Home Blog Page 50

आशिष काकडे यांचे तडकाफडकी निलंबन व धरणगाव येथे हजर राहण्याचे आदेश – महसूल विभागात खळबळ, “दया कुछ तो गडबड है” असा सवाल

0

Loading

पाचोरा – तालुक्यातील सारोळा बु येथील महसूल अधिकारी आशिष कडुबा काकडे यांच्यावर शिस्तभंगाच्या गंभीर तक्रारी दाखल झाल्यानंतर अखेर प्रशासनाने तडकाफडकी कारवाई करत त्यांना तत्काळ प्रभावाने निलंबित केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथून ३० सप्टेंबर २०२५ रोजी काढण्यात आलेल्या अधिकृत आदेशानुसार महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ मधील नियम ४ (१) (अ) च्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. या आदेशावर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सही केली असून महसूल विभागात तसेच संपूर्ण शासकीय यंत्रणेत मोठी खळबळ उडाली आहे. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, तहसीलदार पाचोरा विजय बनसोडे यांनी १७ सप्टेंबर २०२५ रोजी महसूल अधिकारी आशिष काकडे यांच्याविरुद्ध शिस्तभंगासंदर्भात तक्रारी आणि प्राथमिक अहवाल

जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर केला होता. या तक्रारीत महसूल कामकाजातील विविध अनियमिततेच्या मुद्द्यांचा उल्लेख करण्यात आला असल्याचे समजते. तक्रारीत शेतकरी अनुदानाशी संबंधित फायलींचे अयोग्य हाताळणी, नियमांचे उल्लंघन आणि अधिकारांचा गैरवापर केल्याचे आरोप करण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या अहवालावर विचार करून जिल्हाधिकारी कार्यालयाने वरीष्ठ शासन निर्णयांचा संदर्भ घेत तातडीने निलंबनाची कारवाई केली. आदेशानुसार आशिष काकडे यांना पाचोरा तहसील कार्यालयातून तत्काळ हटवून निलंबनाच्या काळात त्यांचे मुख्यालय तहसील कार्यालय, धरणगाव येथे निश्चित करण्यात आले आहे. या काळात त्यांना तहसीलदार, धरणगाव यांच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. सदर आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, निलंबनानंतर विभागीय चौकशी सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संबंधित विभागाने महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ तसेच विभागीय चौकशी नियमपुस्तिका १९९१ नुसार दोषारोप पत्रिका तयार करून सात दिवसांच्या आत जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर चौकशीसाठी आवश्यक पुरावे, नोंदी, तपासणी अहवाल आणि इतर कागदपत्रे देखील लवकर उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले गेले आहेत. निलंबनाच्या कालावधीत आशिष काकडे यांना नियमानुसार मिळणाऱ्या पगार, राहण्याच्या व इतर भत्त्यांबाबत स्वतंत्र आदेश पुढे काढले जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने हा आदेश तहसीलदार धरणगाव, तहसीलदार पाचोरा, जिल्हा कोषागार अधिकारी जळगाव आणि उपकोषागार अधिकारी धरणगाव यांना आवश्यक कार्यवाहीसाठी पाठवला आहे. या कारवाईनंतर महसूल विभागात मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगली आहे. प्रशासनाने शिस्त आणि जबाबदारीबाबत घेतलेला कठोर पवित्रा अधोरेखित झाला असून, हा निर्णय महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी स्पष्ट इशारा ठरत असल्याचे अनेकांनी व्यक्त केले आहे. “कोणत्याही प्रकारची शिस्तभंगात्मक कृती सहन केली जाणार नाही” असा संदेश या कारवाईतून देण्यात आल्याचे अधिकारी वर्गात बोलले जात आहे. मात्र काहींच्या मते, हा निर्णय केवळ शिस्त राखण्यासाठी नसून, काही व्यक्तींना वाचवण्यासाठी प्रशासनाकडून राजकीय आणि प्रशासकीय दबावाखाली घेतलेला असावा, अशीही चर्चा सुरु झाली आहे. तहसीलदार विजय बनसोडे आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यावर “आपल्या लोकांना वाचवण्याचा हा छुपा मार्ग” अवलंबला जात असल्याचा आरोप स्थानिकांमध्ये कानाकोपऱ्यातून ऐकू येत आहे. पाचोरा शेतकरी अनुदान घोटाळा प्रकरण सध्या आर्थिक गुन्हा शाखेकडे तपासाधीन आहे. या प्रकरणात आजपर्यंत कोणावरही ठोस जबाबदारी निश्चित करण्यात आलेली नाही तसेच कोणतेही आरोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही. अशा परिस्थितीत तपास अपूर्ण असताना महसूल अधिकारी आशिष काकडे यांचे तडकाफडकी निलंबन आणि त्यांना धरणगाव येथे हजर राहण्याचे आदेश देण्यात आल्याने या कारवाईमागील कारणमीमांसा विषयी गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. स्थानिक