Home Blog Page 49

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करा — पाचोर्यात महाविकास आघाडीचे जारगाव चौफुलीवर जोरदार रस्ता रोको आंदोलन, सरकार विरोधात घोषणांनी परिसर दणाणला

0

Loading

पाचोरा – तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे झालेले मोठ्या प्रमाणावर नुकसान, त्यावर शासनाकडून झालेली केवळ घोषणांची पोकळ मालिका आणि शेतकरी अनुदान वितरणातील घोटाळ्यांमुळे प्रचंड नाराज झालेले शेतकरी आता रस्त्यावर उतरले आहेत. दिवाळीच्या उंबरठ्यावरही शासनाकडून अनुदानाचे पैसे न मिळाल्याने शेतकरी असंतोषाने पेटले आहेत. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा) घटक पक्षांनी जारगाव चौफुली येथे भव्य रस्ता रोको आंदोलन करून शासनाविरोधात घोषणाबाजी केली. “शेतकऱ्यांचा विश्वासघात बंद करा”, “अनुदान घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा”, “शेतकऱ्यांचा हक्क परत द्या”, “सरकार जागे व्हा” अशा गर्जनांनी परिसर दणाणून गेला काँग्रेसचे माजी सभापती शेख इस्माईल शेख फकीरा, अॅड. अविनाश भालेराव, शिवसेना (उबाठा) चे उपनेते गुलाबराव वाघ, माजी सभापती उद्धव मराठे, ज्येष्ठ शिवसैनिक रमेश बाफना, राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन तावडे, शहराध्यक्ष अजहर खान तसेच विविध संघटनांचे नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी आंदोलनकर्त्यांनी शासनाकडे केलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये — शेतकरी अनुदान घोटाळ्याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच ज्यांच्या नावावरून अनुदान काढले गेले त्यांना लगेच अनुदान जमा करण्यात यावे, शासनाने अनुदान देताना पारदर्शकतेचा अभाव ठेवला असल्याने अनेक खरी पात्र शेतकरी वंचित राहिले आहेत, त्यामुळे ग्रामसेवक, कृषी सहाय्यक आणि पंचायत समिती पातळीवरील अनियमितता उघडकीस आणून जबाबदार अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली. काँग्रेस तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी सांगितले की, “शासनाने दिवसभर टीव्हीवर जाहीर केले की शेतकऱ्यांना मदत देत आहोत, पण वस्तुस्थिती अशी आहे की अनेक शेतकऱ्यांचे नाव यादीतून गायब आहे. काहींच्या खात्यात शून्य रुपये आलेत. अनुदानाचे पैसे कोणाच्या खिशात गेले, हे शासनाने उघड करावे. हाच या आंदोलनाचा मुख्य उद्देश आहे.” शिवसेनेचे उपनेते गुलाबराव वाघ यांनी संताप व्यक्त करताना सांगितले, “शासनाकडे तक्रारींचा ढीग लागलेला आहे. पण प्रशासनाने केवळ दाखवाचाच पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देणे टाळले आहे. हा शेतकऱ्यांवर अन्याय असून आम्ही यापुढे अशा भ्रष्टाचाराला झुकू देणार नाही. शासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा यापुढे संपूर्ण जिल्ह्यात चक्काजाम आंदोलन करण्यात येईल.” आंदोलनस्थळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी नितीन तावडे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, “शासनाकडून जाहीर झालेले एक लाख रुपयांचे साहाय्य हे आजही फक्त कागदावर आहे. अनेक शेतकऱ्यांनी नावे असतानाही पैसे मिळाले नाहीत. काही प्रकरणांमध्ये तथाकथित दलालांनी ऑनलाइन अर्ज करून खोटी माहिती देत अनुदान उचलले आहे. हे अत्यंत गंभीर असून याची सखोल चौकशी झालीच पाहिजे.” आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी एकमुखाने ठरवले की, पाचोरा तालुक्यातील प्रत्येक गावातील शेतकरी आता आपल्या अधिकारासाठी उभा राहील. गावागावात जनजागृती मोहीम राबवून या घोटाळ्याचे पुरावे गोळा केले जातील आणि प्रशासनाला सादर केले जातील. त्याचप्रमाणे ज्यांच्या शेतजमिनी खरडून गेल्या आहेत त्यांना हेक्टरी पाच लाख रुपये रोख स्वरूपात मिळेपर्यंत आंदोलन सुरू राहील. निवेदन देताना आंदोलनकर्त्यांनी मागणी केली की, शासनाने सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे पुन्हा करून यादी दुरुस्त करावी. खोटी नावे टाकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत. सोबतच कपाशी, सोयाबीन आणि ज्वारीसाठी तातडीने सीसीआय व शासकीय खरेदी केंद्रे सुरू करावीत, विहिरीत गाळ काढण्यासाठी दोन लाख रुपये सहाय्य द्यावे, तसेच दुधाळ जनावरांच्या नुकसानीसाठी प्रत्येकी एक लाख रुपयांचे अनुदान द्यावे. या सर्व मागण्या घेऊन अखेरीस महाविकास आघाडीच्या प्रतिनिधींनी नायब तहसीलदार कुमावत यांना निवेदन सादर केले. निवेदन स्वीकृतीनंतर कार्यकर्त्यांनी “शेतकऱ्यांचा जयघोष” करत आंदोलनाची सांगता केली. तथापि, आंदोलनकर्त्यांनी चेतावणी दिली की, शासनाने या मागण्यांवर लवकर निर्णय घेतला नाही, तर यापुढे जिल्हाभर तीव्र आंदोलन उभे केले जाईल आणि शेतकऱ्यांचा न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील. आंदोलनात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी, शेख इस्माईल शेख फकीरा, अॅड. अविनाश भालेराव, शिवसेना उपनेते गुलाबराव वाघ, उद्धव मराठे, रमेश बाफना, नितीन तावडे, अजहर खान, शशिकांत पाटील, अनिल सावंत, विनोद बाविस्कर, राजेंद्र पाटील, रवींद्र पाटील, अरुण तांबे, ज्ञानेश्वर भाऊ, प्रेमचंद पाटील, प्रशांत पाटील, निखिल भुसारे, मनोज चौधरी, हरीश देवरे, खंडू सोनवणे, पप्पू जाधव, भारत पाटील, सर्जेराव पाटील, रतन परदेशी, आनंदा पाटील, पितांबर मिस्त्री, गोकुळसिंग गांगुर्डे, सांडू तडवी, अमोल महाजन, चंद्रकांत पाटील, गजू पाटील, भिकन तडवी, गुलाब पाटील, दिनकर गीते आणि असंख्य कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी महाविकास आघाडीचे हे आंदोलन तालुक्यात चर्चेचा विषय ठरले असून शासनावर दबाव वाढला आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येला शेतकऱ्यांचा हक्काचा आवाज बुलंद करणारे हे आंदोलन, प्रशासनाला जाग आणणारा ठरल्याचे स्थानिक नागरिकांनी मत व्यक्त केले.

