्राला बदनाम करण्याचा हा कपटी डाव आहे पाचोरा येथील वैद्यकीय व्यवसाय बाबत सांगायचे झाले तर येथील डॉक्टर समाज हा आपल्या सेवाभावासाठी ओळखला जातो. एखाद्या वैयक्तिक कारणामुळे किंवा ब्लॅकमेलिंगसाठी जर डॉक्टरांना अशा प्रकारे लक्ष्य केले जात असेल, तर ही संपूर्ण समाजासाठी गंभीर चिंता निर्माण करणारी बाब आहे. पाचोरा शहरात आरोग्यसेवेसाठी झटणारे डॉक्टर मोठ्या निष्ठेने काम करत असताना, त्यांच्यावर अशा प्रकारे खोटे आरोप करून किंवा बनावट व्हिडीओद्वारे धमकी देणे, हा वैद्यकीय पेशाच नव्हे तर मानवतेवरही आघात आहे. या प्रकरणातील आणखी एक गंभीर बाब म्हणजे — इतकी धक्कादायक घटना घडूनही, पाचोरा पोलीस प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती प्रसारमाध्यमांना दिली गेली नाही. यामुळे पत्रकारांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. पोलिसांनी पारदर्शकपणे कार्य करून समाजाच्या मनात विश्वास निर्माण करणे गरजेचे आहे.
या घटनेनंतर पाचोरा शहरातील विविध डॉक्टर संघटना, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय प्रतिनिधी आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. अनेकांनी या प्रकाराचा निषेध नोंदवून संबंधित आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी करणे गरजेचे आहे. डॉक्टरांवर अशा प्रकारे खोटे आरोप करून किंवा धमकावून पैसे उकळण्याचे प्रकार जर रोखायचे असतील, तर संपूर्ण समाजाने एकत्र येणे आणि या प्रवृत्तींचा तीव्र विरोध करणे अत्यंत गरजेचे आहे. ब्लॅकमेलिंग हे फक्त आर्थिक गुन्हा नसून सामाजिक प्रतिष्ठेवर हल्ला करणारा गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या घटनेतील दोषींवर सायबर गुन्हे अन्वेषण विभाग, गुन्हे शाखा व अन्य विशेष पथकांकडून तात्काळ कारवाई होणे आवश्यक आहे. केवळ स्थानिक पोलीस तपास पुरेसा ठरणार नाही, कारण अशा गुन्ह्यांचे जाळे अनेक वेळा मोठ्या रॅकेटशी जोडलेले असते. या घटनेनंतर पाचोरा येथील वैद्यकीय क्षेत्रात एक भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी, शासनाने व पोलीस प्रशासनाने डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी, तसेच धमकी, ब्लॅकमेलिंग यांसारख्या गुन्ह्यांसाठी कडक कायद्यांची अंमलबजावणी करणे महत्त्वाचे आहे
पाचोरा शहरातील वैद्यकीय सेवा ही अत्यंत निष्ठावान व सेवाभावी डॉक्टरांमुळे सर्वत्र प्रसिद्ध आहे. अशा परिस्थितीत एका डॉक्टरला अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन २ कोटींची मागणी करणे, हा केवळ गुन्हा नाही तर माणुसकीचाच गळा घोटण्याचा प्रयत्न आहे. या प्रकरणात पोलिसांनी तत्काळ कारवाई करून आरोपीला अटक करावी आणि समाजात चुकीचे संदेश जाऊ नये याची दक्षता घ्यावी. समाजातील प्रत्येक घटकांनी अशा प्रवृत्तींचा निषेध करून वैद्यकीय क्षेत्राच्या प्रतिष्ठेची व सुरक्षिततेची जबाबदारी घ्यावी, हीच काळाची गरज आहे. आज दिनांक 25 जुलै रोजी सकाळी 11 वाजता पाचोरा येथील पत्रकार बांधवांच्या वतीने या घटनेचा निषेध करून पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार,प्रांताधिकारी भूषण अहिरे,पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार निवेदन देण्यात येणार आहे

“शिवकालीन रणरागिनी” या विषयावर निबंध लेखन स्पर्धा

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडात अनेक तेजस्विनी स्त्रियांनी समाज, कुटुंब, युद्धनीती, राज्यकारभार आणि संस्कृतीमध्ये अतुलनीय योगदान दिले. या स्त्रीशक्तीचा अभ्यास, जागर आणि अभिमान व्यक्त व्हावा, यासाठी “श्री शिवाजी ज्ञानपीठ (इंटरनॅशनल)” आणि “मराठी साहित्य व कला सेवा” या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने एक राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
स्पर्धेचा विषय शिवकालीन रणरागिनी असा असून निबंध पाठवण्याची अंतिम तारीख २५ ऑगस्ट २०२५ आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी, अभ्यासक, गृहिणी, लेखक आणि साहित्यप्रेमींना या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. शब्दमर्यादा १००० ते १५०० असून, स्पर्धा खुल्या गटात होणार आहे. विजेत्यांना प्रथम क्रमांकासाठी रोख रक्कम रुपये ५०००/–, द्वितीय क्रमांकासाठी ३०००/– आणि तृतीय क्रमांकासाठी २०००/– सन्मानचिन्ह आणि सर्व सहभागींना प्रमाणपत्र मुंबई येथे १५ सप्टेंबर २०२५ रोजी होणाऱ्या कार्यक्रमात देण्यात येईल. स्पर्धेची नियमावली आणि अधिक माहितीसाठी marathisahityavkalaseva@gmail.com किंवा WhatsApp क्रमांक ९९८७७४६७७६ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

“भाषेवर सक्ती नव्हे, भक्ती हवी!” — प्रा. जगदीश संसारे यांचे प्रेरणादायी व्याख्यान

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मराठी विभाग आणि बॅफी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथम वर्ष कला शाखा, प्रथम वर्ष बॅफी आणि प्रथम वर्ष बी.कॉमच्या विद्यार्थिनींसाठी मराठी भाषेवरील गोडी वाढवण्याच्या उद्देशाने एक विशेष व्याख्यान दिनांक २३ जुलै २०२५ रोजी आयोजित करण्यात आले. या व्याख्यानाचे प्रमुख वक्ते प्रा. जगदीश संसारे होते. भाषेवरील सक्तीपेक्षा भक्ती निर्माण होणे अधिक महत्त्वाचे आहे, हे सांगताना त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण आणि प्रभावी शैलीत विद्यार्थिनींना भाषेतील सौंदर्यस्थळांची सैर घडवली.

