मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : शनिवार, दिनांक ११ जानेवारी २०२५ रोजी ज्ञानदीप मंडळ संचलित सेंट जोसेफ कला आणि वाणिज्य महाविद्यालय, सत्पाळा, विरार (पश्चिम) यांच्या सेल्फ फायनान्स विभागाच्या वतीने ‘उद्योजकता प्रशिक्षण अर्थात Enterpreneural Talk Show’ चे आयोजन करण्यात आले होते. वसई विरार मधील प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय विल्फ्रेड डिमोंटि आणि जॉय डायस यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. कविता आल्मेडा यांनी सांगितले, की उद्योगात आपण जितका जास्त धोका पत्करू तितका नफा जास्त कमवितो. प्रसिद्ध उद्योजक विल्फ्रेड म्हणाले, “कोणताही व्यवसाय यशस्वी होण्यासाठी आणि नफा कमवण्यासाठी प्रयत्न अत्यंत महत्त्वाचे असतात. व्यवसायामध्ये संघर्ष, सातत्य आणि आत्मविश्वासाची नितांत गरज असते.” सदर कार्यक्रमात बोलताना प्रसिद्ध उद्योजक जॉय डायस म्हणाले, “व्यवसायातील उज्वल यशासाठी आणि भवितव्यासाठी तुमचा जनसंपर्क दांडगा असायला हवा. प्रत्येक ग्राहकाला भगवान मानता यायला हवे.” कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि उद्योजकांचे स्वागत सेल्फ फायनान्स कॉर्डिनेटर डॉ. दीपा लोपीस यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सबिना कोरीया आणि आभार प्रदर्शन अलिशा तुस्कानो यांनी केले. सदर कार्यक्रमास आई क्यू एसी कॉर्डिनेटर डॉ. विन्सेंट डिमेलो, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सुभाष डिसोजा आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सेल्फ फायनान्स विभागाच्या सर्व प्राध्यापकांनी अथक परिश्रम घेतले.
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अभ्युदयनगर येथील बालगोपाल सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाने केईएम हॉस्पिटलच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे, जे रविवार, १९ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९:०० ते दुपारी ३:०० वाजेपर्यंत गणराज सभागृह, इमारत क्र.१६ च्या बाजूला, अभ्युदय नगर, काळाचौकी, मुंबई-४०००३३, येथे आयोजित केले जाईल.
रक्तदान शिबिराचे उद्दिष्ट गरजू रुग्णांना मदत करण्यासाठी इच्छुक रक्तदात्यांकडून रक्त संकलन करणे आहे. रक्तदात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, यशस्वीरित्या रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला २४ इंची ट्रॅव्हल बॅग ही आकर्षक भेट दिली जाईल. रक्तदान शिबिराचे आयोजक जनतेला मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आणि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करत आहेत. हे शिबिर म्हणजे एका उदात्त कार्यात योगदान देण्याची आणि जीव वाचवण्याची सर्वोत्कृष्ट संधी आहे.
“आम्ही सर्वांना पुढे येऊन गरजूंना मदत करण्यासाठी रक्तदान करण्याचे आवाहन करतो,” असे बालगोपाल सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे प्रवक्ते म्हणाले. “प्रत्येक रक्तदान तीन जीव वाचवू शकते आणि आम्हाला आशा आहे की आमचे शिबिर लोकांना समाजाचे ऋण परतफेड करण्यास प्रेरित करेल. आम्ही सर्व रक्तदात्यांना रक्तदान शिबिरात सहभागी होण्याचे आणि ते यशस्वी करण्याचे आवाहन करतो. तुमचे योगदान अनमोल जीव वाचवण्यास आणि समाजमनावर सकारात्मक परिणाम करण्यास मदत करू शकते.”
धाराशिव (गुरुदत्त वाकदेकर) : माऊली रुक्माई तुळसाई प्रतिष्ठान व कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय नळदुर्ग, यांच्या संयुक्त विद्यमाने कवयित्री कविता पुदाले यांच्या संकल्पनेतून ‘आई’ एक दिवसीय साहित्य संमेलन थाटात संपन्न झाले. संमेलनाचे हे चौथे वर्ष आहे.