पातळीवर याबाबत तीव्र चर्चेला उधाण आले असून, “दया कुछ तो गडबड है” अशी प्रतिक्रिया खुलेपणाने ऐकायला मिळत आहे. विशेषतः आर्थिक गुन्हा शाखेकडे तपास सुरू असताना इतर शासकीय यंत्रणांनी हस्तक्षेप करून घाईगडबडीने कारवाई केल्याचे चित्र समोर आल्याने नेमका कोणाचा दबाव आहे, हा यक्ष प्रश्न सर्वांच्या मनात निर्माण झाला आहे. शेतकरी बांधवांमध्ये या कारवाईबाबत प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. पाचोरा शेतकरी अनुदान घोटाळा आंदोलनाचे नेतृत्व करणारे संदीप महाजन यांनी सांगितले की, “सत्य बाहेर यावे आणि जबाबदारांना शिक्षा व्हावी यासाठी शेतकऱ्यांनी आता संघटित होऊन आंदोलन उभारणे गरजेचे आहे. आर्थिक गुन्हा शाखा सखोल तपास करत असताना अचानक निलंबनासारख्या हालचाली घडवून आणल्या जात आहेत, यामुळे तपासावर परिणाम होण्याची भीती निर्माण होते. हे प्रकरण वरच्या पातळीवरून कुठेतरी दबावाखाली हाताळले जात असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.” महसूल विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, “नियमांनुसार कारवाई केली जात असल्याचे सांगितले जात असले तरी, तपास पूर्ण होण्याआधीच कठोर पावले उचलली जाणे विचार करण्यासारखे आहे. सहसा शिस्तभंगाची चौकशी पूर्ण होण्यापूर्वी निलंबन हा शेवटचा पर्याय असतो; मात्र येथे प्रारंभीच हा निर्णय घेण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.” या संपूर्ण घडामोडीत आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. पाचोरा शेतकरी अनुदान घोटाळा प्रकरणातील आरोपी २९ सप्टेंबर रोजी सायंकाळी आर्थिक गुन्हा शाखेकडे स्वतःहून हजर झाले आहेत. या आरोपींमध्ये मुख्य वरिष्ठ अधिकार्‍यांचा समावेश असल्याचे सांगितले जाते. याच दरम्यान, १७ सप्टेंबर रोजी तहसीलदारांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार आणि अहवाल सादर केला, आणि केवळ १३ दिवसांत म्हणजे ३० सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी निलंबनाचा आदेश काढला. तपास प्रक्रियेदरम्यान २९ सप्टेंबर रोजी आरोपी स्वतःहून आर्थिक गुन्हा शाखेकडे गेले आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे ३० सप्टेंबर रोजी निलंबनाची कारवाई करण्यात आली, ही संपूर्ण वेळापत्रक संशयास्पद असल्याची चर्चा जनतेत सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर स्थानिक शेतकरी आणि नागरिकांत असंतोष वाढला आहे. “अजून तपास पूर्ण झालेला नाही, जबाबदारी निश्चित नाही, आरोपींना औपचारिकरीत्या चार्जशीट करण्यात आलेले नाही, तरी घाईघाईत निलंबनाचा निर्णय का?” असा सवाल सर्वत्र उपस्थित होत आहे. लोकांच्या मते, या घाईगडबडीच्या हालचालींमुळे तपासावर दबाव टाकून काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न होत आहे. पाचोरा व परिसरातील शेतकरी संघटनांनी यावर कडाडून आक्षेप घेतला असून, लवकरच याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. “तपास पूर्ण होऊ द्या, सत्य बाहेर येऊ द्या आणि मगच निर्णय घ्या” अशी मागणी शेतकरी संघटनांकडून केली जात आहे. आशिष कडुबा काकडे यांचे निलंबन केवळ एका व्यक्तीविरुद्धची कारवाई नसून महसूल विभागातील नियमशिस्त, प्रामाणिकपणा व जबाबदारी याबाबत प्रशासन किती सजग आहे, याचा संदेश देणारी पायरी मानली जात आहे. मात्र या कारवाईची वेळ, पद्धत आणि तपास प्रलंबित असतानाही घेतलेला घाईगडबडीचा निर्णय यामुळे हा मुद्दा वादग्रस्त ठरला आहे. आगामी काही दिवसांत विभागीय चौकशी व आर्थिक गुन्हा शाखेचा तपास कोणत्या नव्या घडामोडी उलगडतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. शेतकरी बांधवांना आता न्याय मिळवण्यासाठी आणि सत्य बाहेर आणण्यासाठी तीव्र पातळीवर उभे राहण्याची वेळ येत असल्याचे जाणकारांचे मत आहे.

सर्वद फाऊंडेशनचे पहिले राज्यस्तरीय साहित्य संमेलन उत्साहात संपन्न

0

Loading

पालघर (गुरुदत्त वाकदेकर) : “साहित्य समाजमनाचा आरसा आहे. विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्यांना लिहायला लावले तर समाजाला दिशा मिळेल, तसेच भावी पिढीला स्फूर्ती मिळेल,” असे विचार ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ महादेव गो. रानडे यांनी मांडले. ते सर्वद फाऊंडेशनचे प्रथम राज्यस्तरीय साहित्य संमेलन सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते.