“खान्देशचा ढाण्या वाघ” वंदनीय स्व.आप्पासाहेब ओंकार नारायण वाघ यांच्या पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण आदरांजली

0

Loading

पाचोरा( सौ.शितल महाजन)  खान्देशच्या राजकारणात ज्यांनी जनतेच्या मनावर अमिट ठसा उमटवला, सत्तेच्या प्रवाहाच्या विरोधात राहूनही जनतेच्या न्यायहक्कासाठी आयुष्यभर लढा दिला, अशा थोर लोकनेते स्व. माजी आमदार आप्पासाहेब ओंकार नारायण वाघ यांच्या पुण्यतिथी निमित्त पाचोरा विधानसभा मतदारसंघातील सर्व स्तरातील नागरिक, शेतकरी, मजूर, कष्टकरी, व्यापारी, आणि विविध जातीधर्मातील लोकांकडून त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन व भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात येत आहे.
आप्पासाहेब वाघ हे नाव उच्चारले की डोळ्यांसमोर येते ते एक निर्धार, धैर्य, प्रखर नेतृत्व आणि जनतेसाठी अहोरात्र झटणाऱ्या खऱ्या अर्थाने जननायकाचे चित्र. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत कधीच सत्ता, पद किंवा व्यक्तिगत लाभ यांचा मोह ठेवला नाही. सामान्य माणूस, शेतकरी, मजूर, व्यापारी यांच्या अडचणी आणि समस्या या त्यांच्या विचारांचा केंद्रबिंदू राहिल्या. राजकारण म्हणजे सत्तेचा मार्ग नसून सेवाभावाची शपथ आहे, हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले.
त्यांचा जन्म खान्देशच्या सुपीक मातीत झाला. लहानपणा पासूनच त्यांना सामाजिक कार्याची गोडी होती. शेतकऱ्यांचे हाल, अन्यायग्रस्तांचे अश्रू, आणि समाजातील विषमता पाहून त्यांच्या मनात असंतोष निर्माण झाला. हा असंतोष नकारात्मक न राहता सकारात्मक उर्जेत बदलून त्यांनी समाजकारणाच्या मार्गावर पाऊल टाकले. शिक्षण, रोजगार, शेती, पाणी, वीज, रस्ते आणि आरोग्य अशा सर्व क्षेत्रांत त्यांनी आपल्या मतदारसंघात मूलभूत बदल घडवून आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले.
राजकारणात प्रवेश केल्यानंतर त्यांनी जनतेच्या मनात स्थान मिळवण्यासाठी कोणतीही युक्ती न वापरता, सत्य, पारदर्शकता आणि धाडस या तीन तत्त्वांवर आधारित नेतृत्व निर्माण केले. त्यांच्या भाषणात ओज होते, परंतु त्यात केवळ शब्दांचा गडगडाट नव्हता तर प्रत्येक शब्दाच्या मागे लोकांच्या दु:खाशी जोडलेली संवेदना होती. ते ज्या भाषेत जनतेला समजेल त्या भाषेत बोलायचे — मग ती ग्रामीण बोली असो, शेतकऱ्यांची माती मिश्रित भाषा असो किंवा शहरातील युवकांची प्रगतिशील विचारसरणी असो. प्रत्येकाशी संवाद साधण्याची ही त्यांची शैलीच त्यांच्या लोकप्रियतेचे गमक ठरली.
आप्पासाहेब वाघ यांना “खान्देशचा ढाण्या वाघ” ही लोकाभिमुख पदवी कारणाशिवाय प्राप्त झाली नव्हती. त्यांनी आयुष्यभर अन्याय, भ्रष्टाचार, व लोकशाहीच्या नावाखाली चालणाऱ्या सत्तेच्या मक्तेदारीविरुद्ध झुंज दिली. ते नेहमी म्हणायचे, “सत्ता येते-जाते, पण जनता सदैव असते. म्हणूनच जनतेच्या विश्वासावर गदा येऊ देऊ नका.” त्यांच्या या विचारसरणीमुळेच त्यांनी अनेकदा सत्ताधाऱ्यांच्या विरोधात उभे राहूनसुद्धा लोकांचा प्रचंड पाठिंबा मिळवला.
आप्पासाहेब वाघ यांचे राजकीय योगदान केवळ विधानसभेपुरते मर्यादित नव्हते. त्यांनी पाचोरा विधानसभा मतदारसंघातील गावोगाव विकासाच्या दिशेने अनेक उपक्रम राबवले. रस्ते, पाणीपुरवठा, शाळा, आरोग्य केंद्रे, शेतकऱ्यांसाठी सिंचन योजना यांची उभारणी त्यांच्या प्रयत्नातून झाली. गरिबांच्या घरात प्रकाश आणण्यासाठी त्यांनी सुरू केलेली अनेक योजनांची अंमलबजावणी आजही लोकांच्या स्मरणात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा परिसरात सामाजिक सलोखा, बंधुता, आणि जातीय एकता यांचे सुंदर उदाहरण निर्माण झाले.
त्यांच्या नेतृत्वाचा प्रभाव असा होता की विरोधक सुद्धा त्यांचा सन्मान करायचे. कारण त्यांच्या प्रत्येक निर्णयामागे स्वार्थ नव्हता, तर समाजहिताची भावना होती. ते खऱ्या अर्थाने सर्व धर्म, जाती आणि वर्ग यांचे समानतेने प्रतिनिधित्व करणारे नेते होते. निवडणुकीच्या काळात मतदारसंघात घरून भाकरी बांधून आणलेल्या आणि प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांची त्यांच्या भोवती गजबज असायची, पण आप्पासाहेब यांच्या प्रचारात नेहमी आदर्श आणि शिस्त दिसायची. लोक त्यांना मत देत नव्हते, तर आपुलकीने आपले मानून निवडून देत होते.
राजकारणात असताना त्यांनी अनेक चढउतार पाहिले, परंतु कधीही आत्मसन्मानावर तडा जाऊ दिला नाही. त्यांनी एकदा दिलेला शब्द नेहमी निभावला. वेळे प्रसंगी जनतेच्या प्रश्नांसाठी विधानसभेत आवाज उठवताना त्यांनी निर्भीडपणे प्रशासनाला प्रश्न विचारले. “सरकार बदलते, पण माझा जनतेवरील विश्वास बदलत नाही,” असे ते ठामपणे सांगायचे. त्यांचा हा आत्मविश्वासच त्यांना सामान्य राजकारण्यांपेक्षा वेगळा ठरवतो.
आज त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने पाचोरा तालुक्यातील सर्वच समाजघटक त्यांचे कार्य स्मरतात.त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करताना प्रत्येकाच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू आहेत. त्यांच्या याच विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प त्यांच्या सुपूत्रांनी घेतला आहे.
आप्पासाहेब वाघ यांच्या स्मृतीतून उभ्या राहिलेल्या अनेक पिढ्या आजही त्यांच्या विचारांनी प्रेरित आहेत. “राजकारण म्हणजे केवळ सत्ता नव्हे, तर सेवा, प्रामाणिकता आणि संघर्ष” हा त्यांचा संदेश आजच्या तरुण पिढीसाठी दिशादर्शक ठरत आहे. त्यांच्या जीवनप्रवासाने दाखवून दिले की खरे नेतृत्व म्हणजे लोकांना एकत्र आणून समाजघटनामध्ये बदल घडवून आणणे होय.
त्यांच्या निधनानंतरही त्यांचे नाव आजही जनतेच्या ओठांवर आहे. लोक म्हणतात — “आप्पासाहेब गेले, पण त्यांच्या विचारांचा ज्योत कधी विझणार नाही.” हेच त्यांचे खरे अमरत्व आहे. त्यांच्या कार्याचा प्रकाश भविष्यातील पिढ्यांना न्याय, समानता आणि समाजहिताचा मार्ग दाखवत राहील.
पाचोरा विधानसभा मतदारसंघातीलच नव्हे तर सर्वसामान्य जनता, शेतकरी, मजूर, कष्टकरी, व्यापारी, तसेच सर्व जाती-धर्मीय लोकांच्या वतीने त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन आणि भावपूर्ण आदरांजली. त्यांच्या प्रेरणादायी कार्याचा सुवास समाजात सदैव राहील,
खरोखरच, स्व. माजी आमदार आप्पासाहेब ओंकार नारायण वाघ हे नाव म्हणजे लोकशाहीच्या शिलेदारांचे प्रतीक, आणि त्यांची ओळख म्हणजे – “खान्देशचा ढाण्या वाघ” – जे जनतेसाठी जगले, आणि जनतेच्या मनातच अमर झाले.
अशा आदरणीय वंदनीय स्व. माजी आमदार आप्पासाहेब ओंकार नारायण वाघ यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त त्यांच्या पावन प्रतिमेस व स्मृतीस  झुंज वृत्तपत्र व ध्येय परिवारातर्फे विनम्र अभिवादन                  शब्दांकन-सौ. शितल सं महाजन
(उप- शिक्षका श्री गो से हायस्कूल , पाचोरा )
MO.7588645908