कार्यक्रमाची सुरुवात कमल नलावडे यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाच्या उद्घाटनाने झाली. ग्रंथदिंडी डॉ. सुलभा देशमुख यांच्या शुभहस्ते ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पूजन झाले. यावेळी प्राचार्य. डॉ. सुभाष राठोड, प्रा . रणजित दांगट, डॉ. सुभाष जोगदंडे, डॉ. हशमबेग मिर्झा, डॉ. दयानंद भोवाळ, डॉ. तुळशिराम दबडे, डॉ. दिपक जगदाळे, अधिक्षक धनंजय पाटील, शिवाजीराव घुगे अणदूर यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थ्यावर योग्य संस्कार होण्यासाठी प्रा. रणजित दांगट यांच्या ‘आई समजून घेताना’ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या व्याख्यानात त्यांनी आई विषय अत्यंत अलवारपणे व जिव्हाळ्याने श्रोत्यांना समजावून सांगितला आणि असे कार्यक्रम वारंवार व्हायला हवेत असे म्हणून आयोजकांना धन्यवाद दिले. या परिसंवादाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुभाष राठोड यांनी “आमचे महाविद्यालय नेहमीच समाजकार्य करणाऱ्या व्यक्तींच्या मदतीला सदैव तत्पर असेल असे आश्वासन दिले.”
सदर कार्यक्रमात प्रतिष्ठानतर्फे कौटूंबिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करण्याऱ्या महिला सेवाव्रतींना ‘मातोश्री पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. त्यामध्ये डॉ. सुलभा दिलीप देशमुख, धाराशिव (माजी प्राचार्य), डॉ. रेखा अनिल ढगे, (कवयित्री) धारशिव, तृप्ती जगदिश काटकर, कोल्हापूर यांचा समावेश होता. तर सुरभी बी. के. (गीतकार) वडगांव सिध्देश्वर, धाराशिव यांना विशेष सन्मान देऊन गौरविण्यात आले.
सदर संमेलनात ‘आई’ विषयावर घेतलेले कवी संमेलन अतिशय रंगतदार झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. शिवाजी गायकवाड होते. प्रमुख पाहूणे डॉ. रेखा ढगे आणि अरविंद हंगरगेकर होते. अध्यक्षीय भाषणात डॉ. गायकवाड यांनी आपल्या कवितेतून आई विषय मांडला. गेल्या चार वर्षापासून चालू असलेल्या आई एक महाकाव्य व आई समजून घेतांना कार्यक्रमासाठी आयोजकांचे कौतूक केले व शुभेच्छा दिल्या.
कविसंमेलनामध्ये डॉ. मधुकर हुजरे, धाराशिव, नागोराव सोनकुसरे, नागपुर, रुपेशकुमार जावळे, सुरभी भोजने वडगांव (सिध्देश्वर), गणेश मगर वाघोली, बाळासाहेब मगर धाराशिव, महाविद्यालयीन विद्यार्थीनी शिवानी जगताप, स्नेहल जाधव, निकिता घुगे, निकिता जाधव, प्रज्ञा सुरवसे यांनी कविता सादर केल्या.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अरविंद हंगरगेकर, डॉ. संतोष पवार आणि डॉ. सचिन देवव्दारे यांनी केले. तर आभार डॉ. तुळशिराम दबडे व डॉ. लक्ष्मण थिट्टे यांनी मानले. आईच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित केलेल्या कल्पक कार्यक्रमाचे आयोजन रमेशराव पुदाले, सुनील उकंडे, कविता पुदाले, डॉ. अरविंद हंगरगेकर, डॉ. रुपेशकुमार जावळे, डॉ. सुभाष जोगदंडे, डॉ. डी. जी. जाधव, डॉ. एच. एम. मिर्झा, डॉ. पी. एस. गायकवाड, प्रा. अशिष हंगरगेकर, डॉ. संतोष पवार व सर्व सदस्य माऊली रुक्माई तुळसाई प्रतिष्ठान, नळदुर्ग यांनी केले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सिध्दु सुतार, सचिदानंद घुगे, भागीनाथ बनसोड, दतात्रय कांबळे, मधुकर माने, सचिन गायकवाड, भिमराव गवारे यांनी परिश्रम घेतले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. आलेल्या मान्यवरांच्या शुभहस्ते महाविद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपणदेखील करण्यात आले.
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : ३५वी महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धा जाहीर झाली असून सांस्कृतिक कार्य संचालनालयाने २० जानेवारी २०२५ पर्यंत व्यावसायिक नाट्यनिर्मात्यांकडून प्रवेशिका मागविल्या आहेत. २५ जानेवारी २०२५ पासून सुरू होणारी ही प्रतिष्ठित स्पर्धा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार आणि मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे, असे सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी सांगत मराठी व्यावसायिक नाट्य संस्थांना या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. स्पर्धेची प्राथमिक फेरी २५ जानेवारी ते १० मार्च २०२५ या कालावधीत होणार आहे.