प्रा. संसारे यांनी स्पष्टपणे सांगितले की, “कोणत्याही भाषेची सक्ती महत्त्वाची नसते, तर त्या भाषेवर भक्ती निर्माण झाली पाहिजे. त्यासाठी त्या-त्या भाषेतील सौंदर्यस्थळे शोधून काढून ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली गेली पाहिजेत.” त्यांनी भाषेतील लालित्य, गोडी आणि अभिव्यक्तीची ताकद विविध उदाहरणांच्या माध्यमातून उलगडून दाखवली. त्यांच्या सुस्पष्ट उदाहरणांनी आणि ओघवत्या मांडणीनं उपस्थित विद्यार्थिनींमध्ये मराठी भाषेबद्दलचा अभिमान आणि आत्मीयता जागृत झाली.

सदर व्याख्यानाला दीडशेपेक्षा अधिक विद्यार्थिनी उपस्थित होत्या. व्याख्यानाचा प्रभाव इतका होता की शेवटी “येरे येरे पावसा तुला देतो पैसा” हे बालगीतमय गाणं सर्वांनी एकत्र गायले. विद्यार्थिनींनी आनंदाने सहभाग घेतल्याचा हा क्षण म्हणजेच या व्याख्यानाचे खरे यश म्हणावे लागेल. विद्यार्थिनींमध्ये भाषेची गोडी निर्माण होणे, हीच या उपक्रमाची सर्वात मोठी फलश्रुती ठरली.

रात्रीच्या गस्तीत सापडला घरफोडी व मोटारसायकल चोरी करणारा आरोपी; पाचोरा पोलिसांची उल्लेखनीय कारवाई

0

Loading

पाचोरा- पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात २० जुलै २०२५ रोजी रात्रीपासून २१ जुलैच्या पहाटेपर्यंत करण्यात आलेल्या नियमित गस्तीदरम्यान पोलिसांनी घरफोडीच्या तयारीत असलेल्या संशयित इसमास रंगेहाथ पकडून त्याच्याकडून चोरीचे साहित्य जप्त केले. त्यानंतर पुढील तपासादरम्यान त्याच आरोपीकडून दोन स्वतंत्र चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले असून, यामध्ये चोरीस गेलेली मोटारसायकल देखील हस्तगत करण्यात आली आहे. या कामगिरीमुळे पाचोरा पोलीस ठाण्याच्या कार्यपद्धतीवर नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. दिनांक २० जुलै २०२५ रोजी रात्री ११ वाजल्यापासून ते २१ जुलै रोजी पहाटे ५ वाजेपर्यंत पाचोरा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात रात्र गस्त सुरू होती. गस्तीदरम्यान पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे यांच्या नेतृत्वाखालील पथकात सफौ/२६५८ रणजित देवसिंग पाटील, पोहेकॉ/०६२५ राहुल काशिनाथ शिंपी, पोकॉ/१२३० योगेश सुरेश पाटील, पोकॉ/१४२२ शरद मांगो पाटील, पोकॉ/१९०७ कमलेश शांताराम पाटील, पोकों/२३३० संदीप पाटील आणि पोकॉ/१४०९ हरीष कनीराम परदेशी सहभागी होते. या पथकाने गस्तीदरम्यान पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास जारगाव चौफुली परिसरात एक इसम पोलिसांना पाहून संशयास्पद हालचाली करीत असल्याचे निदर्शनास आणले. पोलिसांनी तत्काळ दक्षता दाखवत त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे यांनी त्यास विश्वासात घेत विचारणा केली असता त्याने आपले नाव कुलदिपसिंग सतपालसिंग बावरी, वय २३ वर्षे, रा. कजगाव, ता. भडगाव, जि. जळगाव असे सांगितले. त्याच्या जवळ असलेल्या बॅगेची पोलिसांनी झडती घेतली असता, त्यात घरफोडीसाठी वापरले जाणारे विविध धारधार आणि अनकुचीदार हत्यारे जप्त करण्यात आली. यामध्ये एक लोखंडी सुरा, दोन लोखंडी चिमटे, एक लोखंडी टी-आकाराचे हत्यार आणि एक लोखंडी कात्री असा संशयास्पद साहित्य समाविष्ट होता. सदर साहित्य पाहता त्याने घरफोडीच्या उद्देशाने यांची बेकायदेशीररीत्या वाहतूक केली असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी त्यास पाचोरा पोलीस ठाण्यात आणले व त्याच्याविरुद्ध गुन्हा रजि. क्र. ३५६/२०२५ अन्वये महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १२२(क) आणि भारतीय शस्त्र अधिनियमाच्या कलम ४, २५ अन्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास पोना/३१३६ महेंद्र प्रकाश पाटील करत आहेत. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक बाब समोर आली. आरोपी कुलदिपसिंग बावरी याने काही काळापूर्वी पाचोरा तालुक्यातील लासगाव येथे मोटारसायकल चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार त्याच्याविरुद्ध पाचोरा पोलीस ठाण्यात गु. रजि. क्र. ३५८/२०२५, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२), ३ (५) अन्वये दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून ४०,००० रुपये किमतीची हिरो कंपनीची फॅशन प्रो, लाल रंगाची, क्रमांक MH-19 BV-8763 ही चोरीस गेलेली मोटारसायकल हस्तगत केली. सदर प्रकरणाचा तपास पोहेकॉ/१०५८ वसीम सलीम शेख करत आहेत. यापुढे तपास अधिक खोलवर सुरू असतानाच तिसऱ्या गुन्ह्याचाही छडा लागला. आरोपी कुलदिपसिंग बावरी याने पाचोरा शहरातील गिरणा पंपींग रोड येथील एका घरात चोरी केल्याची माहिती तपासात समोर आली. त्यानुसार त्याच्यावर पाचोरा पोलीस ठाण्यात गु. रजि. क्र. ३३७/२०२५, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०५ (अ) अन्वये आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला असून, या गुन्ह्याचा तपास सफौ/२६५८ रणजित देवसिंग पाटील करत आहेत. या तीनही गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी दाखवलेली सतर्कता, चातुर्य आणि तत्परता ही उल्लेखनीय असून, एका संशयास्पद व्यक्तीस तात्काळ अटक करून त्याच्याविरुद्ध तीन स्वतंत्र गुन्ह्यांचा पर्दाफाश करण्यात पाचोरा पोलीस यशस्वी ठरले आहेत. ही संपूर्ण कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक (चाळीसगाव परिमंडळ) श्रीमती कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अरुण आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. राहुलकुमार पवार यांच्या नेतृत्वात पार पडली. या कारवाईत प्रत्यक्ष सहभाग घेणाऱ्या पोउपनिरीक्षक योगेश गणगे, सफौ रणजित पाटील, पोहेकॉ राहुल शिंपी, पोकॉ योगेश पाटील, शरद पाटील, कमलेश पाटील, संदीप पाटील आणि हरीष परदेशी या सर्वांच्या कार्याचे विशेष कौतुक करण्यात येत आहे. पाचोरा शहरासह तालुक्यात सध्या विविध ठिकाणी चोरी व घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत पोलिसांनी केलेली ही कामगिरी केवळ गुन्हेगारांना रोखण्यासाठीच नाही, तर नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठीही अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. पोलिसांची नियमित गस्त, सतर्क निरीक्षण आणि तत्काळ कारवाई यामुळे भविष्यात अशा गुन्ह्यांवर प्रतिबंध घालण्यात मदत होईल, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांतून व्यक्त होत आहे. या प्रकरणातील पुढील तपास पूर्ण होताच आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करून न्याय मिळविण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. दरम्यान, या कारवाईमुळे पाचोरा पोलीस ठाण्याचे गुन्हे अन्वेषण पथक पुन्हा एकदा चर्चेत आले असून, त्यांच्या कार्यशैलीला जिल्ह्यातूनही प्रशंसा मिळत आहे.