आज दि.17/10/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेषआज कार्यक्षेत्रात नवे संधी प्राप्त होतील. प्रयत्नांना यश मिळेल. कुटुंबातील वातावरण आनंददायी राहील. आरोग्य चांगले राहील.
शुभ अंक : 3 | शुभ रंग : लाल

वृषभआर्थिक लाभ मिळेल. मित्रांचा आधार लाभदायक ठरेल. प्रवास यशस्वी होईल. नातेवाईकांशी सौहार्द टिकवा.
शुभ अंक : 6 | शुभ रंग : हिरवा

मिथुनशिक्षण करिअरमध्ये संधी वाढतील. जुनी प्रलंबित कामे पूर्ण होतील. संवादातून फायदा होईल.
शुभ अंक : 5 | शुभ रंग : पिवळा

कर्कघरगुती जबाबदाऱ्या पार पाडाल. खर्चावर नियंत्रण ठेवा. आरोग्याकडे लक्ष ठेवा.
शुभ अंक : 2 | शुभ रंग : पांढरा

सिंहआत्मविश्वासाने काम यशस्वी होईल. समाजात मानसन्मान वाढेल. प्रेमसंबंध दृढ होतील.
शुभ अंक : 9 | शुभ रंग : केशरी

कन्याआर्थिक स्थिती सुधारेल. महत्वाची कामे पूर्ण होतील. आरोग्य उत्तम राहील.
शुभ अंक : 7 | शुभ रंग : निळा

तुळनवे करार ओळखी लाभदायक ठरतील. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. महत्वाच्या कामात यश मिळेल.
शुभ अंक : 4 | शुभ रंग : गुलाबी

वृश्चिकअनावश्यक खर्च टाळा. नोकरीत ताण जाणवेल. संयम ठेवा.
शुभ अंक : 8 | शुभ रंग : काळा

धनुधार्मिक सामाजिक कार्यात सहभाग लाभेल. प्रवासातून लाभ मिळेल. आर्थिक दृष्ट्या दिवस अनुकूल आहे.
शुभ अंक : 1 | शुभ रंग : जांभळा

मकरवरिष्ठांचे मार्गदर्शन लाभेल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. आरोग्याची काळजी घ्या.
शुभ अंक : 5 | शुभ रंग : राखाडी

कुंभआर्थिक स्थैर्य राहील. नवीन ओळखी लाभदायक ठरतील. कौटुंबिक वातावरण सुखावह राहील.
शुभ अंक : 6 | शुभ रंग : आकाशी

मीनमनातील इच्छा पूर्ण होईल. नोकरीत प्रगती होईल. वैयक्तिक आयुष्यात आनंदाचे क्षण लाभतील.
शुभ अंक : 2 | शुभ रंग : गुलाबी

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

कोळी समाज आंदोलनात स्वार्थी राजकारणाचा शिरकाव – बांधवांचा संतप्त उद्रेक थेट VDO व्हारे पहा

0

Loading

पाचोरा – येथील कोळी समाज बांधवांनी आपले न्याय्य हक्क, जातीचे दाखले व सरकारी लाभ यासाठी आंदोलनाचा मार्ग अवलंबला असताना या आंदोलनाच्या पवित्र हेतूवर काही ठराविक व्यक्तींनी स्वार्थाचा डाग लावल्याचे गंभीर आरोप समाजात होत आहेत. समाजातील काही प्रभावशाली लोकांनी आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी प्रशासनाशी गुप्त समझोते करून स्वतःचे दाखले मंजूर करून घेतले, मात्र इतर सर्व साध्या समाज बांधवांना वाऱ्यावर सोडल्याने समाजात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर कोळी समाजात संतापाचे

वातावरण निर्माण झाले असून अनेक बांधवांनी अशा स्वार्थी प्रवृत्तींचा निषेध केला आहे. समाजातील एकतेचा उपयोग काही जणांनी स्वतःचे राजकीय व वैयक्तिक उद्दिष्ट साधण्यासाठी केल्याने आंदोलनाचा मूळ हेतूच दूषित झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी लढा देणाऱ्या निष्पाप बांधवांची दिशाभूल करून काहींनी मिळवलेले फायदे उघडकीस आणण्यासाठी समाजातील कार्यकर्ते एकत्र येत आहेत. लवकरच या प्रकरणी कोळी समाज बांधवांचे मोठे आंदोलन पुन्हा उभे राहणार असल्याची चर्चा असून, या वेळी समाजातील सर्व स्तर एकत्र येऊन खऱ्या अर्थाने न्याय मिळवण्यासाठी ठाम पवित्र्यात उतरणार असल्याचे संकेत मिळत आहेत. कोळी समाजातील असंतोष आता उफाळून आला असून “आमच्यावर अन्याय सहन नाही” या भूमिकेतून नव्या चळवळीची ठिणगी पडली आहे.विशेष म्हणजे या सर्व बाबींची ध्येय न्यूजला पूर्वीच कल्पना होती वेळेवेळी काही समाज बांधवांना याबाबत सुचित देखील केले होते

भडगाव येथील कोळी समाज बांधवांच्या जातीचे दाखले कागदपत्रे घेण्यास सेतु व CSC सेंटर चालकांचा नकार – समाजात संतापाची लाट, लवकरच आंदोलनाची चेतावणी