साहित्य संमेलनाची सुरुवात थाटामाटात, ढोल-ताशांच्या गजरात आणि पुस्तकांच्या सजीव झेंड्यांनी सजलेल्या ग्रंथदिंडीने झाली. उद्घाटन सनदी अधिकारी हर्षवर्धन जाधव यांच्या हस्ते झाले. त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या वतीने मराठी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी विविध योजना सुरू असल्याचे सांगत, “साहित्यिक व संस्था यांनी या योजनांचा लाभ घ्यावा आणि सर्वद फाऊंडेशनने नव्या पिढीतील साहित्यिक घडवावेत,” असे मत व्यक्त केले.

सुप्रसिद्ध साहित्यिक अशोक बागवे यांनी साहित्यिक गंमतीजमतींनी उपस्थितांना खळखळून हसवले. कवी सतिश सोळांकूरकर यांनी सादर केलेल्या “शाळेतल्या दिवसांचा पाऊस” या कवितेला श्रोत्यांकडून भरभरून दाद मिळाली. कवी अरुण म्हात्रे यांनी कवितेच्या स्फुरणामागील भावविश्वाचे सुंदर विवेचन केले.

प्रास्ताविकात सर्वद फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुचिता पाटील म्हणाल्या, “आज मोबाईलच्या आभासी दुनियेत माणूस प्रत्यक्ष संवाद विसरला आहे. हे साहित्य संमेलन म्हणजे संवादाची खरी भाषा पुन्हा समजून घेण्याचा प्रयत्न आहे.”

स्वागताध्यक्ष डॉ. किरण सावे यांनी मनाच्या आरोग्यावर साहित्य संमेलनाचे महत्त्व अधोरेखित करत “मनाची ‘सर्व्हिसिंग’ झाली तर आजार दूर राहतात आणि समृद्धी वाढते. हे संमेलन त्यासाठी उपयुक्त आहे,” असे सांगितले.

या वेळी डॉ. सुचिता पाटील यांच्या “झाले जलमय” या कथासंग्रहाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले. उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन सुहास राऊत यांनी केले.

दुपारच्या सत्रात रंगलेल्या कविसंमेलनाचे सूत्रसंचालन प्रा. विवेक कुडू, रुपाली राऊत आणि शीतल संखे यांनी केले. नंतर साहित्यिक डॉ. महेश अभ्यंकर, पत्रकार अशोक शिंदे, आणि सुशील शेजुळे यांच्या मुलाखतींनी रसिक मंत्रमुग्ध झाले. हा कार्यक्रम निमा लोखंडे आणि नेहा राऊत यांनी नेत्रदीपकरीत्या नेला.

सायंकाळच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने संमेलनाला बहार चढवली. अभिजीत राऊत यांच्या सूत्रसंचालनाखाली लावणी, मंगळागौर, तारपा आदी पारंपरिक नृत्यांच्या सादरीकरणाने रसिकांना कलाविश्वाचा मनसोक्त आनंद दिला.

या संमेलनातून साहित्य, संस्कृती आणि परंपरेचा अनोखा मेळ घडला असून, सर्वद फाऊंडेशनचे हे पहिले राज्यस्तरीय पाऊल साहित्यजगताला नव्या दिशेची नांदी ठरणार आहे.

आज दि.30/09/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष – नवीन कामात गती मिळेल. आत्मविश्वासाने निर्णय घ्या. मित्रपरिवाराचा सहकार्य लाभेल.
शुभ अंक – ५ │ शुभ रंग – लाल

वृषभ – आर्थिक लाभाचे योग आहेत. कुटुंबात शांतता व आनंद टिकून राहील. आरोग्य सुधारेल.
शुभ अंक – ३ │ शुभ रंग – हिरवा

मिथुन – महत्वाचे काम पूर्ण होतील. शिक्षण व करिअरमध्ये यश मिळेल. प्रवास आनंददायी ठरेल.
शुभ अंक – १ │ शुभ रंग – पिवळा

कर्क – घरगुती जबाबदाऱ्या वाढतील. खर्च वाढण्याची शक्यता आहे. संयमाने काम केल्यास फायदा होईल.
शुभ अंक – २ │ शुभ रंग – पांढरा

सिंह – नवे उपक्रम सुरू होतील. नेतृत्वगुणांमुळे मान-सन्मान वाढेल. सामाजिक क्षेत्रात प्रगती होईल.
शुभ अंक – ९ │ शुभ रंग – सोनेरी

कन्या – नोकरी-व्यवसायात व्यस्तता राहील. नियोजनबद्ध कार्यामुळे यश मिळेल. आरोग्य चांगले राहील.
शुभ अंक – ४ │ शुभ रंग – निळा

तुळ – नातेवाईक व मित्रांचा आधार लाभेल. महत्वाचे निर्णय आज फायदेशीर ठरतील. आनंदी वातावरण राहील.
शुभ अंक – ६ │ शुभ रंग – गुलाबी

वृश्चिक – आर्थिक प्रगतीची संधी आहे. जुन्या अडचणी दूर होतील. आत्मविश्वास व ऊर्जेत वाढ होईल.
शुभ अंक – ८ │ शुभ रंग – काळा