सदर स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी संस्था संचालनालयाच्या वेबसाइटवर https://mahanatyaspardha.com ऑनलाइन उपलब्ध असलेल्या प्रवेश अर्जाचे विहित नमुने भरू शकतात. प्रवेश अर्ज २० जानेवारी २०२५ पर्यंत आवश्यक कागदपत्रांसह सादर करणे आवश्यक आहे. अंतिम मुदतीनंतर प्रवेशिका स्वीकारल्या जाणार नाहीत. तसेच आवश्यक कागदपत्रे जोडलेली नसल्यास किंवा संपूर्ण तपशील भरला नसल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही. संस्थांना नाट्य स्पर्धेसाठी असलेल्या सरकारी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे आणि कोणत्याही नियमाचे उल्लंघन केल्यास स्पर्धक संस्था स्पर्धेसाठी अपात्र ठरू शकते.
व्यावसायिक नाट्यसंस्थांसाठी ही स्पर्धा त्यांच्या कलागुणांचे प्रदर्शन करण्याची उत्तम संधी असून, जास्तीत जास्त संस्थांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी केले आहे.
पुणे – भिडेवाडाकार विजय वडवेराव आयोजित जगातील पहिलाच आंतरराष्ट्रीय काव्य जागर अभियानांतर्गत आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल पुणे २०२५ पहिल्यांदाच एस.एम.जोशी फाऊंडेशन सभागृह नवी पेठ पुणे येथे साजरा करण्यात आला आंतरराष्ट्रीय काव्य जागर पुणे फेस्टिवलचा कार्यक्रम दिनांक २ जानेवारी २०२५ ते ५ जानेवारी २०२५ पर्यत चालला यात जगभरातील साहशे हुन अधिक साहित्यिक उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय संमेलनात सर्व कवी कवयित्री सहभागी झाले होते या संमेलनात उत्रान येथील युवा कवी वैभव प्रभाकर महाजन यांनी सहभाग नोंदवून “भिडेवाडा” देशातील मुलींची पहिली शाळा या विषयावर आपली स्वरचित कविता सादर केली त्यांच्या प्रेरणादायी रचणेला टाळ्यांच्या कडकडाटात प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
त्यांचा सामाजिक तसेच साहित्य क्षेत्रातील योगदान व उल्लेखनीय कार्याबद्दल आयोजक फुलेप्रेमी भिडेवाडाकार कवी तथा शिक्षक विजय वडवेराव सर यांच्या हस्ते भारतीय संविधानाचे पुस्तक, सन्मानचिन्ह ,सन्मानपत्र , ,फुले प्रेमी नाव असलेली पेन देवून यांचा सत्कार करण्यात आला या आंतरराष्ट्रीय फेस्टिवल मध्ये देश विदेशातील साहित्यिक कवी कवयित्री मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्थानिक पातळीवर सर्व स्थरातून कवी वैभव प्रभाकर महाजन यांचे कौतुक होत आहे.
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : ज्ञानदीप मंडळ संचलित सेंट जोसेफ कला आणि वाणिज्य महाविद्यालय, सत्पाळा, विरार (पश्चिम) यांच्या मराठी विभाग आणि विवेक वाहिनीच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रमात बोलताना वसईतील प्रख्यात वकील माननीय अतुल आल्मेडा म्हणाले,” विवेकी माणूस न्यायाने जगत असतो. तो इतरांनाही न्यायाने जगायला भाग पाडतो. सुखी व्हायचं असेल तर प्रत्येकाने विवेकाने जगायला हवे.”
शिक्षणामुळे माणसाच्या ज्ञानात जरूर भर पडते मात्र विवेकभावाने जगणे ही आजच्या काळाची महत्त्वाची गरज आहे असे प्रतिपादन होली क्रॉस माध्यमिक विद्यालयाचे माजी उपप्राचार्य आणि थोर विचारवंत फ्रान्सिस आल्मेडा यांनी केले. याप्रसंगी बोलताना ज्ञानदीप मंडळाचे सचिव अँड्र्यु लोपीस म्हणाले, “महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना विवेक भावना शिकवली जाते. तेच महत्त्वाचे कार्य अनिस करत आहे याचा आम्हाला अभिमान वाटतो’. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. कविता आल्मेडा म्हणाल्या, ” आम्हाला आमच्या महाविद्यालयात असे अभिनव प्रदर्शन भरविता आले याबद्दल आणि त्याचे आभार मानावेत तेवढे कमीच आहेत. महाविद्यालयाचे विद्यार्थी अंधश्रद्धा निर्मूलनात पुढाकार घेतील असे आश्वासनही त्यांनी दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक प्राध्यापक जगदीश संसारे यांनी केले तर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सुभाष डिसोजा यांनी आपल्या ओघवत्या शैलीत उपस्थितांचे आभार मानले.