श्री. गो.से. हायस्कूल पाचोरा येथे गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न

0

Loading

पाचोरा – तालुका सहकारी शिक्षण संस्था संचालित गो.से. हायस्कूल पाचोरा येथे दिनांक 23 जुलै 2025 रोजी गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेला गणवेश वाटप कार्यक्रम अत्यंत प्रेरणादायी आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या उपक्रमामुळे केवळ विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला नाही, तर त्यांच्या पालकांच्या मनातही संस्थेविषयी कृतज्ञतेची भावना जागृत झाली. सामाजिक भान जपत विद्यार्थ्यांच्या गरजा ओळखून शिक्षण संस्थांनी राबवलेले असे उपक्रम समाजासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरतात, याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा गणवेश वाटप सोहळा ठरला. या कार्यक्रमाला संस्थेचे चेअरमन नानासो. संजय वाघ यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. त्यांच्यासोबत व्हाईस चेअरमन नानासाहेब व्ही. टी. जोशी, ज्येष्ठ संचालक आप्पासो. सतीश चौधरी, मयूर सराफ, योगेश जडे, डॉ. स्वप्नील पाटील, डॉ. रुपेश पाटील आणि डॉ. नरेश गवांदे हे मान्यवरही उपस्थित होते. कार्यक्रमात आर्थिक मदतीसाठी पुढाकार घेणाऱ्या उद्योजकांमध्ये विजय कापड दुकानाचे संचालक अनुराग भारतीया, नेरी वाला ड्रेसेसचे संचालक रवी अग्रवाल, दर्शन एम्पोरियमचे संचालक ओम राठी आणि पी.सी. जैनचे संचालक विजयकुमार बडोला यांचा विशेष उल्लेख करावा लागेल. या उद्योजकांनी सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांसाठी सढळ हस्ते मदत करून इतरांसाठी अनुकरणीय आदर्श निर्माण केला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांचे शाळेचे मुख्याध्यापक एन. आर. ठाकरे, उपमुख्याध्यापक आर. एल. पाटील, पर्यवेक्षिका ए. आर. गोहिल, आर. बी. तडवी, आर. बी. बांठीया, किमान कौशल्य विभाग प्रमुख मनीष बाविस्कर, तांत्रिक विभाग प्रमुख एस. एन. पाटील आणि कार्यालयीन प्रमुख अजय सिनकर यांनी पुष्पगुच्छ देऊन मनपूर्वक स्वागत केले. यावेळी शाळेतील शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचा मुख्य भाग म्हणजे जवळपास 200 गरजू विद्यार्थ्यांना गणवेशांचे वाटप करण्यात आले. हा प्रसंग अत्यंत भावनिक होता. अनेक विद्यार्थ्यांनी ही मदत म्हणजे त्यांच्या शिक्षणाच्या प्रवासात आत्मविश्वासाची आणि प्रेरणेची ठिणगी असल्याचे नम्रपणे सांगितले. गरिबीतून प्रगतीच्या दिशेने पावले टाकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही मदत केवळ कपड्यांची नव्हे, तर आत्मसन्मानाची जाणीव करून देणारी ठरली. गणवेश वाटप करताना मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचे मनोबल वाढवले. चेअरमन संजयनाना वाघ यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “शिक्षण केवळ पुस्तकापुरते मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मूलभूत सुविधा पुरवणे हे संस्थेचे दायित्व आहे. गणवेश म्हणजे शिस्त, एकरूपता आणि आत्मविश्वास. तो विद्यार्थ्यांना सामाजिक स्तरापलीकडे जात समानतेची भावना देतो.” व्हाईस चेअरमन नानासाहेब जोशी यांनीही या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, “संस्थेचा उद्देश फक्त गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यापुरता मर्यादित नसून विद्यार्थ्यांचे सामाजिक-सांस्कृतिक व आर्थिक भान ध्यानात घेऊन अशी उपक्रमशीलता जोपासणे हे आमचे आद्यकर्तव्य आहे.” संचालक सतीश चौधरी, मयूर सराफ, योगेश जडे, डॉ. स्वप्नील पाटील, डॉ. रुपेश पाटील, डॉ. नरेश गवांदे यांनी देखील आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी प्रेरणा देणारे विचार मांडले आणि संस्थेच्या सामाजिक जाणिवेचे कौतुक केले. उपस्थित उद्योजकांनीही आपली मते व्यक्त करताना सांगितले की, “व्यवसाय ही आपली उपजीविकेची साधने असली तरी समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखून आपण त्यात योगदान द्यावे, हीच खरी समाजसेवा होय. विद्यार्थ्यांना दिलेला गणवेश ही केवळ देणगी नव्हे तर त्यांच्या शिक्षणातील उभारी आहे.” मुख्याध्यापक एन. आर. ठाकरे यांनी आपल्या भाषणात सर्व मान्यवर व उद्योजकांचे शाळेच्या वतीने मनःपूर्वक आभार मानले. “संस्थेच्या ध्येयधोरणात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, मानसिक आणि सामाजिक विकासाला अग्रक्रम आहे. आजच्या या उपक्रमामुळे त्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे,” असे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे प्रभावी आणि प्रवाही सूत्रसंचालन आर. बी. बोरसे यांनी केले. त्यांच्या सौम्य आणि शिस्तबद्ध सादरीकरणामुळे संपूर्ण कार्यक्रमाला एक विशिष्ट स्वरूप प्राप्त झाले. कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला. या कार्यक्रमाची विशेषता म्हणजे शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि संस्थेचे पदाधिकारी यांनी एकत्र येऊन एकात्मतेचा आदर्श प्रस्तुत केला. यामुळे “एकत्र येऊन केवळ शाळेचे नव्हे तर समाजाचेही हित साधता येते,” हा सकारात्मक सामाजिक संदेश समाजात पोहोचला. विद्यार्थ्यांनी गणवेश मिळाल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “ही मदत आमच्यासाठी केवळ कपड्यांची नव्हे, तर शिक्षणातील आत्मसन्मान आणि प्रेरणेची ओळख आहे.” या उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडले. अशा उपक्रमांची आजच्या काळात मोठी गरज असून, संस्थेच्या पुढाकारामुळे भविष्यात आणखी विद्यार्थ्यांना मदतीचा हात मिळणार, याबद्दल पालक व नागरिकांमध्ये आश्वस्तता निर्माण झाली आहे. हा कार्यक्रम केवळ गणवेश वाटपा पुरता मर्यादित राहिला नाही तर विद्यार्थ्यांच्या मनात आत्मसन्मानाचे बीज रुजवणारा ठरला. समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेली मदत, संस्थेचा समर्पित दृष्टिकोन आणि शिक्षकांचा मायेचा स्पर्श या सर्वांनी मिळून हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी केला. या उपक्रमातून इतर शाळांनीही प्रेरणा घेऊन अशा उपक्रमांची मालिका राबवावी, हीच अपेक्षा व्यक्त केली जात आहे. गो.से. हायस्कूलने दिलेला सामाजिक संदेश आणि विद्यार्थ्यांच्या मनात जागवलेला आत्मसन्मान हा या कार्यक्रमाचा खरा ठेवा ठरला आहे.