0

Loading

भडगाव – तालुक्यातील कोळी समाज बांधवांना जातीचा दाखला मिळवण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शासनाने नागरिकांच्या सोयीसाठी उभारलेले सेतु सुविधा केंद्र आणि CSC सेंटर हेच आता या समाजातील लोकांसाठी त्रासाचे कारण ठरत आहेत. कारण, भडगाव शहरासह तालुक्यातील अनेक कोळी बांधवांनी आपले सर्व आवश्यक कागदपत्रे घेऊन जातीचा दाखला मिळवण्यासाठी सेतु व CSC सेंटरवर अर्ज सादर करण्याचा प्रयत्न केला असता, संबंधित केंद्र चालकांनी “कागदपत्रे अपुरी आहेत” किंवा “तांत्रिक अडचण आहे” अशा कारणांचा दाखला देत हे अर्ज स्वीकारण्यास नकार दिला आहे. या प्रकारामुळे कोळी समाज बांधवांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, समाज बांधवांनी प्रशासनाविरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. संबंधित प्रकरणावर बोलताना कोळी समाजातील काही बांधवांनी ध्येय न्युजशी संवाद साधताना सांगितले की, शासनाच्या निर्देशानुसार कोणत्याही जातीचा दाखला देण्याचा अधिकार हा फक्त शासकीय सक्षम अधिकाऱ्यांकडेच असतो. अर्जदाराकडून सादर झालेल्या कागदपत्रांची पडताळणी करून दाखला देणे, नाकारणे किंवा अपूर्ण कागदपत्रांची परतावणी करणे हे अधिकार सन्माननीय प्रांताधिकारी व संबंधित महसूल विभागातील अधिकारी यांच्याकडेच आहेत. मात्र, हे सर्व अधिकार असताना देखील सेतु सुविधा केंद्र आणि CSC सेंटरचे चालक स्वतःच अर्ज स्वीकारण्यास नकार देत आहेत. त्यांच्या नकारामुळे अर्जदारांना दाखला प्रक्रियेसाठी पुढे जाता येत नाही, आणि त्यामुळे समाजातील बांधवांना आवश्यक प्रमाणपत्रासाठी वारंवार दवडावे लागत आहे. अर्ज न स्वीकृत करण्याचे कारण विचारले असता संबंधित केंद्रचालकांनी “कागदपत्र अपुरे आहेत” किंवा “ऑनलाईन प्रणालीमध्ये तांत्रिक त्रुटी आहे” अशा कारणांचा आधार घेत अर्ज स्वीकारण्यास नकार दिला. परंतु वास्तवात अर्ज स्वीकारून ते शासकीय स्तरावर पाठवणे हेच त्यांच्या जबाबदारीचा भाग आहे. कागदपत्रे चुकीची आहेत का, त्यात त्रुटी आहेत का किंवा अधिक पुरावे आवश्यक आहेत का, याचा निर्णय घेणे हा प्रांताधिकारी कार्यालयाचा अधिकार आहे. अशा परिस्थितीत सेतु व CSC केंद्र चालक स्वतःच अर्ज न स्वीकारून नागरिकांच्या शासकीय अधिकारावरच अन्याय करत आहेत, अशी कोळी समाज बांधवांची भावना आहे. या अन्यायाविरुद्ध समाजात प्रचंड संताप असून, संबंधित अधिकारी व केंद्रचालकांवर कारवाई न झाल्यास येत्या काही दिवसांत भडगाव येथे कोळी समाजाकडून मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभारले जाईल, अशी तीव्र चेतावणी देण्यात आली आहे. पाचोरा ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात दिनांक 15 ऑक्टोबर रोजी सन्माननीय प्रांताधिकारी कार्यालयासमोर जमलेल्या कोळी समाज बांधवांनी आपली व्यथा ध्येय न्युजशी मांडताना सांगितले की, शासन नागरिकांना सोयीसाठी डिजिटल प्रणालीच्या माध्यमातून सेवा देत आहे. परंतु जर त्या प्रणालीतील केंद्रचालकच अर्ज स्वीकारण्यास नकार देतील, तर सामान्य नागरिक कुठे जावेत? शासनाचे उद्दिष्ट लोकाभिमुख असताना, काही सेतु केंद्र चालक मात्र स्वतःच नियम बनवत आहेत आणि त्यामुळे शासनाच्या उद्देशावर पाणी फिरत आहे. त्यामुळे सन्माननीय प्रांताधिकारी व जिल्हाधिकारी यांनी तातडीने या प्रकरणाची दखल घेऊन संबंधित सेतु सुविधा केंद्र व CSC सेंटर चालकांना योग्य तो आदेश द्यावा, अशी मागणी कोळी समाज बांधवांनी केली आहे. तसेच, शासनाने केंद्रचालकांना नागरिकांच्या अर्ज स्वीकारणे बंधनकारक करावे आणि कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्यास त्या बाबतचा अहवाल व शेरा सक्षम अधिकाऱ्यांकडे पाठवावा, अशीही मागणी करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणामुळे भडगाव तालुक्यातील कोळी समाजात मोठी चर्चा सुरू असून, समाजातील वयोवृद्धांसह तरुण वर्गही एकजुटीने या अन्यायाविरोधात उभा राहत आहे. “सेतू सुविधा म्हणजे नागरिकांच्या सेवेसाठी असलेले माध्यम आहे, पण आता तेच नागरिकांच्या समस्या वाढवणारे केंद्र बनले आहे,” अशा शब्दांत समाजातील अनेक बांधवांनी आपली नाराजी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर शासनाने या गंभीर बाबीची चौकशी करून संबंधित चालकांवर योग्य ती कारवाई करावी, जेणेकरून त्रस्त कोळी बांधवांना त्यांच्या हक्काचा जातीचा दाखला सहज उपलब्ध होईल, अशी मागणी कोळी समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.

एस. एस. एम. एम. महाविद्यालयात डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त प्रेरणादायी ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन

0

Loading

पाचोरा – पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या अखत्यारीतील श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिना’च्या औचित्याने डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त प्रेरणादायी ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे, प्रेरणादायी ग्रंथांच्या माध्यमातून आत्मविकासाला चालना देणे आणि डॉ. कलाम यांच्या विचारांचा वारसा तरुण पिढीपर्यंत पोहोचविणे हा होता. कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. त्यांच्या सोबत व्हा. चेअरमन नानासाहेब व्ही. टी. जोशी, ज्येष्ठ संचालक दादासाहेब डॉ. जयंतराव पाटील, प्राचार्य प्रा. डॉ. शिरीष पाटील, उपप्राचार्य प्रा. डॉ. वासुदेव वले, उपप्राचार्य प्रा. डॉ. जे. व्ही. पाटील तसेच ग्रंथपाल प्रा. पी. एम. डोंगरे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले. या वेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी त्यांच्या विचारसरणीला अभिवादन केले. ग्रंथ प्रदर्शनात डॉ. कलाम यांनी स्वतः लिहिलेल्या प्रसिद्ध ग्रंथांसह त्यांच्या जीवनप्रवासावर आधारित विविध लेखकांचे ग्रंथ विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले. “Wings of Fire”, “Ignited Minds”, “India 2020”, “My Journey” यांसारख्या प्रसिद्ध पुस्तकांबरोबरच त्यांच्या प्रेरणादायी विचारांवर आधारित मराठी व हिंदी भाषांतील ग्रंथांचाही समावेश करण्यात आला. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने या पुस्तकांचे अवलोकन केले व त्यातील विचार आत्मसात करण्याची इच्छा व्यक्त केली. या प्रसंगी प्राचार्य प्रा. डॉ. शिरीष पाटील यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, “डॉ. कलाम यांनी आपले संपूर्ण जीवन विज्ञान, शिक्षण आणि समाजसेवेसाठी अर्पण केले. त्यांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रामाणिकपणा, मेहनत आणि स्वप्नांना वास्तवात उतरविण्याची प्रेरणा आहे. वाचनाच्या माध्यमातून आपण त्यांचे विचार जाणून घेतले, तर आपल्या जीवनातही सकारात्मक बदल घडवून आणू शकतो.” उपप्राचार्य प्रा. डॉ. वासुदेव वले आणि प्रा. डॉ. जे. व्ही. पाटील यांनीही आपल्या विचारांतून विद्यार्थ्यांना वाचनाची सवय लावण्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, “आजच्या डिजिटल युगात वाचनाची सवय कमी होत चालली आहे. मात्र ग्रंथ हेच ज्ञानाचे खरे भांडार आहेत. डॉ. कलाम यांच्या प्रेरणादायी ग्रंथांमधून प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःच्या क्षमतेचा शोध घ्यावा आणि समाजासाठी काहीतरी उपयुक्त कार्य करावे.” या प्रसंगी विद्यार्थ्यांनी “एक महिना, एक पुस्तक” असा संकल्प करून वाचन संस्कृती जोपासण्याचा निर्धार व्यक्त केला. अनेक विद्यार्थ्यांनी “वाचन म्हणजे विचारांचा प्रवास” या संकल्पनेला स्वीकारत या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला. ग्रंथालय विभागाच्या वतीने आयोजित या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची नवी जिज्ञासा निर्माण झाली असून, त्याचा लाभ संपूर्ण शैक्षणिक वातावरणाला होणार आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. के. एस. इंगळे, डॉ. एस. बी. तडवी, डॉ. वाय. बी. पुरी, डॉ. क्रांती सोनवणे, डॉ. माणिक पाटील, प्रा. स्वप्नील भोसले, प्रा. प्रदीप रुद्रसवाड, डॉ. सरोज अग्रवाल, डॉ. प्राजक्ता शितोळे, प्रा. सुवर्णा पाटील, डॉ. सपना रावते, प्रा. सुनीता तडवी, प्रा. सुनील पाटील, श्री. विजय सोनजे, श्री. अभिषेक जाधव आणि श्री. उमेश माळी यांनी विशेष योगदान दिले. ग्रंथ प्रदर्शनाच्या आयोजनासाठी ग्रंथपाल प्रा. पी. एम. डोंगरे यांनी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या सहकार्याने श्री. विजय सोनजे व श्री. उमेश माळी यांनी कार्यक्रमाचे नियोजन, ग्रंथांचे प्रदर्शन मांडणी, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन या सर्व बाबतीत उल्लेखनीय योगदान दिले. उपस्थित मान्यवरांनी त्यांचे कौतुक करत भविष्यात अशा उपक्रमांना सातत्य देण्याचे आवाहन केले. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त भरविण्यात आलेले हे ग्रंथ प्रदर्शन म्हणजे केवळ पुस्तकांचे प्रदर्शन नव्हते, तर ते विद्यार्थ्यांसाठी ज्ञान, प्रेरणा आणि आत्मविकासाचा एक सजीव मेळावा ठरला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी वाचनाच्या माध्यमातून स्वतःमध्ये विचारांची नवी ऊर्जा जागविली असून, “वाचन प्रेरणा दिन” हा दिवस त्यांच्या शैक्षणिक जीवनात स्मरणीय ठरला आहे.

पाचोरा नगरपालिकेत निवडणुकीचे रणशिंग फुंकले – प्रशासकीय कारभार शिस्तबद्ध, विकासकामे टॉऊन हॉल मधील पार्कीगच्या जागातील अतिक्रमण सोडले तर सर्व कामे युद्धपातळीवर सुरू