धनु – शिक्षण व नोकरीत सकारात्मक बदल होतील. प्रवास यशस्वी होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.
शुभ अंक – ७ │ शुभ रंग – केशरी

मकर – कामात यश मिळेल. नवीन ओळखी लाभदायी ठरतील. समाजात मान-सन्मान वाढेल.
शुभ अंक – ३ │ शुभ रंग – राखाडी

कुंभ – तुमच्या कल्पकतेला वाव मिळेल. महत्वाचे प्रकल्प पूर्ण होतील. घरगुती वातावरण समाधानकारक राहील.
शुभ अंक – २ │ शुभ रंग – आकाशी

मीन – मानसिक स्थैर्य लाभेल. नवीन करार व व्यवहार फायदेशीर ठरतील. प्रवासाचा आनंद घेता येईल.
शुभ अंक – ५ │ शुभ रंग – जांभळा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

पाचोरा रेल्वे कृती समितीकडून खासदार स्मिताताई वाघ यांना पाचोरा स्थानकावरील रेल्वे सोयीसुविधा वाढविण्यासाठी निवेदन

0

Loading

पाचोरा : पाचोरा शहरासह परिसरातील प्रवाशांना संध्याकाळनंतर रेल्वे प्रवासात प्रचंड गैरसोय होत आहे. विशेषतः मुंबई व मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी सायंकाळी सहा वाजल्यानंतर कोणतीही गाडी उपलब्ध नसल्याने चार ते पाच तालुक्यांचा प्रवासीवर्ग अक्षरशः अडचणीत सापडतो. या पार्श्वभूमीवर पाचोरा रेल्वे कृती समिती तर्फे पाचोरा स्थानकावर पंजाब मेल व विदर्भ एक्सप्रेस या महत्त्वाच्या गाड्यांना थांबा मिळावा, तसेच नाशिक–देवळाली–भुसावळ शटल गाडी पुन्हा सुरू करावी, अशा महत्त्वाच्या मागण्या पुढे सरसावल्या आहेत. यासाठी समितीने जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिताताई वाघ यांना सविस्तर निवेदन सादर केले. पाचोरा रेल्वे कृती समिती ही शहर व परिसरातील प्रवाशांच्या रेल्वे सुविधांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करणारी संघटना आहे. या समितीने पूर्वीही विविध वेळा रेल्वे मंत्रालय, मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम), तसेच रेल्वेमंत्र्यांकडे निवेदने सादर करून प्रवासी हिताच्या मागण्या मांडल्या आहेत. परंतु आजही पाचोरा स्थानकावर प्रवाशांना संध्याकाळीनंतर मोठा रेल्वे दुष्काळ भासतो. मुंबईकडे जाण्यासाठी संध्याकाळी सहा वाजल्यानंतर एकही गाडी थांबत नसल्याने प्रवाशांना भुसावळ, जळगाव किंवा इतर मोठ्या स्थानकांवर जाऊन गाड्या पकडाव्या लागतात. यामुळे वेळ, पैसा आणि श्रम या तिन्ही बाबतीत प्रवाशांवर ताण येतो. पंजाब मेल व विदर्भ एक्सप्रेस या दोन्ही गाड्या पाचोरा मार्गे जात असल्या तरी येथे थांबा नाही. जर या गाड्यांना पाचोरा स्थानकावर थांबा मिळाला तर मुंबईसह दिल्ली, नागपूर, अमरावती, भोपाळ, जबलपूर या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. पाचोरा हे व्यापारी दृष्ट्या महत्त्वाचे केंद्र असून येथून दररोज शेकडो प्रवासी, विद्यार्थी, व्यापारी तसेच रोजगाराच्या निमित्ताने जाणारे नागरिक मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर यांसारख्या शहरांकडे जातात. त्यांना पाचोऱ्यावरूनच थेट लांब पल्ल्याच्या गाड्या मिळाल्यास वेळेची वाचवणूक होईल आणि प्रवास सोयीस्कर बनेल. याशिवाय पूर्वी चालणारी नाशिक–देवळाली–भुसावळ शटल गाडी बंद झाल्यामुळे स्थानिक प्रवाशांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नाशिक, मनमाड, देवळाली, भुसावळ या मार्गावरील दैनंदिन प्रवाशांना या शटल गाडीमुळे मोठा दिलासा मिळत होता. व्यापारी व्यवहार, शिक्षण, नोकरी किंवा वैद्यकीय कारणांसाठी नाशिककडे जाणाऱ्या नागरिकांसाठी ही गाडी अतिशय उपयुक्त होती. आता ती बंद झाल्याने प्रवाशांना महागडी बस सेवा किंवा इतर पर्यायी साधनांचा वापर करावा लागत आहे. शटल पुन्हा सुरू झाली तर पाचोरा व आसपासच्या प्रवाशांसाठी ही अत्यंत मोठी सोय ठरेल. या सर्व मागण्यांसाठी पाचोरा रेल्वे कृती समितीने आज खासदार स्मिताताई वाघ यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. समितीचे सहसचिव शेहबाज बागवान यांनी हे निवेदन देताना सांगितले की, “पाचोरा हे महत्त्वाचे स्थानक असून, या भागातील प्रवाशांची संख्या मोठी आहे. तरीदेखील स्थानकावरील सोयीसुविधा आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांचे थांबे मिळविण्याच्या बाबतीत दुर्लक्ष केले जाते. आम्ही अनेक वर्षांपासून या मागण्यांसाठी पाठपुरावा करीत आहोत. आता या मागण्या लवकर मान्य होणे गरजेचे आहे.” निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, पाचोरा स्थानकावर पंजाब मेल व विदर्भ एक्सप्रेस या दोन्ही गाड्या थांबल्यास केवळ पाचोरा नव्हे तर भडगाव, पाचोरा, एरंडोल, अमळनेर, चाळीसगाव अशा आसपासच्या तालुक्यांतील प्रवाशांनाही मोठा लाभ मिळेल. या भागातील अनेक विद्यार्थी, नोकरीसाठी प्रवास करणारे तरुण, व्यापारी तसेच लांब पल्ल्याचे नियमित प्रवासी दररोज रेल्वे सेवांचा वापर करतात. स्थानकावर गाड्या न थांबल्याने त्यांना अनेकदा अनावश्यक प्रवास करावा लागतो. खासदार स्मिताताई वाघ यांनी निवेदन स्वीकारत समितीच्या मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला. त्या म्हणाल्या की, “पाचोरा परिसरातील प्रवाशांचा हा दीर्घकालीन प्रश्न आहे. पंजाब मेल व विदर्भ एक्सप्रेस या दोन्ही गाड्यांना पाचोऱ्यावर थांबा मिळावा, तसेच नाशिक-देवळाली-भुसावळ शटल गाडी पुन्हा सुरू व्हावी, यासाठी मी मध्य रेल्वे प्रशासन तसेच रेल्वे मंत्रालयाशी लवकरच चर्चा करेन. या मागण्यांसाठी योग्य ती पावले उचलण्याचा माझा प्रयत्न असेल.” पाचोरा रेल्वे कृती समितीने मागील काळात विविध आंदोलनांचे आयोजन करून हा प्रश्न वारंवार मांडला आहे. काही वेळा रस्ता व रेल रोकोसारख्या मार्गांनीही आंदोलन केले गेले. तरीदेखील आजपर्यंत अपेक्षित निकाल मिळालेला नाही. आता खासदार स्मिताताई वाघ यांच्या हस्ते हा विषय उच्च पातळीवर पोहोचल्याने प्रवाशांमध्ये काहीशी आशा निर्माण झाली आहे. स्थानिक नागरिक आणि प्रवाशांच्या मते, जर पाचोरा स्थानकावर पंजाब मेल व विदर्भ एक्सप्रेसचा थांबा मिळाला आणि नाशिक-देवळाली-भुसावळ शटल पुन्हा सुरू झाली, तर प्रवास सुलभ होईल, वेळ आणि खर्चाची बचत होईल, तसेच या भागातील व्यापारी, शैक्षणिक आणि सामाजिक जीवनाला नवी चालना मिळेल. पाचोरा परिसराचा विकास आणि लोकांच्या सोयीसाठी या मागण्या तातडीने मान्य व्हाव्यात, अशी अपेक्षा प्रवाशांनी व्यक्त केली आहे.