पाचोऱ्यात गुन्हेगारी वाढीचा गंभीर सवाल : डॉन स्टाईल व्हिडिओ व्हायरल, पोलिस व कायदा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह

0

Loading

पाचोरा – पाचोऱ्यासारख्या ग्रामीण भागात गेल्या काही काळात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र समोर येत आहे. नुकत्याच बस स्टॅड प्रकरणात, गोळीबार प्रकरणातील आरोपी शरद युवराज पाटील याला पोलिस स्टेशनमधून बाहेर नेताना आणि पोलीस वाहनात बसवत असताना तयार केलेला व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे.त्यामध्ये दुर्लभ कश्यप डॉनसदृश शैली दिसून येते.
या व्हिडिओचा उद्देश काय आहे यावर चर्चा सुरु असून,हेच समाजात दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचे साधन आहे. तरी देखील पोलीस प्रशासनाकडून याची गंभीर दाखल घेण्यात आली नाही आणि VDO काढणारे व प्रसारित करणाऱ्यां विरोधात कारवाई करण्यात आली नाही अशाच स्वरूपाचं बस स्टँडवर मयत आकाश मोरे याने “तुम्ही हवेत गोळ्या मारतात आम्ही छातीवर गोळ्या मारतो ” या इंस्टाग्राम वर प्रसारित झालेल्या रिलची त्याचं वेळी दखल घेतली असती & “कोणी हवेत गोळ्या झाडल्या होत्या” हा रिल का? & कोणासाठी बनवण्यात आला होता ? कृष्णापुरी भागातील कोणते युवक & कधी पासुन? कोणाच्या टार्गेटवर आहेत? अल्पवयीन मुलांपर्यंत गावठी कट्टे व रिव्हाल्वर पोहचण्याचे व देण्याची यंत्रणा कोणती? यांचा गॉडफादर कोण?  या दिशेने तपास केला असता तर शिवाजी नगर मधील नातेवाईकाच्याच हातुन नातेवाईकाची हत्या झाली नसती आणि खरा मास्टर माईड व सर्व सुत्रे तेव्हाच समोर आले असते अजुनही वेळ गेलेली नाही बरेच काही मोठे रॅकेट समोर येऊ शकते कारण यापूर्वीही पत्रकार संदीप महाजन यांना याच शरद पाटील व त्याच्या साथीदारांनी मारहाण केली तेव्हा त्याच्या सहकाऱ्यांव्दारे व्हिडिओ शुट करून सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला होता. या घटना सामान्य नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करत आहेत. त्यांची एवढी दहशत आहे की त्यांच्या अवैध धंद्यांना देखील कोणी कारवाई अथवा धाड टाकायची हिंमत करत नाही
या पार्श्वभूमीवर पाचोऱ्यात पिस्तोल विक्री करणारे व गुन्हेगारी रॅकेटच्या कार्यरत असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही कारवायांमध्ये अंमलबजावणी अपुरी किंवा त्रुटीयुक्त असल्याचे आरोप देखील होत आहेत.पिस्तूल कोठून आली आणि कुठून येतात व पाचोरा येथे कोण विक्रेता आहे आज पर्यंत त्यांनी पाचोरा शहरात किती पिस्तोल विक्री केल्यात याचा कोणताही तपास करण्यात आलेला नाही एवढेच नव्हे तर शरद युवराज पाटील हा आरोपी सहजपणे जामिनावर मुक्त होईल अशा पद्धतीने दोषारोपपत्र मांडल्याचे निरीक्षण नोंदवले जात असल्याची चर्चा आहे. कारण त्याच्यावर वेळोवेळी निघालेले न्यायालयीन समन्स व वॉरंटही पोलीसांकडून वेळेत बजावले जात नसल्याची बाब गंभीर आहे. विशेष म्हणजे गुन्हा दाखल ते निर्दोष मुक्तता झाल्यावर सरकार तर्फे अपिलीय होणार नाही याची दक्षता घेतली जाते
या पार्श्वभूमीवर संदीप महाजन यांनी या गोळीबार प्रकरणी सखोल चौकशी विशेष तपास पथक (SIT) किंवा सीआयडीमार्फत करावी. यातून कोणतेही मोठे गुन्हेगारी जाळे कार्यरत असल्यास ते उघडकीस येईल आणि भविष्यातील धोके टाळता येतील. विशेषबाब म्हणजे शरद युवराज पाटील सह काही आरोपी मुंबईच्या गोरेगावमधील दिंडोशी पो स्टे मधील गंभीर गुन्ह्यांमध्येही संशयित आहेत, याची चौकशी युद्धपातळीवर होणे आवश्यक आहे. बीड प्रमाणे पाचोऱ्यात देखील या गुन्हेगारांचे प्रति वाल्मीक कराड यासारखे गुन्ह्यांचे सूत्रधार नेमके कोण आहेत, याचा शोध घेण्याची गरज सध्या तीव्रतेने जाणवते.
या प्रकरणात संलग्न असलेल्यांची गुन्हेगारी व अवैध धंद्यांची पार्श्वभूमी, त्यांचे स्थानीक पोलीस प्रशासनावर आर्थिक किंवा प्रशासकीय संबंध, पोलिसांवर असलेला प्रभाव, अशा बाबींची सखोल तपासणी केल्यासच सत्य बाहेर येऊ शकेल. काही ठिकाणी प्रशासकीय यंत्रणेवर दबाव असल्याचेही आरोप करण्यात येत आहेत. पोलिस व न्यायव्यवस्थेने यावर स्वखर्चाने आणि स्वतंत्रपणे लक्ष देणे अत्यावश्यक आहे.
गावठी कट्टे व रिवाल्वर या पार्श्वभूमीवर आमदार किशोरआप्पा पाटील, माजी आमदार दिलीप वाघ यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत व सभांमध्ये या विषयावर वेळो – वेळी चिंता व्यक्त केली होती. त्याचप्रमाणे नुकत्याच पावसाळी अधिवेशनात आमदार किशोरआप्पा पाटील, आमदार चंद्रकांत पाटील आणि आमदार अनिल भाईदास पाटील यांनीही या प्रकारांवर लक्ष वेधले होते. मात्र अद्याप कोणती ठोस कारवाई झाली नसल्याने प्रश्न उभा राहतो – नेमके पाणी कुठे मुरते आहे? यावर चक्क सत्ताधारी आमदारही आवाज उठवत असताना राज्य यंत्रणेची प्रतिक्रिया का संथ आहे, असा सवाल उपस्थित होतो. या पार्श्वभूमीवर झुंज वृत्तपत्र आणि ध्येय न्युजचे संपादक संदीप महाजन यांनी केंद्र व राज्य सरकारकडे निवेदने व पुरावे सादर करत यावर तत्काळ लक्ष घालण्याची मागणी केली आहे. बीड प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड सारख्या पाचोर्‍यात देखील प्रति वाल्मीक कराड याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीला व त्याच्या आश्र्याखाली असलेल्या गुंडांना रोखण्यासाठी ठोस उपाययोजना, विशेष तपास व अवैध शस्त्रांचा शोध घेणारे मिशन लवकरात लवकर सुरू होणे काळाची गरज आहे. अन्यथा पाचोऱ्यात खुलेआम  रक्तपाताच्या घटनांची मालिका सुरूच राहणार आहे