0

Loading

पाचोरा नगरपालिकेचा शिस्तबद्ध कारभार नागरिकांच्या समाधानाचा केंद्रबिंदू — प्रशासक मंगेश देवरे यांच्या नेतृत्वाखाली “काम बोले – राजकारण नव्हे” या संस्कृतीचा उदय
पाचोरा – शहरात आगामी नगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे. गलियार्‍यांमध्ये चर्चा, गणितं, आणि समीकरणांच्या जोडघटती रंग घेऊ लागल्या आहेत. काहीजण एकतर्फी निकालाची भविष्यवाणी करत आहेत, तर काहींच्या मते यावेळी दुतर्फी किंवा तीन-चार तर्फी लढत रंगणार आहे. मात्र एक गोष्ट निश्चित — यावेळची निवडणूक पाचोऱ्यातील राजकारणाचा चेहरामोहरा बदलणारी ठरणार आहे. निवडणुकीचे वातावरण गरम होत असले तरी सध्या शहराचा कारभार पूर्णपणे राजकारणमुक्त, शिस्तबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने चालू आहे. प्रशासक तथा मुख्याधिकारी मंगेश देवरे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासकीय व्यवस्थेने नागरिकांचा विश्वास जिंकला आहे. नगरपालिकेचा कारभार सध्या अशा टप्प्यावर आहे, जिथे कोणाच्याही हस्तक्षेपाशिवाय प्रत्येक निर्णय नियमांनुसार घेतला जात आहे. कोणत्याही राजकीय दबावाशिवाय कामकाज केल्याने नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. प्रशासनाने शहराच्या विकासाची दिशा निश्चित करून प्रत्येक प्रकल्पासाठी ठराविक वेळापत्रक आखले असून, त्या वेळेत काम पूर्ण होईल यासाठी अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांनी स्वतःला समर्पित केले आहे. परिणामी, शहरातील स्वच्छता, रस्ते, पाणीपुरवठा, नळजोडणी, प्रकाश व्यवस्था अशा अनेक मूलभूत क्षेत्रांत सातत्याने सुधारणा होत आहे. प्रशासक मंगेश देवरे यांनी शहरातील नागरिकांना आवश्यक असलेल्या सुविधा उपलब्ध करून देण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली शहरातील विविध भागांमध्ये सुरू असलेली विकासकामे युद्धपातळीवर पूर्ण केली जात आहेत. शहराचा चेहरामोहरा बदलत असताना एक-दोन भागांतील अनियमिततेचे मुद्दे मात्र चर्चेचा विषय ठरत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सुशील डेअरी आणि साई मंदिर परिसरात बसलेल्या भाजीपाला विक्रेत्यांच्या प्रश्नावरून काही वाद निर्माण झाले आहेत. या परिसरात बसणाऱ्या भाजीपाला विक्रेत्यांवर स्पेशल ब्रँचच्या पथकाने कडक नजर ठेवली असल्याचे दिसते. मात्र या पथकाच्या कारभारावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. शहरातील नागरिकांचा सवाल आहे की, हे पथक खरंच निष्पक्ष काम करत आहे का? कारण बाजारपेठेत गाळेधारक नियमित भाडे भरत असताना, काही रस्त्यावरील विक्रेत्यांवर विशेष लक्ष दिले जात असल्याची चर्चा आहे. हे पथक शेतकऱ्यांना त्रास देत असल्याची नाराजी देखील व्यक्त होत आहे. शहरातील नागरिक म्हणतात की, “भ्रष्टाचारमुक्त” अशी ओळख असलेल्या या पथकाने जर खरोखरच निष्पक्षता दाखवली असती, तर फक्त भुयारी पुलापासून साई मंदिरापर्यंतच नव्हे तर शहरातील सर्व ठिकाणी समान निकष लावले गेले असते. त्याचप्रमाणे, हुतात्मा स्मारक समोरील टाऊन हॉल परिसरात बसवण्यात आलेल्या पाईप्समुळे नागरिकांना आणि वाहनचालकांना मोठी गैरसोय भासत आहे. त्या ठिकाणी पाईप लावण्याचा निर्णय कोणत्या नियमांनुसार आणि कोणाच्या आदेशाखाली घेण्यात आला, हा देखील नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. पाईपमुळे केवळ चारचाकी वाहने नव्हे, तर दुचाकी वाहने पार्किंगसाठी देखील अडचणीचे ठरत आहेत. टाऊन हॉलमधील एका व्यापाऱ्याने गाळा भाड्याने घेतल्यानंतर पार्किंगच्या जागेतच टेबल, खुर्च्या आणि चहाच्या जार ठेवून व्यवसाय सुरू केला आहे, असे नागरिक सांगतात. या अतिक्रमणाकडे प्रशासनाचे लक्ष असूनही कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये प्रश्न निर्माण झाला आहे की, “फुकटचा चहा न पिणारे” हे अतिक्रमणविरोधी अधिकारी या ठिकाणीच डोळेझाक का करत आहेत? या लहानशा अपवादांशिवाय, नगरपालिकेच्या एकंदर कारभारात तक्रारींचा सूर मात्र नाही. एखादी किरकोळ अडचण आली तरी ती तात्काळ सोडवली जाते. अधिकारी व कर्मचारी वर्ग शिस्तबद्ध पद्धतीने काम करत असून, जनतेशी संवाद साधण्याची त्यांची पद्धत प्रशंसनीय आहे. राजकीय हस्तक्षेप नसल्याने कामकाज अधिक पारदर्शक झाले आहे. पूर्वी ज्या ठिकाणी एखादे काम मंजूर होण्यासाठी विविध दबावगट आणि टक्केवारीचे राजकारण चालायचे, ते आता पूर्णपणे थांबले आहे. प्रत्येक कामासाठी आवश्यक निधी, मंजुरी आणि नियोजन वेळेत पूर्ण होत आहे. नगरपालिकेच्या कारभारावर स्थानिक ज्येष्ठ नागरिक, व्यापारी वर्ग, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार या सगळ्यांचं लक्ष आहे. या सर्व घटकांचे एकमताने मत आहे की, “सध्याच्या काळात प्रशासन ज्या पद्धतीने काम करत आहे, त्यात कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप नाही.” त्यामुळे शहरात वादविवाद निर्माण होत नाहीत, उलट शांततेचे वातावरण आहे. प्रशासक तथा मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी घेतलेली धोरणात्मक भूमिका शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देणारी ठरली आहे. त्यांनी प्रत्येक विभागात पारदर्शकता आणि जबाबदारी यांचा संगम घडवून आणला आहे. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचारी वर्गालाही नियमांच्या चौकटीत राहून काम करण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे. परिणामी, कामकाजाचा वेग वाढला असून नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. नागरिकांमध्ये एकमताने असा विचार पुढे येत आहे की, जर पुढेही नगरपालिकेचा कारभार या प्रशासकीय पद्धतीनेच चालवला गेला, तर पाचोरा शहराचा विकास अधिक वेगाने होईल. कारण सध्याची कामे “राजकारणमुक्त” वातावरणात होत आहेत, आणि त्यामुळे शहराची प्रगती स्थिर व नियोजनबद्ध मार्गाने सुरू आहे. मुख्याधिकारी मंगेश देवरे यांचा दृष्टिकोन अत्यंत दूरदर्शी आहे. शहरातील स्वच्छ भारत अभियानांतर्गत घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा व्यवस्था, नळजोडणी प्रकल्प, आणि रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण ही कामे निश्चित वेळेत पूर्ण होत आहेत. पूरग्रस्त परिस्थितीतही प्रशासनाने दाखवलेली तत्परता उल्लेखनीय ठरली. रात्री-दिवस चालणाऱ्या कामांमुळे नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी विश्वास आणि आदर वाढला आहे. आगामी नगर पालिका निवडणुकीत कोणतेही राजकीय पॅनल सत्तेवर आले, तरी मंगेश देवरे यांच्या नेतृत्वाखालील हा काळ पुढील प्रतिनिधींसाठी आदर्श ठरेल, यात शंका नाही. कारण या काळात “काम बोले – राजकारण नव्हे” ही नवी संस्कृती पाचोऱ्यात दृढपणे रुजली आहे. सार्वजनिक निधीचा योग्य वापर, नागरिकांच्या अडचणींना प्राधान्य, आणि पारदर्शक कारभार या सर्व बाबी शहराला नवे शिखर गाठण्यासाठी मदत करत आहेत. निवडणुकीनंतर जर सर्वानुमते असा निर्णय झाला की, सध्याप्रमाणे टक्केवारीचे वितरण न करता नियमानुसार विकासकामांची पद्धत कायम ठेवायची, तर शहराचा विकास अधिक नियंत्रित, स्थिर आणि सातत्यपूर्ण राहील. अखेरीस हेच म्हणावे लागेल की, प्रशासक तथा मुख्याधिकारी मंगेश देवरे यांच्या संयमित, निर्णयक्षम आणि दूरदर्शी नेतृत्वामुळे पाचोरा शहरात “काम बोले – राजकारण नव्हे” या नव्या संस्कृतीचा पाया भक्कम झाला आहे. भविष्यातही हीच दिशा कायम राहिली, तर पाचोरा शहर विकास, शिस्त आणि स्वच्छतेच्या आदर्श उदाहरणांपैकी एक ठरेल यात शंका नाही.

आज दि.16/10/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेषआज कार्यक्षेत्रात गती येईल. प्रयत्नांना यश मिळेल. कुटुंबीयांशी संबंध आनंददायी राहतील. आरोग्य उत्तम राहील.
शुभ अंक : 3 | शुभ रंग : लाल

वृषभआर्थिक लाभ मिळेल. मित्रांचा आधार लाभदायक ठरेल. प्रवास यशस्वी होईल. नातेवाईकांशी सौहार्द टिकवा.
शुभ अंक : 6 | शुभ रंग : हिरवा

मिथुनशिक्षण करिअरमध्ये संधी वाढतील. जुनी प्रलंबित कामे पूर्ण होतील. संवादातून फायदा होईल.
शुभ अंक : 5 | शुभ रंग : पिवळा

कर्कघरगुती जबाबदाऱ्या पार पाडाल. खर्चावर नियंत्रण ठेवा. आरोग्याकडे लक्ष ठेवा.
शुभ अंक : 2 | शुभ रंग : पांढरा

सिंहआत्मविश्वासाने काम यशस्वी होईल. समाजात मानसन्मान वाढेल. प्रेमसंबंध दृढ होतील.
शुभ अंक : 9 | शुभ रंग : केशरी

कन्याआर्थिक स्थिती सुधारेल. महत्वाची कामे पूर्ण होतील. आरोग्य उत्तम राहील.
शुभ अंक : 7 | शुभ रंग : निळा

तुळनवे करार ओळखी लाभदायक ठरतील. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. महत्वाच्या कामात यश मिळेल.
शुभ अंक : 4 | शुभ रंग : गुलाबी

वृश्चिकअनावश्यक खर्च टाळा. नोकरीत ताण जाणवेल. संयम ठेवा.
शुभ अंक : 8 | शुभ रंग : काळा

धनुधार्मिक सामाजिक कार्यात सहभाग लाभेल. प्रवासातून लाभ मिळेल. आर्थिक दृष्ट्या दिवस अनुकूल आहे.
शुभ अंक : 1 | शुभ रंग : जांभळा

मकरवरिष्ठांचे मार्गदर्शन लाभेल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. आरोग्याची काळजी घ्या.
शुभ अंक : 5 | शुभ रंग : राखाडी

कुंभआर्थिक स्थैर्य राहील. नवीन ओळखी लाभदायक ठरतील. कौटुंबिक वातावरण सुखावह राहील.
शुभ अंक : 6 | शुभ रंग : आकाशी

