Home Blog Page 93

पाचोऱ्यात बँक एटीएम सेवा सुरळीत करण्यासाठी पत्रकार, बँक व्यवस्थापक आणि लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक

Loading

पाचोरा : शहर तसेच तालुक्यातील विविध बँकांच्या एटीएम सेवा सुरळीत व्हाव्यात, ग्राहकांच्या अडचणी दूर व्हाव्यात आणि नागरिकांना आवश्यक त्या बँकिंग सुविधा वेळेवर, सुरक्षित आणि सुलभ पद्धतीने मिळाव्यात या उद्देशाने दिनांक 30 मे 2025 रोजी उपविभागीय कार्यालय, पाचोरा येथे एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस पाचोरा तालुक्यातील विविध पत्रकार संघटनांचे पदाधिकारी, स्थानिक वृत्तपत्रांचे तसेच इलेक्ट्रॉनिक मिडीयाचे संपादक आणि प्रतिनिधी, तसेच सर्व संबंधित बँकांचे व्यवस्थापक किंवा प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीचे अध्यक्षस्थान आमदार किशोर आप्पा पाटील यांनी भूषविले. उपविभागीय अधिकारी (SDO) पाचोरा भाग यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक अत्यंत सकारात्मक वातावरणात पार पडली. पत्रकारांनी 29 मे 2025 रोजी दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने ही बैठक बोलावण्यात आली होती.
बैठकीच्या प्रारंभी आमदार किशोर आप्पा पाटील आणि उपविभागीय अधिकारी यांचे उपस्थित सर्व पत्रकार बांधव आणि बँक व्यवस्थापकांच्या वतीने स्वागत करण्यात आले. यानंतर उपस्थितांनी तालुक्यातील बँकिंग सेवा व एटीएम यंत्रांच्या कामकाजासंदर्भात सविस्तरपणे आपली मते, अनुभव आणि तक्रारी मांडल्या. या अनुषंगाने पुढीलप्रमाणे मुद्देसूद चर्चा झाली आणि कार्यवाहीसाठी ठोस सूचना देण्यात आल्या.
बैठकीत पत्रकारांनी सर्वप्रथम रेल्वे स्थानक परिसरातील एटीएमबाबत तक्रार मांडली. अनेक ग्राहकांनी त्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी प्रयत्न केल्यानंतर त्यांच्या खात्यातून पैसे कट होऊनही प्रत्यक्षात रक्कम मिळत नसल्याची तक्रार केली. विशेष म्हणजे, सदर एटीएम गेल्या दोन वर्षांपासून वारंवार बंद राहत असल्याचेही निदर्शनास आणले गेले.
या तक्रारीवर संबंधित बँकेचे व्यवस्थापकांनी उत्तर देताना सांगितले की, सदर एटीएम 12 तासांपेक्षा अधिक काळ बंद राहत नाही. तसेच त्यासंबंधीचा सर्व रेकॉर्ड बँकेत उपलब्ध आहे. मात्र, ग्राहकांच्या अडचणी लक्षात घेता आमदार पाटील यांनी याबाबत त्वरित कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. त्यांनी स्पष्ट निर्देश दिले की, एटीएम सेवा खंडित होणार नाही, यासाठी बँकांनी योग्य यंत्रणा कार्यरत ठेवावी आणि तांत्रिक अडचणी आल्यास तत्काळ पर्यायी व्यवस्था करावी
वरखेडी येथील महाराष्ट्र बँकेने महिला बचत गटांना कर्ज उपलब्ध करून दिल्याचा उल्लेख करत उपस्थितांनी ही सुविधा इतर बँकांनीही सुरू करावी अशी अपेक्षा व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर आमदार पाटील यांनी तालुक्यातील सर्व बँकांनी अशा गटांना प्राधान्याने कर्ज देण्यासाठी विशेष मेळावे आयोजित करण्याची सूचना केली. यामुळे ग्रामीण व निमशहरी भागातील महिलांना आर्थिक सक्षमतेकडे वाटचाल करण्यास मदत होईल.
बैठकीत पत्रकारांनी सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध प्रकारची कर्जे सहजतेने उपलब्ध व्हावीत, अशी मागणी केली. यावर स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा पाचोराचे व्यवस्थापक यांनी स्पष्टीकरण दिले की, मुद्रा लोन योजनेअंतर्गत अनेक ग्राहकांना कर्ज दिले जात आहे. याशिवाय, वैयक्तिक, व्यवसायिक, शैक्षणिक व इतर कर्ज सुविधा बँकेमार्फत दिल्या जातात. यासंदर्भात जास्तीत जास्त नागरिकांनी अवगत व्हावे यासाठी जनजागृती करण्यात यावी, असेही ठरवण्यात आले.
बँक ऑफ महाराष्ट्र आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या शाखांमध्ये ग्राहकांसाठी पार्किंगची सुविधा नसल्याची तक्रार उपस्थित पत्रकारांनी केली. त्यावर आमदार पाटील यांनी तातडीने या बँकांनी ग्राहकांच्या सोयीसाठी पार्किंगसाठी जागेचा पर्याय शोधून उपाययोजना कराव्यात, असे आदेश दिले.
बैठकीत उपस्थित अनेकांनी एटीएम सेवा बंद असताना ग्राहकांशी संपर्क साधण्याकरिता टोल फ्री क्रमांक किंवा कार्यालयीन संपर्कासाठी फलक लावण्याची मागणी केली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत सर्व बँक व्यवस्थापकांनी अशा सूचना आणि फलक लवकरच लावण्याचे आश्वासन दिले.
बँक ऑफ महाराष्ट्र व सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकांनी ग्राहकांसाठी नव्या जागेवर शाखा स्थलांतर करण्याची सूचना प्राप्त झाली. नव्या ठिकाणी अधिक जागा, सुविधा, आणि सुरक्षितता लक्षात घेता अशा स्थलांतराची गरज असल्याचे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले. संबंधित बँक व्यवस्थापकांनी या सूचनेची नोंद घेतली.
शेतकऱ्यांना वेळेवर पिक कर्ज मिळावे, यासाठी सर्व बँक व्यवस्थापकांना सुचना देण्यात आल्या. यावेळी आमदार पाटील यांनी शेतकऱ्यांच्या हक्काच्या कर्जाबाबत कोणत्याही प्रकारचा विलंब किंवा अडथळा होणार नाही, याची खात्री घेण्याचे आवाहन केले.
रु. 10, 20 आणि 50 च्या नोटा केवळ मोठ्या व्यक्तींनाच दिल्या जातात, असा आरोप उपस्थित पत्रकारांनी केला. यावर आमदार पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत बँक व्यवस्थापकांना सर्वसामान्य ग्राहकांनाही पुरेशा प्रमाणात छोट्या नोटा उपलब्ध करून देण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्व ग्राहकांवर समान न्याय व्हावा, यावर भर देण्यात आला.
प्रत्येक बँक ग्राहकाचा विमा असावा, यासाठी बँकांनी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी सूचना आमदार पाटील यांनी केली. हे विमा संरक्षण ग्राहकांना आर्थिक संकटाच्या काळात उपयुक्त ठरेल. बँकांनी आपापल्या शाखेतून ही मोहीम अधिक गतीने राबवावी, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
प्रत्येक तिमाहीत आयोजित होणाऱ्या बँक बैठकीत बँक व्यवस्थापकांनी पत्रकार, संपादक, इलेक्ट्रॉनिक मिडियाचे प्रतिनिधी आणि आमदार यांच्या उपस्थितीत कामकाजाचा आढावा द्यावा. अशा खुल्या चर्चेमुळे बँकेच्या कामकाजात पारदर्शकता येईल आणि नागरिकांचा विश्वास वाढेल, असा आशावाद व्यक्त करण्यात आला.
या बैठकीत दिलेल्या सूचना, मार्गदर्शन आणि घेतलेल्या निर्णयामुळे पाचोरा शहर व तालुक्यातील बँकिंग सेवा अधिक कार्यक्षम, सुलभ व नागरिक-केंद्रित होतील, असा विश्वास आमदार किशोरआप्पा पाटील यांनी व्यक्त केला. त्यांनी सर्व बँक व्यवस्थापक, पत्रकार व मिडिया प्रतिनिधींचे आभार मानून बैठकीचा समारोप केला.
ही बैठक केवळ एक औपचारिकता न राहता, यामधून खरोखरच सकारात्मक बदल होतील आणि नागरिकांच्या अडचणी दूर होतील, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली. अशा प्रकारच्या संयुक्त बैठका वेळोवेळी आयोजित केल्या जाव्यात, ही मागणीही अनेक प्रतिनिधींनी मांडली.सदर बैठक पाचोरा तालुक्यातील बँकिंग व्यवस्थेसाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरली आहे. पत्रकारांचे प्रश्न, लोकप्रतिनिधींचे सक्रिय नेतृत्व आणि बँक व्यवस्थापकांची सकारात्मक भूमिका या त्रिसूत्रीमुळे ग्राहकांचे हित साधले जाईल, यात शंका नाही.