काळाचौकीत भक्तिभाव, परंपरा आणि ऐक्याचा ४७ वा नवरात्र महोत्सव

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अभ्युदय नगर, काळाचौकी येथील सार्वजनिक नवरात्र महोत्सव इ. क्र. १५ यावर्षीच्या सोहळ्याने ४७ वे वर्ष गाठले आहे. परंपरा, भक्तिभाव आणि सामाजिक एकात्मतेचा वारसा जपणारा हा उत्सव परिसरातील सर्वांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. देवीच्या आराधनेसोबतच विविध सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून भाविकांना भक्ती, आनंद आणि ऐक्याचा अनोखा अनुभव मिळणार आहे.

या महोत्सवाचे अध्यक्षपद अरुण वाघे भूषवत असून, सचिव म्हणून सचिन गुरव आणि खजिनदार म्हणून राहुल खामकर कार्यरत आहेत. कार्यकारिणीच्या पुढाकाराने व स्थानिकांच्या सक्रिय सहभागामुळे गेली चार दशके हा उत्सव यशस्वीरीत्या साजरा होत आहे. सर्वसमावेशकता, शिस्तबद्ध आयोजन आणि लोकसहभाग हीच या महोत्सवाची खरी ताकद असल्याचे आयोजकांनी सांगितले.

पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात आणि मंत्रोच्चारांच्या वातावरणात देवीची स्थापना करण्यात आली आहे. नवरात्रभर भजन, कीर्तन, गाणी, नृत्यस्पर्धा, सामाजिक प्रबोधनपर कार्यक्रम तसेच मुलांसाठी विशेष उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे हा उत्सव केवळ धार्मिकतेपुरता मर्यादित न राहता सांस्कृतिक आणि सामाजिकतेचाही दिमाखदार आविष्कार ठरत आहे.