मीनमनातील इच्छा पूर्ण होईल. नोकरीत प्रगती होईल. वैयक्तिक आयुष्यात आनंदाचे क्षण लाभतील.
शुभ अंक : 2 | शुभ रंग : गुलाबी

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका महाविद्यालयाचा ‘अंकुर’ अंकाचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ यांच्या हस्ते अंक प्रकाशन

0

Loading

पाचोरा – तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय हे पाचोरा तालुक्यातील अग्रगण्य, गुणवत्तापूर्ण आणि प्रगत शिक्षण देणारे एक प्रतिष्ठित शिक्षणकेंद्र म्हणून ओळखले जाते. संस्थेने गेली अनेक दशके केवळ शिक्षणपुरते मर्यादित न राहता, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासाला प्राधान्य देणारे विविध उपक्रम यशस्वीपणे राबवले आहेत. या परंपरेचा एक प्रेरणादायी भाग म्हणजे दरवर्षी प्रकाशित होणारे ‘अंकुर’ हे वार्षिक नियतकालिक. यावर्षी या नियतकालिकाचा ५५ वा अंक अतिशय उत्साहात, शैक्षणिक वातावरणात व सामाजिक भान जागवणाऱ्या वातावरणात प्रकाशित करण्यात आला. हा प्रकाशन सोहळा महामानव भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या करण्यात आलेल्या ‘वाचन प्रेरणा दिना’च्या औचित्याने आयोजित करण्यात आला होता. ‘ज्ञान, वाचन आणि चिंतन हेच राष्ट्रनिर्मितीचे मूळ’ या विचारांच्या प्रेरणेने हा सोहळा अविस्मरणीय ठरला. या प्रसंगी संस्थेचे चेअरमन मा. नानासाहेब संजय वाघ यांच्या शुभहस्ते ‘अंकुर’ वार्षिक नियतकालिकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन मा. नानासाहेब व्ही. टी. जोशी, ज्येष्ठ संचालक मा. दादासाहेब डॉ. जयंतराव पाटील, प्राचार्य मा. प्रा. डॉ. शिरीष पाटील, उपप्राचार्य मा. प्रा. डॉ. वासुदेव वले, उपप्राचार्य मा. प्रा. डॉ. जे. व्ही. पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागात करण्यात आले होते, जिथे पुस्तकांच्या सान्निध्यात ‘वाचन प्रेरणा दिना’चा हा सोहळा अत्यंत अर्थपूर्ण ठरला. चेअरमन मा. नानासाहेब संजय वाघ यांनी आपल्या प्रेरणादायी मनोगतात सांगितले की, “महाविद्यालयाने गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले कार्य अभिमानास्पद आहे. ‘अंकुर’ हे नियतकालिक केवळ एक वार्षिक प्रकाशन नसून, विद्यार्थ्यांच्या विचारांची आणि सृजनशीलतेची एक सुंदर झेप आहे. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये असलेले लेखन, काव्य आणि विचारांचे बीज या ‘अंकुर’मधून फुलते. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांप्रमाणे ‘वाचन’ ही प्रगतीची पहिली पायरी आहे. म्हणूनच आजच्या दिवशी ‘अंकुर’चे प्रकाशन होणे ही अत्यंत आनंदाची बाब आहे.” ते पुढे म्हणाले, “महाविद्यालयातील शिक्षकवर्ग व संपादकीय मंडळाने केलेले हे कार्य प्रेरणादायी आहे. विद्यार्थ्यांनी लेखन आणि वाचन या सवयी जोपासाव्यात, कारण पुस्तक हेच जीवनाचे सर्वोत्तम मित्र आहे. ‘अंकुर’ हे नियतकालिक विद्यार्थ्यांना समाजासाठी विचार करण्याची दृष्टी देते आणि त्यांना जबाबदार नागरिक बनवते.” यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन मा. नानासाहेब व्ही. टी. जोशी यांनीही उपस्थितांना संबोधित करत सांगितले की, “महाविद्यालयाचा ‘अंकुर’ अंक हा आपल्या संस्थेच्या प्रगतीचा आणि विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेचा आरसा आहे. संस्थेच्या प्रत्येक उपक्रमामागे शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा परिश्रम आणि बांधिलकी दिसून येते. ‘अंकुर’ हा केवळ एक नियतकालिक नाही, तर तो महाविद्यालयाच्या शैक्षणिक प्रवासाची, सामाजिक बांधिलकीची आणि सांस्कृतिक योगदानाची नोंद आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना लेखनाचा व्यासपीठ मिळते, त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळते आणि समाजात सकारात्मक विचारप्रवाह रुजतो.” जोशी यांनी पुढे सांगितले की, “वाचन हे माणसाला चिंतनशील बनवते, तर लेखन त्याला विचारशील बनवते. दोन्ही गोष्टींचे संयोजनच प्रगत समाजाची निर्मिती करू शकते. म्हणूनच ‘अंकुर’ नियतकालिक हे संस्थेच्या प्रगत विचारांचे प्रतिक आहे. आजचे विद्यार्थी उद्याचे नागरिक आहेत आणि अशा उपक्रमातूनच ते राष्ट्रनिर्मितीत योगदान देऊ शकतात.” प्राचार्य मा. प्रा. डॉ. शिरीष पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला नेहमीच प्राधान्य दिले आहे. ‘अंकुर’ नियतकालिक हे विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेचा आणि विचारांच्या अभिव्यक्तीचा सुंदर दस्तऐवज आहे. प्रत्येक लेख, कविता, चारोळी आणि छायाचित्र हे विद्यार्थ्यांच्या संवेदनशील मनाचे प्रतीक आहे. ‘वाचन प्रेरणा दिना’चे औचित्य साधून प्रकाशन झाल्याने हा अंक अधिक अर्थपूर्ण ठरतो.” उपप्राचार्य मा. प्रा. डॉ. वासुदेव वले यांनी सांगितले की, “‘अंकुर’ हे नियतकालिक विद्यार्थ्यांच्या विचारांना दिशा देणारे व्यासपीठ आहे. यातून विद्यार्थी आपले अनुभव, भावना आणि समाजाविषयीचे विचार प्रकट करतात. हे नियतकालिक विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.” उपप्राचार्य मा. प्रा. डॉ. जे. व्ही. पाटील यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करत सांगितले की, “वाचन व लेखन ही प्रत्येक विद्यार्थ्याने अंगीकारावी अशी दोन महत्त्वाची साधने आहेत. या दोन्हींच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास साधता येतो. ‘अंकुर’ हे नियतकालिक त्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरत आहे.” ज्येष्ठ संचालक मा. दादासाहेब डॉ. जयंतराव पाटील यांनीही आपल्या भाषणात सांगितले की, “आजच्या डिजिटल युगात पुस्तकांशी नातं राखणं हीच खरी विद्वत्तेची खूण आहे. ‘अंकुर’ सारखी नियतकालिके वाचनसंस्कृतीला प्रोत्साहन देतात आणि विद्यार्थ्यांमध्ये चिंतनशीलतेची ज्योत पेटवतात.” या प्रकाशन सोहळ्याला डॉ. के. एस. इंगळे, प्रा. पी. एम. डोंगरे, डॉ. एस. बी. तडवी, डॉ. वाय. बी. पुरी, डॉ. क्रांती सोनवणे, डॉ. माणिक पाटील, ‘अंकुर’ वार्षिक नियतकालिकाचे संपादक प्रा. स्वप्नील भोसले, प्रा. प्रदीप रुद्रसवाड, डॉ. सरोज अग्रवाल, डॉ. प्राजक्ता शितोळे, प्रा. सुवर्णा पाटील, डॉ. सपना रावते, प्रा. सुनीता तडवी, प्रा. सुनील पाटील, श्री. विजय सोनजे, श्री. अभिषेक जाधव, श्री. उमेश माळी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘अंकुर’ वार्षिक नियतकालिकाचे संपादक प्रा. स्वप्नील भोसले यांनी सांगितले की, “या अंकात महाविद्यालयात वर्षभर आयोजित विविध उपक्रमांचा सविस्तर आढावा, विद्यार्थ्यांचे लेख, कविता, चारोळ्या, शिक्षकांचे मार्गदर्शनपर लेख तसेच विविध विभागांच्या उपक्रमांचे संकलन करण्यात आले आहे. हा अंक विद्यार्थ्यांच्या लेखनकौशल्याला प्रेरणा देणारा ठरेल.” कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मान्यवरांच्या हस्ते संपादकीय मंडळाचे अभिनंदन करण्यात आले. ग्रंथालय विभागाची आकर्षक सजावट, विद्यार्थ्यांचा उत्साही सहभाग आणि शिक्षकांचा उत्तम समन्वय यामुळे हा प्रकाशन सोहळा संस्मरणीय ठरला. ‘अंकुर’ वार्षिक नियतकालिकाचा हा ५५ वा अंक म्हणजे केवळ एक प्रकाशन नाही, तर महाविद्यालयाच्या प्रगत विचारांची आणि विद्यार्थ्यांच्या प्रतिभेची साक्ष आहे. संस्थेचे चेअरमन मा. नानासाहेब संजय वाघ व व्हाईस चेअरमन मा. नानासाहेब व्ही. टी. जोशी यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली व प्राचार्य मा. प्रा. डॉ. शिरीष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे शैक्षणिक मंदिर विद्यार्थ्यांच्या ज्ञान, संस्कार आणि सृजनशीलतेच्या वाटचालीला नवी दिशा देत राहील, असा ठाम विश्वास उपस्थित सर्व मान्यवरांनी व्यक्त केला.