आज दि.23/07/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष
उभयचारी योगामुळे आज कार्यात मान्यता व आर्थिक वाढ होण्याची शक्यता आहे. जुन्या प्रयत्नांचे फळ मिळेल, पण खर्चाकडे लक्ष देणे आवश्यक.
शुभ अंक: १ • शुभ रंग: लाल

वृषभ
मालव्य राजयोगामुळे आज करिअरमध्ये प्रगती दिसू शकते, तथापि भावनिक अस्थिरता संभवते—त्या काळात शांतता राखावी.
शुभ अंक: ६ • शुभ रंग: गुलाबी 

मिथुन
मानसिक तणाव असेल, तरी बुधादित्य योगामुळे संवादात सहजता व करिअरच्या संधी वाढतील.
शुभ अंक: ५ • शुभ रंग: पिवळा 

कर्क
आज सर्जनशीलता व संवादाद्वारे करिअरमध्ये सकारात्मक हालचाल होऊ शकते; प्रवासही लाभदायक ठरु शकतो.
शुभ अंक: ३ • शुभ रंग: निळा

सिंह
उभयचारी योगामुळे आज नेतृत्वगुण स्पष्ट होतील, आर्थिक व प्रतिष्ठेत लाभ; परंतु संयम ठेवा.
शुभ अंक: ९ • शुभ रंग: सोनेरी 

कन्या
आज विरोधाचा सामना करावा लागू शकतो, मात्र निर्णय विचारपूर्वक घेतल्यास तो मात शक्य आहे.
शुभ अंक: ५ • शुभ रंग: हिरवा

तुला
आर्थिक बाबतीत सावधगिरी आवश्यक आहे, परंतु नात्यांमध्ये संवादातून समाधान मिळेल.
शुभ अंक: २ • शुभ रंग: गुलाबी

वृश्चिक
आज मालव्य राजयोगामुळे आर्थिक उन्नतीची शक्यता आहे, परंतु खर्च नियंत्रणात ठेवावे.
शुभ अंक: ७ • शुभ रंग: काळा 

धनु
आज संयमाने काम व प्रवासात प्रगती होईल; खर्च आणि मानसिक ताण नीट व्यवस्थापित करा.
शुभ अंक: ३ • शुभ रंग: नारिंगी 

मकर
आत्मपरीक्षणाचा पूर्णयोग उपलब्ध असून, धैर्याने घेतलेले निर्णय दीर्घकालीन फायदे देतील.
शुभ अंक: ८ • शुभ रंग: निळा

कुंभ
आज करिअर आणि सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होण्याची शक्यता आहे; जुन्या योजना परिणामकारक ठरतील.
शुभ अंक: ४ • शुभ रंग: जांभळा 

मीन
राजयोग व शनि वक्री यांचे संयोग लाभदायक आहेत; आर्थिक तसेच भावनिक दोन्ही स्थैर्य राखायला हवे.
शुभ अंक: ७ • शुभ रंग: पांढरा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून न लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

पाचोऱ्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर- २२० रक्तदात्यांचा सहभाग