काळाचौकीतील हा नवरात्र महोत्सव वर्षानुवर्षे भक्तांना एकत्र आणत आहे. ४७ वर्षांच्या प्रवासानंतरही त्याच उत्साहाने आणि श्रद्धेने हा सोहळा साजरा होत असल्याने परिसरात आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे. देवीच्या चरणी अर्पण केलेला हा भक्तिभावाचा सोहळा श्रद्धा, परंपरा आणि सामुदायिक ऐक्याचा तेजस्वी दीप उजळवत आहे.

स्त्री सृजनतेच्या स्व-कथाकथनाने शारदोत्सवात उमटविला ठसा डॉ. कौजलगीकर यांच्या कथा विद्यार्थिनींसाठी प्रेरणादायी ठरल्या

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटी संचालित श्रीमती एम.पी. शाह महिला महाविद्यालयाच्या मराठी विभागात शारदोत्सव २०२५ (पाचवे वर्ष) अंतर्गत ‘नवदुर्गा : नवविचार’ व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. या व्याख्यानमालेत पाचवे पुष्प म्हणून ‘स्व-कथाकथन’ या विषयावर व्याख्यात्या, लेखिका आणि कथाकथनकार डॉ. वृंदा कौजलगीकर यांनी व्याख्यान सादर केले. कार्यक्रमास विद्यार्थिनींसह प्राध्यापकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्त्री उपजतच सृजनशील असून तिचं योगदान केवळ कुटुंबापुरतं मर्यादित न राहता साहित्य, कला आणि संस्कृतीच्या क्षेत्रात ठसा उमटवते, असे त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. कौजलगीकर म्हणाल्या, “स्व-कथाकथन म्हणजे स्त्रीने स्वतःच्या अनुभवांवर, भावविश्वावर, संघर्षांवर व आत्मशोधावर आधारित कथन सादर करणे. हे केवळ आत्मकथन नसून तिच्या व्यक्तिमत्त्वाचा, विचारांचा आणि सामाजिक स्थितीचा आरसा ठरतो.” त्यांनी सांगितले की स्त्रीच्या अनुभवातून समाजासही संदेश मिळतो आणि तिच्या जीवनातील कथा विद्यार्थिनींसाठी मार्गदर्शक ठरतात. त्यांनी समाजातील स्त्रीच्या विविध भूमिकांवर आणि सृजनशीलतेवरही प्रकाश टाकला.

व्याख्यानादरम्यान डॉ. कौजलगीकर यांनी काही गंभीर आशयाच्या तर काही विनोदी रंगाच्या कथा सादर केल्या. त्यांच्या कथांमधून स्त्रीच्या संघर्षांचे, आनंदाचे आणि भावनांचे सूक्ष्म दर्शन घडले. प्रेक्षकांनी त्यांच्या कथांचा उत्साहाने आनंद घेतला. एका विद्यार्थिनीने सांगितले, “डॉ. कौजलगीकर यांच्या कथांमधून स्त्रीच्या जीवनातील विविध पैलू समजून घेता आले.” या कथांनी उपस्थितांना विचार करण्यास प्रवृत्त केले आणि स्वकथाकथनाचे महत्त्व अधोरेखित केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृतीय वर्ष कला शाखेतील टिशा जाधव हिने केले. कनिष्ठ महाविद्यालयाच्या मराठी विभाग प्रमुख प्रा. नेहा भोसले यांनी प्रमुख व्याख्यात्यांचा परिचय करून दिला, तर यस्तरा मान हिने आभार प्रदर्शन केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थिनींना सृजनशील अभिव्यक्तीला वाव मिळतो तसेच समाजातील स्त्रीच्या बहुआयामी योगदानाची जाणीव होते. शारदोत्सव सारख्या कार्यक्रमांनी साहित्य, कला आणि विचारांना नवी दिशा मिळवून दिली, असा सूर उपस्थितांनी नोंदविला.

कोसबाड टेकडीवरून जीवनदृष्टीचा प्रवास शारदोत्सवात सादर

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटी संचालित श्रीमती मणिबेन एम.पी. शाह कला व वाणिज्य स्वायत्त महिला महाविद्यालयाच्या मराठी विभागात शारदोत्सव २०२५ (पाचवे वर्ष) अंतर्गत ‘नवदुर्गा : नवविचार’ व्याख्यानमालेत सहावे पुष्प म्हणून ‘कोसबाडच्या टेकडीवरून’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. विद्यार्थिनींसमोर अनुताई वाघ यांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. कार्यक्रमास प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या व्याख्यानातून समाजसेवेतील स्त्रीशक्तीच्या अद्वितीय योगदानाची जाणीव विद्यार्थिनींना झाली.

व्याख्यानादरम्यान निवेदिका वैशाली जाधव यांनी अनुताई वाघ यांच्या कार्याची सखोल चर्चा करत “कोसबाडच्या टेकडीवरून जीवनदृष्टी मिळते. समाजसेवा म्हणजे केवळ सेवा देणे नाही, तर मुलं शाळेत येत नसतील तर त्यांच्या अंगणात शाळेचं झाड लावण्याची जबाबदारी स्वीकारणे ही खरी सेवा आहे,” असे सांगितले. त्यांनी विद्यार्थिनींना सांगितले की, प्रत्येक नवीन गोष्ट घडवायची असेल, तर कामाच्या प्रत्यक्ष परिणामाऐवजी मानसिक तयारी, निग्रह आणि सातत्य आवश्यक आहे.