पाचोरा-भडगावमध्ये भाजपाचं वर्चस्व निश्‍चित; दिलीपभाऊ वाघांचा विकासाच्या मंत्रासह प्रवेश

Loading

पाचोरा – भडगाव तालुक्यात आगामी प्रत्येक निवडणुकीत भाजपाचे वर्चस्व असेल, असा ठाम विश्वास माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांनी व्यक्त केला आहे. गेल्या २५ वर्षांपासून पाचोरा-भडगाव मतदारसंघात सक्रिय राजकीय कार्य करत असलेल्या वाघ परिवाराने अखेर भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असून, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपासून ते पुढील विधानसभा निवडणुकीपर्यंत भाजपाचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी काम करण्याचा निर्धार दिलीपभाऊ वाघ यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. शुक्रवारी (ता. ३० मे) दिलीपभाऊ वाघ यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या पक्षप्रवेशासंदर्भात भूमिका स्पष्ट करताना अनेक राजकीय घडामोडींचा संदर्भ दिला. यावेळी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष मधुकरभाऊ काटे, दत्ताआबा बोरसे, रमेश वाणी, कांतीलालभाऊ जैन, डॉ. शांतीलाल तेली, प्रकाश पाटील, ॲड. अविनाश सुतार, सतीश चौधरी, विनय जकातदार, शिवदास पाटील, वासुआण्णा महाजन, नंदू बापू सोमवंशी, प्रदीप पाटील, भाजपा तालुका अध्यक्ष गोविंद शेलार, अनिल पाटील, विजय पाटील, सनीभावाघ, प्रताप चौधरी, अरुण पाटील, किशोर संचेती, रणजीत पाटील, भगवान मिस्तरी, सुनील पाटील, प्रा. माणिक पाटील, राजेंद्र पाटील, अनिल पाटील, सुदाम वाघ, भागवत मालपुरे आदी मान्यवर उपस्थित होते. भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर काटे यांनी उपस्थितांचे स्वागत करून मुंबई येथील पक्षप्रवेश सोहळ्याचे तपशील दिले.
     दिलीपभाऊ वाघ यांनी यावेळी स्पष्ट केले की, गेल्या २५ वर्षांपासून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत होतो. चार वेळा विधानसभा निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर लढविल्या. मात्र यंदा पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने नाईलाजाने अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागली. निवडणूक रिंगणात असताना युती सरकारच्या लाडकी बहिण योजना व विकासात्मक धोरणांमुळे स्पष्ट संकेत मिळत होते की पराभव अटळ आहे. त्यामुळे मी निवडणूक रिंगणातून बाजूला झालो. गेल्या अनेक वर्षांपासून आमच्या राजकारणाचा पाया म्हणजे समाजहित व विकासाभिमुख दृष्टिकोन. मात्र राज्यात राजकीय उलथापालथ झाली. राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या पक्षांचे दोन गट पडल्याने कार्यकर्ते संभ्रमित झाले होते. ‘आता कुठे राहावे?’, ‘विरोधात किती दिवस बसायचे?’ या प्रश्नांनी कार्यकर्ते संभ्रमात होते. त्याच वेळी भाजपात प्रवेश करण्याची कार्यकर्त्यांची मागणी तीव्र झाली. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आणि विकासाचा ध्यास पूर्णत्वास नेण्यासाठी अखेर भाजपात प्रवेश केला, असे दिलीपभाऊ यांनी सांगितले.
मुंबई येथे आयोजित पक्षप्रवेश सोहळ्यात बाजार समिती, नगरपालिका, शेतकरी संघ, पीटीसी शिक्षण संस्था, राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी, संचालक, वाघ परिवाराचे समर्थक व हितचिंतक अशा सुमारे २०० प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भाजपा प्रवेश केला असल्याची माहितीही यावेळी त्यांनी दिली. आमदार व नगराध्यक्ष म्हणून कार्यकाळात शहरासह संपूर्ण मतदारसंघाचा प्रचंड विकास केला आहे. मात्र गेल्या काही काळात सत्ता नसल्यामुळे विकासकामांसाठी निधी मिळवण्यात अडचणी येत होत्या. कार्यकर्तेही दिशाहीन झाले होते. अशा वेळी भाजपकडून पक्षप्रवेशाबाबत आग्रहाने संवाद सुरु झाला. कार्यकर्त्यांच्या विचारांनुसार निर्णय घेऊन आम्ही भाजपात प्रवेश केला, असे स्पष्ट करताना दिलीपभाऊ यांनी येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत भाजपाची सत्ता क्रमांक एक वर आणण्याचा निर्धारही व्यक्त केला.
  आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, शेतकरी संघ, सहकारी संस्था यांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. या सर्व निवडणुकांमध्ये पक्षाच्या आदेशानुसार कार्य करताना भाजपाचा एकतर्फी प्रभाव प्रस्थापित करण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे सांगून, केंद्र ते गल्लीपर्यंत भाजपाची सत्ता आहे आणि त्यामुळे यापुढे निर्णय हे पक्षश्रेष्ठींच्या मार्गदर्शनाखाली घेतले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
   “आगामी निवडणुकीत  काय विचार आहे?” मित्र पक्षाशी युती की स्वतंत्र लढत या प्रश्नावर उत्तर देताना दिलीपभाऊ वाघ म्हणाले की, भाजप हा शिस्तबद्ध पक्ष असून येथे निर्णय हे पक्षश्रेष्ठींचे असतात. पक्षाकडून जे आदेश मिळतील, त्या आदेशानुसार आम्ही निवडणूक लढवू. पक्ष जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल. यावेळी अमोलभाऊ शिंदे यांच्या सहभागासंदर्भात विचारल्यावर दिलीपभाऊ म्हणाले की, माझ्या प्रवेशाने कोणीही नाराज नाही. मी भाजपात सक्रिय झाल्यापासून सामान्य कार्यकर्त्यांपासून ते वरिष्ठ पदाधिकाऱ्यांपर्यंत सर्वांसोबत काम करत आहे. त्यामुळे कोणताही विरोध किंवा नाराजी होण्याची शक्यता नाही. पक्षाच्या धोरणांप्रमाणे संघटनात्मक बळ वाढविण्यासाठी एकसंघपणे सर्वांनी काम करणे आवश्यक आहे.
  या पत्रकार परिषदेत विनय जकातदार, मधुभाऊ काटे, नंदू बापू सोमवंशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पत्रकार परिषदेस उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. वाघ परिवाराचा भाजपात प्रवेश झाल्याने आगामी निवडणुकांमध्ये पक्षाला मोठा बळकटीचा फायदा होणार असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. पत्रकार परिषदेच्या समारोपप्रसंगी नंदू बापू सोमवंशी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी महोत्सवानिमित्त आज भडगावात भव्य जाहीर व्याख्यानाचे व श्री वाघ यांच्या सत्काराचे आयोजन

Loading

भडगाव – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी भडगाव व कजगाव मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आज, शुक्रवार दिनांक ३० मे रोजी सायंकाळी ६.०० वाजता भडगाव येथे भव्य जाहीर व्याख्यानाचे तसेच जीवनचरित्रावर आधारित चित्रप्रदर्शनीच्या उद्घाटनाचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती संभाजी महाराज सभागृह (डोकोरे हॉल), दत्तनगर, बाळद रोड, भडगाव येथे हा कार्यक्रम पार पडणार असून, यामध्ये जिल्ह्यातील नामवंत वक्ते व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून भाजपा जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्ष मा. डॉ. राधेश्यामजी चौधरी आणि शिवव्याख्याते मा. रविंद्र पाटील (पाचोरा) यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभणार आहे.
या खास प्रसंगी माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांचा भाजप प्रवेशाबद्दल विशेष स्वागत समारंभही होणार आहे कार्यक्रमाच्या आयोजनासाठी भाजपा कजगाव मंडलाचे तालुकाध्यक्ष अनिल पाटील व भाजपा भडगाव मंडलाचे तालुकाध्यक्ष  प्रमोद पाटील यांच्यासह संपूर्ण कार्यकर्ते व स्थानिक पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.
  या कार्यक्रमाला परिसरातील नागरिक, महिला, युवक, अभ्यासक, शिक्षक, विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रेरणादायी कार्याची नव्या पिढीला ओळख पटेल, तसेच त्यांच्या जीवनमूल्यांचा आदर्श समाजात रुजेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
हा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम असल्यानं भडगाव शहर आणि परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पदाधिकारी तसेच विद्यार्थ्यांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सांस्कृतिक वारशाचा गौरव करत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या स्मृतीप्रती कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या या कार्यक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी आज सायंकाळी सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