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : शांतीलाल संघवी आय इन्स्टिट्यूट, मुंबई, तरुण उत्साही सेवा मंडळ (रजि.) आणि माघी गणेशोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बी. डी. डी .चाळ, २६/२७ मारुती मंदिर, सखुबाई मोहिते मार्ग, एन. एम. जोशी मार्ग, डिलाइल रोड येथे आयोजित केलेल्या मोफत नेत्र शिबिराला ११ जानेवारी २०२५ रोजी उत्तम प्रतिसाद लाभला.
सदर नेत्र शिबिराला रहिवाशांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. १७५ हून अधिक रुग्णांनी उपस्थित राहून मोफत सेवांचा लाभ घेतला. या शिबिरात संगणकीकृत दृष्टी चाचण्या, मोतीबिंदू चाचण्या आणि मधुमेह रेटिनोपॅथी चाचण्यांसह विविध सेवा देण्यात आल्या.
शिबिरात सहभागी झालेले रुग्ण सर्व वयोगटातील होते आणि त्यात एक वर्षापेक्षा जास्त काळ डोळ्यांची तपासणी न केलेले, मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा इतर मोठ्या आजारांनी ग्रस्त असलेले, काचबिंदू किंवा रेटिनाच्या समस्या असलेले रुग्ण यांचा समावेश होता.
मुंबई येथील शांतीलाल संघवी आय इन्स्टिट्यूटमध्ये रुग्णांना उपलब्ध असलेल्या सुविधांमध्ये संपूर्ण डोळ्यांची तपासणी, नोंदणीच्या तारखेपासून ३० दिवसांसाठी मोफत तपासणी, शस्त्रक्रिया तसेच औषधे आणि चष्म्यांवर सवलत यांचा समावेश होता.
तरुण उत्साही सेवा मंडळ (रजि.) आणि माघी गणेशोत्सव मंडळाचे प्रमुख सल्लागार देवदास सावर्डेकर, अध्यक्ष अरुण चिपळूणकर, कार्यकारी अध्यक्ष स्वप्नील इनरकर, चिटणीस शांताराम तुरळकर, उपचिटणीस महेंद्र सावर्डेकर, खजिनदार हरिश्चंद्र तुरळकर, हिशोब तपासणीस सागर जामसुतकर यांच्या नेतृत्वाखालील आयोजन समितीने शिबिराच्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले. “रहिवाशांकडून इतका मोठा प्रतिसाद पाहून आम्हाला खूप आनंद झाला आहे,” असे श्री. चिपळूणकर म्हणाले. “आमचे ध्येय गरजूंना दर्जेदार नेत्र सेवा प्रदान करणे आहे आणि शांतीलाल संघवी आय इन्स्टिट्यूट, मुंबई यांच्या सहकार्याने हे साध्य करण्यात आम्हाला यश आले याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.”
शांतीलाल संघवी आय इन्स्टिट्यूट, मुंबईचे आऊटरिच हेड प्रशांत नाईक, वरिष्ठ कार्यकारी सचिन कुराडे, व्होकार्ट मार्केटिंगचे अभि भिंगार्डे, डॉ. दीपाली रूपनर आणि इतर अनेक समर्पित सदस्यांच्या चमूने शिबिराचे सुरळीत आयोजन सुनिश्चित करण्यासाठी अथक परिश्रम घेतले आणि सर्व रुग्णांना आवश्यक लक्ष आणि काळजी मिळावी यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
तरुण उत्साही सेवा मंडळ (रजि.) आणि माघी गणेशोत्सव मंडळाचे मिलिंद सुसवीरकर, भावेश सासिया, आदिष नेवरेकर, रोहित तुरळकर, दत्ताराम वायंगणकर, प्रणित चिपळूणकर आणि सदस्यांमुळे शिबिराला लाभलेल्या भव्य यशामुळे आयोजकांना त्यांच्या पुढील कार्यक्रमांच्या नियोजनासाठी बळ मिळाले आहे.