मोक्षाविषयीही विचार मांडले, “मोक्ष शोधताना किंवा काम करताना कामातून मिळणारा मोक्ष हीच खरी कोसबाडची टेकडी आहे. एखादी गोष्ट घडवायची असेल, तर तिच्या मानसिकतेवर निग्रह ठेवून काम करा; परिणामावर जास्त लक्ष केंद्रित करू नका.” त्यांच्या या स्पष्ट आणि प्रामाणिक मतांनी विद्यार्थिनींच्या मनात आत्मशोध आणि कार्याची महत्त्वाची शिकवण रुजली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृतीय वर्ष कला शाखेतील ज्योती पाटील यांनी केले. प्रमुख वक्त्यांचा परिचय पायल गोतपगार ह्या विद्यार्थिनीने करून दिला, तर कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थिनींनी आभार प्रदर्शन केले. शारदोत्सवात अशा उपक्रमांनी विद्यार्थिनींना सामाजिक कार्य, स्त्रीशक्तीची जाणीव आणि जीवनदृष्टीचा अभ्यास करण्याची संधी दिली, असे उपस्थितांनी नोंदविले.

भारताचा विजयी ‘तिलक’ : पाकिस्तानवर ५ गडी राखून आशिया कप २०२५ जिंकला

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा ५ गडी राखून पराभव करत विजेतेपद पटकावले. नाणेफेक जिंकून भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पाकिस्तानी संघाला १९.१ षटकांत १४६ धावांत गुंडाळले. त्यानंतर भारताने १९.४ षटकांत १५० धावा करत नाट्यमय विजय मिळवला.

पाकिस्तानच्या डावात सलामीवीर साहिबजादा फरहान (३८ चेंडूत ५७) आणि फखर जमन (३५ चेंडूत ४६) यांनी सुरुवातीला चांगली भागीदारी केली. परंतु मधल्या फळीतील फलंदाजांना भारतीय फिरकीपुढे तग धरता आले नाही. कुलदीप यादवने ४ षटकांत ३० धावांत ४ गडी घेत पाकिस्तानी डाव कोलमडवला. त्याला अक्षर पटेल (२/२६) आणि वरुण चक्रवर्ती (२/३०) यांचीही साथ लाभली. जसप्रीत बुमराहने शेवटच्या टप्प्यात २ महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या.

१४७ धावांचे लक्ष्य गाठताना भारताची सुरुवात डळमळीत झाली. अभिषेक शर्मा (५), शुभमन गिल (१२) आणि कर्णधार सूर्यकुमार यादव (१) स्वस्तात माघारी परतले. पण तिलक वर्मा (५३ चेंडूत नाबाद ६९) यांनी संयमी आणि स्फोटक अशा दोन्ही शैलीत खेळ करत डाव सावरला. संजू सॅमसनने २४ धावांचे योगदान दिले, तर अखेर शिवम दुबेने फटकेबाजी करत ३३ धावा केल्या. शेवटी रिंकू सिंगने चौकार मारत विजय निश्चित केला.

पाकिस्तानकडून फहीम अश्रफने ४ षटकांत २९ धावांत ३ बळी घेतले. शाहीद आफ्रिदी आणि अबरार अहमद यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. मात्र हारिस रऊफच्या ३.४ षटकांत ५० धावांची उधळण पाकिस्तानच्या पराभवाचे मुख्य कारण ठरली.

या सामन्यात अनेक विक्रम नोंदवले गेले. कुलदीप यादवने आशिया कप २०२५ मध्ये एकूण ९ बळी घेत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज म्हणून आपले स्थान पक्के केले. अंतिम सामन्यातील त्याचा ४/३० चा स्पेल निर्णायक ठरला. तिलक वर्माने अंतिम सामन्यात ५३ चेंडूत नाबाद ६९ धावा ठोकत कारकिर्दीतील सर्वोत्तम टी-२० खेळी साकारली आणि भारताला विजय मिळवून दिला. या विजयासह भारताने आशिया कपचे विक्रमी नववे विजेतेपद आपल्या नावावर केले. तसेच हा सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगतदार ठरल्याने तो चाहत्यांच्या स्मरणात दीर्घकाळ राहील.

दुबईत झालेला हा रोमांचक सामना पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान क्रिकेट स्पर्धेची तीव्रता दाखवून गेला. भारतीय संघाने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागांत उत्कृष्ट खेळ दाखवत आशिया कप २०२५ चा किताब आपल्या नावावर केला. हा विजय भारतीय क्रिकेटच्या आत्मविश्वासात आणि परंपरेत नवा अध्याय जोडणारा ठरला.