न पा प्रशासनाचा दुटप्पी धोरणाचा उद्रेक : संतप्त शेतकऱ्याचा ट्रॅक्टर पेटवण्याचा प्रयत्न

Loading

पाचोरा : शहरातील जुना आणि कायमचा अनुत्तरीत प्रश्न म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हातगाडी, फळ-भाजी विक्रेत्यांचे व्यवस्थापन आणि वाहनतळ अभावी उभ्या राहणाऱ्या वाहनांचे प्रश्न हे आजही तितक्याच तीव्रतेने नागरिकांच्या नजीक उभे आहेत. यासंदर्भात अनेकदा आलेले व गेलेले प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी फक्त चर्चेची पातळी गाठली; प्रत्यक्ष कायम स्वरूपी अंमलबजावणी मात्र कधीच दिसली नाही. परिणामी, या निष्क्रियतेचा व दुटप्पी धोरणांचा भडका अखेर एका शेतकऱ्याच्या कृतीतून उफाळून आला. शहरात कांदा विक्रीसाठी आलेल्या एका शेतकऱ्याने प्रशासनाच्या अरेरावीला वैतागून आपले वाहन पेटवण्याचा निर्धार घेतल्याची धक्कादायक घटना गुरुवारी घडली.पाचोरा शहरातील केंद्रस्थानी असलेल्या बाजारपेठेत चारचाकी-दुचाकी वाहने आणि फळभाजी विक्रेत्यांची प्रचंड गर्दी सततचा अनुभव आहे. या भागात कुठलीही अधिकृत आणि मान्यताप्राप्त वाहनतळ नसल्यामुळे पोलीस प्रशासनाची ‘नो-पार्किंग’ झोन कार्यवाही ही कायदेशीरदृष्ट्या प्रश्नचिन्हास्पद ठरते. त्यात भर म्हणजे विक्रेत्यांविषयी प्रशासनाची भूमिका एका बाजूला अती सहनशील आणि दुसऱ्या बाजूला अती कठोर ( सर्वाना सारखे नियम नसल्याने ) या अन्यायाचे गारुड अधिकच गडद होत आहे. विशेषतः एका विशिष्ट टोळीच्या विक्रेत्यांना अभय दिले जाते तर दुसऱ्या शेतकरी वर्गाला मात्र छळ सहन करावा लागतो. हुतात्मा स्मारकापासून ते कन्या शाळेपर्यंत, आणि नीलम हॉटेलपासून ते नगर परिषदेच्या भाजीपाला मार्केटपर्यंत – संपूर्ण परिसरात हातगाड्यांची, फेरीवाल्यांची गर्दी इतकी आहे की पायी चालणेही कठीण झाले आहे. यातून निर्माण होणारी वाहतूक कोंडी, गैरसोय आणि गोंधळ याचा त्रास नागरिकांना तर होतोच; परंतु खरी झळ शिस्तीच्या नावाखाली दमवलेल्या गरीब शेतकऱ्यांना बसते नगरपरिषदेच्या भाजी मार्केटमध्ये दुकानांची डिपॉझिट आणि भाडेवसुली याबाबतही गोंधळाचे वातावरण आहे. कोणाला किती भरावे लागते, कोणाकडून काय घेतले जात नाही – हे सर्व अज्ञात व अलिखित नियमानुसार चालते. पारदर्शकतेच्या नावावर छद्म नाट्य आणि निवडक लोकांसाठीच असलेले नियम हे चित्र अधिकच निराशाजनक आहे. अनेक दुकानांना वर्षानुवर्षे डिपॉझिट न भरता, भाडे न देता जागा वापरण्याची मुभा दिली गेली आहे, तर नवीन येणाऱ्या, विशेषतः ग्रामीण शेतकऱ्यांना कोणीही स्थान देण्यास तयार नाही. या सर्व गोंधळाच्या मुळाशी आहे नगरपरिषदेत कार्यरत कर्मचाऱ्यांची ‘भाकरी न फिरवणारी’ वृत्ती. ही मंडळी कायम स्वरूपी वर्षानुवर्षे एकाच काम कामजात असल्याने त्यांच्या सेटींगमुळे वेळोवेळी विक्रेत्यांकडून उघडपणे किंवा छुप्या स्वरूपात लाभ घेऊन त्यांच्यावर लक्ष न देण्याचा मार्ग स्वीकारतात. त्यामुळेच बाजारपेठेतील शिस्तीचा बोजवारा उडाला आहे. विशेषतः काही कर्मचारी कम अधिकाऱ्यांनी स्वतःला कायमस्वरूपी मालक समजून घेतले असून त्यांची चिरीमिरी आणि पक्षपाती कार्यपद्धती ही सर्व समस्यांचा केंद्रबिंदू आहे. अनेक वेळा शिस्त राखण्याच्या नावाखाली फक्त काही निवडक विक्रेत्यांवर कारवाई केली जाते. बाकी लोक सेटींगच्या आधारे मोकळे फिरतात. परिणामी, निष्पाप विक्रेत्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे  सध्या कार्यरत मुख्याधिकारी व त्यांच्या अधिकाऱ्यांनी आरोग्य विभागाच्या माध्यमातून शहरात स्वच्छते संबंधी सध्याची कामगिरी अप्रतीम आहे. सफाई ठेकेदाराची निवड योग्य A+ झाल्याने रस्ते व सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता व देखभाल चांगल्या प्रकारे केली जाते. मात्र, यामुळे मूळ प्रश्न सुटलेला नाही.वाहन पार्कींग, हातगाडी नियंत्रण, विक्रेत्यांचे एकसंध नियमन यासंदर्भात कोणतीही ठोस कृती किंवा धोरणात्मक अंमलबजावणी झालेली नाही. परिणामी, एकंदरीतच या अनिर्णयामुळे परिस्थिती अधिक बिघडत आहे.या सर्व पार्श्वभूमीवर काल 29 मे रोजी एक धक्कादायक प्रकार घडला. एका शेतकऱ्याने सकाळच्या सुमारास आपला कांदा विक्रीसाठी ट्रॅक्टरने शहरात आणला. अत्यल्प प्रमाणात आणलेला ताजा कांदा तो थेट ग्राहकांना विक्रीसाठी घेऊन आला होता. विक्रीस प्रारंभ होताच नगरपरिषदेचा कर्मचारी तेथे पोहोचला आणि अत्यंत उद्धटपणे त्या शेतकऱ्याशी वागू लागला.शाब्दिक चकमकीत काही कळायच्या आतच संतप्त झालेल्या शेतकऱ्याने आपल्या वाहनावर पेटवण्याचा निर्धार केला. त्याच्या डोळ्यातली असहायता आणि संताप इतका तीव्र होता की आजूबाजूचे नागरिकही हतबुद्ध झाले. सुदैवाने वेळेवर पोलीस,न पा प्रशासनाचे अधिकारी पत्रकार आणि काही सामाजिक कार्यकर्ते तिथे पोहोचले. त्यांनी मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेने केवळ एक व्यक्ती नव्हे, तर संपूर्ण ग्रामीण शेतकरी वर्गाचा आक्रोश समाजासमोर आणला. प्रशासनाने वेळेवर हस्तक्षेप न केला असता, एक मोठा अनुचित प्रसंग घडला असता. या घटनेनंतर भाजीपाला विक्रेत्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली असून शेतकरी वर्गात संतापाचे वातावरण आहे.घडलेल्या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषद प्रशासनाने आता तरी जागे होणे गरजेचे आहे. हातगाडी, फळभाजी विक्रेत्यांसाठी स्पष्ट एकच धोरण व नियमावली असणे गरजेचे आहे आणि ती सर्वसामान्यांसाठी एकसारखी असली पाहिजे. ‘एकाला पोटाशी, दुसऱ्याला पाठीशी’ हे धोरण केवळ अन्यायाचे मूळ आहे. तसेच बाजारात सेटिंगवर चालणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई होणे अत्यावश्यक आहे. त्यांच्यामुळेच प्रशासनाची प्रतिमा मलिन होत आहे. भाकरी फिरवल्यानंतर विशेषतः ‘चहा पेक्षा किटली गरम’ या वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची सावलीसुद्धा बाजारपेठेवर पडू न देणे हाच उत्तम उपाय ठरू शकतो.शेतकरी हा या देशाचा अन्नदाता आहे. त्याने आपल्या श्रमाच्या बदल्यात मिळालेली भाजी बाजारात आणून विकण्यासाठी एवढे कष्ट केले आणि त्या बदल्यात जर त्याला अपमानास्पद वागणूक मिळाली, तर हा समाज म्हणून आपल्यासाठी लाजिरवाणा क्षण आहे.अशा घटनांपासून प्रशासनाने शिकावे आणि शेतकरी तसेच सर्वसामान्य विक्रेत्यांच्या सन्मानाचे संरक्षण व्हावे यासाठी सर्वांसाठी एकच नियम असतील असे योग्य पावले उचलावीत, हीच सर्वांची अपेक्षा आहे. अन्यथा भविष्यात असेच प्रसंग अधिक तीव्र स्वरूप धारण करतील आणि त्याची जबाबदारी संपूर्णतः प्रशासनावरच राहील.