0

Loading

पाचोरा – महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष, लोकप्रिय आणि जनतेच्या मनामनात स्थान निर्माण केलेले मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी पाचोरा शहर व तालुक्याच्या वतीने एक उल्लेखनीय व समाजोपयोगी उपक्रम — भव्य रक्तदान शिबिर व महासंकल्प अभियान — उत्साहात पार पडले. या अभियानाचे आयोजन माजी आमदार दिलीप वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. समाजासाठी काहीतरी चांगले करण्याच्या प्रेरणेतून आणि मुख्यमंत्री साहेबांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हेतूने या शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे रक्तदान शिबिर केवळ पाचोरा शहरापुरते मर्यादित न राहता त्याचा विस्तार पिंपळगाव, भडगाव व नगरदेवळा या भागांपर्यंत करण्यात आला होता. या चार ठिकाणांवर एकूण २२० रक्तदात्यांनी आपल्या रक्तदातृत्वाचा ठसा उमटवून समाजाप्रती असलेली जबाबदारी जपली. पाचोऱ्यात ५८, पिंपळगाव येथे ४५, भडगाव येथे ७५, तर नगरदेवळा येथे ४२ अशा प्रकारे रक्तदात्यांनी सहभागी होऊन या उपक्रमाला यशस्वी बनवले. या शिबिरासाठी पाचोरा येथे संजीवनी रक्तपेढी, जळगाव यांचे सहकार्य लाभले. तसेच नगरदेवळा येथील शिबिरासाठी भवर रक्तपेढीने रक्तसंकलनासाठी पुढाकार घेतला. दोन्ही संस्थांनी आपल्या अनुभवी वैद्यकीय पथकासह अचूकतेने व नियमबद्धतेने रक्तसंकलनाची प्रक्रिया पार पाडली. या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी व समारोपप्रसंगी माजी आमदार दिलीप वाघ यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. उपस्थित प्रत्येक रक्तदात्याचे मनोबल वाढवण्यासाठी दिलीप वाघ यांनी त्यांच्या राष्ट्रप्रेमाचा, समाजकार्यासाठी असलेल्या संवेदनशीलतेचा विशेष उल्लेख केला. या कार्यक्रमाला नानासाहेब संजय वाघ, जिल्हा उपाध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य मधुभाऊ काटे, पाचोरा तालुका अध्यक्ष गोविंद शेलार, पिंपळगाव मंडळाध्यक्षा शोभाताई तेली, जिल्हा चिटणीस ज्योतीताई भामरे, माजी पंचायत समिती सभापती सुभाष तुकाराम पाटील, माजी सभापती बन्सीबापू पाटील, अनिल धना पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती एन. सी. पाटील, मार्केट कमिटी सदस्य विजय कडू पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रदीपबापू पाटील, जिल्हा चिटणीस प्रमोद सोमवंशी, कोषाध्यक्ष कांतीलाल जैन, ज्येष्ठ कार्यकर्ते किशोर संचेती, शिवदास पाटील, माजी शहराध्यक्ष नंदू सोमवंशी, मुकेश पाटील, तालुकाउपाध्यक्ष शरद अण्णा, गोपाळ पाटील, योगेश माळी, पिंटू भामरे, व्ही.टी. जोशी, भागवत महालपुरे, प्रकाश एकनाथ पाटील, सतीश चौधरी, हरुण दादा देशमुख, योगेशदादा पाटील, भूषण वाघ, ललित वाघ, अॅड. दीपक पाटील, विनोद पाटील, पिंटू राजपूत, अॅड. अविनाश सुतार, गौरव वाघ, अजय अहिरे, गणेश पाटील, रेखाताई देवरे, सरलाताई पाटील, नीलिमा पाटील, कल्पनाताई पाटील, प्रा. डॉ. सुनीता गुंजाळ, जयश्री वाघ, सपना सूर्यवंशी, गायत्री क्षीरसागर, रणजीत पाटील, प्रा. डॉ. माणिक पाटील, हेमराज पाटील, प्रकाश चौधरी, भगवान मिस्तरी, धर्मराज पाटील, अनिल देवरे, सतीश देशमुख, संदेश पवार, संजय राठोड, गुलाबराव पाटील, माणिक शिंदे, महादू कोकणे, प्रदीप वाघ, अली पेंटर, निवृत्ती सूर्यवंशी, डॉ. वासुदेव वले, राजेश माडोळे, प्रा. नितीन पाटील, विनोद महाजन, वसंत गिते, अविनाश सोमवंशी, शांतीलाल तेली, प्रा. अतुल सूर्यवंशी, प्रा. महेंद्र महाजन, निलेश पाटील, वसंत पाटील, महेश माळी, ललित पाटील, गणेश पाटील, प्रा. प्रदीप पाटील, कुलदीप पाटील, गोलू पाटील, महेश नेरपागर, मनोज पवार, उमेश माळी, बंटी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात महिला कार्यकर्त्यांनीही उत्स्फूर्त सहभाग दर्शवून समाजसेवेसाठी महिलांचा सहभाग किती महत्वाचा आहे हे अधोरेखित केले. विशेषतः रेखाताई देवरे, सरलाताई पाटील, नीलिमा पाटील, कल्पनाताई पाटील, प्रा. डॉ. सुनीता गुंजाळ, जयश्री वाघ, सपना सूर्यवंशी, गायत्री क्षीरसागर यांचा उल्लेखनीय सहभाग होता. माजी आमदार दिलीप वाघ यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केवळ महाराष्ट्राचे नेतृत्व करीत नाहीत तर त्यांनी आपले कार्यकर्तृत्व, स्वच्छ प्रतिमा आणि झपाट्याने निर्णय घेण्याची क्षमता यामुळे राष्ट्रीय स्तरावरही स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या वाढदिवसाचा उपयोग केवळ अभिनंदनापुरता मर्यादित न ठेवता, समाजासाठी उपयुक्त ठरेल अशा उपक्रमातून त्यांच्या कार्याला मानवंदना देण्याचा हा प्रयत्न आहे.” या कार्यक्रमात रक्तदात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. त्याचबरोबर उपस्थित मान्यवरांनी रक्तदानाचे महत्व विशद करताना सांगितले की, “रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. एखाद्या आजारी व्यक्तीच्या जीवाला दिलेले हे रक्त म्हणजे जीवनदानच असते.” कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले होते. रक्तदात्यांची तपासणी, नोंदणी, प्रमाणपत्र वितरण आणि शिबिराचे व्यवस्थापन यासाठी स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. अशा समाजोपयोगी आणि मानवतेची भावना जागृत करणाऱ्या उपक्रमामुळे पाचोरा परिसरात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. हा उपक्रम पुढील काळातही वारंवार राबविण्याचे संकेत माजी आमदार दिलीप वाघ यांनी दिले असून युवकांना समाजहिताच्या कार्यात सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. या रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी माजी आमदार दिलीप वाघ व त्यांच्या नेतृत्वाखालील टीमचे सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. हा उपक्रम केवळ राजकीय दृष्टिकोनातून नव्हे, तर सामाजिक बांधिलकीतून साकारलेली कृती म्हणून स्थानिक जनतेतून भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.