पाचोरा : दि पाचोरा पीपल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या वतीने हॅट्रिक विजेते कार्यसम्राट आमदार किशोर पाटील यांचा नागरी सत्कार आणि मुख्य शाखेत सीडीएम (कॅश डिपॉझिट मशीन) लोकार्पण सोहळा थाटात पार पडला. या प्रसंगी विविध
सहकारी संस्थांनी आमदार पाटील यांचा विशेष सत्कार केला. कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या शुभहस्ते झाले, तर अध्यक्षस्थानी बँकेचे चेअरमन अतुल संघवी होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बँकेचे व्हाईस चेअरमन प्रशांत अग्रवाल यांनी केले. आपल्या भाषणात त्यांनी बँकेच्या विकासाचा आढावा घेतला आणि
डिजिटल क्रांतीत बँकेने उचललेल्या पुढाकाराबद्दल माहिती दिली. या प्रसंगी आमदार किशोर पाटील यांचा शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प आणि सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. सत्कारकर्त्यांमध्ये पाचोरा पीपल को-ऑपरेटिव्ह बँकेचे
चेअरमन अतुल संघवी, व्हाईस चेअरमन प्रशांत अग्रवाल, संचालक मंडळ, औद्योगिक वसाहतीचे चेअरमन एकनाथ तावडे, इंडियन मेडिकल असोसिएशनचे
डॉ. जयंत पाटील, डॉ. मनोज पाटील, डॉ. आनंद पाटील, श्रेयस परिवाराचे डॉ. जयंतराव पाटील, जय किरण प्रभा पतसंस्थेचे चेअरमन प्रकाश बंठीया, जळगाव मजूर फेडरेशनचे संचालक
प्रकाश पाटील, भारतीय जैन संघटनेचे राजेश जैन, गजानन उद्योग समुहाचे प्रमोद सोनार यांचा समावेश होता. सत्काराला उत्तर देताना आमदार किशोर पाटील म्हणाले, “गेल्या दहा वर्षांतील विकासकामांचा आढावा घेतला तर मतदारांचे उपकार फेडणे शक्य नाही. आपल्या सर्वांच्या सहकार्याने पाचोरा शहराचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी
प्रयत्नशील राहणार आहे. वाघूर धरणावरून ५६ किलोमीटर लांबीच्या पाईपलाईनद्वारे शहराला पाणीपुरवठा करण्याची योजना सुमारे २०० कोटी रुपयांची असून, ती लवकरच पूर्णत्वास नेणार आहे.” पुढे बोलताना पाटील यांनी एमआयडीसीतील समस्या सोडवण्याबाबत प्राधान्य दिले जाईल असे सांगितले. सूतगिरणी प्रकल्पाला चालना देऊन रोजगारनिर्मितीवर भर देण्याचा आपला मानस असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. बँकेची प्रगती आणि भविष्यातील उद्दिष्टे अध्यक्षीय भाषणात बँकेचे चेअरमन अतुलभाऊ संघवी यांनी बँकेच्या प्रगतीचा लेखाजोखा मांडला. “मी चेअरमन झालो त्यावेळी बँकेकडे ७५ कोटींच्या ठेवी होत्या, त्या आज दीडशे कोटींवर पोहोचल्या आहेत,” असे त्यांनी
नमूद केले. बँकेने एटीएम, एनईएफटी, ऑनलाइन बँकिंग यासारख्या सेवा कार्यक्षमतेने सुरू केल्या असून जिल्ह्याबाहेरही बँकेचा विस्तार यशस्वीपणे झाला आहे. कार्यक्रमास संचालक अॅड. अविनाश भालेराव, विकास वाघ, जीवनभाऊ जैन, डॉ. जयंतराव पाटील, प्रा. भागवत मालपुरे, अविनाश कुडे, प्रमोद बंठीया आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काकाश्री प्रा सी. एन. चौधरी यांनी केले, तर आभारप्रदर्शन अॅड. अविनाश भालेराव यांनी मानले. या भव्य कार्यक्रमाने पाचोरा शहरातील सहकारी संस्थांच्या एकजुटीचे प्रतिक दर्शवले आणि विकास कार्यात केलेल्या योगदानाची दखल घेतली.