“हॉटेलच्या खोलीतले व्यवहार : कायद्याचा प्रश्न की समाजाच्या नैतिकतेचा अधःपात?”

Loading

पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील एका लॉजिंगवर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात युवक आणि युवती अश्लील अवस्थेत सापडल्याची घटना समोर येताच, समाजमनात एकाच वेळी आश्चर्य, संताप आणि चिंता अशा संमिश्र भावना उमटल्या. या घटनेने समाजातील अनेक पातळ्यांवर असलेली तुटलेली शिस्त, गढूळ नैतिकता आणि गढबडलेल्या व्यवस्थेचे वास्तव उघडे पाडले आहे. केवळ दोन व्यक्तींच्या वैयक्तिक आयुष्याचा प्रश्न म्हणून ही बाब दुर्लक्षित करता येणार नाही. कारण ही घटना आपल्या समाजातील एका मोठ्या वळणाची नोंद करणारी आहे. या प्रकरणात युवक-युवती आक्षेपार्ह स्थितीत आढळले, हे जसे चिंताजनक आहे, तसेच हॉटेल चालकाने विश्वासाने आपल्या व्यवस्थापकावर जबाबदारी सोपवली व्यवस्थापकाने कोणतीही अधिकृत ओळख न तपासता रूम उपलब्ध करून दिली, हे देखील तितकेच गंभीर आहे. हॉटेल व्यावसायिकांनी फक्त नफा मिळवण्याच्या उद्देशाने कायद्याला बगल देऊन, कोणत्याही प्रकारच्या तपासणीशिवाय खोली भाड्याने देणे हा केवळ बेजबाबदारपणाच नव्हे, तर समाजहिताला धोका निर्माण करणारा प्रकार आहे. ग्राहकांची माहिती नोंदवहीमध्ये अपूर्ण होती, ओळखपत्रांची खातरजमा नव्हती, आणि कोणत्याही तपशीलांची शहानिशा केली नव्हती. या साऱ्या गोष्टी एकत्र आल्यावर लक्षात येते की अशा लॉजिंग व्यवसायांच्या मुळांमध्येच भ्रष्टाचार आणि गोंधळ दडलेला आहे. पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक दिनेश भदाणे, पीएसआय योगेश गणगे, हवालदार संदीप राजपूत आणि विश्वास देशमुख यांनी तात्काळ आणि योग्य अशी छापेमारी करत कायद्यासमोर तथ्य ठेवले. ही कारवाई नक्कीच स्वागतार्ह आणि प्रशंसनीय आहे. मात्र प्रश्न उरतो तो म्हणजे – ही कारवाई अपवाद होती की आता पासून नियमित नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे? अशा लॉजिंग्सवर सातत्याने तपासण्या व्हायला हव्यात. ग्राहक नोंदवही, ओळखपत्रे, सीसीटीव्ही कॅमेरे, कर्मचाऱ्यांची पार्श्वभूमी यासारख्या बाबींवर काटेकोर देखरेख ठेवली गेली पाहिजे.
या घटनेतील आणखी एक धक्कादायक पैलू म्हणजे काही तथाकथित भुरटे पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते अशा आबंट शौकीन जोडप्यांना रूम उपलब्ध करून देणाऱ्या लॉजिंगवर ‘नजर’ ठेवतात वेळे प्रसंगी तिथे येणाऱ्या अशा जोडप्यांना स्टाफच्या मदतीने त्यांची माहिती जमा करतात आणि ब्लॅकमेल करून पैसे उकळतात ही बाब अत्यंत लाजिरवाणी आहे. पत्रकारिता ही समाजाचा आरसा मानली जाते,परंतु पत्रकारितेच्या नावावर अशा व्यक्ती स्वतःच समाजाला काळिमा फासणाऱ्या ठरतात. अशी मंडळी पत्रकारितेच्या छत्राखाली स्वतःचा पोटापाण्याचा व्यवसाय चालवत असतील तर हे निंदनीयच नव्हे, तर गुन्हेगारी स्वरूपाचे आहे. त्यांच्यावर देखील कायदेशीर कारवाई होणे अत्यंत गरजेचे आहे.परंतु यासाठी अधिकृत तक्रार देण्यासाठी कोणीही पुढे येणार नाही कारण या सर्व गोष्टी “तेरी भी चूप मेरी भी चुप” अशा स्वरूपात असतात
एकीकडे लॉजिंग व्यवस्थापन बेजबाबदारपणे खोल्या देत आहे, तर दुसरीकडे अशी प्रकरणे हेरून काही भुरटी पत्रकार मंडळी पत्रकार संघटनेच्या नावाने ग्रुप तयार करणे व ‘पकड’ तयार करून पैसे कमावतात – यात शेवटी बळी पडतात ते युवक-युवती. & अनैतिक संबंध जोपासणारे वैवाहिक जोडपे या भडगाव रोड हॉटेल प्रकरणात युवक परधर्मीय असल्याची आणि युवती गरीब कुटुंबातील असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे चुप्प राहीली नाही तर या प्रकरणाला वेगळे सामाजिक आणि धार्मिक वळण लागले असते.असतेच काही धर्मांध व कट्टरपंथीय गट अशा घटनांचा गैरफायदा घेत सामाजिक तेढ वाढवतात, द्वेषभावना पसरवतात आणि सामान्य नागरिकांच्या मनात गोंधळ निर्माण करतात. याचा फटका सर्वसामान्य कुटुंबांना आणि मुलींच्या भविष्याला बसतो. अशा प्रकरणांमध्ये युवतीवर समाजाकडून अधिक मोठा दोष दिला जातो. तिच्या वर्तनावर, कपड्यांवर, बोलण्यात, वागण्यात शंभर प्रश्न विचारले जातात. तिच्या कुटुंबावर कलंक लागतो. समाज माध्यमांमध्ये तिची ओळख व्हायरल होते. अशा प्रसंगांमध्ये युवती मानसिकदृष्ट्या तुटून जाते, आत्महत्येच्या विचारापर्यंत जाते. तिचे शिक्षण, करिअर, वैवाहिक जीवन साऱ्याच गोष्टींवर याचा दुष्परिणाम होतो. म्हणूनच पोलिसांनी आणि माध्यमांनी अशा प्रकरणांमध्ये संबंधित व्यक्तींची ओळख गोपनीय ठेवणे हे कायदेशीरच नव्हे तर मानवीदृष्ट्याही आवश्यक आहे. या साऱ्या प्रकारामध्ये पालक आणि समाजाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. केवळ पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणांकडे दोष देऊन भागणार नाही. पालकांनी आपल्या मुलांशी खुलेपणाने संवाद साधायला हवा, त्यांचे मित्र-मैत्रिणी कोण आहेत, त्यांचा मानसिक आणि भावनिक कल कसा आहे, याकडे लक्ष द्यायला हवे. प्रेम, स्नेह आणि योग्य मार्गदर्शनाने तरुणांना विश्वासात घेणे हे गरजेचे आहे. फक्त दबाव, शिस्त आणि शिक्षा यांच्या माध्यमातून आपण आपल्या मुलांना दूर लोटत असतो आणि ते अशा चुकीच्या वाटांकडे वळतात. या प्रकरणाने आपल्याला एक गोष्ट स्पष्ट करून सांगितली – की समाज म्हणून आपण तुटलो आहोत. नैतिकता, नियम, जबाबदारी, सहिष्णुता या साऱ्या मूल्यांची आपल्याकडे उणीव आहे. हॉटेलचे व्यवस्थापन, पोलिस यंत्रणा, पत्रकारिता, पालक आणि समाज – सर्व घटकांनी एकत्र येऊन या समस्येच्या मुळावर मारायला हवे. नाहीतर अशा घटनांचा प्रादुर्भाव वाढत जाईल आणि हेच आपण उद्याचे समाज म्हणून पाहू इच्छितो का, हा गंभीर प्रश्न आपल्यासमोर उभा राहील. लॉजिंगमध्ये घडलेली ही घटना केवळ पोलिस कारवाईचा भाग नाही. ही आपल्या समाजाच्या अधःपतनाची निशाणी आहे. ही एक चेतावणी आहे – ज्या पातळीवर समाज घसरतोय, त्या पातळीवर जर आपण आज विचार केला नाही, तर उद्याचा काळ आणखीनच भयावह ठरेल. म्हणूनच, फक्त घटना पाहणे पुरेसे नाही, तर त्या घटनांमागे दडलेले संदर्भ समजून घेणे आणि त्यावर उपाययोजना करणे ही काळाची गरज आहे. कायद्याचा धाक, नैतिकतेचे भान आणि समाजिक जबाबदारी यांची सांगड घालूनच आपण अशी घसरलेली परिस्थिती रोखू शकतो. अन्यथा अशा खोल्यांतून बाहेर पडणाऱ्या आवाजात भविष्यात संपूर्ण समाजाची प्रतिष्ठा गमावली जाईल, आणि तेव्हा पश्चातापाला उशीर झालेला असेल.