पाचोरा में गंदे पानी की सप्लाई पर MIM पदाधिकारियों ने नगर परिषद को दिया ज्ञापन : अवाम की सेहत पर गंभीर खतरा

0

Loading

पाचोरा – शहर में इस वक़्त अवाम को बहुत ही संगीन और परेशान करने वाली पानी की समस्या का सामना करना पड़ रहा है। नल के ज़रिए जो पानी लोगों के घरों में आ रहा है, वो निहायत ही गंदा, बदबूदार और खराब है। उस पानी में कूड़ा-कचरा और मिट्टी साफ़ तौर पर देखा जा सकता है। इसी परेशानी को लेकर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (MIM) की पाचोरा तालुका और शहर शाखा की जानिब से नगर परिषद के चीफ एक्जीक्यूटिव ऑफिसर (CIO) को एक तफ्सीली याददाश्त पेश की गई, जिसमें जल विभाग की लापरवाही के खिलाफ फौरन कार्रवाई की मांग की गई है। इस याददाश्त में साफ़ तौर पर कहा गया है कि पिछले कई हफ़्तों से शहर के तक़रीबन हर हिस्से में लोगों को बहुत ही खराब, बदबूदार और सेहत के लिए नुकसानदेह पानी सप्लाई किया जा रहा है। इस पानी को किसी भी तरह से फ़िल्टर या साफ़ किए बगैर सीधा नलों में छोड़ा जा रहा है। ये वही पानी है जो लोग खाने, पीने, नहाने और दीगर घरेलू ज़रूरतों के लिए इस्तेमाल करते हैं। ऐसे पानी की वजह से सीधा असर लोगों की सेहत पर पड़ रहा है। इस गंदे और दूषित पानी की वजह से अवाम को दस्त, मलेरिया, डेंगू, स्किन डिज़ीज़, कॉलरा और टायफॉइड जैसे संगीन बीमारियों का सामना करना पड़ रहा है। ख़ास तौर पर बच्चे, बुज़ुर्ग और बीमार लोग ज़्यादा मुतास्सिर हो रहे हैं। बहुत सारे घरों में पूरे-पूरे खानदान बीमार पड़ गए हैं। सेहत की मौजूदा सहूलियतें पहले से ही नाकाफी हैं, और ऐसे में इस तरह के गंदे पानी ने हालत और बिगाड़ दी है। MIM के मुताबिक ये हालात एक किस्म की “जल आपदा” (Water Crisis) बन चुके हैं। इस परेशानी को देखते हुए MIM के ज़िला, तालुका और शहर के ज़िम्मेदारान ने मिलकर नगर परिषद के अफसरों से मुलाक़ात की और ये मांगें पेश कीं: जल विभाग को हिदायत दी जाए कि वो पूरे पानी सप्लाई सिस्टम की जांच करे। पानी फ़िल्टर करने वाले सिस्टम्स को तुंरत चेक करके उन्हें ठीक किया जाए। पानी की टंकियों और पाइपलाइनों की सफ़ाई करवाई जाए। लोगों को उनके घरों में सिर्फ़ साफ़, फ़िल्टर और पीने लायक पानी ही मुहैया कराया जाए। इस पूरे काम पर निगरानी रखने के लिए एक इंडिपेंडेंट कमेटी बनाई जाए जो लोगों से राय लेकर रिपोर्ट पेश करे। जिन लोगों की सेहत इस पानी की वजह से खराब हुई है, उनके लिए हेल्थ कैंप लगाकर फ्री इलाज मुहैया कराया जाए। इस मौक़े पर जो MIM ज़िम्मेदारान मौजूद थे, उनमें शामिल हैं : फहीम शेख (उपज़िला अध्यक्ष), सय्यद ताहेर अली (शहर अध्यक्ष), डॉ. अकील शेख (तालुका अध्यक्ष), अशफ़ाक खाटीक (कार्याध्यक्ष), हारून भाई बागवान (सामाजिक कार्यकर्ता), फारुख पिंजारी (सामाजिक कार्यकर्ता), तारिक सय्यद (सामाजिक कार्यकर्ता), सलीम गनी (मिस्त्री) और कई दीगर कार्यकर्ता। इस मौके पर फहीम शेख ने कहा, “हुकूमत और प्रशासन बार-बार अवाम की बुनियादी ज़रूरतों से मुंह मोड़ रहा है। पानी इंसान की बुनियादी हक़ है, और अगर टैक्स देने के बावजूद ज़हर जैसा पानी मिले, तो ये सरासर ज़ुल्म है।” शहर अध्यक्ष सय्यद ताहेर अली ने कहा, “मुल्क में आम आदमी बेहाल है। सिर्फ़ मीटिंग लेकर औपचारिकताएं पूरी करने से काम नहीं चलेगा। जब तक हमारी मांगें पूरी नहीं होतीं, हम चैन से नहीं बैठेंगे।” डॉ. अकील शेख ने कहा, “डॉक्टर होने के नाते हम देख रहे हैं कि पानी की वजह से किस तरह गांवों की सेहत व्यवस्था तबाह हो रही है। अगर इसी तरह हालात रहे, तो आने वाले दिन और भी खतरनाक होंगे।” अशफाक खाटीक ने तंज़िया लहजे में कहा, “इलेक्शन के दौरान पानी की बातें करके वोट लिए जाते हैं, लेकिन जब देने की बारी आती है, तो जहर जैसा पानी दिया जाता है।” MIM का ये कदम सिर्फ़ एक सियासी पहल नहीं, बल्कि पाचोरा की अवाम के हक़ में एक बुलंद आवाज़ है। अगर प्रशासन वक़्त रहते चेत नहीं पाया, तो ये मुद्दा बड़ा आंदोलन बन सकता है। आख़िर में, ये कहा जा सकता है कि पाचोरा की जनता आज साफ़ पानी के लिए तरस रही है। अगर अब भी सख़्त कदम न उठाए गए, तो अवाम का ग़ुस्सा फूट सकता है और प्रशासन को भारी पड़ सकता है।