LCB पोलिसांची धडक कारवाई — मोटारसायकल चोरीच्या तपासातून उघडकीस आले २९ पाणबुडी मोटारींचे गुन्हे

0

Loading

चाळीसगांव –  ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे हातगाव येथील एका नागरिकाची मोटारसायकल चोरीला गेल्याच्या प्रकरणातून चाळीसगांव ग्रामीण पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने मोठ्या चोऱ्यांचा भंडाफोड केला आहे. या तपासात एकूण २९ पाणबुडी इलेक्ट्रीक मोटारी आणि एक हिरो स्प्लेंडर मोटारसायकल हस्तगत करण्यात आली असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून ग्रामीण भागात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतमोटार चोरीच्या मालिकेला मोठा प्रतिबंध लागला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मौजे हातगाव ता. चाळीसगांव येथील फिर्यादी व्यक्तीची हिरो स्प्लेंडर मोटारसायकल दि. १६ सप्टेंबर २०२५ रोजीच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. या घटनेवरून चाळीसगांव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक ३०८/२०२५ भारतीय न्यायसंहिता कलम ३७९ प्रमाणे (मोटार वाहन चोरी) गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यानंतर मा. पोलिस अधीक्षक सो. जळगांव तसेच वरीष्ठ पोलीस निरीक्षक सो. स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव यांच्या मार्गदर्शनानुसार समांतर तपास सुरू करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की काही संशयित व्यक्ती चोरीच्या वाहनांबाबत संशयास्पद हालचाली करीत आहेत. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने संशयित १) सोमनाथ उर्फ लंगडया रघुनाथ निकम (रा. अंधारी, ता. चाळीसगांव), २) सुधीर नाना निकम (रा. महारवाडी, ता. चाळीसगांव), आणि ३) सम्राट रविंद्र बागुल (रा. महारवाडी, ता. चाळीसगांव) यांना ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत आरोपींनी हातगाव येथून मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. आरोपींच्या कबुलीजबाबानुसार त्यांनी मोटारसायकल ठेवलेल्या ठिकाणावरून पोलिसांनी ती मोटारसायकल हस्तगत केली. पुढील तपासात या आरोपींकडून पोलिसांनी अधिक सखोल चौकशी केली असता त्यांनी ग्रामीण भागातील अनेक शेतांमधून पाण्याच्या विहिरींवरील पाणबुडी इलेक्ट्रीक मोटारी चोरून विकल्याचे उघड केले. या खुलाशानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करून आरोपींनी सांगितलेल्या ठिकाणांवर छापे टाकले. प्रारंभी ११ पाणबुडी इलेक्ट्रीक मोटारी हस्तगत करण्यात आल्या. त्यानंतर न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर आणखी तपास सुरू ठेवला असता आणखी १८ पाणबुडी इलेक्ट्रीक मोटारी सापडल्या. अशा प्रकारे आरोपींकडून एकूण २९ पाणबुडी मोटारी आणि १ चोरीची मोटारसायकल असा मोठा माल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई ही केवळ चाळीसगांव ग्रामीण पोलीस स्टेशनसाठीच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरली आहे. गेल्या काही महिन्यांपासून चाळीसगांव, अंधारी, रोहीणी आणि नांदगांव (जि. नाशिक) परिसरातील शेतकऱ्यांच्या विहिरीतील पाणबुडी मोटारी चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र या धडक कारवाईनंतर चोरट्यांच्या टोळीला मोठा आळा बसला आहे. संपूर्ण तपास व कारवाई ही मा. श्री. महेश्वर रेड्डी (पोलीस अधीक्षक, जळगांव), श्रीमती कविता नेरकर मॅडम (अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगांव), श्री. विजयकुमार ठाकुरवाड (उपविभागीय पोलीस अधिकारी, चाळीसगांव उपविभाग), श्री. राहुल गायकवाड (वरीष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव), आणि श्री. शशीकांत पाटील (पोलीस निरीक्षक, चाळीसगांव ग्रामीण पोलीस स्टेशन) यांच्या सूचनांनुसार पार पडली. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे, पोकॉ महेश पाटील, पोकॉ भूषण शेलार, पोकॉ सागर पाटील, चापोकॉ बाबासाहेब पाटील तसेच चाळीसगांव ग्रामीण पोलिसांचे राफौ युवराज नाईक, पोहेकॉ गणेश चव्हाण, दीपक नरवाडे, संदीप पाटील, तुकाराम चव्हाण आणि विजय पाटील यांनी मोलाची भूमिका बजावली. पोलीस विभागाकडून सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे की, ज्यांच्या शेतातून पाणबुडी इलेक्ट्रीक मोटारी चोरीस गेल्या असतील त्यांनी आपल्या मोटारींची ओळख पटवून आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून चाळीसगांव ग्रामीण पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा व आपला माल परत घ्यावा. या कारवाईमुळे पोलिसांच्या दक्षतेचे आणि शेतकऱ्यांच्या सुरक्षेप्रती असलेल्या बांधिलकीचे उत्कृष्ट उदाहरण समोर आले आहे. चाळीसगांव आणि नांदगांव तालुक्यातील ग्रामीण जनतेकडून या धाडसी पोलिस पथकाचे कौतुक केले जात आहे.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!