“वाघ परिवाराचा भाजप सक्रिय राजकीय प्रवेश : पिंपळगाव हरेश्वरात सेवा, श्रद्धा आणि नेतृत्वाचे नवे पर्व”

Loading

राजकारण हे समाजसेवेचे प्रभावी माध्यम आहे, असं म्हटलं जातं. पण हे सत्य कृतीत उतरवणं हे प्रत्येकाच्या शक्तीबाहेरचं असतं. मात्र काही व्यक्तिमत्त्वं आणि कुटुंबं आपल्या सामाजिक भूमिकेतून, निःस्वार्थ सेवाभावातून आणि स्पष्ट नेतृत्वशैलीतून समाजात अशी ओळख निर्माण करतात की, त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात ही सुद्धा एक विचारांचा ध्वजवंदन ठरते. पिंपळगाव हरेश्वर येथे राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त पार पडलेल्या मंदिर स्वच्छता व महाआरती कार्यक्रमाच्या निमित्ताने याचे प्रत्यंतर पुन्हा एकदा आले. भारतीय जनता पक्षात नुकताच प्रवेश केलेल्या वाघ परिवाराने पाचोरा येथे आल्यानंतर अवघ्या काही तासांतच आपली बांधिलकी, कृतीशीलता आणि संघटनशीलता स्पष्ट करत पिंपळगावात एका उदाहरणवत सामाजिक सहभागाचे दर्शन घडवले. या उपक्रमात वाघ परिवाराचे प्रमुख सदस्य, पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ, यांनी स्वतः भाजपाचे स्थानिक पदाधिकारी यांच्या समावेत मंदिर स्वच्छतेच्या कार्यात सहभाग घेतला  वाघ परिवाराचा भारतीय जनता पक्षात प्रवेश ही काही केवळ औपचारिक घटना नव्हती. हा प्रवेश एका सामाजिक विचाराने, जनसंपर्काच्या बळावर आणि सामाजिक बदलाच्या संकल्पनेवर आधारित होता. वाघ कुटुंब हे गेल्या अनेक वर्षांपासून पाचोरा तालुक्यातच नव्हे जिल्ह्याच्या राजकारणात राजकीय,शैक्षणिक, सहकारी आणि ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात सक्रिय असून, नानासाहेब संजय वाघ हे माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांच्यासोबत त्या कार्याचा चेहरा मानले जातात.ज्या दिवशी मुंबई येथे दिलीप भाऊ वाघ यांचा भाजप पक्षप्रवेश झाला त्यानंतर पाचोरा येथे परतल्यावर काही तासातच पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर मंदिर स्वच्छता अभियानात जुन्या भाजप कार्यकर्त्यांसमवेत सहभाग घेतला. केवळ व्यासपीठावर भाषणं करण्याऐवजी त्यांनी श्रमदानातून जनतेशी नाळ जोडली. या कृतीतून त्यांनी जनतेपुढे एक असा आदर्श मांडला की, राजकारणात फक्त सत्ता मिळवणे हा उद्देश नसून, सेवाभाव, सामाजिक समर्पण आणि आध्यात्मिक मूल्यांचा प्रसार हाच खरा हेतू असावा पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन असलेले नानासाहेब संजय वाघ हे शिक्षण क्षेत्रातले एक सशक्त आणि आदरणीय व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली संस्थेच्या विविध शाळांमध्ये केवळ भौतिक सुविधा नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात आला. त्यांनी शाळा म्हणजे चार भिंती आणि शिक्षक एवढाच दृष्टिकोन झुगारून संस्थेच्या कार्यपद्धतीत प्रगत दृष्टिकोन आणला. त्यांची भाषाशैली अत्यंत समंजस,अभ्यास वृत्ती पण ठाम असते. पिंपळगावच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी अतिशय प्रेरणादायी विचार मांडले – “राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त आपण सेवा आणि श्रद्धेच्या मार्गाने पुढे जात आहोत. आज मंदिराची स्वच्छता करताना मला जाणवलं की, आपण समाजात स्वच्छतेसारखे सकारात्मक विचारही रुजवले पाहिजेत. भारतीय जनता पक्षात प्रवेश हा माझ्यासाठी व वाघ परिवारासमवेत आमच्या कार्यकर्त्यांसाठी केवळ राजकीय पाऊल नाही, तर समाज परिवर्तनाच्या मार्गावर एक सामूहिक चाल आहे.”त्यांच्या या मनोगतातून समाजाप्रती असलेली बांधिलकी आणि भारतीय परंपरेप्रती असलेली निष्ठा स्पष्ट जाणवते. त्यांच्या नेतृत्वात पक्षाला विचारशील, अभ्यासू आणि संयमी कार्यकर्त्यांची मोठी ताकद मिळेल, याबाबत कोणतीही शंका नाही.  या कार्यक्रमात उपस्थित असलेले भाजप जिल्हा उपाध्यक्ष मधु भाऊ काटे हे देखील कार्यकर्त्यांमध्ये एक प्रेरणास्थान मानले जातात. त्यांनी आपल्या छोटेखानी भाषणात वाघ कुटुंबाच्या प्रवेशाचं आणि तत्काळ कृतीशील सहभागाचं कौतुक करताना म्हटलं, “आजकाल अनेकजण पक्षात प्रवेश घेतात, पण समाजाशी नाळ जोडणं आणि सर्वांना सोबत घेऊन प्रत्यक्ष कृती करणे हे फार थोड्यांच्याच अंगी असतं. माजी आमदार दिलीपभाऊ वाघ व नानासाहेब संजय वाघ यांचं नेतृत्व, त्यांचा दृष्टिकोन आणि त्यांचा संयमी स्वभाव हे भाजपसाठी एक नवा ऊर्जा स्रोत ठरेल. त्यांच्या अनुभवाचा पक्षाला निश्चितपणे लाभ होईल.”मधु भाऊ काटेंच्या या शब्दांनी केवळ कौतुकच व्यक्त केलं नाही, तर संपूर्ण जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना नव्या नेतृत्वाच्या स्वागतासाठी तयार केलं. या संपूर्ण कार्यक्रमाचा केंद्रबिंदू होता – राजमाता अहिल्याबाई होळकर यांचा जीवन आदर्श. स्वच्छता, भक्ती, सेवा, शिस्त, समाजकल्याण आणि स्त्रीशक्तीचा प्रेरणादायी इतिहास या साऱ्यांचा संगम त्यांच्या कार्यातून घडलेला आहे. पिंपळगावमधील मंदिर स्वच्छता, महाआरती आणि महिला कार्यकर्त्यांचा सक्रीय सहभाग यामध्ये त्यांचा आदर्श स्पष्टपणे प्रतिबिंबित झाला. कार्यक्रमात महिलावर्ग, युवक, ग्रामस्थ, कार्यकर्ते आणि गावातील जेष्ठ मंडळींच्या उपस्थितीने एकात्मतेचे दर्शन घडले. या साऱ्या घडामोडींमध्ये वाघ परिवाराच्या पक्षप्रवेशाची औपचारिकता नव्हे, तर त्यांच्या प्रवेशाची “चिंतनशील सुरुवात” पाहायला मिळाली.वाघ कुटुंबाचा भाजपमध्ये प्रवेश ही घटना एका ठराविक गावापुरती मर्यादित राहिलेली नाही. ती एक व्यापक संदेश घेऊन आली आहे – की राजकारण ही जर लोकसेवेची दिशा असेल, तर त्याची सुरुवात प्रत्यक्ष समाजात उतरून करावी लागते. मतपेढ्या आणि घोषणा यापेक्षा अधिक प्रभावी असतो तो जनतेतला विश्वास. आणि वाघ कुटुंबाने, विशेषतः नानासाहेब संजय वाघ यांनी, या विश्वासाचं बीज पहिल्याच दिवशी पेरलं आहे. राजकारणात प्रवेश करताच मंदिरात स्वच्छता आणि आरती – हा काही लोकांना “प्रचाराचा प्रयत्न” वाटू शकतो. पण अशा कृतींचं विश्लेषण केवळ बाह्यदृष्टीने केल्यास त्यातला सखोल भावार्थ उमगणार नाही. हाच तर अहिल्याबाईंचा मार्ग होता – कृती, संस्कार आणि समर्पण पिंपळगाव हरेश्वर येथील या कार्यक्रमामुळे वाघ कुटुंबाच्या नेतृत्वाच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते, स्थानिक भाजपचे जुने व वाघ परिवारासोबत भाजपात नवीन आलेले कार्यकर्ते, महिला मंडळ, युवक मंडळ आणि ग्रामस्थ यांचा एकत्र सहभाग हा केवळ एक कार्यक्रम नव्हता – ती एक चळवळ होती. वाघ कुटुंब आता केवळ सहकारी शिक्षण क्षेत्रात नव्हे, तर राजकारणातही एक जबाबदार आणि विचारशील उपस्थिती म्हणून आपली भूमिका निभावेल, अशी आशा आहे. लोकशाही प्रक्रियेतील सक्रिय सहभाग आणि विचाराधारित कृती यांचा आदर्श तयार करत, वाघ कुटुंब भारतीय जनता पक्षाच्या तालुका पातळीवर नव्हे तर जिल्हास्तरावरही एक महत्त्वाचा स्तंभ ठरेल, याबाबत आता कुठलाही प्रश्न उरलेला नाही.

“राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त भाजप तर्फे हरिहरेश्वर मंदिरात स्वच्छता, सेवा व संस्कारांचा संगम”

Loading

पाचोरा – तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त अत्यंत भावपूर्ण व प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात हरिहरेश्वर मंदिरात स्वच्छता अभियान, महादेवाची महाआरती व सामूहिक सहभागातून श्रमदानाच्या माध्यमातून एक नवा आदर्श निर्माण करण्यात आला. राजमाता अहिल्यादेवी होळकर या केवळ एक यशस्वी राज्यकर्त्या नव्हत्या, तर त्या एक धर्मपरायण, जनकल्याणकारी, दूरदृष्टी असलेल्या आदर्श स्त्री नेतृत्वाचं ज्वलंत उदाहरण होत्या. त्यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त देशभरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पिंपळगाव हरेश्वर हे या यादीत एक विशेष ठिकाण ठरले, कारण येथे झालेल्या कार्यक्रमात भक्ती, स्वच्छता आणि सामूहिक

एकजुटीचा अनोखा संगम पाहायला मिळाला.या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये कोणताही औपचारिकता वा मोठ्या भाषणांचा गडबड न करता, प्रत्यक्ष कृतीच्या माध्यमातून पुण्यस्मरण केले गेले. सकाळीच ग्रामस्थ, कार्यकर्ते, महिलावर्ग, युवा मंडळी मंदिरात जमले. त्यांनी प्रथम मंदिर परिसराची स्वच्छता केली. जमिनीवर पडलेले कचरा, वाळलेली झाडांची पाने, कुजलेल्या फुलांचे अवशेष व धुळकट झालेली दगडी पायऱ्या स्वच्छ करण्यात आल्या. मंदिराच्या सभोवतालचा परिसर झाडून स्वच्छ केला गेला. नंतर मंदिरातील नंदी, महादेवाच्या पिंडीवर चढलेल्या जुने पूजासामग्री स्वच्छ करण्यात आली. या श्रमदानात पुरुषांसोबत महिलांनीही उत्साहाने भाग घेतला. स्वच्छता अभियानानंतर संपूर्ण मंदिर परिसरात दिव्य वातावरण निर्माण झाले. नंतर महादेवाची महाआरती अत्यंत भक्तिभावाने पार पडली. मंदिरामध्ये ‘ओं नमः शिवाय’ चा गजर, टाळ-मृदंगाचा नाद, भक्तीमय आरतीचे सूर आणि सुगंधित धुपाचा दरवळ असा एक सजीव आध्यात्मिक अनुभव सहभागी प्रत्येकाच्या मनात रुजून गेला.कार्यक्रमाचे नेतृत्व पिंपळगाव मंडळाच्या अध्यक्षा सौ. शोभाताई शांतीलाल तेली यांनी उत्साहाने केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण नियोजन नीट आणि सुसज्ज पद्धतीने पार पडले. कार्यक्रमास डॉ. शांतीलाल तेली यांची उपस्थिती विशेष महत्त्वाची ठरली. त्यांनी सामाजिक समरसतेचा व संस्कारांचा संदेश देत उपस्थितांना अहिल्याबाईंच्या कार्याचे स्मरण करून दिले.भाजप जिल्हा उपाध्यक्ष मधुभाऊ काटे हेही उपस्थित होते. त्यांनी आपल्या छोटेखानी भाषणातून सांगितले की, “अहिल्यादेवी होळकर यांनी भारतात मंदिरे, धर्मशाळा, तळी, घाट बांधून केवळ धर्म नव्हे तर समाजाचे पुनरुत्थान केले. आज त्यांच्या जयंतीला अशा सेवाभावी कार्यक्रमातून आपण त्यांना खरी श्रद्धांजली अर्पण करत आहोत.”या कार्यक्रमात नुकताच भाजपामध्ये प्रवेश केलेले पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ हे स्वतः सहभागी होते. त्यांनी देखील मंदिर स्वच्छतेच्या कार्यात स्वतः झाडू घेत भाग घेतला. त्यांच्या मनोगतात त्यांनी नमूद केले की, “राजमाता अहिल्याबाई होळकर या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासातील एक तेजस्वी पर्व आहेत. त्यांचे जीवन हे समर्पण, सेवा, शिस्त आणि नीतिमत्तेचा सर्वोच्च आदर्श आहे. आज त्यांच्याच शिकवणीप्रमाणे आपण प्रत्येकाने समाजासाठी काहीतरी योगदान देण्याचा निर्धार केला पाहिजे. हा कार्यक्रम केवळ श्रद्धांजली नव्हे, तर आपल्या जीवनातील एक सुसंस्कारित पाऊल आहे.”कार्यक्रमात शिवदास तात्या पाटील, अनिल धना पाटील, विनोद महाजन, मौजूलाल जैन, पंडित तेली, संतोष कुटे, गोविंदा येवळे, प्रशांत तेली, प्रशांत पाटील, सुनील सर, योगेश हटकर, भडांगे सर, अशोक हरी पाटील, आणि महिला मंडळाच्या कार्यकर्त्या तसेच इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महिलांनी फुलांनी व रांगोळीने मंदिर परिसर सजवला. त्यांचे योगदानही लक्षणीय ठरले.कार्यक्रमामध्ये लहान मुला-मुलींनाही सहभागी करून घेण्यात आले. त्यांना अहिल्यादेवींच्या जीवनकार्याची ओळख करून देण्यात आली. पिंपळगाव हरेश्वरमध्ये झालेला हा कार्यक्रम म्हणजे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतीला साजेशी जयंती ठरली. या दिवशी केवळ शोभेची भाषणे झाली नाहीत, तर प्रत्यक्ष कृतीतून आदर्श निर्माण झाला. सामाजिक समरसतेचा संदेश, भक्तिभावाचे दर्शन, स्वच्छतेचा वसा, आणि संस्कारांची प्रेरणा या सर्वांचा एकत्र संगम पिंपळगावने अनुभवला.

