Home Blog Page 145

पिंपळगाव हरेश्वर येथे हस्ताक्षर आणि सुलेखन कार्यशाळा उत्साहात संपन्न

0

Loading

पाचोरा – तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील ग्रामविकास माध्यमिक विद्यालयात इयत्ता 5 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी हस्ताक्षर आणि सुलेखन यावर विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. दि. 26 व 27 डिसेंबर रोजी दुपारी 2 ते 5 या वेळेत पार पडलेल्या या कार्यशाळेला हस्ताक्षर मार्गदर्शिका सौ. सुवर्णा जितेंद्र पाटील यांनी मार्गदर्शन केले.
    या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना सुंदर हस्ताक्षर काढण्यासाठीच्या महत्त्वाच्या तंत्रांची ओळख करून देण्यात आली. सुंदर हस्ताक्षर कसे असावे? पेन कसा धरावा? कोणता पेन वापरावा? कोणत्या प्रकारच्या वहीत सराव करावा? या प्रश्नांची सखोल उत्तरे सौ. सुवर्णा पाटील यांनी विद्यार्थ्यांना दिली. तसचे, हस्ताक्षर सुधारण्यासाठी सरावाचे योग्य प्रकार कोणते आहेत, सराव करताना कोणत्या बाबींवर लक्ष द्यावे याविषयी त्यांनी विशेष मार्गदर्शन केले.
    याशिवाय, सुलेखन म्हणजे काय? सुलेखनासाठी कोणकोणत्या साधनांची गरज असते? सुलेखनासाठी कोणते पेन किंवा रंग वापरले जातात? याविषयीही त्यांनी सविस्तर माहिती दिली. त्यांनी विविध प्रकारची सुलेखन नमुने विद्यार्थ्यांसमोर सादर केली, ज्यात वारली आर्टची उदाहरणेही समाविष्ट होती. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने हे सर्व अनुभवले व शिकले.
    कार्यशाळेच्या वेळी विद्यार्थ्यांनी सौ. सुवर्णा पाटील यांच्याशी संवाद साधून आपल्या शंकांचे समाधान केले. या कार्यशाळेचे आयोजन करण्यासाठी विद्यालयाचे प्राचार्य श्री. तेली सर आणि उपप्राचार्य श्री. पी. ओ. चौधरी सर यांनी पुढाकार घेतला होता. या उपक्रमाला विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षिका यांनी सहकार्य केले.
    विद्यार्थ्यांना त्यांच्या लिखाण कौशल्याचा दर्जा सुधारण्यासाठी व लेखनकलेत रुची निर्माण होण्यासाठी ही कार्यशाळा अत्यंत उपयुक्त ठरली. कार्यशाळेतील माहिती व प्रत्यक्ष मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. अशा कार्यशाळांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलतेला चालना मिळेल व त्यांच्या बौद्धिक आणि कलात्मक क्षमतेत भर पडेल, असे शिक्षकांनी सांगितले.
    ग्रामविकास माध्यमिक विद्यालयातील या यशस्वी उपक्रमाबद्दल सौ. सुवर्णा पाटील आणि सर्व शिक्षकवृंदांचे पालक व विद्यार्थ्यांकडून विशेष अभिनंदन करण्यात आले.

कविता एक चिंतन, आराधना सरस्वतीची – डॉ. मानसी पाटील

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : “कविता एक चिंतन, आराधना सरस्वतीची, उपासना शब्दांची, अनुभूती समाधानाची” अशा भावना आपल्या अध्यक्षीय मनोगतातून डॉ. मानसी पाटील यांनी व्यक्त केल्या. ‘मराठी साहित्य व कला सेवा’ आणि ‘शोध आनंदाचा फाऊंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १०व्या कविसंमेलनाच्या निमित्ताने त्या बोलत होत्या. सारस्वतांनी तयार केलेल्या उत्तम रचनांचा आस्वाद घेत, एकमेकांना दाद देत तर वेळप्रसंगी हास्याचे फवारे उडवत मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पालघर येथून आलेल्या निवडक निमंत्रित सारस्वतांनी दादर येथील राजा शिवाजी विद्या संकुलात दिवाळी निमित्त उत्तमोत्तम रचनांचा नजराना सादर केला.

“मराठी साहित्य व कला सेवा” आणि “शोध आनंदाचा फाऊंडेशन” आयोजित कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी डॉ. मानसी पाटील विराजमान होत्या. त्यांचे ज्येष्ठ कवयित्री जयश्री चुरी यांच्या हस्ते तसेच ‘शोध आनंदाचा फाऊंडेशन’चे अध्यक्ष नितीन सुखदरे आणि ‘मराठी साहित्य व कला सेवा’चे संस्थापक अध्यक्ष गुरुदत्त वाकदेकर यांच्या उपस्थितीमध्ये मानाची शाल आणि ग्रंथभेट प्रदान करून स्वागत करण्यात आले.