शारदोत्सवाच्या सातव्या माळेत ‘दातापासून दाताकडे’ – डॉ. रिबेका दोडती यांचे प्रबोधन

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : “दात आणि दातामुळे खुलणारे स्मितहास्य हे सौंदर्य उजळवणारा सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. मात्र बदललेली खाद्यसंस्कृती दातांच्या समस्यांना मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे. जुन्या काळी आपण खात असलेल्या भाकरी किंवा अपॉलिश भात यांत भरपूर तंतू असायचे. आजच्या अन्नपदार्थांमध्ये मात्र रसायनांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पचनशक्ती कमी झाली आहे आणि पित्तवृद्धीमुळे दातांवर दुष्परिणाम होत आहेत. जुन्या काळातील दातांवरील म्हणी आजही खरी ठरतात. यावरून स्पष्ट होते की, अखेरीस दातापासून सुरू झालेला प्रवास दातावरच संपतो. त्यामुळे दातांची निगा राखणे अत्यावश्यक आहे,” असे प्रतिपादन दंतचिकित्सक डॉ. रिबेका दोडती यांनी केले.

निमित्त होते सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटी संचालित श्रीमती मणिबेन एम. पी. शाह कला आणि वाणिज्य स्वायत्त महिला महाविद्यालय, मराठी विभाग आयोजित शारदोत्सव २०२५ (पाचवे वर्ष) अंतर्गत ‘नवदुर्गा : नवविचार व्याख्यानमाला’. सातव्या व्याख्यानात ‘दातापासून दाताकडे’ या विषयावर त्या बोलत होत्या.

डॉ. रिबेका दोडती या दंतचिकित्सक असून मराठीवरील विशेष प्रेमामुळे सध्या त्या सेंट जोसेफ महाविद्यालय, सत्पाळा, विरार येथे मराठी पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रश्मी शेटये-तुपे यांनी केले. प्रमुख व्याख्यात्यांचे स्वागत प्रा. किरण जाधव यांनी केले, तर आभार प्रदर्शन सामिया काझी हिने केले. प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. कार्यक्रम आभासी माध्यमातून यशस्वीपणे पार पडला. अशा प्रकारे शारदोत्सवाच्या सातव्या माळेत झालेले हे व्याख्यान विद्यार्थिनींसाठी आरोग्याबाबत सजगतेचा संदेश देणारे ठरले. स्मितहास्याचे खरे सौंदर्य दातांच्या आरोग्यात दडलेले आहे, याची जाणीव या प्रबोधनातून प्रत्येक सहभागींच्या मनात दृढ झाली.

आज दि.29/09/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष – मेहनतीला यश मिळेल. व्यावसायिक क्षेत्रात नवीन संधी मिळू शकतात. कुटुंबाचा आधार लाभेल.
शुभ अंक – ३ │ शुभ रंग – लाल

वृषभ – आर्थिक बाबतीत स्थैर्य राहील. घरात सौख्य लाभेल. नातेवाईकांशी संबंध सुधारतील.
शुभ अंक – ६ │ शुभ रंग – हिरवा

मिथुन – शिक्षण व नोकरीत प्रगती होईल. नवीन मित्रमैत्रिणी जोडले जातील. प्रवास यशस्वी ठरेल.
शुभ अंक – १ │ शुभ रंग – पिवळा

कर्क – कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. खर्च वाढू शकतो. आरोग्याकडे लक्ष द्या.
शुभ अंक – २ │ शुभ रंग – पांढरा

सिंह – तुमच्या नेतृत्वगुणांना दाद मिळेल. सामाजिक कार्यात मान वाढेल. नवे उपक्रम यशस्वी ठरतील.
शुभ अंक – ९ │ शुभ रंग – सोनेरी

कन्या – नोकरी-व्यवसायात व्यस्तता राहील. नियोजनबद्ध काम केल्यास चांगले परिणाम मिळतील.
शुभ अंक – ५ │ शुभ रंग – निळा

तुळ – मित्रपरिवाराशी संवाद वाढेल. आनंदी वातावरणाचा लाभ मिळेल. महत्वाचे निर्णय आज फायदेशीर ठरतील.
शुभ अंक – ७ │ शुभ रंग – गुलाबी

वृश्चिक – आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. जुने प्रश्न सुटतील. आत्मविश्वास वाढेल.
शुभ अंक – ८ │ शुभ रंग – काळा

धनु – नवी संधी मिळण्याची शक्यता आहे. शिक्षण व नोकरीत प्रगती होईल. कुटुंबासोबत वेळ घालवाल.
शुभ अंक – ४ │ शुभ रंग – केशरी

मकर – आजचा दिवस उत्साहवर्धक आहे. कामातील अडथळे दूर होतील. मान-सन्मान वाढेल.
शुभ अंक – ६ │ शुभ रंग – राखाडी

कुंभ – तुमच्या विचारांना लोक मान्यता देतील. महत्वाचे प्रकल्प पूर्ण होतील. घरगुती आनंद लाभेल.
शुभ अंक – २ │ शुभ रंग – आकाशी

मीन – मानसिक स्थैर्य राहील. प्रवासाचा योग संभवतो. नवे करार व व्यवहार फायदेशीर ठरतील.
शुभ अंक – ५ │ शुभ रंग – जांभळा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!