नऊ वर्षांनंतर आरसीबी आयपीएलच्या अंतिम फेरीत; पंजाब किंग्जचा ६० चेंडू शिल्लक राखून केला पराभव

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : गोलंदाजांच्या कामगिरीनंतर, फिल साॅल्टच्या अर्धशतकाच्या मदतीने, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) ने क्वालिफायर-१ सामन्यात पंजाब किंग्जचा पराभव केला आणि आयपीएल २०२५ च्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. या सामन्यात आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पंजाब संघाला १४.१ षटकात फक्त १०१ धावांवर गुंडाळले. प्रत्युत्तरात आरसीबीने १० षटकात दोन गडी बाद १०६ धावा केल्या आणि सामना जिंकला.
आरसीबी संघ आता पहिले जेतेपद जिंकण्यापासून एक पाऊल दूर आहे. पराभव होऊनही पंजाब संघाला जेतेपदाच्या सामन्यात प्रवेश करण्याची अजून एक संधी आहे. गट टप्प्यात अव्वल स्थानावर असल्याने, पंजाबला अतिरिक्त संधी मिळेल. पंजाबचा सामना रविवारी क्वालिफायर-२ मध्ये गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात शुक्रवारी होणाऱ्या एलिमिनेटरच्या विजेत्याशी होईल. जर पंजाबने तो सामना जिंकला तर ते अंतिम फेरीत पोहोचू शकतील जिथे त्यांचा सामना ३ जून रोजी अहमदाबादमध्ये आरसीबीशी होईल. कमी लक्ष्याचा पाठलाग करताना, आरसीबीने विराट कोहलीची विकेट लवकर गमावली, जो १२ चेंडूत दोन चौकारांच्या मदतीने १२ धावा काढून बाद झाला. त्यानंतर साॅल्ट आणि मयंक अगरवालने डाव पुढे नेला आणि संघाला विजयाच्या जवळ नेले. तथापि, मुशीर खानने मयंकला श्रेयस अय्यरच्या हाती झेल देऊन तंबूमध्ये पाठवले. १३ चेंडूत दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १९ धावा काढून मयंक बाद झाला. साॅल्टने २३ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. आयपीएल प्लेऑफमध्ये आरसीबीसाठी हे सर्वात कमी चेंडूंमध्ये केलेले अर्धशतक आहे. या बाबतीत सॉल्टने ख्रिस गेलला मागे टाकले, ज्याने २०१६ मध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्ध २५ चेंडूत अर्धशतक झळकावले होते. साॅल्ट येथेच थांबला नाही आणि तो संघ जिंकेपर्यंत खेळपट्टीवर राहिला. कर्णधार रजत पाटीदारने मुशीर खानच्या चेंडूवर षटकार मारून संघाला जेतेपदाच्या सामन्यात नेले. साॅल्टने २७ चेंडूत सहा चौकार आणि तीन षटकारांसह ५६ धावा काढल्यानंतर नाबाद राहिला, तर पाटीदारने आठ चेंडूत एक चौकार आणि एक षटकारासह १५ धावा काढल्या.
यापूर्वी, पंजाबची फलंदाजी खूपच खराब होती आणि संघाने निराशाजनक कामगिरी केली. त्यांच्याकडून मार्कस स्टोइनिसने सर्वाधिक २६ धावा केल्या. त्याच वेळी, प्रभसिमरन आणि अझमतुल्लाह उमरझाई प्रत्येकी १८ धावा करून बाद झाले. त्यांचे सहा फलंदाज दुहेरी आकडाही गाठू शकले नाहीत. पंजाबची फलंदाजी इतकी खराब होती की संघ पूर्ण २० षटकेही खेळू शकला नाही. यासह पंजाबने एक नको असलेला विक्रम आपल्या नावावर केला. पंजाबचा संघ आयपीएल प्लेऑफमध्ये सर्वात कमी षटके फलंदाजी करणारा संघ बनला आहे. २००८ मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स (आता कॅपिटल्स) ने बनवलेला हा नको असलेला विक्रम त्यांनी मागे टाकला. त्यावेळी, दिल्लीचा संघ राजस्थान रॉयल्सविरुद्ध फक्त १६.१ षटके फलंदाजी करू शकला. आयपीएल प्लेऑफमधील ही संयुक्त तिसरी सर्वात कमी धावसंख्या आहे. आरसीबीकडून जोश हेझलवूड आणि सुयश शर्माने प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या तर यश दयालने दोन विकेट्स घेतल्या. याशिवाय भुवनेश्वर कुमार आणि रोमारियो शेफर्ड यांना प्रत्येकी एक यश मिळाले.

पाचोरा पत्रकारांच्या पुढाकाराने जनतेच्या समस्या ऐकल्या; आ. किशोरआप्पा पाटील यांच्या आदेशाने उद्या सर्व बँक व्यवस्थापकांची तातडीची बैठक