कविसंमेलनाच्या पहिल्या सत्रामध्ये नंदा कोकाटे, रविंद्र शंकर पाटील, जयश्री हेमचंद्र चुरी, वैभवी विनीत गावडे, कल्पना दिलीप मापूसकर, संजीव उंडाळकर, अनील खेडेकर, सानिका ज्योतीकुमार कुपटे, गौरी यशवंत पंडित, संतोष धर्मराज मोहिते, राजेश साबळे ओतूरकर, बालकवी वेदान्त यशवंत पंडित, ॲड. सुजाता त्रिंबककर टिपणीस, प्रफुल अनंत साने, आश्विनी सोपान म्हात्रे, शितलादेवी सुनिल कुळकर्णी, विक्रांत मारूती लाळे आणि डॉ. प्रविण विठ्ठल शिर्के यांनी आपल्या सुंदर रचना सादर केल्या आणि उपस्थितांनी त्यांना टाळ्यांच्या गजरात दादही दिली. पहिल्या सत्राची शेवटची रचना कविसंमेलनाध्यक्ष डॉ. मानसी पाटील यांनी सादर करताच टाळ्यांचा कडकडाट झाला.

मध्यंतरामध्ये सानिका कुपटे यांनी आणलेल्या अल्पोपहारासोबत संमेलनाध्यक्ष डॉ. मानसी पाटील यांनी आणलेल्या बर्फीचा आस्वाद सर्वांनी घेतला. दुसर्‍या सत्रात सर्व कवींनी त्यांच्या स्वरचित विषय विरहित रचना सुंदररीत्या सादर केल्या.

संमेलनाध्यक्ष डॉ. मानसी पाटील यांनी सादर केलेल्या गजलेला सर्वांनी मनमुराद दाद दिली. मनोगत व्यक्त करताना अध्यक्षांनी उपरोक्त विचार मांडले. नेहमीप्रमाणेच आजचा कार्यक्रम देखील दर्जेदार झाला. सर्वांच्या कविता नावीन्यपूर्ण व आशयायुक्त अशा होत्या. त्यामुळे दोन्ही ही सत्रे अगदी श्रवणीय आणि सुखदायक ठरली. नियोजन, आयोजन सर्व अगदी छान होते. आपण करत असलेली साहित्य सेवा अशीच अखंडित चालू राहो व मराठी भाषेची साहित्य संपदा वाढत राहू दे अशा शुभेच्छाही त्यांनी आयोजकांना दिल्या.

कवितांचा आस्वाद घेण्यासाठी आलेल्या कवयित्री गीताश्री नाईक यांना मनोगतासोबतच कविता सादर करण्याची संधीदेखील देण्यात आली. आस्वादक ममता चंद्रकांत तांबिरे, आर्या कुपटे आणि सुनिल भिकाजी मानकर ह्यांनी कार्यक्रमा विषयी आपल्या भावना मोकळ्या केल्या. कवितांचा आस्वाद घेण्यासाठी सुनिल कुळकर्णी, डॉ. रुपाली प्रविण शिर्के, उमाली प्रविण शिर्के, कार्तिकेय प्रविण शिर्केआवर्जून उपस्थित होते. सर्वांनी कार्यक्रमासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. तर संपूर्ण कार्यक्रमाचं ध्वनीचित्रमुद्रण आणि छायांकन रविंद्र पाटील आणि विक्रांत लाळे यांनी केले.

कार्यक्रमाची सांगता करताना “शोध आनंदाचा फाऊंडेशन” चे अध्यक्ष नितीन सुखदरे यांनी सर्वांचे आभार मानले. ‘मराठी साहित्य व कला सेवा’ आणि ‘शोध आनंदाचा फाऊंडेशन’ यांच्या वतीने सर्व सारस्वतांना सहभाग सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

११वे मासिक कविसंमेलन शनिवार १९ जानेवारी २०२५ (अंदाजित) होणार असून त्याच्या अध्यक्षपदी युवा कवी विक्रांत मारुती लाळे असणार आहेत. कविसंमेलनाचे समयोचित सूत्रसंचालन गुरुदत्त वाकदेकर यांनी केले.

कविसंमेलन यशस्वी करण्यासाठी नितीन सुखदरे, विद्याधर शेडगे, सनी आडेकर, विक्रांत लाळे, रविंद्र पाटील आणि गुरुदत्त वाकदेकर यांनी अथक परिश्रम घेतले.

सामनेरच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न
महात्मा गांधी विद्यालयाचे 1998-99 च्या बॅचचे विद्यार्थ्यांचे 25 वर्षांनंतर पुनर्मिलन