जळगाव दि. 10 ( जिमाका ): महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालय, डेहराडून येथे इ. 8 वीसाठी प्रवेशपात्रता परीक्षा’ दि. 05 जून 2025 रोजी पुणे येथे घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी मुले व मुली प्रविष्ट होऊ शकतात. या परिक्षेसाठी विद्यार्थी विद्यार्थीनी उमेदवार दि. 01 जानेवारी, 2026 रोजी कोणत्याही
मान्यताप्राप्त शाळेमध्ये इयत्ता 7 वी वर्गात शिकत असावा किंवा 7 वी उत्तीर्ण झालेला असावा. या परीक्षेसाठी परिपूर्ण भरलेली आवेदनपत्रे दि. 31 मार्च 2025 पर्यंत जमा करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयुक्त अनुराधा ओक यांनी केले आहे. या परीक्षेसाठी ज्या विद्यार्थीनी/विद्यार्थ्यांचे वय दि. 1 जानेवारी 2026 रोजी 11 (अकरा वर्ष सहा महिने) पेक्षा
कमी व 13 (तेरा) वर्षापेक्षा अधिक नाही असे विद्यार्थी परीक्षेस पात्र समजण्यात येतील. म्हणजेच विद्यार्थ्यांचा जन्म दि. 2 जानेवारी 2013 च्या आधी आणि दि. 1 जुलै 2014 च्या नंतरचा नसावा. आवेदनपत्र प्राप्त करण्याची प्रक्रिया परीक्षेचे माहितीपत्रक, आवेदनपत्र व जुन्या प्रश्नपत्रिकांचे संच राष्ट्रीय इंडियन
मिलिटरी कॉलेज, हेहराडून उत्तराखंड पिन कोड 248003 यांचेमार्फत मागवता येणार आहे. ऑनलाईन पध्दतीने पैसे भरून परीक्षेसाठी आवेदनपत्र (फॉर्म) व जुन्या प्रश्नपत्रिकांचा संच मा. कमांडंट राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून यांच्याकडून मागविण्याकरीता राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून यांच्या www.rime.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने सर्वसाधरण व इतर संवर्गाकरिता रु. 600/- व अनुसूचित जाती/जमाती करीता रु. 555/- पैसे भरून आवेदनपत्र
मिळवता येणार आहे. डिमांड ड्राफ्ट द्वारे परीक्षेसाठी आवेदनपत्र मागविण्यासाठी मा. कमांडंट राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून यांच्याकडून मागविण्याकरीता सर्वसाधरण संर्वगातील विद्याथी (उमेदवार) करीता रु. 600/- चा डी.डी. व अनुसूचित जाती जमाती करीता रु. 555/- चा डी.डी कमांडंट RIMC फंड, ड्रॉवी शाखा, एचडीएफसी बँक, बल्लुपूर चौक, डेहराडून, (बँक कोड 1399), उत्तराखंड यांचे नावाने काढावा, सदर डी. डी. कमांडंट “राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून, उत्तराखंड, 248 003या पत्त्याबर पाठविणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती/जमाती करीता डी. डी. सोबत जातीच्या दाखल्याची सत्यप्रत/ छायांकित प्रत पाठविणे बंधनकारक
आहे. डी.डी. पाठवितांना आपल्याला ज्या पत्त्यावर आवेदनपत्र (फॉर्म) मागवायचा आहे तो पत्ता पिन कोड सह अचूक नमूद करावा. तसेच इंग्रजी कॅपिटल अक्षरातच लिहिलेला अथवा टाईप केलेला असावा त्यानंतर आपणास आवेदनपत्र (फॉर्म) व मागील 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा संच व माहिती पुस्तिका स्पीड पोस्टाव्दारे आपण दिलेल्या पत्त्यावर प्राप्त होणार आहे. आवेदनपत्र 2 प्रतीमध्ये भरणे आवश्यक आहे. त्यासोबत जन्म दाखल्याची
छायाप्रत, उमेदवाराचे अधिवास प्रमाणपत्र प्रमाणपत्र छायाप्रत, अनुसूचित जाती/जमातीसाठी जातीच्या दाखल्याची छायाप्रत, विद्यार्थ्यांचा फोटो, जन्मतारीख व इयत्तेच्या नोंदीसह शाळेच्या बोनाफाईड सर्टिफिकेटची मूळ प्रत फोटोसह मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीने जोडणे आवश्यक आहे.आधारकार्ड छायाप्रतजोडणे बंधनकारक आहे विद्यार्थ्यांचे दोन पासपोर्ट आकाराचे फोटो, उपरोक्त कागदपत्रांच्या छायाप्रत (झेरॉक्स कॉपी) मुख्याध्यापकांमार्फत किंवा राजपत्रित अधिकाऱ्यांमार्फतसाक्षांकित (Attested) करून आवेदनपत्रासोबत (फॉर्मसोबत) जोडावेत. आवेदनपत्र परीपूर्ण पणे भरून सोबत
आवश्यक कागदपत्रे जोडून मा. आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (राज्यमंडळ) भांबुर्डा, आधारकर रिसर्च इन्स्टिटयूट सेंटरच्या मागे, शिवाजीनगर पुणे 411004. या पत्त्यावर दिनांक 31 मार्च 2025 पर्यंत पोहोचतील अशा पध्दतीने स्पीड पोस्टाने पाठवावीत किंवा समक्ष येऊन जमा करावीत. परीक्षेसाठी इंग्रजी, गणित आणि सामान्यज्ञान या तीन विषयांचे पेपर असतील. हा पेपर रविवार दिनांक 1 जून 2025 रोजी होणार आहे. लेखी परीक्षेतून मौखिक परीक्षेस पात्र होणाऱ्या विद्यार्थ्यांना मौखिक परीक्षा दिनांक यथावकाश कळविण्यात येईल. आधिक माहितीसाठी Phone No. 020-29709617, Email: mscepune@gmail.com, Website: www.mscepune.iल या फोन नंबरवर संपर्क करावा किंवा खाली दिलेल्या वेबसाईट ला भेट द्यावी.