Oplus_16777216

Loading

पाचोरा — शहर व तालुक्यातील नागरिक, शेतकरी, व्यापारी, विद्यार्थ्यांचा अत्यंत महत्वाचा आणि दैनंदिन गरजांशी निगडित असलेला विषय म्हणजे एटीएम सेवा आणि बँक व्यवहारांतील सातत्याने निर्माण होणाऱ्या अडचणी. या गंभीर समस्येकडे शासन, प्रशासन आणि बँक व्यवस्थापनाचे लक्ष वेधण्यासाठी पाचोरा शहरातील पत्रकारांनी पुढाकार घेतला असून, दिनांक 29 मे रोजी प्रांताधिकारी भूषण अहिरे यांच्यासह स्थानिक आमदार किशोरआप्पा पाटील यांचे प्रतिनिधी व जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील यांना एक सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनाची दखल घेत, आमदार किशोरआप्पा पाटील यांनी तत्काळ नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी तातडीने कृती सुरू केली आहे. त्यांनी प्रांताधिकारी कार्यालयात उद्या दिनांक 30 मे रोजी पाचोरा शहरातील सर्व बँक व्यवस्थापकांची तातडीची बैठक आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. या बैठकीत बँक व्यवस्थापक यांच्यात थेट संवाद साधून समस्यांचे त्वरित निराकरण करण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे.
सध्याची परिस्थिती पाहता, पाचोरा शहरासह आसपासच्या ग्रामीण भागातील लोक सतत अडचणीत सापडले आहेत. विशेषतः राष्ट्रीयकृत व खाजगी बँकांचे एटीएम केंद्रे वारंवार बंद असल्याने, नागरिकांना आवश्यक त्या वेळी रोख रक्कम मिळण्यात मोठी अडचण निर्माण होत आहे. काही ठिकाणी ‘नेटवर्क समस्या’, ‘ कॅश उपलब्ध नाही’, ‘देखभाल सुरू आहे’ अशा सूचना लावून सेवा बंद ठेवली जाते. तर काही ठिकाणी यंत्रणेच पूर्णपणे बंद असून, ग्राहकांना केवळ निराशाच पदरी पडते. या समस्येचा सर्वाधिक फटका सध्या शेतकरी वर्गाला बसत आहे. खरीप हंगाम तोंडावर असताना शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते, कीटकनाशके खरेदीसाठी रोख रक्कमेची निकड असते. अनेक शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पीक कर्जाच्या स्वरूपात रक्कम जमा झालेली आहे. परंतु, एटीएम सेवा बंद असल्यामुळे किंवा बँकांमध्ये होणारी गर्दी आणि तांत्रिक अडचणीमुळे त्यांना आपलीच रक्कम वेळेवर मिळत नाही. परिणामी, शेतकऱ्यांचे शेतीचे नियोजन पूर्णपणे विस्कळीत होत असून, त्यांच्यावर आर्थिक व मानसिक तणाव वाढला आहे. म्हणून पाचोरा येथील पत्रकारांनी सादर केलेल्या निवेदनात नागरिकांच्या व शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत. निवेदनात पुढीलप्रमाणे स्पष्ट व ठोस मागण्या मांडण्यात आल्या आहेत 1. पाचोरा शहर व तालुक्यातील सर्व एटीएम केंद्रांची तातडीने तपासणी करावी.& सध्या किती एटीएम कार्यरत आहेत, किती बंद आहेत, याचा संपूर्ण डेटा संकलित करावा.2) जे एटीएम वारंवार किंवा सतत बंद राहत आहेत, त्यांना कार्यान्वित करण्यासाठी ठोस कार्यवाही करावी.
3) प्रत्येक बँकेने किमान एक एटीएम केंद्र २४ तास कार्यरत ठेवावे.विशेषतः शेतकरी व विद्यार्थी वर्गासाठी ही सेवा अत्यावश्यक आहे. 4) प्रत्येक एटीएम कॅबिनमध्ये, मशीन बंद किंवा नादुरुस्त असल्यास त्वरित संपर्क साधता यावा यासाठी सूचना फलक लावावा. यामध्ये संबंधित बँकेच्या किमान चार अधिकाऱ्यांची नावे व ( कार्यान्वीत ) मोबाइल क्रमांक नमूद असावेत.5.) बँकेच्या सेवा संदर्भात नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी नागरीकां कडून लेखी स्वरूपात संकलित करून त्यावर संयुक्त बैठक घ्यावी. 6) बँक व्यवहारासाठी हिंदी व मराठीत मितभाषी अधिकारी/कर्मचारी नियुक्त करावेत.
या निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, वरील सर्व मागण्या 5 जून 2025 पर्यंत पूर्ण करण्यात याव्यात. अन्यथा, जनहितार्थ सामाजिक बांधिलकीतून लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल.
यामध्ये सतत बंद राहणाऱ्या एटीएम केंद्रांना ढोल-ताशांच्या गजरात पुष्पहार अर्पण करून लोकशाही पद्धतीने ‘अंत्यसंस्कार’ करण्यात येतील. विशेषतः रेल्वे स्टेशनबाहेर असलेले सतत बंद राहणारे एटीएम केंद्र हे आंदोलनाचे प्रमुख केंद्र ठरणार आहे.
यानंतर संबंधित बँक व्यवस्थापकांना गुलाबपुष्प व पेन अर्पण करून त्यांच्या सजगतेसाठी ‘नम्रतेने जागृती’ करण्यात येईल. शेवटी, जर बँक व्यवस्थापनाने सकारात्मक कार्यवाही केली नाही, तर कोणतीही पूर्वसूचना न देता बँकेसमोर ‘ढोल बजाओ आंदोलन’ राबवण्यात येईल.
हा लढा केवळ सामाजिक बांधिलकीतून… राजकारणाशी काहीही संबंध नाही!
या संपूर्ण चळवळीचा मूळ हेतू म्हणजे जनतेच्या मुलभूत गरजांकडे लक्ष वेधून त्या सोडविणे. या आंदोलनाचा कोणत्याही राजकीय पक्षाशी वा प्रवृत्तीसोबत संबंध नसून, पत्रकारांनी सामाजिक बांधिलकीतून आणि जनहिताच्या भूमिकेतून पुढाकार घेतल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. या निवेदनाची प्रत खालील अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे, जेणेकरून संबंधित यंत्रणाही या गंभीर समस्येकडे लक्ष देतील व समन्वयाने काम करतील 1)मा. डीवायएसपी साहेब, पाचोरा, जि. जळगाव 2) मा. तहसीलदार साहेब, पाचोरा, जि. जळगाव 3) मा. पोलिस निरीक्षक साहेब, पाचोरा, जि. जळगाव 4) मा. रेल्वे स्टेशन अधीक्षक साहेब, पाचोरा, जि. जळगाव
या संपूर्ण घडामोडीत आमदार किशोरआप्पा पाटील यांची तात्काळ प्रतिक्रिया आणि कार्यवाही उल्लेखनीय ठरली आहे. निवेदन प्राप्त होताच त्यांनी काही सेकंदात याची गंभीर दखल घेत, लगेचच उद्याच सर्व बँक व्यवस्थापकांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत सर्व अडचणींचा सखोल आढावा घेऊन, नागरिक व शेतकऱ्यांच्या प्रश्नांची त्वरित सोडवणूक करण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. या प्रकारे पत्रकारांनी केलेल्या संयमी व लोकशाही माध्यमातून सुरू झालेल्या चळवळीला प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून मिळालेला प्रतिसाद निश्चितच आदर्शवत आहे. ही बैठक व त्यानंतर होणारी कार्यवाही पाचोरा शहर व तालुक्याच्या बँकिंग प्रणालीत सकारात्मक बदल घडवून आणेल, अशी सर्वसामान्यांची आशा आहे.

पाचोऱ्यातील बंद एटीएममुळे शेतकरी व सामान्य नागरिक त्रस्त; पत्रकार आंदोलनासाठी सज्ज

Loading

पाचोरा : -सध्याच्या काळात देशाच्या कणा असलेल्या शेतकऱ्यांचे जीवन अधिकच कठीण बनले असून, शेतीसाठी अत्यावश्यक असलेल्या पैशांसाठी त्यांना अक्षरशः वणवण भटकावे लागत आहे. पिकांची लागवड सुरू होण्याच्या तोंडावरच शेतकऱ्यांना बियाणे, खते, कीडनाशके आणि इतर शेतीसाठी लागणाऱ्या साधनसामुग्रीसाठी रोख रक्कमेची नितांत गरज असते. मात्र, पाचोरा शहरासह संपूर्ण तालुक्यातील बहुतांश एटीएम सेवा गेल्या अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे बँकेतून पैसे काढणे अत्यंत कठीण झाले असून, याचा सर्वात मोठा फटका ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना बसत आहे.विशेष म्हणजे, अनेक शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये शासकीय मदतीच्या, सोसायट्यांच्या किंवा पीककर्जाच्या माध्यमातून रक्कम जमा झाली आहे. मात्र, ती रक्कम प्रत्यक्षात मिळवण्यासाठी त्यांना बँकेच्या शाखांमध्ये दीर्घ रांगा लावाव्या लागत आहेत किंवा बंद एटीएमपुढे रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. काही शेतकऱ्यांनी तर पैसे काढण्यासाठी १० ते १५ किलोमीटरचा प्रवास करून दुसऱ्या गावातील बँकांमध्ये धाव घेतली आहे, पण तिथेही कधी कॅश नसते, तर कधी नेटवर्क नाही. परिणामी, शेतकरी वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे.या पार्श्वभूमीवर आता पत्रकार बांधवांनी आपल्या संघटना गत तट बाजूला सारून एकत्र येऊन या गंभीर प्रश्नाला वाचा फोडण्याचा निर्धार केला आहे. सध्या बातम्या संकलित करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी एकजूट होण्याची गरज असल्याचे स्पष्ट करत, पत्रकारांना संघटना, गट-तट, मतभेद यापलीकडे जाऊन एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पाचोरा शहरातील पत्रकारांनी ठरवले आहे की, केवळ बातम्यांपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरून, आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आवाज शासनदरबारी पोहोचवला जाईल.या आंदोलनाचा प्रारंभ शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येऊन करण्यात येणार आहे. २९ मे गुरुवारी सकाळी ११ वाजता सर्व पत्रकारांनी या ठिकाणी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यानंतर प्रांताधिकारी कार्यालय व पाचोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोरआप्पा पाटील यांना निवेदन सादर करण्यात येईल. निवेदनाद्वारे शहरातील सर्व बंद एटीएम तातडीने सुरु करण्याची मागणी केली जाईल. तसेच, एक आठवड्याच्या आत ही एटीएम सेवा पूर्ववत झाली नाही, तर त्या त्या बँकेच्या बंद एटीएमवर अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवण्यात येणार आहे.या निषेधात बंद एटीएमवर ढोल-ताशांच्या गजरात पुष्पहार अर्पण करून संबंधित बँकेच्या व्यवस्थापकाला बँकेत जाऊन एटीएम सेवा तात्काळ सुरू कराव्या यासाठी गुलाबपुष्प देत विनंती करण्यात येणार आहे या आंदोलनामागे कुठलाही राजकीय हेतू नसून, हा शुद्ध सामाजिक आणि जनहितार्थ उपक्रम असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. बँकिंग सुविधा बंद ठेवणे हे केवळ तांत्रिक अडचण नसून, शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्य नागरिकांच्या भावनांशी खेळणारे कृत्य आहे. शहरातील व तालुक्यातील इतर सामाजिक संस्था, कार्यकर्ते, शेतकरी संघटना, व्यापारी संघटना आणि विद्यार्थ्यांनी देखील या आंदोलनात सहभागी होऊन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे. पत्रकारांनी जर एकत्रितपणे आवाज उठवला, तर प्रशासन आणि बँका निश्चितच जागरूक होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे उद्या २९ मे रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात जास्तीत जास्त पत्रकारांनी उपस्थित राहावे, ही नम्र विनंती आयोजकांनी केली आहे.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!