0

Loading

सामनेर (ता. पाचोरा, जि. जळगाव):
जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संचालित महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे 1998-99 च्या 10वी बॅचचे माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात पाचोरा येथील स्वामी लॉन्स येथे संपन्न झाला. तब्बल 25 वर्षांनंतर शाळेतील जुने वर्गमित्र पुन्हा एकत्र आले आणि शालेय आठवणींना उजाळा दिला.
या स्नेहमेळाव्याचे आयोजन महेंद्रकुमार साळुंखे, प्रमोद पाटील आणि स्वप्निल शिरोळे यांनी केले. या प्रसंगी स्वागतासाठी संपूर्ण परिसर आकर्षक रांगोळ्या आणि बॅनर्सने सजविण्यात आला होता.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि प्रतिमापूजनाने झाली, ज्यामध्ये भारती सोनकुळ, सुरेखा पाटील, भारती पाटील, वैशाली पाटील, जागृती डांबरे, पितांबर पाटील, गोपाल पाटील, गजानन पाटील, पिंटू पाटील यांचा सहभाग होता.
दहावी बॅचचे माजी विद्यार्थी भारतीय सैन्य दलात कार्यरत असल्याने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. भूषण पाटील, दीपक कैलास पाटील, दीपक फुलचंद पाटील, राहुल सोनकूळ यांना सैन्य दलातून सेवानिवृत्तीच्या निमित्ताने सन्मानित करण्यात आले. सत्कारप्रसंगी संदीप पाटील, सचिन चिंचोले, गोपीचंद पाटील, दिलीप पाटील, प्रमोद साळुंखे, वासुदेव पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाला विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणारे माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉक्टर, शिक्षक, व्यवस्थापक, अभियंते, ग्रामसेवक, आरोग्य सेवक, आदर्श शेतकरी, व्यावसायिक अशा विविध पदांवर कार्यरत असलेले राजेंद्र बाविस्कर, योगेश जाधव, वासुदेव पाटील, राजेंद्र सूर्यवंशी, प्रवीण पाटील, गोपीचंद पाटील, चंद्रकांत पाटील, भीमराव पाटील, स्वाती पाटील, मीना पाटील, जागृती पाटील, मनीषा पाटील, सुलोचना पाटील, भारती पाटील, सुनंदा पाटील, मीनाक्षी पाटील, सुनीता पाटील, कल्पना पाटील, भावना चव्हाण यांचा समावेश होता.
या मेळाव्यात शाळेतील आठवणींना उजाळा देण्यात आला. अनेकांनी शालेय जीवनातील हास्यविनोद आणि आठवणींचे किस्से सांगत वातावरण आनंदमय केले. स्नेहमेळाव्याच्या शेवटी सर्वांनी पुन्हा भेटण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. दीपक पाटील यांनी केले, सूत्रसंचालन महेंद्रकुमार साळुंखे यांनी तर आभार प्रदर्शन प्रमोद पाटील यांनी केले.

६३ व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेतील मुंबई-३ केंद्राचे शानदार उद्घाटन

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित करित असलेल्या ६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या मुंबई-३ केंद्राच्या प्राथमिक फेरीचे उद्घाटन साहित्य संघ मंदिर, गिरगाव, मुंबई येथे करण्यात आले. सुप्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक प्रमोद पवार, सुप्रसिद्ध अभिनेते अरूण पालव, ज्येष्ठ रंगकर्मी तसेच साहित्य संघ मंदिरचे कार्यवाह सुभाष भागवत, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे कार्यक्रम अधिकारी मिलिंद बिर्जे, मच्छिंद्र पाटील तसेच परीक्षक रमाकांत भालेराव, विवेक खेर, प्रतिभा नागपुरे तेटू यांच्या शुभहस्ते तसेच उपस्थितीमध्ये दीपप्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन सायली साळवी यांनी केले.
६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या उद्घाटनाच्या वेळी प्राथमिक फेरीमध्ये डॉ. तृप्ती झेमसे लिखित तसेच अभिषेक भगत दिग्दर्शित “कॅनिबल” या नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला. प्रेक्षकांनी प्रयोगाला हजेरी लावून कलाकारांना खूप छान दाद दिली.
स्पर्धेची प्राथमिक फेरी मुंबई-३ केंद्रावर सुरू झाली असून ८ जानेवारी २०२५ पर्यंत या स्पर्धेमध्ये विविध २० नाटकांचे प्रयोग होणार आहेत. स्पर्धेमध्ये सामाजिक समस्या, राजकीय विषय, प्रेमकथा आणि इतर विविध विषयांवर आधारित नाटके सादर करणार आहेत.
सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने विकास खारगे, (भा.प्र.से.) अपर मुख्य सचिव तसेच बिभीषण चवरे, संचालक यांनी हौशी कलाकारांचे मनोबल वृद्धिंगत करण्यासाठी जास्तीत जास्त प्रेक्षकांनी उपस्थित राहावे अशी विनंती केली आहे.
     तिकीट दर केवळ ₹१५/- आणि ₹१०/- आहे. रोज सकाळी ११:३० आणि संध्याकाळी ७ वाजता नाटकाचे प्रयोग होणार आहेत. सदर स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच “रंगभूमी डॉट कॉम” ह्या संकेतस्थळावरून ऑनलाइन तिकीट बुकींग करता येणार आहे. मुंबई केंद्राचे समन्वयक म्हणून राकेश तळगावकर आणि प्रियांका फणसोपकर हे काम पाहात आहेत.