माणूस हा निसर्गाचा घटक आहे. त्याचा जन्म आणि मृत्यू या दोन टोकांमध्ये साऱ्या जीवनाचा खेळ रंगतो. परंतु या प्रवासात, तो सतत “मुहूर्त” किंवा शुभ वेळ शोधत राहतो. जन्म आणि मृत्यू या जीवनाच्या अपरिहार्य सत्यांसाठी कोणताही मुहूर्त लागत नाही, तरीही माणूस प्रत्येक कृतीसाठी योग्य वेळ आणि शुभ संकेत शोधण्याचा प्रयत्न का करतो, याचा विचार करणे महत्त्वाचे आहे. “मुहूर्त” ही संकल्पना एक मानसिकता आहे, जी आपल्या जीवनावर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम करू शकते. मात्र, विचार चांगले आणि आचरण शुद्ध असेल, तर कोणत्याही कृतीसाठी वेळ शुभच ठरते मुहूर्त म्हणजे काय? “मुहूर्त” म्हणजे विशिष्ट वेळ किंवा क्षण, जो शुभ, अनुकूल आणि यशस्वी ठरेल, असा विश्वास असतो. हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृतीत मुहूर्ताचे विशेष महत्त्व आहे. विवाह, गृहप्रवेश, व्यवसाय सुरू करणे, नवे वाहन खरेदी करणे, किंवा इतर महत्त्वाच्या गोष्टींसाठी मुहूर्त निश्चित केला जातो. यामागे विश्वास असा असतो की शुभ वेळेत केलेली कृती अधिक यशस्वी होते. परंतु, खरे पाहता, जीवनात सर्व वेळ शुभच असते, जर आपल्या विचारांची पवित्रता आणि कृतीतील नीतिमत्ता टिकून असेल. मुहूर्ताचा मानसिकतेवरील प्रभाव १. शुभ वेळेचा अंधविश्वास: मुहूर्त शोधण्यामागे अनेकदा अंधश्रद्धा असते. माणूस शुभ वेळेची वाट पाहण्यात वेळ वाया घालवतो, आणि संधी हातून निसटून जातात. उदाहरणार्थ: एखाद्या व्यावसायिकाने विशिष्ट वेळेची वाट पाहून व्यवसाय उशिरा सुरू केल्यास, स्पर्धक त्याच्या पुढे जाऊ शकतात. २. धैर्य गमावणे: जर माणसाला एखादी कृती “अशुभ” वेळेत करण्याची वेळ आली, तर तो त्यातून यश मिळेल का, याबाबत शंका घेतो. अशा वेळी त्याचा आत्मविश्वास कमी होतो, आणि चुका होण्याची शक्यता वाढते. ३. सकारात्मकता वाढवणे: दुसरीकडे, मुहूर्त सकारात्मक विचारांना चालना देतो. योग्य वेळेत केलेली कृती यशस्वी होईल, असा विश्वास माणसाला पुढे जाण्यास प्रेरित करतो. माणसाचा जन्म आणि मृत्यू: मुहूर्ताविना घडणारी सत्यता माणूस आपल्या जीवनाच्या प्रारंभ आणि शेवटाच्या क्षणी कोणत्याही मुहूर्ताचा विचार करू शकत नाही. १. जन्म: कोणत्याही व्यक्तीचा जन्म हा नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्याला कोणत्याही मुहूर्ताची आवश्यकता नसते. पण, ज्योतिषशास्त्रानुसार जन्मवेळेच्या आधारे कुंडली तयार केली जाते, ज्यावर माणसाचे भवितव्य ठरवल्याचे मानले जाते. परंतु, सत्य हे आहे की जन्माच्या वेळेपेक्षा त्या व्यक्तीचे विचार, शिक्षण, आणि संस्कार त्याच्या जीवनाचे भविष्य ठरवतात. २. मृत्यू: मृत्यू हा अंतिम सत्य आहे. तो कधीही येतो, त्याला कोणतीही निश्चित वेळ नसते. ज्याप्रमाणे सूर्यास्ताला आपण रोखू शकत नाही, त्याचप्रमाणे मृत्यू टाळता येत नाही. चांगल्या विचारांचे आणि शुद्ध आचरणाचे महत्त्व मुहूर्तापेक्षा चांगले विचार आणि शुद्ध आचरण यांना