सोनचाफा सजलेला गड : बाबूराव कदम यांची ११ लाखांची घोषणा

0

Loading

नांदेड – इतिहासाच्या कुशीत विसावलेले पवित्र पाटणूर हे गाव आज नव्या प्रेरणास्थळी रूपांतरित होत आहे. “आपरंपार गड संस्थान पाटणूर” या संस्थेच्या माध्यमातून सुरु झालेल्या गड संवर्धन, पर्यावरण रक्षण व पर्यटन विकासाच्या एकात्म उपक्रमात आता निसर्गाचे नवे रंग खुलू लागले आहेत. पाटणूरच्या गडावर सुरु झालेल्या “सोनचाफा भिंत उपक्रमातून” गडावर व गडाभोवतालच्या परिसरात अनोखी सुवासिक झुळूक दरवळू लागली आहे. गडाच्या दोन्ही बाजूंनी जवळपास दोन किलोमीटर लांब सोनचाफ्याच्या वृक्षांची भिंत उभारण्यात आली असून, या भिंतीच्या माध्यमातून गडाचा संपूर्ण परिसर सुगंधी, नयनरम्य, पवित्र आणि भावस्पर्शी रूप धारण करणार आहे. गडावरील वातावरण आधीच आध्यात्मिकतेने भरलेले असताना आता निसर्गाचा हातभार लाभल्याने येथे येणाऱ्या प्रत्येक भाविक, पर्यटक व पर्यावरणप्रेमींना एक नव्याने ऊर्जा मिळणार आहे. हा अनोखा उपक्रम “आपरंपार गड संस्थान पाटणूर” या संस्थेच्या पुढाकारातून राबवण्यात आला आहे. संस्थेच्या नियोजनबद्ध कामगिरीमुळे आणि गावकऱ्यांच्या एकजुटीमुळे या कार्यास योग्य दिशा लाभली असून, पुढील पाच वर्षांसाठी गडाच्या सर्वांगीण विकासाचा सखोल आराखडा तयार करण्यात आलेला आहे. या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र भूषण व्यंकटेश जोशी यांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे ठरले. त्यांच्याच प्रेरणेने सोनचाफा वृक्षसंवर्धनाच्या या अभिनव कल्पनेला मूर्त स्वरूप मिळाले. गावातील अनेक तरुणांनी या उपक्रमात मनःपूर्वक सहभाग घेतला. विशेषतः “सेवा समर्पण परिवार” या संस्थेने आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवत मोठ्या प्रमाणात श्रमदान केले. गडाच्या पायथ्यापासून ते सर्वोच्च टोकापर्यंत सकाळी सहा वाजता हे स्वयंसेवक उपस्थित राहून वृक्ष लागवडीचे नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध काम पार पाडत होते. त्यांच्या कष्टातून आणि समर्पणातून गडावर एक नवा इतिहास घडत आहे. सोनचाफा भिंत उपक्रमाचा शुभारंभही अत्यंत औपचारिक आणि भावनिक वातावरणात झाला. ज्येष्ठ समाजसेवक प्रा. राजाराम वट्टमवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल उपस्थितांनी कौतुकाची दाद दिली. याच कार्यक्रमात उपस्थितांचे मनोबल वाढवत, लोकप्रिय आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांनी गडाच्या विकास व संवर्धनासाठी ११ लाख रुपयांचा निधी जाहीर करून गडप्रेमींमध्ये आशेचा नवा किरण पेरला. “गडाचे नैसर्गिक पावित्र्य राखा, मी नेहमी तुमच्यासोबत आहे,” असे भावनिक शब्द त्यांनी बोलून उपस्थितांना भारावून टाकले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने गडाच्या पवित्र भूमीत अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. परमपूज्य रेवणसिद्ध आया महाराज, परमपूज्य गोपाळ महाराज, नरेंद्र चव्हाण, विठ्ठल पावडे, अशोक घोरबांड, बळवंत म्हस्के, नियोजन गुरु शिवाजी गावंडे, रमेश चित्ते, दिलीप माहूरे, अविनाश कदम, चंदा रावळकर, विठ्ठल फुलारी, नरसिंगा बतलवाड, प्रा. राजाराम वट्टमवार, पत्रकार ज्योती सरपाते, पत्रकार दीपक मठपती, दिगंबर देशमुख आदींची उपस्थिती या उपक्रमास बळकटी देणारी ठरली. कार्यक्रमात नरसिंगा बतलवाड यांचा विशेष उल्लेख करण्यात आला. गडावरील पाण्याच्या अडचणीमुळे विहिरीसाठी जागा दान करून त्यांनी परोपकाराचा खरा आदर्श समोर ठेवला. त्यांच्या भूमीदानामुळे पाण्याची कायमस्वरूपी सोय होणार आहे. तर परमपूज्य गोपाळ महाराज यांनी स्वतःच्या खर्चातून विहिरीचे खोदकाम करून या समाजोपयोगी कामात आपला सहभाग नोंदवला. या दोन्ही व्यक्तींचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या गड विकास उपक्रमासाठी खा. अशोकराव चव्हाण व मा. खा. रवींद्र चव्हाण यांनी विशेष सहकार्य केले आहे. गडावर पाणी नेण्यासाठी लागणाऱ्या कामात त्यांनी खूप मोलाचे योगदान दिले असल्याची माहिती आयोजकांनी दिली. गड संवर्धन, पर्यावरणरक्षण आणि पर्यटन विकास या तिन्ही बाबींचा एकत्रित विचार करून राबवलेला हा उपक्रम केवळ पाटणूर गावापुरता मर्यादित न राहता, संपूर्ण महाराष्ट्रातील इतर गडांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरणार आहे. “आपरंपार गड संस्थान” व “सेवा समर्पण परिवार” यांच्या संयुक्त प्रयत्नांतून हे काम केवळ एक उपक्रम न राहता ते गडप्रेमींच्या श्रद्धेचा आणि निसर्गाप्रती कृतज्ञतेचा जागर ठरत आहे. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन समाधान पाटील यांनी प्रभावीपणे पार पाडले. त्यांनी प्रत्येक अतिथीची ओळख, उपक्रमाचे महत्त्व आणि भविष्यातील उद्दिष्टे यांची सुसंगत मांडणी केली. आभार प्रदर्शन अरविंद देशमुख यांनी केले. त्यांनी उपस्थित सर्व मान्यवर, श्रमदान करणारे तरुण, गडसंवर्धनासाठी योगदान देणारे व्यक्ती, पत्रकार बांधव आणि गावकऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. या उपक्रमामध्ये भावनांचा ओलावा होता, निसर्गाची सुंदरता होती आणि एकत्रित सामाजिक सहभागाचा उत्कृष्ट नमुना होता. पाटणूरचा ‘आपरंपार गड’ हे केवळ ऐतिहासिक स्थळ नसून आता एक प्रेरणास्थळ म्हणून उदयास येत आहे. हे कार्य केवळ संस्थात्मक उपक्रम न राहता, गावकऱ्यांच्या, स्वयंसेवकांच्या आणि लोकप्रतिनिधींच्या एकत्रित प्रयत्नांची फलश्रुती आहे. अशा संयुक्त कृतीतूनच आपल्याला नव्या महाराष्ट्राची निर्मिती करता येईल, असा विश्वास अनेक मान्यवरांनी या वेळी व्यक्त केला. पाटणूरचा गड आता सुगंधित व सशक्त होणार – या उपक्रमातून केवळ निसर्ग संवर्धनच नव्हे, तर सामाजिक बांधिलकीचा सुगंधही दरवळू लागला आहे.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!