पाचोरा येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत स्थानिक इतिहास पुनर्लेखनावर राज्यस्तरीय परिषद

0

Loading

जळगाव: कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या अंतर्गत प्रधानमंत्री उच्चतर शिक्षण अभियान (PM-USHA), शिक्षण मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या आर्थिक सहकार्याने व पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचालित श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, पाचोरा यांच्या वतीने राज्यस्तरीय एक दिवशीय इतिहास परिषद आयोजित करण्यात येत आहे.
ही परिषद शनिवार, ४ जानेवारी २०२५ रोजी महाविद्यालयाच्या इतिहास विभागाच्या संयोजनाखाली होणार आहे. परिषदेसाठी “स्थानिक इतिहास पुनर्लेखन आणि संशोधन” हा विषय निवडण्यात आला असून, स्थानिक इतिहासाच्या संवर्धनासाठी संशोधन आणि अभ्यासाच्या नव्या वाटा शोधण्याच्या दृष्टीने ही परिषद महत्त्वाची ठरेल.
श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका महाविद्यालय, ज्याला नॅकच्या तिसऱ्या चक्रात सी ग्रेड (CGPA 1.91) प्राप्त झाली आहे, हा कार्यक्रम आयोजित करत आहे. इतिहास विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. जे. डी. गोपाळ हे या परिषदेचे समन्वयक असून, प्रा. डॉ. माणिक पी. पाटील हे सहसमन्वयक म्हणून कार्यभार सांभाळत आहेत.
या परिषदेचे उद्दिष्ट स्थानिक इतिहासाच्या विविध पैलूंचे सखोल पुनर्लेखन व त्यावरील संशोधनास चालना देणे आहे. इतिहासाच्या अभ्यासकांना स्थानिक पातळीवर इतिहासाची पुनर्रचना करण्यासाठी आवश्यक स्रोत व पद्धती यावर मार्गदर्शन करणे, तसेच विविध विद्वानांनी त्यांच्या संशोधनातून स्थानिक इतिहासाच्या विकासात योगदान देण्याची संधी मिळवून देणे, हे या परिषदेचे मुख्य हेतू आहेत.
परिषदेत सहभागी होणाऱ्या इतिहास अभ्यासक, संशोधक, विद्यार्थी व प्राध्यापक यांना स्थानिक इतिहासाच्या अद्ययावत माहितीसह नवीन संशोधन विषयांवर चर्चा करण्याची अनोखी संधी मिळणार आहे. कार्यक्रमादरम्यान विविध तज्ञ व्याख्यानांद्वारे आपले विचार मांडतील, तसेच इतिहास पुनर्लेखनाच्या महत्त्वाकडे लक्ष वेधतील.
परिषदेला राज्यातील मान्यवर इतिहासतज्ज्ञ, संशोधक आणि अभ्यासक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. या परिषदेच्या माध्यमातून स्थानिक इतिहासाच्या अनभिज्ञ राहिलेल्या पैलूंवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
सर्व संबंधित अभ्यासकांनी आणि विद्यार्थ्यांनी या परिषदेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाच्या इतिहास विभागातर्फे करण्यात आले आहे.
स्थानिक इतिहास पुनर्लेखन परिषदेस मान्यवरांचा गौरवशाली सहभाग
      परिषदेचा उद्घाटन समारंभ आणि प्रमुख मान्यवर
परिषदेचा उद्घाटन समारंभ ४ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९.०० ते १०.३० या वेळेत पार पडणार असून, प्रमुख उद्घाटक व वीजभाषक म्हणून डॉ. सोमनाथ रोडे, प्राचार्य व अध्यक्ष, अखिल भारतीय सर्वोदय संघ, लातूर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे मान्यवर पदाधिकारी प्रमुख उपस्थित राहणार आहेत, त्यामध्ये संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार भाऊसो. दिलीप ओंकार वाघ, चेअरमन नानासाहेब संजय ओंकार वाघ, व्हा. चेअरमन नानासाहेब व्ही. टी. जोशी, मानद सचिव अॅड. महेश एस. देशमुख, तसेच संचालक मंडळातील आनंदराव दगाजी विठ्ठल वाघ, दादासाहेब भागचंद मोतिलाल राका, भाईसाहेब दुष्यंत प्रविणसागर रावल, डॉ. पितांबर नध्धू पाटील, नानासाहेब सुरेश देवरे, डॉ. जयंतराव बी. पाटील, संजय हिरालाल कुमावत, योगेश माधवराव पाटील, सतीष नारायण चौंधरी, खलील दादामिया देशमुख, आणि प्रा. एस. झेड. तोतला यांचा समावेश आहे.
द्वितीय सत्र: सकाळी १०.३० ते १२.००
द्वितीय सत्रात प्राचार्य डॉ. जी. बी. शहा, अध्यक्ष, जैन इतिहास परिषद, महाराष्ट्र राज्य, आणि प्राचार्य डॉ. वसंत श्रावण देसले, के.एन.एम.पी.पी. कला महाविद्यालय, मारवड, हे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. या सत्रात इतिहास संशोधनाच्या विविध पद्धती, स्थानिक इतिहासाचे महत्त्व, आणि स्थानिक वारसाच्या जतनाच्या उपक्रमांवर चर्चा होईल.
शोधनिबंध वाचन:
सकाळच्या सत्रानंतर दुपारी १२.०० ते १.०० या वेळेत सहभागी संशोधक व अभ्यासक आपले शोधनिबंध सादर करतील. या सत्रात इतिहासाच्या विविध पैलूंवर आधारलेले अभ्यासपूर्ण विचार मांडले जातील. त्यानंतर दुपारी १.०० ते २.०० दरम्यान भोजनाची व्यवस्था आहे.
तृतीय सत्र: दुपारी २.०० ते ३.३०
तृतीय सत्रात डॉ. प्रशांत सुधाकरराव देशमुख, चेअरमन, इतिहास अभ्यासमंडळ, क.ब.चौ.उ.म. विद्यापीठ, जळगाव, आणि प्राचार्य डॉ. भी. ना. पाटील, माजी अधिष्ठाता, क.ब.चौ.उ.म. विद्यापीठ, जळगाव हे प्रमुख वक्ते असतील. या सत्रात इतिहास पुनर्लेखनासाठी आवश्यक साधने, ऐतिहासिक दस्तऐवजांचे जतन आणि संशोधन प्रक्रियेतील आव्हाने यावर चर्चा होईल.
चौथे सत्र व समारोप:
दुपारी ३.३० ते ५.३० या वेळेत समारोप सत्र पार पडेल. यामध्ये प्राचार्य डॉ. भी. ना. पाटील, सदस्य, इतिहास अभ्यासमंडळ, क.ब.चौ.उ.म. विद्यापीठ, जळगाव हे प्रमुख वक्ते असतील, तर अध्यक्षपदाची जबाबदारी नानासाहेब व्ही. टी. जोशी, व्हा. चेअरमन, पा.ता.स.शि. संस्था, पाचोरा सांभाळतील. या सत्रात प्रा. एस. झेड. तोतला यांचीही प्रमुख उपस्थिती राहील.
परिषदेत सहभागी होण्याचे आवाहन:
या परिषदेच्या माध्यमातून स्थानिक इतिहासाच्या महत्त्वपूर्ण पैलूंवर नव्याने प्रकाश टाकला जाईल. परिषदेच्या यशस्वीतेसाठी इतिहास अभ्यासक, संशोधक, प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रा. डॉ. जे. डी. गोपाळ (समन्वयक व इतिहास विभाग प्रमुख) आणि प्रा. डॉ. माणिक पी. पाटील (सहसमन्वयक) यांनी केले आहे.
या परिषदेच्या माध्यमातून इतिहास संशोधनाला नव्याने चालना मिळेल आणि स्थानिक इतिहासाचा नवा अध्याय लिहिला जाईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