अधिक महत्त्व आहे. १. चांगले विचार: चांगले विचार माणसाच्या कृतींना दिशा देतात. विचार शुद्ध असल्यास, कोणत्याही कृतीत माणूस यशस्वी होतो. उदाहरण: महात्मा गांधींनी कोणताही शुभ मुहूर्त न पाहता, सत्याग्रह सुरू केला. त्यांच्या विचारांनी लोकांमध्ये प्रेरणा निर्माण केली, आणि भारताला स्वातंत्र्य मिळाले. २. शुद्ध आचरण: आचरण म्हणजे कृतीत प्रामाणिकपणा आणि सत्यता असणे. जेव्हा माणूस आपल्या कर्तव्यात प्रामाणिक असतो, तेव्हा कोणतीही वेळ त्याच्यासाठी अशुभ ठरत नाही. उदाहरण एखाद्या डॉक्टरने रात्री कोणत्याही मुहूर्ताशिवाय एखाद्या रुग्णाला वाचवण्यासाठी शर्थ केली, तर त्या कृतीचा शुभ-अशुभ विचार होत नाही. ती कृतीच शुभ मानली जाते मुहूर्ताच्या संकल्पनेवर वैज्ञानिक दृष्टिकोन १. वेळेचा मानसशास्त्रीय प्रभाव: मुहूर्त हे मानसशास्त्राशी संबंधित आहे. माणूस विशिष्ट वेळेला शुभ मानतो, ज्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढतो. आत्मविश्वासातून घेतलेले निर्णय यशस्वी होण्याची शक्यता अधिक असते. २. प्रेरणादायक मानसिकता: शुभ वेळेवर विश्वास ठेवल्यामुळे माणूस अधिक प्रेरित होतो. त्याला वाटते की निसर्ग त्याला साथ देत आहे. ३. प्रत्यक्ष कृती महत्त्वाची: मात्र, वैज्ञानिक दृष्टिकोन सांगतो की यशस्वी होण्यासाठी कृती अधिक महत्त्वाची आहे. वेळेवर कृती केली नाही, तर शुभ वेळेचाही उपयोग होत नाही. चांगले विचार आणि कृती: मुहूर्ताशिवाय यशाचा मूलमंत्र १. संधीचा फायदा घेणे: चांगल्या विचारांचा माणूस कोणत्याही संधीचा योग्य वेळी फायदा घेतो. तो शुभ-अशुभ विचार न करता कृतीवर भर देतो. २. धैर्य आणि आत्मविश्वास: धैर्यवान आणि आत्मविश्वासी माणूस वेळ आणि परिस्थितीवर अवलंबून राहत नाही. तो स्वतःच्या विचारांवर विश्वास ठेवतो. ३. आचरणातील सातत्य: शुद्ध आचरण म्हणजे सातत्याने चांगल्या कृती करणे. अशा व्यक्तीला कोणतीही वेळ शुभच वाटते. मुहूर्ताचे सांस्कृतिक महत्त्व भारतीय संस्कृतीत मुहूर्ताला अत्यंत महत्त्व आहे. ते आपल्या परंपरांशी आणि श्रद्धेशी जोडलेले आहे. परंतु, आधुनिक जीवनात त्यावर अवलंबून राहण्याऐवजी त्या परंपरेला वैज्ञानिक दृष्टीकोनातून पाहणे गरजेचे आहे. १. परंपरेतील श्रद्धा: विवाह, वास्तुशांत, आणि धार्मिक विधी यासाठी मुहूर्त पाहणे ही परंपरा आहे. ती माणसाला मानसिक स्थैर्य देते. २. आधुनिक जीवनाचा वेग: मात्र, आधुनिक जीवनात प्रत्येक गोष्टीसाठी शुभ वेळेची वाट पाहणे शक्य नसते. स्पर्धात्मक युगात संधीचे महत्त्व अधिक आहे. मुहूर्त ही मानवी कल्पना आहे. तिचा उपयोग माणसाला प्रेरित करण्यासाठी होतो, परंतु तो अंतिम सत्य नाही. माणसाचे विचार चांगले आणि आचरण शुद्ध असल्यास, कोणतीही वेळ शुभ ठरते. जीवनाच्या प्रत्येक क्षणाचा आदर करा, कारण प्रत्यक्ष कृतीतूनच यश मिळते. “मुहूर्ता”ची वाट पाहत बसण्यापेक्षा, विचार आणि आचरण शुद्ध ठेवा, कारण वेळेचा आदर करणारा माणूस स्वतःच वेळ निर्माण करू शकतो.