विनापरवाना दुचाकी विक्रीमुळे जळगाव जिल्ह्यात प्लॅनिंगने ग्राहकांची आर्थिक लूट, आरटीओ विभागाचे झोपेचे सोंग

0

Loading

जळगाव – संपूर्ण जळगाव जिल्ह्यात उपप्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) यांची मिलीभगत आणि आशीर्वादाने, विनापरवाना दुचाकी वाहन विक्रेते मोठ्या प्रमाणात ग्राहकांची आर्थिक लूट करत आहेत. जिल्ह्यात अनेक ठिकाणी दुचाकी विक्री करण्यासाठी परवानाधारकांची नियुक्ती करण्यात आली आहे, परंतु काही शोरूम्स, डीलर

आणि सब डीलर यांनी या नियमांचे उल्लंघन करत दुचाकी विक्री सुरू केली आहे.
   जिंल्हयाभरात अनेक ठिक – ठिकाणी शोरूम्समध्ये, ग्राहकांना कायदेशीर अटी न पाळता अधिक शुल्क घेतले जात आहेत. विना परवाना दुचाकी वाहन विक्रेत्यांमुळे ग्राहकांकडून शोरूम चार्जेस, डिलेवरी चार्जेस, प्रोसेसिंग फी, आणि इन्शुरन्स अशा नावाखाली अतिरिक्त पैसे घेतले जात आहेत. यामुळे ग्राहकांना वित्तीय कर्ज घेण्यास प्रवृत्त केले जात आहे, ज्यामुळे ग्राहकांनाच ही आर्थीक झळ सोसावी लागत आहे.
   दुचाकी खरेदी करणाऱ्या ग्राहकांवर अतिरिक्त शुल्क लावले जात आहेत, ज्यात किमान १० हजार रुपये पर्यंत अतिरिक्त खर्च ग्राहकांना

भरण्यास सांगितला जात आहे. याशिवाय, शोरूम्स आणि सब डीलर यांच्याकडून फायनान्स कंपन्यांना कर्ज घेत असलेल्या ग्राहकांवर अतिरिक्त चार्जेस लादले जात आहेत. याचा परिणाम म्हणजे ग्राहकांना अत्यधिक कर्ज घेण्यास भाग पडावे लागते. यामुळे सरकार आणि अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून घेणारी ही समस्या आहे.
   आरटीओ विभागाच्या अधिकाऱ्यांचे हे वर्तन आणि त्यांची मिलीभगत ही आर्थिक लूट करणाऱ्यांसाठी एक हक्काची संधी बनलेली आहे. आरटीओ विभागाची चूक हे उघड आहे, कारण विना परवाना दुचाकी विक्रेते मुक्तपणे व्यवसाय करत आहेत, आणि त्यांच्या विरोधात कोणतीही ठोस कारवाई केली जात नाही.
  इतकेच नाही, तर शोरूम्स ग्राहकांना शक्कल करून इन्शुरन्स, हेल्मेट आणि इतर वस्त्रासाठी देखील दबाव टाकत आहेत. अशा प्रकारे, काही दुचाकी विक्रेते, ग्राहकांना बोगस दर्जाचे हेल्मेट विकत आहेत आणि त्यावर अतिरिक्त शुल्क घेत आहेत. या हेल्मेटसाठी आरटीओच्या नियमांची दुरुपयोग करत, गाडी पासिंग करण्याच्या शर्ती लादल्या जात आहेत. परंतु, इतर जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारच्या सक्तीचा सामना करत नसल्याची समजते
दुचाकी खरेदी करणाऱ्यांना विक्रेत्यांकडून या सर्व अतिरिक्त शुल्कांवर मोठा आघात होत आहे. परिणामी, ग्राहकांची आर्थिक लूट होत असून, त्यांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी आरटीओ विभागाची तत्काळ कारवाई अपेक्षित आहे. यासाठी, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने व सार्वजनिक तक्रारी प्रणालीने जागरूकता निर्माण करणे आणि या मुद्द्याची गंबीरता लक्षात घेत कारवाई सुरू करणे आवश्यक आहे.
   सरकारी अधिकाऱ्यांच्या कामकाजावर असलेल्या या शंकेमुळे नागरिकांची .नाराजी वाढत आहे. आरटीओ विभाग आणि स्थानिक . अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई होईल अशी नागरिकांची अपेक्षा आहे. जर या प्रश्नावर कारवाई केली गेली नाही, तर जनजागृती होऊन आगामी काळात यासाठी मोठे आंदोलन देखील होऊ शकते.
   शिवाय, संबंधित कंपन्यांचे कस्टमर केअर आणि इतर अधिकाऱ्यांशी संपर्क साधून ग्राहक तक्रारी दाखल करू शकतात.

होळ जिल्हा परिषद शाळेत विज्ञान विषयक पुस्तकांचे सौ. वैशालीताई सूर्यवंशी यांच्या शुभहस्ते वितरण

0

Loading

पाचोरा – तालुक्यातील होळ येथील जिल्हा परिषद शाळेत विज्ञानविषयक पुस्तकांचे वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन सौ. वैशाली नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागावी, त्यांचे ज्ञान वाढावे, आणि शैक्षणिक विकास साधावा या उद्देशाने या पुस्तकांचे वितरण करण्यात आले.या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष अरुण पाटील, मार्गदर्शिका योजनाताई पाटील, प्रमुख पाहुणे शरद पाटील, ऍड. अभय पाटील यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित मान्यवरांसोबतच शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, तसेच अनेक पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते.सौ. वैशाली सूर्यवंशी यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी अशा उपक्रमांची महत्त्वाची भूमिका अधोरेखित केली. त्यांनी विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाची गोडी लागावी, प्रयोगशील वृत्ती विकसित व्हावी आणि त्यांच्या भवितव्यासाठी आधुनिक ज्ञानाची जोड मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. योजनाताई पाटील यांनी शिक्षण क्षेत्रातील विविध उपक्रमांची माहिती दिली व अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षणाच्या संधी उपलब्ध होऊ शकतात, असे नमूद केले. अरुण पाटील व शरद पाटील यांनी शाळेला त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि विद्यार्थ्यांना नियमित वाचन व प्रायोगिक शिक्षणावर भर देण्याचे आवाहन केले.मुख्याध्यापकांनी या उपक्रमाचे कौतुक करताना शाळेला पुस्तकांच्या माध्यमातून झालेल्या योगदानाबद्दल आभार मानले. त्यांनी सांगितले की, विज्ञान शिक्षणाचा प्रसार हा ग्रामीण भागाच्या विकासासाठी अपरिहार्य आहे.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक वृंद आणि सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांनीदेखील या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या वितरणामुळे शाळेत नवीन ऊर्जा आणि प्रेरणा संचारल्याचे जाणवले.                  कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने करण्यात आली. कार्यक्रमामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीला निश्चितच चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

विज्ञान प्रदर्शनाचा अभिनव सोहळा: जयकिरण प्रभाजी न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय योगदान

0

Loading

पाचोरा – दि. 24 डिसेंबर 2024 रोजी, मंगळवार, आप्पासाहेब पी.एस. पाटील माध्यमिक विद्यालय, नांद्रा (ता. पाचोरा) येथे 52 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहात पार पडले. या विज्ञान प्रदर्शनात जयकिरण प्रभाजी न्यू इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी आपल्या

नाविन्यपूर्ण प्रकल्पांद्वारे सहभाग नोंदवून शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेची छाप पाडली.
     वर्ग 6 वी:-जलशुद्धीकरण प्रकल्प:
पूर्वा पाटील, स्वरांगी सराफ, आणि निरुशा कुमावत यांनी सादर केलेला जलशुद्धीकरण प्रकल्प प्रदूषित पाणी शुद्ध करून पिण्यासाठी योग्य बनवण्याच्या विविध पद्धतींवर आधारित होता. त्यांनी सादर केलेल्या मॉडेलने शाश्वत जलव्यवस्थापनावर प्रकाश टाकला.
    सोलर हाऊस प्रकल्प:-स्वानंद सराफ, जयेश पाटील, दुर्गेश पाटील, आणि आदित्य पाटील यांनी सोलर हाऊसची संकल्पना प्रभावीपणे

सादर केली. या प्रकल्पात सौरऊर्जेचा उपयोग करून उर्जेची बचत कशी करता येते, यावर सविस्तर माहिती देण्यात आली.
     वर्ग 7 वी: -सूक्ष्मदर्शकाचा शोधरेवती देशमुख, लीशा जैन, प्रियांशी सोनवणे, सांची तोतला, आणि अर्पिता वावगे यांनी सूक्ष्मदर्शक कसे कार्य करते याची सखोल माहिती दिली. त्यांनी सूक्ष्मदर्शकाचा वापर करून सूक्ष्मजंतूंचा अभ्यास करण्यासाठी प्रायोगिक उदाहरणे दिली.
      नैसर्गिक शेती:-लावण्या रावडे, मीहीका जैन, आणि प्रांजल सुरवाडे यांनी सादर केलेला नैसर्गिक शेती प्रकल्प सेंद्रिय पद्धतीने शेती कशी करता येते याचे मार्गदर्शन करणारा होता. त्यांनी पर्यावरणपूरक शेतीचे महत्त्व स्पष्ट केले.
      वर्ग 8 वी:-दिशा पाटील आणि जिनिषा संघवी यांनी “जलनिर्मिती” या प्रकल्पाच्या माध्यमातून पाण्याच्या निर्मितीतील विज्ञान व त्यातील शक्यता उलगडून दाखवल्या.
      वर्ग 9 वी: -यश सुवालका आणि दर्शील प्रजापत यांनी सादर केलेला “मिनी ट्रॅक्टर” प्रकल्प ग्रामीण शेतीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या आधुनिक यंत्रणेवर आधारित होता.
    या प्रदर्शनाला पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोरआप्पा पाटील यांनी भेट दिली. त्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत त्यांच्या कल्पनाशक्ती व कर्तृत्वाला दाद दिली.
     विज्ञान प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष दिनेशजी बोथरा, उपाध्यक्ष गिरीशजी कुलकर्णी, सचिव जीवनजी जैन, सहसचिव संजयजी बडोला, खजिनदार जगदीशजी खिलोशिया, शाळा समितीचे चेअरमन लालचंदजी केसवानी, आणि सचिव रितेशजी ललवाणी यांच्यासह सर्व संचालक मंडळाचे अनमोल मार्गदर्शन लाभले.
         जयकिरण प्रभाजी न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका पुष्पलता पाटील आणि सीईओ अतुल चित्ते यांनी विद्यार्थ्यांना सतत प्रोत्साहन देत या यशस्वी कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
    विज्ञान प्रदर्शनाच्या आयोजनात स्मिता देशमुख मॅडम, संगीता पाटकरी मॅडम, आनंद दायमा सर, व इतर शिक्षकांचे विशेष योगदान राहिले. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांना यश मिळाले.
         विज्ञान प्रदर्शनाने विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला चालना देऊन त्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला नवी दिशा दिली. शिक्षण, विज्ञान, व सर्जनशीलतेच्या एका आदर्श संगमाचा अनुभव देणारे हे प्रदर्शन भविष्यातील शास्त्रज्ञ घडवण्यासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल.
      विज्ञान प्रदर्शनाच्या या आनंदोत्सवाने शाळेच्या शैक्षणिक वारश्याला नवी उंची दिली असून, विद्यार्थ्यांच्या यशाने तालुक्याचा गौरव वाढवला आहे.

स्व. मोहम्मद रफी यांच्या १००व्या जयंतीनिमित्त पाचोरा कराओके परिवाराचे सदाबहार गीतांद्वारे अभिवादन

0

Loading

पाचोरा कराओके परिवाराच्या वतीने हिंदी संगीत जगतातील अजरामर गायक स्व. मोहम्मद रफी यांच्या १००व्या जयंतीनिमित्त एका विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात रफी साहेबांच्या सदाबहार गीतांना नव्याने गाऊन, त्यांना

भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन पाचोरा येथे करण्यात आले होते, आणि त्याला संगीतप्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
     कार्यक्रमाची सुरुवात पाचोरा श्री गो से हायस्कूलचे पर्यवेक्षक रहीम तडवी यांच्या हस्ते स्व. मोहम्मद रफी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. यावेळी त्यांनी रफी साहेबांच्या संगीत कारकिर्दीवर प्रकाश टाकला आणि त्यांच्या अप्रतिम योगदानाबद्दल

आदर व्यक्त केला. त्यांच्या या योगदानामुळे रफी साहेब आजही प्रत्येक पिढीच्या मनात स्थान टिकवून आहेत.
     या विशेष प्रसंगी, पाचोरा कराओके ग्रुपच्या सदस्यांनी रफी साहेबांनी गायलेल्या अजरामर गाण्यांचे सादरीकरण केले. गायकांमध्ये सागर थोरात, रवींद्र जाधव, राजू पाटील, नासीर शेख, भरत कुमार प्रजापत, माधुरी थोरात, सार्थक थोरात, प्रज्वल प्रजापत, आणि अथर्व प्रजापत यांचा समावेश होता. त्यांच्या प्रभावी सादरीकरणाने उपस्थित रसिकांच्या हृदयात रफी साहेबांच्या आठवणी जागवल्या.
      प्रत्येक गायकाने आपल्या गायनातून रफी साहेबांच्या गाण्यांमध्ये असलेल्या विविधतेला न्याय दिला. काही गायकांनी त्यांची गाणी अतिशय उत्कटतेने सादर केली, तर काहींनी त्यातील उत्साहपूर्ण चालींना पुन्हा जिवंत केले. रफी साहेबांचे “चौदहवी का चांद”, “तेरी आंखों के सिवा” आणि “क्या हुआ तेरा वादा” यांसारखी कालातीत गाणी कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरली.
    या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशाल थोरात, पंकज धनराले, जुबेर भाई खाटीक (हॉटेल दिल्ली दरबार) यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाच्या यशात त्यांच्या मेहनतीचा मोठा वाटा होता.
       कार्यक्रमाच्या शेवटी सागर थोरात यांनी उपस्थित गायक, रसिक आणि सहकार्य करणाऱ्या व्यक्तींचे आभार मानले. त्यांनी रफी साहेबांच्या संगीताने दिलेल्या प्रेरणेचा उल्लेख करत, या कार्यक्रमाचा उद्देश संगीत क्षेत्रातील त्यांच्या अजरामर योगदानाला सलाम करणे असल्याचे सांगितले.
     एक अविस्मरणीय सांगीतिक पर्व:
पाचोरा कराओके परिवाराच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम संगीतप्रेमींसाठी एक अविस्मरणीय पर्व ठरला. मोहम्मद रफी यांच्या संगीताने भरलेला हा सोहळा प्रत्येक उपस्थिताच्या मनात कायमस्वरूपी कोरला गेला.

जळगावमध्ये दीर्घायु सुपरस्पेशालिटी आयुर्वेद हॉस्पिटल : आयुर्वेद उपचारांचा नवा विश्वास

0

Loading

जळगाव – प्रतापनगर येथील ख्वाजा मिया रोडवर स्थापन झालेल्या दीर्घायु सुपरस्पेशालिटी आयुर्वेद हॉस्पिटल आणि पंचकर्म सेंटरने आयुर्वेद उपचारांमध्ये नवा विश्वास निर्माण केला आहे. वैद्य योगेश तुकाराम तेली (BAMS, पारायणी नाडी वैद्य आणि आयुर्वेदाचार्य) आणि वैद्य महिमा योगेश तेली (SAMS, पारायणी नाडी वैद्य) यांच्या नेतृत्वाखाली हे केंद्र रुग्णांच्या विविध आजारांवर आयुर्वेद पद्धतीने प्रभावी उपचार पुरवत आहे.                                         येथे हृदयविकार, मधुमेह, कॅन्सर, पचनविकार, स्त्री-पुरुष वंध्यत्व, मुळव्याध, सांधेदुखी, त्वचारोग, मानसिक आजार अशा अनेक आजारांवर पारंपरिक आयुर्वेदिक उपचार केले जातात. तसेच ऍसिडिटी, मायग्रेन, कंबरदुखी, यूरिक अॅसिड वाढणे (गाऊट), मणक्यांमध्ये गॅप, लघवीच्या तक्रारी आणि जुनी सर्दी अशा आजारांवरही सखोल उपचार केले जातात.       हॉस्पिटलमध्ये पंचकर्म उपचार पद्धतींचाही समावेश आहे. शिरोधारा, विध्दकर्म, अन्नीकर्म, पादाभ्यंग अशा उपचार पद्धतींमुळे शरीरशुद्धी आणि मानसिक स्वास्थ्याचा अनुभव घेता येतो. लहान मुलांसाठी सुवर्णप्राशन उपचाराचा विशेष लाभ येथे मिळतो.                             गुरुवारी वैद्य योगेश तुकाराम तेली हे पाचोऱ्यातील वृंदावन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ओपीडी सेवा देतात. या सेवेसाठी दुपारी 12 ते सायंकाळी 5 या वेळेत रुग्णांना तपासणीसाठी उपस्थित राहता येईल. नाव नोंदणीसाठी 9860487198 या क्रमांकावर संपर्क साधता येतो.                                 जळगावमधील रुग्णांसाठी दीर्घायु सुपरस्पेशालिटी आयुर्वेद हॉस्पिटल हे एक विश्वासार्ह केंद्र बनले आहे. ख्वाजा मिया रोड, डॉ. संजय महाजन यांच्या दवाखान्यासमोर, स्वामी समर्थ केंद्राजवळ, प्रतापनगर, जळगाव येथे असलेल्या या हॉस्पिटलमध्ये सर्व आयुर्वेदिक उपचारांची सुविधा उपलब्ध आहे.                                    आरोग्याच्या विविध समस्या दूर करण्यासाठी पारंपरिक आयुर्वेद उपचाराचा लाभ घ्यायचा असल्यास दीर्घायु सुपरस्पेशालिटी आयुर्वेद हॉस्पिटलला नक्की भेट द्या. संपर्कासाठी 9860487198 वर संपर्क साधा आणि आयुर्वेदाच्या माध्यमातून आपले आरोग्य सशक्त बनवा.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!